Saturday, March 31, 2012

चौकटीतले स्वातंत्र्य


 जन्मत: आपल्याला कुठल्याही प्राण्याला असावे इतके स्वातंत्र्य असते.
किंबहुना स्वातंत्र्याची व्याख्या मी अशी करते आहे की मी / किंवा कुठलीही व्यक्ती जगात एकटी असती तर तिला जे असेल,  "हवं तसं वागणं, हवं तसं बोलणं, हवं तसं वावरणं, हवं ते करणं, ....+++... यांची मुभा," ते म्हणजे स्वातंत्र्य!
 आपल्या आयुष्यात दुसरी व्यक्ती आली की तिला जागा करून द्यावी लागतेच.
आपण एका घरात , कुटूंबात, समाजात, देशात जन्माला आलेलो असतो म्हणून आपलं एकेक स्वातंत्र्य आपल्याला गमवावं लागतं त्याबदल्यात एकेक सुविधा आपण मिळवत जातो. बरेचदा आपल्याला  काही निवडता येत नाही.
 एका घरात, कुटूंबात राहायचं तर आपल्याला तसंच घडवलं जातं. म्हणजे लहानपणी तर परावलंबनच असतं ना? माणसाच्या पिल्लाचं बालपण सर्वात अधिक काळ असतं.
 समाजात राहायचं तर एक सुव्यवस्था लागते. न्यायव्यवस्था लागते. मग काही नियम पाळावे लागतात. नियम आले की स्वातंत्र्याचा संकोच होतो.
 हे नियम पाळायचेच असं आपल्यात इतकं रुजलेलं असतं की आपल्या स्वातंत्र्याला मर्यादा घालण्यात आल्या आहेत हेच मुळी आपल्या लक्षात येत नाही.
 अगदी टोकाचं उदाहरण द्यायचं तर ’कपडे न घालण्याचं’ स्वातंत्र्य आपल्याला नाही. आपली त्याबद्दल काही तक्रार नाही.
 असे कित्येक नियम आपण चालवून घेतो, का? तर शेवटी आपण आपल्या काळाची अपत्ये असतो. आपल्या विचारांवर ही बंधने येतात.
 म्हणजे सुविधा मी नाकारत नाही, नाकारायच्या म्हंटल्या तरी ते शक्य नाही, त्यामुळे माझं स्वातंत्र्य मर्यादित झालं आहे, एवढंच मी निदर्शनास आणू इच्छिते.
पुरूष असो वा स्त्री तिला हे मर्यादित स्वातंत्र्यच बहाल झालेलं आहे.
म्हणून मी म्हणते की मला चौकटीतलं स्वातंत्र्य आहे.

आमचं घर काही स्त्री-पुरूष समानतावादी नव्हतं. आमच्या घरात बाबांची हुकूमशाहीच होती, जशी की इतर आजूबाजूच्या घरांमधे होती. बाबा माझ्याबाबतीत वेगळे वागले आणि मीही त्यांना तसं वागायला भाग पाडलं. बाबांना वाटे, मुलींनी शिकावं, धीट असावं, स्वत:च्या जबाबदारीवर कामं (बाहेरची) करावीत, पण हे सारं करून शेवटी पुरूषाच्या आज्ञेत असावं. त्यांच्या बहीणी, त्यांच्या आत्या, त्यांची आई ह्या अशा धीराच्या, हिंमतीच्या बायका होत्या. माझी आत्या, सात महिन्यांची गरोदर बाई, येरगी ते वडगाव, सत्तरएक किलोमीटरचं अंतर घोडीवर बसून आली होती. त्या मुलांच्या शिक्षणासाठी घर करून शहरात राहिल्या. पण त्यांनी कुणीही पुरूषसत्तेला आव्हान दिलं नाही. घरातल्या पुरूषांना समजावून, प्रसंगी विरोधात जावून, कामं केली. तरीही पुरूषांचं वर्चस्व त्यांना मान्य होतं.
 माझ्यात मुलगी/ बाई म्हणून कोणी बरोबरीनं वागलं नाही तर भांडायची खुमखुमी आधीपासूनच होती. माझ्याइतकीच घरातली कामे माझ्या भावाने केली पाहिजेत याबाबत मी आग्रही असे. मुली फारशा इंजिनिअर होत नाहीत, तर तिसरी चौथीतच मी इंजिनीअर व्हायचं ठरवून टाकलेलं. घरात कुणाचा विरोध नव्हता , बाकीच्यांकडे मी लक्ष दिले नाही.
 माझी आई निमूटपणे सगळंच चालवून घेत आली. तिच्या वतीने मी वेळोवेळी भांडत आले. मी FE ला असताना, बाबांचे दोन मित्र सपत्नीक काशी आणि आजूबाजूचं काही असं यात्रा + सहल , जाणार होते. बाबांनी त्यांच्याबरोबर जायचं ठरवलं.
मी म्हणाले, "आईला घेऊन जा."
" तुला इथे एकटीला राहावं लागेल."
" मी राहीन, माझी काळजी करू नका."
मग म्हणाले, " दोघांच्या खर्चाचे पैसे जरा जास्त होताहेत."
" ठीक आहे. कुणा एकट्यालाच जाता येणार असेल तर आईला जाऊ दे, तुम्ही यापूर्वी काशीला गेलेला आहात."
बाबांच्या मित्रांनीही आग्रह केला. शेवटी आई बाबा दोघेही त्या पंधरावीस दिवसांच्या सहलीला गेले.
मी घर सांभाळलं. पुढेही माझ्यावर घर सोडून ते दरवर्षी एका सहलीला जायचे.
आईबाबा घरी नाहीत म्हणजे आम्ही मैत्रिणी धमाल करायचो! मी कॉलेजमधे असायचे तेव्हढा वेळ वगळला तर सतत मैत्रिणी घरात. आमचं घर म्हणजे अड्डाच झालेला असायचा.
मी भांडून, वाद घालून आईबाबांना बदलणं भाग पाडलं. त्यांची मूल्ये बदलली आहेत का? पूर्णपणे नाही. ते माझ्यापुरते आणि माझ्यासाठी बदलले आहेत. (त्यामुळे पुष्कळच उदार झाले आहेत.)
माझ्या जवळच्या माणसांना माझ्यासाठी बदलायला लागतं, माझ्याशी समानतेने वागायला लागतं कारण त्यापेक्षा कमी, मी काही चालवूनच घेत नाही. माझं त्यांना सांगणं असतं, माझ्यानिमित्ताने बदला पण बदला, माझ्यापुरते बदलू नका.

 मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नाही. आर्थिक स्वातंत्र्य ही गाभ्याची गोष्ट असते. ( यावर पूर्वी लिहून झालं आहे.)
शारीरिकदृष्ट्या स्वतंत्र आहे का? नाही,
 म्हणजे वावरण्याचं स्वातंत्र्य यावर अवलंबून असतं.  पण ते मी उपभोगू शकते का? पूर्णपणे नाही.  त्यामुळे समाजाच्या चौकटीत ज्या वेळांमधे , ज्या परिसरात वावरण्याला मान्यता आहे, तिथे मी फिरू शकते. रात्री बेरात्री फिरायला मला मदत लागते.
मानसिकदृष्ट्या/ भावनिकदृष्ट्या  स्वतंत्र आहे का?. पूर्णपणे नाही.
  कठीण परिस्थितीत मला आधार हवा असतो, मी धडपडत स्वत: बाहेर येण्याचा प्रयत्न करते, बरेचदा मला जमतं पण माझी खूप दमछाक होते. मी सावरू शकते, असं वाटतंय, काय सांगावं? मला खात्री नाही.
 लैंगिकदृष्ट्या स्वतंत्र आहे का? नाही.
हो, नाही म्हणता येणं, आपल्या इच्छेचा आदर केला जाणं हे या स्वातंत्र्याचा छोटा हिस्सा आहे.
 इथे एक लक्षात घ्या, ते स्वातंत्र्य उपभोगण्याची माझी इच्छा आहे की नाही हा वेगळा भाग झाला, मुळात मला ते स्वातंत्र्य आहे का? तर नाही. माझ्या शरीरावर माझा अधिकार आहे का? आहे. पण नाहीच अशी माझी समजूत आहे.
वैचारीकदृष्ट्या स्वतंत्र आहे का? नाही.
 मी मघाशी लिहिलंय त्याप्रमाणे आपण आपल्या काळाची अपत्ये असतो. माझ्या घडवण्यात, माझ्या समाजात जो विचार केला जातो, तसाच विचार करायची सवय मला लावली गेली आहे. मी चौकटीची थोडी मोडतोड करते , माझ्या मापाची करू पाहते, बस! तेही पूर्वपिढ्यांनी जो विचार करून ठेवलाय त्या आधारे.
कुठले निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मला आहे? कुठले नाही?
 आर्थिक निर्णय मी घेत नाही कारण ते घेण्याइतकं त्यातलं मला कळत नाही. बाकी घर चालवण्यासाठीचे चौकटीतले निर्णय आम्ही दोघे मिळून घेतो. चौकटीबाहेरचे काही निर्णय घ्यायची (म्हणजे आम्हां दोघांच्य़ चौकटीबाहेरचे) वेळ आली नाही.
 रोजच्या दिवसभराच्या कामात स्वतंत्र आहे का? नाही.
घरातल्या रोजच्या कामासाठी मी मावशींवर अवलंबून असते.

या वरच्या सगळ्या गोष्टींमधे बाई म्हणून माझं काय वेगळेपण आहे, या चौकटी तर पुरूषांनांही आहेतच ना?
हं, माझ्या वावरण्याच्या स्वातंत्र्यावर त्यामुळे बंधने आली आहेत.

माझं काय आणि तुमचं काय चौकटीतलं स्वातंत्र्य आहे. तुम्हांला चौकटींचा काच होतो का? मला होतो.
मला जर असं वाटलं की शहरातल्या सुनसान रस्त्यांवरून मला मध्यरात्री फिरायचं आहे, तर ते शक्य नाही, याचा मला त्रास होतो.

चौकटीतलं स्वातंत्र्य मला आहे का? तर आहे.
कितीकजणींना तेही नसतं.
बायकांना निदान तेव्हढं स्वातंत्र्य मिळावं यासाठी मी आग्रही असते.
पूर्वी या प्रश्नाकडे पाहताना मी, स्वत:चा आणि माझ्या गटातल्या स्त्रियांचाच यात अंतर्भाव करायचे.
आता मला यात वेश्यांचाही अंतर्भाव करता येऊ शकतो आहे.
कुठल्याही स्त्रीकडे पाहताना नेहमीचे पवित्र-अपवित्रतेचे चष्मे मी लावत नाही.
आता समाजात होणारी पुरूषांचीही गोची माझ्या लक्षात येते आहे.

माझ्या नात्यातल्या स्त्रिया, मैत्रिणी, आमच्या कामवाल्या मावशी किंवा इतर माझ्या संपर्कातल्या स्त्रियांशी वागताना मी माझ्याइतकंच स्वातंत्र्य त्यांना आहे, त्यांना ते मिळालं पाहिजे याची काळजी घेते.
लग्नानंतरही मी आमच्या (आईबाबांच्या) घराची सदस्य आहेच, ते घर मी सोडलेले नाही, सर्वार्थांनी, त्याप्रमाणेच माझ्या नणंदांचं संगमनेर हे घरच आहे, त्या आतल्या वर्तूळात आहेत, हे मला मान्यच आहे. आईच्या हक्कांसाठी मी भांडत आले. कायम मी स्त्रियांची बाजू समोर आणत असते त्यामुळे माझ्याशी वागताना समोरच्या व्यक्तीला ते जाणवत असावं. काही वेळा जाणवलं आहे हे कळतं. लग्नाळू मुलामुलींना तर मी सांगतेच.
  स्वातंत्र्य हवं आणि त्याबरोबर येणार्‍या जबाबदार्‍यांचीही जाणीव हवी. तरच तुम्ही भरभरून जगू शकता. घर जर दोघांचं आहे तर हक्क आणि जबाबदार्‍यांचीही वाटणी समसमान हवी.
नुसती आर्थिक जबाबदारी नव्हे. जेव्हा आपण जबाबदारी उचलत असतो, तेव्हाच कर्तव्यपूर्तीचं समाधान मिळू शकतं. आमच्या घरातल्या वाटणीत मी पैसे कमावत नाही, त्याशिवायच्या सगळ्याच जबाबदार्‍या घेऊ शकते, घेते. मिलिन्द पुण्यात नव्हता तेव्हाही मी पूर्ण घर चालवत होतेच. शिवाय त्याच्या आणि माझ्या नातेवाईकांना सांभाळण्याचं काम बर्‍यापैकी माझ्याकडेच आहे. मुक्ता आणि सुहृदच्या शाळेसंबंधातल्या बर्‍याच गोष्टी मी पाहते. मिलिन्दला सांगते, विचारांनी तो सोबत असतोच, मुख्यत: ते मीच पाहते. काही गोष्टी त्याला वेळेमुळे शक्य होत नाहीत. तो माझ्यावर अवलंबून नाही, मीही त्याच्यावर अवलंबून नाही पण सगळ्या वैचारिक बाबींमधे आम्ही एकमेकांबरोबर असतो.
  स्त्रियांच्या स्वातंत्र्याबद्दल मी जागरूक असते एवढेच नाही तर पुरूषांच्या स्वातंत्र्याबद्दलही असते.
सगळ्यात जवळच्या नात्यात म्हणजे नवर्‍याला मी स्वातंत्र्य देते. हे मी त्याच्याकडूनच शिकले हे कबूल करायला हवं. प्रेम म्हणजे हक्क आणि बांधून ठेवणं असाच माझा समज होता. मी हे शिकले की प्रेम म्हणजे हक्क असला तरी बांधून ठेवायचं नाही, तरी त्याने बांधून असायचं.
लग्नाच्या नात्यात आम्ही दोघेही बर्‍यापैकी स्वतंत्र आहोत. यासाठी मी बरीच वर्षे घेतली.

 चौकटीतले स्वातंत्र्य मी भरभरून उपभोगते, माझ्यापुरती चौकट मोडते, मोठी करू पाहते. माझ्यापुरतं काही करायचं हे मला आवडत नाही, पटत नाही. इतर स्त्रीपुरूषांनांही हे काच होऊ नयेत असं मला वाटतं. नुसती मी स्वतंत्र असून उपयोग नाही, समाजाने माझं स्वातंत्र्य स्वीकारायला हवं. इतरांच्या नजरा बदलायचं बळ माझ्यात नाही. ते सगळ्यांनी मिळूनच केलं पाहिजे.
 सगळ्यांनी जबाबदारीसह येणारं स्वातंत्र्य पेललं पाहिजे, आहे ती चौकट मोठी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे आपल्याला फायदा होईलच
आणि
आपल्या मुलींसाठीची वाट आणखी प्रशस्त होऊ शकेल.

7 comments:

  1. "हे नियम पाळायचेच असं आपल्यात इतकं रुजलेलं असतं की आपल्या स्वातंत्र्याला मर्यादा घालण्यात आल्या आहेत हेच मुळी आपल्या लक्षात येत नाही."

    "चौकटीतलं स्वातंत्र्य" असा विचार मी केला नव्हता. म्हणजे प्रत्येकाने आपली चौकट ठरवलेली असते किंवा प्रत्येकासाठी एक चौकट ठरवली गेलेली असते. त्या चौकटीत पंख पसरता आले की आपल्याला आपण स्वतंत्र आहोत असा भास होतो!

    सध्या मी 'महापुरुषांच्या नजरेतून स्त्री' हे मंगला आठल्येकरांचे पुस्तक वाचते आहे. त्या पार्श्वभूमीवर हे मला अगदी पटलं.

    ReplyDelete
  2. विद्या,

    हे ’चौकटीतलं स्वातंत्र्य’ ही कल्पना मला तरी नीट उमगली नाही. चौकट हा शब्दच मुळात बंधन दर्शवतो; त्यामुळे मी चौकट न म्हणता व्यवस्था म्हणीन. तू म्हणतेस तसं प्रत्येक व्यवस्थेचे काही फायदे तर काही नियम असतातच. मुळात ही व्यवस्था मान्य करायची का नाही हे स्वातंत्र्य तूला आहेच की! (निदान मला तरी असं वाटतं.) तूच मागे लिहीलं होतस त्या ’उत्सुकतेने मी झोपलो’ पुस्तकात कुटूंब व्यवस्था माणसाच्या सर्वांगीण उत्कर्षाच्या आड येते का ह्याचा उहापोह केला होता. ही कुटूंब व्यवस्था मान्य करायची का स्वतंत्र रहायाचं ह्याचं स्वातंत्र्य आपल्यापैकी बहुतांशांना असावं आणि आहे. पण एकदा ही व्यवस्था मान्य केली तर मग तिला चौकट मानणं मला योग्य वाटत नाही. तसंही कोणतीही चौकट ही आपल्यावर लादलेली नाहीच; जर कोणत्याही चौकटीचा जाच व्हायला लागला तर तॊ तुम्ही मोडू शकता. आणि व्यवस्थेचे नियम हे व्यवस्थेचे फायदे घेणार्‍या सार्‍यांनाच लागू आहेत.

    तू ज्याला दुसर्‍यांवर अवलंबून आहे असे म्हणतेस ते सर्व तूच तुझ्या फायद्यासाठी घेतलेले निर्णय नव्हेत का? तू घरकामासाठी मावशींवर अवलंबून आहेस का? मावशी चार दिवस आल्या नाहीत तर ती कामं तू करूच शकत नाहीस का? तसंच आर्थिक स्वातंत्र्याच्या बाबतीत. एकदा कुटूंब व्यवस्था मान्य करायची असा निर्णय घेतल्यावर ’तू नोकरी नं करणं आणि घर सांभाळणं, आणि मिलिंदने अर्थार्जनाची जबाबदारी उचलणं’ हा ती व्यवस्था नीट चालावी ह्यासाठी तुम्ही दोघांनी परस्पर सामंजस्याने घेतलेला निर्णय नव्हता का? तो कोणी नक्कीच तुझ्यावर लादलेला नाही; आणि आताही तू परत नोकरी करायची म्हंटलंस तर त्याचं स्वातंत्र्य तुला नाही आहे का? आर्थिक निर्णय मिलिंदवर सोपवणे हाही तू एक तुझ्या सोयीचा निर्णय घेतला आहेस. अन्यथा हे निर्णय घेण्याची क्षमता आणि स्वातंत्र्य तुझ्याकडे नक्कीच आहे.
    आपण ज्या प्रकारे वाढत जातो त्याप्रमाणे आपली विचारपद्धती घडते ह्यात तथ्य आहेच; पण त्याला पर्याय काय? ती वस्तुस्थिती आहे; पण त्याला विचारस्वातंत्र्यावर बंधन म्हणणं योग्य होणार नाही. लहान असताना विचार करण्याची आपल्यात कुवत नसते. पण आता ती कुवत प्राप्त झाल्यावर कोणी तुला असाच विचार कर आणि असा करू नकोस असं कोणी बजावतं का? मग ते बंधन कसं होऊ शकतं? तू वैचारीक दृष्ट्या स्वतंत्रच आहेस ना मग?

    मला वाटतं की स्वातंत्र्याची व्याख्या करताना आपण एखाद्या व्यवस्थेचे फायदे उठवण्यासाठी पाळायचे नियम आणि दुसर्‍याने (व्यक्ती किंवा समाज) आपल्या मर्जीविरूद्ध लादलेली बंधने ह्यात नीट फरक करणे आवश्यक आहे.

    - सचिन

    ReplyDelete
  3. आपल्या मुलींसाठीची वाट प्रशस्त होऊ शकेल... एकदम सही !!
    माझ्या एका मैत्रिणीचा ’दिलदार’ नवरा बोलता बोलता सहज मला म्हणाला," तिची ती स्वतंत्र आहे, ’आपली’ तिला कशालाही परवानगी असते". परवानगी शब्द येतो ते कसले आलेय स्वातंत्र्य, पण यात काही चुकीचे आहे असे त्याला आणि दुर्दैवाने (की सुदैवाने!) तिलाही जाणवले नाही.ती तिच्या चौकटीत खूष आहे.
    मला वाटते चौकट वाढवणे शक्य आहे पण ते फार चिकाटीचे काम आहे. चौकटीवर लक्ष ठेवून असणार्‍या माणसांशी मन दुखावणार नाहीत पण मुद्दा पटेल असा वाद घालण्याचे कौशल्य मिळवले तरच चौकट मोठी होऊ शकते. पण त्यात आयुष्य़ातली उमेदीची वर्ष खर्ची पडतात मग चौकट मोठी झाली तरी ते स्वातंत्र्य ’उपभोगण्याचा’ उत्साह उरत नाही. पण तू म्हणालीस तसे.. किमान आपल्या मुलींसाठी हे करत राहायला हवे.

    ReplyDelete
  4. अश्विनी,
    >> प्रत्येकाने आपली चौकट ठरवलेली असते किंवा प्रत्येकासाठी एक चौकट ठरवली गेलेली असते.
    खरं आहे.
    >> त्या चौकटीत पंख पसरता आले की आपल्याला आपण स्वतंत्र आहोत असा भास होतो!
    हो. कुणाकुणाला त्यासाठीही झगडायला लागतं.

    कौस्तुभ, धन्यवाद!

    सचिन, तू चौकट म्हणालास काय व्यवस्था म्हणालास काय, वस्तु्स्थिती बदलत नाही.
    >>मुळात ही व्यवस्था मान्य करायची का नाही हे स्वातंत्र्य तूला आहेच की!
    नाही. मला या समाजात राहायचं असेल तर व्यवस्था नाकारता येणार नाही.
    >>ही कुटूंब व्यवस्था मान्य करायची का स्वतंत्र रहायाचं ह्याचं स्वातंत्र्य आपल्यापैकी बहुतांशांना असावं आणि आहे.
    बहुतांशांना हे स्वातंत्र्य नाही.
    >> जर कोणत्याही चौकटीचा जाच व्हायला लागला तर तॊ तुम्ही मोडू शकता.
    नाही मोडू शकत.
    >> तू घरकामासाठी मावशींवर अवलंबून आहेस का? मावशी चार दिवस आल्या नाहीत तर ती कामं तू करूच शकत नाहीस का?
    चार दिवस करू शकते पण पाचव्या दिवशी दमून जाते.
    त्यामुळे सध्या मी त्यांच्यावर अवलंबून आहे, हे चित्र बदलत नाही. मी त्यांच्यावर अवलंबून आहेच.

    आणि
    कुठलीही व्यवस्था मान्य केली म्हणजे पॅकेज डील आहे का? सगळंच मान्य असायला हवं का? काही नियम मान्य नाहीत असं असू शकतं ना.

    >>आपण ज्या प्रकारे वाढत जातो त्याप्रमाणे आपली विचारपद्धती घडते ह्यात तथ्य आहेच; पण त्याला पर्याय काय? ती वस्तुस्थिती आहे; पण त्याला विचारस्वातंत्र्यावर बंधन म्हणणं योग्य होणार नाही.
    ही सहजी बाजूला सारता येणार नाही अशी बंधनेच आहेत.
    वस्तुस्थिती आहे म्हणून काय काय स्वीकारायचं?

    >>तुला असाच विचार कर आणि असा करू नकोस असं कोणी बजावतं का?
    असं कोणी समोरासमोर बसून बजावत नाही पण अप्रत्यक्षपणे दबाव असतोच.
    तू नाही का मी ’वैचारिकदृष्ट्या स्वतंत्र आहेच असं बजावत आहेस" ? :)

    >> मला वाटतं की स्वातंत्र्याची व्याख्या करताना आपण एखाद्या व्यवस्थेचे फायदे उठवण्यासाठी पाळायचे नियम आणि दुसर्‍याने (व्यक्ती किंवा समाज) आपल्या मर्जीविरूद्ध लादलेली बंधने ह्यात नीट फरक करणे आवश्यक आहे.
    हे इतकं ढोबळ नाही आहे. काहीतरी विचारांनी केलेली मांडणी आहे.

    मोहिनी,
    >> मला वाटते चौकट वाढवणे शक्य आहे पण ते फार चिकाटीचे काम आहे. चौकटीवर लक्ष ठेवून असणार्‍या माणसांशी मन दुखावणार नाहीत पण मुद्दा पटेल असा वाद घालण्याचे कौशल्य मिळवले तरच चौकट मोठी होऊ शकते.
    खरं आहे.
    >>चौकट मोठी झाली तरी ते स्वातंत्र्य ’उपभोगण्याचा’ उत्साह उरत नाही
    असं नको व्हायला. तरी मला वाटतं ते स्वातंत्र्य माझ्या खिशात आहे याचंही मला समाधान वाटेल, मी उपभोगीन किंवा नाही नंतरची गोष्ट आहे. :)

    ReplyDelete
  5. स्वातंत्र्य या विषयावरील इतर लेखांवर प्रतिक्रिया देऊन झाल्यात. आता ही शेवटची प्रतिक्रिया. (हुश्श!)

    खरं सांगायचं तर मला असं वाटलं, की विषय ठरवताना तो अधिक स्पष्ट करायला हवा होता. (की प्रत्येकाला विषयाचा हवा तसा अर्थ लावायचं स्वातंत्र्य देणं अपेक्षित होतं?) "मी एक स्त्री आहे. मी किती स्वतंत्र आहे? किती परतंत्र आहे?" असा विषय दिलेला होता. त्यामुळे बहुतेकींनी साहजिकच प्रामुख्याने केवळ "माझं" स्वातंत्र्य यावरच लिहिलं आहे. आणि ते लिहिताना "स्वातंत्र्य" म्हटल्यावर जो ढोबळ अर्थ समोर येतो, तेवढा पुरेसा मनाला आहे. "स्वातंत्र्य म्हणजे काय" याबद्दलचा प्रत्येकीचा आपला विचार असेल, तो पुरेसा व्यक्त झालेला नाही.

    तू मात्र स्वातंत्र्याची तुझी कल्पना विस्ताराने मांडली आहेस. त्यामुळे तसं इतरांकडूनही अपेक्षित होतं की काय असा प्रश्न पडलाय. असो.

    प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याला चौकट आहे. ती बहुतांश लादलेली आहे (परंपरेने आणि जन्माने). अगदी जुजबी सवलती सोडता, त्यात फार फेरफार करणे (एकट्या व्यक्तीला एका आयुष्यात) सहजी शक्य होत नाही. चौकट मोडण्याच्या प्रयत्नांची फार मोठी किंमत द्यावी लागते. मान्य आहे.

    माझ्यामते, चौकटीची (जाचक) जाणीव "होणे" हा आपल्याला असलेलं स्वातंत्र्य समजून घेण्याच्या प्रक्रियेतला मैलाचा दगड आहे.

    तू Matrix हा चित्रपट पाहिला आहेस का? (भन्नाट Science Fiction आहे. या विषयाशी थेट संबंध नाही.)

    निओ हा एक सामान्य माणूस आहे आणि तो त्याचे आयुष्य जगतोय. अचानक त्याला काही लोक संपर्क करतात. त्यातून हळूहळू त्याला कळत जातं की, २१ व्या शतकात यंत्रांनी मानवावर विजय मिळवला आणि सर्व मानवांना उर्जेचा स्त्रोत म्हणून वापरायला सुरुवात केली. आता प्रत्यक्षात सर्व मानव हे यंत्रांना जखडलेले आहेत (बॅटरीच्या सेल सारखे‌) आणि आपण जे आयुष्य जगतोय असं आपल्याला वाटतंय ते वास्तव नसून केवळ आपण मुकाट पडून राहावं म्हणून आपल्या मेंदूत केलं जाणारं आभासी जीवनाचं प्रक्षेपण आहे. ज्या लोकांनी त्याला संपर्क केला ते काही मोजके मुक्त मानव असतात. मग निओ त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करतो, वगैरे.

    चित्रपटाची कथा फिल्मी असली तरी काही प्रमाणात मला ती वास्तव आयुष्याला रुपक म्हणून योग्य वाटते. यंत्रांऐवजी समाज किंवा समाजव्यवस्था असं पाहिलं तर निओच्या आणि आपली अवस्थेत मला साम्य वाटतं. जाणीव नसतानाचा निओ अज्ञानात आणि सुखात असेलही, पण एकदा जाणीव झाली की चौकटीचं जाचणं आपण टाळू शकत नाही.

    इंद्रधनूतील प्रत्येकीच्या स्वातंत्र्याच्या पातळीत जमिनास्मानाचा फरक नसावा. किंबहुना तू आग्रहपूर्वक इतर जणींपेक्षा थोडंफार अधिकच स्वातंत्र्य मिळवलं असशील. पण तरीही ज्या प्रश्नांना इतरांनी “स्वातंत्र्य आहे” असं उत्तर दिलं आहे त्याला तू “नाही” असं उत्तर दिलं आहेस.

    हा चौकटीची लख्ख जाणीव तुला झालेली असल्याचा परिणाम असावा, असं मला वाटतं.

    ReplyDelete
  6. >>की प्रत्येकाला विषयाचा हवा तसा अर्थ लावायचं स्वातंत्र्य देणं अपेक्षित होतं?
    हो. (मुद्दे काढलेले होते पण अर्थाचा परीघ जिने तिने निश्चित करायचा होता.)

    >>तू Matrix हा चित्रपट पाहिला आहेस का?
    नाही.

    >> अचानक त्याला काही लोक संपर्क करतात.
    अचानक त्याच्याशी काही लोक संपर्क साधतात. :) (असं आहे?)

    >>पण एकदा जाणीव झाली की चौकटीचं जाचणं आपण टाळू शकत नाही.
    hmmmmm




    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...