Monday, June 30, 2014

शीला

शीला केरळातल्या पट्टनमतिट्टाहून आलेली. महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावातल्या इंजिनीअरींग कॉलेजमधून तिने BE केलं होतं. नंतर इथे पुण्यात नोकरी करत होती. आमच्या हॉस्टेलवर राहात होती.

साधी सरळ मुलगी! प्रेमात पडली होती. लग्न ठरलेलं. ते चार वर्षांनी करायचं हे ही ठरलेलं. तो मुलगा मुंबईत राहायचा. मुंबईपेक्षा एकट्या मुलीला राहायला पुणं सुरक्षित! म्हणून आईवडिलांनी वर्षभर पुण्यात राहून नोकरी करण्याला परवानगी दिली होती.

आता आई-बाबांचं ऎकायचं, नंतर नवर्‍याचं, मग संसार मुलं.... तिचं अगदी पक्कं होतं.

आमच्यापेक्षा तिचं जरा निराळं होतं. आमचं सार्‍याजणींचं भविष्य धुसर, अनिश्चित होतं. तिचं दृष्टीपथात. त्यापेक्षाही खरं प्रेमाने तिला वर उचललेलं.

तिच्या प्रेमकथेच्या खरं मजाच होत्या.

एक म्हणजे दोघंही पट्टनमतिट्टाच्या एकाच हॉस्पीटलमधे चार महिन्यांच्या अंतराने जन्मलेले.

दुसरं..

ही दोघं आणि आणखीही आठ-दहा जण असतील, इथे शिकायला आलेले. हा खरं तर तिच्या मैत्रिणीचा चांगला मित्र! तिघेही एकाच वर्गात. पण शीला त्याच्याशी फारसं बोलत नसे. दोघांचं कसं जमलं, हा तपशील मी विसरले आहे. पण दोघांचं नक्की ठरल्यावर त्यांनी घरी सांगायच्या आत, या दोघांना त्या छोट्या गावातल्या शीलाच्या एका दूरच्या काकांनी पाहिलं. तेच तिचे local guardian होते. योगायोगाने चारच दिवसांनी ते गावी, पट्टनमतिट्टाला जाणार होते. दोघी मैत्रिणी काळजीत पडल्या. ते काका घरी जाऊन हे नक्की सांगणार! मग घरी कसा गोंधळ माजेल, कदाचित फिसकटेल हे दिसायला लागलं. मग काकांच्या आधी आपणच घरी सांगावं हा विचार करून रिझर्वेशन नसताना तसाच प्रवास करत दोघी मैत्रिणी गावी गेल्या. शीला अशी अचानक कशी काय आली? आई-बाबांना कळेना.

हिने सांगितलं की ते काका उद्या-परवा येणार आहेत, त्यांनी मला एका मुलाबरोबर पाहिलं, ते येऊन काही सांगतील तर त्याच्या आत आपणच खुलासा करावा म्हणून आले आहे. आई-बाबा म्हणाले, " अगं, वेडी की काय तू? तेव्हढ्यासाठी आलीस? त्यांनी काहीही सांगितलं तरी आमचा काय आमच्या मुलीवर विश्वास नाही? आमची खात्री आहे. तू काहीही काळजी करू नकोस. " ........ झालं! इथवर गोष्ट आली की ख्यॅ! ख्यॅ! ख्यॅ! आम्ही नुसत्या हसायला लागायचो. मग काकांना जी शंका आली ती खरीच आहे....... वगैरे वगैरे सांगताना तिची उडालेली त्रेधातिरीपीट ऎकायला जाम मजा यायची.

एकाच जाती-पोटजातीतल्या आणि अनुरूप असणार्‍या दोघांच्या लग्नाला दोन्हीकडच्यांनीही पाठिंबा द्यावा यात नवल ते काय?

तिचं सगळं शिस्तीत चालायचं. सकाळी उठल्यावर प्रार्थना, झोपताना देवाचे आभार, वगैरे वगैरे. तिच्या आयुष्यात आलेल्या ’त्याच्या’ वर ती खूष होती आणि हे करणार्‍या देवाबद्दल कृतज्ञ!



आमच्या हॉस्टेलच्या शेजारी दर गुरूवारी सकाळी भजनी मंडळाच्या बायका जमून भजनं म्हणत. जो काही टिपेचा सूर लावीत! बस्स! मी म्हणायचे काय कटकट आहे! आणि माझ्या दोन मैत्रिणी नसरीन आणि शीला मला समजावीत असत की " असं म्हणू नये. देवाचं नाव आपोआप कानावर पडतं. " :)

नसरीन सारखीच शीला ही एकमेव ख्रिश्चन मैत्रिण!

तिचे बाबा तिकडे चर्चमधे फादर होते. म्हणजे तो हुद्दा की संबोधन कोण जाणे!

तिचे घरी आणि त्याला मुंबईला फोन करण्याचे दिवस ठरलेले होते. (तिचा पगार ती जपून वापरत असे.) मुंबईला फोन केला की आधी नणंदेशी किंवा सासूबाईंशी अदबीने बोलणं मग त्याच्याशी. तेव्हा सर्रास मोबाईल नव्हते, आम्ही सगळ्याच १/४ रेट झाल्यावर घरी फोन करत असू.

ते दोघे एकाआड एका रविवारी भेटत असत. बरेचदा लोणावळ्याला.  दोघांनांही ते बरे पडे.

एकदा काय निरोपात गडबड झाली माहित नाही पण ही लोणावळ्याला गेली आणि तो आलाच नाही. आम्ही कुठे कुठे भटकायला गेलेलो परत हॉस्टेलवर आलो तर ही पांघरूण घेऊन झोपलेली. कुणाशी काही बोलेना. रडतच असलेली. आम्हीही शांत बसलो. तेव्हा काय किंवा नंतर काय कधीही आम्ही या प्रसंगाची खिल्ली उडवली नाही.

एकदा कधीतरी लोकरीच्या विणकामाचा विषय निघाला, मी शिकवू शकेन म्हंटल्यावर दोघी- तिघीजणी जाऊन तुळशीबागेतून लोकर , सुया घेऊन आल्या. मी काहीतरी साधीशी विण शिकवली असेल. नसरीनने पण कुणासाठीतरी करायला घेतला. शीलाला आपण त्याच्यासाठी स्वेटर विणतोय हे इतकं भारी वाटत होतं. मला म्हणाली, "तुझं लग्न ठरलं की तुही एक छानसा विण. "

" मी? ह्या!"

" कशी गं तू? तुला काहीच नवर्‍यासाठी करायला नको आहे. त्याला किती छान वाटेल! विचार करून बघ. "

" मला वाटतं, ही अशी भेट मला मिळाली तर मला किती छान वाटेल! तुम्ही स्वत:ला छान वाटण्याचा जरा विचार करून बघा. " :)

त्या रविवारी तो यायचा होता. मुंबईहून पुण्याला. त्याला साडी नेसलेली आवडते म्हणून शीला एक साडी घेऊन आली होती. ती तिला नेसायची होती. इतक्या लगेच ब्लाऊज कसा शिवून मिळेल? मग काय सगळ्याच जणी सल्ले द्यायला तयार! रेडीमेड कुठे मिळेल? पासून काळा चालेल, पर्यंत. ती कॉटनची काळ्यावर डिझाईन असलेली साडी होती. मी म्हणाले, " तुला अगदी मॅंचिग हवा आहे ना? मग काय कर, तुझ्याकडे काळा ब्लाऊज आहेच ना, त्याच्या नुसत्या बाह्या बदल. साडीच्या आतल्या बाजूकडून बाह्या कापून घ्यायच्या आणि जोडायच्या, कोणीही हे पटकन करून देईल. "

"वा!" ती एकदम खूष झाली.

पण दोन दिवसांत हे करून देईल असा कोणी टेलर मिळाला नाही.

" विद्या, तूच दे ना करून. "

" बरं. " मीही उदारपणे म्हणाले.

रविवारी सगळ्याजणी कुठे कुठे गेलेल्या. आम्ही दोघीच होतो. तो दुपारी चारला यायचा होता.

मी उशीरा उठून सावकाश आवरून, पेपर वाचून, निवान्तच. तिने जुना ब्लाऊज उसवून ठेवलेला, आणि माझ्या मागे पुढे.

जेवायला दोघीच होतो. शेवटी ती म्हणाली, " विद्या, शिवून देणारेस की नाही?"

" देते की! कितीसा वेळ लागणारे!"

" जेवण झालं की दुसरं काहीही करू नकोस."

जेवणानंतर खरंच मी शिवायला घेतला.

मग माझ्याजवळ बसून त्याच्याबद्दल काय काय सांगायला लागली.

ती इतकी त्याच्या प्रेमात बुडालेली होती आणि इतकी सुंदर दिसत होती.

म्हणाली, " त्याला दुबईला जाऊन खूप पैसा कमवायचाय. दोन-चार वर्षच जाईन म्हणतो आहे. आमच्याकडे हे फार आहे. पुरूषमंडळी आखातात आणि बरेचदा बायका इकडॆ. लग्न झालं तरी आम्हांला एकत्र राहायला मिळणार की नाही कोण जाणे. "

ती काळजीतही होती आणि सुखातही.

मी नुसती ऎकत होते.

ती बोलत होती.

प्रेमामुळे माणसं कशी फुलून येतात, कशी तरंगायला लागतात हे मी पहिल्यांदा इतक्या जवळून पाहिलं ते तेव्हा!

तिचाही स्वर इतका सलगीचा होता, इतका आतला होता.

नुसत्या मैत्रीने , स्नेहाने मी न्हाऊन निघत होते.



माणसाला काय बरं हवं असतं?

आतलं आतलं बोलता यावं असं एक माणूस!



शीलाही पत्त्यासगट कुठेतरी हरवून गेली.

पट्टनमतिट्टा ? की मुंबई? की दुबई?

कुठे आहेस तू?



स्वत:ला छान वाटावं याचा विचार करून बघितलास की नाही अजूनतरी?


********


Saturday, June 28, 2014

माझ्या सासूबाई

माझ्या सासूबाई - सुमती भिडे. आधीच्या सुधा आठवले.त्यांनी  मला कधीच प्रत्यक्ष पाहिलं नाही. कारण त्या आमच्या लग्नाच्या आधी काही वर्ष दृष्टीहीन झाल्या होत्या.
.........

लग्नाच्याबाबतीत निर्णय घेताना माझ्या मनावर ताण आला.
त्या परावलंबी आहेत त्यामुळे आपल्याला त्यांना सांभाळावं लागणार आहे. हे गृहित धरुन मगच "हो" असा निर्णय घ्यायचा आणि एकदा "हो" असा निर्णय घेतल्यावर मग त्याचा व्यवस्थित स्विकार करायचा हे मी मला सांगत होते.

हो असं ठरलं.

माझ्या लग्नाच्या सर्व खरेदी साठी त्या आमच्याबरोबर आल्या. प्रत्येक खरेदीच्यावेळी त्यांचं असं मत होतं. अगदी डिझाईन, रंग इ... बाबत. त्यांच्या दोघी बहिणींच्या मदतीने त्यांनी संपूर्ण कार्य पार पाडलं.

आता माझा खरा कसोटीचा काळ चालू झाला.
मला स्वयंपाकाची सवय नव्हती. भाज्या फारशा येत नव्हत्या. पण आता ही आपलीच जबाबदारी आहे असं होतं त्यामुळे ताण होता. मी नोकरी करत होते. सकाळी नऊ वाजता जायचे ते संध्याकाळी सहा वाजता यायचे.

लग्नानंतर नोकरी चालू झाली. पहिल्या दिवशी सकाळचं करुन कामावर गेले. संध्याकाळी घरी आले तर सगळा स्वयंपाक तयार. अगदी कुकर सुध्दा. मला म्हणाल्या अगं माझा वेळ जात नाही कंटाळा येतो. मी करत जाईन संध्याकाळचं. तूही दमतेस. मला फक्त पोळ्या नाही जमत. लाटताना पोळपाट कुठं संपतो त्याचा अंदाज नाही येत. पोळ्या बाई करतील, बाकी मी करेन. त्यांनी ते ठरवूनच टाकलं होतं. 

हळूहळू जरा आमची एकमेकींशी ओळख झाल्यावर मला त्यांनी वेगवेगळ्या भाज्या शिकवायला सुरुवात केली. भाजी शिकून झाली की मला ती लिहून ठेवायला सांगायच्या. प्रमाण सुध्दा अचूक असायचं. त्यांचं माहेर नागपूरचं असल्याने पदार्थ पण चमचमीत असायचे. मला म्हणायच्या सगळ्या गोष्टी तू एकदा शिकून घे. मग आवडल्या तर कर. मग माझी एक पाककृतीची वही तयार झाली.
घराची स्वच्छता, आवराआवरी त्याच करायच्या. किराणा सामान संपत आलं की त्यांनी मनात यादी केलेलीच असायची. ती फक्त कागदावर उतरवायची मदत मी करायचे.

दिवाळी मधे मला म्हणाल्या आनंदला तू तेल लाव आणि तुला मी लावते. कदाचित स्पर्शातून त्यांना मला पाहिचं असेल.
दिवाळीत फराळाच्या गोष्टी करण्यासाठी त्यांची मदत होणार नव्हती. त्यामुळे त्यांनी मला स्पष्टपणे सांगून टाकलं, काहीही घरी करण्यात कष्ट करु नकोस. सरळ चितळ्यांकडून विकत आण. मला एकदम हलकच वाटलं.

उन्हाळाच्या सुट्टीत मला म्हणाल्या साखर आंब्याच्या कै-या आणून दे. मी त्यांना सामान आणून दिलं. एक दिवस कामावरुन घरी आले तर साखर आंबा तय्यार. असच लोणचं पण घातलं. 

आमची ओळख अजून विस्तारली. जवळीक वाढली. तशी त्यांनी मग मला संसाराच्या व्यवस्थापनाबाबत टीप्स द्यायला सुरुवात केली. गुंतवणूक, बचत याबाबत सल्ला दिला. मला माझं स्वत:च स्वतंत्र बचत खातं उघडायाल सांगितलं. म्हणाल्या तुझे तू स्वतंत्रपणे पैसे ह्यामधे ठेव. घरात खर्च करुन टाकू नकोस.

घरी एकटं बसून त्यांना कंटाळा यायचा. मग कधी कधी गावात बहिणीकडे जायच्या. एकट्य़ा जायच्या. मी सोडू का असं विचारल्यावर म्हणायच्या कशाला तुझा वेळ घालवते मला माहिती आहे रस्ता. एक दिवस मी त्यांच्या बरोबर गेले. तेव्हा बघितलं त्या सतत रिक्षावाल्यांशी बोलत होत्या. कुठल्या भागात आलो आहोत हे तपासत होत्या. शेवटपर्यंत त्यांनी अचूक ठिकाणं सांगितली. नगरला सुध्दा मोठ्या मुलाकडे त्या कधीकधी एकट्य़ाने प्रवास करुन जायच्या. 

टि व्ही वरच्या सिरीयल, बातम्या, इतर कार्यक्रम त्या आवडीने बघायच्या. हो बघायच्याच. मी घरी आले की कार्यक्रमाची सविस्तर माहिती द्यायच्या. 

त्यांना आता नातवंड येण्याकडे डोळे लागले होते. माझ्यावर त्यांच बारीक लक्ष असायचं. प्रत्येक महिन्यात पाळी येऊन गेली का ते विचारायच्या. मग हळूहळू कळलं की मला औषध - उपचाराची गरज आहे. दवाखान्याच्या वा-या, मनावरचा ताण हे सगळं सुरु झालं. त्यांना ते जाणवत होतं. एक दिवस मला म्हणाल्या, एक लक्षात घे मुलं झाली म्हणजे आकाशाला हात टेकले असं अजिबात नाही. मुलं झाली की संसार परिपूर्ण असं नसतं. शेवटी माणुसकी महत्वाची.
त्यानंतर त्यांनी मला कधीच त्याबाबतीत विचारलं नाही.
.............

त्यांचा संसार खूप खडतर झाला.
आनंदच्या जन्मानंतर डायबेटिस झाला. पण संसारच्या जबाबदारीमुळे कधीच त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. आणि त्याचा परिणाम दृष्टी जाण्यापर्यंत झाला.

नव-याच्या व एका मुलाच्या अकाली निधनाने खचून न जाता त्यांनी त्यांच्या जबाबदा-या खंबीरपणे पार पाडल्या.

"त्या परावलंबी आहेत त्यामुळे आपल्याला त्यांना सांभाळावं लागणार आहे. " हे माझं मत पूर्ण चुकीचं ठरलं. मी मात्र छोट्य़ा छोट्य़ा गोष्टींसाठी त्यांच्यावर अवलंबून रहात असे.

खूप स्वाभिमानाने त्या जगल्या. त्यांना कोणाला सांभाळायची वेळ येऊ नये अशी त्यांची इच्छा होती. अचानक एक दिवस रात्री पाठ दुखीचा त्रास सुरु झाला आणि ह्र्दय विकाराच्या झटक्याने त्या सकाळी आम्हाला कायमच्या सोडून गेल्या.
.......

त्यांनी शिकवलेल्या भाज्या मी करते. स्वयंपाघरातील छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी सांगितल्याप्रमाणे पाळते. त्या आजही माझ्याबरोबर आहेतच.

Thursday, June 26, 2014

शकुंतलामावशी

   आम्ही वाडयातून आमच्या फ्लॅटमध्ये रहायला गेलो तेव्हा मी चार पाच वर्षांची असेन आणि माझा भाऊ वर्षादीड वर्षांचा.आईची बाळंतपणाची रजा जसजशी संपत आली तसा आम्हाला संभाळायचा प्रश्न पुढे उभा राहीला. कोणीतरी संभाळायला ठेऊ या म्हणून शोध सुरु झाला.कारण घरात आजोबा होते पण माझी आजी पॅरेलिसीसने अंथरुणात होती.आई बाबांना दोघांनाही नोकरी करणे भाग होते.कीर्लोस्करांच्या बंगल्यावर बाबा तेव्हा साहेबांचे पी.ए. म्हणून काम बघत होते.तेथे स्वयंपाकाला असणारा बाळू सोलापूरचा रहाणारा.त्याच्या ओळखीची एक बाई.नव-याने सोडून दिलेली.....शकुंतला नाव तिचं.तिला आमच्याकडे रहायला ठेवा असा बाळूचा आग्रह.तिची पण सोय होईल आणि मुलांनाही संभाळेल.अतिशय प्रामाणिक आहे.त्याच्यावर विश्वास ठेवून बाबांनी तिला पुण्याला आमच्याकडे बोलावून घेतले.
   शकुंतला बाई.काय म्हणायचे त्यांना ?  कोणत्या गावाच्या ? कोणाच्या कोण...कोणावर  तरी विश्वास ठेवून आमच्या घराचा आसरा मिळेल अश्या आशेने आमच्याकडे आल्या आणि आमच्यातल्याच एक झाल्या. एखादी आजी काय करेल इतक्या प्रेमाने तिने आम्हा दोघांना लहानाचे मोठे केलं.अतिशय शिस्तीच्या,प्रसंगी धाक दाखवून पण अतिशय प्रेमळ.आमच्या झोपायच्या,खाण्यापिण्याच्या वेळा अगदी चोख सांभाळणारी.तिच्या हातच्या पातळ तव्यावरच्या भाक-या आणि झणझणीत पिठलं ......त्याची चव आजूनही जिभेवर आहे.मला एकदा हुक्की आली.मला स्वयंपाक शिकायचा म्हणून...तिने मला पहील्यांदा भाकरी शिकवली तो दिवस आजही मनात ताजा आहे.पहील्या पहील्यांदा माझ्या हातून खूपच जाड भाकरी थापली जायची.त्याला चिरा पडायच्या,फुगायची पण नाही.पण तेथून ती भाकरी पातळ जमेपर्यंतचे तिचे शिकवणे आजही आठवते.जेव्हा जेव्हा आजही मी भाकरी करते तेव्हा तेव्हा एकही दिवस असा जात नाही की मावशींची आठवण येत नाही. रावण पिठलं...हे त्यांनीच मला शिकवलं .म्हणाल्या असा ठसका लागायला हवा तेव्हा जमलं खरं पिठलं.त्यांची वाक्य आजही कानात आहेत.
    आमची आजारपण,आमचे धडपडणे....एक ना अनेक उद्योग.आईने डोळे झाकून त्यांच्यावर सोपवून नोकरी केली.तेव्हा रजाही सारख्या मिळायच्या नाहीत.आणि रजा घ्यायची गरजही कधी वाटली नाही.इतक्या प्रामाणिक,विश्वासू आणि प्रेमळ होत्या त्या. स्वत:ची कामे स्वत: करणार आणि दुस-यासाठीही झिजणार.आमच्या घरातच त्यांनी त्यांचं म्हातारपण घालवलं .त्या ऎंशी वर्षाच्या असतील त्यांना गुदघेदुखीचा त्रास अनेक वर्षे होता.आणि शेवटी शेवटी तर त्यांना चालणेही अवघड होऊन बसलं.जमीनीवर खुरडत खुरडत चालायच्या त्यातच म्हातारपणामुळे डोळ्यांना दिसणं कमी झालं होतं.एक दिवस आम्हाला म्हणाल्या मला एखाद्या वृद्धाश्रमात ठेवा साहेब .आता मला होत नाही आणि तुम्ही माझं केलेलं मला आवडणार नाही.माझे शेवटचे जे काही दिवस राहीलेत ते मी तेथे काढेन.आम्ही सगळ्यांनीच त्या गोष्टीला नकार दिला.पण त्यांचा एकच हट्ट की तुम्ही माझं करायच नाही.या कल्पनेनेच मला आधीच मरण येईल.आई बाबांनी ऎकल नाही.त्याचा त्यांनी इतका धसका घेतला की त्या आजारी पडल्या आणि अंथरुणाला खिळल्या.अनेक दिवस औषधे चालू होती पण काही उपयोग झाला नाही.त्यांच्या गावी सोलापूरला त्यांचा भाचा होता त्याला बोलावून घ्या म्हणाल्या.तेव्हा पत्र पाठवून त्याला बोलावून घेतले.आमच्या हातून त्यांना सेवा करुन घ्यायची नव्हती.तो गावी त्यांना घेऊन गेला आणि दहा बारा दिवसातच त्या गेल्या.त्यांचा शेवट आमच्या घरातच व्हावा असे आम्हा प्रत्येकाला वाटत होते.पण ते घडले नाही.माझ्या घडण्याच्या काळातली आई बाबांच्या इतकीच महत्वाची व्यक्ती म्हणजे शकुंतला मावशी होत्या.
   माझ्या आयुष्यात अशी काही माणसे आहेत की ज्यांच्या नसण्याने मी अपूर्ण रहाते त्यापैकी एक शकुंतलामावशी....

Wednesday, June 25, 2014

आजी

आजी,
गेले दोन दिवस मी तुझं लिखाण वाचते आहे. तू लिहिलेला चारपाचशे पानांचा गठ्ठा तू गेल्यावर मी माझ्याकडे घेऊन आले. अधेमधे, थोडंथोडं वाचत होते. या दोनतीन दिवसात मात्र ते बरंचसं वाचून काढलं. या तुझ्या लिखाणावरची सर्वात आधीची तारीख २००५ सालातली दिसते आहे. शेवटच्या दोनतीन वर्षात एवढं सगळं लिहिलंयस. तुझं बारीक बारीक अक्षर, लिहिताना कागदावरच्या जागेचा पुरेपूर उपयोग करुन घेण्याची तुझी सवय हे सगळं माझ्या खूप खूप ओळखीचं आहे. वाचतानाही हे सगळं तुझ्या आवाजातच माझ्यापर्यंत पोचतं आहे. अगदी तुझ्या हावभावांसहित. तुझ्या बालपणीच्या, शाळेच्या, लग्नाच्या, वाफेगावच्या लोकांच्या, एवढंच नाही तर तुझ्यापर्यंत कुणाकुणाकडून तुझ्यापर्यंत पोचलेल्या तुझ्या जन्माआधीच्याही गोष्टी यात  आहेत. शंभरेक वर्षांचा कालपट माझ्यासमोर तुकड्यातुकड्याने उलगडतो आहे.
शाळकरी वयातली तू! आई-वडील, काका-काकू, आजी, सोवळी जिजाआत्या, भावंडं, चुलत भावंडं असं मोठं कुटुंब. तुझी आजी म्हणजे घरातलं सर्वात महत्वाचं माणूस. तिची नातवंडांवरची माया, पण त्याचवेळी ती तुझ्या आईला करीत असलेला सासुरवास, तुझी काकू आणि आई यांच्यात ती करत असलेला भेदभाव, तुझ्या आजोळच्या- ग्वाल्हेर, ब्रह्मावर्ताच्या- गोष्टी... आणि तुझ्या सख्ख्या मैत्रिणीबरोबरच्या- शरयू (बावडेकरच ना गं? आपण एकदा गेलो होतो त्यांच्याकडे) बरोबरच्या आठवणी वाचताना तर पाणीच आलं डोळ्यातून. तुम्ही शाळेच्या वाटेवरच्या कबरस्तानातून चिंचा गोळा करयचात आणि मारुतीच्या देवळात बसून खायचात :) भांडणं झाली की तू छोट्या माईच्या हाती शरयूला पाटीवर चिठ्ठी पाठवायचीस आणि तुमची भांडणं मिटवायचीस :) शाळेत जायच्या वाटेवर एकदा तू तुला त्रास देणार्‍या एका मुलाला बेदम मारलं होतंस. हे गुपित फक्त शरयूलाच सांगितलंस कारण घरी सांगितलं तर शाळाच बंद होण्याची धास्ती! तू शाळेत अगदी हुशार विद्यार्थिनी होतीस. सगळ्या विषयात पहिली येऊन महिन्याला बारा आणे शिष्यवृत्ती मिळवणारी! तुला खूप शिकायचं होतं. डॉक्टर व्हायचं होतं. तुझे काका सोलापुरातले सुविख्यात सर्जन. त्यांचा तुला पाठिंबा होता. त्यामुळेच तुला हायस्कूलचे शिक्षण घेता आले. तू तिथल्या सेवासदनात शिकत होतीस. घरी मात्र तुझ्या लग्नाचं बघत होते. तुझ्या आजीची शेवटची इच्छाच मुळी ’सुमतीचं लग्न वर्षाच्या आत करा’ अशी. त्यापुढे काकांचंही काही चाललं नाही. तुला शिकता आलं असतं तर तू सहजच डॉक्टर होऊ शकली असतीस. ती खंत तू तुझ्या संसाराच्या रामरगाड्यातून वेळ काढून होमिओपॅथीचा कोर्स करून पूर्ण केलीस का? बारा बाळंतपणं, आठ मुलं, त्यांची शिक्षणं, लग्नं, दुखणीखुपणी, पै-पाहुणे, दिरांच्या संसारांच्या जबाबदार्‍या, या सगळ्यातून वेळ काढलास तरी कधी? वाफेगावातले लोक किती विश्वासाने तुझ्याकडून औषध घेऊन जायचे. घरच्या गुरांच्या आजारपणात गुरांचे डॉक्टर वाफेगावला येऊ शकले नाहीत तेव्हा गुरांनाही होमिओपॅथीच्या गोळ्यांचा मोठा डोस देऊन बरं करणं म्हणजे मात्र कमाल होती हं :)
तू लिहिलंयस, ’आपल्याला शिकता आलं नाही तर किमान नवरा तरी खूप शिकलेला हवा, आपल्याला पडलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर त्यानं पाच मिंटात द्यावं असं वाटायचं. पण तेही नाही घडलं.’ पण पुण्यात रहाता यावं ही इच्छा मात्र पूर्ण झाली.  (आजी पुण्यातून प्रसिद्ध होणारं ’आनंद’ मासिक वाचायची. त्यात येणार्‍या पुण्याच्या, तिथल्या सांस्कृतिक वातावरणाच्या माहितीमुळे तिची इच्छा होती की लग्नानंतर पुण्यात रहायला मिळावं)
माहेरी लाडाकोडात वाढलेली, खूप शिकायचं स्वप्न बघणारी तू, शिक्षण अर्धवट टाकून वाफेगावसारख्या आडगावी, भल्या थोरल्या वाड्यात, दुसरेपणाची बायको म्हणून आलीस तेव्हा काय वाटलं असेल तुला? लग्नानंतरच्या पहिल्या दिवशी, सगळ्या बायका आपापल्या नवर्‍याच्या उष्ट्या ताटात जेवताहेत हे पाहिल्यावर दुसर्‍या दिवसापासून तू पुरुषांची जेवणं झाल्याबरोब्बर चपळाईने सगळ्यांची ताटं घासून टाकलीस आणि पुन्हा कधीही नवर्‍याच्या उष्ट्या ताटात जेवली नाहीस. मला तो प्रसंग वाचताना हसू आलं, पण खरंच, तुझ्यासारख्या बायकांसाठी किती कसरतीचं होतं ना त्या काळात स्वाभिमानाने जगणं? आजोबा सरळमार्गी, समजुतदार, भले होते, ही एक मोठीच जमेची बाब. नाहीतर तिथेही तुला लढत राहावं लागलं असतं. त्यांच्या नोकरीच्या निमित्ताने तुम्ही कुठेकुठे फिरलात आणि मग पुण्यात येऊन स्थिरावलात. तुझं ’आनंद’ मासिकातलं पुणं तुला मिळालं. छान वाटलं असेल ना तेव्हा? पुण्यात मुला-मुलींची शिक्षणं होऊन थोडी स्थिरता आल्यावर तुम्ही दोघांनी परत वाफेगावचं घर उघडलंत. पुढे कधीतरी बाबा तिथे आले, मग लग्नानंतर आई, मग मी, अभिजीत. माझी शाळा सुरु होईपर्यंतचा वाफेगावातला काळ अगदी धूसर आठवतो मला. पुढे आम्ही पंढरपूरला गेलो आणि मग वाफेगाव सुट्ट्यांपुरतं राहिलं. त्या घरातली तू जेव्हा डोळ्यासमोर येतेस, तेव्हा कधी चुलीवर दूध आटवत असतेस, म्हशीचं आंबोण करत असतेस, नऊवारी साडीच्या निर्‍या करुन ती गोलगोल फिरवून, तिची गाठ मारत असतेस, संध्याकाळी ओटीवर बसून सातच्या बातम्या ऐकत असतेस, मथणीपाशी उभं राहून ताक करत असतेस, आणि खूपदा रात्रीच्या वेळी उशाला बारीक कंदील ठेवून वाचता वाचता झोपी गेलेली असतेस. तुला कधी पोथ्या पुराणं वाचताना पाहिलं नाही. पण रोजच्या जगण्याशी जोडून घेणारं सगळं तुला वाचायला आवडायचं. वाफेगावच्या घरात दिवाळी अंकांच्या, मासिकांच्या, पुस्तकांच्या थप्प्याच असायच्या. रिकामा वेळ मिळाला की तू वाचत असायचीस. तुला कमी झोप पुरायची. मग रात्री जेव्हा कधी जाग यायची तेव्हा उशाला ठेवलेला कंदील मोठा करून तू वाचत बसायचीस. पुस्तकांएवढीच तुला माणसंही हवीशी असायची. वाफेगावच्या घरात सतत माणसांचा राबता असे. शेतातल्या कामांच्या, गाईगुरांच्या निमित्ताने कोणी येत, कोणी ताक, कोरड्यास मागायला येत, कोणाला औषध हवं असे, कोणी उगाचच टाईमपासला येत. तुझी तासातासाला चहाची फेरी व्हायची. जरा थांबलं की एखादा कपभर च्या त्यांनाही मिळे. रात्रीच्या वेळी तर झोपायला येणार्‍या मंडळींनी ओसरी भरून जाई.
मला तू सांगायचीस त्या गोष्टी आठवतात. तुझ्या गोष्टी म्हणजे बाबा-काका-आत्यांच्या लहानपणाचे मजेमजेचे प्रसंग, तुमच्या पुण्यातल्या घरी येणारे सगळे विचित्र पाहुणे, त्यांना तुम्ही ठेवलेली गंमतीदार नावं, चाळीतल्या गमती, तुझ्या लहानपणच्या आठवणी. ते सगळे प्रसंग पण तू केवढी खुलवून खुलवून सांगायचीस. पुन्हा प्रत्येकाच्या हुबेहूब नकलाही.
एका सुट्टीत आम्ही वाफेगावला आलो होतो आणि मला, शामूला आणि नाश्कूला तिथल्या मुलांसारखी फडक्यात भाकरी-भाजी बांधून शेतात न्यायची होती. तू खूप हसली होतीस पण आम्हाला तिघांना वांग्याचं भरीत आणि भाकरी फडक्यात बांधून दिली होतीस. आणि आपल्या घरच्या मांजरांची गंमत? मांजराच्या डोक्यावर तुपाचा थेंब टाकायचा. त्याला तुपाचा वास कुठून येतो ते कळतच नसे. मग ते आपल्याच डोक्यावर आहे हे कळल्यावर ते आपला पंजा डोक्यावरुन फिरवून पंजा चाटत बसे. आणि आपण सगळे त्याच्या पंजा चाटण्याची नक्कल करत हसत बसायचो.
आम्ही मोठे होत गेलो तसं आमचं वाफेगावला येणंही कमी होत गेलं. कॉलेजात असताना मी एकदा वाफेगावला आले होते. तेव्हा वाफेगावच्या बायकांबद्दल तू मला केवढं काय काय सांगितलं होतंस. समोरची रखमा, शकी-उशी, भामा, गोदाबाई, द्वारका, प्रत्येकीची वेगळी कथा. मी ते ऐकून हडबडून गेले होते. या सोसणार्‍या बायकांच्या कहाण्या तुझ्यापर्यंत पोचत होत्या कारण त्या बायकांना तुझ्याबद्दल विश्वास होता. तू त्यांच्या व्यथा ऐकून घ्यायचीस, जमेल तसा त्यांना मदतीचा हात द्यायचीस. रखमाला कित्येकदा घरी जेवायला द्यायचे नाहीत. ती आपल्या ओसरीवर झोपायला यायची. तू, आईनं कधी तिला उपाशीपोटी झोपू दिलं नाही.  विमलबाई तिच्या छोट्या मुलाला अफूची गोळी देऊन कामाला जायची, तिला तू परोपरीचं सांगून, मुलासाठी दुधाची सोय करून ते बंद करायला लावलं होतंस. हं, पण याचबरोबर तिथल्या तरूण मुलामुलींच्या मुक्त जगण्याच्या गोष्टीही तू सांगितल्या होत्यास....भन्नाट होत्या त्या :)
        धार्मिक रीतीरिवाज, मासिक पाळी अशा बाबतीत तर तुझे विचार बंडखोरच होते. तरूण मुलींनी उपासतापास अजिबात करु नयेत चांगलं खाऊनपिऊन असावं असं तू कितीजणींना सांगायचीस.  आजोबांच्या वर्षश्राद्धालाही कसले विधी वगैरे न करता एका विद्यार्थ्याला तू मदत करायचीस.
  आता तू नाहीस आणि वाफेगावचाही संबंध संपल्यातच जमा. तीन वर्षांपूर्वी तिथे गेले होते तेव्हा आपल्या घराच्या दगडमातीच्या ढिगार्‍यातून फिरून आले. मागच्या दारातला शेवगा आणि सायली सोडता काहीच शिल्लक नाही तिथे.
एकदा तू विचारलं होतंस नवरा कसा हवाय तुला? तेव्हा लग्नाबिग्नाचं काही डोक्यात नव्हतं माझ्या. मी काहीतरी उत्तर दिलं असेल. तू म्हणालीस, ’शिक्षण वगैरे काय गं, ते असणारच. आपल्याकडे लग्नाची मुलं बर्‍यापैकी सुस्थिरही असतात. पण हे थोडं कमीजास्त असलं तरी चालेल. तो माणूस म्हणून कसा आहे त्याची पारख व्हायला हवी, तो निर्व्यसनी आणि निरोगी असायला असावा हे मला फार महत्वाचं वाटतं.’
आमच्या लग्नाला नाही येऊ शकलीस तू. लग्नाआधी दहा दिवस वाफेगावला पाय घसरून पडल्याचं निमित्त झालं आणि मग हिंडणंफिरणंच थांबलं तुझं. हट्टी होतीस हं तू. आधीच आली असतीस पळसदेवला तर हे टळलंही असतं कदाचित. पण ऐकलं नाहीस. शेवटची तब्बल नऊ वर्षे तुला तशी काढावी लागली. पुस्तकं तर शेवटपर्यंत होतीच तुझ्याबरोबर. नंतर या लिखाणानंही तुला खूप सोबत केली असणार. तुझ्यासारख्या बाईसाठी ते परावलंबी आयुष्य जगणं किती जड असणार त्याची कल्पना आहे मला. तुझ्या लिखाणातूनही ते डोकावतंय अधूनमधून. त्याबरोबरच आतापर्य़ंत ऐकलेल्या अनेक कौटुंबिक गोष्टींमागची तुझी भूमिका, तुझी बाजूही कळते आहे. या सगळ्यातून माझ्या मनातली तुझी प्रतिमा अधिकच उजळत जाते आहे.
        या लिखाणाच्या माध्यमातून तू अजूनही माझ्याजवळ आहेस हे खूप छान आहे..

-अश्विनी

Sunday, June 15, 2014

नसरीन

मी पहिल्यांदा वसतिगृहात राहायला गेले आणि दुसर्‍याच दिवशी नसरीन गावाहून आली. कोकणात तिचं गाव होतं. तिला वसतिगृहात येऊन महिना होऊन गेला होता.

तिच्या वडिलांचा आणि भावांचा गावी काहीतरी व्यवसाय होता. पुण्यातल्या कुलकर्णी ब्रदर्स नावाच्या अप्पा बळवंत चौकातल्या दुकानाशी त्यांचे व्यवहार चालायचे. गावाहून तिने निरोप आणलेला होता तो द्यायला तिला अप्पा बळवंत चौकात जायचं होतं.

तिचं माझं जुजबी ओळखीचं बोलणं झालं. तिने विचारले, " येतेस का माझ्याबरोबर?" मलाही पुस्तकांची दुकाने असलेला हा चौक एकदा पाहायचाच होता. दोघी शोधत शोधत गेलो. तिच्याबरोबर मी पहिल्यांदा तिथे गेले आणि मग जातच राहिले. कितीतरी पुस्तकं मी रसिक साहित्य च्या लायब्ररीतून आणून वाचली. तो रस्ता माझा रोजचा पायाखालचा रस्ता झाला.



या आमच्या हॉस्टेलमधे बरेच कडक नियम होते, रात्री आठनंतर बाहेर थांबता यायचं नाही.

मग रात्रीचं जेवता जेवता आणि नंतरही आतच गप्पा चालायच्या.

नसरीन सरकारी नोकरीत होती आणि नोकरी अंतर्गतच कुठलासा नऊ-दहा महिन्यांचा कोर्स करायला पुण्यात आली होती.

उंची बेताची, सडपातळ, निमगोरी, कमरेपर्यंत एक वेणी आणि कायम दोन्ही खांद्यांवरून घेतलेली , व्यवस्थित पिना लावलेली ओढणी, अशी ती असायची.

आमच्याकडे बहुभाषिक मुली असल्याने मुख्यत: बोलणे हिंदीतून चालायचे. पण नसरीन अगदी शुद्ध मराठी बोलू शकायची.

माझ्या वर्गात पाचवी ते सातवी एक मुसलमान मुलगी होती, तिचं आडनाव शेख, आम्ही तिला आडनावानेच हाक मारायचो.

त्यानंतर कुणीही मुस्लिम मैत्रिण मला नव्हती, एक नसरीन वगळता.

औरंगाबादमधे, मुसलमान भाजीवाल्या, दुकानदार, कंडक्टर असा मुसलमानांशी काहीतरी संबंध यायचा.

इथे अजिबातच येत नाही.

दोन जगं वेगळी झालेली.

नसरीनच्या मोठ्या भावांची, मला वाटते एका मोठ्या बहीणीचंही लग्न झालेलं होतं. तिला चार-पाच छोटी भाचरं होती आणि त्यांची तिला आठवण यायची. दोन अडीच महिन्यांनी ती जायची तेव्हा इथून त्यांच्यासाठी काय काय छोटी खेळणी घेऊन जायची. तिला त्या लहानग्यांमधे राहण्याची, त्यांचं करण्याची सवय होती.

हळू हळू मला तिनं पंखांखाली घेतलं.

मी उशीरापर्यंत जागायचे आणि उशीरा उठायचे.

ती नऊला जाताना मला उठवून जायची. लोळत लोळत मी तिचं आवरणं, ओढणीला व्यवस्थित पिन लावणं, बघायचे. नऊ नंतर आमच्याकडे गरम पाणी आंघोळीला मिळायचं नाही. कधी कधी ती माझ्यासाठी पाणी आणून ठेवी आणि ते गार होण्याआत आंघोळ उरकायला सांगून जाई. यात माझ्या आंघोळीच्या काळजीपेक्षाही मिळू शकणारं बादलीभर गरम पाणी का सोडायचं? हा तिचा हिशोब असे. :) कारण आमच्या या हॉस्टेलवाल्या दोन्ही काकवा अतिशय खडूस होत्या आणि अत्यंत हिशेबी!

कधीतरी कॉलेजमधून आल्यावर पाहिलं तर माझं टेबल आवरून ठेवलेलं असे. मी म्हणे, " असू दे गं, मला पसारा चालतो."

एके दिवशी खोलीतल्या लहानशा मोरीच्या टाईल्स चकाचक घासून ठेवलेल्या.

मला म्हणाली, "ओळख. काय वेगळं दिसतंय?"

मला इतका वेळ लागला! :)

तर असले काय काय उद्योग करायला तिला आवडायचं.

कितीदातरी तिचा हात पाहून मी भविष्य सांगितलं असेल. अशी एक दोन पुस्तकं वाचून मी त्यातलं काय काय सांगू शकायचे. :)

" तुला ना नसरीन जुळी मुलं होणारेत! इथल्या रेषा बघ." मी असं सांगितल्यावर तिचे चकाकलेले डोळे मी पाहिले आहेत.

म्हणायची, ’तुला बारशाला नक्की बोलवीन."

आमच्या जुन्या हॉस्टेलमधे महिनाभरासाठीच एक मुलगी आलेली, अनिता! (तिच्यावरही कधीतरी लिहिन.)

तर ही अनिता दुपारी मी कॉलेजला गेलेले असताना , माझ्या कॉटवर बसून केस विंचरायची, कारण माझा पलंग खिडकीजवळ.

चार दिवसांनी माझं डोकं खाजायला लागलं. काही सुचेना.

आई माझ्या केसांची खूप काळजी घ्यायची. शाळेत असतानाही आईने कधी माझ्या डोक्यात उवा होऊ दिल्या नाहीत. रोज फणीने विचंरायची. एखादी बया आली असेल उडून तर लगेच काढली जायची.

इथे काय झालं? मला कळेना.

मग नसरीनने फणीने माझे केस विचंरले, उवा काढल्या. ते लायसील घ्यायला माझ्याबरोबर आली.

अगदी मोठ्या बहीणीसारखं, वर मला म्हणाली की भाच्यांच्या केसांचं मीच बघते.

या घ्यायला येण्यावरून आठवलं.

हॉस्टेलला आल्यावर मी सॅनिटरी नॅपकिन्स वापरायला सुरूवात केली, इथे ती कापडं धुणार कुठे? आणि वाळत कुठे घालणार? म्हणून.

ते मी औरंगाबादहून घेऊन यायची. आई मला आणून द्यायची. औषधांच्या दुकानात जाऊन दुकानदाराला ते मागायला मला खूपच लाज वाटायची.

एकदा इथे आणायची वेळ आली तेव्हा नसरीन माझ्याबरोबर आली आणि तिने घेऊन दिले.

वर मला ऎकवलं, "त्यात काय लाजायचंय?"

हळू हळू माझी भीड चेपली.

या जुन्या हॉस्टेलचं बांधकाम निघालं तेव्हा सुदैवानं आम्हा तिघीचौघींना जवळच एक चांगलं हॉस्टेल मिळालं.

इथे आमच्यावर बंधनं नव्हती. नाटक / सिनेमा पाहून मी बाराला परत येऊ शकायचे. डबाही बाहेरून लावता यायचा.

मग काय आम्ही सुटलोच! पण नसरीन नाही.

इथे भिंतीवरही काही लावलं तर चालायचं.

मग माझ्या भिंतीवर मी काही पोस्टर्स, काही कविता लावल्या. जी. एं च्या पत्रातलं एक वाक्य लिहिलं. NO buddy can go home once again , बाकी मुली खवळल्या. हे काय असलं लिहून ठेवलंय. आम्हांला वाचायला लागतंय वगैरे, नसरीन काही म्हणाली नाही, तिची भिंत आहे, तिला हवं ते करू देत.

मी त्याचा अर्थ काय आहे ते सांगितल्यावरही, मुलींना ते खटकायचंच.

नसरीनकडून मी नमाज पडायला शिकायचं ठरवलं आणि थोडंफार शिकलेही बहुदा.

एकही केस दिसू नये अशी काळजी घेऊन ओढणी कशी बांधायची ते आणि अजूनही थोडंफार काही तरी नियमांविषयी वगैरे असेल.

ती काही फार धार्मिक वगैरे नव्हती.

एकदा अशाच काहीतरी गप्पा चाललेल्या. मुलग्यांविषयी, लग्नाविषयी असेल.

मी नेहमी असायचे तशी जोशात कुठल्याही स्वरूपातील हुंडा घेणार्‍या मुलाशी मी लग्न करणार नाही, लग्नानंतर नाव बदलणार नाही, मला रजिस्टर मॅरेजच करायचंय. काय काय मुद्दे मांडून माझी बाजू पटवून देत असणार.

सगळ्यांसमोर नसरीन काही बोलली नाही.

नंतर मला एकटीला विचारलं, " तू बोलते आहेस हे खरंच की वाद घालण्यापुरतंच? "

मी म्हणाले, "खरंच."

" नाहीच मिळाला मनाजोगता मुलगा तर?"

" तर काय? नाही करणार लग्न."

" हे जमवता येईल?"

" हो. जमवीन. बघ तुला लग्नाला बोलवीन."

हे खरंच सोपं नव्हतं , हे आज कळतंय.

मग म्हणाली, "तुझ्या मनासारखं होऊ दे. विद्या, मलाही हुंडा घेणार्‍या, माझ्या नोकरीकडे पाहून लग्न करणार्‍या मुलाशी लग्न करायचं नाहीये. मलाही रजिस्टर लग्न करायला आवडेल, ते काही शक्य नाही. आपल्याला हवा तसा मुलगा कुठे शोधायचा? अम्मीने एक शोधलाय, हुंडा नकोय त्याला पण तो कधीतरी पितो, मला नाही चालायचं."

नसरीन कोर्स संपवून गावी गेली. त्यापूर्वी आठ दिवस तिची धाकटी बहीण आलेली, प्रचंड उत्साही आणि प्रचंड बडबडी!

तिने स्वत:चा स्वत: नवरा शोधलेला. नसरीन अजून लग्न करत नाही म्हणून थांबलेली......

.

नंतर नसरीनचं एक पत्र आलं होतं. देईन देईन म्हणता उत्तर द्यायचं राहून गेलं.

तिला लग्नाची पत्रिका पाठवली होती.

पुन्हा काहीच संपर्क नाही.

नसरीन, तुला शोधून काढायचंच म्हंटलं तर शोधू शकेनच.

पण जग तसं छोटं आहे. कधीतरी पुढ्यात उभी राहशील.

तेव्हा मला सांगशील की जुळ्या मुलांची नावं काय ठेवलीस ते!

त्यातल्या एकाचं मी ठेवणार होते! :)

 

 

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...