Sunday, February 28, 2010

पहिली माझी ओवी गं.....

समाजात कुटुबांनी सुखी दिसण्याचं खूप दडपण असतं.(तेही समाजाच्या दृष्टीने सुखी) ते सगळं अर्थातच घरातल्या बाईवर असतं. त्यामुळे सासरघराशी, नवर्‍याशी पटवून तर घ्यावंच लागतं पण त्याचा देखावाही चारचौघात करावा लागतो.( हे दुहेरी दडपण आहे.)
आपण हे का समजून घेत नाही, कुठल्याही दोन माणसांमधे मतभेद असणं ही स्वाभावीक गोष्ट आहे. तसे ते नवरा-बायको या नात्यातही असणार. मतभेद असूनही ते नातं निरोगी असू शकतं. दोन माणसांचं सगळ्याच बाबतीत कसं पटू शकेल?
पूर्वीच्या एकत्र कुटूंबात / बायका एकत्र कामे करीत तेंव्हा या मतभेदांना, जाचाला मोकळं करायला काही जागा तरी होत्या. समदु:खी एकमेकींशी बोलून आपल्या भावनांना वाट करून देऊ शकायच्या. आताच्या विभक्त कुटूंबांमधे तशी जागाच राहिलेली नाही. त्या बाईने सोसायचंही आणि बोलायचंही नाही. तारेवरची कसरत आहे ही! पूर्वीच्या बायका ’ हे नशीबाचे भोग’ म्हणून स्वीकारायच्या. पण आजच्या शिकलेल्या बाईने हे कसं स्वीकारायचं?
सोसणं थांबवणं शक्य होतंच असं नाही, निदान बोलणं आणि मोकळं होणं यासाठी तरी आपल्या कुटूंबांमधे जागा पाहिजे. कोणाशीतरी बोलल्यामुळे ती व्यक्ती मार्ग दाखवते असं नाही, मार्ग आपल्यालाच शोधावा लागतो, पण बोलून ते मागे टाकून पुढे जाण्याच्या शक्यता तरी निर्माण होतात. असं मनातलं बोलण्यासाठी कोणी उरलंच नाहीये आपल्या कुटूंबपद्धतीत.आणि फ्लॅटसंस्कृतीमुळे समाजात. मग बोलायचं कोणाशी तर नवरा बायकोंनी एकमेंकांशीच. त्या नात्यावर सगळंच सांभाळायची जबाबदारी येते. ते सगळं पेलायची त्या बिचार्‍याची कुवत असते का?( मागे साप्ताहिक सकाळ मधे यावर एक चांगला लेख आला होता. कोणाला हवा असल्यास शोधून ठेवीन.) आपला नवरा कोणी सुपरमॅन नाही,( आपण सुद्धा सुपरवुमन नाही, व्हायचंही नाही.) त्याच्या मर्यादा जाणून घेणे आणि त्याला स्वीकारणे याशिवाय अन्य पर्याय नाही.( त्याच्यापुढेही याच्यापेक्षा वेगळा काय पर्याय असतो? )
आपणही मोकळे होण्याचे मार्ग शोधले पाहिजेत. एकटेपणा, नैराश्य या गोष्टी आपल्याही समाजात वाढत चालल्या आहेत.
पूर्वी बायका दळायला बसायच्या, कष्टाचेच काम ते. दळता दळता ओव्या म्हणायच्या श्रमाचाही भार कमी वाटायचा आणि मनही मोकळं व्हायचं. द्ळण नसलं तरी, आपणही आता सुरू केलं पाहिजे, पहिली माझी ओवी गं.....

*************

एका ८० वर्षांच्या म्हातार्‍या बाईची गोष्ट वाचल्याचे लक्षात आहे. संधीवात झालेला, रुग्णालयात भरती केलेलं, सांधे आखडलेले, काही हालचाल करणं शक्य नाही, सांगितलेले व्यायाम करायची नाही. डॉक्टरांना कळेना कसे करावे, ही आजीबाई काही साथच देत नव्हती. नवीन आलेल्या फिजिओथेरपिस्ट्ने आजींना एक उशी देऊन सांगितलं की हा तुमचा नवरा आहे असं समजा आणि हातांच्या मुठी करून उशीवर मारा. या सल्ल्यामुळे आजी पंधरा दिवसात बर्‍यापैकी बर्‍या झाल्या.

*************

Monday, February 15, 2010

परावलंबन-२

दीपा,
खूप खरं लिहीलं आहेस. हे सोपं नसतं.
पण यात नवीन काही नाही. हे असं चालत आलेलं आहे. इतकं सवयीचं आहे, बर्‍याच जणींना/जणांना ते नैसर्गीक वाटतं.
स्त्री परावलंबी असणे हे पुरूषसत्ताक व्यवस्थेसाठी गरजेचं आहे.

तुझं काय म्हणणं आहे? परावलंबन नको? नक्की?
हे नीट विचार करून ठरवायला हवं आहे.
परावलंबन ही खूप मोहविणारी गोष्ट आहे. ’आपण विचारच करायचा नाही’ ही तर चैन आहे. आपल्या वतीने कोणीतरी विचार करेल, आपण केंव्हा काय करायचं हे ठरवेल, आपण नुसतं तसं वागायचं. किती छान!
हे नकॊ असेल तर विचार करायला हवा. आपल्या निर्णयाची आणि आपल्या आयुष्याचीही जबाबदारी घ्यायला हवी. चुकलात तर कोणाकडे बोट दाखवून सुटका करून घेता येणार नाही. आणि मग चुकत माकत जगायलाही मजा येईल.
आहे ही चौकटही बर्‍यापैकी वाकवून घेता येते. तसे प्रयत्न आपण करतो का?
स्त्री ही नकोशी आहेच, फक्त ती समाजधारणांना अनुकूल अशी वागत असेल तर तिला चालवून घेतात.
त्याचं काय आहे दीपा? देवाने आधी पुरूष निर्माण केला , नंतर त्याला एक खेळणं हवं, त्याच्या सेवेसाठी आणि मनोरंजनासाठी कुणीतरी हवं ना? म्हणून स्त्री निर्माण केली. ही गोष्ट तुला माहीत आहे ना? पुढेही मुक्‍तीच्या मार्गातली धोंड वगैरे.....

’माझ्या शरीरावर माझा हक्क’ असं सांगत स्त्रीवादी चळवळ पुढे आली. तुमच्या शरीरावर तुमचा अधिकार आहे, ती काही कुणाची इस्टेट नाही. तुम्ही स्वत:च्या शरीराचा आदर करा आणि इतरांना करायला लावा. स्वत:च्या हक्कांविषयी जागरूक राहा. ही लढाई जिची तिला लढायची आहे, स्त्रियांनाही शारीरिक सुखाचा अधिकार आहे हे सांगणारी एक विचारधारा तुमच्या पाठीशी आहे इतकंच! (इथे फ्रॉइडदेखील स्त्रियांच्या विरोधात आहे, त्याचं म्हणणं त्यापुढच्या शास्त्रज्ञानी खोडून काढलं)

(तुझ्या लेखात न आलेल्या संशय/ पावित्र्य या गोष्टीसाठीही बायकांना खूप सोसावं लागतं. अगदी सीता अहिल्येपासून ते आजतागायत, जगभरच! Chastity belt चा इतिहास असो की तस्लिमा नसरीनची लज्जा असो.)

तू उलट विचार करून पाहिला आहेस का? पुरूष किती परावलंबी असतात याचा??

ते, त्यांचे ते स्वत:, काहीही करू शकत नाहीत. त्यांना वाढवलयंच तसं! बिच्चारे.

०००००००००००००००००००००००००

बायकांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असावं असं मला कायमच वाटत आलेलं आहे.

आता तरी आम्ही दोघांनी मिळून काही प्राधान्यक्रम ठरवले आहेत, काही व्यवस्था ठरवलेली आहे, पण लग्न झालं तेंव्हा लग्न केलं म्हणून मिलिन्दने मला का पोसायचं असं मला वाटत असे. देण्याघेण्याचा व्यवहार ’साजरा’ व्हायचा असेल तर घेणार्‍यापेक्षा देणार्‍याला ती काळजी घ्यावी लागते.आर्थिकबाबतीत मिलिन्दने हे खूप सहजपणे केलं. (नाहीतर मी तेंव्हा कायम दुखवून घ्यायला तयार अशीच असे.)

तरीही काही गोष्टी माझ्यात भिनलेल्य़ा आहेत. मिलिन्दसाठी, मुलांसाठी किंवा घरासाठी काही खर्च करायचा असेल तर मी एकदा विचार करते, पण माझ्या एकटीसाठी काही घ्यायचे असेल तर मी चारदा विचार करते, नक्की हे आवश्यक आहे ना?(खरं म्हणजे ती रक्कम फारशी मोठी नसते.)

आत्ताच्या टप्प्यावर आमच्या घरातली कामाची विभागणी ही पारंपारिकच आहे. त्यानुसार स्वैपाक करणे हे माझेच काम आहे.

आम्ही वेगवेगळ्या कारणांसाठी बाहेर जेवायला जातो. कधी ठरवून, कधी मुलांना हवं असतं म्हणून, कधी कोणालातरी घेऊन, कधी मिलिन्द्ने काहीतरी वाचलेलं असतं, तिथला खास पदार्थ खाण्यासाठी. पण कधी मला स्वैपाक करायचा कंटाळा येतो म्हणून आम्ही बाहेर जातो. अशावेळी मला वाटतं पार्सलच आणलं तर? किंवा नुसती पावभाजीच खाल्ली तर, चालेल की! बाहेरच जायचं ठरलं तर मला वाटतं अगदी ’ऑफ बीट’ वगैरे नको. सूप पासून सुरूवात आणि आईसक्रीमपर्यन्त नको. अशावेळी मी आवर्जून बील पाहते, ती रक्कम म्हणजे मला माझ्या कामचुकारपणाची किंमत आहे असं वाटतं. म्हणून मी कंटाळा करायचं थांबवते असं नाही पण चुकचुकत राहणंही थांबवू शकत नाही.

००००००००००००००००००००००००००००००००००

Monday, February 1, 2010

परावलंबन

लग्न या चौकटीत आडकल्यावर एक मुलगी ही, स्त्री म्हणून अनेक गोष्टींवर अवलंबून रहायला लागते असे मला वाटते. म्हणजे ज्या घरात ती नव्याने आली आहे त्या सासरी. त्या घरातील लोकांवर ती वेगवेगळ्या गोष्टींसाठी, वेगवेगळ्या प्रसंगी,अवलंबून असल्याचे जाणवते. किंबहुना तशी परीस्थीती तिच्याभोवती निर्माण केली जाते.या नवीन घरात प्रवेश केल्यापासुन तिच्याहुन मोठ्या असणा-या व्यक्तिंची सारखी या ना त्या स्वरुपात परवानगी काढताना ती दिसते. तिच्या उठण्याच्या-झोपण्याच्या वेळा,ते तिने कोणत्या वेळेला काय करायचे इतपर्यंत तिच्यावर त्या घराची अशी एक पद्धत लादली जाते. मी ही सर्व कामे करीन पण मला वाट्टेल तेव्हा,माझ्यावेळेनुसार हे स्वातंत्र्य क्वचितच कोणा एकीला मिळत असेल.काही घरात तिने घराबाहेर जाताना कोठे जाणार?कधी येणार हे सांगण्याची बांधीलकी तिच्यावर असते.याच वेळी तिच्याबरोबरचा पुरुष याला या गोष्टींसाठी काहीही नियम नसतात.पुरुष घराबाहेर न सांगता जाणे हे ग्रुहीतच धरले जाते.घरातील सामुहीक प्रश्नांमध्ये तिला सहभागी करुन न घेणे,घरातील आर्थिक व्यवहार तिच्यापासुन लपवून ठेवणे,स्त्रीला तिच्या स्वत:साठी अथवा तिच्या कुटुंबासाठीलागणा-या पैशासाठी(मग ती नोकरी करणारी असो वा नसो.) सतत कोणापुढे तरी मागते रहाणे......या आणि अश्या अनेक गोष्टींसाठी स्त्री ही परावलंबी झालेली दिसते.या आणि अश्या अनेक तिच्या जीवनातील गोष्टी जर आपण पाहील्या तर असे जाणवते की या सर्वांमागे त्या तिच्या आपल्या माणसांचा तिच्यावर असलेला अविश्वास.ती आपल सर्वस्व सोडुन ज्यांना आपलं सर्व मानत असते अश्या सगळ्यांपैकी कोणा एकाचाही तिच्यावर विश्वास नसतो हे सिद्ध होते.त्या स्त्रीला तिचे असे वैयक्तिक आयुष्य असते हे मान्यच नसते कित्येकांना.तिला काय वाटते?,तिचे आवडीचे छंद,तिच्या आवडीच्या गोष्टी याचा विचार खुप कमी घरांमध्ये होत असेल .किंबहुना तीने माझ्याच आवडीनिवडींशी समरस होऊन रहावं असा हट्टच असतो. तिच्या आवडींसाठी आपण काय करु शकू का? याचा काडीचाही विचार न करणारी मंडळी खुप सापडतात.तिचे मन जाणण्याचा विचार कोणी करत नाही.याउलट आपल्या प्रत्येक तालावर नाचवून घेणारे व त्यामधुन असुरी आनंद उपभोगणारे अनेक जण आपल्याला सापडतात.स्त्रीयांची मानसिक गरज जशी लक्षात घेतली जात नाही तशी तिची शारीरीक गरज ही लक्षात घेतली जात नाही.पण या विषयावर पुन्हा सविस्तर बोलता येईल.शारीरीक गरज ही फक्त स्त्रीयांनाच असते का? किंबहुना गरज नसताना देखील केवळ पुरुषाच्या सोईने त्याला वाट्टेल तेव्हा ती गरज पुर्ण केली जाते. यात दोघांच्या आनंदाचा,पुर्ण सहभागाचा विचार खुप कमी वेळा केला जातो. प्रत्येक वेळी त्या पुरुषाचा मुड संभाळुन शारिरिक गरजा भागवणा-या स्त्रीयांची संख्या काही कमी नव्हे.कधीतरी तिचा मुड,तिची गरज लक्षात घेतली जातच नाही.ह्या आणि अश्या अनेक तिच्या आयुष्यातील गोष्टी आहेत की ज्या गोष्टींसाठी ती सतत कोणावर तरी अवलंबून रहाताना दिसते अथवा तशी परीस्थिती निर्माण केली जाते. आणि त्यामुळे आपण कुणाचं तरी मिंध असल्याच सतत तिला जाणवत रहाते. आणि या परवलंबनाचा एक प्रकारचा ताण तिच्यासाठी सहन करण मोठ आवघड होऊन बसतं. तिचे स्वत:चे असे तिचे स्वच्छंदी आयुष्य ती सतत कोणत्या तरी दडपणाखाली जगत असते.तिच्या या अश्या स्वच्छंदी जगण्यासाठी आपण काय करु शकु याचा विचार तरी प्रत्येक कुटुंबात केला जावा एवढी अपेक्षा.प्रत्येक कुटुंबात एक तरी स्त्री आहे. कधी ती आई,कधी बायको,कधी बहीण,तर कधी आपली रक्ताची लेक.पण या प्रत्येक रुपाशी वागणारा पुरुष हा नेहमीच वेगळा का असतो?

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...