Tuesday, March 30, 2010

जरा विचार करू या -- १

बाई घरात/ कामात इतकी का गुंतून असते? पुरूष का नसतॊ?

मी यावर जरा विचार केला, कुठल्या निष्कर्षाला पोचले असे नाही, सर्व बाजूंनी तपासून पाहिलंय असंही नाही. जो विचार केलाय तो तुमच्यापर्यन्त पोचवावा असं वाटलं. आपल्याला मिळून काही ठरवता येईल का बघूया.

आपण जेव्हा इतरांच्या घरी जातो तेव्हा त्यांच्या घरी केलेल्या मदतीचं आपल्याला ओझं वाटत नाही. सांगतील ती मदत तशीच/ तेव्हढीच करायची. आपल्या घरी काम वाटतं कारण केलेलं सगळं पुरेल (फार उरणार नाही ना?) ना? आवडेल ना? ही जबाबदारी आपली असते. कुणाला जेवायला बोलवायचं ठरवलं तर फक्त स्वैपाक करणं एव्हढच काम नसतं तर, कुठले कुठले पदार्थ करायचे हे ठरवावं लागतं, येणार्‍यांना काय आवडेल याचा विचार करावा लागतो, त्यांची काही पथ्ये असतील तर ती लक्षात ठेवावी लागतात एव्हढंच नाही तर मागच्या वेळी त्यांना बोलावलं होतं तेव्हा जे केलेलं असेल तेच परत करायचं नाही हे ही लक्षात ठेवावं लागतं. सुगृहिणी होणं काही सोपं नसतं. किती वेळ जातो हा सगळा विचार करण्यात! गुंतून पडतो आपण. (चांगलं म्हणवून घ्यायची चटक लागते.)
म्हणजे मला म्हणायचंय नुसतं पोळ्या करायचं काम करायला काही वाटत नाही कारण त्यावेळी मी मला हवे ते वेगळे विचार करू शकते.त्यात विचार करण्याचा वेळ जात नाही. कोणी ठरवून दिलेलं काम करणं सोपं आहे, जसं की पुरूष करतात.

हे एक उदाहरण झालं, याशिवाय आणखी किती गोष्टी असतात! कुठल्या कुठल्या कार्यक्रमांना जायचं असतं. (लग्न, मुंज, वाढदिवस वगैरे) मग तिथे आहेर काय द्यायचा याचा विचार करावा लागतो, योग्य, साजेसा, दिखाऊ नसलेला, त्या व्यक्तीला आवडेलसा,(आपण ठरवलेल्या किंमतीचा) किती वेळ जातो या सार्‍यात? सगळे आपल्या जवळचे असतात असं नाही, जवळच्यांसाठी विचार करण्यात वेळ गेला तर वेळ घालवला असं वाटत नाही, तेव्हढा वेळ आपण त्या व्यक्तीसोबत असतो मनाने. पण इतरांसाठी ते काम होऊन बसतं आणि आपण गुंतून पडतो.

आपल्या रूढी-परंपरा पण बायकांना फार गुंतवून ठेवतात. ज्यांच्या घरी सगळे सण साजरे होतात त्या घरात बाईचा पिट्टा पडतो. सण साजरे करताना विचार करावा लागत नाही. तेच तेच त्याच पद्धतीने करत राहायचं. त्याचाही कंटाळा येतो, विचार न करता का त्याच पद्धतीने वागायचं?

एखाद्या घरात वर्षानुवर्षे सासू जर घरातले/स्वैपाकघरातले सगळे निर्णय घेत असेल त्या सुनेच्या हातात काहीच अधिकार नसतील तर तिने काय कायम सांगीतलेली कामे करत राहायची?

मी तयार केलेल्या जाळ्यात पुरती फसत चालले आहे.

एकीकडे मी म्हणतेय की निरर्थक कामांचा विचार करण्यामधे गुंतायचं नाही आणि दुसरीकडे म्हणतेय की जी कामे बायका/ आपण करतो त्याचे अधिकार आपल्याकडे पाहिजेत, म्हणजे ते नीट विचार करून ठरवणे आलं.

काय करायचं अशावेळी?

शिवाय हा सगळा विचार करण्याचा वेळ वाचवून त्यात तरी काय करायचंय? (कुठे दिवे लावायचेत?)

*********

लग्न झाल्यानंतरची पहिली दोन-तीन वर्षे वगळता बाकी सारा काळ वरच्या सगळ्या गोष्टी मीच पाहते आहे. म्हणजे मिलिन्द सुचवतो, मदत करतो पण जबाबदारी माझीच असते. मला वाटलं ही जबाबदारी मिलिन्दने पण घ्यायला पाहिजे. मग एके दिवशी मी त्याला सांगीतलं, तुझ्या नातेवाईकांकडे काही कार्यक्रम असेल तर सगळं तू पाहायचंस, माझ्या नातेवाईकांचं मी बघीन. मीसुद्धा सुचवीन, काही आणायचे झाल्यास आणीन, मदत करीन पण ठरवायचं तू. मी त्यावर विचार करणार नाही. (खरं म्हणजे इतक्या वर्षांनंतर त्याचे अन माझे नातेवाईक इतका काटेकोर फरक राहिलेला नाही, त्याचे नातेवाईक येऊन तो नसला तरी माझ्याशीच मनसोक्त बोलून वर तुझ्याशीच बोलायचं होतं, असं म्हणून जातात आणि उलटही होतं.)

मी असं ठरवल्यावर काही दिवसांनी त्याच्या एका नातेवाईकाचा फोन आला, ’सत्यनारायणाच्या प्रसादाला या’ असा. फोन मीच घेतला. मिलिन्दला निरोप सांगीतला. शिवाय हे ही सांगीतलं ’ त्यांनी नुकतंच घर घेतलयं, त्यामुळे सत्यनारायण असावा, त्यांच्या घरासाठी काही घ्यायचंय का ते ठरव.’ मिलिन्द म्हणाला,’ त्यांनी फोनवर असं काही सांगीतलं का?नाही ना? मग कशाला न्यायचं?’ मी म्हणाले,’बघ बाबा, मला तरी वाटतयं’ मिलिन्दने ठरवलं काही भेटवस्तू न्यायची नाही. तिथे आलेल्या बाकीच्या सगळ्या नातेवाईकांनी काहीतरी भेटवस्तू आणलेली होती. मी तर निर्विकार चेहर्‍याने वावरत होते, मी माझ्याकडून मिलिन्दला सांगीतलेलं होतं. (मिलिन्द तर माझ्यापेक्षा पोचलेला आहे.)

घरी आल्यावर माझ्या लक्षात आलं, आमच्यात काय ठरलंय हे नातेवाईकांना काय माहित? ते तर ’विद्याला सुचलं नाही’ असाच विचार करणार ना!

**********

Thursday, March 25, 2010

निर्मिती

अखेर तो दीवस उजाडतो. पोटात बारीक बारीक कळा येऊ लागतात. पहील्या पहील्या कळा सहन होणा-या,सुखद
वाटणा-या.आपल्यातूनच एक नवीन जीव निर्माण होणार ही कल्पनाच मुळी केवढी आनंददायी आहे.त्यासाठी काही वाट्टॆल ते सहन करण्याची शक्ती प्रत्येक स्त्री मध्ये त्यावेळी कोठून येते कोण जाणे.मनात असंख्य विचार येत असतात. कसा असेल तो इवलासा जीव. नाक,डोळे हात, पाय,चेहरा,रंग.जावळ असेल का? का नसेलच?मुलगा का मुलगी? या आणि अश्या असंख्य कुतुहलापोटी,उत्सुकतेपोटी पडलेल्या प्रश्नात मोठी गंमत आहे.कालच भावजय बाळंत झाली तिच्यापाशी असताना असे अनेक गमतीशीर प्रश्न मनात येऊन गेले.स्वत:च्या वेळीही असे अनेक प्रश्न पडलेच होते. पण त्यावेळी कळा सहन करण्याचा भाग त्यामध्ये खूपच जास्त होता.त्यावेळेचे स्वत:वर येणारे दडपण हे त्या कुतुहलावर मात करत होते.काल जरा आजूबाजूला मला बघता आले. दर एक तासाने एक नर्स येत होती आणि तिच्या पोटावर छोटसं यंत्र लावून बाळाचे ठोके तपासत होती.एरवी या नर्सेस अगदी नॉर्मल चेह-याने वावरत असताना आपल्याला दीसतात.पण आपल्याच पेशंटपाशी आल्या की काय होत त्यांना कोणास ठाऊक. उगाचच गंभीर चेहरा करतात.तो त्यांचा चेहरा बघून आजूबाजूच्या नातेवाइकांना घाबरायला होत असते.किंबहूना आपणही दडपणाखाली असतो म्हणून तो तसा चेहरा बघुन अजुनच दडपणात भर पडते. हाच अनुभव तिला आत ऑपरेशन थेअटरमध्ये नेल्यावर.उगाचच सगळ्या नर्सेसची पळापळ.मध्येच आतून एखादी पळत येणार आणि गंभीर चेह-याने बाहेरच्या नर्सला ओरडतच अहो लवकर या पळा लवकर असे म्हणणार.हे सगळे गंभीर नाट्य बघुन बाहेर उभे रहणारे आपण उगाचच गंभीर होतो. आणि ही धावाधाव बघून ही सगळी धावाधाव आपल्याच आत असणा-या पेशंटसाठी चालली आहे असा तर्क काढत असतो. काही आत प्रॉब्लेम तर नाही ना? अशी उगाचच प्रत्येकाच्या मनात शंका येते.मधूनच एक वयस्कर आजी (नर्स)आतून येतात. त्यांना मी विचारलं आजी झाली का हो बाळंत? तर त्या म्हणाल्या हो आत्ताच.त्यांना म्हणलं काय झालं काही कळलं का? तर म्हणाल्या मला नाही सांगता येणार....परत या अर्धवट उत्तराने आम्ही उगाचच गंभीर.खरतर हॉस्पिटलचेही काही नियम असतील.पण त्या आजी असे म्हणल्यावर सगळं बर असेल ना आत? अशी उगाचच शंका येऊन गेली पुन्हा एकदा.हे सगळ फक्त चाललं होत ते मनातील दडपणामुळे.....साधारण दहा मिनीटे हे नाट्य चालले आणि डॉ. बाळाला हातात घेऊन बाहेर आले. तो नवा इवलासा जीव बघून सगळ्यांच्याच मनावरचे दडपण चुटकीसरशी गळून पडले. खरंच आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रत्येक क्षणी अशी अनेक मनावर येणारी दडपणं ही केवळ आपल्या मुलांचे चेहरे बघून कुठच्या कुठे पळुन जातात हे काल मला पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवले.

Monday, March 8, 2010

कविता

कंटाळा आला आहे मला
रोज रोज तेच तेच करण्याचा
कंटाळा आला आहे
कांदा चिरण्याचा,
टीव्हीवरची धूळ पुसण्याचा
(तिथेच जन्मत असल्यासारखी कुठून येते कोण जाणे)
कंटाळा आला आहे
फोनची रिंग वाजली की तो उचलण्याचा,
कुरिअरवाल्याच्या कागदांवर सह्या करण्याचा
(पत्रधारकाशी माझं नातं काय आहे सांगण्याचा)
कंटाळा आला आहे
बोलण्याचा,
येणार्‍या जाणार्‍यांसाठी हसून दार उघडण्याचा
(की हसण्याचाच)
कंटाळा आला आहे
मुलांची काळजी करण्याचा,
मुलांशी वागताना बालमानसशास्त्राचे सगळे नियम लक्षात ठेवण्याचा
(सारखं स्वत:ला तयार ठेवण्याचा)
कंटाळा आला आहे
नवर्‍याशी भांडण्याचा,
त्याच्यावर प्रेम करण्याचा,
(आणि त्यालाही आला असेल तर?)
कंटाळा आला आहे
शब्दांचे अर्थ लावण्याचा,
वाचण्याचाच;
(मग ती पुस्तके असोत की माणसे)
कंटाळा आला आहे
कंटाळा करण्याचा,
कंटाळ्याचं गाठोडं इतकं वाढलं आहे’
पाय दमत चाललेत आत्ताच
(आजीने या कंटाळ्याचं काय केलं? आणि आईने?)
कंटाळा आला आहे
मुक्काम कधी हे माहीत नसताना
चालत राहण्याचा
खरंच कंटाळा आला आहे
(बदली कोणी मिळू शकेल?)

*************
 
संसार म्हणजे
रोजची तीचतीच
कामे फक्त
व्हायला हवीत
करणारी कोण
याला तशी
काहीच
किंमत नाही

बदली म्हणून
आपलं एक
बुजगावणं
उभं करायचं
हुबेहुब आपल्यासारखं
त्यात आपला
जीव फक्त
ओतायचा नाही

तो राखायचा
आपल्या आवडींसाठी

***********

घरी राहणं पत्करल्याचे
फायदेही असतात काही
टाळता येतात पुरूषांचे
नकोसे स्पर्श
विसरायला होतात
जगातले अनोळखी पुरूष
कधीतरी बाहेर पडल्यावर
सावधपणे, आकसून
वावरायचं नाही राहीलं लक्षात
नाट्यगृहात समोर कार्यक्रम चालू
शिताफीने झेलला
मागच्या माणसाचा स्पर्श
दंडावर
(सावधपणा मुरलेला असतो
बायकांच्या अंगात)
त्याचच कौतुक वाटत राहिलं
कार्यक्रमभर!
आपण काहीच करू शकत नाही
लोकांना जर वाटलं
ही फक्त एक बाई आहे
शरीर असलेली

*************

असं काही झालं की
आपण मनस्थिती बिघडून घेतो
आणि स्पर्शालाच घाबरायला लागतो;
प्रेमाचे, मायेचे,
वात्सल्याचे,
धीर देणारे,
कौतुक करणारे,
क्षमा करणारे,
किती हर तर्‍हेचे स्पर्श
स्पर्शांना आपण वाळीत टाकतो,
काय गमावून बसतो
याची आपल्याला कल्पनासुद्धा नसते.

*************

जुनी मैत्रिण
भेटली खूप दिवसांनी
मागच्या पानावरून पुढे
गप्पा सुरू झाल्या,

आपलं कसं
छान आहे नं!
सगळंच
एकमेकींना माहित!

नवी मैत्री करायला
नको वाटते
पुन्हा सगळं सुरवातीपासून
कुठे सांगत बसायचं?

सांगणं म्हणजे
पुन्हा एकदा भोगणंच की!
ती ताकद
राहीली नाही आता!


*************
 
”मोरासारखा छाती काढून उभा रहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा”


कवी असोत की शायर
प्रेम करायचं ते त्याने
करवून घ्यायचं ते तिने
विचारायचं त्याने
होकार द्यायचा तिने
इथेसुद्धा पायर्‍या
ठरलेल्या आहेत
कर्ता तो कायमच
(आणि कर्म तिचं??)
प्रेमबीम करायचं असलं
तरी ती दोन पायर्‍या खालीच

एके दिवशी सकाळी उठल्यावर
साक्षात्कारासारख्ं तुमच्या लक्षात येतं
प्रेम म्हणजे ’हे असं असतं’

******************

Wednesday, March 3, 2010

व्हाईट लिली आणि नाईट रायडरच्या निमित्ताने

साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातले माधव आणि भक्ती. पस्तीशी गाठलेले, अविवाहित. एकटेही आणि एकाकीही. दोघे इंटरनेट च्या माध्यमातून बोलत असतात. त्या आभासी, स्वप्नातल्या जगात माधव असतो नाईट रायडर - काळा सूट, टाय, हॅट, गॉगल घालणारा, रुबाबदार. आणि भक्ती असते व्हाईट लिली देखणी, त्याच्या बोलण्यावर लाजणारी, त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारी. मग दोघे लग्न करायचं ठरवतात. त्यासाठी प्रत्यक्ष भेटायचं ठरवतात. प्रत्यक्ष भेटीत मात्र ते भक्ती आणि माधवच असतात. दोघांनी चॅटिंग करताना घातलेले व्हाईट लिली आणि नाईट रायडरचे मुखवटे आता उपयोगाचेच नसतात. मग एकेका प्रसंगातून दोघांनाही एकमेकांची खरी ओळख होत जाते. व्हाईट लिलीच्या आवरणाखालची संशयी, सावध, आक्रमक भक्ती आणि नाईट रायडरच्या आवरणाखालचा चारचौघांसारखा, पोटापाण्याच्या मागे असलेला, टक्कल पडलेला माधव - दोघांनाही एकमेकांच्या स्वभावातली, विचारातली, सवयींमधली दरी जाणवू लागते. तडजोड दोघांनाही शक्य नसते. संवादाचा धागाच उरत नाही. शेवटी पुन्हा ते पूर्वीच्याच मुखवट्यांचा, स्वप्नातल्या जगाचा आधार घेतात आणि चॅटिंग द्वारे संवाद सुरु करतात. नाटक अजूनही बरंच काही सांगत होतं. मला लक्षात राहिलं ते व्हाईट लिली आणि नाईट रायडर झाल्याशिवाय त्यांना एकमेकांशी संवादच साधता न येणं.
नात्यांमधेही असं होतं का? कधी आपण समोरच्याला आपल्याला हवा तो मुखवटा घालू पाहतो कधी समोरच्याला हवा तसा मुखवटा आपण स्वतःला घालायचा प्रयत्न करतो. क्वचित कधी खरा चेहरा आणि तो मुखवटा एक असतात. क्वचितच कोणाला मुखवटे न घेता जगता येतं. पण कित्येकदा मात्र ते मुखवटेच आपली ओळख बनतात. ते मुखवटे जपण्याचा आपणही कसोशीने प्रयत्न करत राहतो.कित्येकदा समोरच्यानंही आपल्याला हव्या तशा मुखवट्यात स्वतःला बसवावं असाही प्रयत्न करतो. काही नात्यांच्या तर अपेक्षाच अशा असतात की मुखवटे चढवल्याशिवाय त्या पूर्णच करता येत नाहीत.
मुखवटे म्हणजे तडजोड. मुखवटे म्हणजे जे नाही ते आहे असं भासवणं.
आतून काही तुटत असेल, काही फुटून बाहेर येत असेल, डोळे वाहत असतील, चेहरा वेडावाकडा झाला असेल. पण मुखवटा असतो. तो हे काहीच उघडं पडू देत नाही. पुन्हा, जो मुखवटा चढवलेला/चढलेला असेल, त्याच्याशी सुसंगत असं, त्याला शोभेल असं वागणंही ओघानंच आलं. हे 'ज्याला जसे हवे तसे' मुखवटे आपण चढवले की खूपसे प्रश्न उत्तराची अपेक्षा न बाळगताच बाजूला जातात. कारण ते प्रश्न तर खऱ्या चेहऱ्यालाच पडलेले असतात. मुखवटा काही प्रश्न विचारतच नाही. तो तयार होतो तोच मुळी समोरच्याच्या प्रश्नाला उत्तर म्हणून. त्याच्या मागणीचा पुरवठा म्हणून.
कधीतरी कुठलातरी हळवा कोपरा दुखावला जातो, मुखवटा खळ्ळकन फुटतो. आतला वेगळाच अनोळखी चेहरा बाहेर येतो. त्याच्या मागण्या असतात. त्याचे प्रश्न असतात. त्याची स्वप्नं असतात. त्याच्या भावना असतात. पण समोरच्याला सवयच नसते त्या चेहऱ्याशी संवाद करण्याची. त्याला तो मुखवटाच सवयीचा आणि सोयीचा असतो. पुन्हा तो तुटलेला मुखवटा सांधायचा आणि चढवायचा. नीट पाहिलं तर चरे दिसतात त्याच्यावरचे नाहीतर असतोच तो पुन्हा 'ज्याला जसा हवा तसा.'

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...