Tuesday, June 2, 2015

उमा ..... बारी चाय्याची!

आम्ही सुट्टीत चार दिवस कूर्गला गेलो होतो.
तिथे मला भेटली उमा.
कोडगू चं इंग्रजांनी केलं कूर्ग
कोडगू हा कर्नाटकातील एक नितांत सुंदर जिल्हा आहे.
तिथले स्थानिक हे कोडवा, ही लढवय्या जमात आहे.
उमा आणि तिचा नवरा रमेश हे कोडगू जिल्ह्यातील एका खेड्यात किंवा वस्तीवरच म्हणू या, राहतात आणि पर्यटकांची घरगुती राहण्याची सोय करतात.

आम्ही त्यांच्याकडे उतरलो होतो.
दोघांनांही गप्पांची आवड. उमाला खूपच.
त्यांच्या कुटुंबाची तिथे पन्नास एक एकर जमीन आहे. कॉफी हे मुख्य उत्पादन!

दोघांमधेही लोकांना आपलंसं करण्याची कला आहे.
अगत्य, आग्रह आणि गप्पा जणू कुणा आप्तांकडॆच उतरलो आहोत असं वाटत होतं.
यजमान आमच्याबरोबर एकाच टेबलावर नाष्ट्याला, जेवायला बसत आणि भरपूर गप्पा होत.

आम्ही पोचलो तेव्हा आमच्या आधी राहायला आलेला ओयोन आणि उमाच्या गप्पा रंगलेल्या होत्या.
ओयोनची बायको उर्मीमाला या दोघांना गप्पा मारायला सोडून खोलीत आराम करत होती.
उमाने आमची चौकशी केली मग आमची आणि ओयोनची ओळख करून दिली, रमेश बाहेर गेल्याचं सांगितलं.

आल्यावर रमेशनेही सगळी चौकशी केली. रात्री जेवताना भरपूर गप्पा झाल्या. ओयोन आणि उर्मीमाला त्यांच्या कुंटुंबाचेच घटक झाले होते.
मग त्यात आम्हीही सामावले गेलो.
गाणी झाली, गप्पा झाल्या , सांस्कृतिक देवाण-घेवाण वगैरे! :)
मुक्ताने एक कन्नड, एक बंगाली आणि एक मराठी गाणं म्हंटलं.

उमा मला आवडूनच गेली.
सकाळी मी तिच्या घराचं चित्र काढत होते, दोघांनांही उत्सुकता कुठवर आलंय? कसं होतंय?
संध्याकाळी ते चित्र त्यांनांच दिलं. इतकी हरखून गेली ती! एखाद्या लहान मुलीसारखी! :)
चित्राने आम्हां दोघींना आणखीनच जवळ आणलं.
आमची गट्टीच जमली.

एक दिवस आम्ही कुठे बाहेर भटकायला गेलो नव्हतो, मग काय? भरपूर गप्पा.
ऎरवीही जेवणाच्या टेबलाशी तास दीड तास गप्पा!
सुरूवातीला मुलंबाळं काय करतात ते सांगून झालं.
घर सांभाळणं, शिक्षण वगैरे बायकी गप्पा!

तिला विचारलं की तुझं लग्न कसं जमलं?
ठरवून लग्न!
रमेश माझ्या भावाबरोबर एकाच कंपनीत काम करायचा.
एकदा त्याचा निरोप घेऊन घरी आला.
सकाळी सातला.
मी दार उघडलं, मला त्याने पाहिलं आणि मी त्याला आवडले.
नऊ वाजता एका मित्राला घेऊन आला, मी ज्या मुलीशी लग्न करणार आहे, ती बघ, म्हणून.
नंतर माझ्या भावाला सांगितलं की त्याला माझ्याशी लग्न करायचयं.
मी म्हणाले, " म्हणजे लव्हमॅरेजच झालं!"
" हो. त्याच्याबाजूने. मी नाही म्हणाले, मी फक्त अठरा वर्षांची होते. मला नव्हतं लग्न करायचं. हा आमच्याकडे येत राहिला, आईबाबांना हा आवडायचा. नंतर शेवटी मलाही आवडायला लागला. बावीसाव्या वर्षी मी लग्न केलं."

" तुमच्या लग्नाचे फोटॊ मला दाखव."
" नाही दाखवणार."
" का?"
" अजिबात नाही!"
" पण का?"
" अगं, माझी एक कझीन आहे, तिने मला मेक अप केलेला, ते फाऊंडेशन अन काय काय, डोळ्यांवर काय काय, ती म्हणालेली की लग्नात तर मेक अप करायचाच असतो. सगळा वेळ मी तो मेक अप सांभाळून होते, आमच्यात घुंगट घेतात, पारदर्शकच कळतं कोण कोण भेटायला आलेत. नंतर रूममधे नवर्‍याने घुंगट उचलायचा आणि दुध पाजायचं असं असतं. याने घुंगट उचलला आणि त्याचा चेहरा पाहून मला कळलं मी कशी दिसत असणार ते! भीतिदायक!"
तिकडून रमेश म्हणाला, "घोस्ट!"
आम्ही खळखळून हसलो.
त्या आठवणीने ती पुन्हा हिरमुसली. तिच्यात एक छोटी मुलगी आहे.
" मग मी आरशात पाहिलं आणि चेहरा धुवून काढला! तर ... असं दुधाळ पाणी!" :)

" पण कोडवा पद्धतीने साडी नेसल्यावर घुंगट कसा घेता येईल?" त्या पद्धतीत निर्‍या मागे असतात आणि पदर मागून पुढे घेऊन त्याला पिन लावून टाकतात.
" अगं , ओढणी असते ती वरून घेतात, साडीचा पदर नव्हे. आमच्यात नवरा मुलगा आणि मुलगी दोघांनांही ती पांघरतात. त्या उत्तरीयाचा रंग लालच असायला लागतो. मुलीची साडी पण लाल असावी लागते. हल्ली मुली केशरी किंवा मरून अशी घेतात, पण लालपैंकीच हवी.

"तुमच्यात लग्न कसं लागतं?"
रमेश पुढे सरसावला, म्हणाला, " लग्नाचे विधी असे काही नसतात. अग्निभोवती फेरे वगैरे काही नाही. जस्ट सेलिब्रेशन! मुला मुलीचे आईवडील ते साजरं करतात."
" हार वगैरे घालतात की नाही?"
" तेवढंच असतं. जेवण, खाणं /पिणं नाच!"
" लग्नगीतं असतात?"
" गाणी नाहीत, केवळ म्युझिक!"
" कसं नाचता?"
"बल्ले बल्ले स्टाईल! हात वर करून" उमा म्हणाली.
" मंगळसूत्राचं काही महत्त्व नाही. काही घातलं तरी ते आई घालते ना, दोघांची लग्नं तशी आपापल्या घरी, आपापल्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लागतात. म्हणजे माम्या, मावश्या, आत्या, काकू वगैरे मिळून आंघोळ घालतात. मग नवर्‍याकडचे नातेवाईक नवर्‍या मुलाला घेऊन मुलीकडे येतात. नवरा मुलगा म्हणतो, ’मला तुमच्या मुलीशी लग्न करयचयं.’ मुलीकडचे म्हणतात,’ आम्ही नाही देणार आमची मुलगी!" मग थोडावेळ गमतीशीर बोलाचाली होते, मुलीचं लग्न करायला तयार होतात. मुलीकडचे सांगतात, " केळी कापून आत या" अशी मोठमोठी केळीची खोडं असतात. कोयत्याने एका वारात ती कापायची असतात. थोडक्यात, मुलाकडच्यांनी आपलं शौर्य दाखवायचं असतं. मुलाकडचा कोणीतरी पुरूष हे करतो. मग दोघं एकमेकांना हार घालतात.
मुलाकडे आल्यावर मुलीने नारळ कोयत्याने फोडायचा असतो. "
" एका वारात?"
" पूर्वी यायचे मुलींना, हल्ली नाही. उमा वीस पंचवीसदा मारून फोडायचा प्रयत्न करत होती. :) "
तो पुढे सांगायला लागला, " नारळाचं पाणी विहिरीत घालतात मग त्या विहिरीतून कळशीभर पाणी काढून नवर्‍या मुलीने कळशी डोक्यावर घ्यायची. नाचत- गात- पीत ही वरात नवच्या घरी येते. एवढंसं अंतर कापायला तीन- चार तास लागतात. "
" मुलीची मान अवघडत असेल."
" हो. मुलीकडच्या स्त्रिया हात लावतात. कोणी घाई केली तरी तरूण मुलं ऎकत नाहीत, त्यांना नाचायचं असतं."
उमा म्हणाली, " अगं आमच्यावेळी पहाटेचे साडेचार वाजलेले. तेव्हा रूममधे जायचं आणि साडेसहाला बाहेर आलंच पाहिजे! :) "
नंतर मजा मजा चालते.
उमा म्हणाली, एका आत्याबाईने तिची पेटी उघडली आणि त्यातली एक एक वस्तू, साड्या उचलून सगळ्या बायकांना दाखवू लागली, सगळ्या नुसत्या हसत होत्या.

........ हे ऎकत असताना मला वाटून गेलं की कशा वेगवेगळ्या पद्धती असतात ना! जी त्याच सांस्कृतिक परिसरातील मुलगी असेल ती याची मजा घेऊ शकेल. पण समज कुणी पाश्चात्य मुलगी लग्न करून आली तर या प्रथेचा तिला किती धक्का बसेल! तिची बॅग, तिच्या स्वत:च्या वस्तू, कपडे सगळ्यांना दाखवण्यात, काय मजा आहे! तो तिचा अपमान आहे असं वाटेल तिला. काय मागासलेले लोक आहेत असं वाटेल... ........ काय बरं असेल या प्रथेमागे? रॅगिंग? .... मुलीला सामावून घेण्याचीच एक रांगडी पद्धत?..... आपण आपल्या सांस्कृतिक परीघाबाहेर पडून अशा गोष्टींकडे बघायला पाहिजे. आपल्या मोजपट्ट्या न वापरता.... एका अख्ख्या जमातीला बोल न लावता याकडे बघायला पाहिजे.... उमालाही ते नव्हतं आवडलेलं बहुदा, तिच्या सुरावरून, किंवा सुनांना अशी चेष्टा नसेलच आवडत.... ती शहरात, बंगलूरात जन्मलेली आणि वाढलेली मुलगी आहे. आपल्या सुनेच्या वेळी ती ही प्रथा बदलेल का? कोण जाणे. सांस्कृतिक अभिसरणात वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या गोष्टी प्रतिष्ठेच्या समजल्या जात असतात. काही वर्षांपासून.... तरी तीस- चाळीस, लग्नानंतर केक कापणे ही प्रथा त्यांच्यात सुरू झालेली आहे, पूर्वी ती नव्हती.

 अमेरिकेतल्या भटजी बोलावून अगदी मराठी पद्धतीने केलेल्या लग्नातही आता केक कापणे + किस हे वाढवलेलं आहे. संस्कृतींच्या सीमारेषेवर हे बदल होत असतात.

उमाच्या मुलाचं लवकरच लग्न आहे. लग्न होईपर्यंत तिने गोड खाणं सोडलंय. असं असतं का त्यांच्याकडे? कोण जाणे.
मुलाने स्वत:च लग्न ठरवलंय, सून मल्याळी आहे.
तिचा फोटॊ दाखवला, तिला केलेले दागिने घातलेला फोटो होता.
म्हणाली, " आमच्या इकडच्या बायका म्हणाल्या की दागिने निवडायला सुनेला कशाला न्यायचं? आपल्याला आवडतील ते करायचे. मी तसं केलं नाही. आपले दागिने तिला आवडले नाहीत तर ती घालणार नाही, तसेच ठेवेल आणि मी गेले की विकून टाकेल, त्यापेक्षा तिच्या पसंतीने घेतलेले चांगले, ती वापरेल. मला मुलगी नाही, ती माझ्या मुलीसारखी रा्हील."

 तिच्या घराच्या खालच्या बाजूला तिचे सासूसासरे राहतात. त्यांचं घर काहीच्या काही सुंदर आहे. उमा म्हणाली की त्या घराचं खरं सौंदर्य म्हणजे माझी सासू आहे. ८६ वर्षांची आहे, कायम व्यवस्थित असते, एखाद्या राणीसारखी राहते. कूर्ग पद्धतीची साडी नेसते, (उमा कायम पाश्चात्य पेहरावत असते.) तिची स्किन बघ तू, कशी ठेवलीये. अगदी ताठ चालते. स्वत:च्या आणि नवर्‍याच्या आरोग्याची खूप काळजी घेते. तिला अजूनही तिचं वय कुणाला कळू द्यायचं नसतं. :)
 सासूबाईंना भेटायचं राहूनच गेलं.

 रमेश आधी टाटा टी त होता. मग त्याने बंगलुरूला व्यवसाय सुरू केलेला. दहा वर्षांपूर्वी तिचे दीर अचानक वारले. मग सासूसासर्‍यांकडे बघायला कोणी नव्हतं. दर आठवड्याला रमेश बंगलुरूहून यायचा. वर्षभर त्याने असं केलं.
 उमा सांगत होती, " एके दिवशी एकदम रमेश म्हणाला की आपण कोडगूत आपल्या खेड्यात राहायला जातोय. माझ्यासाठी तर धरणीकंप झाला. एका बाईचं विश्व कुठलं असतं? तिचं घर, तिचा नवरा, तिची मुलं. बायकांना कसं पुढचं दिसत असतं ना? मला माझं घर विखुरलेलं दिसायला लागलं. मोठा मुलगा तेव्हा मॉडेलिंग करायचा, मला त्याला एकट्याला त्या क्षेत्रात सोडणं रिस्की वाटत होतं. धाकट्याची दहावी झालेली, त्याच्याकडे बारावीपर्यंत तरी पाहायला हवं होतं. मी रमेशला म्हणाले की मला दोन वर्ष दे, मी मुलांपाशी राहते. दोन वर्षे मी इथे जाऊन येऊन होते. रमेशने त्याचं काम सुरू केलं. मी इथे येऊन आचारी शोधून त्याला सगळं शिकवलं, इथलं बस्तान बसवून दिलं. इथल्या आजूबाजूच्या बायका म्हणायच्या ’तू तर नवर्‍याला इथे ठेवून बंगलुरात मजा करते आहेस.’ मजा? मी घर सांभाळत होते, पोरं सांभाळत होते, धाकटा चांगला हुशार पण खेळात मग्न, त्याच्या ताणात होते. मग एकदा मी एकीला म्हणाले तू पण एकटी बंगलूरात ये आणि मजा कर.
धाकटा मेडीकलला लागला. मग तो हॉस्टेलला गेला. मोठ्याने त्याची कंपनी सुरू केली( कदाचित रमेशची चालवायला घेतली.) मी इथे राहायला आले."
" इथे, या खेड्यात राहायचं कसं जमवतेस?"
" हं. जमवते. दर दोन महिन्यांनी बंगलुरला जाते. एक दिवस खरंच मजा करते. आम्ही सगळ्या मैत्रिणी भेटतो. दुपारी बाराला जेवायला जमतो. बाहेर जेवतो. मग क्लबात जातो आणि सात वाजेपर्यंत गप्पा गप्पा गप्पा! कुणाचं काय चाललंय?, हिच्या तिच्या सासूची गार्‍हाणी, नवर्‍याची गार्‍हाणी, मजा येते."
 उमा सुगरण आहे. खास कोडवा (कूर्ग) पद्धतीचं अप्रतिम जेवण तिने आम्हांला खिलवलं.
शेवटच्या दिवशी रात्री तिच्याकडून पाककृती उतरवून घेतल्या.

तिने खास कोडवा पद्धतीचा जॅम दिला, शिवाय मिरे, घरचे पेरू... आई गं! निरोप घेतला, पुन्हा येईन म्हणाले.
दुसर्‍या दिवशी पहाटे साडेचारला निघणार होतो, आम्हांला वाटले हाच निरोप!
पण नाही.
सकाळी साडेचारला केवळ आम्हांला निरोप द्यायला दोघेही उठले होते.
उमाने मिठी मारली आणि आता खरंच निरोप घेतला.
या चार दिवसांत मी काही कोडवा शब्द शिकले आणि ती काही मराठी शब्द शिकली.
बारी चाय्याची -- छान वाटलं....

पुन्हा येईन.... नान पुना बप्पी!


हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...