Saturday, March 31, 2012

चौकटीतले स्वातंत्र्य


 जन्मत: आपल्याला कुठल्याही प्राण्याला असावे इतके स्वातंत्र्य असते.
किंबहुना स्वातंत्र्याची व्याख्या मी अशी करते आहे की मी / किंवा कुठलीही व्यक्ती जगात एकटी असती तर तिला जे असेल,  "हवं तसं वागणं, हवं तसं बोलणं, हवं तसं वावरणं, हवं ते करणं, ....+++... यांची मुभा," ते म्हणजे स्वातंत्र्य!
 आपल्या आयुष्यात दुसरी व्यक्ती आली की तिला जागा करून द्यावी लागतेच.
आपण एका घरात , कुटूंबात, समाजात, देशात जन्माला आलेलो असतो म्हणून आपलं एकेक स्वातंत्र्य आपल्याला गमवावं लागतं त्याबदल्यात एकेक सुविधा आपण मिळवत जातो. बरेचदा आपल्याला  काही निवडता येत नाही.
 एका घरात, कुटूंबात राहायचं तर आपल्याला तसंच घडवलं जातं. म्हणजे लहानपणी तर परावलंबनच असतं ना? माणसाच्या पिल्लाचं बालपण सर्वात अधिक काळ असतं.
 समाजात राहायचं तर एक सुव्यवस्था लागते. न्यायव्यवस्था लागते. मग काही नियम पाळावे लागतात. नियम आले की स्वातंत्र्याचा संकोच होतो.
 हे नियम पाळायचेच असं आपल्यात इतकं रुजलेलं असतं की आपल्या स्वातंत्र्याला मर्यादा घालण्यात आल्या आहेत हेच मुळी आपल्या लक्षात येत नाही.
 अगदी टोकाचं उदाहरण द्यायचं तर ’कपडे न घालण्याचं’ स्वातंत्र्य आपल्याला नाही. आपली त्याबद्दल काही तक्रार नाही.
 असे कित्येक नियम आपण चालवून घेतो, का? तर शेवटी आपण आपल्या काळाची अपत्ये असतो. आपल्या विचारांवर ही बंधने येतात.
 म्हणजे सुविधा मी नाकारत नाही, नाकारायच्या म्हंटल्या तरी ते शक्य नाही, त्यामुळे माझं स्वातंत्र्य मर्यादित झालं आहे, एवढंच मी निदर्शनास आणू इच्छिते.
पुरूष असो वा स्त्री तिला हे मर्यादित स्वातंत्र्यच बहाल झालेलं आहे.
म्हणून मी म्हणते की मला चौकटीतलं स्वातंत्र्य आहे.

आमचं घर काही स्त्री-पुरूष समानतावादी नव्हतं. आमच्या घरात बाबांची हुकूमशाहीच होती, जशी की इतर आजूबाजूच्या घरांमधे होती. बाबा माझ्याबाबतीत वेगळे वागले आणि मीही त्यांना तसं वागायला भाग पाडलं. बाबांना वाटे, मुलींनी शिकावं, धीट असावं, स्वत:च्या जबाबदारीवर कामं (बाहेरची) करावीत, पण हे सारं करून शेवटी पुरूषाच्या आज्ञेत असावं. त्यांच्या बहीणी, त्यांच्या आत्या, त्यांची आई ह्या अशा धीराच्या, हिंमतीच्या बायका होत्या. माझी आत्या, सात महिन्यांची गरोदर बाई, येरगी ते वडगाव, सत्तरएक किलोमीटरचं अंतर घोडीवर बसून आली होती. त्या मुलांच्या शिक्षणासाठी घर करून शहरात राहिल्या. पण त्यांनी कुणीही पुरूषसत्तेला आव्हान दिलं नाही. घरातल्या पुरूषांना समजावून, प्रसंगी विरोधात जावून, कामं केली. तरीही पुरूषांचं वर्चस्व त्यांना मान्य होतं.
 माझ्यात मुलगी/ बाई म्हणून कोणी बरोबरीनं वागलं नाही तर भांडायची खुमखुमी आधीपासूनच होती. माझ्याइतकीच घरातली कामे माझ्या भावाने केली पाहिजेत याबाबत मी आग्रही असे. मुली फारशा इंजिनिअर होत नाहीत, तर तिसरी चौथीतच मी इंजिनीअर व्हायचं ठरवून टाकलेलं. घरात कुणाचा विरोध नव्हता , बाकीच्यांकडे मी लक्ष दिले नाही.
 माझी आई निमूटपणे सगळंच चालवून घेत आली. तिच्या वतीने मी वेळोवेळी भांडत आले. मी FE ला असताना, बाबांचे दोन मित्र सपत्नीक काशी आणि आजूबाजूचं काही असं यात्रा + सहल , जाणार होते. बाबांनी त्यांच्याबरोबर जायचं ठरवलं.
मी म्हणाले, "आईला घेऊन जा."
" तुला इथे एकटीला राहावं लागेल."
" मी राहीन, माझी काळजी करू नका."
मग म्हणाले, " दोघांच्या खर्चाचे पैसे जरा जास्त होताहेत."
" ठीक आहे. कुणा एकट्यालाच जाता येणार असेल तर आईला जाऊ दे, तुम्ही यापूर्वी काशीला गेलेला आहात."
बाबांच्या मित्रांनीही आग्रह केला. शेवटी आई बाबा दोघेही त्या पंधरावीस दिवसांच्या सहलीला गेले.
मी घर सांभाळलं. पुढेही माझ्यावर घर सोडून ते दरवर्षी एका सहलीला जायचे.
आईबाबा घरी नाहीत म्हणजे आम्ही मैत्रिणी धमाल करायचो! मी कॉलेजमधे असायचे तेव्हढा वेळ वगळला तर सतत मैत्रिणी घरात. आमचं घर म्हणजे अड्डाच झालेला असायचा.
मी भांडून, वाद घालून आईबाबांना बदलणं भाग पाडलं. त्यांची मूल्ये बदलली आहेत का? पूर्णपणे नाही. ते माझ्यापुरते आणि माझ्यासाठी बदलले आहेत. (त्यामुळे पुष्कळच उदार झाले आहेत.)
माझ्या जवळच्या माणसांना माझ्यासाठी बदलायला लागतं, माझ्याशी समानतेने वागायला लागतं कारण त्यापेक्षा कमी, मी काही चालवूनच घेत नाही. माझं त्यांना सांगणं असतं, माझ्यानिमित्ताने बदला पण बदला, माझ्यापुरते बदलू नका.

 मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नाही. आर्थिक स्वातंत्र्य ही गाभ्याची गोष्ट असते. ( यावर पूर्वी लिहून झालं आहे.)
शारीरिकदृष्ट्या स्वतंत्र आहे का? नाही,
 म्हणजे वावरण्याचं स्वातंत्र्य यावर अवलंबून असतं.  पण ते मी उपभोगू शकते का? पूर्णपणे नाही.  त्यामुळे समाजाच्या चौकटीत ज्या वेळांमधे , ज्या परिसरात वावरण्याला मान्यता आहे, तिथे मी फिरू शकते. रात्री बेरात्री फिरायला मला मदत लागते.
मानसिकदृष्ट्या/ भावनिकदृष्ट्या  स्वतंत्र आहे का?. पूर्णपणे नाही.
  कठीण परिस्थितीत मला आधार हवा असतो, मी धडपडत स्वत: बाहेर येण्याचा प्रयत्न करते, बरेचदा मला जमतं पण माझी खूप दमछाक होते. मी सावरू शकते, असं वाटतंय, काय सांगावं? मला खात्री नाही.
 लैंगिकदृष्ट्या स्वतंत्र आहे का? नाही.
हो, नाही म्हणता येणं, आपल्या इच्छेचा आदर केला जाणं हे या स्वातंत्र्याचा छोटा हिस्सा आहे.
 इथे एक लक्षात घ्या, ते स्वातंत्र्य उपभोगण्याची माझी इच्छा आहे की नाही हा वेगळा भाग झाला, मुळात मला ते स्वातंत्र्य आहे का? तर नाही. माझ्या शरीरावर माझा अधिकार आहे का? आहे. पण नाहीच अशी माझी समजूत आहे.
वैचारीकदृष्ट्या स्वतंत्र आहे का? नाही.
 मी मघाशी लिहिलंय त्याप्रमाणे आपण आपल्या काळाची अपत्ये असतो. माझ्या घडवण्यात, माझ्या समाजात जो विचार केला जातो, तसाच विचार करायची सवय मला लावली गेली आहे. मी चौकटीची थोडी मोडतोड करते , माझ्या मापाची करू पाहते, बस! तेही पूर्वपिढ्यांनी जो विचार करून ठेवलाय त्या आधारे.
कुठले निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मला आहे? कुठले नाही?
 आर्थिक निर्णय मी घेत नाही कारण ते घेण्याइतकं त्यातलं मला कळत नाही. बाकी घर चालवण्यासाठीचे चौकटीतले निर्णय आम्ही दोघे मिळून घेतो. चौकटीबाहेरचे काही निर्णय घ्यायची (म्हणजे आम्हां दोघांच्य़ चौकटीबाहेरचे) वेळ आली नाही.
 रोजच्या दिवसभराच्या कामात स्वतंत्र आहे का? नाही.
घरातल्या रोजच्या कामासाठी मी मावशींवर अवलंबून असते.

या वरच्या सगळ्या गोष्टींमधे बाई म्हणून माझं काय वेगळेपण आहे, या चौकटी तर पुरूषांनांही आहेतच ना?
हं, माझ्या वावरण्याच्या स्वातंत्र्यावर त्यामुळे बंधने आली आहेत.

माझं काय आणि तुमचं काय चौकटीतलं स्वातंत्र्य आहे. तुम्हांला चौकटींचा काच होतो का? मला होतो.
मला जर असं वाटलं की शहरातल्या सुनसान रस्त्यांवरून मला मध्यरात्री फिरायचं आहे, तर ते शक्य नाही, याचा मला त्रास होतो.

चौकटीतलं स्वातंत्र्य मला आहे का? तर आहे.
कितीकजणींना तेही नसतं.
बायकांना निदान तेव्हढं स्वातंत्र्य मिळावं यासाठी मी आग्रही असते.
पूर्वी या प्रश्नाकडे पाहताना मी, स्वत:चा आणि माझ्या गटातल्या स्त्रियांचाच यात अंतर्भाव करायचे.
आता मला यात वेश्यांचाही अंतर्भाव करता येऊ शकतो आहे.
कुठल्याही स्त्रीकडे पाहताना नेहमीचे पवित्र-अपवित्रतेचे चष्मे मी लावत नाही.
आता समाजात होणारी पुरूषांचीही गोची माझ्या लक्षात येते आहे.

माझ्या नात्यातल्या स्त्रिया, मैत्रिणी, आमच्या कामवाल्या मावशी किंवा इतर माझ्या संपर्कातल्या स्त्रियांशी वागताना मी माझ्याइतकंच स्वातंत्र्य त्यांना आहे, त्यांना ते मिळालं पाहिजे याची काळजी घेते.
लग्नानंतरही मी आमच्या (आईबाबांच्या) घराची सदस्य आहेच, ते घर मी सोडलेले नाही, सर्वार्थांनी, त्याप्रमाणेच माझ्या नणंदांचं संगमनेर हे घरच आहे, त्या आतल्या वर्तूळात आहेत, हे मला मान्यच आहे. आईच्या हक्कांसाठी मी भांडत आले. कायम मी स्त्रियांची बाजू समोर आणत असते त्यामुळे माझ्याशी वागताना समोरच्या व्यक्तीला ते जाणवत असावं. काही वेळा जाणवलं आहे हे कळतं. लग्नाळू मुलामुलींना तर मी सांगतेच.
  स्वातंत्र्य हवं आणि त्याबरोबर येणार्‍या जबाबदार्‍यांचीही जाणीव हवी. तरच तुम्ही भरभरून जगू शकता. घर जर दोघांचं आहे तर हक्क आणि जबाबदार्‍यांचीही वाटणी समसमान हवी.
नुसती आर्थिक जबाबदारी नव्हे. जेव्हा आपण जबाबदारी उचलत असतो, तेव्हाच कर्तव्यपूर्तीचं समाधान मिळू शकतं. आमच्या घरातल्या वाटणीत मी पैसे कमावत नाही, त्याशिवायच्या सगळ्याच जबाबदार्‍या घेऊ शकते, घेते. मिलिन्द पुण्यात नव्हता तेव्हाही मी पूर्ण घर चालवत होतेच. शिवाय त्याच्या आणि माझ्या नातेवाईकांना सांभाळण्याचं काम बर्‍यापैकी माझ्याकडेच आहे. मुक्ता आणि सुहृदच्या शाळेसंबंधातल्या बर्‍याच गोष्टी मी पाहते. मिलिन्दला सांगते, विचारांनी तो सोबत असतोच, मुख्यत: ते मीच पाहते. काही गोष्टी त्याला वेळेमुळे शक्य होत नाहीत. तो माझ्यावर अवलंबून नाही, मीही त्याच्यावर अवलंबून नाही पण सगळ्या वैचारिक बाबींमधे आम्ही एकमेकांबरोबर असतो.
  स्त्रियांच्या स्वातंत्र्याबद्दल मी जागरूक असते एवढेच नाही तर पुरूषांच्या स्वातंत्र्याबद्दलही असते.
सगळ्यात जवळच्या नात्यात म्हणजे नवर्‍याला मी स्वातंत्र्य देते. हे मी त्याच्याकडूनच शिकले हे कबूल करायला हवं. प्रेम म्हणजे हक्क आणि बांधून ठेवणं असाच माझा समज होता. मी हे शिकले की प्रेम म्हणजे हक्क असला तरी बांधून ठेवायचं नाही, तरी त्याने बांधून असायचं.
लग्नाच्या नात्यात आम्ही दोघेही बर्‍यापैकी स्वतंत्र आहोत. यासाठी मी बरीच वर्षे घेतली.

 चौकटीतले स्वातंत्र्य मी भरभरून उपभोगते, माझ्यापुरती चौकट मोडते, मोठी करू पाहते. माझ्यापुरतं काही करायचं हे मला आवडत नाही, पटत नाही. इतर स्त्रीपुरूषांनांही हे काच होऊ नयेत असं मला वाटतं. नुसती मी स्वतंत्र असून उपयोग नाही, समाजाने माझं स्वातंत्र्य स्वीकारायला हवं. इतरांच्या नजरा बदलायचं बळ माझ्यात नाही. ते सगळ्यांनी मिळूनच केलं पाहिजे.
 सगळ्यांनी जबाबदारीसह येणारं स्वातंत्र्य पेललं पाहिजे, आहे ती चौकट मोठी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे आपल्याला फायदा होईलच
आणि
आपल्या मुलींसाठीची वाट आणखी प्रशस्त होऊ शकेल.

Sunday, March 25, 2012

माझे स्वातंत्र्य

माझे स्वातंत्र्य

माझ्या मते स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारीचे भान ठेवून इच्छेप्रमाणे वागण्याची मुभा.

मात्र ही आदर्श व्याख्या झाली. मी स्वतः त्याप्रमाणे वागते का?
तर पूर्णत्वाने नक्कीच नाही. लहानपणापासूनच मला "वडीलधारी मंडळी सांगतील त्याप्रमाणे वागणे योग्य" असेच शिकवले गेले. स्वतःहून निर्णय घेण्याची संधी मला फारशी मिळाली नाही. किंवा मिळालीच तर ती मला पेलता आली नाही. हे सांगताना मला लहानपणीचे काही प्रसंग आठवतात.

तिसरी चौथीच्या सुमारास माझ्या जवळच्या मैत्रिणी नाचाच्या वर्गाला जात. मलाही नाच शिकायची खूप इच्छा होती. मात्र तसा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मला घरून मिळालं नाही. मैत्रिणींनी घरी येऊन आईला गळ घालूनही मला परवानगी मिळाली नाही.

त्यानंतर आठवीच्या सुमारास मला चित्रकलेच्या वर्गांना जायची इच्छा होती. ते शाळा सुटल्यावर उशिरापर्यंत असत. त्यावेळी मी घरी हट्ट करून त्यांना जायला सुरुवात केली. मात्र चित्रकलेमुळे अभ्यासात मागे पडलेले चालणार नाही, पहिल्या पाचात नंबर आला पाहिजे असा सततचा धाक मला काही काळाने असह्य झाला. आणि मी ते वर्ग अर्ध्यावरच सोडून दिले.

दहावीला मला ९०% गुण मिळाले. पण त्यामुळे ताण कमी व्हायच्या ऐवजी वाढलाच. मग बारावीच्या परीक्षेच्या वेळी माझ्याकडून असलेल्या अपेक्षांचे ओझे मला पेलवलेच नाही. आणि त्या परीक्षेत अपेक्षेइतके यश न मिळाल्यावर मला खरं तर हायसंच वाटलं, की आता माझ्यावरील अपेक्षा संपतील. लग्नापर्यंत मला घरून कधीही मुक्कामी सहलीला पाठवले नाही. प्रत्येक वेळी मिळालेला नकार पाहून हळूहळू मला अशीच सवय लागली की कसलाही हट्ट करायचा नाही आणि जे सांगितले जाईल ते विनातक्रार ऐकायचे.

मी घेतलेला पहिला निर्णय म्हणजे नीरज बरोबर लग्नाचा. तो मी कसा घेतला याचं मला अजूनही आश्चर्य वाटतं. कदाचित पहिल्यांदाच मला घराबाहेरील कोणाचे तरी पाठबळ मिळताना दिसले म्हणून असेल. घरातून सुरुवातीला विरोध होऊनही मी निदान घरी इतकं तरी सांगू शकले की मला नीरज बरोबरच लग्न करायचे आहे.

आता मला स्वातंत्र्य असले तरी लहानपणीच्या सवयीमुळे म्हणा किंवा बुजऱ्या स्वभावामुळे म्हणा मी त्याचा पुरेसा उपभोग घेत नाही असे मला वाटते.

>> मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे का?
हो. मी आर्थिकदृष्ट्या नक्कीच स्वतंत्र आहे. लग्नानंतर सुरुवातीला मी कमावत नव्हते तेव्हाही स्वतःच्या इच्छेप्रमाणे खर्च करायची आडकाठी नव्हती. मात्र इतर कोणाला उत्तर द्यावे लागत नसले, तरी मला स्वतःलाच कुठेतरी थोडं अडखळायला होत असे. आता स्वतः कमवायला लागल्यावर (आताही मी ऑफिसमध्ये केलेल्या कामाचा मोबदला म्हणून पगार घेते) तोही प्रश्न उरला नाही.

>> शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या स्वतंत्र आहे का?
माझ्यावर शारीरिक किंवा मानसिक बंधने आहेत असे नाही, मात्र माझ्या स्वभावानुसार कुठेतरी मला शारीरिक आणि मानसिक आधार घ्यायची सवय झाली आहे. ही सवय दूर व्हावी अशी माझी इच्छा आहे, मात्र त्यादृष्टीने पुरेसे प्रयत्न माझ्याकडून होत नाहीत, किंवा खरंतर त्यासाठी लागणारे धैर्य मला गोळा करता येत नाही.

>> वैचारिकदृष्ट्या स्वतंत्र आहे का?
हो. नक्कीच. मात्र माझा स्वभावच वैचारिक बंडखोरी करण्याचा नसल्याने या स्वातंत्र्याचा कस लागण्याची वेळ माझ्यावर फारशी आलेली नाही.

>> लैंगिकदृष्ट्या स्वतंत्र आहे का?
हो. नक्कीच. याबाबतीत माझ्या निर्णयाचा पूर्ण आदर राखला जातो.

>> रोजच्या दिवसभराच्या कामात स्वतंत्र आहे का?
रोजच्या दिवसभराच्या कामात मी बरीचशी स्वतंत्र असले, तरी पूर्ण नाही. काही कामांसाठी (विशेषतः घराबाहेरील) मी अवलंबून असते. या बाबतीत मी प्रयत्नपूर्वक स्वावलंबी बनण्याची गरज आहे.

>> कुठले निर्णय घेण्याचं स्वतंत्र्य मला आहे? कुठले नाही?
आता सर्वच प्रकारचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मला आहे. स्वातंत्र्य नाही असा अमुक एक निर्णय डोळ्यांसमोर येत नाही. अर्थात काही निर्णय कुटुंबातील व्यक्तींचे मिळून असतात, पण त्या निर्णयातही माझा पुरेसा सहभाग असतो.
आदित्यला आम्ही लहानपणापासूनच स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास प्रोत्साहन देत आलो आहोत. तो ज्या आत्मविश्वासाने निर्णय घेतो ते पाहून मला आनंद होतो.

>> एक बाई म्हणून मी स्वतंत्र आहे का?
अर्थात आपल्या समाजात वावरताना बाई म्हणून विशिष्ट अपेक्षा आणि मर्यादा येतातच, आणि त्याचा त्रासही होतोच. पण या बाबतीत लहानपणापासून बिंबवलेले असल्याने कुठेतरी त्याबद्दल स्वीकारलेपण आले आहे.

Sunday, March 18, 2012

एक व्यक्ती म्हणून कळत्या समजत्या वयात मला स्वातंत्र्य होतं का ?

माझे आई वडिल म्हणजे मागची पिढी. त्यामुळे सामाजिक, कौटुंबिक दबाव/दडपण या वातावरणातले. पण मुलगी म्हणून भेदभाव, बंधनं, एक स्त्री म्हणून समाजाकडून ठरवलेले नियम लादणं असं कधीच झालं नाही.

लग्न करताना स्थळ निवडीचं स्वातंत्र्य होतं. कशापध्दतीने त्याच्या कडे बघ असं मार्गदर्शन नक्कीच होतं. पण अंतीम निर्णय माझा होता.
लग्ना नंतर परक्या घरात येणं, तेथील रितीरिवाज समजून घेणं, त्याची माझ्या विचारंशी सांगड घालणंही माझी जबाबदारी होती. सुरुवातीला दडपण होतच. सासूबाईंनी एक व्यक्ती म्हणून मला खूप आदराने वागवलं. मंगळसूत्र, बांगड्या घाल्याव्या, कुंकू लावाव ह्या त्यांच्या अपेक्षा होत्याच. पण मग मी त्याकडे माफक अपेक्षा म्हणून बघितलं. कारण त्याबाबत कधीच आग्रह नव्हता.

सणवार, देवपूजा, धार्मिक कार्यक्रम, ह्याबाबत माझं काय मत आहे ते मांडण्याच आणि अवलंबण्याच स्वातंत्र्य मला आहे. ह्याबाबत आनंदबरोबर काही बाबतीत मतभेद आहेत. पण त्याच दडपण कधीच नाही.

मी आर्थिकद्रुष्ट्या स्वतंत्र आहे का ?

ह्याचा दोन पध्दतीने विचार केला.
१. मी स्वत: कमवून पूर्णपणे माझे खर्च, माझं घर चालवू शकते का ? तर नाही
२. आमच्या दोघांच्या उत्पन्नातून होणारे खर्च मी मला हवे तेव्हा हवे तसे करु शकते का ? हो.
घरातील कोणतेही मोठे आर्थिक निर्णय आम्ही दोघे मिळून घेतो.

लैंगिकद्रुष्ट्या मला हो / नाही म्हणण्याच स्वातंत्र्य आहे का ?
हो नक्कीच.

एकंदरीत सर्व पातळ्यांवर एक स्त्री म्हणून मला माझ्याशी निगडीत सर्व लोकांकडून स्वातंत्र्य आहे.

हे स्वातंत्र्य मी एक व्यक्ती म्हणून प्रत्येक ठिकाणी पेलू शकते का ?
घरातील कोणतेही मोठे निर्णय घेताना, कोणत्यानी मानसिक ताणाचा विचार करताना, भविष्यातील काही प्रकर्षाने जाणवणार्या चिंतांचा विचार करताना (तब्येत) मी कमकुवत होते. आणि मग एकट्य़ाने निभावणे, खंबीरपणे त्याकडे बघणे ह्याबाबत मी जवळच्या व्यक्तिचा आधार शोधते.
हे स्वातंत्र्याच्या व्याख्येत बसते का ? मला माहीत नाही.

माझ्याकडे काम करणार्या बाईंशी मी स्त्री म्हणून कशी बघते / वागते ?

कधीही रजा घेताना त्यांनी विचारल्यास नाही म्हणत नाही. (गावी जाणार असल्यास अजून एक दिवस जरुर घ्या असे सुचवते)
न सांगता सुट्टी झाल्यास फक्त कारण विचारते. (इथे आपणही कधीतरी कंटाळा आला म्हणून कामावर काहीतरी सबब सांगून सुट्टी घेतॊ हा विचार करते)
त्यांची तब्येत बरी नसल्यास त्यांना मदत करते किंवा एखाद काम राहू देण्यास सांगते.
एखाद्या मोठ्या सणावाराला जसे दिवाळी, दसरा, पाडवा इ. दिवशी सुट्टी घ्या असे सुचवते.

स्वातंत्र्याची नक्की व्याख्या काय ?

सामाजिक पातळीवर विचार केला तर ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही बर्याचश्या स्त्रीयांना स्वातंत्र्याची व्याख्या काय आहे ह्याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे खूप गोष्टी ह्या प्रथा, पध्दत, संस्कार ह्या शब्दांमधे पाळल्या जातात. आणि मग पुढे हीच स्त्री आपल्या मुलीला तू मुलगी म्हणून कशी वाग असे सांगते. आणि तेव्हाच तिच्या बाबतीतला स्वातंत्र्याचा कप्पा बंद होतो.

वैयक्तिक पातळीवर आपण त्याकडे कसे बघतो हे महत्वाचं वाटतं.
मी एक स्त्री म्हणून माझं आयुष्य समाधानानं जगत आहे. माझ्यातील मुलगी, बहीण, बायको, आई ही सर्व नाती मला खूप बळ देतात.

Friday, March 16, 2012

स्वातंत्र्याचे भान

स्वातंत्र्य म्हणजे स्वत:च्या मताप्रमाणे निर्णय घेता येणे, स्वत:ला पटेल तसे/रुचेल तसे वागता येणे, जगता येणे!
हा खूप ढोबळ अर्थ झाला. म्हणजे असा आधिकार प्रत्येकाला असायलाच हवा; पण कायमच आपल्याला हवे तसे वागता येते का? समाजात वावरतानाही आपल्याला आवश्यक ते कायदे/नियम पाळावेच लागतात. आपल्या व्यक्‍तिगत आयुष्यात बरेचसे महत्त्वाचे निर्णय घेताना (शिक्षण, नोकरी/करिअर, लग्न वगैरे) स्वजनांचा आपल्यावर प्रभाव असतो; काही वेळा परिस्थितीचा विचारही करावा लागतो.
‘हे माझे आयुष्य आहे, त्याची जबाबदारी माझीच आहे. त्यामुळे त्याबाबत अंतिम निर्णय मलाच घेता यायला हवा आणि त्यातून काही चुका झाल्याच तर त्याच्या परिणामांची जबाबदारीही सर्वस्वी माझीच असेल’ ही मानसिकता असणे जरुरीचे वाटते. ही मानसिकता विकसित होण्यात आपल्या जडण-घडणीचा महत्त्वाचा वाटा तर असतोच पण काही बदल जाणीवपूर्वकही घडवून आणावे लागतात.
--------------------

आपण वाढत असताना घरातील वातावरणाचा, घरातील लोकांच्या विचारांचा आपल्यावर खूप प्रभाव असतो. माझ्या बाबतीत मी जशी घडले त्यात प्रामुख्याने माझ्या आईचा तसेच माझे काका व मोठा चुलतभाऊ(दादा) यांचा महत्त्वाचा वाटा आहे. वडिलांच्या अकाली निधनानंतर कुटुंबाची परिस्थिती बिकट झाली होती. मी ७ वर्षांची आणि माझा भाऊ ४ वर्षांचा. वडिलांची नोकरी खाजगी असल्यामुळे पेन्शन, फ़ंड वगैरेचाही काही आधार नव्हता. त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे आमचाच वाडा असल्यामुळे राहण्याच्या जागेचा काही प्रश्न नव्हता. फ़क्‍त येणार्‍या तुट्पुंज्या भाड्यातून आमचे भागणार नव्हते. आईचे तेव्हाचे शिक्षण चांगल्या नोकरीसाठी अपुरे होते. अशावेळी मोठ्या मावशीने आम्हाला सांभाळायची/आमचा खर्च उचलायची तयारी दाखविली. पण आईने ठाम नकार दिला. तिने स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा निर्णय घेतला. माझ्या काकांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आणि मार्गदर्शनही केले. आईने बालवाडी पासून सुरुवात करून प्राथमिक शिक्षिकेच्या पदासाठी आवश्यक ते अभ्यासक्रम पूर्ण केले. अर्थाजनासाठी त्या काळात पाळणाघरही चालविले. सकाळची शाळा असल्यामुळे तिला सकाळी लवकरच घराबाहेर पडावे लागे. माझी शाळा दुपारची असल्यामुळे मी नंतर माझे आवरून, जेवून, घर व्यवस्थित बंद करून बाहेर पडायचे. स्वावलंबनाचा पाया तेव्हाच तयार झाला. आई आमच्यावर घरातल्या/बाहेरच्या छोट्या छोट्या जबाबदार्‍या सोपवायची. कधी काही चुकले तरी तिने आमच्या क्षमतेबद्द्ल कधीच अविश्वास दाखविला नाही. त्यामुळे आमचा आत्मविश्वासही वाढला आणि जबाबदारी घ्यायची सवयही लागली. आयुष्यात कठीण प्रसंग आला/मोठे संकट कोसळले तरी तुमची मानसिक तयारी असेल तर तुम्ही स्वत:च्या हिमतीवर खंबीरपणे त्यावर मात करू शकता याचे उदाहरणच तिने आमच्यापुढे ठेवले.

प्रतिकूल परिस्थितीत खचून न जाता तिच्याशी झुंजण्याची मानसिक क्षमता माझ्यातही आहे याची मला खात्री आहे.
--------------------

कुटुंबप्रमुख(कर्ता), आई, शिक्षिका अशा सर्वच जबाबादार्‍या आई निभावत होती. मी जशी मोठी होत गेले तशी याची जाणीव मला प्रकर्षाने होऊ लागली. त्यामुळेच दहावी नंतर पुढचे शिक्षण असेच घ्यायचे जे मला लवकरात लवकर माझ्या पायावर उभे करेल आणि मीही घराची जबाबदारी उचलू शकेन असा निर्णय मी घेतला. सर्व बाजूने विचार करून मी पाच वर्षे शिक्षण पूर्ण व्हायची वाट बघण्याऐवजी तीन वर्षांची अभियांत्रिकी पदविका करायचे ठरविले.

कोठलेही शारीरिक कष्ट करण्याची/निभावून नेण्याची जी मानसिक क्षमता माझ्यात तयार झाली आहे तिचा यांत्रिक शाखेची पदविका करताना मला खूप उपयोग झाला. तासन्‍ तास उभे राहून यंत्रांवर काम करताना जेव्हा इतर मुलींना सरांची किंवा इतर मुलांची मदत घ्यायला लागायची तेव्हा मी मात्र स्वतंत्रपणे माझे प्रकल्प पूर्ण करू शकत होते.

पदविका पूर्ण केल्यावर लगेच नोकरी स्वीकारली. नोकरीसाठी मला भोसरीला जावे लागे. सकाळी ६:३०-७:०० वाजता बाहेर पडलेली मी रात्री १०:०० च्या सुमारास A.M.I.E. चे वर्ग करून घरी यायचे. काही प्रमाणात दगदग/धावपळ होत असली तरी मानसिक आनंद खूप होता. घराची आर्थिक जबाबदारी उचलू शकते याचे समाधान होते. या काळात मला जे काही बरे/वाईट अनुभव आले (नोकरीत/प्रवास करताना) त्यातून मी बरेच काही शिकले. बाहेरच्या जगात एक स्वतंत्र व्यक्‍ती म्हणून मी वावरू शकते हा आत्मविश्वास निर्माण झाला.

मी आर्थिकदृष्ट्याही स्वतंत्र होते/आहे म्हणजे फ़क्त अर्थार्जन करण्याची क्षमता आहे म्हणून नाही; तर घरात येणार्‍या पैशांचा विनियोग कसा करायचा हे ठरविण्याचे स्वातंत्र्य मला तेव्हा होते आणि अजूनही आहे. घरासाठी/कुटुंबासाठी काही मोठे खर्च असतील किंवा मोठी गुंतवणूक करायची असेल तेव्हा सचिन आणि मी मिळून निर्णय घेतो.

नोकरी करण्याचा निर्णय जसा मी घेतला होता तसा नोकरी सोडण्याचा निर्णयही माझाच होता. म्हणजे सचिन आणि मी याबाबत विचारविनिमय जरूर केला होता. पण नोकरी सोडून घरुन करता येईल असा व्यवसाय करायचा हा अंतिम निर्णय माझाच होता.
--------------------

मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना दादाचे लग्न झाले. शुभांगी बॅंकेत नोकरी करत होतीच पण त्याबरोबर ती काही सामाजिक संघटनांबरोबर काम ही करत असे. तिच्याबरोबर मीही कार्यक्रमात सहभागी होऊ लागले. खेड्या-खेड्यांमधे जाऊन तेथील मुली/स्त्रियांना भेटून आरोग्याविषयी माहिती देणे, स्त्री शिक्षण, वेश्यांच्या मुलांचे पुनर्वसन, व्यसनमुक्‍ति, पर्यावरण विषयक जागृती अशा विविध समस्यांवर/विषयांवर शिबिरे असत. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या विचारांचे लोक भेटू लागले, त्यांच्याकडून वेगळे अनुभव ऐकता आले. तोपर्यंत, मी, माझे घर आणि माझी नोकरी एवढ्यापर्यंतच माझे जग सीमित होते. आता माझ्या जाणिवेच्या कक्षा रुंदावल्या. मला सामाजिक जबाबदारीचेही भान आले आणि इतर स्तरातील स्त्रियांचे प्रश्न मनाला भिडू लागले.
--------------------

सचिनने जेव्हा मला लग्नासाठी विचारले तेव्हा माझी लग्नासाठी मानसिक तयारी झाली नव्हती. त्यावेळेस मी पूर्णपणेच घराची जबाबदारी घेतली होती. भावाचे शिक्षण अजून चालू होते. सचिन म्हणाला मी थांबेन. पण हेच कारण असेल तर लग्नानंतरही यात काही फ़रक पडणार नाही. तू तुझी जबाबदारी निभावलीच पाहिजे; त्यात मी पण तुला साथ देईन.
दोन वर्षांनंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. आम्हाला दोघांना नोंदणी पध्दतीनेच लग्न करायचे होते आणि लग्नाचा पूर्ण खर्च आम्ही दोघांनीच करायचा असे ठरवले होते. नोंदणी पध्दतीला सचिनकडच्या काही जवळच्या नातेवाईकांचा विरोध होता. आमच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा निर्णय होता आणि आमच्या मूल्यांबद्द्ल आम्ही ठाम होतो. त्यामुळे सचिनच्या आई-बाबांनीही आम्हाला पाठिंबा दिला. काही नाती दुरावली. ती नाती टिकवण्यासाठी आम्ही तडजोड केली असती तर आयुष्यभर आम्हाला ते डाचत राहिले असते.

लग्नानंतरही वेगवेगळ्या धार्मिक पूजा, व्रत-वैकल्ये, घरी आलेल्या सुवासिनींना कुंकु लावणे अशा प्रथांमधे मी कधी सहभागी झाले नाही/होत नाही. सासरच्यांनीही माझ्या मूल्यांचा आदर केला आणि त्यांची मते लादण्याचा प्रयत्न कधी केला नाही.

आजी-आजोबांच्या हौसेसाठी म्हणून आम्हीही काही गोष्टी स्वीकारल्या उदा. गौतमीचे बारसे मोठ्या स्वरुपात साजरे करणे, वर्षातून एकदा कुलदेवतेच्या दर्शनासाठी एकत्र जाणे वगैरे. पण कोठल्या बाबतीत तडजोड करायची आणि कोणत्या बाबतीत नाही याच्या कल्पना सुस्पष्ट आहेत.
-----------------------

कॉलेजमधे असताना मी एका मैत्रिणींच्या घरी गेले होते. तिची आई पोळ्या करत होती. त्यांच्या पोळ्या झाल्यावर त्या मैत्रिणीला म्हणाल्या की तुझ्यासाठी ४ गोळे ठेवले आहेत लाटायला. मला विचारले तुला येतात का पोळ्या करायला? मुलीच्या जातीला स्वयंपाक आला पाहिजे.
आईला एखादी भाजी चिरून देणे, कधी चहा करणे, ताट-पाणी घेणे याउपर माझी स्वयंपाकघरात काही मदत होत नसे आणि ही कामे तर माझा दादाही करत असे. मुलगी म्हणून मला कधी वेगळे वाढविले गेले नाही. मला दादा म्हणायचा तुला जे आवडते ते जरूर कर; पण मुलीच्या जातीला आले पाहिजे म्हणून अजिबात नको.

लग्न झाल्यावरही माझे हे स्वातंत्र्य अबाधित राहिले आहे. मला स्वयंपाक येत नाही / स्वयंपाकात फ़ारसा रस नाही हे माझ्या सासरी खूप छान स्वीकारले गेले, त्याचा कधीच बाऊ केला गेला नाही. कारण स्वयंपाक / संसार ही केवळ स्त्रीची जबाबदारी नाही हा विचार माझ्या माहेरी आणि सासरी, दोन्ही घरी सर्वमान्य आहे.
-------------------------

माझ्या स्वत:शी निगडित असलेले सर्व निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मी घेते.
सहजीवनाशी संबाधित निर्णय सचिन आणि मी मिळून घेतो. कुटुंबनियोजनाशी निगडित निर्णयांचे मला स्वातंत्र्य होते आणि आहे. लैंगिक संबंधातही माझ्या मन:स्थितीचा / इच्छेचा आदर राखला जातो.
गौतमीशी संबधित निर्णय आम्ही तिघे मिळून घेतो. गौतमीलाही तिची मते मांडण्याचे घरात पूर्ण स्वातंत्र्य आहे.
-----------------------

इतर स्त्रियांचे स्वातंत्र्य:

सासूबाई, माझी धाकटी जाऊ आरती आणि मी, आम्ही तिघी वेगळ्या वातावरणात, वेगवेगळ्या परिस्थितीत वाढलो त्यामुळे आमची व्यक्‍तिमत्त्वही वेगळी आहेत. पण आम्ही एकमेकींचे मतस्वातंत्र्य/विचार/मूल्य यांचा नेहमीच आदर करतो.

माझ्या सासूबाई गृहिणी आहेत. त्या घरातील इतर मंडळींची दिनचर्या/त्यांच्या वेळा सांभाळून त्याप्रमाणे स्वत:चा दिनक्रम ठरवित असत. त्यांच्याशी बोलणे करून ही जाणीव करून द्यायला लागली की तुम्ही तुमच्यासाठी स्वतंत्र वेळ राखून ठेवलाच पाहिजे आणि त्या वेळेचा विनियोगही तुम्हाला हवा तसा करायला हवा. आता ते त्यांना जमायला लागले आहे आणि आम्ही घरातील सर्व सदस्यही त्यांना तो वेळ मिळाला पाहिजे याकडे लक्ष देतो.

आमच्याकडे घरकाम करण्यासाठी येणार्‍या स्त्रिया बर्‍याच वर्षांपासून आमच्याकडे काम करत असल्यामुळे आमच्या घरच्या सदस्यांसारख्याच आहेत. त्यांच्या अडी-अडचणींबाबत त्या माझ्याशी मोकळेपणाने बोलतात. अगदी घरातल्यांबद्लच्या तक्रारीही सांगतात. मीही वेळोवेळी त्यांच्या स्वातंत्र्याची / हक्कांची जाणीव करून द्यायचा प्रयत्न करत असते.
माझ्याकडे वरकाम करायला स्वाती येते (वय १८-१९ वर्षे). आई जाऊन ५-६ वर्ष झाली आहेत. घरी तिच्यापेक्षा लहान दोन भाऊ आणि वडिल. वडिल दारूच्या नशेत नसतील तर रोजंदारीवर काहीबाही काम करतात. त्यामुळे स्वातीला मिळणारे पैसे घरातच खर्च होतात आणि उरलेच तर वडिलांच्या दारूत. मी तिला बचतखाते उघडण्याचा सल्ला दिला. आता दर महिन्याला तिच्या पगारातील काही भाग ती बँकेत टाकते. तिचे १०वी पर्यंत शिक्षण झाले आहे. पदवीपर्यंत शिकायची इच्छा होती पण आता जमतच नाहीये असे तिने मला सांगितले. आम्ही तिला सुचविले की ’तू बारावीचा अर्ज भर आणि आमच्याकडे काम करतेस तो वेळही अभ्यासाला वापर. पण शिक्षण पूर्ण करच.’ अजून काही तिने अर्ज भरला नाहीये. जाणीव करून देणे माझ्या हातात आहे, पण तो निर्णय घेण्याचा हक्क तर तिचाच ना!

नोकरी करत असताना माझ्या कनिष्ठ स्त्री सहकार्‍यांना आवश्यक तेव्हा रजा संमत करणे, लवकर जायची किंवा उशिरा येण्याची मुभा देणे इतपत अधिकार माझ्याकडे होता आणि मी त्याचा योग्य वापर करत असे. त्यांच्या अडचणींवर मी नक्कीच विचार करायचे. त्यांचे मत/विचार लक्षात घ्यायचे. समस्या निवारण्याचा थेट हक्क मला नसला तरी त्या व्यवस्थापन मंडळासमोर मांडून त्यावर तोडगा काढला जाईल हा प्रयत्न मी जरूर करत असे.
-----------------------

एक स्वतंत्र व्यक्‍ती म्हणून मी आयुष्य भरभरून जगते आहेच. स्वत:साठी वेळ देऊ शकते, आवडी/छंद जोपासू शकते. मला योग्य वाटतील ते निर्णय घेते. नवीन जबाबदार्‍या घेते. घेतलेल्या जबाबदार्‍या पूर्ण करायचा प्रयत्न करते, खूप वेगवेगळे अनुभव घेत आहे. कधी चुकतेही आहे आणि त्यातून काही नवीन शिकतेही आहे, त्याप्रमाणे स्वत:त बदल पण करत आहे. अशा प्रत्येकवेळी मी स्वत:ला नव्यानेच भेटल्यासारखी वाटते.

Sunday, March 11, 2012

स्वतंत्र / परतंत्र

स्वातंत्र्य म्हणजे स्व तंत्राने वागणे. स्वतःच्या विचारांप्रमाणे / स्वतःला पटलेल्या विचारांप्रमाणे वागणे आणि त्याचवेळी आपल्या स्वतंत्र वागण्यामुळे दुसर्‍याच्या स्वातंत्र्याची आपण गळचेपी करत नाही ना याचे भान ठेवणे. विद्याने लिहिलंय ते खरंच आहे - आपण समाजाच्या अशा गटाचं प्रतिनिधित्व करतो, ज्यातल्या स्त्रीला स्वातंत्र्याचे सर्वाधिक फायदे मिळालेले आहेत. प्रश्न आहे, त्या स्वातंत्र्याचे मला भान आहे का?
आपल्याला घडवण्यात आई-वडिलांचा, घराचा वाटा मोठा असतो. माझ्याबाबतीतही तो नक्कीच आहे. आमच्या घरी मुलींसाठीची वेगळी आचारसंहिता कधी नव्हती. खेडेगावात रहाताना माझ्याच वयाच्या इतर मुलींना नाकारल्या जाणार्‍या कित्येक गोष्टी आपल्याला सहजच आणि आपला हक्क म्हणूनही मिळतात हे मी पहात आले. आधी आमच्या शिक्षणासाठी आणि नंतर नोकरीच्या निमित्ताने आई आम्हाला घेऊन पंढरपूरला, पळसदेवला राहिली. बाबा गावाकडची शेती बघत आणि येऊनजाऊन आमच्याजवळ रहात. आई आम्हाला घेऊन पळसदेवला रहाते याबद्दल आमच्या कुटुंबियांमधे तिचं कौतुक होतं. ते का होतं ते आत्ता कळतं. नोकरी करत आई दोन लहान मुलं आणि घर सांभाळत होती. शेतीचं उत्पन्न तसं बेभरवशी असल्याने घराची आर्थिक बाजू बर्‍यापैकी तीच सांभाळत होती. तिच्या स्वभावात बंडखोरी नाही पण ती कोणत्याही प्रसंगी मोडून न जाता निश्चयाने आणि ताठपणे आपल्या जागेवर पाय रोवून उभी रहाते. तिचा हा गुण माझ्यात थोडाफार आला आहे. आपल्या प्रत्येक कृतीसाठी स्वतःला प्रश्न विचारणं, आपली कृती आपल्या विचारांशी सुसंगत आहे का ते तपासणं, स्वतंत्र विचार करणं, आपल्या विचारांशी प्रामाणिक आणि ठाम रहाणं, गरज असेल तेव्हा आपल्या न्याय्य हक्कांसाठी भांडणं या गोष्टी बाबांकडून माझ्याकडे थोड्याफ़ार आल्या आहेत. बाबांशी कित्येक गोष्टींवरून माझे वादही होत. पण ’तुला काय कळतंय, गप्प बस’ अशी भाषा त्यांनी कधीही वापरलेली नाही. आईबाबांनी लहानपणापासून आमच्यावर छोट्याछोट्या जबाबदार्‍या टाकल्या, आम्हाला चुकू दिलं, धडपडू दिलं, आम्ही त्या जबाबदार्‍या पार पाडू असा विश्वास आमच्यावर दाखवला. अकरावीत मी पुण्यात आले आणि MSc पर्यंत होस्टेलवर राहिले. होस्टेलवर रहिलं ना, की आपण वेगळेच बनून जातो. घर लांब राहिलेलं असतं. सारखा हात देणारं कोणी नसतं. आपण कितीतरी गोष्टी शिकत जातो. जबाबदारीचं भान येतं. घराची किंमत कळते. वाटेत येणार्‍या छोट्यामोठ्या अडचणींचा बाऊ वाटेनासा होतो. शिक्षण संपल्यावर नोकरीच्या निमित्तानेही एकटं रहाण्याची माझ्यावर वेळ आली, तेव्हा मला त्याचं फारसं काही वाटलं नाही. आईबाबांनीही माझी एकटं रहाण्याची तयारी आहे हे पाहिल्यावर मला दौंडला खोली बघून दिली. नंतर माझ्या लक्षात आलं की मी एकटी खोली घेऊन रहाते, ही माझ्या सहकारी मैत्रिणींच्या मते फारच धाडसाची गोष्ट होती. त्यांच्या घरून असं एकटं रहायला कधीच परवानगी मिळाली नसती. मलाही, आईबाबांनी परवानगी दिलेली नव्हती. मी एकटं रहाण्याचा निर्णय घेतला होता, त्याला त्यांची सहमती होती. आणि ती माझ्या दृष्टीने महत्वाचीही होती.
घरात लग्नाची बोलणी सुरू झाली तेव्हा मी फोटो काढून घेणार नाही, मुलाला भेटायला जाताना साडी नेसणार नाही, मुलाच्या आईवडिलांना वाकून नमस्कार करणार नाही वगैरे बर्‍याच गोष्टींवरून मी तावातावाने बोलायचे. आई मला समजावू पहायची आणि बाबा म्हणायचे - तिचे विचार चुकीचे नाहीत, करूदे तिला तिच्या मनासारखं! मुलाला भेटून आल्यावर माझा नकार असेल तर ते लगेचच त्यांना पत्र लिहून मोकळे होत. जे मध्यस्थ असत ते मुलाकडचे काय म्हणताहेत ते बघा मग निर्णय घ्या, चांगलं स्थळ आहे, सोडू नका, वगैरे सल्ला देत. आईबाबा मात्र माझं मत अंतिम मानत. मला लग्न कधी करायचंय, कोणाशी करायचंय हे ठरवण्याची पूर्ण मोकळीक होती. लग्नाच्या विधींबाबतही माझी वेगळी मतं होती, मी ती लावून धरली असती तर बाबाही माझ्यामागे ठाम उभे राहिले असते नक्कीच.
लग्नानंतर चित्र थोडंसं बदललं. काही गोष्टी तर पार उलट्यापालट्याच झाल्या. काही वाटा या आपल्यासाठी नाहीत हे माझ्यापुरतं पक्कं होतं पण सुरुवातीला त्या वाटांवरून चालावं लागलं. आपण स्वतःविरुद्ध वागतोय हे कळत असतानाही तडजोड म्हणून, कोणाला दुखवू नये म्हणून मी त्या वाटांवरून चालले. पण त्याचा जीवघेणा मनस्ताप होतो आहे हे कळल्यावर निग्रहाने त्या वाटा स्वतःसाठी बंद केल्या. माणसं तेवढ्यापुरती थोडी दुखावली गेली तरी चालतील पण भलत्या तडजोडी करायच्या नाहीत हे पक्कं ठरवलं. आता काही गोष्टींना मी ठाम नकार देते हे लक्षात आल्यावर माझ्याकडून त्या गोष्टींची अपेक्षा केली जात नाही हा एक चांगला बदल घरात झाला आहे. त्याहूनही सुखाची गोष्ट ही की असं करताना मी माझी मानलेली माणसं माझ्यापासून दुरावली गेलेली नाहीत. काहीकाही बाबतीत जगदीशची आणि माझी मतेही एकमेकांना पूर्ण छेद देणारीच आहेत. त्यावरून खणखणाटही होतात :) पण (इतक्या वर्षांनंतर) समोरच्याने आपल्या मताप्रमाणे वागावे ही अपेक्षा चुकीची आहे हे दोघांनाही समजते आहे! आम्ही दोघेही आपली मते दुसर्‍यावर लादली जाणार नाहीत असा प्रयत्न करत असतो.
आर्थिक/ शारीरिक/लैंगिक /भावनिक /निर्णय स्वातंत्र्य:.
घरात मला आर्थिक स्वातंत्र्य अर्थातच आहे. मुळात माझा स्वभाव खर्चिक नाही. मी स्वतःसाठीचे आणि घरासाठीचे खर्च जबाबदारीनेच करते आणि जगदीशलाही त्याची जाणीव आहे. कर्ज, गुंतवणूक, मोठे खर्च यासारखे निर्णय दोघांच्या विचारांनी घेतले जातात. कोणी कोणाला गृहित धरत नाही, ही माझ्या दृष्टीनं पुरेसं आहे. शारीरिकदृष्ट्या मी स्वतंत्र आहे का? बर्‍याच प्रमाणात आहे. बरेचदा कसं होतं, की आपला निश्चयच कमी पडत असतो. निश्चय पक्का असला की शारीरिक बळ थोडं कमी असलं, तरी फारसं अडत नाही. आपण ताकदीची कामंही निभावून नेऊ शकतो. कोणी मदत करेपर्यंत अडून राहावं लागत नाही. कपडे, दागिने अशा बाबतीत जगदीशची आणि त्याच्या आईबाबांची मते थोडी पारंपारीक आहेत. माझ्या आईबाबांचीही तशीच आहेत. पण माझ्या आवडीचं स्वातंत्र्य मला आहे. कुंकू, मंगळसूत्र वगैरे मला आवश्यक वाटत नाहीत. बाकीच्यांना मात्र ते अत्यावश्यकच वाटतं. तिथे मात्र माझा नाईलाज होतो. त्यांचा मान म्हणून मी ते चालवून घेते. लैंगिक? हो. नाही म्हणण्याचा अधिकार मला आहे आणि त्याबाबतीत एकमेकांच्या इच्छांचा विचार आणि आदर दोन्हीकडून नक्कीच केला जातो. भावनिकदृष्ट्या? स्वतःच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य मी बरेचदा घेत नाही. समोरच्या व्यक्तीचा विचार जास्त करते. किंवा माझ्या भावना समजून घेतल्या जातील अशा ठिकाणीच त्या व्यक्त करते. माझ्या अगदी जवळच्या व्यक्तींशी मी मोकळेपणाने माझ्या भावना व्यक्त करते. जवळच्या व्यक्तींवर मी भावनिकदृष्ट्याही अवलंबून असते. त्यांच्याकडून मिळणारा भावनिक आधार मला मोलाचा वाटतो. फ़क्त स्वतःच्या बळावर भावनिकदृष्ट्या खंबीर रहाणं मला बहुदा नाही जमणार. निर्णयस्वातंत्र्याच्या बाबतीत: एखाद्या प्रश्नावर घरातल्या सर्वांनी मत देणं, आपापले विचार मांडणं ही ठीकच आहे. पण अंतिम निर्णय मात्र त्या त्या संबंधित व्यक्तीला कसल्याही दबावाशिवाय घेता यायला हवा. आणि त्या व्यक्तीच्या निर्णयाचा बाकीच्यांनी आदरही करायला हवा. घरातल्या लहान मुलांनाही आपापले निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य असायला हवं. माझ्या स्वतःच्या बाबतीतले निर्णय मला स्वतः घेता यावेत यासाठी मी आग्रही असते.ते स्वातंत्र्य मला दरवेळी सहजच मिळत नाही. कधीकधी ते मिळवायसाठी थोडे प्रयत्न करावे लागतात.त्याला माझी तयारी असते.
मी परीपूर्ण/ भरभरून जगते का? तसं जगताना बाई म्हणून मी स्वतंत्र आहे का?
माझ्या आवडीच्या गोष्टींसाठी मी आवर्जून वेळ काढते. त्यात मला कोणाची सोबत असली तर छानच वाटतं, पण नसली तरी फारसं काही बिघडत नाही. एकटेपणीही त्या गोष्टी मला भरभरून आनंद देतात.
काहीवेळा माझ्या छंदांना मला इतर जबाबदार्‍यांमुळे बाजूला सारावंही लागतं, पण त्याची खंत नाही वाटत.
इतरांचं स्वातंत्र्य:
माझ्याकडे पोळ्या, केर, फरशी, भांडी वगैरे करायला येणारी संगीता गेली पाचसात वषे माझ्याकडे येते आहे. तिलाही माझ्या मुलांच्याच वयाची मुले आहेत, त्यांच्या शाळेच्या वेळा, नवर्‍याचं दारू पिणं, त्याचं अधून्मधून बेकार असणं हे सगळं सांभाळून ती कामं करते. तिचं घर एकटीच्या जिवावर चालवते. पण तिला आठवड्याची हक्काची सुट्टी नसते.हक्काच्या रजा नसतात. तिच्या इतर रजांबद्दल मी कधी तिला बोलत नाही पण तिला आठवड्याला एक दिवसाची सुट्टी देणं मला अजून जमलेलं नाही.त्यातल्या त्यात पळवाट म्हणून पोळ्यांना रविवारी सुट्टी दिली आहे, पण पूर्ण सुट्टी हा खरंतर तिचा हक्क आहे. ती तो मागत नाही, मी तो तिला देत नाही. तिला आपल्याकडून अनादराने वागवलं जाणार नाही याची काळजी मात्र मी घेते.
माझ्या कुटुंबातल्या बायकांच्या समानतेच्या हक्कांबाबत, त्यांच्या मतस्वातंत्राबाबत, मात्र मी नेहेमी जागरूक असते. त्यासाठी घरातल्या मोठ्यांना त्यांची बाजू समजावून सांगायचा प्रयत्न करते आणि प्रसंगी, आपला वाद त्या अन्याय्य रूढींशी/परंपरांशी/मतांशी आहे माणसांशी नाही याचं भान ठेवून त्यांच्याशी वादही घालते.

जसं मला माझं स्वतंत्र आणि स्वावलंबी असणं मोलाचं वाटतं, तसंच माझ्या मुलांनी स्वतंत्र आणि स्वावलंबी असावं, आपली त्यांच्यावरची माया, प्रेम त्यांच्या पायातल्या बेड्या ठरू नयेत,त्यांनी स्वतःला माझ्यावर किंवा कुणावरही शारीरिक, वैचारिकदृष्ट्या अवलंबून ठेवू नये. स्वतः विचार करावा, अनुभव घ्यावेत, मतं बनवावीत, तपासून पहावीत. आत्मनिर्भर, आनंदी आयुष्य जगावं, असंही मला मनापासून वाटतं.

Thursday, March 8, 2012

या बायकांना हवंय तरी काय?



परदेशात महिलांना मतदानाच्या हक्कांसाठी लढावं लागलं, इथे पहिल्या निवडणूकीपासून सर्व महिलांना, पुरूषांच्या बरोबरीने हा हक्क मिळालेला आहे.
शिक्षण?? हवं ते आणि हवं तेव्हढं शिकवतो की आम्ही मुलींना!
नोकर्‍या करताहेत, कितीतरी स्त्रिया उच्चपदस्थ आहेत!
सातच्या आत घरात असं कोणी बजावत नाही. (आपापलं सांभाळून असा म्हणजे झालं)
गाड्या चालवतात, स्वत:च्या जीवावर प्रवास करतात.
घरकामातही पुरूष मदत करतात, जे करत नाहीत त्यांना महिलांच्या श्रमांची जाणीव आहे.
हवे ते कपडे घालताहेत, कोणी त्यांना अडवत नाही.
कायद्याने वारसा हक्क आहे.
झालंच की सगळं काही पुरूषांसारखं!
आता या बायकांना हवंय तरी काय?

खरं आहे, उच्चवर्णीय, मध्यम/उच्चमध्यमवर्गीय स्त्रियांना हे सगळं मिळतं आहे.
तरी सामाजिक संकेतांचा काच त्यांना आहेच!
रात्री बारानंतरची अघोषित संचारबंदी आहे.

बायकांना काय हवंय ?
”आपण बायकांना स्वातंत्र्य देतो’ चा, हा जो दर्प आहे ना, या वाक्यांना तो नकोय. आम्ही स्वतंत्र आहोतच, कृपया ते देण्याचं औदार्य दाखवण्याची वेळ तुमच्यावर येऊ नये. ते सहज, स्वाभाविक,  असावं.

आता आम्हांला माणूस म्हणून जगू द्या
नका आम्हांला देव्हार्‍यात बसवू
आम्हांला चूकू द्या
आम्हांला भरकटू द्या
सावरायला पुढे नका येऊ
आम्ही ठरवू, काय करायचं ते!
आम्हांला ते प्रतिष्ठेचे दागिने नकाच घालू,
संस्कृतीचं ओझं नका मानेवर ठेवू
मग त्या इज्जतीच्या झेंड्यासाठी
आमचा बळी द्यावा लागतो.
मिरवा तुमचे तुम्हीच ते!
आमचा पाय घसरला
तर नका तुम्ही मान खाली घालू
आमची जबाबदारी आम्ही पेलू
आमचेही खांदे समर्थ आहेत.
आणि ते तुमचं संरक्षण,
काळजी घेणं, करणं,
नकोय आम्हांला
त्याचं ओझं होतं.

नाहीच घाबरायचं पुरूषांना
असं ठरवल्यावर
घाबरण्यासारखं उरतंच काय??

********

"मी किती स्वतंत्र आहे? किती परतंत्र आहे?"

या आधीही थोड्या फार प्रमाणात यावरील काही भाग पूर्वी लिहीलेल्या काही ब्लॉगमधून स्पष्ट केला आहे.त्या व्यतिरीक्त हे थोडेसे.....
आपलं कोणावर फारसं अवलंबून रहाणं अथवा न रहाणं हे माझ्यामते आपण लहानपणापासून कसे वाढवले जातो यावर खूप अवलंबून असते.यात पालक म्हणून माझे आई वडील म्हणून प्रत्येकाची भुमिका मला महत्वाची वाटते.बाबा किर्लोस्कर मध्ये मोठ्या पदावर होते. मी साधारणत: सातवी आठवीत असीन. ते मला लकाकी बंगल्यावर,ब्ल्यू-डायमंड हॉटेलमधे घेऊन जायचे.बाबांच्या मिटींग्ज,कींवा काही मोठी लोक यांच्या गाठीभेटी,कींवा नुसतंच शंतनुराव-यमुताई कीर्लोस्करांशी गप्पा मारायला...अश्या अनेक कारणांसाठी मी त्यांच्या बरोबर पुढेही अनेक वर्षे जात असे.तेव्हा ब-याचदा त्यांची मॅनेजमेंट,ते उठतात कसे,वागतात कसे,कोणकोणत्या विषयांवर बोलतात कसे,त्यांचे रहाणीमान, त्यांच्या आवडीनिवडी , इ. अश्या अनेक विषयांची ओळख,त्यानिमित्ताने बरीच नामवंत मंडळी,अश्या जगात वावरण्याची मला नव्याने ओळख झाली ती बाबांमुळे.....एरवी घरातले बाबा सुट्टीच्या दिवशी, बॅंकेचे,पोस्टाचे,शेअर्समधील गुंतवणुक अश्या आर्थिक व्यवहारांची ओळख कींवा ही कामे बाबांच्या बरोबर जाऊन मी शिकले.मंडई,कीराणा,घरातील स्वयंपाक हा घराशी निगडीत भाग मी त्यांच्याबरोबरीने शिकले.खूप लहानपणापासून बाबा मला त्यांच्या बरोबर घेऊन जात व ही कामे करत असत. त्यामुळे नवीननवीन गोष्टी शिकले आणि त्याबरोबर एक हींमत आली.त्यांचे नेहमीच म्हणणे असते की कोठेही,कोणत्याही कामात आडले नाही पाहीजे.करुन बघा,चुका आणि त्यातून शिका.या अनुभवाने मी बिनधास्त झाले.याबरोबरीने तितकाच महत्वाचा भाग होता तो आईचा.घरातील बारीकसारीक कामे,त्यांचे नियोजन,त्याविषयीचे माझ्याशी निगडीत असलेल्या विषायांचा स्वत: निर्णय घेणे,कधी,कशी,केव्हा,का या सर्व प्रश्नांचे स्वातंत्र तिने मला दिले.मुलगी म्हणून वेळेचे बंधन कींवा मुलगी आहेस म्हणून हे करु नकोस असे कधीच वाढवले नाही.याचा परीणाम आज मी खूप स्पष्ट,नुसतीच भावनिक न रहाता काही ठीकाणी प्रॅक्टीकल होता येणं,एक प्रकारचा वावरण्यातला बिनधास्तपणा, स्वत: कोणतीही परीस्थिती आली तरी धीराने तोंड देणं या गोष्टी मला यशस्वीपणे पेलता येतात.आता राहीला भाग लग्नानंतरचा.....ब-याचदा वाटतं की कौस्तुभ घरात कश्यात लक्ष घालत नाही.पण एक आर्थिक सोडलं (म्हणजे खर्चासाठी पैशाची मागणी जरी करावी लागत असली तरी त्यापैशांच्या मी केलेल्या व्यवहाराशी त्याला काही घेणं देणं नसतं ते स्वातंत्र्य नक्कीच मला आहे.) तर बाकी कोणत्याच गोष्टींसाठी मी त्याच्यावर अवलंबून नाही,ही गोष्ट माझ्यात हींमत वाढवणारी आहे.माझ्या आजूबाजूला नात्यात मी अश्या अनेक बायका बघते की ज्या छोट्या छोट्या गोष्टींवर आपल्या नव-यांवर अवलंबून असतात. माळ्यावरचे काहीतरी काढून हवं आहे ते भाजी आणण्यापर्यंत अशी अनेक छोटी कामे.अश्याने मी कोणत्या न कोणत्या कारणांसाठी नव-यावर सतत अवलंबून आहे ही त्यांना मोहवणारी गोष्ट वाटत असावी का ?का त्या नव-यांनाही तिचं आपल्यावर अवलंबून असणं हवहवस वातत असतं?,आपण कसं वागायचं याविषयी स्वत: काहीच करायचं नाही.सगळं डोकं त्यानेच चालवायचे.यात आपली काहीच शक्ती वाया घालवायची नाही.ही गोष्ट्च अश्या बायकांना आवडणारी वाटते का? आणि यात मग चुकत माकत शिकायची मजा त्यांना घेता येत नाही.आज माझं मला एखादं वाहन चालवता येणं त्याच्या आधारे मी एकटी अथवा मुलांना घेऊन कोठेही जाऊ शकते.आम्ही तिघे मजा घेऊ शकतो.यासाठी मला कौस्तुभ बरोबर असावा याकरता मी कधीच त्याच्यावर अवलंबून रहात नाही.तो आपल्या बरोबर असेल का? त्याची गाडी असेल का? तरच आपण सगळे जाऊ. यात मी अडकून रहात नाही.यासाठी मी त्याच्यावर अवलंबून नाही.त्यामुळे मला त्यातील मजा घेता येते.तो आमच्या बरोबर असेल तर नक्कीच जास्त मजा आहे.पण तो नसतो म्हणून मी हातपाय गाळून बसत नाही.माझा प्रत्येक दीवस माझ्यापद्धतीने जगण्याचे स्वातंत्र्य मला आहे.कोणाच्या आधारावर ते अवलंबून नाही.ही गोष्ट मला आतून बाहेरुन भक्कम करणारी आहे. उद्या माझ्या पुढ्यात, माझ्या कुटुंबावर कोणतेही संकट अथवा कोणताही वाईट प्रसंग आला तरी त्या प्रसंगाला खचून न जाता धीराने सामोरे जाण्याची ताकद यातून मला मिळते.मला वाटतं स्वातंत्र्य म्हणजे आपल्या विचारांच्या देवाण घेवाणीला कुठलेही बंधन नसणे, स्वत:च्या कर्तव्याच्या जाणीवेने प्रगतीकडे उचललेले पाऊल, इतरांना त्रास न देता केलेले मनासारखे स्वच्छंदी निर्मळ वर्तन.मी आज स्वतंत्र आहे अथवा कोणावर अवलंबून नाही त्यामुळे माझ्या आयुष्यातील गोष्टी मी करताना थोडी चुकणार आहे,त्यातून शिकणार आहे,माझ्या हीमतीने मी थोडी पुढे जाणार आहे,आणि त्यातील आनंद उपभोगणार आहे.यासाठी असणारी स्वत:वरच्या विश्वासाची खात्री.त्यामुळे आमूक एक गोष्ट मला जमणार नाही कींवा त्यासाठी कोणावर तरी मी अवलंबून राहून त्यातील धडपडण्याची गंमत मी अनुभवण्याची गोष्ट सोडून देत नाही.त्याची मजा मला घेता येते.लहानपणापासून मी अश्याच पद्धतीने जगत आले.समोरच्या प्रसंगाला तोंड देत राहीले.त्याचा आस्वाद घेत राहीले.त्यामुळे आज माझं आयुष्य मी स्वंच्छंदीपणे मोकळेपणाने जगण्याचा प्रयत्न करत आहे.

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...