Friday, March 11, 2016

अक्कणमाती चिक्कणमाती -- ४


स्वयंपाक करताना मजा येत नाही, असं आहे का?
तर नाही, मजा येते.
स्वयंपाकघर ही खरोखर प्रयोगशाळा आहे.
रंग, रस, गंध, स्पर्श आणि ध्वनी पंचेन्द्रियांना आवाहन आहे.
पहिले म्हणजे गंध, स्वैपाकघरातून काय मस्त मस्त वास येत असतात.
भाज्यांचे वेगवेगळे मुख्यत: हिरव्या रंगछटेतील रंग, रंगीबेरंगी कोशिंबीर,
डाळीचा पिवळा, पोळ्यांचा गव्हाळ, भाताचा पांढरा, लोणच्याचा लाल...
रंगाच्या दृष्टीने पाहिलं तर ताट कसलं भारी दिसत असतं.
साध्या पोळीचाही प्रवास पिठाचा रंग ते भाजलेल्या पोळीचा रंग असा बदलत असतो.
फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवलं की ते प्रसरण पावतं. हळू हळू वास यायला लागतो.
मोहरी तेलात भिजू न देता परफेक्ट टायमिंग साधत टाकली की ती तडतडते,
ती जळण्याच्या आत मिरची हिंग पडायला पाहिजे, मग भाजी!
बरेचदा मी मिरचीऎवजी लाल तिखट वापरते.
यात वेळेचं महत्त्व फार आहे.
पोह्यांमधला शेंगदाणा किंवा पुलावातला काजू विशिष्ट रंगात तळला गेला तरच मस्त लागतो.
तर स्वैपाकाचा एक माहोल तयार झालेला असतो.
कणीक छान मळली की हाताला तिचा स्पर्श कसा सुखावतो.
छान भूक लागलेली असली आणि असे गंध आणि रंग!
जेवायला मजा येते.
लहानपणापासून ज्या पद्धतीचं जेवण आपण करत आलेलो असतो त्यात तृप्त करण्याची क्षमता असते.
म्हणजे चायनीज किंवा थाई किंवा पिझा खाऊन पोट भरतं, चव कळते. ते आवडतंही.
तृप्त होतो का?
मला शंका आहे.
आपली मुळं खूप खोलवर गेलेली असतात.
आपल्या बालपणात, आपल्या मातीत.
तृप्तीशी आपल्या भावना निगडीत असतात.
आपल्या ओबडधोबड मूळ गावी कशी एक आतून प्रसन्नता आणि स्वस्थता येते.
आपण फिरायला जातो तेव्हा ते श्रीमंत आणि सुबक गाव आपल्याला आवडतं, आपण भारावतो पण आपली नाळ ही शेवटी आपल्या गावाशी जोडलेली असते.
तसंच जेवणाचंही असतं.

स्वैपाक करणं माझ्यासाठी कायम कंटाळवाणंच होतं का? नाही.
मला मजा आलेली.
खाणारांनी शाबासकी दिल्यावर, खूप मार्क्स मिळावल्यावर कसं भारी वाटतं,
तसं मला वाटलेलं आहे.

बहुदा मी अकरावीत होते,
विश्वास पुण्याहून आलेला.
कशी कोण जाणे, मी पोळ्या करत होते.
पोळी अशी ट्म्म फुगली, तो म्हणाला, " वा!"
जमताहेत की तुला"
मग म्हणाला, " ही जी पोळी तू लाटते  आहेस ती जर अशीच फुगली तर मी तुला काहीही देईन."
" एवढं काय? फुगतात माझ्या पोळ्या "
आणि तीही पोळी फुगली, तो म्हणाला, "माग काय हवं ते! काहीही, मागे पुढे पाहू नकोस ."
" काय बरं मागू? ड्रेस? पुस्तक? "
" काहीही पटकन सांग. पुढची पोळी होईपर्यंत, नाहीतर संधी गेली."
आई गं! खरंच संधी गेली! :(
मला काही ठरवताच आलं नाही.
आपल्याला काय हवं आहे ते आपल्याला बरेचदा माहितच नसतं.

बाबा आणि मी मिळून स्वैपाक करायचो तर काय मजा यायची.
बाबा काय सुंदर कणीक मळून द्यायचे!
सोबतीला त्यांच्या गप्पा!
बाबा त्रिकोणी पोळ्या करत आणि बर्‍यापैकी जाड करत.
मी आणि विश्वास कधी कधी म्हणायचो, "बाबा, पोळी जरा जास्तच जाड झाली आहे."
" जाडी काय बघता? लुसलुशीत किती झाली आहे बघा. पापुद्रे कसे सुटले आहेत तुमच्या आईला सुद्धा अशी पोळी करायला जमणार नाही." :)
आम्ही गप्प बसत असू.
भाज्या पण कायच्या काय करायचे, वरणात दाण्याचा कूट घालायचे, काहीही!
वर आम्हांला त्यामुळे चव कशी बदलली आहे, छान झाली आहे, ते पटवून द्यायचे.
ते आम्हांला पटायचंच असं नाही पण आम्ही त्यांच्या प्रयोगांना शरण जात असू. :)
ते पसारा इतका करून ठेवत, वर याचे हात त्याला,
आईने जर पाहिलं असतं तर काही खरं नव्हतं.
आईचं शिस्तीच्या स्वैपाकघरात नुसता गोंधळ करून ठेवत.
दोन चार दिवस मजा यायची मग आईची वाट पाहणे सुरू होई.

मी नाट्यशास्त्राचा कोर्स करत होते तिथे एक पाककृतींची स्पर्धा ठरली.
माझ्या गटाला सुरळीच्या वडीची चिठ्ठी आली होती.
आमच्या तिकडे हा पदार्थ करत नाहीत,
आत्यांना फोन करून विचारलं.
आदल्या दिवशी घरी करून पाहिल्या,
आणि मग दुसर्‍या दिवशी तिथे बनवल्या आणि चक्क पहिला नंबर!

मिलिन्दच्या बाबांचे मामा संगमनेरला आले होते तेव्हा मी गुलाबजाम करून घेऊन गेलेले,
त्यांना खूप आवडले.
मग साताठ वर्षांनी मी त्यांच्याकडॆ गेले तेव्हा त्यांच्या सूनेने सांगितलं तुझे गुलाबजाम छान असतात ना?
:)
असं कुणी म्हंटलं की छान वाटतंच.
मी काही सुगरण नाही. हाताला चव वगैरे कॅटॅगरीतली तर अजिबात नाही.
कुठल्याही बाईला येतात तसे चार पदार्थ मलाही चांगले जमतात.
इतकंच

एकदा गंमत झाली.
मिलिन्दची आतेबहीण आली होती,
सखुबद्दा चाटून खाल्ला आणि म्हणाली, " तुझ्याकडून शिकून मीपण करते.
माझ्या भाच्यांना फार आवडतो, ते या लोणच्याला मावशीचं लोणचं म्हणतात,
मी म्हणते अरे, ते माझं नाही, विद्याने शिकवलेलं लोणचं आहे. तुम्ही याला मिलिन्दचं लोणचं म्हणा."
:) :)
मिलिन्दचा काय संबंध?

मी आईकडून शिकले. ती तिच्या आईकडून शिकली.
खरं कुठले कुठले पदार्थ आपण कुठून कुठून शिकतो, कशात भर घालतो,
त्यातले काही आपल्या घरात रूजतात.
पदार्थांचंही लोककथांसारखं असतं.
वर्षानुवर्ष लोकांनी लोकांना सांगितलेल्या तसे वर्षानुवर्षे लोकांनी (बायकांनीच मुख्यत:) लोकांसाठी करत आलेले पदार्थ.
कुठल्या पदार्थाची जननी कोण आहे ते ओळखणं अवघडच!
पदार्थाच्या माध्यमातून आपण समूहाशी जोडलेलो असतो.
लोकांचं शहाणपण त्यातही उतरलेलं असतं.

( क्रमश:) 

2 comments:

  1. तर स्वैपाकाचा एक माहोल तयार झालेला असतो
    आपल्याला काय हवं आहे ते आपल्याला बरेचदा माहितच नसतं
    मिलिन्दचा काय संबंध? :-) :-)
    पदार्थाच्या माध्यमातून आपण समूहाशी जोडलेलो असतो.
    लोकांचं शहाणपण त्यातही उतरलेलं असतं.

    हे सगळं फार आवडलेलंय

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...