Friday, March 16, 2012

स्वातंत्र्याचे भान

स्वातंत्र्य म्हणजे स्वत:च्या मताप्रमाणे निर्णय घेता येणे, स्वत:ला पटेल तसे/रुचेल तसे वागता येणे, जगता येणे!
हा खूप ढोबळ अर्थ झाला. म्हणजे असा आधिकार प्रत्येकाला असायलाच हवा; पण कायमच आपल्याला हवे तसे वागता येते का? समाजात वावरतानाही आपल्याला आवश्यक ते कायदे/नियम पाळावेच लागतात. आपल्या व्यक्‍तिगत आयुष्यात बरेचसे महत्त्वाचे निर्णय घेताना (शिक्षण, नोकरी/करिअर, लग्न वगैरे) स्वजनांचा आपल्यावर प्रभाव असतो; काही वेळा परिस्थितीचा विचारही करावा लागतो.
‘हे माझे आयुष्य आहे, त्याची जबाबदारी माझीच आहे. त्यामुळे त्याबाबत अंतिम निर्णय मलाच घेता यायला हवा आणि त्यातून काही चुका झाल्याच तर त्याच्या परिणामांची जबाबदारीही सर्वस्वी माझीच असेल’ ही मानसिकता असणे जरुरीचे वाटते. ही मानसिकता विकसित होण्यात आपल्या जडण-घडणीचा महत्त्वाचा वाटा तर असतोच पण काही बदल जाणीवपूर्वकही घडवून आणावे लागतात.
--------------------

आपण वाढत असताना घरातील वातावरणाचा, घरातील लोकांच्या विचारांचा आपल्यावर खूप प्रभाव असतो. माझ्या बाबतीत मी जशी घडले त्यात प्रामुख्याने माझ्या आईचा तसेच माझे काका व मोठा चुलतभाऊ(दादा) यांचा महत्त्वाचा वाटा आहे. वडिलांच्या अकाली निधनानंतर कुटुंबाची परिस्थिती बिकट झाली होती. मी ७ वर्षांची आणि माझा भाऊ ४ वर्षांचा. वडिलांची नोकरी खाजगी असल्यामुळे पेन्शन, फ़ंड वगैरेचाही काही आधार नव्हता. त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे आमचाच वाडा असल्यामुळे राहण्याच्या जागेचा काही प्रश्न नव्हता. फ़क्‍त येणार्‍या तुट्पुंज्या भाड्यातून आमचे भागणार नव्हते. आईचे तेव्हाचे शिक्षण चांगल्या नोकरीसाठी अपुरे होते. अशावेळी मोठ्या मावशीने आम्हाला सांभाळायची/आमचा खर्च उचलायची तयारी दाखविली. पण आईने ठाम नकार दिला. तिने स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा निर्णय घेतला. माझ्या काकांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आणि मार्गदर्शनही केले. आईने बालवाडी पासून सुरुवात करून प्राथमिक शिक्षिकेच्या पदासाठी आवश्यक ते अभ्यासक्रम पूर्ण केले. अर्थाजनासाठी त्या काळात पाळणाघरही चालविले. सकाळची शाळा असल्यामुळे तिला सकाळी लवकरच घराबाहेर पडावे लागे. माझी शाळा दुपारची असल्यामुळे मी नंतर माझे आवरून, जेवून, घर व्यवस्थित बंद करून बाहेर पडायचे. स्वावलंबनाचा पाया तेव्हाच तयार झाला. आई आमच्यावर घरातल्या/बाहेरच्या छोट्या छोट्या जबाबदार्‍या सोपवायची. कधी काही चुकले तरी तिने आमच्या क्षमतेबद्द्ल कधीच अविश्वास दाखविला नाही. त्यामुळे आमचा आत्मविश्वासही वाढला आणि जबाबदारी घ्यायची सवयही लागली. आयुष्यात कठीण प्रसंग आला/मोठे संकट कोसळले तरी तुमची मानसिक तयारी असेल तर तुम्ही स्वत:च्या हिमतीवर खंबीरपणे त्यावर मात करू शकता याचे उदाहरणच तिने आमच्यापुढे ठेवले.

प्रतिकूल परिस्थितीत खचून न जाता तिच्याशी झुंजण्याची मानसिक क्षमता माझ्यातही आहे याची मला खात्री आहे.
--------------------

कुटुंबप्रमुख(कर्ता), आई, शिक्षिका अशा सर्वच जबाबादार्‍या आई निभावत होती. मी जशी मोठी होत गेले तशी याची जाणीव मला प्रकर्षाने होऊ लागली. त्यामुळेच दहावी नंतर पुढचे शिक्षण असेच घ्यायचे जे मला लवकरात लवकर माझ्या पायावर उभे करेल आणि मीही घराची जबाबदारी उचलू शकेन असा निर्णय मी घेतला. सर्व बाजूने विचार करून मी पाच वर्षे शिक्षण पूर्ण व्हायची वाट बघण्याऐवजी तीन वर्षांची अभियांत्रिकी पदविका करायचे ठरविले.

कोठलेही शारीरिक कष्ट करण्याची/निभावून नेण्याची जी मानसिक क्षमता माझ्यात तयार झाली आहे तिचा यांत्रिक शाखेची पदविका करताना मला खूप उपयोग झाला. तासन्‍ तास उभे राहून यंत्रांवर काम करताना जेव्हा इतर मुलींना सरांची किंवा इतर मुलांची मदत घ्यायला लागायची तेव्हा मी मात्र स्वतंत्रपणे माझे प्रकल्प पूर्ण करू शकत होते.

पदविका पूर्ण केल्यावर लगेच नोकरी स्वीकारली. नोकरीसाठी मला भोसरीला जावे लागे. सकाळी ६:३०-७:०० वाजता बाहेर पडलेली मी रात्री १०:०० च्या सुमारास A.M.I.E. चे वर्ग करून घरी यायचे. काही प्रमाणात दगदग/धावपळ होत असली तरी मानसिक आनंद खूप होता. घराची आर्थिक जबाबदारी उचलू शकते याचे समाधान होते. या काळात मला जे काही बरे/वाईट अनुभव आले (नोकरीत/प्रवास करताना) त्यातून मी बरेच काही शिकले. बाहेरच्या जगात एक स्वतंत्र व्यक्‍ती म्हणून मी वावरू शकते हा आत्मविश्वास निर्माण झाला.

मी आर्थिकदृष्ट्याही स्वतंत्र होते/आहे म्हणजे फ़क्त अर्थार्जन करण्याची क्षमता आहे म्हणून नाही; तर घरात येणार्‍या पैशांचा विनियोग कसा करायचा हे ठरविण्याचे स्वातंत्र्य मला तेव्हा होते आणि अजूनही आहे. घरासाठी/कुटुंबासाठी काही मोठे खर्च असतील किंवा मोठी गुंतवणूक करायची असेल तेव्हा सचिन आणि मी मिळून निर्णय घेतो.

नोकरी करण्याचा निर्णय जसा मी घेतला होता तसा नोकरी सोडण्याचा निर्णयही माझाच होता. म्हणजे सचिन आणि मी याबाबत विचारविनिमय जरूर केला होता. पण नोकरी सोडून घरुन करता येईल असा व्यवसाय करायचा हा अंतिम निर्णय माझाच होता.
--------------------

मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना दादाचे लग्न झाले. शुभांगी बॅंकेत नोकरी करत होतीच पण त्याबरोबर ती काही सामाजिक संघटनांबरोबर काम ही करत असे. तिच्याबरोबर मीही कार्यक्रमात सहभागी होऊ लागले. खेड्या-खेड्यांमधे जाऊन तेथील मुली/स्त्रियांना भेटून आरोग्याविषयी माहिती देणे, स्त्री शिक्षण, वेश्यांच्या मुलांचे पुनर्वसन, व्यसनमुक्‍ति, पर्यावरण विषयक जागृती अशा विविध समस्यांवर/विषयांवर शिबिरे असत. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या विचारांचे लोक भेटू लागले, त्यांच्याकडून वेगळे अनुभव ऐकता आले. तोपर्यंत, मी, माझे घर आणि माझी नोकरी एवढ्यापर्यंतच माझे जग सीमित होते. आता माझ्या जाणिवेच्या कक्षा रुंदावल्या. मला सामाजिक जबाबदारीचेही भान आले आणि इतर स्तरातील स्त्रियांचे प्रश्न मनाला भिडू लागले.
--------------------

सचिनने जेव्हा मला लग्नासाठी विचारले तेव्हा माझी लग्नासाठी मानसिक तयारी झाली नव्हती. त्यावेळेस मी पूर्णपणेच घराची जबाबदारी घेतली होती. भावाचे शिक्षण अजून चालू होते. सचिन म्हणाला मी थांबेन. पण हेच कारण असेल तर लग्नानंतरही यात काही फ़रक पडणार नाही. तू तुझी जबाबदारी निभावलीच पाहिजे; त्यात मी पण तुला साथ देईन.
दोन वर्षांनंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. आम्हाला दोघांना नोंदणी पध्दतीनेच लग्न करायचे होते आणि लग्नाचा पूर्ण खर्च आम्ही दोघांनीच करायचा असे ठरवले होते. नोंदणी पध्दतीला सचिनकडच्या काही जवळच्या नातेवाईकांचा विरोध होता. आमच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा निर्णय होता आणि आमच्या मूल्यांबद्द्ल आम्ही ठाम होतो. त्यामुळे सचिनच्या आई-बाबांनीही आम्हाला पाठिंबा दिला. काही नाती दुरावली. ती नाती टिकवण्यासाठी आम्ही तडजोड केली असती तर आयुष्यभर आम्हाला ते डाचत राहिले असते.

लग्नानंतरही वेगवेगळ्या धार्मिक पूजा, व्रत-वैकल्ये, घरी आलेल्या सुवासिनींना कुंकु लावणे अशा प्रथांमधे मी कधी सहभागी झाले नाही/होत नाही. सासरच्यांनीही माझ्या मूल्यांचा आदर केला आणि त्यांची मते लादण्याचा प्रयत्न कधी केला नाही.

आजी-आजोबांच्या हौसेसाठी म्हणून आम्हीही काही गोष्टी स्वीकारल्या उदा. गौतमीचे बारसे मोठ्या स्वरुपात साजरे करणे, वर्षातून एकदा कुलदेवतेच्या दर्शनासाठी एकत्र जाणे वगैरे. पण कोठल्या बाबतीत तडजोड करायची आणि कोणत्या बाबतीत नाही याच्या कल्पना सुस्पष्ट आहेत.
-----------------------

कॉलेजमधे असताना मी एका मैत्रिणींच्या घरी गेले होते. तिची आई पोळ्या करत होती. त्यांच्या पोळ्या झाल्यावर त्या मैत्रिणीला म्हणाल्या की तुझ्यासाठी ४ गोळे ठेवले आहेत लाटायला. मला विचारले तुला येतात का पोळ्या करायला? मुलीच्या जातीला स्वयंपाक आला पाहिजे.
आईला एखादी भाजी चिरून देणे, कधी चहा करणे, ताट-पाणी घेणे याउपर माझी स्वयंपाकघरात काही मदत होत नसे आणि ही कामे तर माझा दादाही करत असे. मुलगी म्हणून मला कधी वेगळे वाढविले गेले नाही. मला दादा म्हणायचा तुला जे आवडते ते जरूर कर; पण मुलीच्या जातीला आले पाहिजे म्हणून अजिबात नको.

लग्न झाल्यावरही माझे हे स्वातंत्र्य अबाधित राहिले आहे. मला स्वयंपाक येत नाही / स्वयंपाकात फ़ारसा रस नाही हे माझ्या सासरी खूप छान स्वीकारले गेले, त्याचा कधीच बाऊ केला गेला नाही. कारण स्वयंपाक / संसार ही केवळ स्त्रीची जबाबदारी नाही हा विचार माझ्या माहेरी आणि सासरी, दोन्ही घरी सर्वमान्य आहे.
-------------------------

माझ्या स्वत:शी निगडित असलेले सर्व निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मी घेते.
सहजीवनाशी संबाधित निर्णय सचिन आणि मी मिळून घेतो. कुटुंबनियोजनाशी निगडित निर्णयांचे मला स्वातंत्र्य होते आणि आहे. लैंगिक संबंधातही माझ्या मन:स्थितीचा / इच्छेचा आदर राखला जातो.
गौतमीशी संबधित निर्णय आम्ही तिघे मिळून घेतो. गौतमीलाही तिची मते मांडण्याचे घरात पूर्ण स्वातंत्र्य आहे.
-----------------------

इतर स्त्रियांचे स्वातंत्र्य:

सासूबाई, माझी धाकटी जाऊ आरती आणि मी, आम्ही तिघी वेगळ्या वातावरणात, वेगवेगळ्या परिस्थितीत वाढलो त्यामुळे आमची व्यक्‍तिमत्त्वही वेगळी आहेत. पण आम्ही एकमेकींचे मतस्वातंत्र्य/विचार/मूल्य यांचा नेहमीच आदर करतो.

माझ्या सासूबाई गृहिणी आहेत. त्या घरातील इतर मंडळींची दिनचर्या/त्यांच्या वेळा सांभाळून त्याप्रमाणे स्वत:चा दिनक्रम ठरवित असत. त्यांच्याशी बोलणे करून ही जाणीव करून द्यायला लागली की तुम्ही तुमच्यासाठी स्वतंत्र वेळ राखून ठेवलाच पाहिजे आणि त्या वेळेचा विनियोगही तुम्हाला हवा तसा करायला हवा. आता ते त्यांना जमायला लागले आहे आणि आम्ही घरातील सर्व सदस्यही त्यांना तो वेळ मिळाला पाहिजे याकडे लक्ष देतो.

आमच्याकडे घरकाम करण्यासाठी येणार्‍या स्त्रिया बर्‍याच वर्षांपासून आमच्याकडे काम करत असल्यामुळे आमच्या घरच्या सदस्यांसारख्याच आहेत. त्यांच्या अडी-अडचणींबाबत त्या माझ्याशी मोकळेपणाने बोलतात. अगदी घरातल्यांबद्लच्या तक्रारीही सांगतात. मीही वेळोवेळी त्यांच्या स्वातंत्र्याची / हक्कांची जाणीव करून द्यायचा प्रयत्न करत असते.
माझ्याकडे वरकाम करायला स्वाती येते (वय १८-१९ वर्षे). आई जाऊन ५-६ वर्ष झाली आहेत. घरी तिच्यापेक्षा लहान दोन भाऊ आणि वडिल. वडिल दारूच्या नशेत नसतील तर रोजंदारीवर काहीबाही काम करतात. त्यामुळे स्वातीला मिळणारे पैसे घरातच खर्च होतात आणि उरलेच तर वडिलांच्या दारूत. मी तिला बचतखाते उघडण्याचा सल्ला दिला. आता दर महिन्याला तिच्या पगारातील काही भाग ती बँकेत टाकते. तिचे १०वी पर्यंत शिक्षण झाले आहे. पदवीपर्यंत शिकायची इच्छा होती पण आता जमतच नाहीये असे तिने मला सांगितले. आम्ही तिला सुचविले की ’तू बारावीचा अर्ज भर आणि आमच्याकडे काम करतेस तो वेळही अभ्यासाला वापर. पण शिक्षण पूर्ण करच.’ अजून काही तिने अर्ज भरला नाहीये. जाणीव करून देणे माझ्या हातात आहे, पण तो निर्णय घेण्याचा हक्क तर तिचाच ना!

नोकरी करत असताना माझ्या कनिष्ठ स्त्री सहकार्‍यांना आवश्यक तेव्हा रजा संमत करणे, लवकर जायची किंवा उशिरा येण्याची मुभा देणे इतपत अधिकार माझ्याकडे होता आणि मी त्याचा योग्य वापर करत असे. त्यांच्या अडचणींवर मी नक्कीच विचार करायचे. त्यांचे मत/विचार लक्षात घ्यायचे. समस्या निवारण्याचा थेट हक्क मला नसला तरी त्या व्यवस्थापन मंडळासमोर मांडून त्यावर तोडगा काढला जाईल हा प्रयत्न मी जरूर करत असे.
-----------------------

एक स्वतंत्र व्यक्‍ती म्हणून मी आयुष्य भरभरून जगते आहेच. स्वत:साठी वेळ देऊ शकते, आवडी/छंद जोपासू शकते. मला योग्य वाटतील ते निर्णय घेते. नवीन जबाबदार्‍या घेते. घेतलेल्या जबाबदार्‍या पूर्ण करायचा प्रयत्न करते, खूप वेगवेगळे अनुभव घेत आहे. कधी चुकतेही आहे आणि त्यातून काही नवीन शिकतेही आहे, त्याप्रमाणे स्वत:त बदल पण करत आहे. अशा प्रत्येकवेळी मी स्वत:ला नव्यानेच भेटल्यासारखी वाटते.

7 comments:

  1. आशा, तुझे विचार किती सुस्पष्ट आहेत गं!!! मला नवल वाटतं तुझं!!

    ReplyDelete
  2. >> ‘हे माझे आयुष्य आहे, त्याची जबाबदारी माझीच आहे. त्यामुळे त्याबाबत अंतिम निर्णय मलाच घेता यायला हवा आणि त्यातून काही चुका झाल्याच तर त्याच्या परिणामांची जबाबदारीही सर्वस्वी माझीच असेल’
    मस्त!
    आणि जे काय चांगले घडेल/घडते ( माझ्यामुळे ) त्याचे श्रेयही मलाच आहे.
    असं वाढवू शकशील ना?

    ReplyDelete
  3. आशा, छानच लिहिलं आहेस. अनेकदा वाचूनही मला आणखी काय प्रतिक्रिया द्यावी ते कळेना.

    "हे माझे आयुष्य आहे, त्याची जबाबदारी माझीच आहे. त्यामुळे त्याबाबत अंतिम निर्णय मलाच घेता यायला हवा आणि त्यातून काही चुका झाल्याच तर त्याच्या परिणामांची जबाबदारीही सर्वस्वी माझीच असेल"

    ही तुझी वाक्ये विद्यानेही तिच्या प्रतिक्रियेत नोंदवली आहेत. जर हीच वाक्ये उलट करून "जोवर परिणामांची जबाबदारी माझी मी घ्यायला तयार आहे, तोवर कसाही निर्णय घेणे हा माझा हक्क आणि माझ्या स्वातंत्र्याचा भाग आहे" असं विधान केलं तर त्यावर तुझी प्रतिक्रिया काय राहील?

    एव्हाना दीपा, अश्विनी, वैशाली यांच्या लेखावरही प्रतिक्रिया देऊन झाल्या आहेत. या सर्व लेखांमध्ये "मी किती सक्षम आहे" (how able i am) या दृष्टीनेच स्वातंत्र्याचा विचार केलेला दिसला. (अर्थात विषयच तसा होतं).

    मात्र "स्वातंत्र्यासाठी मी किती उत्सुक आहे" (how willing i am) किंवा त्याही पुढे जाऊन "मला स्वातंत्र्याचा किती ध्यास आहे" (how desperate i am) असा प्रश्न केल्यास तुझी (तुमची) भूमिका काय राहील?

    ReplyDelete
    Replies
    1. >> "स्वातंत्र्यासाठी मी किती उत्सुक आहे" (how willing i am) किंवा त्याही पुढे जाऊन "मला स्वातंत्र्याचा किती ध्यास आहे" (how desperate i am) असा प्रश्न केल्यास तुझी (तुमची) भूमिका काय राहील?

      नीरज, कंसात तुमची लिहिलंस म्हणून हे....
      माझ्या स्वातंत्र्यावरच्या लेखात मी स्वातंत्र्यासाठी (माझ्या / इतरांच्या) केलेले प्रयत्न हे "स्वातंत्र्यासाठी मी किती उत्सुक आहे" ते सांगतातच.
      >>"मला स्वातंत्र्याचा किती ध्यास आहे" (how desperate i am) ??
      मला एकटीला काही विशेष हक्क असावेत, स्वातंत्र्य असावं, असा आग्रह मला चुकीचा वाटतो. मला जे / ज्या प्रकारचं स्वातंत्र्य हवं आहे, ते माझ्याबरोबर सगळ्याच स्त्रीपुरूषांना मिळालं पाहिजे अशी माझी भूमिका असते.
      इंद्रधनु सुरू करणे आणि सातत्याने त्यावर लिहिणे हे तू "मला स्वातंत्र्याचा किती ध्यास आहे" (how desperate i am) ? मधे धरू शकशील.
      जी सगळी स्वातंत्र्ये मला नाहीत, असं मी लिहिलं आहे. ती मी वापरीन की नाही, वेगळा मुद्दा आहे पण ती सगळी माझ्या खिशात मला हवी आहेत.
      जेव्हा कस लागण्याचे प्रसंग येतील, तेव्हा मी निश्चितच स्वातंत्र्याच्या बाजूने उभी राहीन.
      काही कर्तव्यांच्या/ जबाबदारीच्या बेड्या माझ्या पायात आल्या तर मी विचारांनी माझी भूमिका स्पष्ट करेन.
      ( "न बोलता सहन करणं" या वाटेनं मला जायचं नाही.)
      शक्य तितकी विचारांच्या जवळ जाणारी माझी कृती आहे , हे पाहीन.

      या सगळ्यासाठी, आपण पारतंत्र्यात आहोत ची जाणीव असायला लागते.
      सुरूवात तिथून होते.
      आपलं स्वत:वर किती प्रेम आहे, त्यावर स्वत:ला किती स्वातंत्र्य हवं आहे, अवलंबून असतं.
      आपल्या समाजात बायकांना स्वत:वर प्रेम करायला शिकवलंच जात नाही.
      त्यांचं वस्तूकरण केलं जातं, मग त्यांच्यासाठी, त्यांच्या इच्छा, आकांक्षा, स्वातंत्र्य, मुक्ती.... सगळंच त्यांच्या आकलनापलीकडचं होऊन जातं.

      मला वाटतंय पुरूष तरी किती झगडत असतील स्वातंत्र्यासाठी?
      बहुदा नाहीच.

      Delete
  4. नीरज,
    प्रतिक्रिया आवडली. धन्यवाद.
    ह्याबद्द्ल :
    >>"जोवर परिणामांची जबाबदारी माझी मी घ्यायला तयार आहे, तोवर कसाही निर्णय घेणे हा माझा हक्क आणि माझ्या स्वातंत्र्याचा भाग आहे" असं विधान केलं तर त्यावर तुझी प्रतिक्रिया काय राहील?

    जो निर्णय घ्यायचा आहे, तो(त्याचे परिणाम) जर फ़क्‍त माझ्याशी निगडीत असेल तर हे विधान लागू आहे असं वाटतं. जर निर्णयाचा परिणाम इतरांवर होणार असेल तर माझ्यामते त्यांचा विचार घेणं; त्यांनाही निर्णयप्रक्रियेत सामावून घेणं आवश्यक आहे.
    वास्तविक, स्वत:बाबतीतही, मनात आलं आणि पटकन निर्णय घेऊन टाकला असं शक्यतो नाही होत माझं! मोठे निर्णय असोत वा छोटे निर्णय, ते घेताना मी परिणांमाबद्द्ल नक्कीच विचार करते; जेवढा शक्य होईल तेवढा योग्य निर्णय घ्यावा असं वाटत असतं. जर कधी द्विधा मनस्थितीत असले तर सचिन/जवळच्यांना विचारप्रक्रियेत सामील करून घेते.

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...