Tuesday, April 30, 2013

मुलीचं घर -- ३

यापूर्वीचं

http://asvvad.blogspot.in/2013/03/blog-post_31.html

पुढे


मुलींना वाढवलं असं जातं की नवर्‍याचं घर हेच तिचं घर. माहेरी ती वाढते ती उपरी म्हणूनच, कधीतरी हक्काच्या घरी जायची ती तात्पुरती इथे आहे, असंच.  हे मनात बिंबलेलं असताना तिलाही आई वडील जर तिच्या सासरघरी कधी आले तर ते पाहुणे असंच वाटत असतं.

 ही जी काय पुरूषसत्ताक पद्धत आहे, पुरूषाच्या घरच्या परंपरा चालवणारी, लग्न झाल्यावर मुलीने सासरी राहायला जायचं, तिची कर्तव्य ठरवणारी, ही काही नैसर्गिक रित नाही, ती एक समाजरचना आहे. ती सर्वाना मान्य करायला लागते.

 माझी एक मैत्रिण होती, त्या पाच बहीणी, ही सगळ्यात मोठी, इंजिनीअरींग च्या पहिल्या वर्षाला आम्ही असताना ती एकदा आम्हांला म्हणाली की ’शनिवारी कॉलेज झाल्यावर माझ्याकडे या, माझ्या भावाला बघायला या.’  ....... आम्ही गेलो. पाच बहीणींवरचा तो चिमुकला भाऊ, दोन महिन्यांचा असेल. दुपट्यांत गुंडाळलेला... आई बाळांतीण... कानाला बांधून... बाकी घर मुलीच सांभाळताहेत. आईच्या आणि मुलींच्या डोळ्यात भावाचं अपार कौतुक! ...... ते बाळ झोपलेलं.... गोडंच होतं.... मला तिथे अस्वस्थ व्हायला लागलं.......
 संततीनियमनाची साधने रूढ असताना, दोनच मुलं हवीत वगैरे प्रचार असतानाची ही गोष्ट आहे. आमच्या आणि आजूबाजूच्या कितीक घरांमधे तेव्हा दोन किंवा तीन इतकीच मुलं ( अपत्ये ) दिसायची.
आई - बाबांना मुलगाच का हवा असेल? आपण मुली त्यांना पुर्‍या पडत नाही याचं दु:ख मनात मैत्रिणीला होत नसेल का? होत असूनही तिला आनंद झाल्याचं दाखवायला लागत असेल का? की खरंच मनातून आनंद झाला असेल?
 खरंच आनंद झाला असण्याची शक्यता जास्त आहे. नाहीतर आम्हां मैत्रिणींना आवर्जून बोलावण्याचं काय कारण? तिचा उत्साह, आनंद दिसत होता. तेव्हा माझ्या मनातलं मी तिच्याशी बोलू शकले नाही.
 आपल्या आई वडीलांच्या दृष्टीने आपण दुय्यम आहोत, हे कसं स्वीकारलं असेल तिने? हे कसं स्वीकारत असतील मुली? कशा आनंदात सहभागी होत असतील?
  अशा मुली मोठ्या झाल्यावर त्यांना आपल्या आई बाबांना आपण म्हातारपणी सांभाळायला हवं हे आपलं कर्तव्य आहे, असं नाहीच वाटणार!
 अशीही बरीच घरं असतील, जी माझ्या मैत्रिणीसारखी होती पण ते आई बाबा दोन, तीन मुलींवर थांबले, मुलगा नाही झाला म्हणून आयुष्यभर खंतावत बसले.  अशा घरातल्या मुली काय म्हणणार?  " आई-बाबा, मी मुलगा असते तर तुम्हांला सांभाळलं असतं. " हा त्यांचा ढोंगीपणा नाही आहे. तसंच आहे ते आतून आलेलं!

 माझ्या पाहण्यात एक कुटूंब आहे, दोन मुली असणारं, छान, सुखी, मुली हवं ते शिकताहेत,  त्यातल्या बाबांना जेव्हा विचारलं की तुमच्या कुटूंबातील खोलवरची दु:खं कुठली आहेत? तर एक दु:ख असं होतं की मुलगा नाही,  मुलींना भाऊ नाही याचं मुलींनांही खूप वाईट वाटतं... असं लिहिलेलं! मी हादरलेच! वरवर सुखी दिसणार्‍या कुटूंबात असं आहे?
 या समाजाने लादलेल्या अपेक्षा आहेत. कधी कळेल त्यांना?

.......

या पार्श्वभूमीवर मला माझ्या त्या वहीनीचं कौतुकच वाटतं. आदर वाटतो यासाठी की तीही या अशाच विचारसरणीच्या घरात वाढलेली आहे. तिचे खरं विचारही बदलले नाहीत. .... या सार्‍यांपलीकडॆ एक माणुसकी असते, ती तिने सांभाळली, आपल्या आतल्या आवाजाला ओ दिला.  ती निगरगट्ट होऊ शकली असती पण झाली नाही. सगळ्या जोखडात बांधलेली असताना एक शहाणपणाचा आणि माणुसकीचा झरा तिने वाहता ठेवला.

......

Monday, April 15, 2013

मर्द


फरहान अख्तरने मर्द   MARD -- Men Against Rape and Discrimination असं कॅम्पेन सुरू केलं आहे.
मर्द असणं म्हणजे काय? हे सांगायला सुरूवात करणं स्वागतार्ह आहे.

यावरची जावेद अख्तर यांची कविता खूपच छान आहे.
जितेंद्र जोशींनी रूपांतर करताना कवितेचा गाभा बदलला आहे. आणि तीच टिपीकल, प्रेमळ पुरूषसत्तेची भूमिका घेतली आहे. अशा प्रेमळ पुरूषांच्या साथीतही बाईची घुसमट होते. असे पुरूष बाईवर खूप प्रेम करतात पण तिला वाढू देत नाहीत. जोशींनी स्त्रीला देवहार्‍यात बसवले आहे आणि पुरूषाला तिच्या संरक्षकाची भूमिका दिली आहे.

आईचा राखतो मान
आदर बहीणीचा
मुलीचा आणिक गृहिणीचा
तयाचा आम्हां आहे अभिमान

नका पुन्हा देव्हार्‍यात बसवू.

स्त्री म्हणजे कोमल छाया...

नको पुन्हा..... खरंच नको.

रक्षण करतो बाईचे

पुन्हा नव्या जगातही तिचे रक्षण करायला लागणारच आहे?

स्त्री जननी, स्त्री भगिनी , भार्या....
एवढंच!

या वर्तुळाबाहेरच्या स्त्रीचं काय?
आई, बहीण, मुलगी किंवा गृहिणी हीच बाईची ओळख आहे? त्याशिवायची विखुरलेली बाई आहे, मैत्रिण आहे, कार्यालयातली सहकारी आहे, कर्तबगार वरीष्ठ आहे, भाजीवाली आहे, कामवाली आहे.. ......
 कदाचित वेश्या आहे, तिला आपण वर्तुळाबाहेर का ठेवायचं? तिच्याही इच्छेचा आदर केला पाहिजे. तिचा अभिमान नाही वाटणार म्हणून ती बाई नाहीच का? वर्तुळाच्या बाहेरच्या स्त्रियांशी कसंही वागायला पुरूष मोकळेच का?

नवी चौकट नवं कोंडणं........

जितेंद्र जोशींच्या हेतूबद्दल मला किंचितही शंका नाही. पण बाईला बरोबरीने वागवणारा पुरूष हवा आहे. तिच्या आत्मसन्मानाची जाणीव असणारा पुरूष हवा आहे.

पुरूष म्हणजे माणूस
पौरूष म्हणजे निव्वळ माणूसपण
मर्द म्हणजेही माणूस
मर्दानगी म्हणजे निव्वळ माणूसपण
हे मर्दा, तू बाईशी केवळ माणसासारखं वाग.
आणि दुसर्‍या पुरूषाशीही केवळ माणसासारखं वाग.
बाईला देव्हार्‍यात बसवून तिची पूजा करू नकोस,
वा तिला कस्पटासमान समजून तिला पायदळी तुडवू नकोस
ती माणूस आहे, हे विसरू नकोस,
माणसाचे सगळे अधिकार तिला आहेत,
ती नाही म्हणू शकणार आहे,
ती एकटी फिरेल, रात्री अपरात्री,
स्वत:ला आवडतील असे कपडे घालेल,
तिच्या शरीरावर तिचा अधिकार आहे,
आणि मनावर देखील,
हे तुला पचवायला अवघड जाईल,
पण ते स्वीकारण्यात तुझं पौरूष आहे,
सत्ता गाजवण्यात काही मर्दानगी नाही,
ती आहे बरोबरीने वागवण्यात,
बळजबरी करण्यात कसलं आलंय पौरूष?
ते आहे प्रेमाने आपलंस करण्यात,
नसेल तिचं प्रेम तुझ्यावर तर
ते स्वीकारणं ही मर्दानगी आहे.
अरेरावी करणं, अनादर करणं,
म्हणजे तुझ्यातलं पुरूषपण नाही
बाई ही जिंकण्याची वस्तू नाही
बाईला पुरूषाच्या आधाराने जगायला लागू नये.
बाईला सुरक्षित ठेवणं म्हणजे पुरूषार्थ नाही
बाईला वाढू दे मोकळेपणाने
आणि तू वाढतोस तितक्याच मोकळेपणाने
हे जग पुरूषांचं नाही की बाईचं नाही
दोघांचं मिळून आहे.
हे जाणणार्‍या पुरूषा.......
तू खरा मर्द आहेस!

********

जावेद अख्तर यांची कविता  जितेंद्र जोशींचा पोवाडा / कविता इथे ऎकता येईल.
https://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=nbZj9YX_IBs

*********

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...