Sunday, March 31, 2013

मुलीचं घर -- २


यापूर्वीचं

http://asvvad.blogspot.in/2012/10/blog-post_31.html

पुढे

>> याची मुळं शोधत गेलो तर "मुलीने लग्नानंतर मुलाच्या(!) घरी जायचं" या आणि एकूणच पुरुषप्रधान समाजाने ठसवलेल्या सर्व नियमांत असेल ना.
हो.

>> जावयाचे घर जसं मुलीचं व्हायला लागलं तसं मुलाचं घर सुनेचं व्हायला लागलं..
आता काहींच्या बाबतीत सुनेपेक्षा मुलीच्या घरात जास्त मोकळेपणा जाणवतो असं होत असेल.
हो.

>> आजकालच्या घरांमध्ये,खूपदा मुलीच्या आई वडिलांचा,सहभाग जास्त असतो.ते परके पण वगेरे वगेरे फक्त बोलण्या पुरेसे असते.
असेल काही घरांमधे.

>> माझ्या घरापासून पायी ५ मिनिटावर राहणार्या माझ्या चुलत बहिणीकडे आई बाबा नेहमी येतात.. पण मुंबईहून पुण्यात येऊनही इकडे सक्ख्या मुलीकडे थांबत नाहीत..
असंही आहे.

 कुठल्याही समाजात म्हणजे समाज रचनेत काही ठळक जबाबदार्‍या आणि कर्तव्ये यांच्या नीट रेषा आखलेल्या असल्या तर बरं पडत असणार.
 आपली पुरूषप्रधान व्यवस्था असल्याने आई वडीलांची जबाबदारी मुलावर, वडीलांची इस्टेट परंपरेने मुलाकडे/ मुलांकडे येणार.
 मरताना पाणी द्यायला मुलगा हवा, मेल्यानंतर अग्नी द्यायला मुलगा हवा.
 या व्यवस्थेत मुलगा असणं / होणं हे आवश्यकच होतं. नाहीतर दत्तक घ्यायचे, पण मुलगा हवाच.

 मुलगा असण्याच्या अट्ठहासापायी मुलींचे गर्भ पाडणं, सर्रास सुरू झालं. कारण आता दोन-तीनापेक्षा अधिक मुलं परवडण्यासारखी नाहीत हे पटलेलं, आणि मुलं हवं की नको, यासाठी संततिनियमनाची साधनं सहज उपलब्ध झालेली.
 पण विज्ञान पुढे गेलं म्हणून लगेच मानसीकता थोडीच बदलते?
 समाजात दाखवायला तरी मुलाचंच घर हक्काचं!
सहज मुलीकडॆ राहणारे किंवा मुली सहज माहेरीच राहताहेत आणि जावाई सासरी राहतोय अशी उदाहरणे विरळच आहेत.
 ज्यांना एक किंवा दोन मुलीच आहेत त्यांनी काय करायचं? असे आईवडील, अगदी परावलंबी होईपर्यंत मुलीकडे सहसा येत नाहीत.

 पूर्वीच्या एकत्र कुटूंबपद्धतीत नसला मुलगा तर पुतणे पाहायचे , वडीलोपार्जित घर असायचं, घराला माणसं लागायचीच. त्या घरातही स्वत:चा मुलगा नसेल तर आश्रितासरखं राहावं लागत असेलही. पण घर आणि माणसं तर असायचीच.
 मी कुठल्याही कुटूंबपद्धतीचा इथे पुरस्कार करत नाही आहे.
आताच्या विभक्त कुटूंबपद्धतीत, जेव्हा मुलीला इस्टेटीतही हक्क मिळतो आहे आणि बर्‍यापैकी समानतेनी वाढवलं जातं आहे, तर आईवडीलांनी मुलीकडे राहण्याचा संकोच वाटून घेऊ नये.
 लगतच्या भविष्यात ते दिसायला लागेल असं मला वाटतं.
मुलींनीही आपली आईवडीलांबाबतची कर्तव्ये सासरघरी स्पष्ट केलेली असली पाहिजेत.
 एकदा मुलगीसुद्धा म्हातारपणीची काठी आहे, आधार आहे, हे मनात बिंबलं, समाजात दिसायला लागलं की ”मुलगाच हवा’ चा हट्ट कमी होईल.

*********

 माझी एक वहीनी आहे, अगदी पुरूषप्रधान समाजाची कडीच, तिची आई गावी एकटी राहायची, मुलाचं सुनेचं आईशी पटायचं नाही, मुलगा तर आईचं तोंड पाहायलाही तयार नाही, आई आजारी पडली, एकटी राहणं शक्य नव्हतं, ही माझी वहीनी आईला आपल्या घरी घेऊन आली. आणि नंतर शेवटपर्यंत ठेवून घेतलं. भावानीच हे करायला पाहिजे, नाही तो करत, तर काय करायचं? म्हातारीलाही वाटे काय हे मुलीकडे राहण्याचे दिवस आले.
 पण वहीनी्ने आईला वार्‍यावर सोडलं नाही. मला तिच्याबद्दल आदर वाटतो.

*********
 पुढे

Friday, March 15, 2013

कसं सांगू?


मुक्ताला नाचाच्य़ा वर्गाला सोडायला गेले होते. एका बंगल्यांच्या सोसायटीतला हॉल! जरा लवकरच गेलेलो, अजून कोणी मुली आल्या नव्हत्या, ताई आल्या नव्हत्या. हॉलचं दार किलकिलं. बाकी आजूबाजूला कोणी नाही, रस्ता सुनसान. संध्याकाळी पावणेसहाची वेळ असेल. मला पुढे कामं होती. " जाऊ का गं? " तर " जा " म्हणाली.
 येतीलच मुली एवढ्यात असा विचार करून निघाले. "मुली येईपर्य़ंत बाहेर बाकावरच बसून राहा."
मग वाटत राहिलं, एवढं काय कामाचं? अगदी कोणी नव्हतं, सोबत थांबायला हवं होतं. नंतर वाटलं असू देत, एवढं तरी काय?

   रात्री बोलणं चाललेलं.. एकदम मला ते आठवलं. " आल्या का मैत्रिणी लगेच?"
" दहा मिनिटांनी आल्या असतील."
" तोवर बाहेरच थांबलीस ना? "
" नाही. आत जाऊन घुंगरू बांधले. एक काका हॉल झाडत होते."
" ते एकटेच आत होते?"
" हो. आमच्या ओळखीचे आहेत ते. "
ओळखीचे म्हणजे कधी कधी हॉल झाडताना पाहिलेले.
एकूण परिस्थिती माझ्या लक्षात आली, आजूबाजूला कोणी नाही, एकटा हॉल, आणि नेहेमी साफसफाई करणारा कुणीतरी माणूस...
मी शक्यतो आवाज नॉर्मल ठेवत म्हणाले, " तुला मुली येईपर्य़ंत बाहेर बाकावरच बसायला सांगितलं होतं ना?"
" अगं, घुंगरू बांधायला वेळ लागतो. बाहेर बसण्यापेक्षा ते कामं झालं ना?"

मला कळलं, मला जे वाटतंय ते काहीच हिला कळत नाहीये. भीतीची एक लहर माझ्या अंगातून गेली....
ही तशीच....
माझी भीती मला ट्रान्सफर करायची नव्हती, तिने घाबरू नये हे ही समजत होतं.
पण राहवेना. कसं सांगू?
जगाबद्दलचा अविश्वास तिच्या मनात तयार व्हायला नको आहे.
तो बिचारा माणूस चांगला असेलही, होताच.
पण काळजी घ्यायला तर शिकवायला हवंच आहे ना?
आईने मला सांगितलं तेच मी सांगणार आहे का?
तोच पाया आहे? स्त्रियांचं जग आणि पुरूषांचं जग यांच्यातल्या नात्याचा?
आईचं किती बरोबरच होतं असं वाटायला लागलं.
आईने दिलेल्या चष्म्यातून पुरूषांकडे पाहायचं मी नाकारलं, पण सावध तर राहिलेच. काळजी तर घेतच आले.
पवित्र-अपवित्र, नैतिक-अनैतिक जाऊ दे, माझ्या किंवा कुठल्याही बाईच्या इच्छेविरूद्ध कुठल्याही पुरूषाने तिला स्पर्श करायलाच नको.

कदाचित आईने थेट सांगितलं, तेच मी वळसे घेऊन सांगितलं.
तिला जवळ घेतलं आणि म्हणाले,
" अगं तो माणूस तिथे एकटाच, तू एकटीच, मला भीती वाटली. त्याने कुठे अंगाला हात लावला असता, आणखी काही केलं असतं.
ओळखीचा असो अगर अनोळखी असो, कुठल्याही पुरूषाने तुला नको तिथे हात लावला किंवा काही केलं तर काय करशील?
एकतर तिथून पळत आधी बाहेर यायचं, आणि ओरडायचं मोठ्यांदा, चालवून घ्यायचंच नाही. प्रतिकार करायचा. कोणीतरी मदतीला येतंच.
आणि तो कोणीही पुरूष असला ओळखीचा अगर अनोळखी, तरी मला सांगायचं. त्याचं काय करायचं ते मी पाहीन."

एकदम उंचीने वाढलेल्या, निरागस असणार्‍या माझ्या मुलीची काळजीच वाटायला लागली.

गौरी देशपांड्यांच्या एका कादंबरीतील वाक्यं आठवली......
... माझ्यावर बलात्कार झाला तर मी तो एक अपघात समजेन, त्यातून बाहेर येईन. पण माझ्या मुलीकडे कोणी पाहिलं ना तर त्याचा मी खून करीन.

निसंशय! मला हेच वाटून गेलं.




Wednesday, March 13, 2013

बाईपणाची ओझी



ओझी म्हणजे नक्की काय?

मला वाटतं, मनाला पटणाऱ्या, पेलणाऱ्या अपेक्षा असल्या (इतरांकडून आपल्यासाठी) की त्यांचं ओझं होतं. मग या अपेक्षांना रूढी, रिती-रिवाज, सामाजिक, आर्थिक अशी कुठलीही पार्श्वभूमी असू शकते.
 'बाईपणाच ओझं' यात मग एक स्त्री म्हणून जन्माला येणं ही अजून एक पार्श्वभूमी add होते. आणि या सर्वांचा परिपाक असलेल्या अपेक्षा प्रत्येक स्त्रीला सामोऱ्या येतात.
            व्यक्तीपरत्वे ही ओझी बदलू शकतात किंबहुना एकाच व्यक्तीच्या संदर्भातही काळाप्रमाणे, कुठल्या गोष्टी ओझी या सदरात मोडत आहेत यात बदल होऊ शकतो.
यातल्या काही गोष्टी काहीजणींना सहज जमणाऱ्या, आवडणाऱ्या असल्या तर त्यांचं ओझं वाटत नाही. पण प्रत्येक स्त्रीला तसंच  वाटेल असं नाही. उदा. कुंकू लावणं, मंगळसूत्र घालणं.
कधी कधी असं पण होतं कि आधी आवडत असतं पण मध्येच कधी नाही केलं तर इतरांकडून विचारणा होते आणि मग त्या गोष्टीचं ओझं वाटायला लागतं. माझ्या एका मारवाडी मैत्रिणीच उदाहरण देते. ती पुण्यात एका software कंपनीत आहे. इथे ती आणि नवरा दोघच रहातात. लग्न झाल्यावर अगदी हौसेने नवीन साड्या, त्याच्याबरोबर सगळ्या matching गोष्टी, हातभार लाल-पांढऱ्या बांगड्या(तिचा नवरा यूपी चा आहे) अशी खरेदी केली. सुरुवातीला नवीन साडी नेसली कि नटून फोटो काढून मला दाखवायची. पुण्यात रहाताना अगदी इथल्या मुलींसारखी जीन्स-टी शर्ट मध्ये असते. पण जेव्हा सासरी जाते तेव्हा तिथे त्याच नव्या साड्या नेसून सगळे दागिने घालून, घुंघट काढून रहायला लागतं. तिथे त्याचा तिला त्रास होतो. तिथे तिने तसंच रहायला हवं या अपेक्षेचं तिला ओझं होतंय. खरंतर साडी नेसून नटण ही तिची आवडती गोष्ट आहे तरीही.
सामाजिक ओझी बरीच आहेत. पाळी चालू असताना मंदिरात जाणे हे पाळीशी संबधित एकाप्रकारचं ओझं आहे. जे मी लग्न झाल्यावर झुगारून दिलंय. सासरी मला कुणीच या गोष्टीवरून काही बोललं नाही. उलट असं काही पाळायची गरज नाही हेच सांगितलं. पण पाळीशी संबंधित इतकी ओझी असतात समाजात वावरताना. आपली पाळी सुरु आहे हे कुणाला कळू द्यायचं नाही. उघडपणे सांगायचं नाही. पॅड बदलायचं असेल तर ते लपवून बाथरूममध्ये घेऊन जायचं. खूप वेळ जर एका जागी बसायला लागलं तर उठल्यावर मागे डाग तर नाही पडलेला याची काळजी करणं. फक्त बायकाच जवळ असल्या तर यावर बोलणं होतं, एकमेकींना मदत होते. पण पुरुष कधी बोलतात का की आज माझ्या बायकोची पाळी चालू आहे. तिला त्रास होतोय वगैरे. जवळपास जर ५०% समाजाची ही दर महिन्याची शारीरिक अवस्था आहे तर त्यात काहीतरी लपवण्यासारखं आहे असं आपण का वागतो? का ओझं आहे आपल्यावर या गोष्टींचं आणि तेच ओझं आपण आपल्या मुलीना पण देतोय. निदान आपण तरी आपल्या मुलाशी, वडिलांनी आपल्या मुलीशी पाळीबद्दल बोलताना अडखळू नये असं मला वाटतं.
घराबद्दल बोलायचं झालं तर बराचशा अपेक्षा या आपण जबाबदाऱ्या म्हणून घेतो. आणि मग त्यांच ओझं वाटायला लागलं तरी ते जबाबदारीच्या लेबलाखाली झाकायचा प्रयत्न करतो. यात आपण म्हणजे स्वतः आणि घरचे सुद्धा. उदा. स्वयंपाक करणं, मुलाचं बघणं, घर आवरणं, पाहुणे-रावळे बघणं...वगैरे पण हि उदाहरणं इथेच थांबत नाहीत 
आता पूर्वीसारखं घरातली कामं बायकांची आणि बाहेरची पुरूषांची असं नाहीये. बाई पण बाहेर काम करत असल्याने तिची कामं पण वाढली आहेत. आणि मग स्वतःला prove करायला बऱ्याच गोष्टींची जबाबदारी ती घेते किंवा तिच्यावर येते. इथे परत जबाबदारी आणि अपेक्षेची गल्लत आहेच. आणि मग यातून येणारं ओझं आहे.
व्यवसायाच्या ठिकाणी काहीजणींना पुरुष सहकाऱ्यांच्या तुलनेत आपण कमी नाही हे दाखवून द्यायला लागतं. बरेचदा संधी मिळूनही पुढे जाता येत नाही. मला आठवतंय, माझी आई बँकेत होती. तिथे तिला ऑफिसर म्हणून प्रमोशन मिळणार होतं पण मग मुंबईतून बाहेर जावं लागणार होतंआईने नको म्हणून सांगितलं. क्लार्क म्हणूनच शेवटी रिटायर झाली.
आता बऱ्याच अंशी हे ओझं कमी झालेलं दिसतं. नवराही बायकोला अशा बाबतीत बहुधा पाठींबा देताना दिसतो. व्यवसायाच्या ठिकाणी पुरुष सहकारी कसे असतील, तिथे एक स्त्री म्हणून कसं वागायचं याचं ओझं असतचरात्री उशिरा बाहेर असणं याचं ओझं पुण्यात तरी बरंच कमी वाटतं मुंबईपेक्षा
अजून बरीच ओझी आहेत सामाजिक संकेत झालेली. उदाएकत्र कार्यक्रमाला स्त्रियांनी डावीकडच्या बाजूला बसणे. खाली बसणे. घरी पाहुणे आलेले असताना बायकांनी पुरुष आणि मुलांनंतर जेवणे आणि आवरून ठेवणे, स्वतःच्या कपड्याचं कायम भान ठेवणं(कुठून काही दिसत तर नाहीये ना, साडीचा पदर जागेवरच आहे ना) वगैरे वगैरे....

     ही सगळी ओझी आहेत असं सांगताना पुरुषांवर काहीच ओझं नसेल असं गृहीत धरलेलं नाही. पण त्यांच्यावरच ओझं समजून त्याच्याशी तुलना करून बायकांची ओझी मांडली आहेत असंही नाही. समाजाकडून आलेलं ओझं यात 'समाज' म्हणजे स्त्रिया आणि पुरुष एकत्र असा विचार आहे.

     आजच्या आपल्या पिढीत पूर्वीपेक्षा बाईपणाची ओझी बरीच कमी झाली आहेत. आपली ती झुगारून द्यायची क्षमता पण वाढली आहे. आपल्यापेक्षा आपल्या पुढच्या पिढीत अजून बदल दिसतील
पण ही ओझी झुगारून देताना त्यामुळे नवी ओझी तर निर्माण होत नाही आहेत ना याकडे पण लक्ष द्यायला हवे आहे.

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...