Saturday, July 31, 2010

बंधन

वैवाहिक (सह)जीवन यशस्वी होणं, हे वय लहान-मोठं असण्यावर अवलंबून नसावं. ती सोय आहे, ते नातं आयुष्यभरासाठीचं आहे त्यामुळे दोघांनी मरेपर्यन्त एकमेकांना साथ देण्याची शक्यता वाढते इतकंच. कुठल्याही नातेसंबंधांचा आलेख हा दोघांच्या मॅच्युरीटीवर अवलंबून असतो.खरं आहे. समज कितीही असो पण दोघांची समजेची पातळी सारखी असेल तर बरं पडतं. समज ही अशी गोष्ट आहे की वय वाढलं म्हणून वाढेलच असं नाही. दुसर्‍याला कायम समजून घेत राहणं ही सोपी गोष्ट नाही. समज सारखी असल्याने परस्पर सुसंवाद शक्य होऊ शकतो.
 मला तरी मी बोललेलं समोरच्याला कळणं / निदान कळणं गरजेचं वाटतं. विचार वगैरे जुळणं पुढच्या गोष्टी. माझ्या आणि मिलिन्दच्या बाबतीत आम्ही बोललेलं एकमेकांना (विचारांच्या पातळीवर) कळू शकतं ही गोष्ट मला फार समाधानाची वाटते. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे सगळ्या मर्यांदांसह एकमेकांचा स्वीकार! मिलिन्दला ही गोष्ट सहज जमली. मी मात्र कितीक वर्षे त्याच्यात छोटे मोठे बदल व्हावेत यासाठी प्रयत्न करत राहिले. त्याच्यात काही बदल झाले नाहीत, मी त्या गोष्टी स्वीकारण्याची माझी पात्रता वाढवण्यासाठी ही वर्षे खर्ची घातली. मिलिन्दला सुरूवातीपासूनच माझ्यात काहीही बदल अपेक्षीत नव्हते. याचा अर्थ माझ्यात उणीवा नाहीत किंवा नव्हत्या असं नाही तर त्यांच्यासह स्वीकार असं होतं. आपण एखादं माणूस कसं असेल याचा अदांज करतो, त्याने तसंच असावं असा आग्रह धरतो, पण ते माणूस काही तुमच्या कल्पनेतलं नाही, प्रत्यक्षात आहे. काही बाबतीत हे प्रत्यक्षातलं माणूस कल्पनेतल्या माणसापेक्षा कितीतरी छान असतं. हा साक्षात्कार व्हायला माझी किती वर्षे गेली. बरेचदा मी धडपडत, ठेचकाळत जे शिकते, ते मिलिन्दने सहजपणे आधीच आत्मसात केलेलं असतं. पण माझा लांबचा प्रवास झाल्याने माझ्या खात्यावर अधिक शहाणपण जमा होतं, एव्हढं खरं.
 नवरा-बायकोचं नातंच असं आहे ना? रोजचा सारखा संबंध येणारं, इतक्या जवळून सारखं पाहिल्याने त्या माणसाचं तटस्थपणे काही मूल्यमापन करणं अशक्य होतं. मी तर म्ह्णते नवरा बायको एकमेकांबद्दलचा किमान आदर शिल्लक ठेवू शकले तरी खूप आहे.
 या नात्यात समानता राखणे ही कसरतीची गोष्ट आहे. बरेच संसार हे कोणाच्या तरी/ दोघांपैकी एकाच्या शोषणावर उभे असतात. संसार या चौकटीचीच ही गरज आहे की काय वाटण्याइतके हे सार्वत्रिक आहे.
 एकमेकांसाठी वेळ काढणे आणि बोलत राहणे याही खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आमच्या घरात माझ्या बाजूने मी हे करत आले. मिलिन्दला याची तितकीशी गरज वाटली नाही किंवा या बाबतीतल्या आमच्या गरजांच्या पातळ्या वेगळ्या आहेत.
 नवरा-बायकोच्या नात्याचं बंधन किंवा ओझं होऊ नये. त्यासाठी दोघांनीही सगळ्या बाजूंनी फुलतं राहणं गरजेचं आहे.

Monday, July 19, 2010

ना उम्र का हो बंधन....

वडिलांच्या वयाच्या पुरुषाशी नायिकेचे फ़सवून लग्न लावले जाते आणि मग त्याविरूध्द ती बंड पुकारते. जरठ-बाला(कुमारी) विवाहाची समस्या मांडणार्‍या प्रभातच्या ‘कुंकु’ चित्रपटाने किंवा देवलांच्या ‘संगीत शारदा' नाटकाने या अनिष्ट विवाहप्रथेला छेद देणारा विचार त्यावेळेस मांडला. खरचं किती अन्यायी प्रथा होती ती! त्या मुलीचे कोमल भावविश्व कसे करपून जात असेल अशा लग्नाने.

हे झाले त्याकाळातले; आजच्या काळात देखील, आपल्यापेक्षा १५-२० वर्षांनी मोठया असणा-या पुरूषावर प्रेम करणा-या/लग्न करणा-या(स्वखुषीने) स्त्रिया देखील आहेतच की! वयातील अंतर एवढे जास्त म्हणजे विचारांमधे दरी निर्माण होत नसेल? एकमेकांना समजून घेणे कस शक्य होत असेल? कदाचित नातेसंबंध सांभाळण्याची प्रगल्भता/क्षमता असेल त्यांच्यात.

लग्न करताना, पुरुषापेक्षा स्त्री वयाने लहान असावी असा एक सामाजिक नियमच (का निसर्गनियम?) ठरून गेला आहे. स्त्री ने तिच्यापेक्षा अधिक कर्तृत्ववान असणा-या, तिच्यापेक्षा मनाने खंबीर, उंचीनेही 'मोठा' असणा-या पुरुषाशीच लग्न करावे अशी सर्वसाधारण धारणा असते. मधे वाचनात आले होते की पुरुषाने स्त्रीपेक्षा वयाने मोठं असावं याचे कारण दोघांच्या मानसिकतेतील फ़रक! पुरुषापेक्षा स्त्रीत जास्त प्रमाणात असणारी सहनशीलता, तिची नैसर्गिक शारीरिक जडणघडण वगैरे. असेल ही कदाचित काही प्रमाणात ह्यात तथ्य, पण म्हणून असा नियम होऊ शकत नाही.

समाजाच्या ह्या चौकटीबाहेर जाण्याचा जरा कोणी प्रयत्न केला की तो चर्चेचा विषय होतो. नर्मदा बचाव आंदोलनात सहभागी होण्यासाठी मी अहमदाबादला निघाले होते. माझ्या बरोबर तेव्हा कुसुम कर्णिक होत्या. त्यांच्याबरोबर गप्पा मारताना समजले की त्यांचा नवरा(आनंद कपूर) त्यांच्यापेक्षा १५-१६ वर्षांनी लहान आहे. मला त्यावेळेस जरा नवलच(खरतरं विचित्रच) वाटले होते. अशी उदाहरणे त्याआधी बघितली/ऐकली होती (सचिन तेंडुलकर, काही सिनेनट), पण त्यांचे सामाजिक वर्तुळ वेगळे आहे, त्यामुळे चालत असेल असे वेगळे काहीतरी असे वाटायचे. पण आजकाल अगदी आपल्या आजूबाजूला सुध्दा अशी जोडपी असतात. माझ्या एका मावसभावाने पण त्याच्यापेक्षा ५-६ वर्षांनी मोठया असलेल्या मुलीशी लग्न केले आहे. त्याला तिच्यातले काय भावले असेल किंवा तिला त्याच्याशी लग्न का करावेसे वाटले असेल असे प्रश्न नाही पडले मला. कारण ही आवड-निवड पूर्णत: खाजगी गोष्ट आहे. त्याचे स्पष्टीकरण देता येत नाही किंवा देण्याची काही गरजही नाही. पण असे सामाजिक परंपरेला छेद देणारे विवाह ‘प्रेम विवाहच’ असतात; रीतसर ठरवून केलेल्या लग्नात, वयाने जाऊ देत पण शिक्षण, नोकरी, उंची, सामाजिक दर्जा ह्यापैकी कशातही मुलीपेक्षा कमी असलेला मुलगा निवडणे असे उदाहरण विरळाच!

वैवाहिक (सह)जीवन यशस्वी होणं, हे वय लहान-मोठं असण्यावर अवलंबून असतं का? स्त्रीचं वय पुरुषापेक्षा जास्त असल्यास त्यांच्या नातेसंबंधावर परिणाम होतो की नाही? हे ठरवणं अवघड आहे. परस्परांच्या संमतीने निवड झालेली असेल, तर खरतरं सहजीवनात काही प्रॉब्लेम येऊ नयेत. पण कधीकधी वयातील हा फ़रक काही वर्षांनंतर टोचतही असेल. अर्थात हे दोघांच्या मॅच्युरिटीवर, परस्परांवरील विश्वासावर अवलंबून असते असे मला वाटते.

Thursday, July 15, 2010

बाई

’बाई’ किंवा ’बायका’ असे शब्द मी पूर्वी कधी वापरत नसे. ते मला आवडायचे नाहीत. मी कायम स्त्री, महिला असेच शब्द वापरायचे. तेच बायकांसाठी सन्मानदर्शक शब्द आहेत असे मला वाटे.


चांगल्या शिकल्या सवरल्या बाईला ’बाई’ काय म्हणायचे! ती स्त्री. बाईपण ओलांडून माणूसपणाकडे गेलेली.

हे सगळं करत असताना मी बायकांची प्रतवारी करत आहे हे माझ्या लक्षात येत नसे. मी स्त्री आणि माझ्याकडे काम करणार्‍या मावशी म्हणजे कामवाली बाई. स्त्री आणि बाई असे शब्द वापरताना बायकांची आर्थिक, सामाजिक उतरंड मी पक्की करत असे.

जेव्हा माझा स्त्रियांचा रितसर अभ्यास सुरू झाला तेव्हा समाजात स्त्रियांचे कसे वेगवेगळे गट पाडले गेलेले आहेत, हे मी शिकले. त्याही पलीकडे शरिरविक्रय करणार्‍या स्त्रिया, वेश्या किंवा सेक्स वर्कर्स तर माझ्या दृष्टीने जगात अस्तित्वातच नव्हत्या. त्यामागचे राजकारण मी शिकले. वेगवेगळ्या विचारसरणीच्या स्त्रीवाद्यांचे त्यावरचे विचार आम्हांला अभ्यासायला होते. आणि ’डोळे उघडावेत’ तसे माझे झाले. मी कितीही माझ्या स्वातंत्र्याचा विचार करत असले तरी ते सारे विचार चौकटीतले होते. माझ्या विचार करण्याच्या मर्यादा मला कळल्या. पुटं गळून पडावीत तसे झाले.

जर मला स्त्रियांचा विचार करायचा असेल तर फक्त मध्यमवर्गातल्या, उच्चवर्णातल्या स्त्रियांचा विचार करून चालणार नाही. निदान विचारांच्या पातळीवरतरी माझ्या कुवतीप्रमाणे मी सगळ्या स्त्रियांना सामावून घ्यायला पाहिजे. हे कधीतरी मला कळलं

मग जगातल्या सगळ्या बायकांशी नातं सांगणारा ’बाई’ हा शब्दच मला जवळचा वाटू लागला.

त्यानंतर मी प्रामुख्याने मी ’बाई’ हाच शब्द वापरायला सुरूवात केली.

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...