Showing posts with label इंद्रधनु -- दीपश्री. Show all posts
Showing posts with label इंद्रधनु -- दीपश्री. Show all posts

Thursday, March 9, 2017

लंच बॉक्स......


हा सिनेमा मुंबईच्या डबा संस्कृतीचा आहे.या डब्याभेवती सिनेमा रंगत जातो.एक नातं फुलतजातं.एक
तरुण बाई आणि रीटायरमेंट्ला  आलेला पुरुष यांच्यातले नातेसंबध .यांची ओळख होत जाते तीच या लंचबॉक्समुळं.हळूहळू त्याचा प्रवास प्रेमाच्या दिशेने होत जातो.

इला (इमरत कौर )....एक मध्यम वर्गातील गृहीणी,तिला एक लहान मुलगी आहे.तिच्या नव-याचे विवाहबाह्य संबंध आहेत.घरी असला तरी मोबाईलमद्ये डोकं घालून बसलेला.
इला, आपल्या हाताने चविष्ठ जेवण बनवून नव-याला खूश करु पहाणारी....
साजन ( इरफान खान ) असाच एक सरकारी काम करणारा....त्याच्या पत्नीचे निधन झाले आहे.आपल्या ऑफीसात तो जेवणाचा बाहेरुन डबा मागवतअसतो. एके दिवशी डबेवाल्याच्या चुकीमुळे इला जो नव-यासाठी डबा पाठवत असते तो साजनच्या हाती येतो.डबेवाल्याच्या लक्षात हे येत नाही आणि इलाचा डबा रोज त्याच्याकडे येऊ लागतो.या डब्यातून त्यांचा पत्रव्यवहार सुरु होतो. दोघे अनोळखी डब्यातून रोज एकमेकांना चिठ्ठ्या लिहायला लागतात.आपली मनं मोकळी करत जातात.प्रत्येक गोष्ट शेअर करु लागतात.मोकळेपणा इतका येतो की आपल्या नव-याचे विवाहबाह्य संबंध आहेत हेही ती त्याच्याशी बोलते.अश्या अनेक चिठ्ठ्यांमधून व्यक्त होत जाताना दोघं भावनिक पातळीवर एकमेकांच्या जवळ येतात.अश्याच एका चिठ्ठीत इला त्याला भूतानला चालली आहे असे सांगते.त्यावर तुझ्या बरोबर मी पण येऊ इच्छितो असे तो उत्तर पाठवतो.अनोळखी व्यक्तीबरोबर कसं भूतानला जायचं म्हणून ते हॉटेलमध्ये प्रत्यक्ष  भेटायचं ठरवतात. ती आतुरतेने वाट बघत असते.पण तो तिला भेटतच नाही.दुस-या दिवशी डब्यातून चिठ्ठी पाठवून ती त्याला न येण्याचे कारण विचारते.त्याला उत्तर म्हणून तो लिहून पाठवतो की तो तिला भेटायला आला होता , पण भेटला नाही कारण इलाच्या तुलनेत तो जास्त वयाचा  होता.तो तिला चिठ्ठीत म्हणतो आपण इथचं थांबाव.एके दिवशी इलाला त्याचा नोकरीचा पत्ता कळतो.ती तिथे जाते पण तो नोकरी सोडून नाशिकला निघून गेलेला असतो.सिनेमाच्या शेवटी तो नाशिकहून परत येतो  आणि तिचा शोध घेत असताना दाखवला आहे आणि पार्शभूमीला डब्बेवाल्यांचे संगीत चालू आहे.

समाजातल्या अश्या अनेक स्त्रीया......
आपल्या सहजीवनातील , रोजच्या जगण्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीतील आनंद ,माझा नवरा,मुलं याभोवतीचं जग  हेच आपलं आयुष्य मानणा-या ,सगळं कसं छान चाललंय हे दाखवण्याची धडपड करणा-या ,मधूनच नाही माझं चांगल चाललय म्हणून पाऊल उचलणा-या  ,गृहीणी म्हणून समाजाच्या असलेल्या मर्यादा संभाळणा-या  , जोडीदाराकडून अपेक्षित असणा-या भावनिक समाधान देणा-या गोष्टी दुस-या कोणा पुरुषाकडून मिळवणा-या अश्या अनेक स्त्रीया आपल्या आजूबाजूला आहेत.या सगळ्यांचं प्रतिनिधित्व इला ही व्यक्तिरेखा करते.सिनेमाची कथा म्हणून आपल्याला हे पटेलही,आवडेल सुद्धा.पण प्रत्यक्षात एखादी स्त्री आपल्या आवतीभोवती अशी असेल तर याकडे आपण कसे बघतो ते महत्वाचे. नाही का ?


Friday, March 6, 2015

स्वयंपाक......१

    विषय वाचल्या वाचल्या माझ्या  लहानपणीचा एक प्रसंग डोळ्यासमोर आला.भातुकली खेळत असताना आई मला खरी खरी मळलेली कणीक द्यायची.भाताला तांदूळ द्यायची,आणि काही भाज्या......इकडे भातुकली खेळत असताना हळूच माझं लक्ष नसताना माझ्या भातुकलीतल्या काही भांड्यांमध्ये खरा तयार झालेला भात,छोट्या वाटीने पाडलेल्या आणि खरंच भाजलेल्या छोट्या छोट्या पोळ्या,आणि माझ्या छोट्याश्या कढईत परतलेली खरीखरी शिजलेली भाजी.मला जादूच वाटायची.त्या न कळत्या वयात आपण कीती भारी स्वयंपाक केला असं वाटायचं.मला वाटतं याच मुळे का काय आजही मला स्वयपाकाची आवड आहे. याला आजून एक कारण असंही असावं की माझ्या लहानपनापासून मी आईच्या बरोबरीने बाबांनाही स्वयपाक करताना पाहात आले आहे.म्हणजे मला आठवतं तसं मी सहावी सातवीत असेन बहुतेक,आई ऑफीसहून येण्याआधी साधारण कणीक मळून ठेवणे,भाजी चिरुन ठेवने,वरण भाताचा कुकर लावणे अशी कामं बाबा करत.काहीवेळा त्यांच्या बरोबरीने या कामात मला त्यांनी सहभागी करुन घेतलं.ते म्हणायचे तुला जमेल तसे कर.भाजी काहीवेळा खूप मोठी चिरली जायची,भाताला पाण्याचा अंदाज चुकायचा,पण हे सगळं आई बाबांनी चालवून घेतले.त्यामुळे चुकतमाकत मी स्वयपाक शिकले.कधीही सुचना,उपदेश दिले नाहीत म्हणून त्यातली आवड आजही कायम आहे.
   माझ्या आईची एक डायरी होती .वेगवेगळ्या पदार्थांची पाककृती त्यात लिहून ठेवलेली असायची. आणि विशेष म्हणजे त्याच पद्धतीची बाबांची पण डायरी आहे.अनेक प्रकारचे मसाले,विविध प्रांतीय पाककृती ,अनेक प्रकारचे केक,एक ना अनेक पदार्थांनी ह्या डाय-या भरलेल्या आहेत.एखादा चांगला पदार्थ कोणी करत असेल तर तो डायरीत टीपून ठेवायची सवय मला यामुळेच लागली.मी रमते पदार्थ बनवण्यात आणि मला मनापासून आवडतं असे पदार्थ बनवून खाऊ घालण्यात.
     लग्नाआधी आई बाबांचे बघून बघून मी पूर्ण स्वयपाक ,अगदी पुरणपोळी सकट सगळं शिकले ते खूप आवडीने.लग्नानंतर माझी ही आवड कायम राहीली ती कौस्तुभच्या आईमुळे.आई खूप छान,चविष्ट स्वयपाक करतात.कोणताही पदार्थ खूप मनापासून करतात.त्यांचे भातांचे प्रकार खूप खास आहेत.काही गोष्टी त्यांच्या बघत बघत शिकले.
     एकत्र कुटुंब असल्याने धबडगा खूप, त्यामुळे पदार्थ करतानाची गंमत, त्यातला आनंद संपला.आवड नक्की शिल्लक आहे पण आता काही पदार्थ करताना जुन्या गोष्टी आठवतात आणि वीट येतो करण्याचा.एवढ्या धबडग्यात माझ्या स्वयपाकाला मनापासून दाद देणारी एकच व्यक्ती होती.बाबा ( कौस्तुभचे बाबा ) ,मनापासून पदार्थ कसा झालाय हे पानावर बसल्या बसल्या लगेच सांगायचे.आम्ही वेगळे झालो.दुपारी घरी जाताना ते आमच्या डेक्कनच्या घरी डोकवायचे .माझ्या गरमगरम भाकरी चालल्या असतील की हमखास खाऊन जायचे.आणि परत घरी गेल्यावर आईंना सांगायचे मजा आली आज, दिपाने गरम गरम भाकरी वाढली.खूप कौतुक होतं त्यांना. माझ्या हातची भाकरी ,आळुची भाजी,हे पदार्थ बाबांच्या विशेष आवडीचे होते. आजही स्वयपाक करताना त्यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.अशी मनापासून दाद देणारं मला आजून भेटलं नाही.तुमच्या सगळ्या स्वयपाकाचा थकवा दूर करणारी गोष्ट म्हणजे त्याला मिळणारी दाद.
     स्वयपाकाचे काम हे फक्त बायकांचेच अश्या विचारांच्या घरात मी जन्मले नाही.माहेरी कधी मी हे पाहीले नाही त्यामुळे सासरी आल्यावरचे चित्र पचवणे अवघड गेले.नंतर सवयीचा भाग म्हणून पुरुषांनी ऑर्डर सोडायची आणि बायकांनी ते करत रहायचे याची सवय झाली.पहील्यां पहील्यांदा होणारी चिडचिड त्या गोष्टी स्विकारल्याने कमी झाली.आणि कोणत्याही परीस्थितीत मग आपण आजारी पडो, आपले अ‍ॅबॉर्शन होवो,बाळंतपणातून उठो,मुलं तान्ही असो,त्यांचे आजारपण असो,अश्या गोष्टींपासून ते एखाद्या दिवशी मूड नाही म्हणून.....पण ते सगळं बाजूला सारुन स्वयपाक केलेले आहेत. आता इतक्या वर्षांनी हे सगळं सहन केले आहे म्हणून का काय या सगळ्याचा वीट आलाय,कंटाळा आलाय.थकलेली आहे मी.उत्साहच कमी झालाय.या क्षणाला या स्वयपघरातून रीटायर्ड हो म्हणलं कोणी तर आनंदान बाजूला होण्याची तयारी झाली आहे.आता जे काही करते आहे ते बळं करते असे वाटते. आता अस वाटतं कोणीतरी आयतं द्यावं हातात.नाही पडायचं त्यात.त्याहीपेक्षा आवडीच्या माझ्या राहून गेलेल्या गोष्टींमध्ये रमून जायचे आहे.त्या गोष्टी करण्यात वेळ घालवायचा आहे.आणि आता त्या दिशेने माझा प्रवास सुरु झाला आहे.


Thursday, June 26, 2014

शकुंतलामावशी

   आम्ही वाडयातून आमच्या फ्लॅटमध्ये रहायला गेलो तेव्हा मी चार पाच वर्षांची असेन आणि माझा भाऊ वर्षादीड वर्षांचा.आईची बाळंतपणाची रजा जसजशी संपत आली तसा आम्हाला संभाळायचा प्रश्न पुढे उभा राहीला. कोणीतरी संभाळायला ठेऊ या म्हणून शोध सुरु झाला.कारण घरात आजोबा होते पण माझी आजी पॅरेलिसीसने अंथरुणात होती.आई बाबांना दोघांनाही नोकरी करणे भाग होते.कीर्लोस्करांच्या बंगल्यावर बाबा तेव्हा साहेबांचे पी.ए. म्हणून काम बघत होते.तेथे स्वयंपाकाला असणारा बाळू सोलापूरचा रहाणारा.त्याच्या ओळखीची एक बाई.नव-याने सोडून दिलेली.....शकुंतला नाव तिचं.तिला आमच्याकडे रहायला ठेवा असा बाळूचा आग्रह.तिची पण सोय होईल आणि मुलांनाही संभाळेल.अतिशय प्रामाणिक आहे.त्याच्यावर विश्वास ठेवून बाबांनी तिला पुण्याला आमच्याकडे बोलावून घेतले.
   शकुंतला बाई.काय म्हणायचे त्यांना ?  कोणत्या गावाच्या ? कोणाच्या कोण...कोणावर  तरी विश्वास ठेवून आमच्या घराचा आसरा मिळेल अश्या आशेने आमच्याकडे आल्या आणि आमच्यातल्याच एक झाल्या. एखादी आजी काय करेल इतक्या प्रेमाने तिने आम्हा दोघांना लहानाचे मोठे केलं.अतिशय शिस्तीच्या,प्रसंगी धाक दाखवून पण अतिशय प्रेमळ.आमच्या झोपायच्या,खाण्यापिण्याच्या वेळा अगदी चोख सांभाळणारी.तिच्या हातच्या पातळ तव्यावरच्या भाक-या आणि झणझणीत पिठलं ......त्याची चव आजूनही जिभेवर आहे.मला एकदा हुक्की आली.मला स्वयंपाक शिकायचा म्हणून...तिने मला पहील्यांदा भाकरी शिकवली तो दिवस आजही मनात ताजा आहे.पहील्या पहील्यांदा माझ्या हातून खूपच जाड भाकरी थापली जायची.त्याला चिरा पडायच्या,फुगायची पण नाही.पण तेथून ती भाकरी पातळ जमेपर्यंतचे तिचे शिकवणे आजही आठवते.जेव्हा जेव्हा आजही मी भाकरी करते तेव्हा तेव्हा एकही दिवस असा जात नाही की मावशींची आठवण येत नाही. रावण पिठलं...हे त्यांनीच मला शिकवलं .म्हणाल्या असा ठसका लागायला हवा तेव्हा जमलं खरं पिठलं.त्यांची वाक्य आजही कानात आहेत.
    आमची आजारपण,आमचे धडपडणे....एक ना अनेक उद्योग.आईने डोळे झाकून त्यांच्यावर सोपवून नोकरी केली.तेव्हा रजाही सारख्या मिळायच्या नाहीत.आणि रजा घ्यायची गरजही कधी वाटली नाही.इतक्या प्रामाणिक,विश्वासू आणि प्रेमळ होत्या त्या. स्वत:ची कामे स्वत: करणार आणि दुस-यासाठीही झिजणार.आमच्या घरातच त्यांनी त्यांचं म्हातारपण घालवलं .त्या ऎंशी वर्षाच्या असतील त्यांना गुदघेदुखीचा त्रास अनेक वर्षे होता.आणि शेवटी शेवटी तर त्यांना चालणेही अवघड होऊन बसलं.जमीनीवर खुरडत खुरडत चालायच्या त्यातच म्हातारपणामुळे डोळ्यांना दिसणं कमी झालं होतं.एक दिवस आम्हाला म्हणाल्या मला एखाद्या वृद्धाश्रमात ठेवा साहेब .आता मला होत नाही आणि तुम्ही माझं केलेलं मला आवडणार नाही.माझे शेवटचे जे काही दिवस राहीलेत ते मी तेथे काढेन.आम्ही सगळ्यांनीच त्या गोष्टीला नकार दिला.पण त्यांचा एकच हट्ट की तुम्ही माझं करायच नाही.या कल्पनेनेच मला आधीच मरण येईल.आई बाबांनी ऎकल नाही.त्याचा त्यांनी इतका धसका घेतला की त्या आजारी पडल्या आणि अंथरुणाला खिळल्या.अनेक दिवस औषधे चालू होती पण काही उपयोग झाला नाही.त्यांच्या गावी सोलापूरला त्यांचा भाचा होता त्याला बोलावून घ्या म्हणाल्या.तेव्हा पत्र पाठवून त्याला बोलावून घेतले.आमच्या हातून त्यांना सेवा करुन घ्यायची नव्हती.तो गावी त्यांना घेऊन गेला आणि दहा बारा दिवसातच त्या गेल्या.त्यांचा शेवट आमच्या घरातच व्हावा असे आम्हा प्रत्येकाला वाटत होते.पण ते घडले नाही.माझ्या घडण्याच्या काळातली आई बाबांच्या इतकीच महत्वाची व्यक्ती म्हणजे शकुंतला मावशी होत्या.
   माझ्या आयुष्यात अशी काही माणसे आहेत की ज्यांच्या नसण्याने मी अपूर्ण रहाते त्यापैकी एक शकुंतलामावशी....

Thursday, March 7, 2013

ओझं

पिढ्यां पिढ्या येत रहातात.पण बदल होतातच असं म्हणता येत नाही. जाणीवपूर्वक, एखाद्या विचाराने बदल घडवून आणला जातो असं नाही. इच्छा नसताना मागच्या पिढीची नकोशी वाटणारी ओझी आपण अनेक वर्षे आपल्या खांद्यावर बाळगत रहातो.मनापासून आपल्याला काय वाटते हा विचार बाजूला टाकतो आणि कोणी दुखावू नये म्हणून ते करत रहातो.आत्ता जाऊ दे . आपल्या हातात येईल तेव्हा ही चौकट मोडू. आत्ता वाद होतील,मन दुखावतील,नाती तुटतील....एक ना अनेक गोष्टींच्या भिती पोटी सहन करत रहातो. आज मी बोलणार आहे ते आमच्या घरातली अशीच एक समाजाच्या दृष्टीने पिढ्यांपिढ्या चालत असलेली चौकट मोडताना मी टाकलेले पाऊल.माझे सासरे गेले.सासूबाई खूपच धार्मिक. जुन्या मताशी चिकटलेल्या.समाजाचे बंधन, का त्यांना स्वत:ला असं आवडायचं, कोणासं ठाऊक.मी विचार करत होते. बाबा गेले त्या क्षणापासून आईंनी त्यांची सौभाग्यलेणी ,त्याचं इथून पुढचं आयुष्य कसं जगायचं? काय करायचं हे त्यांनी स्वत: ठरवावं. कोणी एक व्यक्ती कींवा समाजाच्या दडपणाखाली त्यांनी कोणतीही कृती कींवा यापुढचे त्यांचे आयुष्य जगू नये अशी माझी इच्छा होती. बाबा स्वत: खूप आधुनिक विचाराचे होते.त्यांचा मृत्यूनंतरच्या सर्व विधींवर आक्षेप होता.कशाचे तेरावे चौदावे घालता. गरीबाला जेवायला मिळत नाही. आणि ज्यांना मिळतं त्यांनाच जेवणं घालायची असे ते स्वत: म्हणत. पण प्रत्यक्षात ते गेल्यानंतर आमच्या घरात हे सगळे विधी पार पडले. घरातल्या माणसांची मनं दुखावली जाऊ नये म्हणून पटत नसूनही मी गप्प राहीले. मी माझ्या हातात असणा-या गोष्टींबद्दल कसं लढता येइल याचा विचार करु लागले. एवढं केलं की गुरुजींना सांगितलं की असं काहीही आई करणार नाहीत की तुम्ही एक तो विधी आहे म्हणून त्या जोडवी, मंगळसूत्र,कूंकू,अन्य सौभाग्य अलंकार उतरवायचे, त्याचा तुम्ही उल्लेख टाळला तर बरं होईल. त्यामुळे तसं तुम्ही काही न बोलता जे काही विधी असतील ते करा. गुरुजींनी ऎकलं.हे पंधरा दिवस झाले आणि एक दिवशी मी आईंना घेऊन बसले. आणि त्यांच्याशी बोलले. खरं सांगते मनातून त्या कश्या प्रतिक्रीया देतील याची धाकधूक होती. तरी सुद्धा बोलायचे ठरवले होते. आजपासून तुमचं पुढचं आयुष्य आत्तापर्यंत तुम्ही जसं जगत होता तसंच जगावं अशी माझी इच्छा आहे. कोणी काय म्हणेल तर म्हणू देत काही झालं तर मी तुमच्या बरोबर आहे शेवटपर्यंत. तुम्ही कोणाचंच दडपण घेऊ नका. आईंचं सगळं आयुष्य सहकारनगरच्या त्यांच्या हक्काच्या घरात गेलं. पहीलं सांगितलं की तुम्हाला जिथे रहायला आवडेल , आनंद मिळेल तेथे तुम्ही रहा. तीन मुलं आसून एकट्या रहातात एवढ्या बंगल्यात...असे टोमणे लोकं मारणारच आहेत. महत्वाचं आहे ते तुम्हाला छान कोठे वाटेल याचे. तुम्ही शांतपणे विचार करा आणि ठरवा.लाल कूंकू लावायचं की नाही, जरीच्या रंगीत साड्या घालायच्या की नाही ,हळदीकूंकू यासारख्या सणाचे काय करायच,केसात गजरा माळायचा की नाही अश्या अनेक प्रश्नांवर फुल्या मारा. आपल्या घरापासून त्याची सुरवात करु या. बाबा गेल्यावर सगळे सणवार जसे पूर्वी होत होते त्या पद्धतीने आम्ही केले. कोणी म्हणत होतं यावर्षी तुम्ही गौरी बस्वणार का? गणपती बस्वणार का?दिवाळी साजरी करणार का? या सर्व प्रश्नांवर आम्ही फुली मारली. आम्ही उलट गौरीचे दरवर्षी प्रमाणे हळदीकूंकू केलं.आईंना घेऊन मी सगळ्यांकडे हळदीकूंवाला घेऊन गेले.आवर्जून सांगितलं त्यांना हलदीकूंकू लावा. आम्हाला चालतं.आज बाबा जाऊन एक वर्ष झालं पण आई त्यांचं आयुष्य पूर्वीप्रमाणे आनंदाने जगत आहेत त्यांच्या मर्जीप्रमाणे. त्यांचं असं जगणं बघून मला खूप समाधान मिळतं. मागे जाऊन विचार करते तेव्हा वाटतं की आईंच्या भितीमुळे, त्या काय म्हणतील? समाजाच्या दडपणाखाली मी त्यांच्याशी हे बोललेच नसते तर माझ्या मनावरचं हे ओझं कायमच राहीलं असतं.......

Thursday, March 8, 2012

"मी किती स्वतंत्र आहे? किती परतंत्र आहे?"

या आधीही थोड्या फार प्रमाणात यावरील काही भाग पूर्वी लिहीलेल्या काही ब्लॉगमधून स्पष्ट केला आहे.त्या व्यतिरीक्त हे थोडेसे.....
आपलं कोणावर फारसं अवलंबून रहाणं अथवा न रहाणं हे माझ्यामते आपण लहानपणापासून कसे वाढवले जातो यावर खूप अवलंबून असते.यात पालक म्हणून माझे आई वडील म्हणून प्रत्येकाची भुमिका मला महत्वाची वाटते.बाबा किर्लोस्कर मध्ये मोठ्या पदावर होते. मी साधारणत: सातवी आठवीत असीन. ते मला लकाकी बंगल्यावर,ब्ल्यू-डायमंड हॉटेलमधे घेऊन जायचे.बाबांच्या मिटींग्ज,कींवा काही मोठी लोक यांच्या गाठीभेटी,कींवा नुसतंच शंतनुराव-यमुताई कीर्लोस्करांशी गप्पा मारायला...अश्या अनेक कारणांसाठी मी त्यांच्या बरोबर पुढेही अनेक वर्षे जात असे.तेव्हा ब-याचदा त्यांची मॅनेजमेंट,ते उठतात कसे,वागतात कसे,कोणकोणत्या विषयांवर बोलतात कसे,त्यांचे रहाणीमान, त्यांच्या आवडीनिवडी , इ. अश्या अनेक विषयांची ओळख,त्यानिमित्ताने बरीच नामवंत मंडळी,अश्या जगात वावरण्याची मला नव्याने ओळख झाली ती बाबांमुळे.....एरवी घरातले बाबा सुट्टीच्या दिवशी, बॅंकेचे,पोस्टाचे,शेअर्समधील गुंतवणुक अश्या आर्थिक व्यवहारांची ओळख कींवा ही कामे बाबांच्या बरोबर जाऊन मी शिकले.मंडई,कीराणा,घरातील स्वयंपाक हा घराशी निगडीत भाग मी त्यांच्याबरोबरीने शिकले.खूप लहानपणापासून बाबा मला त्यांच्या बरोबर घेऊन जात व ही कामे करत असत. त्यामुळे नवीननवीन गोष्टी शिकले आणि त्याबरोबर एक हींमत आली.त्यांचे नेहमीच म्हणणे असते की कोठेही,कोणत्याही कामात आडले नाही पाहीजे.करुन बघा,चुका आणि त्यातून शिका.या अनुभवाने मी बिनधास्त झाले.याबरोबरीने तितकाच महत्वाचा भाग होता तो आईचा.घरातील बारीकसारीक कामे,त्यांचे नियोजन,त्याविषयीचे माझ्याशी निगडीत असलेल्या विषायांचा स्वत: निर्णय घेणे,कधी,कशी,केव्हा,का या सर्व प्रश्नांचे स्वातंत्र तिने मला दिले.मुलगी म्हणून वेळेचे बंधन कींवा मुलगी आहेस म्हणून हे करु नकोस असे कधीच वाढवले नाही.याचा परीणाम आज मी खूप स्पष्ट,नुसतीच भावनिक न रहाता काही ठीकाणी प्रॅक्टीकल होता येणं,एक प्रकारचा वावरण्यातला बिनधास्तपणा, स्वत: कोणतीही परीस्थिती आली तरी धीराने तोंड देणं या गोष्टी मला यशस्वीपणे पेलता येतात.आता राहीला भाग लग्नानंतरचा.....ब-याचदा वाटतं की कौस्तुभ घरात कश्यात लक्ष घालत नाही.पण एक आर्थिक सोडलं (म्हणजे खर्चासाठी पैशाची मागणी जरी करावी लागत असली तरी त्यापैशांच्या मी केलेल्या व्यवहाराशी त्याला काही घेणं देणं नसतं ते स्वातंत्र्य नक्कीच मला आहे.) तर बाकी कोणत्याच गोष्टींसाठी मी त्याच्यावर अवलंबून नाही,ही गोष्ट माझ्यात हींमत वाढवणारी आहे.माझ्या आजूबाजूला नात्यात मी अश्या अनेक बायका बघते की ज्या छोट्या छोट्या गोष्टींवर आपल्या नव-यांवर अवलंबून असतात. माळ्यावरचे काहीतरी काढून हवं आहे ते भाजी आणण्यापर्यंत अशी अनेक छोटी कामे.अश्याने मी कोणत्या न कोणत्या कारणांसाठी नव-यावर सतत अवलंबून आहे ही त्यांना मोहवणारी गोष्ट वाटत असावी का ?का त्या नव-यांनाही तिचं आपल्यावर अवलंबून असणं हवहवस वातत असतं?,आपण कसं वागायचं याविषयी स्वत: काहीच करायचं नाही.सगळं डोकं त्यानेच चालवायचे.यात आपली काहीच शक्ती वाया घालवायची नाही.ही गोष्ट्च अश्या बायकांना आवडणारी वाटते का? आणि यात मग चुकत माकत शिकायची मजा त्यांना घेता येत नाही.आज माझं मला एखादं वाहन चालवता येणं त्याच्या आधारे मी एकटी अथवा मुलांना घेऊन कोठेही जाऊ शकते.आम्ही तिघे मजा घेऊ शकतो.यासाठी मला कौस्तुभ बरोबर असावा याकरता मी कधीच त्याच्यावर अवलंबून रहात नाही.तो आपल्या बरोबर असेल का? त्याची गाडी असेल का? तरच आपण सगळे जाऊ. यात मी अडकून रहात नाही.यासाठी मी त्याच्यावर अवलंबून नाही.त्यामुळे मला त्यातील मजा घेता येते.तो आमच्या बरोबर असेल तर नक्कीच जास्त मजा आहे.पण तो नसतो म्हणून मी हातपाय गाळून बसत नाही.माझा प्रत्येक दीवस माझ्यापद्धतीने जगण्याचे स्वातंत्र्य मला आहे.कोणाच्या आधारावर ते अवलंबून नाही.ही गोष्ट मला आतून बाहेरुन भक्कम करणारी आहे. उद्या माझ्या पुढ्यात, माझ्या कुटुंबावर कोणतेही संकट अथवा कोणताही वाईट प्रसंग आला तरी त्या प्रसंगाला खचून न जाता धीराने सामोरे जाण्याची ताकद यातून मला मिळते.मला वाटतं स्वातंत्र्य म्हणजे आपल्या विचारांच्या देवाण घेवाणीला कुठलेही बंधन नसणे, स्वत:च्या कर्तव्याच्या जाणीवेने प्रगतीकडे उचललेले पाऊल, इतरांना त्रास न देता केलेले मनासारखे स्वच्छंदी निर्मळ वर्तन.मी आज स्वतंत्र आहे अथवा कोणावर अवलंबून नाही त्यामुळे माझ्या आयुष्यातील गोष्टी मी करताना थोडी चुकणार आहे,त्यातून शिकणार आहे,माझ्या हीमतीने मी थोडी पुढे जाणार आहे,आणि त्यातील आनंद उपभोगणार आहे.यासाठी असणारी स्वत:वरच्या विश्वासाची खात्री.त्यामुळे आमूक एक गोष्ट मला जमणार नाही कींवा त्यासाठी कोणावर तरी मी अवलंबून राहून त्यातील धडपडण्याची गंमत मी अनुभवण्याची गोष्ट सोडून देत नाही.त्याची मजा मला घेता येते.लहानपणापासून मी अश्याच पद्धतीने जगत आले.समोरच्या प्रसंगाला तोंड देत राहीले.त्याचा आस्वाद घेत राहीले.त्यामुळे आज माझं आयुष्य मी स्वंच्छंदीपणे मोकळेपणाने जगण्याचा प्रयत्न करत आहे.

Monday, October 3, 2011

सौंदर्य-४

माझ्यामते आपण जसजसे शहाणे होतो,म्हणजे वयानुसार येणारे शहाणपण म्हणा हवं तर..आपल्याला बरेच काही शिकवून जातं.मी कॉलेजला असताना जरी कॉलेजची वेळ सकाळची सात असायची तरी मला शिकवणा-या बोकील मॅडमचा माझ्यावर प्रभाव होता त्या वयात. तो इतका होता की त्या जश्या स्वत:ल प्रेझेंटेबल ठेवायच्या ते मला खूप भावायचं.त्या शिकवायला आल्यावर एक प्रकारे आख्खे वर्गातील वातावरण ताजेंतवानं व्हायचं.मला त्या ज्या पद्धतीने स्वत:ला निटनेटकं ठेवायच्या ते फार आवडायचं.मग मी ही त्या जसे मॅचिंग कुंकू त्यांच्या पोशाखाप्रमाणे अगदी बारीक काडीने काढायच्या तसे मी ही काढत असे.त्यासाठी दहा मिनीटे लवकर उठत असे.माहीत नाही हे कोणी मला चांगलं,खूप छान दीसते असं म्हणावं हा त्यामागचा हेतू कधीच नव्हता.मला आठवतंय त्यासाठी मी तुळशीबागेत ती वेगवेगळे रंग असलेली ओल्या कुंकवाची डबी खरेदी केली होती.पण नंतर त्या अश्या सुंदर दीसण्यामागे त्यांची हुशारी,शिकवण्याची पद्धत,आणि इंग्रजी व क्रीएटीव्ह विषया वरील प्रभुत्व...अश्या अनेक गोष्टीं ही होत्या की ज्या त्यांच्या सौंदर्यात भर घालत होत्या.लग्नाआधी मलाही नटावं,आपण खूप छान रहावं ,कींबहुना आपण जे कपडे घालतो त्याचा काही एक रंगसंगती असावी.या गोष्टींकडे माझं खूप लक्ष असे. म्हणजे आत्ताही ते आहेच.मला कोणत्याही पॅन्टवर भलताच शर्ट कौस्तुभने घातलेला नाही चालत.म्हणजे ऑफीसमध्ये जातानाशर्ट इन करुन जाणे,दाढी करुन जाणे,स्वत:ला प्रेझेंटेबल ठेवावं असं मला वाटतं. पण अताशा मी त्याच्या नादी नाही लागत.( बहुतेक हे मला उशीरा आलेलं शहाणपण असेल).यात कोठेही आपण सुंदर, छान दीसलो नाही तर आपल्याकडे कोणी बघणारच नाही असा विचार नसतो. कींवा शर्ट आऊट केला,कश्यावरही काहीही घातलं,दाढी न करता गेला तर अडणार काहीच नाही.पण आपण व्यवसायानिमित्त जेथे वावरतो,त्यासाठी प्रेझेंटेबल रहावं असं माझं मत असतं.मला माहीत नाही आपलं चांगलं (प्रेझेंटेबल रहाणं) रहाणीमान ही आपल्या चांगलं दीसण्यासाठीची कींवा कोणी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून करत असणारी खटपट नव्हे.

Monday, September 26, 2011

सौंदर्य-२

विद्या तुझा सौंदर्य या विषयावरचा ब्लॉग वाचला आणि तेव्हाच माझ्या लहानपणापासूनच्या काही आठवणी मनात येऊन गेल्या.लहान नू.म.वि. शाळेत असताना आमचं स्नेहसंमेलन आलं की तेव्हा मला त्याच्यात आनंद घेण्यापेक्षा मनातून खूप वाईट वाटत असे याची मुख्य कारणे म्हणजे माझी उंची,ज्यामुळे नाचात कायमच मी मागच्या रांगेत ,दुसरं म्हणजे रंग...... समाजाच्या दृष्टीने गो-या गोमट्या, देखण्या यात बसणा-या मुली स्टेजवर पुढे असत. त्यामाने कमी देखण्या मागच्या रांगेत असा जणू नियमच ठरलेला.समाजात अजूनही दीसणं हा कीती महत्वाचा मुद्दा आहे.तेव्हा त्या शाळेच्या वयात या बद्दल मनात एक प्रकारचा न्यूनगंड आला होता.त्यातून स्वत:च शहाणपण यायला बरीच वर्षे गेली.मी कॉलेजला असताना जेव्हा फोटोग्राफी विषय घेतला तेव्हा काळा रंगातील सौंदर्य म्हणजे काय?अनेक काळ्या रंगाच्या असणा-या व्यक्तींचे उत्कृष्ठ फोटो मी जेव्हा पाहीले तसतसा मनातला न्यूनगंड कमी झाला.माझं लग्न करण्याचा जेव्हा आई बाबा विचार करत होते तेव्हा आलेल्या अनेक स्थळांपैकी बहुतेक मुलांच्याकडून आलेल्या फोनवरचे संवादावरुन रंगावरुन नकार हे कारण होते.माणूस एवढा आपल्या बाह्यरुपाला महत्व देतो.याउलट इकडं कौस्तुभकडे सगळे पांढरे फटक गोरे असताना जिथून मला खात्रीने नकार येईल अशी अपेक्षा होती तिथूनच होकार आलेला पाहून मला धक्काच बसला. कारण त्याआधी आलेल्या स्थळांमध्ये आपलं दीसणं कीती महत्वाचे आहे हे अनुभवायला येत होतं.त्याबद्दल कौस्तुभचे खरंच कौतुक.आता आई म्हणून मी जेव्हा स्मृतीला वाढवतं असताना आमच्याकडे इतर माझ्या पुतण्या रंगाने गो-या आहेत त्यामुळे कधीकधी तिच्याकडूनही काळ्या रंगाबद्दलची नाराजी दीसते तेव्हा या रंगापलिकडे काही गोष्टी चांगल्या आहेत.आपलं वागणं,आपल्यातले गुण,आपल्या जवळची हुशारी ,आपल्या आवडी-निवडी अश्या अनेक विषयावर तिच्याशी बोलल्यावर तिचा चेहरा एकदम खुलतो.खरंच लहानपणापासून या गोष्टी आपण कश्या दाखवतो हे फार महत्वाचे वाटते.गोरं म्हणजे सुंदर आणि तसं आपन नसू तर अनेक गोष्टींच्या लेपनाने तो तात्पुरता गोरा रंग मिळवून समाजात मिरवणा-या बायकांकडे बघून खरंच कीव करावीशी वाटते अनेक प्रकारची महागडी सौंदर्य प्रसाधने वापरुन आपण आहोत त्यापेक्षा अधिक सुंदर दाखवणे. त्यासाठी पैसा, वेळ, आपली बुद्धी खर्च करणे म्हणजे केवळ मुर्खपणा आहे.आपल्या मुलींकडे पाहीले की खरंच बरं वाटत की घराच्या बाहेर पडताना त्यांना पावडर न लावताही बाहेर पडता येतं. स्वत:च्या दिसण्यात त्या एवढ्या गुरफटल्या जात नाहीत.आपलं बोलणं,आपलं हासणं, आपल्यातील छंद,कल्पकता यासारख्या अश्या अनेक गोष्टी म्हणजे खरं सौंदर्य......... याचा अर्थ त्यांना खूप लहान वयात माहीती होतोय.

Tuesday, March 1, 2011

छोट्या छोट्या गोष्टी..........३

सकाळी उठल्यापासून पांघरुणाची घडी घालणे,आंघोळीचे कपडे काढून ठेवणे,बेडवर आंघोळीनंतरचा त्याने तसाच फेकलेला टॉवेल उचलणे,घरातली घालायची शॉर्ट अशीच कोठेतरी भिरकावलेली ती उचलणे, ऑफीसला जातानाचे म्हणून इस्त्रीचे पॅन्ट,शर्ट,रुमाल,आदल्या दिवशी घातलेल्या पॅन्टमधून खिशातले सामान बाहेर काढून ठेवणे.वेळ इकडची तिकडे न होता वेळेवर नाष्टा तयार असणे,त्या शेजारी पाणी पिण्याचा ग्लास ठेवणे, त्यानंतर त्यांनी खाल्लेल उचलून ठेवणे, खाऊन झाल्यावर म्हणून सुपारीचा डबा समोर ठेवणे, घरातील इस्त्री करायचे असलेले कपडे इस्त्रीला ती आपलीच जबाबदारी आहे. ( कारण आता त्या गोष्टी आठवल्या की माझ्या बावळटपणाचे हासू येते.) एखादी अमूक एक पॅन्ट, कींवा शर्ट नसेल तर त्यावरुन तेव्हा कौस्तुभ भडकायचा. आणि त्याक्षणी अनेकवेळा लॉन्ड्रीवाल्याकडे त्याने मला पळवले आहे. त्याचे हे भडकणे टाळण्यासाठी म्हणा कींवा त्यापासून मला होणार असलेल्या मानसिक त्रास टाळण्यासाठी त्याची ही प्रत्येक कामे दबावाखाली ( खरतर तेव्हा ही ती त्याने स्वत:च करणे अपेक्षित होते तरीही )लग्नानंतरची सुरवातीची काही वर्षे मी चोख बजावत असे. खरतर मनात अनेकदा त्या कृतीबद्दल राग यायचा पण आईंपुढे विरोध करण्याची धमक त्यावेळी माझ्यात नव्हती.कारण एकत्र कुटुंबपद्धती.........याविषयी कधीही कौस्तुभकडे तक्रार न करता बिंनडोकासारखी ही कामे करत राहीले. खरतर तेव्हाही त्याच त्याला आपणहून कळावे अशी अपेक्षा मी ठेवत होते.
आता चित्र खूप बदलले आहे.यातील बरीचशी कामे आणि त्याबरोबरच माझी काही कामे (वैयक्तिक माझी नव्हे.आम्हा दोघांची सामाईक असलेल्या कामांपैकी काही कामात कौस्तुभचा सहभाग वाढला आहे.
तसे पाहीले तर बारीक बारीक खूप गोष्टी आहेत की त्याचा जर विचार केला तर त्रासच होणार आहे. जश्या पुरुषांच्या वागण्यात आहेत तश्या त्या आपल्याही वागण्यात आहेतच.नातं बरोबरीचे असेल व कामातील सहभाग बरोबरीने असला तर त्या गोष्टींचा त्रास होणार नाही.यात फरक पडला की मनस्ताप होतो.

Tuesday, January 25, 2011

सासू-सून- मुलगा....माझा विचार

मूळात कोणतीही दोन माणसे.... त्यांचे विचार वेगळे,जगण्याची उद्दीष्टे वेगळी,पद्धती वेगळ्या,आवडी-निवडी वेगळ्या.हे आपण जर समजावून घेत असू तर आपली अपेक्षा अशी असते की समोरच्याने पण तसाच आपल्या सारखा विचार करावा. आणि यामध्ये फरक पडत असेल तर मतभेद, वादविवाद यांना सुरुवात होते. मग ते नातं कोणतही असो.भाऊ- बहीण, आई-मुलगी, नणंद-भावजय,सासू-सून,नवरा-बायको आणि अशी अनेक. पण या सगळ्यांमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात सासू- सून हे नात जास्त डोक्यात जातं. मला वाटतं की यामागची कारणं सुद्धा शोधली पाहीजेत. तसा विचार करायला हवा.
नणंद-भावजय.........
आमच्याकडे कौस्तुभला सख्खी बहीण नाही. त्यामुळे नणंद या नात्यापासून मी वाचले. असे म्हणते कारण माझ्या आईच्या आणि माझ्या आत्त्याच्या नात्याच्या आठवणींनी त्या नात्यातील अनुभवाने मी जेव्हा लग्नाला उभी राहीले तेव्हाच आई- बाबांना माझी एक अट घातली की मला एकवेळ दोन-चार दिर असतील तर चालतील पण नणंद नको.नणंद-भावजय या नात्याचीच डोक्यात तिडीक बसली होती. आता तुम्ही म्हणाल की मी कोणाची तरी नणंद आहेच. नक्कीच आहे. आता मलाही भावजय आहे. पण मागील पीढीचा हा अनुभव पाहून त्यानुसार आमच्या दोघींचे नाते जास्तीत जास्त कसे चांगले राहील यासाठीचे वागणे माझ्या हातात आहे.ती नोकरी करते.भावाचे लग्न झाले तसे आईला- बाबांना बसून समजावून सांगितले की आता उटसूट माहेरी येणे,किंवा माहेरच्या कोणत्याही निर्णयात माझे मत ग्राह्य धरणे चुकीचे आहे.ती नव्याने घरात आली आहे तुमच्या चौघांच्या एकमेकांतील नात्याने हे घर फुलूद्यात.त्या आनंदात आम्ही नक्कीच तुमच्या बरोबर आहोत.आणि हे माझ्या आईनेही चांगल्या रीतीने स्विकारले आहे. आणि यामुळेच भावजयीला जर का एखाद्याचे वागणे मग ते माझ्या भावाबद्दल असो, कींवा आई-बाबांच्या बद्दल असो तिचा हक्काने मला फोन येतो आणि यात कोठेही तक्रारीचा सूर नसतो व तो प्रॉब्लेम चुटकीसरशी सामज्यस्याने सोडवला जातो. समजावून घेऊन कोणत्याही नात्याला कोणत्याही नात्याशी मोकळेपणाने एखादी अडचण मांडता यावी असे नाते असावे असे मला मनापासून वाटते.
सासू-मुलगा-सून...........
या नात्यातही रोज छोट्या-छोट्या कारणांवरुन वाद हे होणारच आहेत. सुरवातीला माझं प्रचंड डोकं फीरायचं.आणि त्यातून माझा स्वभाव हा कोणाही बद्दल काही तक्रार न सांगण्याचा. त्यामुळे या स्वभावाने मी मला स्वत:ला आतल्या आत खूपच त्रास करुन घेत असे.माझा चेहराच बघून खूपदा कौस्तुभ मला विचारत असे की काय झालं पण मी त्याला म्हणत होते की तुझ्या पर्यंत काही नाही. याचा अर्थच असा की जरी सासूचे वागणे आपल्याला खटकणारे असले तरी आपण ज्याच्याकडे तिच्याविषयीची तक्रार करणार आहे तो आपला नवरा असण्या आधी तिचा मुलगा आहे.कोणत्याही मुलाला त्याच्या आईविषयी तक्रार ऎकून घेणे हे अपमानास्पद वाटते. रहाता राहीला प्रश्न कोण चूक कोण बरोबर. आणि त्याने कोणाची बाजू घ्यायची.खरंतर सासू-सून वादातील पूर्ण प्रसंग घडताना तो नवरा म्हणजेच सासूचा मुलगा हा त्या प्रसंगाला हजर असणे आणि तो हजर नसताना घडून गेलेल्या वादावर दोघींच्या बाबतीत योग्य निर्णयाने वागणे यात फरक आहे.कारण प्रत्येकजण आपण बरोबर या धारणेने त्या मूलाच्या म्हणजेच नव-याच्या पुढे आपली बाजू मांडत असतो.अश्यावेळी आपल्या भोवतालची परीस्थिती जर वर्षानुवर्षे तशीच रहाणार आहे तर अश्या माणसांचा, अश्या परीस्थितीचा त्रास करुन न घेता त्याने योग्य निर्णय घेणे.हे मला महत्वाचे वाटते.आणि शेवटी सगळ्यात महत्वाचे आपण नवरा- बायको म्हणून जेव्हा दोघेच असतो तो पर्यंत काही नाही. पण जेव्हा मुलं होतात तेव्हा त्यांच्यापुढे, संपूर्ण घराचे मनस्वास्थ्य संभाळणे गरजेचे आहे असे वाटते.
पूर्वी यातलं मला काहीच जमत नव्हतं यातून काय मार्ग काढावा काहीच सुचत नव्हते. याचा परीणाम कौस्तुभवर सतत चिडचिड होत होती.पण एक दिवस शांत बसून विचार केला व त्यातून मार्ग सापडला.आपल्या स्वत:च्या स्वास्थ्यासाठी, आपल्या मुलांसाठी, त्यांचे बालपण आनंददायी रहाण्यासाठी, घर हसतं रहाण्यासाठी, प्रत्येक नात्यातील काही खटकणा-या गोष्टीं नक्की सोडून देऊयात.

Wednesday, November 24, 2010

कमावतं असणं आणि नसणं

तुम्ही जर एकत्र कुटुंबात रहात असाल अथवा पुरुष प्रधान घरात असाल तर तुम्ही कमावतं असणं आणि नसणं यावर तुमचं घरातलं स्थान निश्चितच अवलंबून असते असं मला नक्की वाटतं. काही एका रकमेच्या पुढील खर्च त्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीने घ्यायचा व त्यानंतर तो प्रस्ताव पटला तर तो मान्य करायचा यात त्या स्त्रीची स्वत:ची गरज, आवडनिवड,तिला काय वाटते हे मतच धरले जात नाही. आणि याचा आपण कमावते नाहीत याची एक बोचणी मनाला लागून रहाते. पिढ्यानपिढ्या हे असेच चालू राहील्याने या प्रवाहाविरुद्ध वागण्याला कोणीच पुढं येत नाही. आणि मग यात जी कमावती नसते तीची मात्र फरफट होत रहाते.आणि अगदी फालतू गोष्टींसाठी सतत कुटुंबातील कोणा न कोणा तरी व्यक्तीपुढे पैशांसाठी हात पसरावा लागतो.तर मोठे खर्च तर लांबच. यासगळ्यातून आपण आपल्याच माणसांचा आपल्यावर विश्वास नाही ही भावना सतत मनामध्ये घेऊन एक प्रकारची लाचारी आपल्या पदरात येते.मी कमावत नाही म्हणजे मी माझ्या कुटुंबासाठी काही एक स्वत:च्या चार गोष्टींचा त्याग करून घर संभाळते आहे. हे समोरच्याला सांगण्याचीही तिला गरज वाटत नाही. कारण समोरचा त्याच्या प्रत्येक कृतीतून तिला हे सतत दर्शवत असतो की तू काय जगावेगळं करतेस? आपल्या घरासाठीच करते. आणि हे केलेच पाहीजे.अशी त्या घरातील प्रत्येकाच्या वागणुकीतून तिला हे दिसत असते. आणि सतत ती आपल्या सेवेला आहे असे गृहीतच धरले जाते.का विश्वासाने एखादी ठराविक रक्कम तिच्या हाती सोपवली जात नाही. आणि ज्या अर्थी असे होत नाही त्या अर्थी तिने असे सतत तुमच्या पुढे पैशासाठी हात पसरलेले तुम्हाला चालतात. आणि कुठतरी आपण तिच्यापेक्षा श्रेष्ठ,कर्तृत्ववान अशी अहंकारी भावना त्या पुरुषाच्या मनात असते हे नक्की.आणि अश्यामुळेच एकाच घरातील कमावती आणि न कमावती अश्या दोन स्त्रीयांच्यात त्या घरातील इतरांचे वागणे हे वेगवेगळे असते. आणि घरातील माणसे जर असा भेदभाव करणारी असतील तर समाजातील इतरांचे काय म्हणावे.

Friday, May 28, 2010

मैत्री..... मनाला हवीहवीशी.

माझ्या आयुष्यात वयाच्या प्रत्येक टप्प्यावर जेव्हा कोणाशी मैत्री होते तेव्हा समोरची व्यक्ती स्त्री आहे का पुरुष याचा विचार करुन कधीच होत नाही.मला वाटते लहानपणापासून आपण कसे वाढवलो गेलो यावर ते अवलंबून असते. याबाबतीत विचारांनी माझी आई खुप सुधारीत होती. आणि बाबांचे विचार त्यामानाने मागासलेले.आईने लहानपणी आम्हाला सर्व जातीचे, सर्व थरांमधील, मित्र-मैत्रीणींशी मैत्री करायला हवी ती मोकळीक दीली.त्या मैत्रीच्या सीमारेषा,त्यातील फायदे तोटे,धोके हे वेळोवेळी त्या त्या वयानुसार समजावून सांगितले. त्यामुळे समाजाची कधीच भीती वाटली नाही. यात आमचे बाबा,नातेवाईक,सोसायतीतील इतर मंडळी हे सर्वजण मोडत होते.कारण त्या मैत्रीवर पूर्ण विश्वास असणारी माझी आई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती.आणि हाच विश्वास व आमच्या नात्यातील पारदर्शकता ही कोणत्याही वयात, कोणाशीही होणारी मैत्री टीकवण्यात होते.या आमच्या नात्यातील जमेच्या बाजूंमुळे मला लहानपणी,कॉलेजमध्ये मित्र मैत्रीणींची संख्या भरपूर होती.आणि त्यातही मित्रांच्या संख्येचे प्रमाण जास्त होते.लग्नाआधी आम्ही रात्री दहादहा वाजेपर्यंत गप्पा मारायचो,एकत्र फोटोग्राफीला जायचो,एकत्र स्केचिंग करायला जायचो.
एकत्र कुटुंबात लग्न करुन आल्यावर नवरा म्हणून कौस्तुभचा अंदाज यायला खूप वेळ लागला.याला एकत्र कुटुंबातील घरातील अनेक कारणे होती. त्यामुळे मित्रांशीच बोलणे केले.तो मला जास्त सोपा मार्ग वाटला.त्या मित्रांनीही माझी बाजू समजावुन घेऊन काही वर्ष फोन नाही केले,न भेटण्याचे ठरवले.आता गेली तीन एक वर्षांपासून आमच्या बॅचमधले मित्र-मैत्रीणी आम्ही एकत्र दोन एक महीन्यातुन एक दीवस भेटत असतो.घरी माझ्या जुन्या मित्रांचे फोन येतात.त्याबद्दल कौस्तुभला माहीतीही आहे.वेळोवेळी त्याची मित्रांशी ओळखही करुन दीली जाते.आता समाजाची भिती अजिबात वाटत नाही. एकत्र कुटुंबात कोण काय म्हणेल याचा मनावर ताणही येत नाही. कारण कोणतीही आमच्या मैत्रीमधील गोष्ट माझ्याकडून लपवली जात नाही.
परवाच मी मुलांना घेउन बालगंधर्वला प्रदर्शन बघायला गेले होते.मी त्या वस्तू आणि त्याची माहीती वाचण्यात गुंग होते. एवढ्यात मागून मला कोणीतरी ट्प्पल मारली. वळून मागे बघते तर माझा कॉलेजचा मित्र होता.क्षणभर मी ही चक्रावले. कारण त्याच्या वयाने म्हणा मी त्याला पटकन ओळ्खले नाही.वेगळ्या स्टाईलची मिशी,रहाणीमान सर्वच बदललेले होते. त्याच्याशी दहा मिनीटे गप्पा मारल्या. गप्पा मारत असताना स्मृतीचा चेहरा कावरा बावरा झालेला दीसला.मी ओळखले आणि मुलांची ओळख त्याच्याशी करून दीली.नंतर आम्ही घरी आलो आणि दारातच स्मृतीने मला विचारलं तो मगाशी तुला टप्पल मारणारा माणूस कोण होता?तिचा मगाशी झालेला कावराबावरा चेह-यामागचा प्रश्न आता तीने मला विचारला होता.दोघांनाही कॉलेजच्या त्या मित्राविषयी सांगितले.आम्ही एकत्र कसे काम करायचो अश्या गप्पा त्यांच्याशी मारल्यावर स्मृती मला म्हणते कशी की आई म्हणजे माझा जसा शाळेमध्ये यश हा मित्र आहे तसा तुझा तो मित्र होता का? कारण यश पण माझ्या डोक्यावर ट्प्पल मारतो.म्हणजे लहानपणी मित्राने गंमत म्हणून मारलेली टप्पल आपल्या नजरेला खटकत नाही याउलट हेच मोठ्या वयात तिच्या नजरेला खटकले.तर समाजाला काय म्हणायचे?
मैत्री ही समोरचा स्त्री-पुरुष कोण आहे यावर अवलंबून नाही. माझे विचार ज्याच्याशी जुळतात,मी कुठलाही विषय,कोणतीही अडचण,सुखात-दु :खात, कोणत्याही वेळेस ज्याच्याशी,जिच्याशी मनमोकळेपणाने शेअर करु शकते तो खरा मित्र.आणि यात वयाची अट नसते.
आताही कधीही, वयाच्या कोणत्याही टप्प्यावर मित्रांशी खूप वेळ मनमोकळ्या गप्पा माराव्यात,त्यांच्याबरोबर सिनेमाला जावे,एकत्र स्केचिंग-फोटोग्राफी करावी,त्या चित्रावर-फोटोवर तासंतास वाद घालावेत.एकत्र कॉफी प्यावी असे नक्कीच वाटते. यासाठी समाजाची, कोण काय म्हणेल याची भिती नाही वाटणार. कारण जवळच्या व्यक्तीचा माझ्यावर असणारा विश्वास व नात्यातील पारदर्शकता. या दोन गोष्टींनी बाकी समाजाशी लढण्याचे बळ येते. व त्या समाजाचा आपल्या मनावर ताण येत नाही.

Saturday, May 15, 2010

मनापासून वाटले ते.....

दररोज सकाळी आयता चहाचा कप हातात येणे,आरामात पेपर वाचन करणे, फक्त स्वत:चेच आवरणे, आयता नाष्टा- जेवण घेणे, मनात येईल तेव्हा कोठेही कसेही पाय पसरुन बसणे, मनात येईल तेव्हा आराम करता येणे, मनाला वाट्टॆल तेव्हा ,वाट्टॆल तितकी झोप घेता येणे,मानसिक शारीरीक ताण कमी करण्यासाठी आपले आवडीचे छंद जोपासणे,चप्पल पायात घातली की घराबाहेर पडता येणे,आठवड्याची एक अशी हक्काची सुट्टी मिळणे,व ती सुट्टी फक्त आठवडाभर दमलो या कारणाने सत्कारणी लावणे,रात्री उशिरा पर्यंत घरी आले तरी चालणे, मित्रांबरोबर कटटयावर चकाटया पिटत बसणे, मनात येईल तेव्हा शिट्टी मारता येणे, जोरात आळस देता येणे, चारचौघांच्या समोर जांभई देता येणे, ढेकर देता येणे,आणि पादता येणे , उन्हाळ्यात उघडे बसता येणे,महीन्याच्या त्या अडचणींचे चार दिवस वाटयाला न येणे, मासिक पाळीचा शारीरीक व मानसिक होणारा त्रास वाटयाला न येणे, अशी एक ना अनेक उदाहरणे बघितली की मला नेहमी वाटते की मी पुरुषाच्या जन्माला आले असते तर बरे झाले असते.
या उलट मी स्त्री आहे याचा मला निश्चित अभिमान वाटतो.कारण आयुष्यातल्या स्त्रीच्या वाट्याला येणा-या प्रत्येक भुमिकेत मिळणारे समाधान. म्हणजे कधी मी कुणाची मुलगी, तर कोणाची बहीण, तर कोणाची बायको, तर कोणाची आई असते.आणि या नात्यांमध्ये असणारा ओलावा मला भावतो. या प्रत्येकात स्त्री म्हणुन असलेली माझी गुंतवणूक महत्वाची वाटते. मी स्त्री आहे याचा निश्चित अभिमान आहे कारण मी माझ्यातून स्त्री-पुरूषाचे प्रतिक म्हणून एका नव्या जीवाला जन्म देऊ शकते. एकाच वेळी अनेक कामांवर लक्ष केंद्रीत करून ती चोख बजावण्याचे सामर्थ्य स्त्रीयांमध्ये असते, संसार (मुले वाढवणे, त्यांची आजारपणे, त्यांचा अभ्यास, इ. अनेक अश्या अर्थी) आणि नोकरी अश्या अनेक गोष्टींसाठी लागणारी मॅनेजमेंट ही स्त्रीयांकडे उत्तम असते असे मला वाटते.
स्त्री असणे व पुरुष असणे या दोन्ही गोष्टी ज्याच्या त्याच्या जागी योग्य व श्रेष्ठ आहेत असे माझे मत आहे.प्रत्येकाचे नक्कीच फायदे व तोटे आहेत. म्हणूनच निसर्गत:च काही गुणधर्म हे स्त्री व पुरुषांत वेगवेगळे असतात ते आपण मान्य केले पाहीजे.

Friday, April 30, 2010

जरा विचार करु या-३

मुळात बाई बाईत फरक हा अनेक गोष्टीत आणि अनेक प्रकारे केला जातो.म्हणजे ती एखादी कामवाली, अडाणी, अशिक्षित, शिकलेली,घर सांभाळणारी अथवा नोकरी करणारी.मुळात त्या बाईशी वागणारी आजूबाजूची मंडळी(त्यात दुसरी स्त्री पण आली) ही तिचा दर्जा......ती मिळवत असलेला पैसा(मग तो चार घरची धुणं-भांडी करुन मिळवलेला असो वा नोकरी करुन)आपल्याला ती स्त्री कीती आणि कशी कामास येते यावर ठरवत असतात.मग त्या स्त्रीचे समोरच्या व्यक्तीशी नाते कोणतेही असो.ती त्याच्या अपेक्षेप्रमाणे पात्र ठरली तर ती चांगली नाहीतर तिला कोणीही यावे कसेही बोलावे व तिच्याशी कसेही वागावे हे ठरलेले असते. यात तिच्या स्वत:चा असा विचार करणारी व्यक्ती आपल्याला पहायला मिळत नाही.हा फरक समाजात अनेक थरांमध्ये वेगवेगळा आढळतो. म्हणजे काही घरांत जिला मुलगा आहे, जी कमावती आहे, जी घरात आपण म्हणू त्याला मान डोलावते,जी आपल्या तालावर नाचते अश्या स्त्रीया या त्यांच्यामते श्रेष्ठ असतात.याउलट जिला मुली आहेत,जी घर सांभाळते पण पैसे कमावून आणत नाही,इतरांचा विचारांबरोबर स्वत:चा विचार सुद्धा करते,व सगळ्यांसमोर आपले मत मांडते.अश्या स्त्रीयांना मिळणारी वागणूक ही नेहमी वेगळी असते.मला वाटतं की एक स्त्री आयुष्याच्या ज्या प्रवासातून जात असते तिने दुस-या स्त्रीला मग ती कोणत्याही जातीची असो, सुशिक्षित असो, वा कोणत्याही थरातील असो. तिला जाणून घेणे हे इतरांपेक्षा एका स्त्रीला खरतर सोपे जायला हवे. पण समाजात हे चित्र आपल्याला खूप कमी ठीकाणी बघायला मिळते. ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

Thursday, March 25, 2010

निर्मिती

अखेर तो दीवस उजाडतो. पोटात बारीक बारीक कळा येऊ लागतात. पहील्या पहील्या कळा सहन होणा-या,सुखद
वाटणा-या.आपल्यातूनच एक नवीन जीव निर्माण होणार ही कल्पनाच मुळी केवढी आनंददायी आहे.त्यासाठी काही वाट्टॆल ते सहन करण्याची शक्ती प्रत्येक स्त्री मध्ये त्यावेळी कोठून येते कोण जाणे.मनात असंख्य विचार येत असतात. कसा असेल तो इवलासा जीव. नाक,डोळे हात, पाय,चेहरा,रंग.जावळ असेल का? का नसेलच?मुलगा का मुलगी? या आणि अश्या असंख्य कुतुहलापोटी,उत्सुकतेपोटी पडलेल्या प्रश्नात मोठी गंमत आहे.कालच भावजय बाळंत झाली तिच्यापाशी असताना असे अनेक गमतीशीर प्रश्न मनात येऊन गेले.स्वत:च्या वेळीही असे अनेक प्रश्न पडलेच होते. पण त्यावेळी कळा सहन करण्याचा भाग त्यामध्ये खूपच जास्त होता.त्यावेळेचे स्वत:वर येणारे दडपण हे त्या कुतुहलावर मात करत होते.काल जरा आजूबाजूला मला बघता आले. दर एक तासाने एक नर्स येत होती आणि तिच्या पोटावर छोटसं यंत्र लावून बाळाचे ठोके तपासत होती.एरवी या नर्सेस अगदी नॉर्मल चेह-याने वावरत असताना आपल्याला दीसतात.पण आपल्याच पेशंटपाशी आल्या की काय होत त्यांना कोणास ठाऊक. उगाचच गंभीर चेहरा करतात.तो त्यांचा चेहरा बघून आजूबाजूच्या नातेवाइकांना घाबरायला होत असते.किंबहूना आपणही दडपणाखाली असतो म्हणून तो तसा चेहरा बघुन अजुनच दडपणात भर पडते. हाच अनुभव तिला आत ऑपरेशन थेअटरमध्ये नेल्यावर.उगाचच सगळ्या नर्सेसची पळापळ.मध्येच आतून एखादी पळत येणार आणि गंभीर चेह-याने बाहेरच्या नर्सला ओरडतच अहो लवकर या पळा लवकर असे म्हणणार.हे सगळे गंभीर नाट्य बघुन बाहेर उभे रहणारे आपण उगाचच गंभीर होतो. आणि ही धावाधाव बघून ही सगळी धावाधाव आपल्याच आत असणा-या पेशंटसाठी चालली आहे असा तर्क काढत असतो. काही आत प्रॉब्लेम तर नाही ना? अशी उगाचच प्रत्येकाच्या मनात शंका येते.मधूनच एक वयस्कर आजी (नर्स)आतून येतात. त्यांना मी विचारलं आजी झाली का हो बाळंत? तर त्या म्हणाल्या हो आत्ताच.त्यांना म्हणलं काय झालं काही कळलं का? तर म्हणाल्या मला नाही सांगता येणार....परत या अर्धवट उत्तराने आम्ही उगाचच गंभीर.खरतर हॉस्पिटलचेही काही नियम असतील.पण त्या आजी असे म्हणल्यावर सगळं बर असेल ना आत? अशी उगाचच शंका येऊन गेली पुन्हा एकदा.हे सगळ फक्त चाललं होत ते मनातील दडपणामुळे.....साधारण दहा मिनीटे हे नाट्य चालले आणि डॉ. बाळाला हातात घेऊन बाहेर आले. तो नवा इवलासा जीव बघून सगळ्यांच्याच मनावरचे दडपण चुटकीसरशी गळून पडले. खरंच आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रत्येक क्षणी अशी अनेक मनावर येणारी दडपणं ही केवळ आपल्या मुलांचे चेहरे बघून कुठच्या कुठे पळुन जातात हे काल मला पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवले.

Monday, February 1, 2010

परावलंबन

लग्न या चौकटीत आडकल्यावर एक मुलगी ही, स्त्री म्हणून अनेक गोष्टींवर अवलंबून रहायला लागते असे मला वाटते. म्हणजे ज्या घरात ती नव्याने आली आहे त्या सासरी. त्या घरातील लोकांवर ती वेगवेगळ्या गोष्टींसाठी, वेगवेगळ्या प्रसंगी,अवलंबून असल्याचे जाणवते. किंबहुना तशी परीस्थीती तिच्याभोवती निर्माण केली जाते.या नवीन घरात प्रवेश केल्यापासुन तिच्याहुन मोठ्या असणा-या व्यक्तिंची सारखी या ना त्या स्वरुपात परवानगी काढताना ती दिसते. तिच्या उठण्याच्या-झोपण्याच्या वेळा,ते तिने कोणत्या वेळेला काय करायचे इतपर्यंत तिच्यावर त्या घराची अशी एक पद्धत लादली जाते. मी ही सर्व कामे करीन पण मला वाट्टेल तेव्हा,माझ्यावेळेनुसार हे स्वातंत्र्य क्वचितच कोणा एकीला मिळत असेल.काही घरात तिने घराबाहेर जाताना कोठे जाणार?कधी येणार हे सांगण्याची बांधीलकी तिच्यावर असते.याच वेळी तिच्याबरोबरचा पुरुष याला या गोष्टींसाठी काहीही नियम नसतात.पुरुष घराबाहेर न सांगता जाणे हे ग्रुहीतच धरले जाते.घरातील सामुहीक प्रश्नांमध्ये तिला सहभागी करुन न घेणे,घरातील आर्थिक व्यवहार तिच्यापासुन लपवून ठेवणे,स्त्रीला तिच्या स्वत:साठी अथवा तिच्या कुटुंबासाठीलागणा-या पैशासाठी(मग ती नोकरी करणारी असो वा नसो.) सतत कोणापुढे तरी मागते रहाणे......या आणि अश्या अनेक गोष्टींसाठी स्त्री ही परावलंबी झालेली दिसते.या आणि अश्या अनेक तिच्या जीवनातील गोष्टी जर आपण पाहील्या तर असे जाणवते की या सर्वांमागे त्या तिच्या आपल्या माणसांचा तिच्यावर असलेला अविश्वास.ती आपल सर्वस्व सोडुन ज्यांना आपलं सर्व मानत असते अश्या सगळ्यांपैकी कोणा एकाचाही तिच्यावर विश्वास नसतो हे सिद्ध होते.त्या स्त्रीला तिचे असे वैयक्तिक आयुष्य असते हे मान्यच नसते कित्येकांना.तिला काय वाटते?,तिचे आवडीचे छंद,तिच्या आवडीच्या गोष्टी याचा विचार खुप कमी घरांमध्ये होत असेल .किंबहुना तीने माझ्याच आवडीनिवडींशी समरस होऊन रहावं असा हट्टच असतो. तिच्या आवडींसाठी आपण काय करु शकू का? याचा काडीचाही विचार न करणारी मंडळी खुप सापडतात.तिचे मन जाणण्याचा विचार कोणी करत नाही.याउलट आपल्या प्रत्येक तालावर नाचवून घेणारे व त्यामधुन असुरी आनंद उपभोगणारे अनेक जण आपल्याला सापडतात.स्त्रीयांची मानसिक गरज जशी लक्षात घेतली जात नाही तशी तिची शारीरीक गरज ही लक्षात घेतली जात नाही.पण या विषयावर पुन्हा सविस्तर बोलता येईल.शारीरीक गरज ही फक्त स्त्रीयांनाच असते का? किंबहुना गरज नसताना देखील केवळ पुरुषाच्या सोईने त्याला वाट्टेल तेव्हा ती गरज पुर्ण केली जाते. यात दोघांच्या आनंदाचा,पुर्ण सहभागाचा विचार खुप कमी वेळा केला जातो. प्रत्येक वेळी त्या पुरुषाचा मुड संभाळुन शारिरिक गरजा भागवणा-या स्त्रीयांची संख्या काही कमी नव्हे.कधीतरी तिचा मुड,तिची गरज लक्षात घेतली जातच नाही.ह्या आणि अश्या अनेक तिच्या आयुष्यातील गोष्टी आहेत की ज्या गोष्टींसाठी ती सतत कोणावर तरी अवलंबून रहाताना दिसते अथवा तशी परीस्थिती निर्माण केली जाते. आणि त्यामुळे आपण कुणाचं तरी मिंध असल्याच सतत तिला जाणवत रहाते. आणि या परवलंबनाचा एक प्रकारचा ताण तिच्यासाठी सहन करण मोठ आवघड होऊन बसतं. तिचे स्वत:चे असे तिचे स्वच्छंदी आयुष्य ती सतत कोणत्या तरी दडपणाखाली जगत असते.तिच्या या अश्या स्वच्छंदी जगण्यासाठी आपण काय करु शकु याचा विचार तरी प्रत्येक कुटुंबात केला जावा एवढी अपेक्षा.प्रत्येक कुटुंबात एक तरी स्त्री आहे. कधी ती आई,कधी बायको,कधी बहीण,तर कधी आपली रक्ताची लेक.पण या प्रत्येक रुपाशी वागणारा पुरुष हा नेहमीच वेगळा का असतो?

Friday, January 8, 2010

हरलेली मी

अगदी काल-परवाचा ताजा प्रसंग...माझ्या भावजयीचा डोहाळजेवणाचा कार्यक्रम.सगळी तयारी झाली होती.झोपाळा सजवला,ओटीचे ताट सजवले,औक्षणाची तयारी केली,सर्व काही.आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली.आईने मला आमच्याकडील बायकांना भावजयीची ओटी भरायला बोलवायला सांगितले.माझ्या जरा नावडीचे आणि मला अवघड असे ते काम.अवघड अश्यासाठी की त्या बायकांमध्ये अश्या दोघीजणी होत्या की त्यांना माझी इच्छा असूनही मी बोलवू शकले नाही.कारण एक विध्वा व दुसरी अशी की जिला मूलबाळ नाही. विचार आला आणि आईपाशी गेले.मी त्या दोघींना बोलावू का असे तिला विचारता तीही दोन मिनीटे थांबली आणि तिने माझ्याकडे बघून नकारात्मक मान हलवली.त्या दोघींच्याच बाजूला बसलेल्या बायकांना बोलावताना मला माझीच लाज वाटत होती.किंबहूना अपराध्यासारखे वाटत होते.मला माझा स्वत:चाच राग आला होता. मी काय आणि माझी आई काय अश्या रुढी अजिबात न मानणा-या.पण आमच्या मनावर या समाजाचे दडपण नकळत होतेच.आपण कीतीही म्हणलं तरी ही चौकट मोडण्याचे धाडस आपल्यात नसतच.म्हणजे माझ्याततरी नव्हतं.विचार केला तर त्याप्रसंगी माझी आई माझ्या पाठीशी उभी राहीली असती तर सगळ्यांशी वाद घेऊन त्याला विरोध देखील केला असता.पण तसे झाले नाही.मनातून पटत नसताना देखील आईचे मी ऎकलेच.इतर ठीकाणी नाहीपण आपल्या माहेरच्या,हक्काच्या माणसांमध्ये आपण ही चौकट मोडू शकू असे अनेकदा मला वाटत होते. पण ते तेवढे सोपे नव्हते.काय झालं असतं त्यादोघींनी तिची ओटी भरली असती तर....?इतक्या सगळ्या बायकांत त्या दोघींना वेगळी वागणूक देणारी मी शेवटी इतर बायकांसारखीच निघाले.भले ते वागणे मला पटो अथवा ना पटो.या सगळ्यांच्या विरोधात जाण्याची ताकद माझ्यात नव्हती.आणि ह्यामध्ये मी माझी हार झाली असे समजते.

Monday, November 30, 2009

जाणीव

आईची १० ते ६ सरकारी नोकरी.घरात आजी-आजोबांचे वय झालेले.आजी अर्धांगवायुमुळे पूर्णपणे परावलंबी.तिचे सर्व अंथरुणात.अशावेळी आईची होणारी दमछाक मी समजू शकत होते पण तिला मदत करण्याइतकी मी मोठी नव्हते.माझे वय साधारण पाच सात वर्षांचे.बाबा तेव्हा कीर्लोस्कर कंपनीत होते.मला आठवतय तसं ते आईच्या आधी तासदीड तास घरी आधी यायचे कंपनीतून.त्या तासात ते आमच्या रात्रीच्या जेवणासाठीची तयारी करत असत.कणीक मळून ठेवणे,वरण भाताचा कुकर लावणे आणि एखादी भाजी चिरणे,इ.....कधीकधी तर पूर्ण स्वयंपाक देखील तयार असायचा.नोकरी करुन आई घरी आल्यावर बाबांची ही तयारी बघून,तिचा थकवा पळून जाई.हे म्हणण्याचं कारण एवढच की काम ही रोजचीच आहेत.
न संपणारी.......पण अश्यावेळी नुसतं कोणी, आपलं काम हलकं केले तरी पुढची दहा काम ती स्त्री आणखी उत्साहाने करते.आता ते सत्तर वर्षांचे आहेत.घरात सूनही आली आहे. तरीपण त्या दोघींच्या कामात त्यांचा नक्कीच मदतीचा हात असतो.
मला वाटतं स्त्री-पुरुष समानता, कामांच्या समसमान वाटण्या याही पलीकडे जाऊन त्या कामांत मदत करण्यामागे असलेलं प्रेम आणि आपुलकीचा भाग खूप मोठा आहे.स्त्री-पुरुष समानतेपेक्षाही मला अपेक्षित आहे ते एकमेकांना समजणं....मग ते नातं कोणतही असो.....

Tuesday, November 17, 2009

दिल है छोटासा...बहोत बडी आशा

मागे वळून बघता लहानपणीच्या भातुकलीच्या खेळाचे रुपांतर संसारात कसे झाले हे कळले देखील नाही.लहानपणी मैत्रीणींबरोबर मांडलेला भातुकलीचा हा डाव आज संसारातील डावापेक्षा इतका का निराळा असतो?लहानपणीचा हा सहज, सोपा,खेळ काही वेळा अवघड होऊन बसतो.कोठे जाते ही सहजता? जसजसे मोठे होतो तसतशी आपल्याभोवती असलेली समाजाच्या कर्तव्यांची वर्तुळे वाढतच जातात असे वाटते.आणि आपण या वर्तुळात किती आणि कसे गुरफटलो जातो हे आपल्याला कळूनही,आपण त्यातून बाहेर पडू शकत नाही.आजच्या मुलांचे आजचे भातुकलीचे चित्रच वेगळे आणि आशादायी वाटते.आत्ताच्या मुलांमुलींमध्ये(या अर्थी की मुलगे पण आवडीने भातुकली खेळताना दिसतात.) हे मुलांचे, ते मुलींचे खेळ असे काही वेगळे राहीले नाही.किंबहुना तसे ते मानतही नाहीत.मुलगे भातुकली खेळताना जसे दिसतात, तश्या मुलीदेखील क्रिकेट,ऑफीस-ऑफीस, यांसारखे मुलांचे खेळ खेळताना दिसतात.फक्त अजुनही त्यांचे हे खेळ खेळताना बघणारे आपण मोठे, त्याला बायल्या असे संबोधितो.हे बायल्या संबोधिणे आता या मोठया झालेल्या पुरुषाला सहन होत नाही.कमीपणाचे वाटू लागले आहे.कारण आपल्या डोक्यात अजूनही नाही म्हणलं तरी स्त्री-पुरुषांनी करायच्या कामाच्या चौकटी स्पष्ट आहेत.त्या चौकटी मोडण्याचे सामर्थ्य क्वचितच एखाद्यातच.येथे आपण नक्कीच विचार करायला हवा असे वाटते.येणारी पिढी नक्कीच बदलते आहे.पण आपल्याभोवतीची वर्तुळे मात्र तिच आहेत.अगदी घट्ट, न सुटणारी.....चला थोडे या वर्तुळांच्या बाहेर डोकवूयात..... एकूणच आपण, मोठे खूप भरकन होतो असे वाटते.या मोठे होण्यात विचारांची प्रगल्भता क्वचितच कोणा एकाकडे दिसते.

सुनीता

 सुनीता माझ्याकडे केरफरशीला येते.आज इतकी वर्ष आमच्याकडे कामाला येते ,घरातली एक असल्यासारखी.तिचं काम अतिशय चकचकीत, स्वच्छ. फरशी पुसताना फरशीव...