Thursday, March 31, 2011

वाजत गाजत


काल भारत पाकिस्तान उपान्त्य फेरीचा सामना संपल्यानंतर बाहेर पडलो. भारताने सामना जिंकल्याने खुशीत होतो, त्यासंबंधी बोलत होतो. दवाखान्यात जायचे होते.रात्रीचे साडेअकरा वाजले होते. पौड रस्त्यावर आलो तर नुसती गर्दी, अडकलो. सगळ्यांनी कुठे कुठे एकत्र मॅच पाहिली असणार... घरी परतत असणार. समोर चौकात काही तरूण मुलं मुली एकत्र जमून आनंद साजरा करत असणार.... साहजिक आहे.... वा! मुलांबरोबर मुलीही दिसताहेत. ट्रॅफिक जॅम मधे अडकलो तरी आजूबाजूचे चेहरे आनंदी दिसत होते. पाच मिनिटे ... दहा मिनिटे झाली..... इंचाइंचाने पुढे सरकत होतो. चौकाच्या जसजसे जवळ येत होतो तसतसे उत्साह अतिरेकी दिसायला लागला. बाजूला काही दारूच्या बाटल्या फुटलेल्या दिसल्या, पुढे मुले दारू पित होती. झुलत होती, बाटल्या हातात दिसत होत्या. ओरडत होती, एकमेकांना टाळ्या देत होती, मिठ्या मारत होती. एका बाईकवर तीन तीन जण, काही मुलांनी शर्ट काढलेले होते. या सगळ्यांनी  उन्मादी अवस्थेत जावं असं झालं होतं तरी काय?
 भारत - पाकिस्तान सामन्यात भारत जिंकायची शक्यता अधिक होती. ते ही बाजूला ठेवू पारंपारीक प्रतिस्पर्धी म्हणून जिंकल्याचा अधिक आनंद, ठीक आहे.... पण इतका??
 माध्यमे भस्मासुरासारखी आहेत. त्यांना सतत बातम्या लागतात. वाचणारे , पाहणारे त्यात वाहून जातात. माध्यमांनी ही गोष्ट इतकी टोकाची करण्याची जबाबदारी उचलली पाहिजे.
 भारत हरण्याची शक्यता होतीच ना? जर हरलो असतो तर या मुलांनी काय केलं असतं? तोड्फोड, नासधूस? जिंकण्याचा अतिरेकी आनंद तर हरण्याची अतिरेकी निराशा.
 एखादी गोष्ट तुम्ही जितक्या अभिमानाची करून ठेवाल तितकी ती घडली नाही तर शरमेची होऊन बसते.
*******
 हॉस्पीटलमधे पोचलो तर तिथेही बरेच लोक. दोन मुलांना लागले होते कारण ते जोरात गाडी चालवताना पडले होते. एक मुलगी अशीच बाईकवरून पडली म्हणून. एक गाडीवरून पडलेला तरूण रक्तबंबाळ होऊन आला, चालू शकत नव्हता आम्ही त्याला वाट करून दिली. तिथला कर्मचारी म्हणाला ” आज मॅचमुळे फार गर्दी आहे.” दोघे तिघे बाहेर पट्ट्या बांधून बसले होते.
 निघताना दोन तरूण म्हणाले,” तुम्ही हे इंजेक्शन दिलं आहे, त्यावर ड्रिंक्स घेतली तर चालतील का?”
डॉक्टर म्हणाले, ” नाही त्याचे साईड इफेक्टस होतील.”
” आज मॅच जिंकली, आज तर घेतलीच पाहिजे, काही झालं तर तुम्ही आहातच.”

*******
साखरपुडा खूप लोकांना बोलावून, खूप खर्च करून, वाजत गाजत केला जातो. त्यानंतर जर मुलाला / मुलीला आपण एकमेकांसाठी योग्य नाही असं लक्षात आलं तरी लग्न टाळता येणं फारच अवघड होऊन बसतं
 त्यापेक्षा साध्या पद्धतीने घरातल्या घरात, आपण एकमेकांना जाणून घेत आहोत हे ध्यानात ठेऊन, परतीची वाट असू शकते ही जाणीव दोन्ही बाजूंनी ठेऊन केला तर?
 पुढे अयशस्वी होणारी काही लग्ने टाळता येऊ शकतील.
********

Monday, March 14, 2011

स्त्रिया ..... दुय्यम


यावर्षीच्या नवलच्या दिवाळीअंकात वंदना भागवत यांनी हिटलर छळ छावण्यातून वाचलेल्या लोकांच्या अनुभवांवर आधारित पुस्तकाचा लिंगभाव परिप्रेक्ष्यातून केलेला अभ्यास अनुवादित केला आहे.
त्यातल्या स्त्रिया लढत राहतात. का बरं?

स्त्रिया प्रतिकूल परीस्थितीतही जीवटपणे चिवटपणे लढत राहतात. जेव्हा पुरूष हरतात, नाउमेद होतात, सगळं सोडून देतात तेव्हाही स्त्रिया प्रयत्न करत राहतात. हे त्यांच्यात कुठून येत असणार??
 स्त्रियांच्या वाढवण्यात याची मुळं असावीत. वर्षानुवर्षे असंच जगल्यामुळे काही प्रमाणात त्यांच्या जीन्समधेही असतील.
 स्त्रियांना सोसण्याची सवय असते. त्यांना दुय्यम असण्याची सवय असते. त्यांना डावललं जातं, त्यांचा अपमान केला जातो, हसत हसत त्यांची खिल्ली उडवली जाते. त्यांच्याकडे वस्तू म्हणून पाहिलं जातं, त्यांचं शरीर दुसर्‍या कुणाच्यातरी वापरासाठी आहे, त्यांना कळलेलं असतं, गोषात राहायचं तरी पुरूषांसाठी, सजायचं तरी पुरूषांसाठी, त्यांच्याकडे सतत संशयाने पाहिलं जातं मग ते अध्यात्मात असो, साहित्यात असो की इतर कलांमधे असो, त्यांना निरर्थक कामे करत राहण्याची सवय असते, त्यांना वाट पाहण्याची सवय असते, आयुष्याकडून त्या फारशा अपेक्षा ठेवत नाहीत, त्या स्वत:साठी नाही तर दुसर्‍या कुणाकुणासाठी जगत असतात.
 कसोटीची वेळ येते तेव्हा त्यांना मरायला बाहेर पाठवलं जातं. शौर्याचं, अभिमानाचं, सैनिकी मरण मरायला पुरूष तयार असतात, पण अपमानाचं लाजिरवाणं मरण मरायला स्त्रियांना पुढे केलं जातं.
 सगळे पुरुषी समजले जाणारे गुण हे पहिल्या रांगेतले ठरवलेले आहेत.
स्त्रियांचं मात्र जगणं दुय्यम, मरणं दुय्यम, लढणं दुय्यम.

*********

या जगात ज्या स्त्रियांनी दुय्यम असणं स्विकारलंय त्यांना सोपं आहे, ज्यांना त्या दुय्यम आहेत हेच माहीत नाही त्यांच्यासाठी सोपं आहे, .... ज्या हे स्विकारत नाहीत, व्यवस्थेला सतत प्रश्न विचारत असतात, त्यांचं काही खरं नाही, .........
त्यांचीही समाजाने काळजी करायला नको, शेवटी त्या स्त्रिया आहेत....
 स्त्रियांना सोसण्याची सवय असते.

*********



Tuesday, March 1, 2011

छोट्या छोट्या गोष्टी..........३

सकाळी उठल्यापासून पांघरुणाची घडी घालणे,आंघोळीचे कपडे काढून ठेवणे,बेडवर आंघोळीनंतरचा त्याने तसाच फेकलेला टॉवेल उचलणे,घरातली घालायची शॉर्ट अशीच कोठेतरी भिरकावलेली ती उचलणे, ऑफीसला जातानाचे म्हणून इस्त्रीचे पॅन्ट,शर्ट,रुमाल,आदल्या दिवशी घातलेल्या पॅन्टमधून खिशातले सामान बाहेर काढून ठेवणे.वेळ इकडची तिकडे न होता वेळेवर नाष्टा तयार असणे,त्या शेजारी पाणी पिण्याचा ग्लास ठेवणे, त्यानंतर त्यांनी खाल्लेल उचलून ठेवणे, खाऊन झाल्यावर म्हणून सुपारीचा डबा समोर ठेवणे, घरातील इस्त्री करायचे असलेले कपडे इस्त्रीला ती आपलीच जबाबदारी आहे. ( कारण आता त्या गोष्टी आठवल्या की माझ्या बावळटपणाचे हासू येते.) एखादी अमूक एक पॅन्ट, कींवा शर्ट नसेल तर त्यावरुन तेव्हा कौस्तुभ भडकायचा. आणि त्याक्षणी अनेकवेळा लॉन्ड्रीवाल्याकडे त्याने मला पळवले आहे. त्याचे हे भडकणे टाळण्यासाठी म्हणा कींवा त्यापासून मला होणार असलेल्या मानसिक त्रास टाळण्यासाठी त्याची ही प्रत्येक कामे दबावाखाली ( खरतर तेव्हा ही ती त्याने स्वत:च करणे अपेक्षित होते तरीही )लग्नानंतरची सुरवातीची काही वर्षे मी चोख बजावत असे. खरतर मनात अनेकदा त्या कृतीबद्दल राग यायचा पण आईंपुढे विरोध करण्याची धमक त्यावेळी माझ्यात नव्हती.कारण एकत्र कुटुंबपद्धती.........याविषयी कधीही कौस्तुभकडे तक्रार न करता बिंनडोकासारखी ही कामे करत राहीले. खरतर तेव्हाही त्याच त्याला आपणहून कळावे अशी अपेक्षा मी ठेवत होते.
आता चित्र खूप बदलले आहे.यातील बरीचशी कामे आणि त्याबरोबरच माझी काही कामे (वैयक्तिक माझी नव्हे.आम्हा दोघांची सामाईक असलेल्या कामांपैकी काही कामात कौस्तुभचा सहभाग वाढला आहे.
तसे पाहीले तर बारीक बारीक खूप गोष्टी आहेत की त्याचा जर विचार केला तर त्रासच होणार आहे. जश्या पुरुषांच्या वागण्यात आहेत तश्या त्या आपल्याही वागण्यात आहेतच.नातं बरोबरीचे असेल व कामातील सहभाग बरोबरीने असला तर त्या गोष्टींचा त्रास होणार नाही.यात फरक पडला की मनस्ताप होतो.

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...