Monday, November 30, 2009

जाणीव

आईची १० ते ६ सरकारी नोकरी.घरात आजी-आजोबांचे वय झालेले.आजी अर्धांगवायुमुळे पूर्णपणे परावलंबी.तिचे सर्व अंथरुणात.अशावेळी आईची होणारी दमछाक मी समजू शकत होते पण तिला मदत करण्याइतकी मी मोठी नव्हते.माझे वय साधारण पाच सात वर्षांचे.बाबा तेव्हा कीर्लोस्कर कंपनीत होते.मला आठवतय तसं ते आईच्या आधी तासदीड तास घरी आधी यायचे कंपनीतून.त्या तासात ते आमच्या रात्रीच्या जेवणासाठीची तयारी करत असत.कणीक मळून ठेवणे,वरण भाताचा कुकर लावणे आणि एखादी भाजी चिरणे,इ.....कधीकधी तर पूर्ण स्वयंपाक देखील तयार असायचा.नोकरी करुन आई घरी आल्यावर बाबांची ही तयारी बघून,तिचा थकवा पळून जाई.हे म्हणण्याचं कारण एवढच की काम ही रोजचीच आहेत.
न संपणारी.......पण अश्यावेळी नुसतं कोणी, आपलं काम हलकं केले तरी पुढची दहा काम ती स्त्री आणखी उत्साहाने करते.आता ते सत्तर वर्षांचे आहेत.घरात सूनही आली आहे. तरीपण त्या दोघींच्या कामात त्यांचा नक्कीच मदतीचा हात असतो.
मला वाटतं स्त्री-पुरुष समानता, कामांच्या समसमान वाटण्या याही पलीकडे जाऊन त्या कामांत मदत करण्यामागे असलेलं प्रेम आणि आपुलकीचा भाग खूप मोठा आहे.स्त्री-पुरुष समानतेपेक्षाही मला अपेक्षित आहे ते एकमेकांना समजणं....मग ते नातं कोणतही असो.....

5 comments:

  1. दीपा,
    तू सांगते आहेस ती २५-३० वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. त्याकाळात स्वयंपाकात मदत करणारे, आईच्या कष्टांची जाणीव असणारे बाबा!
    वाचून खूप छान वाटलं.

    पण शेवटी तू म्हणते आहेस तसं-- स्त्री-पुरूष समानता नसलेलं, फक्त एकमेकांना समजून घेणारं नातं आपल्याला चालेल? अशा मातीत प्रेम आणि आपुलकीची फुले येतीलही, पण मग स्वाभिमान आणि सन्मानाचं काय करायचं?

    ReplyDelete
  2. दीपा,
    विद्याने नोंदवल्याप्रमाणे मलाही खरोखरच हे खूप महत्वाच वाटत २५-३० वर्षांपुर्वी स्वयंपाकात मदत करणारी, आईच्या कष्टांची जाणीव असणारी व्यक्ती. ही जाणीवच सगळ्यात महत्वाची. वाचून छान वाटलं.

    ReplyDelete
  3. विद्या स्वाभिमानाचा मुद्दा काढलास म्हणून माझे वैयक्तिक मत मांडत आहे.माहीत नाही पण आजूबाजूला अशी अनेक उदाहरणं पाहीली आहेत.की त्यावरुन असे वाटते की स्त्री कींवा पुरुष कोणीही असो त्याला अति स्वाभिमान उराशी बाळगणं घातकच.
    अति स्वाभिमानाने नाती दुखावतात असे माझे मत आहे.कींवा काही कुटुंबही मोडलेली आहेत. (कुटुंब अश्या अर्थी की एक स्त्री आणि पुरुष जेव्हा लग्न बंधनात आडकतात तेव्हा त्यांच्यामुळे अनेक कुटुंब जोडली जातात.) आणि त्यामुळे पदरी फक्त मनस्तापच आला आहे.म्हणून प्रत्येकवेळी नमतचं घ्यायचे का? तर नाही. असे मुळीच नाही. पण दोघापैंकी एकाने समंजसपणा नक्कीच दाखवावा असे वाटते.आणि जेव्हा ती स्त्री कींवा पुरुष हे फक्त एक व्यक्ती म्हणून असतील तर काही अंशी कोणताही निर्णय घेणे एकवेळ सोपे जाते. पण जर पदरी मुलं असतील की जी आई-बाबा म्हणून त्या स्त्री-पुरूषावर अवलंबून असतील तर तडजोड ही करावीच लागते.(तडजोड हा चांगल्या अर्थी म्हणत आहे.) हो, हे निश्चित की तुम्ही प्रत्येक वादात,भांडणात आपली बाजू जर बरोबर असेल तर निश्चित ठामपणे समोरच्याला पटवून देउ शकता.अगदी लगेचच नाही ते शक्य होत.पण काहीवेळाने शांत झाल्यावर ते निश्चित शक्य होतं.मग याला तू काय म्हणशील?नमत घेणं....स्वाभिमान नसणं......का आणखी काही?

    ReplyDelete
  4. दीपा,
    १)अति स्वाभिमान, योग्य स्वाभिमान, कमी स्वाभिमान , यांच्यात भेद कसा करशील?
    २)अति स्वाभिमानाने नाती दुखावतात , इथे अहंकार मिसळला जातो का हे पण बघायला हवे.
    स्वाभिमान म्हणजे काय? तर स्वतःबद्दलचा अभिमान (अहंकार नव्हे), मी पण तुमच्यासारखी माणूसच आहे, योग्य त्या आदराने तुम्ही माझ्याशी वागा. मी पण तुमच्या बरोबरीची आहे.
    ३)काही कुटुंबही मोडलेली आहेत. ---- कुटूंबे मोडण्याची आपल्याला कळणारी कारणे म्हणजे हिमनगाचे टोक असते. प्रत्यक्षात आत बरेच काही धुमसत असते असे मला वाटते.
    नमतं घेणं म्हणजे स्वाभिमान नसणं असं मी म्हणणार नाही. ती एक चाल आहे.
    ४) ’हे निश्चित की तुम्ही प्रत्येक वादात,भांडणात आपली बाजू जर बरोबर असेल तर निश्चित ठामपणे समोरच्याला पटवून देउ शकता’
    हे दरवेळी नाही करू शकत आपण असं मला वाटतं.
    दोघे आपापली मते घेऊन चालू शकता पण परस्परांविषयी आदर बाळगायला हवा. बदलतील मते तेंव्हा बदलतील.
    ५)तडजोडीचं म्हणशील तर नवरा-बायकोच का? प्रत्येक नात्यात ती करायला लागते. दोघेही समान पातळीवर असतील तर ते नातं फुलत जातं.

    मला इतकच म्हणायचं होतं दीपा, घरातल्या पाळीव प्राण्यावर पण आपण प्रेम करतो.उतरंडीच्या रचनेत (एक वरीष्ठ दुसरा कनिष्ठ) पण प्रेम, आपुलकी, जाणीव हे असू शकतं. पण आपण त्यावरच समाधानी राहायचं का?( तू म्हणतेस समानते पलीकडे मला समजून घेणं महत्त्वाचं वाटतं.)
    मला हे पण पटतं की बायका दरवेळी स्वाभिमानाची किंमत नाही मोजू शकत, नाही परवडत आपल्याला.

    पण हे तत्व म्हणून तरी तुला मान्य आहे का?

    ReplyDelete
  5. घरातील कामांची वाटणी हा माझ्या बाबतीत फार 'संवेदनशील' विषय आहे! लहानपणी या गोष्टी फारशा जाणवल्या नाहीत. माझ्या बाबांचा घरातल्या कामांमध्ये शून्य सहभाग असायचा पण आईने त्याबद्दल कधी तक्रारही केली नाही, की त्यांना 'सुधारायचा' प्रयत्नही केला नाही. मला आणि माझ्या भावाला मात्र घरातील कामं बरोबरीनं करायला लावली.लग्नानंतर मात्र वेगळंच चित्र समोर आलं.. सासूबाई पहाटे उठून सगळा स्वैपाक करून वरच्या मजल्यावर क्लास घ्यायला जात आणि दोन बॅचच्या मधे मधे खाली येऊन उरलेली कामं उरकत. जोडीला आजेसासूबाई असत. बसल्या बसल्या त्याही बरीच कामे करत. या दोन सुप्परफास्ट बायका काम करत असल्यावर घरातल्या पुरुषांना घरातल्या कामांकडे बघायचं कारणच काय.. (एकत्र कुटुंब पद्धतीचा एक वाईट्ट परिणाम?!) मला काही या व्यासपीठाचा वापर करून तक्रारींचे पाढे वाचायचे नाहीत, पण हेच प्रातिनिधीक चित्र नाही का? पुढे आम्ही दोघे सातारला आणि नंतर पुण्याला आल्यावर मात्र ते चित्र आशादायी दिशेने बदलू लागलं! मुलांचा तर प्रश्नच नाही. खूपशा कामात ती त्यांच्या परीने हातभार लावतात, त्यातली मजाही घेतात. त्यामुळं भविष्यातलं चित्रही आशादायी आहे!
    मला कित्येकदा अचंबा वाटतो. या लोकांना समोर पडलेली कामं दिसतच नाहीत, की दिसूनही 'ही काही आपली जबाबदारी नाही' म्हणून ते दुर्लक्ष करतात? जे पुरुष घरातली कामं करतात, त्यांच्यापैकी कितीजण 'ही माझी जबाबदारी आहे' म्हणून करतात आणि कितीजण 'बायकोला मदत' म्हणून करतात? आपण कर्ते झालो तरी आपल्याला स्वतःची कित्येक छोटी छोटी कामेही स्वतः करता येत नाहीत, या गोष्टींचं यांना काही वाटत नाहीच, उलट ती कामं घरातल्या बाईनं (ती बायको असेल,आई असेल,बहिण असेल,किंवा मुलगीही) आपल्यासाठी करावीत हा यांना आपला हक्कच कसा काय वाटत असतो?

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...