Friday, November 30, 2012

इंद्रधनु १०० - एक आढावा


इंद्रधनु या ब्लॉगवर १०० लेख लिहून झाले आहेत.
या टप्प्यावर इंद्रधनुवरील लेखन काय आणि कसं आहे? याचा आढावा घ्यावा असं वाटलं.
इंद्रधनु वर ’हेच किंवा तेच", ’या किंवा त्याच’ पद्धतीचं लिहिलं जाईल, असं काही ठरवलेलं नव्हतं.
स्त्रीवादाच्या चष्म्यातूनच पाहू असंही ठरवलेलं नव्हतं / नाही.
मी जो स्त्री अभ्यास केंद्रात कोर्स केला आहे, त्याने एक दृष्टी मिळाली, हे महत्त्वाचं असलं तरी तेव्हढंच आहे.
’बाई’ म्हणून जगताना पडणारे प्रश्न, होणारी घुसमट, खटकणार्‍या गोष्टी, मिळणारे दिलासे, असं सगळं इथे येऊ शकतं, आलेलं आहे.
या ब्लॉगवर केवळ बायकांचं लेखन आहे असं नाही ते बायकांशी/ त्यांच्या बाई असण्याशी निगडीत आहे.
म्हणजे ’पाऊस’ या विषयावरचा ललितनिबंध या ब्लॉगवर येणार नाही, मी बाई म्हणून पाऊस कसा अनुभवते? येऊ शकतं. मनसोक्त, मनमोकळं मला भिजता येतं का? अंगाला चिकटलेले कपडे आणि ते पाहणारांच्या नजरा... यांच्यासह मला भिजायला लागतं.
 ही या ब्लॉगची मर्यादा आहे. तेच या ब्लॉगचं सामर्थ्य आहे.
काही विषयांवर आम्ही सगळ्याजणींनी आपापली मतं लेख लिहून मांडली आहेत. स्वातंत्र्य, बाई असणं, काहीवर तिघीचौघींनी लिहिलं आहे, जसं की स्त्री-पुरूष मैत्री, कमावणं, बाकी लेखांमधून ती ती लेखिका व्यक्त झालेली आहे. तो तो विषय तिला भिडला आणि लिहावंसं वाटलं.
 म्हणजे आशाला लग्न करताना "पुरूषाचं वय बाई पेक्षा जास्त असलं पाहिजे" या रूढीवर लिहावंसं वाटलं. अश्विनीला व्हाईट लिली आणि नाईट रायडरच्या निमित्ताने लिहावंसं वाटलं. दीपाला ’सासू - सून -मुलगा’ यावर लिहावंसं वाटलं. वैशालीने "देवी अंगात येणं" यावर लिहलं.
 कुणीही स्त्रीवादाचा चष्मा घालून लिहिलेलं नाही. बाई म्हणून संवेदनशीलतेने जगताना जे जाणवलं ते त्यांनी लिहिलं आहे.
आमच्या काही वाचक देखील यात सामील झाल्या आणि त्यांनीही त्यांच्यापुढे उभ्या राहणार्‍या प्रश्नांवर लिहिलं आहे. पियूने नवर्‍याच्या आयुष्यातील आपलं स्थान काय आहे? असा प्रश्न उपस्थित केला.
 एफजीएम बद्दल वाचलं आणि लिहिलं, त्या सगळ्या बायकांशी आपलंही बाई म्हणून नातं जोडलेलं आहे, तिचं शरीर आणि माझं शरीर सारखंच आहे असं वाटलं.
 काही विषयांवर एका पेक्षा अधिक लेख लिहिले आहेत. लिहिताना, प्रतिक्रियांतून त्या विषयाचे आणखी पैलू जाणवत गेले. आणि पुढचे लेख लिहिले गेले.
सौंदर्य या विषयावर असे लेख लिहिलेले आहेत.
 हे सगळे लेख स्वानुभवावर आधारीत आहेत. लिहीणारी प्रत्येकजण त्या विषयाच्या अनुषंगाने तिचं जगणं मांडते आहे/ शोधते आहे.
उच्चवर्णीय, मध्यमवर्गीय बाईवर ’बाई’ असण्याचे कसे ताण आहेत, या ताणांकडे ती कसं पाहते, काय प्रतिक्रिया देते, याचा किंचित अंदाज हा ब्लॉग वाचून यावा, अशी अपेक्षा आहे.
 अजून बरेच विषय आहेत, ज्यावर लिहिता येईल / लिहिलं जाईल.
आमच्यापैकी प्रत्येकीला मोकळं होण्यासाठीची ही जागा आहे, त्याचा फायदा वाचणारांपैकीही कुणाकुणाला होऊ शकतो. माझ्या जातीचं कुणी भेटलं, कुणी आहे, म्हणून हुरूप येऊ शकतो.

मिलिन्द आणि नीरजने अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया दिल्या आहेत, सचिननेही कधी कधी दिल्या आहेत, त्यांचा आम्हांला फायदाच झाला. काहीवेळा गटाबाहेरच्यांनीही प्रतिक्रिया दिल्या, त्यावरही विचार झाला.

 समजून उमजून जगायचं असा मार्ग निवडल्यावर, रस्ता तर लांबचाच आहे आणि या ब्लॉगची सोबत आहे.



Wednesday, November 28, 2012

वाचकांचे लेख -- आमच्याकडे असंच असतं...


विद्याच्या लेखातल्या "तुमच्याकडे गणपतीला तळणीचे मोदक चालतात का ग?" हे वाचल्यानंतर मनात "तुमच्याकडे" आणि "आमच्याकडे" यावर बराच विचार झाला आणि मग जे काही प्रश्न पडले ते म्हणजे हा लेख..

आमच्याकडे गौरीनिम्मित ओट्या भरण्याचा कार्यक्रम सुरु होता.. माझ्या माहेरी कुमारीकांची ओटी भरण्याची पद्धत नाहीये त्यामुळे मी जरा बिचकत होते. पटकन सासरच्या काहीजणी पुढे आल्या आणि म्हणाल्या " आता हे सगळ शिकून घे.. आमच्याकडे असच असत". मुळातच ओटी  वगैरे रस नसल्याने मी त्या जे सांगत होत्या तसे करून मोकळी झाले..

सासरचे वातावरण बरयापैकी लोक काय म्हणतील? समाज काय म्हणेल ह्याविषयी भीड बाळगणारे.. तरीदेखील घरात धुम्रपान, मद्यपान, तंबाखू खाणे आणि मांसाहार होतो. असं कसं चालत विचारल्यावर उत्तर एकच "आमच्याकडे असंच असत.. तुलाही होईल सवय हळूहळू"..

हे "आमच्याकडे असच असत" प्रकरण तुम्ही सगळयांनी सुद्धा कधी ना कधीतरी ऐकले असेलच.. वेगवेगळ्या प्रसंगात.. वेगवेगळ्या संदर्भात.. काहींनी तर ते अमुक एका पद्धतीचे कपडे वापरणे, अमुक वेळी जेवणे, एखादी भाजी एका विशिष्ट पद्धतीने बनवणे, अमुक एखादे काम किंवा घरातली सगळी कामे बाईनेच करणे अश्याही बाबतीत ऐकले असेल..

घरात एखादी मुलगी सून होऊन येते याचा अर्थ ती घराची कोणीच नसते का??  नवीन येणार्या सुनेने स्वत:च्या वागण्याने सगळ्यांची मने जिंकून घ्यायची म्हणजे नक्की काय करायचे? घरात आधीपासून जे राहत आहेत त्यांचा त्या घरावर हक्क जास्त हे पटतेही एकीकडे.. पण म्हणून नव्याने राहायला येणाऱ्या/री ने त्या साच्यात स्वत:ला बसवून घ्यावे हि अपेक्षा चूक आहे कि बरोबर?

कोणत्याही घराचे ठरलेले असे साचे, संस्कार असतात.. प्रत्येक कुटुंबागणिक ते बदलतात. हे सगळ्यांनाच माहित आहे आणि कबूलही आहे. कदाचित या सगळ्यांची नंतर सवयही होत असेल.

पण तरीही हे वाक्य मनावर कुठेतरी ओरखडा काढतं हे नक्की.. 

तुम्हाला असे प्रश्न पडले का? याबाबतीत तुम्हाला काय वाटत??

- स्पृहा

Sunday, November 25, 2012

देवी अंगात येणं......

लहानपणी आमच्या बिल्डिंगमधे खालच्या मजल्यावर राणीच्या आई रहायच्या. कुटूंब मारवाडी होतं. त्यामुळे नवरात्रीचा सण मोठ्या प्रमाणात असे. तेव्हा नऊ दिवस त्यांच्या रोज अंगात यायचं. आम्हा मुलांना त्याबद्दल गंमत, असूया, उत्सुकता, भिती  अशा सगळ्या भावना असायच्या. त्यामुळे ९ दिवस ते बघायला आम्ही संध्याकाळच्या आरतीला जात असू. तिथं आम्हा सगळ्यांना सांभळून उभं रहावं लागे. कारण आरती सुरु झाली की हळूहळू त्या थरथरायला लागायच्या, आणि मग पूर्ण खोलीभर केस सोडलेल्या अवस्थेत पिसाळल्यासारख्या नाचायच्या. साडीचं, पदराचं भान नसायचं. मग त्यांचा छोटा मुलगा पायात आला तरी त्यांच लक्ष नसायचं. समोर पेटलेल्या आरतीवर आपण पडलो तरी ह्याची पर्वा नसायची. नवरा ह्यासगळ्या गोष्टी सांभाळण्यात गुंतलेला. थोड्यावेळाने दमल्यावर त्या शांत व्ह्यायच्या. जमिनिवर निपचित पडायच्या. आम्ही सगळे त्यांना नमस्कार करायचो. ती देवी आहे असं थोडावेळ वातावरण असायचं. दुस-यादिवशी नेहमीप्रमाणे परत रुटिन चालू. काल रात्रीची राणीची आई आणि आत्ताची ह्याचा सुतरामसंबंध नसायचा.
..............

राणीच्या आईविषयी थोडसं.......

नव-याची दुसरी बायको, त्यांच वय २२ होतं तेव्हा नवरा ५० वर्षाचा. पहिली बायको वारली. तिचे २ मुलगे नव्या आईच्या बरोबरीच्या वयाचे. त्यांची लग्नं नुकतीच झालेली. दोघांनाही वेगळं राहण्याखेरीज मार्ग नव्हता. त्यांनी वडिलांवरचा राग आईशी तुसडेपणाने वागून, वाटणी मागून व्यक्त केलेला. राणीच्या आईलाही पाठोपाठची ३ मुलं - १ मुलगी व २ मुलं. सगळी मुलं १० -१२ वयाच्या आसपास आल्यावर वडिलांचं निधन झालं. कुटुंबाची जबाबदारी पडली. त्यांच रविवार पेठेत चहाच अमृततुल्या दुकान. उदर्निवाहाच प्रश्न उभा राहिल्यावर राणीच्या आई स्वत: दुकानात जाऊन बसायला लागल्या. पुढ मग आम्ही तिथे रहात नसल्याने संपर्क संपला.
.........

शाळा - कॉलेजमधल्या माझ्या सगळ्या मैत्रिणी ह्या धार्मिक वृत्तीच्या, रितीरिवाज पाळणा-या, पुरुषप्रधान संस्कृतीला झुकतं माप देण्या-या. माझ्या आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम का होईना मी काही एक ठोस विचारांनी वावरत होते. मी नास्तिक आहे, मुर्तिपूजा मानत नाही, मी पाळीच्या दिवशीपण मंदिरात जाते, लग्न झाल्यावर पण स्त्री-पुरुष समानतेकडे मी कशी बघेन हे मैत्रिणींशी बोलायचे. तेव्हा अंगात येण्याविषयी बोलणं झालं. मी पटकन म्हणाले तो सगळा ढोंगीपणा आहे. देवीवगैरे असं काही नसतं.
...........

मध्यंतरी असच एकदा कामवाल्याबाईंबरोबर बोलत होते. तेव्हा त्यांच्या वस्तीमधल्या एका बाईंबद्दल त्या म्हणाल्या की तिच्या अंगात येतं. चेष्टेत हसत म्हणल्या "काहीनाही ओ ताई, नुसती नाटकं आहेत ती". मग मी थोडं त्याबाईंबद्दल त्यांना विचारलं. तेव्हा पुढ आलेली माहीती अशी -  नवरा दारु पितो, रोज रात्री वस्तीमधे धुडगूस घालतो. बायकोला मारतो. आधीच्या बायकोच्या वयात आलेल्या मुलींशी नीट वागत नाही.  
...........

एक दिवस मी व माझी बहिण चाललो होतो तेव्हा अचानक राणीच्या आई भेटल्या. त्या माझ्या बहिणीच्या बरोबरीच्या वयाच्या असल्याने तिच्याशी नेहमी मनमोकळेपणाने बोलायच्या. मुलं काय काय करतात, हताशी कशी आली, दुकान कसं बघतात, हे आनंदानं आणि आत्मविश्वासानं सांगितलं.
.........

राणीच्या आईंनी, त्यांची घुसमट, राग, दु:ख नवरात्रीमधले ९ दिवस तरी माझे हक्काचे असं गृहित धरुन अंगात आणून व्यक्त केली. तो नक्कीच ढोंगीपणा नव्हता. वस्तीमधे, ग्रामीण भागात अंगात येण्याच्या प्रकाराची वारंवारिता जास्त. जेव्हा संधी मिळेल, मुभा मिळेल तेव्हा आपला विरोध, संताप, दु:ख व्यक्त करण्याचा तो एक माफक प्रयत्नच. शेवटी परिस्थिशी समझोता हा ह्या बायकांनी केलेलाच असतो. तो नक्कीच नाटकीपणा नाही.

Friday, November 9, 2012

व्रत वैकल्ये -- ३

http://asvvad.blogspot.in/2012/10/blog-post_23.html#comment-form


नीरज,
छान लिहिलं आहेस. आवडलं.
हा फार महत्त्वाचा सामाजिक प्रश्न आहे, असं मलाही वाटत नाही. हे मी सांगीतलेलं आहेच.
पण मला तो अभ्यास करण्यासाठी, नक्कीच महत्त्वाचा वाटतो आहे. त्याची नोंद झाली पाहिजे, हे ही वाटतंच आहे.
ज्या गोष्टींमधे निवडीला खरं वाव आहे, म्हणजे रंग पाळायचे की नाही? तुम्ही ठरवू शकता आहात. तेव्हढा सामाजिक दबाव नाही आहे.
 ही प्रथा अजून मजे मजेच्या स्वरूपातच आहे, तेव्हा लोक काय निवडतात?
त्यामागची कारणं काय असतात ? वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक स्तरातले लोक काय प्रतिक्रिया देतील?
हे जाणून घ्यायला मला आवडेल.
कुणीतरी खरंच हा प्रकल्पाचा विषय म्हणून , यावर काम करायला हवं आहे.
आपणही करायला हरकत नाही, आशाने तर सुरूवात पण केली. :)

>>नवरात्रात कुठल्या दिवशी कुठल्या रंगाचे कपडे घालायचे हे व्रत आहे असं का वाटतं हे समजून घ्यायला आवडेल.
ही आत्ता प्रथाच आहे, पण व्रत होण्याच्या मार्गावर आहे.
लोकांचा देवभोळेपणा काही कमी होतोय असं दिसत नाही, मंदिराच्या बाहेर हात जोडून उभे राहणार्‍यात किटितरी तरूण दिसतात.
म्हणून हे व्रत होऊ शकतं, असं वाटतय.

कुंभार विचार करतातच, असं नाहीच आहे, ते फक्त वळतात.

>>>> आपलं कुठल्याही दिवशी कुठल्याही रंगाचे कपडे घालण्याचं स्वातंत्र्य असं कुणालाही का देऊन टाकायचं?
प्रथेचा संबंध एकदम पारतंत्र्याशी?!!

खूप ताणलं जातंय. पण ती वस्तुस्थिती आहे. म्हणजे बीजं आहेतच.
होळीला पुरणपोळी खाण्याची प्रथा आपण नाही सुरू केली.
आपण तसे वाढलो, समजा नाही खाल्ली त्या दिवशी पुरणपोळी तर चालतंच, हे कळलेलं असतंच की!
आणि होळीच्या दिवशी पुरणपोळी खायची प्रथा आपण स्वीकारतो, तेव्हा त्यादिवशी दुसरं काहीही खाण्याचं स्वातंत्र्य आपण गमावतो,
कारण समाजाचा एक हिस्सा म्हणून आपल्याला राहायचं असतं.
अशी कितीक स्वातंत्र्य आपण देऊन टाकतोच.
पण रंगाच्या प्रथेचं असं आहे, ती घडण्याच्या प्रक्रियेत आहे, काहीतरी विचार केला जाणं शक्य आहे.

>> नऊ दिवस आवर्जून वेगवेगळ्या रंगांचे कपडे घालायचा आनंद नाही का?

आपल्या समाजात असले आनंद किती असतात?
म्हणजे आपल्याकडे वर्षाला एखाद दुसरा सण असता, आणि लोक त्यात वेळ घालवत असते तर ठीक होतं.
आपल्याकडे सणावर सण चालूच असतात. प्रत्येक सणाच्या वेगळ्या प्रथा, वेगळे नियम,...
श्रावणापासून सुरू केलं तरी नागपंचमी, राखीपौर्णिमा, गोकुळाष्टमी, पोळा, गणपती, गौरी, दोन्हींचे विसर्जन, नवरात्र.... अडीच महिन्यात एव्हढे सण....
एखादा दिवस नाही , नऊ दिवस त्यात घालवायचे?
किती आनंद? किती उत्सव?

>>एखादी गोष्ट साजरी करायला मोठा समूह, एक पूर्ण समाजघटक, किंवा संपूर्ण समाजच एकत्र आला तर त्याला तुझा आक्षेप आहे का? असला तर का आहे?
नाही.
पण ती गोष्ट कुठली आहे? आणि साजरी करण्याची पद्धत काय आहे? ह्याचा विचार केला पाहिजे.

>> मोठ्या समुहाने एकत्र येऊन काही अर्थपूर्ण अथवा निरर्थक गोष्टी करणे मला आवश्यक वाटतं.
हो. समाज म्हणून एकत्र आहोत, या भावने साठी ते आवश्यक असतं.
निर्रथक म्हणजे किती निर्रथक? आणि किती काळ?

पेपरचा संबंध यासाठी आहे की त्यामुळे वेगाने पसरत जातं. निर्रथक गोष्टींना माध्यामांनी उचलून धरायचं आणि समाजाने माना डोलवायच्या हे बर्‍याच बाबींमधे होत असतं.
कोणीतरी सांगायचं आणि समुहाने विचार न करता करायचं, हे पटणारं नाहीच.
त्यापेक्षा छोट्या समुहात मजेच्या गंमतीदार कल्पना, गट लक्षात घेऊन राबवता येतात, तिथे निखळ मजा असू शकते.
अशा मान डोलावण्यात ती असतेच असं नाही.

>>“सकाळपासून रात्रीपर्यन्त, जिम असो, शाळा असो, कार्यालय असो, लिफ्ट असो की दवाखाना असो,
सगळीकडॆ त्यावर बोललं जातंय” हे तू कशाच्या आधारावर लिहिलं आहेस माहीत नाही.
हे मी ऎकलंय. माझ्या अनुभवावरच आहे. मला ते अती झालं. लोक मजेत का असेना त्यावर बोलताहेत. आणि नुसतं बोलताहेत असं नाही कोणी कोणी आनंदाने आवर्जून नऊ दिवस नऊ रंग वापरताहेत, हे ही मला कळलं.
 नेटवर सुद्धा लोक मागण्या करताहेत की आम्हांला १३ साली कुठल्या दिवशी कुठले रंग वापरायचे ते कळवा. म्हणजे त्यांना बरं पडेल.

>> एखद्या वर्षी ऑफिसमध्ये विशिष्ट पद्धतीने (सार्वत्रिक प्रथेप्रमाणे) सण साजरा झाला, आता पुढच्या वर्षी “पुन्हा तसंच करू” असं ऑफिसमधील मंडळी म्हणायला लागली, तर मी म्हणेन, झालं की गेल्या वर्षी ते, आता या वर्षी काहीतरी वेगळी मजा करू.
आवडलं.
याच्यापुढे जे लिहिणार आहे, तो आगाऊपणा आहे, तरी लिहिते आहे.
आपण कुठलीही सार्वजनिक प्रथा का पाळतो आहोत? याचा विचार करायला हवा. त्याने काय साधलं? काय फायदा? काय तोटा?
हा विचार करायला हवा.
दिखाऊ प्रथांमधे आपण किती दिवस घालवायचे?
या प्रथेच्या निमित्ताने अंगावरचे कपडे आणि त्यांचे रंग यांना आपण केंद्रस्थानी आणतो आहोत.

बरं ही प्रथा पाळणं सक्तीचंच आहे समजा, त्यावर माझा पगारच अवलंबून आहे.
तर रंगांशी संबंधीत, रंगाची जाण वाढवणार्‍या, रंगांबाबत सजग करणार्‍या, माणसांची रंगाभिरूची घडवू शकणार्‍या, छोट्या समुहात शक्य असणार्‍या किती छान छान गोष्टी शक्य आहेत. ( हा आगाऊपणाच आहे, छान च्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या असतात, हे ही मान्यच आहे.) त्या का नाही करायच्या?

नीरज,
 धन्यवाद! मजा आली.
 वाद घालण्याचा नवा आनंदाचा प्रकार, तू साजरं करण्याच्या यादीत घाल. :)
१) तू चर्चा आणखी पुढे नेलीस, म्हणून आणखी विचार केला गेला.
२) इतक्यात व्रत हा शब्द वापरायला नको, हे मान्य, पण व्रत होऊ शकतं.
३) "पाळणे" हे क्रियापदही मी ऎकलं, आपल्याला आवडो न आवडो लोक वापरताहेत. ते माझं नाही.
४) माझ्या मांडणीत काहीवेळा टोकाला गेले आहे (धागा न सोडता), ( असं टॊकापर्यंत जाऊन विचार केला पाहिजे, असं मला वाटतंच) पारतंत्र्याच्या बाबतीत , मान्य.
 आगाऊपणा चालवून घ्यावास, असं नाही. :)

आणि आता एक शेवटचं आणि महत्त्वाचं -- मी जे काही करते, त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करतच असेन असं नाही. करत नाहीच. पण असं काही पृष्ठभागावर आलं, कोणी लक्षात आणून दिलं तर मी नक्कीच विचार करीन आणि बदलेन.

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...