Saturday, April 30, 2011

नाती


नवरा - बायको किंवा कुठल्याही स्त्री - पुरूषांमधली नाती ही खूप गुंतागंतीची असतात. त्या सगळ्या नात्यांना समाजमान्यता लागते. त्यात बर्‍याचशा आर्थिक बाबी असतात.
 हरीयाणात नवरा गेल्यावर त्या बाईचं धाकट्या दिराशी लग्न लावलं जात असे. याला कारण जमीन त्याच घरांत राहाणे आवश्यक. आपल्याला हे खूप विचित्र वाटलं तरी त्या अख्ख्या समाजाची त्याला मान्यता होती / आहे.
 केरळात / दक्षिण भारतात मामाशी लग्न करायची प्रथा होती / आहे. या प्रथेची मुळं मातृसत्ताक पद्धतीत आहेत.
आपल्याकडे महाराष्ट्रात ’ विधवाविवाहाला मान्यतेचा कायदा’ आला. समाजाच्या वरच्या स्तरांतल्या / वरच्या जातीतल्या विधवांसाठी हा आधुनिक असला तरी खालच्या समाजातील स्त्रियां एक नवरा गेल्यावर सहजच दुसरा करीत. किंवा पहिल्या नवर्‍याशी पटत नसेल तर त्याला सोडून दुसर्‍याशी घरोबा करीत. याला समाजमान्यता होती. त्यांचं पोट हातावर, इस्टेटीसाठीची भांडणे नाहीत, स्त्रिया स्वत: कमावतात त्यामुळे हे स्वातंत्र्य त्यांना मिळत होतं.
 इंग्रजांनी लग्न कायदेशीर केले. त्यामुळे लग्नविधी निश्चित केले गेले. अर्थातच उच्च जातीतले लग्नविधी हेच प्रमाण मानले गेले, त्यामुळे हे ब्राह्मणी विधी सगळ्या जातींवर लादले गेले. त्यामुळे उच्च जातीतल्या स्त्रियांना काही सुरक्षितता मिळाली असेल पण खालच्या जातीतल्या स्त्रियांना त्याचा काच झाला. त्यांच्यातली सहज लग्न होणे आणि मोडणे, पुन्हा करणे या बाबी अवघड होऊन बसल्या. शिवाय पातिव्रत्याच्या कल्पनाही झिरपत झिरपत खाली गेल्या.
 तर स्त्री-पुरूष नाती, जी आपल्याला भावनेवर वगैरे आधारलेली ्वाटत असतात ती अशी कायदा, समाज, कुटूंब , आर्थिक स्तर, इस्टेट यांवर आधारित असतात.
अर्थात यातूनही काही नाती फुलतात.
****
नवरा - बायकोच्या नात्यात त्यांच्या एकमेकांविषयीच्या अपेक्षा या अशा बाहेरच्या समाजाने ठरवलेल्या असतात हे जर लक्षात आले तर आपण मुळापासून विचार करू शकू.
****

Thursday, April 14, 2011

सांगू तरी कोणापाशी

सरलं दळण
माही भरली ओंजळ
सोन्याची तुळस
वर मोत्याची मंजूळ

सरलं दळण
मी ते आनिक घेणार
देवा विठ्ठ्लाची
मले पालखी येणार

जिवाले जड झालं
सांगू तरी कोणापाशी
शेवटला भास
मन फिरते आकाशी

गेला माहा जीव
मले भीतीशी कुटवा
सोन्याचं पिंपळपान
माह्या माहेरी पाठवा


गेला माहा जीव
राया रडे खळाखळा
लग्नाचा जोडा
न्हाई मिळत येळोयेळा

गेला माहा जीव
नका करू संध्याकाळ
पोटच्या पोराची
थंड्या पान्याची आंगूळ

गेला माहा जीव
माह्या किरडीले साकळ्या
दिर लावी ओझा खांदे
राम चालू द्या मोकळा

शेवंतीचं बन या कार्यक्रमातलं हे शेवटचं गाणं आहे, माधुरी पुरंदरे ते प्रभावीपणे सादर करतात. हे जात्यावरचं गाणं आहे. 
एक सासुरवाशीण आपलं मन मोकळं करते आहे. कदाचित जातं ओढायला सोबतीण आहे, बहुदा नाही.
सकाळी लवकर उठून रोजचं दळण दळायचं.
... सकाळी सकाळीच ती आपल्या मरणाचं स्वप्न पाहते आहे. तो सगळा प्रसंग ती डोळ्यासमोर उभा करते....
पहिल्यांदा अंगावर शहारे येतात ते , 

गेला माहा जीव
नका करू संध्याकाळ
पोटच्या पोराची
थंड्या पान्याची आंगूळ

हे ऎकून / वाचून....
...
सगळंच तर ती स्पष्टपणाने सांगते आहे.
......

पुन्हा पुन्हा वाचताना मी थबकले ...

जिवाले जड झालं
सांगू तरी कोणापाशी
मला वाटलं या शोकांतिकेचं मूळ या ओळींमधे तर नाही?

समाजाच्या चाकोर्‍या, रूढी, परंपरा माणसांना काचत असतात, त्या मोडता येतील इतके बळ सामान्य सासुरवाशीणीत कुठून असणार?
तिने सहन करत राहणे एवढेच अपेक्षित आहे. 
माहेर नुसते नावालाच. सासर घरी माप ओलांडून आल्यावर त्या घरातून बाहेर पडायचे ते तिरडीवरूनच.
हे काहीही एक बाई बदलू शकत नाही. मुळात तिच्यात काही मानसिक बळ असावं असं तिला वाढवलंच जात नाही.
हे स्वीकारू या.
पण तिचा त्रास, जाच तिने बोलून दाखवावा, मनमोकळं करावं असं तरी कुणी हवं ना?
......
जिवाले जड झालं
सांगू तरी कोणापाशी
अशी एखादी सखी असती तर कदाचित सहन करायची ताकद मिळाली असती.
~~~
काय केलं असेल तिने? एखादा आड, विहिर जवळ केली असेल??
जीव तिच्यात गुंतून राहतो.

..................

आजच्या आपल्या समाजातही ’सहनही करायचं आणि बोलायचंही नाही’  असं आहे.
ते बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
निदान बोलायला तरी हवं.

....................

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...