Friday, June 29, 2012

वाचकांचे लेख -- त्याच्या आयुष्यातील आपली गरज.. स्थान.. --- ३

छान लिहिलंयस ग..  
तू मनोविज्ञान किंवा विवाह समुपदेशन यापैकी कोणत्या क्षेत्रात आहेस का?
मनाचा गुंता अगदी सहज सोडवलास.. टप्प्याटप्प्याने..

तुझे काय चुकले?>> खूप लोक जेव्हा "तुझं चुकतंय" असं म्हणतात तेव्हा पटकन "माझं चुकलं" असं म्हणून एक पाउल मागे यायची माझी प्रवृत्ती आहे.. त्याचे मुळ कदाचित माझ्या मुलगी असण्यात किंवा मला ज्याप्रकारे वाढवले गेले त्यात असावे. काही वेळेस खरोखर माझी चूक असतेच.. पण ती नसते तेव्हाही माझं चुकलंय हे मी कबूल करते माझ्या अश्या वृत्तीमुळे..

"आपल्या भावना", ”आपल्याला आतून वाटणं’ हे कधीही नाकारायचं नाही.’मला वाटूच नये”, ’असं मनात नाही यायला पाहिजे’,...... अशा अपेक्षा स्वत:कडून ठेवणं हे स्वत:वर अन्याय करणारं आहे.>> हे असं म्हणणारे खूप कमी भेटतात.. आपल्या समाजात/ संस्कृतीत काही वेळेस काही विचार/भावना मनात येणे (उदा. काकस्पर्श), कोणाकडूनही कुठलीही अपेक्षा करणे हे सरसकट चूक मानले जाते. 

हा तुम्हां दोघांना वाढवण्यातला फरक आहे.>> ह्म्म्म.. हे बरोबर आहे. माझ्या बाबतीत मला आयुष्यातली बरीचशी मौजमजा करण्यासाठी मला लग्न होण्याची वाट पहायला लागली आहे (त्यामुळे मलाच माझ्या लग्नाची इतकी घाई होती कि मी सासरी जातांना रडले पण नाही :D :D) . तसं त्याचं झालं नसावं. आणि शिवाय माझ्याच नवरयापुरत बोलायचं झालं तर इकडे सासरी नातेसंबंधान्विषयी खूप पारंपारिक अप्रोच आहे. माझ्या सासरेबुवांनी कधीच अजूनही आईंना नावाने हाक मारलेली नाहीये किंवा (मी मागे म्हटलं तसं) कुठेच फिरायला वगैरे घेऊन गेलेले नाहीयेत.. मुलांची नावंसुद्धा ठेवतांना सासूबाईंना विचारले देखील नव्हते.. त्यांच्या आईने (माझ्या आजेसासूबाई) सांगितले ते नाव ठेवले. माझा नवरा तेच पहात लहानाचा मोठा झाला आहे. त्यामुळे त्याच्या दृष्टीने कदाचित तो माझ्याशी बोलतो किंवा माझ्यासोबत बाहेर येतो हेच खूप (आणि पुरेसे) असेल.

आपल्याला अशी पायाची दासी वगैरे व्हायचं आहे का? (तिथे स्थान निर्माण करायला पुष्कळ वाव आहे.) नाही ना?>> नक्कीच नाही. म्हणूनच मी काय ते स्थान निर्माण नाही झाले तरी चालेल.. पण त्याला त्याची कामे स्वत:लाच करू देते/ करायला लावते/ सांगते. मात्र माझ्या सासूबाई त्यावेळी आमची नव्हती हो टाप कधी नवरयाला स्वत:चे ताट स्वत: वाढून घ्या म्हणायची..असे भुवया विस्फारून सांगतात.. (मी गम्मत म्हणून सोडून देते :) ).

मुली सहसा असं करतात, तुझं काय मला माहीत नाही, त्यांच्या मनात जी घोड्यावरून दौडत येणार्‍या राजकुमाराची प्रतिमा असते, तिला आपल्या नवर्‍याचं रूप देतात. नवरा म्हणजे असा असणारच, असायलाच हवा, असं गृहीत धरतात. >> रंग-रूपाच्या बाबतीत मुळीच अशी प्रतिमा नव्हती. पण तो मला फुलासारखं जपेन (आणि माझ्यामागे भुंग्यासारखा फिरेन :D :D ), आणि सारख सारख मला काय हव नको ते विचारेन असे काहीतरी माझे विचार होते.. पण ते बरेचसे बालिश आहेत याची मला लग्नानंतर आपणहून जाणीव झाली. (शिवाय घरकाम करण्यात एवढी सूट आहे याला मी फुलासारखे जपणेच म्हणेन.)

नवरा असण्याआधी तो एक माणूस आहे, आणि तो तसा नाही आहे. हे वास्तव मुली पाहू शकत नाहीत.>> हे कोणत्या बाबतीत म्हणते आहेस? रंगाच्या, रूपाच्या, पैश्यांच्या, आवडीनिवडीच्या, सवयींच्या (उदा. स्वच्छता इत्यादी) कि स्वभावाच्या??

मला असं वाटतं लग्न झाल्या झाल्या मुली नवर्‍यात फार अडकतात, याचं कारण शारीरिक संबंध हे असावं.>> तो एक भाग झाला.. मुळात स्त्रीचं सर्वस्व.. मग ते तन-मन-धन काही का असेना.. ते नवऱ्याच्या मालकीचं आहे.. तिच्या स्वत:च नाही, या संस्कारात आहे.. तू शारीरिक अनुषंगाने म्हणते आहेस पण आजही बरयाच मुली लग्न झाले कि आपली कोणत्याही मुलाशी असलेली मैत्री/ संपर्क  कमी करते क्वचित तोडून टाकते हि भावनिक गुंतवणूक झाली ना.. आणि धनाच्या बाबतीत तर आपण नकोच बोलूयात.. तो एक स्वतंत्र विषय आहे..

बायकोशिवायही त्यांचं त्यांचं जग असतंच.>> आणि बायकोच तसं नसतं.. याच कारण पुन्हा त्यांना कसं वाढवलं गेलं आहे त्यात असत.. हो ना?

त्यामुळे जर त्याच्या आयुष्यात स्थान नाही, त्याला आपली गरज नाही असं वाटायला लागलं तर अहंकार दुखावला जात असेल, पण त्यापेक्षाही मला वाटते ही निराशा आहे.>> खुपदा असे विचार मनात येतात कि मी त्याला आपलंस करू शकले नाही.

त्याला आठवत असणारही पण तो तुला सांगत नाही आहे, अशी एक शक्यता आहे.>> असेल.. सर्वसामान्य पुरुषांप्रमाणे तोही अबोल असेल.. किंवा त्याच्या संस्कारात पुरुषाने आपल्या भावना व्यक्त करणे नसेल.

एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं ते असं की आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू आपण आहोत. केंद्रस्थानी दुसर्‍या कुणालाही, नवर्‍यालाही ठेवायचं नाही. >> थोडक्यात आपला आनंद आणि भावना परावलंबी करायच्या नाहीत. बरोबर?

मी जर त्याच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची व्यक्ती नाही आहे तर याचं कारण माझ्यात काहीतरी कमी आहे, असे अर्थ काढायचे नाहीत.>> हम्म्म.. याने निराशा नक्कीच कमी होईल.

मुळात खरोखरी एकमेकांच्या प्रेमात पडण्यासाठी सहा महिने हा खूपच थोडा कालावधी आहे, एवढ्यात तर एकमेकांची पुरेशी ओळखही होत नाही. (याबद्दल सगळ्यांनी सांगीतलं आहेच! :) )>>
हो ना.. पण मुळात आसपास नवविवाहित जोडपी पहिली कि ते प्रेमातला हा असा मिस यु लव्ह यु वाला बालीशपणा खूप करतात..त्यात पण मजा असते एक. मग मला असं वाटायचं कि आपल्या लग्नाला ६च महिने झाले, इतक्यात आपल्या नात्यातली नवलाई संपली का??कि आता मी असले काय नि नसले काय.. कुठे फरक पडतो? मी माझ्या लेखात जो प्रसंग सांगितला आहे त्यावरून मी काढलेला निष्कर्ष लग्नाला अजून ६च महिने झाले आहेत म्हणून सगळ्यांनी चुकीचा आहे असे सांगितले. पण उलट आमच्या लग्नाला २० वर्ष झाली असती आणि त्याला माझी आठवण आली नसती तर कदाचित आता मी माहेरी जाण्यात आता कसली नवलाई असं मीच म्हटलं असत..आणि मला वाईट वाटलं नसत.. नवऱ्याने आपल्याला सारख मिस यु किंवा लव्ह यु म्हणव हि अपेक्षा लग्नानंतरच्या पहिल्या ६ महिन्यानंतर असते कि लग्नाला १०-१२ वर्ष झाल्यावर?? 
कदाचित माझा प्रश्न चुकला.. एकदम स्थान वगैरे म्हणणे एकदम चुकीचे होते.. पण त्याला माझी आठवण यावी हि अपेक्षा रास्त होती.. तुला काय वाटत??

स्थान निर्माण करण्यासाठी असं वरून नाही काही करता येत.>> बर झालं सांगितलस ते.. माझा आटापिटा कमी होईल..

तुझ्या या स्वतंत्र लेखाबद्दल खूप खूप आभार.. आत्मपरीक्षण करण्यास मदत झाली आणि स्वत:ला आणि स्वत:च्या भावनांना जसे आहे तसे स्वीकारण्यासाठी सुद्धा..

ता.क. १. मी जिथे जिथे मुला-मुलीवर होणारे संस्कार आणि त्यांची वाढ असे म्हटले आहे तिथे मला पालक आणि आजूबाजूचा समाजही जे संस्कार करतो त्यांविषयी बोलायचे आहे. मी कुठेच पालकांना अश्या संस्कारांसाठी एकमेव दोषी मानलेले नाही.

ता.क. २. एवढी मोठी प्रतिक्रिया त्या लेखाखाली देण्यात तांत्रिक अडचण येते आहे त्यामुळे हि प्रतिक्रिया स्वतंत्र लेख म्हणून प्रसिद्ध करावा.

-पियू

त्याच्या आयुष्यातील आपली गरज.. स्थान.. -- २


पियू,
   तुझे काय चुकले?
 आपल्या नवर्‍याच्या आयुष्यात आपले काही स्थान असावे, ते महत्त्वाचे असावे, आपल्यावाचून त्याचे अडावे, त्याला आपली आठवण यावी, असे वाटण्यात चुकीचे काय आहे?
कुठलीही दोन माणसे एकमेकांत गुंतलेली असतील/जवळच्या नात्यातली असतील तर त्यांना एकमेकांसाठी असं वाटणारच ना?
"आपल्या भावना", ”आपल्याला आतून वाटणं’ हे कधीही नाकारायचं नाही.
मग त्यामागची कारणं काय आहेत? गुंतागुंत काय आहे? ते शोधू या ना!
पण ’मला वाटूच नये”, ’असं मनात नाही यायला पाहिजे’,...... अशा अपेक्षा स्वत:कडून ठेवणं हे स्वत:वर अन्याय करणारं आहे, त्यावर विचार झाला की वाटणं बदलू शकतं.

 तोवर जिथे आहोत, तिथून सुरूवात करायची.
तुझं म्हणणं असं आहे की तुला त्याच्याबद्द्ल असं/जे वाटतं पण त्याला वाटत नाही. असं का?
हा तुम्हां दोघांना वाढवण्यातला फरक आहे.

 तू हे ऎकत वाढलीस की ..." आधी लग्न करा आणि मग नवरयाला घेऊन फिरा कुठे फिरायचे ते"......
तुझ्या नवर्‍याने हे वाक्य कधी ऎकले असेल का? नसावे.
मुली सहसा अशी वाक्ये ऎकत वाढतात. अगदी लहान असल्यापासून नवर्‍याची एक प्रतिमा त्यांच्या मनात तयार होत जाते, त्याचं घर म्हणजे माझं घर, त्याचं सुख म्हणजे माझं सुख, त्याला पटेल तसं मी वागीन, तो माझ्या आयुष्याचा मह्त्त्वाचा भाग असणार आहे, मी त्याच्याविना अपुरी, माझं ध्येय काय? त्याची मर्जी सांभाळणं, त्याच्या आयुष्यात स्थान निर्माण करणं.
 मुली नुसती अशी वाक्ये ऎकत नाहीत, तर आजूबाजूला बायकांना असं वागताना बघतात.
मुलग्यांना असं काहीही ऎकवलं जात नाही. त्यांच्या मनातली बायकोची प्रतिमा कशी असते? मदतनीसाची, किंवा रूममेटची.
म्हणजे लग्न झाल्यावर त्याला असे ऎकवले जाऊ शकते, " मोजे सापडत नाहीत का? आता बायकोला विचारत जा."
मग बायको नियमाने मोजे तयार ठेवू लागली की त्याला बायकोची आठवण येणारच! आपल्याला अशी पायाची दासी वगैरे व्हायचं आहे का? (तिथे स्थान निर्माण करायला पुष्कळ वाव आहे.) नाही ना?

 मुली सहसा असं करतात, तुझं काय मला माहीत नाही, त्यांच्या मनात जी घोड्यावरून दौडत येणार्‍या राजकुमाराची प्रतिमा असते, तिला आपल्या नवर्‍याचं रूप देतात. नवरा म्हणजे असा असणारच, असायलाच हवा, असं गृहीत धरतात.
 नवरा असण्याआधी तो एक माणूस आहे, आणि तो तसा नाही आहे. हे वास्तव मुली पाहू शकत नाहीत.
का? याला लग्नाची किंवा प्रेमाची जी मिथकं आहेत, तीही कारणीभूत आहेत.
लग्न हा एक व्यवहार आहे, सोय आहे, मग तुमचं ठरवून लग्न असो की प्रेमविवाह असो.
तू किंवा कुठलीही मुलगी ही नवर्‍याची एक प्रतिमा जपत, त्याची वाट पाहात वाढली आहे त्यामुळे एकदा तो त्या मुलीच्या आयुष्यात आला की तो तिचं सर्वस्व झालेला आहे.
 दुसरं असं की ती शरीराने त्याच्याशी बांधली गेली आहे, ते त्याला समर्पित केलं, म्हणजे तो खासचं आहे ना, तिच्यासाठी. आजवरचं आयुष्य, ते शील, काचेचं भांडं वगैरे ती जपत आली ती त्याच्यासाठीच!
 मला असं वाटतं लग्न झाल्या झाल्या मुली नवर्‍यात फार अडकतात, याचं कारण शारीरिक संबंध हे असावं.
मुलग्यांसाठी ते तसं नसतं. म्हणजे ते बायकोशी प्रामाणिक नसतात असं मी सुचवतही नाही आहे. पण ते स्वत:ला जपत आलेले नसतात, म्हणजे नाही त्यांना जपायला लागत.
बायकोशिवायही त्यांचं त्यांचं जग असतंच.

त्यामुळे जर त्याच्या आयुष्यात स्थान नाही, त्याला आपली गरज नाही असं वाटायला लागलं तर अहंकार दुखावला जात असेल, पण त्यापेक्षाही मला वाटते ही निराशा आहे.

या पार्श्वभूमीवर तुझा प्रश्न काय आहे, तो पाहू या.
नवर्‍याच्या आयुष्यात आपली काही गरज निर्माण करणे, यासाठीचे मार्ग कुठले? त्याच्या आयुष्यातलं आपलं स्थान काय?
केव्हा नवर्‍याला आपली गरज भासावी, असं तुला वाटतं?
मोजे घालताना नक्कीच नाही.
म्हणजे त्याला भावनिक पातळीवर आपली गरज भासली पाहिजे असं तुला वाटतं.
संकटात, आनंदात, दु:खात, ऎरवी सहजही त्याला तू आठवली पाहिजेस. आणि त्याने तुला ते सांगीतलंही पाहिजे.
त्याला आठवत असणारही पण तो तुला सांगत नाही आहे, अशी एक शक्यता आहे.
दुसरी शक्यता अशी आहे की नाही त्याला आठवण येत.... अशावेळी काय करायचं.
स्वीकारायचं.
तुला त्याचा त्रास होतोय, वाईट वाटतंय... ठीकच आहे.
पण स्वत:ला दुखवून घ्यायचं नाही.
तो तुझ्याशिवाय मजा करू शकतोय पण तू त्याच्याशिवाय मजा करू शकत नाही आहेस. काय करायचं?
स्वीकारायचं.

एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं ते असं की आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू आपण आहोत. केंद्रस्थानी दुसर्‍या कुणालाही, नवर्‍यालाही ठेवायचं नाही.
स्वत:कडे त्याच्या नजरेने पाहायचं नाही.
मी जर त्याच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची व्यक्ती नाही आहे तर याचं कारण माझ्यात काहीतरी कमी आहे, असे अर्थ काढायचे नाहीत.

मुळात खरोखरी एकमेकांच्या प्रेमात पडण्यासाठी सहा महिने हा खूपच थोडा कालावधी आहे, एवढ्यात तर एकमेकांची पुरेशी ओळखही होत नाही. (याबद्दल सगळ्यांनी सांगीतलं आहेच! :) )

 आपण आपल्या गतीने, आपल्या चालीने चालत राहायचं, आपल्या मुल्यांसह, त्यामुळे जर कोणाच्या मनात स्थान निर्माण झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं. स्थान निर्माण करण्यासाठी असं वरून नाही काही करता येत.

 एक मला बरं वाटलं तुझा नवरा नाटक करत नाही आहे. हे तुमचे नाटक करण्याचे दिवस आहेत, प्रतिमेत अडकण्याचे दिवस आहेत. ते तो करत नाही आहे, छानच ना? कुठल्याही जवळच्या नात्यात ’खरा माणूस’ आपल्या समोर असायला हवा. मग त्याला कसं समजून घ्यायचं बघता येईल. पण तो जर खोटा असेल, अगदी जाणीवपूर्वक नाही ..... समाजाच्या दबावाखाली, तर संवादच संपेल.

 एकमेकांमधे काही नातं निर्माण करायचं असलं तर ते विश्वासाच्या पायावर उभं असलं पाहिजे, एकमेकांशी गाभ्यातून खरं बोलता आलं पाहिजे. एकमेकांकडे सहानुभूतीने बघता आलं पाहिजे. एकमेकांना क्षमा करता आली पाहिजे. अशी खरी नाती दु्र्मीळ असतात.
अशा दुर्मीळ व्यक्तींची गरज भासणारच आणि एकमेकांच्या आयुष्यात त्यांना स्थान असणारच.







Friday, June 15, 2012

मौज-मजा




बायकांना पुरूषांशिवाय मजा करावीशी वाटत नाही किंवा त्या करत नाहीत असे सर्वसाधारणपणे दिसते.
आपल्या परंपरेत असे काही सण आहेत, जेंव्हा बायका बायका मजा करतात. उदा. हळदीकूंकू, मंगळागौर, डोहाळजेवण हे अगदी बायकांचे सण आहेत. पुरूषांना अशा समारंभांना बंदी असते आणि बायका ते साजरे करतात. अशा पुरूषपात्रविरहीत सणांमधे मजा येते.
 (आम्ही इंद्रधनुच फक्त जमतो तेव्हा अशा "पुरूषपात्रविरहीत बैठकींना" खूप मजा येते. अशावेळी बसण्या, बोलण्या, वावरण्याचे जे किंचित ताण इतरवेळी असतात, ते नसतात. मोकळं वाटतं.)
म्हणजे जर परंपरेची परवानगी असेल तर बायका बायका मजा करतात.
ही परवानगी फक्त सौभाग्यवतींना किंवा कुमारीकांना होती. विधवांना हे सगळंच नाकारलेलं. बायका बायकांच्या मजेसाठीही नवरा असणं गरजेचं होतं.
 बायकांना पुरूषांशिवाय मजा करावीशी वाटत नाही याची मुळं मला वाटतं पतिव्रताधर्मात आहेत. ( पतिव्रताधर्म आणि त्यामागचं राजकारण याबद्दल कधीतरी लिहिन.) आणि आधी पुरूष आणि नंतर बायका अशी उतरंड.
 साधी जेवायची गोष्ट घेतली तरी पुरूषांची पंगत आधी अशी पद्धत होतीच ना? उरलं सुरलं बायकांच्या पंगतीला. बाईने नवर्‍याच्या ताटात जेवायचं. त्याचं उष्ट खायचं. काही दयाळू नवरे आपल्या बायकोला मिळावं म्हणून ताटात जास्तीचं गोडधोड वाढून घेत आणि पानात ठेवत. ते म्हणजे प्रेम! आपल्या पाळीव कुत्र्यामांजरावर प्रेम करावं तसं ही पुरूषमंडळी आपल्या बायकांवर प्रेम करीत आणि बायका करवून घेत.
 अशा बायका एकट्या जेवायला हॉटेलात जातील का?
 मजा म्हणजे काय? मजेची व्याख्या आपण कशी करू? ’अ’ व्यक्तीच्या मजेची व्याख्या ’ब’ व्यक्ती नाही करू शकणार. ’अ’ ने जर सांगीतलं ती मजेत आहे तर मजेत आहे. मग इथे प्रश्न येतो संस्कारांचा, समाजातील व्यक्तीची भूमिका आणि प्रतिमा यांचा.
 पियू, इथे तू म्हणतेस तशी मजा न करण्याची मुळे बायकांवरील संस्कारांत आहेत.
 पूर्वीपासून घर हेच बायकांचं कार्यक्षेत्र होतं. त्यामुळे जी काय मजा करायची ती घरातच. अशी प्रथा होती की ’ बाहेर जाणाराला कुठे जात आहात?" असं विचारून हटकायचं नाही. नाहीतर काम होत नाही. पुरूष मजा करायला कुठे जात आहेत हे बायकांनी विचारायचं देखील नाही. वा! काय न्याय आहे?
 मला वाटते आता थोडे बदल होताहेत. बायका बदलताहेत. तुझ्या सासूबाईंसारख्या आणखीही बायका असतील पण अशा सहलींना जाणार्‍या बायकाही आहेत. तुझ्या सासूबाईंनी आवडीच्या सहलीला जाण्याची संधी का नाकारली असेल? तुला काय वाटतं?
 १)अशी संधी नाकारून त्या नवर्‍यासाठी त्याग करत आहेत, त्यामुळे समाजात प्रतिष्ठा मिळत आहे.
 २) त्याचवेळी नवर्‍याला मी तुमच्यासाठी काय काय सोडते असं सांगून ’इमोशनली ब्लॅकमेल" करून त्याचे फायदे मिळवता येतात.
 ३) आणि खरं म्हणजे त्या स्वत:च्या सुखासाठी, आनंद मिळविण्यासाठी मनाने तयारच नाहीत.
हे तिसरं जे कारण आहे ना, ते करूण आहे.
आपण बायका आपल्याला स्वत:ला सुखी करण्याचा आपल्याला हक्क आहे असं मानतच नाही.

मला असं वाटतं,  फार त्याग-बीग करू नये कोणी, बायकांनी तर नाहीच नाही. आपल्यालाही आपण हे सोडलं ते सोडलं वाटत राहतं आणि ज्याच्यासाठी त्याग करतो ना ? त्यालाही त्याचं ओझं होऊन बसतं.

>> मला स्वत:ला एक माणूस म्हणून कुठलीही मौज-मजा करण्याचा अधिकार नाही का??
आहे आणि हा अधिकार नुसता खिशात ठेवू नकोस.
मजा कर.


वाचकांचे लेख -- त्याच्या आयुष्यातली आपली गरज..

हा विषय खरे तर मी माझ्या "आपली आपली एन्जॉयमेंट" मध्येच समाविष्ट करणार होते.. कारण तो थोडाफार त्या विषयाच्या जवळ जातो.. पण मला दोन्ही विषयांवर आपली स्वतंत्र चर्चा होणे अपेक्षित आहे म्हणून या दुसऱ्या लेखाचा घाट...

या लेखात मांडलेले विचार मनात यायचे कारण  म्हणजे मी लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी (पुण्याहून मुंबईत) आले होते.. एकदम १० दिवसांसाठी.. पहिले काही दिवस (खर तर १-२ च) त्यातल्या त्यात बरे गेले.. पण नंतर खूप प्रकर्षाने नवऱ्याची आठवण यायला लागली.. त्याच्याशिवाय मी इथे इतके दिवस करू काय असं वाटायला लागलं सतत..

म्हणून मी दोनदा-तीनदा नवर्याला फोन केला.. तर तो त्याच्या मित्रांसोबत पार्टी करण्यात मग्न होता.. कधी फुटबॉल खेळण्यात.. कधी क्रिकेट.. कधी सिंहगड ट्रीप..
अगदी प्रामाणिकपणे कबूल करते.. मला खूप वाईट वाटले..
ज्याच्याशिवाय आपल्याला अज्जिबात करमत नाही त्याचे आपल्यावाचून काहीच अडत नाही हे ऐकून अहंकार थोडासा दुखावला गेला बहुतेक माझा...

आणि मग मी विचार करायला लागले.. त्याचे माझ्यावाचून अडावे असे काही मी केले आहे काय? घरात कपडे, भांडी आणि इतर स्वच्छतेला बाई आहेत.. त्या कपडे धुण्यापासून ते अगदी त्यांच्या घड्या पण करून ठेवतात.. इस्त्रीवाला घरी येऊन कपडे घेऊन जातो आणि आणून देतो.. अजून तरी घरात स्वयंपाक  सासूबाई करतात.. मी त्यांना सगळी मदत करते..पहिल्यापासून अमुक कामे बायकोची आणि अमुक नवऱ्याची असा पायंडा पडू नये म्हणून मी त्याची कामे त्याला करायला लावते.. उदा. स्वत:चे ताट स्वत: वाढून घेणे, स्वत:ची अंतर्वस्त्रे स्वत: धुणे.. (मला सध्या तरी एवढीच कामे आठवत आहेत जी आम्हाला करायला उरतात).. लग्नाला ६ च महिने झाले असल्याने मुले असण्याचा काही संबंध नाही.. कि ज्यांचे माझ्यावाचून अडावे...

मी नुकताच महेंद्र कुलकर्णी यांच्या "काय वाट्टेल ते" ह्या ब्लॉग वरील एक लेख वाचला होता.. "गुळाचा गणपती" नावाचा.. त्यात त्यांनी लिहिलं होत.. बायका मुद्दाम आपल्या नवऱ्याला एकूण एक वस्तू हातात देऊन पांगळ करून टाकतात.. अगदी गुळाचा गणपतीच.. जेणेकरून त्याचे पदोपदी आपल्यावाचून अडावे.. त्या वेळी मी तो लेख वाचून.. "बंर झालं बाई आपण काही आपल्या नवऱ्याचा असा गुळाचा गणपती नाही होऊ देत" असा विचार करून आनंद मानला होता...

पण आज या घटनेनंतर विचार केला तर जाणवतंय.. बायका असं का करत असतील.. नवीन घरात आल्यावर.. नवऱ्याच्या आयुष्यात आपलं असं काही स्थान निर्माण करायच्या प्रयत्नात हे घडत असेल.. सासरी आल्यावर नवीन नवीन एक नवरा सोडून कोणीच आपले नसते.. विशेषत: लग्नानंतर शहर बदलले आणि नवीन शहरात कोणाशी ओळख पाळख नसेल तर खूपच एकटेपणा जाणवतो..नंतर हळूहळू हि इतरांबद्दलची परकेपणाची भावना कमी होते.. पण निदान लग्न नाव असतांना ती मुलगी खूप इन्सिक्युर फील करते... आणि आपल्यापाशी असलेल्या एकमेव गोष्टीला जीवापाड जपायला लागते.. थोडा हक्कही गाजवायला लागते.. आणि मग हे "गुळाचा गणपती" प्रकरण त्याचाच एक भाग असते..

पण असं काही नवऱ्याच्या बाबतीत घडत नाही.. किंबहुना मला वाटायला लागलेय कि हे त्याच्या खिजगणतीतही नसते.. तो त्याच्याच घरात.. त्याच्याच परिसरात राहत असल्याने त्याला असे इन्सिक्युर वाटत नाही.. त्याच्यावर प्रेम करणारी अनेक माणसे त्याच्या आसपास असतातच..
मागेच कुठल्यातरी लेखावर दिलेल्या प्रतिक्रियेत दिपाताईने म्हटलेय तसे नवऱ्याला बायकोसाठी कधीतरी खास काही करावे असे वाटतच नाही त्याचे हे कारण असावे.. कि त्याने कोणाच्यातरी (बायकोच्या) आयुष्यात आपले काही स्थान निर्माण करायलाच हवे अशी गरज त्याला वाटत नाही..

मग आपल्याला वाटायला लागते.. याच्या आयुष्यातले आपल नक्की स्थान तरी काय?

संसार म्हणजे 
रोजची तीचतीच
कामे फक्त
व्हायला हवीत
करणारी कोण
याला तशी
काहीच
किंमत नाही

हि ८ मार्च २०१० ला ब्लॉग वर आलेली कविता बहुतेक याच भावनेतून जन्मलेली असावी..

तर.. माझा प्रश्न असा आहे सख्यांनो आणि सखींनो..
"आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात आपली काही गरज निर्माण करणे यासाठी त्याला "गुळाचा गणपती" बनवून पांगळे करणे याव्यतिरिक्त काही मार्ग आहेत काय? असतील तर ते कोणते?

 पियू

Tuesday, June 12, 2012

वाचकांचे लेख -- आपली आपली एन्जॉयमेंट !!!


हा माझा ह्या ब्लॉग साठीचा पहिलाच लेख आहे... काही चुकलं तर समजून घ्या...

जास्त पाल्हाळ न लावता मुद्द्यावर येते.. माझं असं ऑ  ब्झर्वेशन आहे कि लहानपणापासून जसे स्त्रीच्या मनावर "पुरुषांशिवाय तू कोणीही नाही/ तुझ्या अस्तित्वाला काही अर्थ नाही" असे बिंबवले जाते त्याचप्रमाणे "पुरुषांशिवाय मजा/आनंद हा खरा आनंदच नाही" असेही ठसवले जाते... ह्याचाच परिणाम म्हणून पुरुष आपल्या  बायकांशिवायही मजेत पार्टी 
 वगैरे करताना दिसतात.. इकडे तिकडे ट्रीप ला जातांना दिसतात.. पण बायकांना मात्र नवऱ्याशिवाय कुठल्या मौजमजेची कल्पनाही करवत नाही..

बायको घरी नसेल तर खुशाल एकटे-दुकटे सुद्धा हॉटेल मध्ये येऊन जेवणारे अनेकजण आपण पहिले असतील.. पण आज कंटाळा आला म्हणून एकटीच बाई कधी कुठे येऊन जेवतेय असे दिसते का?? अगदी घरात एक दिवसापुरते तिच्यावर अवलंबून असणारे कोणीही नसले तरी..??

पुरुष स्वत:चे मजेमजेचे प्लान्स ठरवतांना बायकांना अगदी सहज गृहीत धरतात.. म्हणजे.. एखाद्या पुरुषाच्या मित्रांच्या ग्रुप मध्ये ट्रीप ला  वगैरे  कुठे जायचे ठरले तरी तो अगदी सहज होकार कळवून मोकळा होतो.. बायका मात्र "ह्यांना विचारून/ आईंना विचारून सांगते" अश्या छापाची उत्तरे देतात.. आणि नुसतीच उत्तरे देत नाहीत तर खरोखर परवानगी काढतात.. (आता हा भाग वेगळा कि बऱ्याच जणी "हे सोडत नाहीयेत.. किंवा सासूबाईंना नाही चालणार" याचा बहाणा म्हणून वापर करतात).. पण म्हणून तिला फक्त तिचा विचार करून चालत नाही हे खरे..

माझ्या सासुबाईंची नेहमी तक्रार असते कि त्यांना माझ्या सासरेबुवांनी कधीच कुठे फिरायला वगैरे नेले नाही.. त्यांची फिरण्याची आवड मारून टाकली इत्यादी.. म्हणून मी ठरवले कि आपण त्यांना सध्या प्रसिद्ध असलेल्या एका लेडीज ओन्ली ट्रीप (केसरीची माय फेअर लेडी)ला पाठवू.. तसं मी त्यांना बोलूनही दाखवले.. पण कसचं काय? त्यांना आपल्या नवऱ्याशिवाय कुठे जायचे किंवा कोणती मजा करायची हि कल्पनाच सहन झाली नाही.. त्यांनी मला तसं बोलूनही दाखवले...

एवढेच कश्याला? मला लहानपणापासून कधीच कुठल्या मुक्कामी ट्रीप ला वैगेरे कधी जाऊ दिले नाही घरातून.. कधी विचारले तर उत्तर मिळायचे.." आधी लग्न करा आणि मग नवरयाला घेऊन फिरा कुठे फिरायचे ते".. म्हणजे? मला स्वत:ला एक माणूस म्हणून कुठलीही मौज-मजा करण्याचा अधिकार नाही का?? अर्थात याला अपवाद असणारे पालक आणि सासरकडचे असतीलही जगात.. पण.. मेजोरीटी ह्या अश्या संस्कारांचीच दिसून येते...

अर्थात हेही मान्य आहे कि प्रत्येक वेळी घरच्यांचीच सक्ती असेल असे नाही.. कुठे एकटे जायला.. आपल्यालाच खुपदा  नवऱ्याशिवाय मजा करावीशी वाटत नाही.. पण.. मला वाटते ह्याची मुळे आपल्या इच्छेत कमी आणि आपल्यावरच्या संस्कारात जास्त दडलेली आहेत..

तुम्हाला काय वाटते???

- पियू

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...