Monday, August 30, 2010

काळजी

आमच्या घरी बाबांनी माझी कधी काळजी केली नाही. आई करत असे, पण बाबा करत नसत त्यामुळे घराला तसं वळण नव्हतं. यावेळेच्या आत घरी पाहिजे असंही काही नव्हतं. पण थेट नसलं तरी मर्यादांची अदृश्य परीघं असतातच की! ती माझ्या समजुतीप्रमाणे मी कधी ओलांडली नाहीत. म्हणजे घराने मर्यादेची रेघ ओढलेली नव्हती इतकंच. इतकंच कसं? आजूबाजूच्या घरांशी तुलना करता किंवा न करताही हे खूपच होतं.
 मिलिन्दकडे त्याचे बाबा काळजी करतात, सुरूवातीला मला ते छान वाटलं (आईचं काळजी करणं तसं कधी वाटलं नाही, हं!) पण नंतर नंतर लक्षात येत गेलं, कोणीतरी आपली काळजी करणं म्हणजे पायातल्या बेड्याच असतात.
 काळजी करणं म्हणजे आपल्यावर ’अविश्वास दाखवणं’ असतं, आपल्या क्षमतेबाबत शंका घेणं असतं. (म्हणजे या हेतूने कोणी काळजी करतं असं नाही.) काही वेळा काळजी करणं म्हणजे व्यवस्थेवरचा अविश्वास असतो, समाजावरचा अविश्वास असतो. म्हणजे मी खूप चांगली/ व्यवस्थित गाडी चालवीत असेन पण म्हणून मला अपघात होण्याची शक्यता मावळत नाही तर इतर सगळ्यांनीही नीट गाडी चालवली पाहिजे. बर्‍यापैकी लोक बर्‍यापैकी गाडी चालवतात असा विश्वास पाहिजे, आलाच प्रसंग तर मी तो निभावून नेऊ शकेन याबाबत खात्री पाहिजे. मधेच ट्रॅफिकजाम होऊ शकतो, कोणी भेटू शकतं, अशा सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या म्हणजे जर मला यायला उशीर व्हायला लागला तर काळजी वाटणार नाही.  प्रत्येकाला आलेले अनुभव वेगळे असतात, त्यातून तो घडत जातो. त्यामुळे काळजी वाटणं कमी जास्त प्रमाणात असू शकतं, आपण हे ही समजून घेतलं पाहिजे.
 मिलिन्द माझी कधी काळजी करत नाही. ( कधी कधी मला वाटतं याने माझी जरा काळजी करावी.) मलाही त्याची कधी काळजी वाटत नाही.  मिलिन्द मुंबईला होता तेंव्हा त्याचा मित्र ज्याची बायको आणि मुलगा पुण्यात राहात असे, रोज रात्री तासभर फोन करून इथलं घर चालवत असे, म्हणजे मुलाचा अभ्यास, शाळा, खोड्या, इतर प्रश्न. मिलिन्दने हे केलं नाही. मला एकटीला सारं सांभाळता येणार नाही असं त्याला कधी वाटलं नाही. (आता तर या गोष्टीचा तो गैरफायदा घेतो की काय असं मला वाटतं) असं काळजी न करण्यामुळे आपण स्वतंत्र, सुटे होत जातो. आपल्या क्षमता कमाल मर्यादेपर्यन्त वापरू शकतो. आत्मविश्वास वाढतो. एकूणच जगण्याचा दर्जा उंचावतो.
 तर मुख्य मुद्दा असा की काळजीच्या बेड्या काढून फेकल्या पाहिजेत. काळजी म्हणजे प्रेम नाही हे लक्षात घेतलं पाहिजे (जरी त्याची सीमारेषा अंधुक असली तरी) कुठल्याही प्रेमाने तुमचा विकास थांबवायला नको. तुम्हांला परावलंबी बनवायला नको.

**************

हल्ली या वर्षादीडवर्षात मीही काळजी करणारी झाले आहे की काय अशी मला शंका येते आहे. मग मी विचार करायला लागले. मला, कुणाला उशीर झाला तर, अपघातांची, आजारपणाची, मरणाची काळजी वाटत नाही. मला माणसांच्या आत्मसन्मानाची काळजी वाटते, ती दुखावली गेली तरची काळजी वाटते, उरातले खोल घाव सांभाळत ती कशी जगतील याची काळजी वाटते, मनासारखं जगायला न मिळणार्‍यांची काळजी वाटते, संवेदनशील माणसांची संवेदनशीलता आपल्या समाजात जपली जाईल ना? याची काळजी वाटते, विचार न करता जगणारांची काळजी वाटते.......... या सगळ्या काळज्यांचही काय करायचं ते वेळ काढून एकदा ठरवायला पाहिजे.

***********

Sunday, August 15, 2010

स्वीकार


"सगळ्या मर्यांदांसह एकमेकांचा स्वीकार"
हे फारच अवघड आहे.
होय.
आपण स्वत:ला बदलत आणतो. ते स्वत:ला पटलेल्या कारणांसाठीच असं नाही. काही वेळा इलाजच नसतो म्हणूनही. दोघांना जर एकत्र राहायचं असेल तर (गुण्यागोविंदाने वगैरे) तर बदलावं लागतंच दोघांनाही, कमी जास्त प्रमाणात. अशावेळी आपण खंत करीत बसतो, बदलण्याची, न बदलण्याची, बदलावं लागलं याची. स्वीकारात कसं आहे, खंत नाही. ही खंत जर टाळता आली तर किती श्रम कमी होतील. एक व्यावहारीक कारण हे की बदलाची वाट तरी किती दिवस पाहायची? ( दुसरं ते संतपदाला पोचणं आहेच.)
 आणि हे सगळे विचारच, मला हे जमतच असं नाही. पण विचारांच्या पातळीवर जरी स्वीकार करता आला तरी खूपच मजल मारली असे म्हणता येईल. (तेही मला जमलेलं आहे असं नाही.) कळणं आणि वळणं याच्यात अंतर राहतंच, कळून घेण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे.
 कुठल्याही दोन य आणि क्ष माणसांचं जास्तीत जास्त किती पटू शकतं? (दोघांचही स्वातंत्र्य आणि समानता टिकवून) दोन वेगवेगळी माणसे आहेत, वेगवेगळे अनुभव आहेत, वेगवेगळे विचार आहेत तर पूर्णपणे पटणार नाहीच. फक्त या दोन य आणि क्ष मधे प्रेम आहे . पण प्रेम ब्लॅकमेलींगसाठी वापरू नये. (प्रेमाने स्वत:हून काम केलं तर ठीकच आहे.)
 अश्विनी, तू नेहेमी म्हणतेस तसं आपण तरी बर्‍यापैकी विचार करूनच एकमेकांना निवडलेलं असतं. अशावेळी मूलभूत बाबींमधे मतभेद असायची शक्यता कमी आहे. (तसं असेल तर वेगळा विचार करायला हवा.) आणि असंही आपली घरं कुठे विचारांवर चाललेली असतात?
समज ”स्त्री-पुरूष समानतेचं आपण आपल्या घरात काय करायचं ठरवलं आहे?” काहीही नाही. म्हणजे विचारपूर्वक काहीही नाही. जसे प्रश्न पुढ्यात येतील तसतसे तेव्हढ्यापुरते काय ते आपण ठरवतो. दूरवरचा काही मूलगामी विचार केलेला आहे का? नाही. अशा परीस्थितीत किमान पातळीवर कुणाशीही पटायला हरकत नाही. तसं होत नाही कारण छोट्या छोट्या गोष्टींमधे आपण गुंतूवून घेतो, असं करणं म्हणजेच संसार करणं,  अशी आपली समजूत आहे.
 जर विचार करायला लागलो तर स्वीकार सोपा होईल. मी कुरकुरत असते ’ मिलिन्द नेहेमी वाचत असतो.’ हे एक पोकळ विधान आहे. नेहेमी म्हणजे काय? त्याचा दिवसभरातला किती वेळ त्याच्या कामात जातो? तो घरी किती वेळ असतो? त्यातला किती वेळ तो वाचत असतो? गणित करून काय ते शोधून काढायला हवं. हीसुद्धा स्पष्टता हवी की वेळ त्याचा आहे, त्यावर त्याचा हक्क आहे, त्याच्या वेळेचं काय करायचं हे त्याने ठरवायचं. कदाचित असं लक्षात येईल की त्याच्याकडे वेळेचीच कमतरता आहे. असं का आहे? समजा त्याने कमी वेळ काम करायचं ठरवलं तर तशी सोय उपलब्ध आहे का? आमच्या गरजा काय आहेत, हे तरी आम्ही नीट ठरवलं आहे का? हे सगळंच असं भुसभूशीत असताना ’ मिलिन्द नेहेमी वाचत असतो ’ असं म्हणण्याला अर्थ नाही. म्हणून प्रश्नाच्या मूळापर्यन्त जाऊन नीट काय ते शोधून काढलं पाहिजे म्हणजे स्वीकारायला सोपं जातं.
 अर्थात प्रत्यक्षात सगळं इतकं काही सोपं नसतं, खूप गुंते असतात. शिवाय भावना, जिव्हाळा, प्रेम हे मधेमधे येणारच. माझ्यासाठी म्हणून, स्वत:हून काही सुचणं हे ही असतंच. त्यामुळे मला वाटतं निदान विचार तरी करत राहिलं पाहिजे, म्हणजे कधीतरी "सगळ्या मर्यांदांसह एकमेकांचा स्वीकार" च्या मुक्कामाला पोचता येईल.

**********

चतुरंग पुरवणीत ज्योती कानिटकरांचा एक लेख आला होता. त्यात त्यांनी मॅस्लोच्या गरजांच्या पिरॅमिड दोघांचं किती जमतं/ जमू शकतं यासाठी वापरला आहे.
मॅस्लोनी मानवाच्या या गरजांची वर्गवारी केली आणि ती उतरंडीच्या स्वरूपात मांडली ती अशी..



* बौद्धिक गरजा
* उत्तमता
* स्वत्व
* स्वाभिमान
* प्रेम-सहवास
* भावनिक गरजा
* सुरक्षिततेच्या गरजा
* अन्न, वस्त्र, निवारा- शारीरिक गरजा.
या उतरंडीतील सर्वात तळातल्या गरजा या शारीरिक गरजा आहेत. त्या प्रत्येक माणसाला असतातच. त्या पूर्ण करण्यासाठी सर्वानाच धडपडावं लागतं. या मूलभूत गरजा आहेत. मनुष्य या गरजा पूर्ण करण्यासाठी धडपडतो. त्या सहजपणे पूर्ण होऊ लागल्या की, त्याचं लक्ष वरच्या पायरीकडे जातं. खालून दुसरी पायरी सुरक्षिततेची, यात आर्थिक, सामाजिक, शारीरिक अशा सर्वच प्रकारच्या सुरक्षितता अभिप्रेत आहेत. याही गरजा पूर्ण झाल्या की माणसाचं लक्ष त्या वरच्या म्हणजे भावनिक गरजांकडे वेधलं जातं. त्यानंतर मग बौद्धिक गरजा आणि या सर्वाच्या वर ‘उत्तमतेच्या’ गरजा.
याचा अर्थ असा नाही की, अन्न-वस्त्र मिळेपर्यंत मनुष्याला प्रेमाची गरजच भासत नाही. परंतु शारीरिक गरजांची पूर्तता होईपर्यंत इतर गरजा तितक्या प्रकर्षांने महत्त्वाच्या ठरत नसतात. समाजातील बरीच माणसं पहिल्या तीन गरजांतच आनंदी असतात.
 प्रत्येक पुरुष आणि स्त्रीच्या स्वत:च्या गरजा असतात. त्या आपण या उतरंडीवर मापू शकतो. या गरजा घेऊनच ती व्यक्ती नात्यात प्रवेश करते. बहुतेक वेळेला व्यक्तीला अशाच जोडीदाराचा शोध असतो, जो तिच्यासारखाच असतो. म्हणजेच पुरुष आणि स्त्री अशाच जोडीदाराच्या शोधात असतात, ज्यांच्या ‘गरजा’ स्वत:सारख्याच असतात.  व्यक्ती स्वत:च्या गरजांनुसारच आपल्या जोडीदाराकडून अपेक्षा करते.
 समज कमी जास्त असेल तर नात्यात प्रश्न निर्माण होतात तसे गरजा वेगवेगळ्या पातळीवरच्या असतील तरी प्रश्न निर्माण होत असणार. कदाचित जोडीदाराकडून जास्त अपेक्षाही ठेवल्या जात असतील.
 आपला जोडीदार आपल्यापेक्षा वेगळ्या पातळीवरचा आहे, हे लक्षात घेतल्यावर स्वीकार सोपा जाईल.

**************

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...