Wednesday, June 15, 2011

नावात काय आहे!


मुलींनी लग्नानंतर नाव - आडनाव बदलू नये. नाव ही आपली ओळख असते. लग्नामुळे ती का बदलली जावी? पुरूषांची बदलते का?
कोणाची बायको म्हणून ओळखली जाण्यापेक्षा कुणाची मुलगी म्हणून ओळखलं जाणं मला पसंत आहे. मी जशी आहे तशी माझ्या बाबांनी मला स्वीकारलीच असती. आई - बाबांनी मला वाढवलं ते आपलं मूल म्हणून! मी घडत गेले. माझ्या नवर्‍याने माझ्याशी लग्न करायचे ठरवले ते माझ्यातल्या काही गोष्टी पटल्या / आवडल्या म्हणून! म्हणजे आमचं नातं विनाअट नाही.
 बाबांचं तसं नाही म्हणजे नसावं, वडील आहे त्या क्षमतांसह अपत्याला स्वीकारतात / स्वीकारावं. मला आईचं नाव लावायलाही आवडलं असतं, ते माझ्या हातात नव्ह्तं.
 मी लग्नानंतर माझं नाव/ आडनाव बदललं नाही. त्यामुळे जिथे जिथे मला किंवा मिलिन्दला आम्ही नवरा - बायको आहोत हे सांगायची गरज पडते, तिथे तिथे आमचं मॅरेज सर्टीफिकेट दाखवावं लागतं. साधं कुरीअरने आलेलं पत्र सही करून घ्यायचं असलं तरी कधी कधी तुमचं आडनाव वेगळं कसं? तुम्ही यांच्या कोण? असे प्रश्न विचारले जातात. मला ते सवयीचं झालं आहे.
 आमच्याकडे मोठे मूल बाबाचे नाव लावेल आणि धाकटे आईचे लावेल असे आम्ही ठरवले होते. त्याप्रमाणे सुहृदचे नाव शाळेत आम्ही सुहृद विद्या कुळकर्णी असे लावले होते.

त्रिनाम पद्धतीत आडनाव न लावता नावापुढे आईचे आणि वडिलांचे फक्त नाव लावतात. आडनावे किती वैशिष्ट्यपूर्ण असतात!, ती सोयीची आहेत, ती आपल्या समाजाची ओळख आहे. ती मिटून जावी असे मला वाटत नाही. आडनावामुळे जातीचा अंदाज येतो किंवा जात कळते. जे जात मानत नाहीत त्यांनी ही जातीवाचक ओळख नको व आई, वडीलांचे दोघांचेही नाव लावायचे अशी पद्धत सुरू केली. यावर माझे म्हणणे असे होते की इतर गोष्टींवरूनही लोक जातीचा अंदाज बांधतच असतात आणि जात हे आपल्या समाजातील वास्तव आहे ते असे वरवर नाकारून काय फायदा? जात आहे ती स्वीकारून आपले वर्तन जातीनिरपेक्ष ठेवले पाहिजे.

माझे नाव लावण्यावर  जवळचे नातेवाईक आणि माझ्या मैत्रिणीदेखिल अनेक प्रश्न विचारीत. पटकन हे कोणालाच पटायचे नाही. म्हणजे
”अगं एका घरात भावाबहीणींची नावे निराळी असली तर त्यांच्यात दुरावा येईल? ”
”का? आत्ताही बहीणीच्या लग्नानंतर दोघांची आडनावे वेगळी होतातच की!
” आता आईचं नाव येतंच की दहावीच्या प्रमाणपत्रावर?”
” नाव येतं आडनाव नाही! ते प्रमाणपत्र म्हणजे मुलाची ओळख नाही.”
” मूल वडीलांच्या कुळातलं असतं म्हणून ते नाव लावायचं”
” ते आईच्याही कुळातलं असतंच की!”
यावर आणखी पुढे तर मी म्हणते असे, ”माझं मूल हे माझं मूल आहे हे नक्की! ते मी सांगते माझ्या नवर्‍याचं आहे म्हणून त्याचं आहे!” ... हे तर कोणालाही झेपत नसे.
 आम्ही सुहृदचं नाव ठरवल्याप्रमाणे टाकलं. पहिलीत गेल्यावर नावाची नोंद शासन दरबारी होते. त्यामुळे जन्माचा दाखला लागतो. तो दिला. त्यावर आईचं फक्त नाव आणि वडीलांचं पूर्ण नाव असं असतं. आईचं आडनाव नाही. त्यामुळे शाळेने चौकशी केल्यावर कळले असे नाव ठेवायचे असल्यास गॅझेटमधे बदलून घ्यावे लागेल. ( खरे म्हणजे बदलायचे काही नव्हतेच! फक्त लावायचे होते.)
 अशी नावें ठेवणार्‍या इतर पालकांनी काय केले? हे जाणून घेण्यासाठी गणेश विसपुते यांना फोन केला. त्यांनी आपल्या मुलींची नावे त्रिनाम पद्धतीने ठेवलेली आहेत. त्यांनाही आता दहावीला गॅझेटमधे नाव (परत एकदा) आणायला लागणार होते. ते म्हणाले ,” आपण ठाम राहायचं, म्हणायचं आमच्यात असंच आहे. त्या साऊथ इंडियन लोकांना कोणी विचारत नाही तुमचं नाव असंच का? हवी ती कागदपत्रे पुरवीत राहायचं.”
त्यानंतर सचिनला फोन करून श्रुती पानसे आणि इब्राहिम खान यांनी त्यांच्या मुलाचं नाव काय घातलं आहे? त्यांचा अनुभव काय आहे? हे विचारून घ्यायला सांगीतलं.
 त्यांनी रूढ पद्धतीप्रमाणेच नाव घातलेलं आहे नाहीतर फार कटकटी असतात. तो पुढे म्हणाला, विनय र. र. यांनी त्यांच्या मुलीचं नाव त्रिनाम पद्धतीप्रमाणे ठेवलं आहे, त्यांच्या मुलीने मात्र आपल्या मुलाचे नाव रूढ पद्धतीने ( वडीलांचे नाव आडनाव लावून) घातले आहे. सततच्या कटकटींना ती वैतागलेली होती. तिचे स्वत:चे नावही आई- बाबांनी रूढ पद्धतीने ठेवले असते तर बरे झाले असते,असे तिला वाटते. रश्मीताई म्हणाल्या ,” नाव वेगळ्या पद्धतीचे असले की बरीच कागदपत्रे लागतात, गॅझेटमधे नाव बदलून घेऊनही मनिषाताईंच्या मुली्ला दहावीच्या ऎन परीक्षेत नावामुळे त्रास झाला.”
 एकूण काय तर आईचे नाव/ आडनाव मुलांनी लावावे हे स्वीकारण्याची समाजाची / चौकटीची तयारी नाही. नसेल तर कोणीतरी लढायला हवं. अगदी खरं आहे.
 माझी लढायची तयारी नाही. आज माझ्यासाठी तो शाळेत नीट डबा खाईल ना? पूर्णवेळ शाळेत रूळेल ना? घाबरणार नाही ना? हे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत. त्याच्या इतर चिंता मला नसत्या तर मी लढलेही असते. आता मी त्या मनस्थितीत नाही.
 मिलिन्द म्हणाला ,” तू याकडे सोय म्हणून पाहात असशील तर हरकत नाही, तुला हा तुझा पराभव आहे असं वाटत असेल तर लढायला हवं”
 मी म्हणाले,” ही सोय आहे. कशाच्या बदल्यात काय मिळवायचं याचा मी व्यावहारीक विचार करते आहे. नावासाठी इतक्या कटकटींना सामोरं जाण्याची माझी इच्छा नाही. आज माझ्यात ती ताकदही नाही. पूर्वी मला या मुद्द्याविषयी जितकं तीव्रतेनं वाटायचं ते आज वाटत नाही.”

मग शाळेत जाऊन मी सुहृदचं आधीचं नाव खोडून ते बाम सुहृद मिलिन्द असं केलं.

*****
सुहृदला विचारलं, ” तुझं नाव तुला आत्ता आहे तसं सुहृद विद्या कुळकर्णी असं आवडेल की सुहृद मिलिन्द बाम असं आपल्या ताईसारखं आवडेल?”
”मला माझं नाव सुहृद विद्या कुळकर्णी असंच आवडतं.

******

हल्ली मी विचार करते तो समाज जावू देत खड्ड्य़ात! मी काही समाज बदलण्याचा मक्ता घेतलेला नाही! माझं काय चाललं आहे ते समाज बघतो तरी का? मला साथ देतो का? नाही ना! मग मी का विचार करायचा? मी पण माझ्यापुरतंच बघीन.

दरवेळी हे जमेल का? मला माहित नाही.

*******

हा माझा पराभव आहे का? मी ’सोयी’आड दडते आहे का?
नसावं. हा बदल मी खूप सहजतेने केला आणि स्वत:ला काही लावून घेतलं नाही.
बहुदा मी समजदार झाले असेन.

******

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...