Sunday, October 29, 2017

मुक्त-मनस्वी!

दिवाळीत दक्षिण गोव्यातल्या अनवट प्रदेशाची सहल करुन आलो, तेव्हा मनात रेंगाळत राहिली ती तिथली समृद्ध वनं, लांबचलांब, शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारे आणि तीन बायका! त्यापैकी दोघी साठी ओलांडलेल्या आणि एक जेमतेम पंचवीस तीसची.
पहिल्या दिवशी संध्याकाळी बीचवर गेलो तेव्हा किना-यावरच्या एका बंगल्यातून त्या दोघी आज्ज्या मस्तपैकी पोहायचे वेश घालून बाहेर पडल्या. समुद्रात लांबपर्यंत गेल्या आणि भीज भीज भिजत बसल्या. आम्ही लांबवर चक्कर मारून आलो तरी त्या समुद्रातच. अगदी अंधारून आलं तसं किना-यावरचे लाईफ़गार्ड समुद्रात गेलेल्यांना बाहेर हाकलू लागले, तेव्हा त्या बाहेर पडल्या. दुस-या दिवशी आम्ही समुद्रावर पोचलो तर या बायका बहुदा शॉपिंग करून आल्या होत्या. गाडीवानाशी काहीतरी थट्टेचं बोलत, हसत हसत आमच्यासमोरच गाडीतून उतरल्या आणि थोड्याच वेळात आमच्यामागोमाग परत समुद्रावर. उशिरापर्यंत समुद्रावर थांबून परत फिरताना मी रोज त्यांच्या त्या समुद्रकाठावरच्या बंगल्याच्या कुंपणावरून आत डोकावून पहात असे. समुद्रात भिजून आल्यावर या बायका बंगल्याच्या अंगणात खुर्च्या टाकून, पाय लांब करून, गप्पा टाकत टाकत आवडत्या दारूचे घुटके घेत बसत असतील असं मला उगीचच वाटत असे :) ते चित्र पुर्ण झालं नाही, पण मला त्या आज्ज्या भारीच आवडल्या. त्यांच्यात काही नातं असेल-नसेल, त्यांची कुटुंबं, गोतावळा कुठे परदेशी असेल, त्यांची काहीतरी गोष्ट असेल...कोणास ठाऊक. तिथे त्या दोघी प्रचंड खूश दिसायच्या. प्रत्येक क्षण असोशीने जगत आहेत असं वाटायचं.
पुण्यात परतण्याच्या आदले दिवशी दुपारी आम्ही आमच्या मुकामाच्या जागी आलो, तर एक परदेशी मुलगी तिथल्या हिरवळीवर आपली सॅक टाकून आरामात बसली होती. पंचवीस-तीस वर्षाची असेल. आम्ही रहात होतो, ते अभयारण्यातलं चारपाच खोल्यांचं एक छोटंसं रिसॉर्ट होतं. त्याचे मालक -पैंगणकर जवळच्याच गावात राहात. अधूनमधून थोडावेळ येऊन जात, एरवी शुकशुकाट. ती त्यांचीच वाट पाहात होती. त्यांना फोन लावून द्याल का म्हणाली, म्हणून आम्ही तिला नंबर दिला. तर मोकळंढाकळं हसत म्हणाली की अजून सिमकार्डच घेतलं नाहीये! तिथे मोबाईलला रेंज नव्हती. एका विशिष्ट जागीच रेंज असे. तिला बरोबर घेऊन त्या जागी गेले आणि फोन लावून दिला. परत खोलीकडे येताना तिचं धन्यवादाचं भाषण संपेचना! थोड्याच वेळात पैंगणकर आले. त्यांच्याशी बोलून तिने खोली ताब्यात घेतली आणि अर्ध्याच तासात पाठपिशवी अडकवून, ताडताड टांगा टाकत कुठेतरी निघूनही गेली. आम्हीही यथावकाश बाहेर पडलो आणि समुद्रावर फिरून, जेवणं आटोपून सावकाश रात्री साडेनऊ दहाच्या सुमारास परत आलो. परदेशी पाहुणीच्या खोलीला कुलूपच दिसलं. तेवढ्यात गाडी घेऊन पैंगणकर आले, त्यांना सहजच विचारलं तिच्याबद्दल. तर ते म्हणाले, "आत्ता ती प्रवेशद्वारापाशी दिसली. तिथून चालत येते आहे. एकटीच आहे. मी गाडी थांबवून माझ्याबरोबर चल म्हणलं, तर थांबलीच नाही. मला ओळखलं नसेल किंवा तशीही ही लोकं फारसं लावून घेत नाहीत. येईल थोड्या वेळात." मी ऐकतच राहिले! प्रवेशद्वारापासून सहजच दोन किलोमीटरचं अंतर होतं. तिथे फक्त राहाण्याच्या ठिकाणी दिवे आहेत, बाकी रस्त्यांवरसुद्धा दिवे नाहीत. छोटे रस्ते आणि दोन्ही बाजूला घनदाट झाडी. त्यात पुन्हा ऐन दिवाळीतला अमावस्येचा काळोख. जंगलभागातल्या वाड्यावस्त्यांवर रात्री बाईकवर एकेकटी जाणारी मंडळी पाहूनही आम्हाला आश्चर्य वाटे. भसकन एखादा प्राणी वाटेवर आला तर भंबेरीच. रात्री जेवणानंतर सगळे मिळून रस्त्यावर फिरत असू तेव्हाही आजूबाजूच्या थोड्याशा हालचालीनेही थरकाप होत असे. अशा ठिकाणी, ही जगाच्या कोणत्यातरी भागातून आलेली मुलगी एकटीच अंधार कापत, चालत येत होती! मला अगदी काळजीच वाटू लागली तिची आणि खूप कौतुकही. वीसेक मिनिटात ती पुन्हा दुपारसारखीच ताडताड टांगा टाकत आली आणि खोलीत अदृष्य झाली. हातात ना टॉर्च होता, ना मोबाईल. किंवा इथे येतायेता सॅकमधे टाकला असेल. अनोळखी मुलखातला प्रवास, एकटीने, तोही अशा दाट जंगलभागात. निर्मनुष्य जागी मुक्काम. उद्या पहाटे आम्ही इथून गेलो की हिच्या सोबतीला इथे चिटपाखरू असणार नाही - किंवा चिटपाखरुच फक्त असणार. या वयात किती समृद्ध अनुभवांना ती पुढे होऊन आलिंगन देते आहे!
मागे कधीतरी वाचलेला एक लेख आठवला ’मोकाट स्वच्छंद कुमारिकांचे देश!’ त्यात म्हणलं आहे - "ज्या देशात कुमारिका मोकाटपणे, स्वच्छंद वृत्तीनं हिंडू शकतात ते देश चिरायु होवोत. इथं कळपाचं काहीतरी आपल्या मनात येतं. तसं नाही, एकट्या कुमारिकेलाही मोकाट आणि स्वच्छंद जगता आलं पाहिजे. दिवसा-रात्रीच्या कोणत्याही प्रहरी कुमारिकेला निर्भयपणे, मोकळेपणाने कुठंही जाता आलं पाहिजे. तिच्या मनास येईल ते करता आलं पाहिजे. मोकाट आणि स्वच्छंद या शब्दांना जबाबदारीच्या मर्यादेत पाहिलं पाहिजे." ...ती ज्या देशातून आली आहे, त्या देशानं, तिथल्या संस्कृतीनं तिच्यात हे मोकाटपण, स्वच्छंदपण रुजवलं असावं का? आणि त्या साठी ओलांडलेल्या बायकांमधेही? ते रुजलं की जगाकडे आणि आयुष्याकडे असं स्वच्छ नजरेने, हसत हसत पहाता येत असेल का? अजूनही त्या तिघी मनात रेंगाळताहेत. विशेषतः ती एकटी मुलगी. तळव्यावर चेहरा टेकून तिच्याकडे पहात मी विचार करत बसले आहे...असं खुल्या दिलानं, आजुबाजूच्या जगावर विश्वास टाकून, मोकळं होऊन एकटं हिंडणं आपल्याला यापुढेतरी कधी जमेल? 

लुईस

लुईस हे’’ ३० ऑगस्टला वयाच्या नव्वदाव्या वर्षी गेली.
.
.
लुईसची आणि माझी ओळख कशी झाली?
:)
.
.
गौरीताई स्वस्ति ची एक कार्यशाळा घेत आहेत हे मला दीपाकडून कळलं.
मग मी गौरीताईंना फोन केला, स्वत:चा शोध आणि स्वत:ला बरं करण्यासाठीची/ठेवण्यासाठीची काही वैचारिक साधनं, असं त्या कार्यशाळेचं स्वरूप होतं.
स्वत:चा शोध हे माझ्या आवडीचं असल्याने आणि गौरीताई आवडीच्या असल्याने, मी त्या कार्यशाळेला गेले.
ती लुईसच्या विचारांवरची कार्यशाळा होती.
काही गोष्टी कळल्या, काही पटल्या काही पटल्या नाहीत, काही समजून घ्यायला अडथळे येत होते आणि काही गोष्टी मी पूर्वीपासूनच करत होते.
आपल्या सगळ्या प्रतिक्रियांच्या, वाटण्याच्या मुळाशी आपल्या धारणा असतात, त्या शोधायला हव्यात, तपासायला हव्यात. बदलून घ्याव्यात, टाकून नव्या स्वीकाराव्यात किंवा जुन्या चालू ठेवाव्यात. हे मला पहिल्यांदा तिथे कळलं. जाणीवपूर्वक मी कधी हे पाहिलेलंच नव्हतं.
हे तर एक भलंमोठ्ठं :) काम मी घरी घेऊन आले.
त्याशिवायही तिथे खूप काय काय शिकायला मिळालं, पण धारणांसंबंधीचं कळणं क्रांतिकारी होतं.
त्यावेळी खरं मी सन राईज कार्यक्रमाची बांधणी करत होते, पूर्वतयारी करत होते, त्यासाठी स्वत:ला तयार करत होते, याची मला कल्पनाच नव्हती.
गौरीताई खूप छान कार्यशाळा घेतात, समजूतीने शिकवतात, त्यामुळे ज्या गोष्टी आकलनाच्या आणि आपल्या वैचारिक परीघाबाहेरच्या असतात/ होत्या, त्या केवळ गौरीताई आहेत, त्यांना अनुभव आहे, त्यांचा विश्वास आहे तर आपण निदान ऎकून घेऊ या, असं झालं.
लुईसपेक्षा लक्षात राहिल्या त्या गौरीताई!
.
येताना लुईसचं ’ यू कॅन हील युवर लाईफ ’ हे पुस्तक घेऊन आले.
जमेल तसं वाचत गेले आणि लुईसची थोडी थोडी ओळख व्हायला लागली.
तरीही मी या बाईपासून मी लांबच होते.
आपण विचारांनी, विचारांच्या साखळ्या बदलून, मनाबरॊबरच शरीरही तंदुरूस्त ठेवू शकतो आणि मुख्य म्हणजे बिघडल्यास, पुन्हा ठीक करू शकतो, यावर विश्वास ठेवण्यात अडचण येत होती.
.
लुईसला स्वत:ला जेव्हा कॅन्सर झाला तेव्हा डाएट आणि विचार बदलून मुख्यत: सगळ्यांना क्षमा करून, तिने स्वत:ला बरं केलं.
कॅन्सर होण्या आधी ती हे सांगतच होती की विचार बदलून तुम्ही स्वत:ला बरं करू शकता,
जेव्हा तिच्यावर वेळ आली तेव्हा तिने ते करून दाखवलं.
.
आपलं शरीर जेव्हा व्यवस्थित चालत असतं तेव्हा शरीरात किती विविध प्रकारच्या आपण अचंबित होऊ अशा प्रक्रिया घडत असतात आणि आपल्याला त्याची जाणीवही नसते, जर शरीर चालवण्याचं ज्ञान शरीरात आहे तर बिघडल्यावर ते दुरूस्त करण्याचं ज्ञानही शरीरात आहे यावर आपण विश्वास का ठेवत नाही? शेवटी याबाबतची आपली धारणा काय आहे? ते महत्त्वाचं असतं.
.
लुईस सांगते की स्वत:वर प्रेम करा, स्वत:चं कौतुक करा, स्वत:ला स्वीकारा, आशादायी राहा, सकारात्मक विचार करा,
जे मिळालंय त्याबद्दल कृतज्ञ राहा. सगळ्यांना क्षमा करा.
तुमचे विचार तुमचं भविष्य घडवतात.
.... या खूप साध्या गोष्टी आहेत पण सोप्या नाहीत, फार अवघड आहेत.
स्वत:वर प्रेम करा... मला वाटलेलं , यात काय सांगायचंय? आपण ते करतच असतो.
पण नाही.  (तरी मी पुष्कळच बरी आहे. :)) खूप लोक असे असतात ज्यांचं खरं स्वत:वर प्रेमच नसतं.
स्वत:च्या दिसण्यावर प्रेम नसतं, स्वत:च्या असण्यावर नसतं, स्वत:च्या वागण्यावर नसतं, विचारांवर नसतं, स्वत:च्या क्षमतांवर विश्वास नसतो,
झाली स्वत:ची चूक की फटकारलं स्वत:ला!, मला हे जमणारच नाही, मला हे झेपणारच नाही, माझी लायकीच नाही, माझ्यावर कुणी का प्रेम करेन?
मी कुणाला का आवडेन?
फक्त तुम्ही स्वत:वर प्रेम करू शकलात तर कितीतरी गोष्टी बदलतील.
स्वत:वर प्रेम करण्यासाठी स्वत:ला स्वीकारावं लागतं,
स्वत:चा पूर्ण स्वीकार ही काही सोपी गोष्ट नाही.
मला तर सारखं स्वत:ला कोरत बसायची सवय आहे,
कुठे कुठे अपुरे पडत असल्याची रूखरूख आहे.
ठीक आहे, स्वत:ची अजून चांगली आवृत्ती हवी आहे, पण आत्ता जशी आहे तशी स्वत:ला स्वीकारायचं आणि तशा स्वत:वर प्रेमही करायचं,
आत्ता समज चौथीत आहे, १० वीतलं येत नाही तर ४ थी तल्या स्वत:ला स्वीकारायला आणि प्रेम करायला अडचण काय आहे? :)
अजून पुढे पुढे तर जातच राहू. :)
यासाठी गरजेचं आहे वर्तमानकाळात राहाता येणं, भूतकाळाचं ओझं नको आणि भविष्यकाळाची चिंता नको.
या सगळ्या एकमेकांशी जोडलेल्या गोष्टी आहेत.
हे सगळं आपल्याला नाटक करायचं नाहीये, हे खरं खरं आतून यायला हवं आहे, त्यासाठी तुम्ही प्रामाणिक असायला हवं.
.
आणखी एक म्हणजे आपला समज असतो की हे सगळं आपण करतोच,
स्वत:वर प्रेम करतोच, इतरांना क्षमा करतोच.
आत खोल खोल जायला लागलं की कळतं,
तसं नाहीये.
स्वत:वर काम करायला लागणार आहे.
मग या साध्या तत्वांचं महत्त्व आणखीनच जाणवायला लागतं.
.
हे सगळं कुणाकुणाच्या आयुष्यात कुठल्या कुठल्या मार्गाने येत असेल, माझ्या आयुष्यात हे लुईसने आणलं.
त्यामुळे मी धारणांवर काम करायला लागले आणि माझी एक मानसिक तयारी सुरू झाली.
जेव्हा माझ्या आयुष्यात सन राईज प्रोग्राम आला तेव्हा तो काही एक कळू शकावा, इतपत काम मी केलेलं होतं.
त्यातही मग आणखी खोल खोल जाण्यासाठी... Acceptanace, non judgemental, Unconditional Love, Hope, be in Present, making happyness the priority.... यावर काम करत, ही वाट समजत गेली.
.
लुईस,
 तू हे सगळं शहाणपण मला देते आहेस,
मी कृतज्ञ आहे.
.
गौरीताई,
हे सगळं तुमच्याकडून आलं, तुम्ही होतात म्हणून मी हे सुरूवातीला गंभीरपणे घेऊ शकले आणि मग मला जमत गेलं, जमतं आहे, करते आहे.
:)
.
.
मी नेटवर कधी फारसं लुईसला शोधलं नव्हतं,
ती गेली आणि मग मी तिचं काय काय यूट्यूबवर पाहात गेले.
आत्ता मी तिला थेट बोलताना पाहिलं.
तिच्या एडस वरच्या कामाबद्दल कळलं,
ती फार खास आहे/ होती.
ती ओघवत्या भाषेत, थेट, ठामपणे, प्रामाणिकपणे, काळजाला हात घालत, ऎकणारांवर प्रेम करत बोलत होती आणि बोलत राहिल. :)
....

Thursday, March 9, 2017

लंच बॉक्स......


हा सिनेमा मुंबईच्या डबा संस्कृतीचा आहे.या डब्याभेवती सिनेमा रंगत जातो.एक नातं फुलतजातं.एक
तरुण बाई आणि रीटायरमेंट्ला  आलेला पुरुष यांच्यातले नातेसंबध .यांची ओळख होत जाते तीच या लंचबॉक्समुळं.हळूहळू त्याचा प्रवास प्रेमाच्या दिशेने होत जातो.

इला (इमरत कौर )....एक मध्यम वर्गातील गृहीणी,तिला एक लहान मुलगी आहे.तिच्या नव-याचे विवाहबाह्य संबंध आहेत.घरी असला तरी मोबाईलमद्ये डोकं घालून बसलेला.
इला, आपल्या हाताने चविष्ठ जेवण बनवून नव-याला खूश करु पहाणारी....
साजन ( इरफान खान ) असाच एक सरकारी काम करणारा....त्याच्या पत्नीचे निधन झाले आहे.आपल्या ऑफीसात तो जेवणाचा बाहेरुन डबा मागवतअसतो. एके दिवशी डबेवाल्याच्या चुकीमुळे इला जो नव-यासाठी डबा पाठवत असते तो साजनच्या हाती येतो.डबेवाल्याच्या लक्षात हे येत नाही आणि इलाचा डबा रोज त्याच्याकडे येऊ लागतो.या डब्यातून त्यांचा पत्रव्यवहार सुरु होतो. दोघे अनोळखी डब्यातून रोज एकमेकांना चिठ्ठ्या लिहायला लागतात.आपली मनं मोकळी करत जातात.प्रत्येक गोष्ट शेअर करु लागतात.मोकळेपणा इतका येतो की आपल्या नव-याचे विवाहबाह्य संबंध आहेत हेही ती त्याच्याशी बोलते.अश्या अनेक चिठ्ठ्यांमधून व्यक्त होत जाताना दोघं भावनिक पातळीवर एकमेकांच्या जवळ येतात.अश्याच एका चिठ्ठीत इला त्याला भूतानला चालली आहे असे सांगते.त्यावर तुझ्या बरोबर मी पण येऊ इच्छितो असे तो उत्तर पाठवतो.अनोळखी व्यक्तीबरोबर कसं भूतानला जायचं म्हणून ते हॉटेलमध्ये प्रत्यक्ष  भेटायचं ठरवतात. ती आतुरतेने वाट बघत असते.पण तो तिला भेटतच नाही.दुस-या दिवशी डब्यातून चिठ्ठी पाठवून ती त्याला न येण्याचे कारण विचारते.त्याला उत्तर म्हणून तो लिहून पाठवतो की तो तिला भेटायला आला होता , पण भेटला नाही कारण इलाच्या तुलनेत तो जास्त वयाचा  होता.तो तिला चिठ्ठीत म्हणतो आपण इथचं थांबाव.एके दिवशी इलाला त्याचा नोकरीचा पत्ता कळतो.ती तिथे जाते पण तो नोकरी सोडून नाशिकला निघून गेलेला असतो.सिनेमाच्या शेवटी तो नाशिकहून परत येतो  आणि तिचा शोध घेत असताना दाखवला आहे आणि पार्शभूमीला डब्बेवाल्यांचे संगीत चालू आहे.

समाजातल्या अश्या अनेक स्त्रीया......
आपल्या सहजीवनातील , रोजच्या जगण्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीतील आनंद ,माझा नवरा,मुलं याभोवतीचं जग  हेच आपलं आयुष्य मानणा-या ,सगळं कसं छान चाललंय हे दाखवण्याची धडपड करणा-या ,मधूनच नाही माझं चांगल चाललय म्हणून पाऊल उचलणा-या  ,गृहीणी म्हणून समाजाच्या असलेल्या मर्यादा संभाळणा-या  , जोडीदाराकडून अपेक्षित असणा-या भावनिक समाधान देणा-या गोष्टी दुस-या कोणा पुरुषाकडून मिळवणा-या अश्या अनेक स्त्रीया आपल्या आजूबाजूला आहेत.या सगळ्यांचं प्रतिनिधित्व इला ही व्यक्तिरेखा करते.सिनेमाची कथा म्हणून आपल्याला हे पटेलही,आवडेल सुद्धा.पण प्रत्यक्षात एखादी स्त्री आपल्या आवतीभोवती अशी असेल तर याकडे आपण कसे बघतो ते महत्वाचे. नाही का ?


Wednesday, March 8, 2017

कहानी - २



कहानी २ ची कहानी बाललैंगिक अत्याचारांवर आहे.
त्यात योगायोगाच्या आणि फिल्मी म्हणाव्यात अशा घटना आहेत.
तरीही योग्य तो संदेश लोकांपर्यंत पोहोचतो असं मला वाटतं.
लहान वय, आजूबाजूच्या जवळच्या, प्रेमाच्या माणसांकडून विश्वासघात, मुलीच्या मनातली भीती, तिचं गप्प गप्प होणं, अशा अनुभवामुळे मोठेपणी पुरूषांची आणि लैंगिक सुखाचीच वाटणारी भीती, याबाबतीत गमावलेला आत्मविश्वास....... कहानी
कहानी आपल्या आजूबाजूला घडणारी आणि आपल्याला माहितच नसलेली, आपण बघू शकत नाही अशी!
पण दुर्गा रानी सिंग? ती बघते, तिला जाणवतं... ती शोधते आणि तडीस नेते.
आपल्या सख्ख्या काकाच्या अत्याचारांना बळी पडणारी छोटी मिनी, काकाच्या बाजूने असणारी सख्खी आजी, त्याच घरात राहण्यावाचून पर्याय नसणारी मिनी.

कहानीत तीन बायका आहेत, एक मिनी, एक तिची आजी आणि एक दुर्गा!
 ( कहानीत एक अत्याचार करणारा काका आहे आणि पहिल्यांदा नाही तरी दुसर्‍यांदा दुर्गाला मदत करणारा पोलीस ऑफीसर आहे. पण आज मला पुरूषांबद्दल बोलायचं नाहीये. )

मिनी लहान आहे आणि आपल्या जवळची माणसे योग्यच वागत असणार अशा भ्रमात ती आहे, तिचे त्रास योग्य आहेत का? ते बोलायला देखील तिला कुणी नसतं.
तिला मग एक दुर्गा भेटते. दुर्गाने लहानपणी हे भोगलेलं आहे. जिवाच्या आकांताने ती मिनीला वाचवू पाहात असते आणि वाचवते.
मिनीत ती छोट्या दुर्गाला पाहात असते. मिनीला ’’ते” आवडतं असं दुर्गाला सांगितलं जातं तेव्हा ती म्हणते की हे कळण्याचं, ठरवू शकण्याचं तिचं वय तरी आहे का? ....
 (.... मुलींना/मुलांना सज्ञान होऊ देत आणि मग काय ते ठरवू देत.)
 मिनीसाठी ती आपल्या प्रियकराला सोडते. अजूनही पुरूषाबरोबर राहण्याची, संसाराची तिला भीती वाटत असते का? ही पळवाट ती शोधते का? प्रियकराला विश्वासात घेऊनही ती हे करू शकली असती.

 यातली आजी जी आहे तिच्या वागण्याने आपल्याला सगळ्यात जास्त धक्का बसतो. ती त्या माकडीण आणि तिचं पिल्लू या गोष्टीतल्या माकडीणीसारखी आहे का? अशा आज्या असत असणार. 'दोघी' मधे आपल्या मुलीला वेश्याव्यवसायाला लावणारी आई आहे. आपल्याला वाटतं कठीण, कसोटीच्या प्रसंगात माणसाने उजळून निघावं. पण माणसं स्वार्थी असतात, भेकड असतात, नैतिकतेची चाड नसणारी असतात, मूर्ख असतात, दुष्ट असतात. अशी माणसं जगायला लायक असतात? की नसतात? सिनेमात जेव्हा ती फिल्मी पद्धतीने मरतात तेव्हा बरं वाटतं.
खरंच बरं वाटतं. वास्तवांत असं घडणं शक्य नाही हे कळत असतानाही बरं वाटतं.

 या प्रश्नात हे महत्वाचं आहे की अत्याचारीत बालकाचं भविष्य त्याच्या भूतकाळातून मोकळं करणं. बालकाचा आत्मविश्वास वाढवणं, त्याच्या/तिच्या मनातला अपराधभाव काढून टाकणं.

 अशा अत्याचारांच्या विरोधात निर्भीडपणे उभं राहायलाच हवं असं आपल्याला आतून जे वाटत असतं, ते दुर्गा करते. ती उजळून निघते. तिच्या आयुष्याचं ध्येय बनवते. एका मुलीला एक सुरक्षित भविष्य देऊ करते. त्या दोघींमधे एक छानसं आश्वासक नातं तयार होतं.
 यातलं दुर्गाचं काम विद्या बालनने फार छान केलं आहे. आपल्या दिसण्याची आणि फिगरची ती अजिबात पर्वा करत नाही. व्यक्तिरेखेशी एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करते. ती बाई म्हणून उभी आहे किंबहुना तिचं बाईपण दाखवणारा चित्रपट आहे आणि ती कुठेही दुय्यम नाहीये ती ’हिरो’ आहे. नायिका ’हिरो’ असणारे चित्रपट येताहेत आणि यायला हवे आहेत. आपल्या आयुष्यात आपण ’हिरो’ असतो हे आपण बायकांनी मनावर बिंबवायला हवं. :)


 स्त्री आणि पुरूष या नात्यांत भीती आली की ते विद्रूप होतं. भीती म्हणजे धाक नाही, भीती म्हणजे हा आपल्या तनामनावर अत्याचार करेल ही भीती! जेव्हा स्त्रीचं पुरूषाशी भीतीमुक्त नातं असतं.... बहीणीचं भावाशी,  मैत्रिणीचं मित्राशी , आईचं मुलाशी, बापाचं लेकीशी.... ते फार सुंदर असतं.

 पुरूषांबरोबरची अशी सुंदर नाती तुमचं आयुष्य फुलवत जावोत ही आजच्या महिलादिनी शुभेच्छा!


हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...