Thursday, September 30, 2010

व्हाईट लिली आणि नाईट रायडरच्या निमित्ताने, पुन्हा एकदा----

इंटरनेटच्या आभासी जगातून वास्तव जगाशी जुळवून न घेता येणं हा याचा विषय आहे असं म्हणता येईल. जे खरोखरच चॅटींग करतात त्यांच्यासाठी हा जिव्हाळ्याचा असेलही. आता संपर्काची माध्यमे इतकी सहज हाताशी आहेत. मोबाईल, sms, मेल, चॅटींग तरी खरेच संवाद होतो का? की ही माध्यमे प्रत्यक्ष संवादाची गरज संपवतात? अशी मानसीकता असेल तर ’एकमेकांजवळ न बोलता नुसतं असणं’ हे कसं अनुभवता येणार?
चाळीशीच्या आसपास असलेल्या या अविवाहितांना लग्नही करायचे आहे. आपल्या लग्नव्यवस्थेत ज्या अनेक त्रुटी आहेत त्यातल्या, लैंगिक अनुरूपता आणि रोजच्या जगण्यातली, सवयींमधली अनुरूपता पाहिली जात नाही, या दोन त्रुटी हे नाटक समोर आणते.
 भक्ती आणि माधव यांनी घातलेले व्हाईट लिली आणि नाईट रायडरचे मुखवटे हे खरोखरच मुखवटे आहेत का? का ती त्यांना हवीशी अशी स्वत:ची रूपं आहेत?
 या नाटकाचा जीव फारसा नाही, कदाचित सुदर्शन वरचे हे नाटक नाट्यगृहात आणायचे ठरवल्यावर वाढवले असेल, ते दिसूनही येते.  ही दोघं लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय का स्वीकारत नाहीत ते मला कळले नाही. लग्न म्हणजे काय? कशासाठी करायचं? याबद्दल दोघांनीही काही विचार केला आहे असे दिसले नाही. दोघांमधे शारीरिक आकर्षणही नाही, जे काही काळ दोघांना एकत्र ठेवू शकले असते, आणि प्रेम? प्रेमामुळे तुम्ही जोडीदाराच्या डोळ्यांनीही जग पाहायला शिकता,  तेही नाही. लग्न केलंच पाहिजे असंही खरं म्हणजे काही नाही. त्या पर्यायाचाही विचार नाही.
 लग्नासाठी जोडीदार शोधताना काय बघायचं याचा विचार नाही. नाटकातलं वास्तव स्वीकारलं तरी, नाटक तर्कसुसंगत मार्गाने पुढे जात नाही. तुम्ही लग्नाआधी लैंगिक अनुरूपता आहे की नाही हे पाहण्याचा जर पर्याय स्वीकारता/ तेवढे पुढारलेले आहात  तर ’लग्न ही आयुष्यभर टिकवलीच पाहिजे अशी गोष्ट आहे” हे कसं धरून ठेवता?
 चॅटींगचीच सवय असल्यामुळे एकमेकांजवळ येतानाचं अवघडलेपण ही कल्पनेतली गोष्ट वाटते आणि असलंच तर ते तात्पुरतं असणार आहे त्यात अधोरेखित करण्याजोगं काय आहे?
 राहता राहिली रोजच्या जगण्यातली/ सवयींमधली अनुरूपता. ती इतकी महत्वाची गोष्ट आहे? गेल्या लेखात मी लिहिलं होतं तसं हे आहे. भांडणाची ही वरवरची कारणं आहेत, खरा सल वेगळाच असतो. वैफल्य आहे, निराशा आहे, अपेक्षाभंग आहे ती वाफ अशी कुठूनतरी बाहेर पडते. पंखा हवा की नको यावर उपाय शोधता येतो पण जोडीदारच नकोसा झाला तर त्यावर काही उपाय नाही. (असतील पण सोपे नाहीत.)
 लग्न म्हणजे तडजोड करावीच लागते. कुणीही लैला-मजनू जरी संसारात पडले की भांडणे होणारच आहेत, भांडण हा शब्द खुपत असेल तर आपण मतभेद म्हणू या. जर कोणी आमची भांडणे होतच नाहीत असा दावा करत असेल तर एकतर ते खोटं बोलताहेत किंवा त्या दोघांमधलं नातं समानतेचं नाही गुरू- शिष्याचं आहे असं मी म्हणेन. आदर्श लग्न हे एक मिथक आहे. आदर्श जोडीदार खास तुमच्यासाठीच बनवला गेलेला कुठेही नाही हे एकदा लक्षात घ्या. मानवी पद्धतीने लग्नाकडे पाहा मग आहे हाच जोडीदार किती चांगला आहे हे शोधता येईल. तोही आणि आपणही साधी माणसं आहोत हे मान्य केल्यावर त्यालाही आणि स्वत:लाही चुकण्याची संधी देता येईल.
 स्त्रीवादाच्या दृष्टीकोनातून या नाटकाकडे पाहिलं तर, हे नाटक पुरूष हा स्त्रिला अनुरूप असावा,( असेल तो तिने स्विकारावा ऎवजी) हे मांडतं आणि स्त्रिच्या लैंगिक इच्छांचा उच्चार करतं पण त्यापलीकडे माधव आणि भक्ती ही दोघंही पारंपारिक पुरुष आणि स्त्री या साच्यातलेच आहेत.
 हे नाटक पाहावं - हसावं - विसरून जावं या प्रकारातलंच  होतं. तरी पाहायलाच हवं असंही होतं.

********

 आपल्या सवयी जुळतात की नाही हे ती दोघं तपासत असतानाच्या गमती भारी होत्या पण मला त्यात कुठेही आमचे प्रतिबिंब दिसले नाही. जिथे कुठे जावं तिथून आपलं फारच जुळतं असेच निष्कर्ष काढून घरी यावं लागत आहे. आम्ही लग्न करायचं ठरवलं तेव्हा मिलिन्दचा एक मित्र म्हणाला होता, ’ तुम्ही दोघेही आळशी, अव्यवस्थित, दोघेही पुस्तक घेऊन बसाल, तुमचं घर चालायचं कसं?’  याची आठवण झाली. फार जुळणं ही सुद्धा काही फार चांगली गोष्ट नाही :)
 एकमेकांच्या काही सवयींचा खरेच त्रास होतो. म्हणजे मला व्हायचा /होतो. ( मिलिन्दला अर्थातच होत नाही, बोलून दाखवण्याइतका होत नाही. ) पण त्या गोष्टी सोडून द्यायच्या ना! मी ’संत’ नसल्यामुळे स्वत:ला वैतागायची सवलत देते, मनावर घेत नाही.
 बालमानसशास्त्राप्रमाणे, मुलाशी बोलताना त्याला, तुझं हे वागणं/ ही कृती मला आवडली नाही पण तू मला आवडतोसच असं सांगायचं असतं ना! असंच नवर्‍यालाही सांगता आलं पाहिजे :)

**********
        

Wednesday, September 15, 2010

भांडण - १

मिलिन्दच्या कंपनीच्या डायरेक्टरने दिलेली पार्टी होती. त्यासाठी आम्ही गेलो होतो. कशावरून तरी आमचं भांडण झालेलं होतं. त्यामुळे कार्यक्रमाच्या इथे मी उसनं हसू आणून (सहजपणे) वावरत होते. नुकतंच आमचं लग्न झालेलं होतं, मिलिन्दच्या सहकार्‍यांना आणि सहकारीणींना त्याची बायको पाहायची उत्सुकता होती. मिलिन्दच्या बॉसच्या बॉसच्या बॉसलाही मला भेटायचं होतं. माझा हात अगदी हातात धरून ते मला म्हणाले,” तू किती लकी आहेस, तुला माहित आहे का? तुझा नवरा किती चांगला आहे......” मी पुन्हा हसले. हो + खरं की काय? असं. आता त्याच्या कौतुकाचं मला अजीर्ण होत आलेलं. कार्यक्रमानंतर आम्ही बाहेर पडलो आणि मी पुन्हा भांडणाचं चॅनेल लावलं. लकी?? ह्याला कधी कोणी म्हणत नाही लकी! मीच कायम लकी? मी म्हणाले, ” तू कितीही चांगला असलास तरी नवरा म्हणून कसा आहेस हे जगात मी एकटीच सांगू शकते, ते इतरांनी ठरवायचं कारण नाही.” मिलिन्द म्हणाला,” तू सोडून दे. ते त्यांचं मत आहे.” ..... भांडणातली महत्वाची गोष्ट आहे सोडून देणे. ही शिकायला मी खूप वेळ घेतला.
 वाद घालायला, भांडायला मला आवडतं. पण समोरचा नीट तर्कसुसंगत बाजू मांडत असेल तरच! नाहीतर लोक इतक्या उड्या मारतात इकडून तिकडे, स्वत:च्या बाजूच्या विरोधातले मुद्दे मांडतात आणि तसे ते आहेत हे ही त्यांच्या गावी नसतं. पूर्वी मी वैतागायचे, त्यांच्या बोलण्याचा काय अर्थ होतो, हे सांगू पाहायचे. आता सोडून देते.
 भांडणातली दुसरी महत्वाची गोष्ट आहे, ’भांडण म्हणजे गणित नाही, जे सोडवता येईलच आणि त्याचं काहीतरी उत्तर असेलच असं नाही.’ तरीही भांडायची एक तर्कशुद्ध रीत आहे.
 माझी एक मैत्रिण आधी पुण्यात होती, नंतर मुंबईला गेली. तिचे अधून मधून फोन येतात. एकदा नवर्‍याशी भांडण झालं, पुन्हा मूळ पदावर येण्याऎवजी बिनसतच चाललं. आधी आणखी एक सांगते, तिचं लग्न झालं आणि सुरूवातीच्या दिवसांतच ती सासरच्या, नवर्‍याच्या काही साध्या तक्रारी माहेरी आई-बाबांना सांगायला लागली तेव्हा ते म्हणाले,’ तुझं लग्न करून दिलं, आमचा संबंध संपला, आता हे आम्हांला सांगायचं नाही, तुझं तू बघायचं’ .... ती अस्वस्थ होती. मी सगळं फोनवरून ऎकत होते. तेव्हा मी नुकतंच समाजशास्त्रावरचं एक पुस्तक वाचलेलं होतं. त्या पद्धतीने बोलून पाहा असं मी सुचवलं. १) दोघेही रागात/ चिडलेले असताना काही बोलायचं नाही. आधी एक वेळ ठरवून घ्या आणि शांतपणे त्या वेळी या विषयावर बोला. २) फक्त याच विषयावर बोला, जुन्या घटना उकरून काढू नका, या निमित्ताने जुने हिशोब चुकते करणे, असे करू नका. ३) विरोधासाठी विरोध नको, समोरच्याचे योग्य म्हणणे, आपल्या चुका, मान्य करा. ४) समोरच्याचे म्हणणे पूर्ण्पणे ऎकून घ्या. आणखीही दोन-चार मुद्दे असतील, मी हे स्मरणातून लिहिले आहेत...... खरोखरच त्यांचं भांडण मिटलं. जणू काही जादू करून हे मुद्दे मी तिला काढून दिले! मी तिला म्हणाले, ”हे पुस्तकातलं आहे, तुझ्या निमित्ताने ते काम करतं हे सिद्ध झालं.” मागे दीपाने साठ्यांचं एक मेल फॉरवर्ड केलेलं, त्यातही असंच काहीसं होतं. अशा पद्धती पुस्तकांमधून कुठे कुठे असतातच, आपण त्या वापरतो का हा प्रश्न आहे.
 ही रीत जर दोन्ही बाजूंना भांडण मिटवायचं असेल तर उपयोगी पडते.
बरेचदा भांडणाची कारणं वरकरणी दिसतात ती नसतातच. सल कुठे आहे हे आपल्याला शोधून काढता आलं पाहिजे. नाहीतर भांडणे दिशाहीन होत जातात. अबोला हे काही कुठल्या प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही. भांडण ही तर नात्यातल्या जिवंतपणाची खूण आहे.

********

आम्ही जेव्हा लष्कराच्या भाकरी भाजत असतो, म्हणजे घराबाहेरच्या मुद्द्यांवर मतभेद (कसला भारी शब्द आलाय ना? वरती सुचलाच नाही!) असतात तेव्हा व्यवस्थित वाद घालतो/ भांडतो. घरगुती प्रश्नांवरची आमची भांडणे एकतर्फी असतात. मिलिन्दला काही प्रश्नच नसतात आणि मला तर प्रश्नच पडत राहतात. थोड्या वेळाने मी भिंतीशीच भांडतेय असा ऎकणार्‍याचा समज होईल. पण संतपुरूषांची (आदरार्थी बहुवचन) एक तर समाधी लागते, असाही त्यांना काही फरक पडत नाही. ते कधीही रागावत नाहीत/ चिडत नाहीत/ त्यांचा स्वरसुद्धा चढा लागत नाही. भांडून झाल्यावर (एकतर्फी) मलाच काय आपण संतमहात्म्याशी भांडतो असं होऊन जातं....... तर सांगायचा मुद्दा हा की भांडणावरचा रामबाण उपाय म्हणजे शांत बसा. आमच्या घरी हे सिद्ध झालेलं आहे.

******

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...