Sunday, March 10, 2013

जबाबदारी की ओझं


एकंदरीत आपली समाज रचना, संस्कृती, परंपरा, रितिरीवाज, रुढी, ह्याचा विचार केला तर एखादी स्त्री म्हणून जगताना तिने अनेक ओझ्यांची जबाबदारी घेतली असते अस म्हणता येईल का ?
एकदा क तुम्ही स्त्री म्हणून जन्माला आलात की अनेक गृहितकं तुमच्या बरोबरीनं वैयक्तिकरित्या, कुटूंबाकडून, समजाकडून मान्य केली जातात.

१. मुलगी म्हणून वावरताना रात्री उशिरापर्यंत बाहेर वावरताना येणारं दडपण
२. पत्नीच्या, सूनेच्या भूमिकेत घर, कुटूंबातील माणसं, नाती सांभाळण्याची जबाबदारी
३. आई म्हणून मुलांना, समाजात मान्य होतील असे "चांगले संस्कार" देण्याची धडपड

सर्वसाधारणपणे अनेकजणी वरील तिनही गोष्टींकडे आपली जबाबदारी, आपली कर्तव्य ह्या नजरेतूनच बघतात. हे सगळं काटेकोरपणे पाळलं की आपण सुरक्षित, आदर्श, इतरांकडून स्विकारल्या जाऊ असा समज. मग हे ओझं आहे हा समजत पुसट होण्यापर्यंत त्यांची मानसिकता होते.
.......

वैयक्तिक विचार करता -

मी कॉलेजमधे असताना रात्री बाहेर उशिरापर्यंत वावरणं कधी आपणहून स्विकारलं नाही. घरातून कधी बंधन नव्हतं पण तसं वातावरण पण नव्हतं. त्यामुळे त्या वातावरणाची, त्या नियमाची जबाबदारी मी पाळली.
(माझी बहीण कॉलेजमधे वेगवेगळ्या उपक्रमाच्यानिमित्ताने रात्री उशिरा घरी यायची. त्यामुळे तिला कदाचित ती जबाबदारी न वाटतां ओझं वाटलं असू शकतं)

लग्न arrange marriage  पध्दतीने असल्याने नवीन वातावरणाची काहीच ओळख नव्हती. त्यामुळे सून, पत्नी म्हणून वावरताना सर्वसाधारणपणे समाजाने ठरवून दिलेल्या पध्दतीचा अवलंब केला गेला. मंगळसूत्र घालणे, कुंकू लावणे इ.

नोकरी करत असलेल्या ठिकाणी पॅन्ट, ओढणीविरहीत ड्रेस घालण्याची मुभा नव्हती. म्हणजे तसं सांगण्यातही आलं होतं. कुंकू लावणं पण होतच. आजूबाजूला कामगार लोकांचा वावर सतत असायचा. त्यांची आम्हा मुलींकडे बघण्याची नजर नेहमीच जाचक वाटायची. तेव्हा का कोण जाणे पण हे मंगळसूत्र, कुंकू घतल्यानं बरं वाटायचं. मग ते ओझं म्हणाव तर त्याचा आधार आम्ही घेत होतो का ?
शाळेत असताना कोल्हापूरला सहल गेली होती. माझी पाळी चालू होती. बरोबरच्या मैत्रिणी मला देवळात न येण्याबद्दल सुचवत होत्या. बाईंनीपण मला तसच सांगितलं. मी त्याला विरोध केला. मी ते ऎकलं नाही. ती पण देवीच आहे की ? मग असं का ? असा उलट प्रश्न केला. मी देवळात गेले. निर्धास्तपणे वावरले. तेव्हा मी विरोध केला त्याचं आज पण मला खूप समाधान वाटतं.

जबाबदारी आणि ओझं याची माझ्या मनात गल्लत नाही. मला आवडेल ते कपडे मी घालते.मंगळसूत्र  व कुंकू ह्याचं सौभाग्य म्हणून बंधन ठेवलं नाही. पुण्यासारख्या शहरात राहते त्यामुळे रात्री उशिरापर्यंत वावरु शकते. कुटुंबाचं प्रत्येक काम ही आमच्या दोघांची जबाबदारी असते.

...........

कधीतरी वाटतं की समाजाच्यादृष्टीने असलेली ही बंडखोरी मी माझ्या आधीचा घटनामधे, प्रसंगांमधे, नोकरीत दाखवू शकले असते तर......
कदाचित मला ते समजून घ्यायला, त्यावर विचार करायला वेळ लागला असं मी म्हणेन.

4 comments:

  1. >>तेव्हा मी विरोध केला त्याचं आज पण मला खूप समाधान वाटतं.
    खरंय! (कोणत्याही कारणानं का होईना, पण) स्वतःच्या विचारांशी, तत्वांशी प्रामाणिक न रहाता येणं ह्याची आयुष्यभर खंत जाणवत रहाते; आणि तेच सर्वात जड ओझं होतं आपल्याला.

    - सचिन

    ReplyDelete
  2. >>जबाबदारी आणि ओझं याची माझ्या मनात गल्लत नाही.
    वा! हे छानच आहे. त्यामुळे द्विधा टाळत येत असणार.

    >> (कोणत्याही कारणानं का होईना, पण) स्वतःच्या विचारांशी, तत्वांशी प्रामाणिक न रहाता येणं ह्याची आयुष्यभर खंत जाणवत रहाते; आणि तेच सर्वात जड ओझं होतं आपल्याला.
    छान लिहिलंस. यावर विचार करायला हवा. म्हणजे "सर्वात जड" यावर!

    ReplyDelete
  3. >>एखादी स्त्री म्हणून जगताना तिने अनेक ओझ्यांची जबाबदारी घेतली असते अस म्हणता येईल का
    ओझ्यांची जबाबदारी .... interesting :)

    जबाबदारीचं ओझं नाही होत कधी? काही जबाबदार्‍या निभावताना आपल्या इच्छा/आकांक्षा बाजूला साराव्या लागतात,तडजोड करावी लागते तेव्हा ते ओझं नाही का वाटत?

    ReplyDelete
    Replies
    1. आशा,
      मला वाटतं,
      जी ओझी वाहावी लागतात, त्याबद्दलची आपली नैतिक भूमिका स्पष्ट असली पाहिजे. तुमचा विचार काय आहे? का आहे? ही स्पष्टता हवी.

      वैशाली,
      तू म्हणतेस,
      जबाबदारी आणि ओझं याची माझ्या मनात गल्लत नाही.
      हे तू विस्ताराने आणि आणखी स्प्ष्ट करून सांगायला हवंस.

      Delete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...