Friday, November 9, 2012

व्रत वैकल्ये -- ३

http://asvvad.blogspot.in/2012/10/blog-post_23.html#comment-form


नीरज,
छान लिहिलं आहेस. आवडलं.
हा फार महत्त्वाचा सामाजिक प्रश्न आहे, असं मलाही वाटत नाही. हे मी सांगीतलेलं आहेच.
पण मला तो अभ्यास करण्यासाठी, नक्कीच महत्त्वाचा वाटतो आहे. त्याची नोंद झाली पाहिजे, हे ही वाटतंच आहे.
ज्या गोष्टींमधे निवडीला खरं वाव आहे, म्हणजे रंग पाळायचे की नाही? तुम्ही ठरवू शकता आहात. तेव्हढा सामाजिक दबाव नाही आहे.
 ही प्रथा अजून मजे मजेच्या स्वरूपातच आहे, तेव्हा लोक काय निवडतात?
त्यामागची कारणं काय असतात ? वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक स्तरातले लोक काय प्रतिक्रिया देतील?
हे जाणून घ्यायला मला आवडेल.
कुणीतरी खरंच हा प्रकल्पाचा विषय म्हणून , यावर काम करायला हवं आहे.
आपणही करायला हरकत नाही, आशाने तर सुरूवात पण केली. :)

>>नवरात्रात कुठल्या दिवशी कुठल्या रंगाचे कपडे घालायचे हे व्रत आहे असं का वाटतं हे समजून घ्यायला आवडेल.
ही आत्ता प्रथाच आहे, पण व्रत होण्याच्या मार्गावर आहे.
लोकांचा देवभोळेपणा काही कमी होतोय असं दिसत नाही, मंदिराच्या बाहेर हात जोडून उभे राहणार्‍यात किटितरी तरूण दिसतात.
म्हणून हे व्रत होऊ शकतं, असं वाटतय.

कुंभार विचार करतातच, असं नाहीच आहे, ते फक्त वळतात.

>>>> आपलं कुठल्याही दिवशी कुठल्याही रंगाचे कपडे घालण्याचं स्वातंत्र्य असं कुणालाही का देऊन टाकायचं?
प्रथेचा संबंध एकदम पारतंत्र्याशी?!!

खूप ताणलं जातंय. पण ती वस्तुस्थिती आहे. म्हणजे बीजं आहेतच.
होळीला पुरणपोळी खाण्याची प्रथा आपण नाही सुरू केली.
आपण तसे वाढलो, समजा नाही खाल्ली त्या दिवशी पुरणपोळी तर चालतंच, हे कळलेलं असतंच की!
आणि होळीच्या दिवशी पुरणपोळी खायची प्रथा आपण स्वीकारतो, तेव्हा त्यादिवशी दुसरं काहीही खाण्याचं स्वातंत्र्य आपण गमावतो,
कारण समाजाचा एक हिस्सा म्हणून आपल्याला राहायचं असतं.
अशी कितीक स्वातंत्र्य आपण देऊन टाकतोच.
पण रंगाच्या प्रथेचं असं आहे, ती घडण्याच्या प्रक्रियेत आहे, काहीतरी विचार केला जाणं शक्य आहे.

>> नऊ दिवस आवर्जून वेगवेगळ्या रंगांचे कपडे घालायचा आनंद नाही का?

आपल्या समाजात असले आनंद किती असतात?
म्हणजे आपल्याकडे वर्षाला एखाद दुसरा सण असता, आणि लोक त्यात वेळ घालवत असते तर ठीक होतं.
आपल्याकडे सणावर सण चालूच असतात. प्रत्येक सणाच्या वेगळ्या प्रथा, वेगळे नियम,...
श्रावणापासून सुरू केलं तरी नागपंचमी, राखीपौर्णिमा, गोकुळाष्टमी, पोळा, गणपती, गौरी, दोन्हींचे विसर्जन, नवरात्र.... अडीच महिन्यात एव्हढे सण....
एखादा दिवस नाही , नऊ दिवस त्यात घालवायचे?
किती आनंद? किती उत्सव?

>>एखादी गोष्ट साजरी करायला मोठा समूह, एक पूर्ण समाजघटक, किंवा संपूर्ण समाजच एकत्र आला तर त्याला तुझा आक्षेप आहे का? असला तर का आहे?
नाही.
पण ती गोष्ट कुठली आहे? आणि साजरी करण्याची पद्धत काय आहे? ह्याचा विचार केला पाहिजे.

>> मोठ्या समुहाने एकत्र येऊन काही अर्थपूर्ण अथवा निरर्थक गोष्टी करणे मला आवश्यक वाटतं.
हो. समाज म्हणून एकत्र आहोत, या भावने साठी ते आवश्यक असतं.
निर्रथक म्हणजे किती निर्रथक? आणि किती काळ?

पेपरचा संबंध यासाठी आहे की त्यामुळे वेगाने पसरत जातं. निर्रथक गोष्टींना माध्यामांनी उचलून धरायचं आणि समाजाने माना डोलवायच्या हे बर्‍याच बाबींमधे होत असतं.
कोणीतरी सांगायचं आणि समुहाने विचार न करता करायचं, हे पटणारं नाहीच.
त्यापेक्षा छोट्या समुहात मजेच्या गंमतीदार कल्पना, गट लक्षात घेऊन राबवता येतात, तिथे निखळ मजा असू शकते.
अशा मान डोलावण्यात ती असतेच असं नाही.

>>“सकाळपासून रात्रीपर्यन्त, जिम असो, शाळा असो, कार्यालय असो, लिफ्ट असो की दवाखाना असो,
सगळीकडॆ त्यावर बोललं जातंय” हे तू कशाच्या आधारावर लिहिलं आहेस माहीत नाही.
हे मी ऎकलंय. माझ्या अनुभवावरच आहे. मला ते अती झालं. लोक मजेत का असेना त्यावर बोलताहेत. आणि नुसतं बोलताहेत असं नाही कोणी कोणी आनंदाने आवर्जून नऊ दिवस नऊ रंग वापरताहेत, हे ही मला कळलं.
 नेटवर सुद्धा लोक मागण्या करताहेत की आम्हांला १३ साली कुठल्या दिवशी कुठले रंग वापरायचे ते कळवा. म्हणजे त्यांना बरं पडेल.

>> एखद्या वर्षी ऑफिसमध्ये विशिष्ट पद्धतीने (सार्वत्रिक प्रथेप्रमाणे) सण साजरा झाला, आता पुढच्या वर्षी “पुन्हा तसंच करू” असं ऑफिसमधील मंडळी म्हणायला लागली, तर मी म्हणेन, झालं की गेल्या वर्षी ते, आता या वर्षी काहीतरी वेगळी मजा करू.
आवडलं.
याच्यापुढे जे लिहिणार आहे, तो आगाऊपणा आहे, तरी लिहिते आहे.
आपण कुठलीही सार्वजनिक प्रथा का पाळतो आहोत? याचा विचार करायला हवा. त्याने काय साधलं? काय फायदा? काय तोटा?
हा विचार करायला हवा.
दिखाऊ प्रथांमधे आपण किती दिवस घालवायचे?
या प्रथेच्या निमित्ताने अंगावरचे कपडे आणि त्यांचे रंग यांना आपण केंद्रस्थानी आणतो आहोत.

बरं ही प्रथा पाळणं सक्तीचंच आहे समजा, त्यावर माझा पगारच अवलंबून आहे.
तर रंगांशी संबंधीत, रंगाची जाण वाढवणार्‍या, रंगांबाबत सजग करणार्‍या, माणसांची रंगाभिरूची घडवू शकणार्‍या, छोट्या समुहात शक्य असणार्‍या किती छान छान गोष्टी शक्य आहेत. ( हा आगाऊपणाच आहे, छान च्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या असतात, हे ही मान्यच आहे.) त्या का नाही करायच्या?

नीरज,
 धन्यवाद! मजा आली.
 वाद घालण्याचा नवा आनंदाचा प्रकार, तू साजरं करण्याच्या यादीत घाल. :)
१) तू चर्चा आणखी पुढे नेलीस, म्हणून आणखी विचार केला गेला.
२) इतक्यात व्रत हा शब्द वापरायला नको, हे मान्य, पण व्रत होऊ शकतं.
३) "पाळणे" हे क्रियापदही मी ऎकलं, आपल्याला आवडो न आवडो लोक वापरताहेत. ते माझं नाही.
४) माझ्या मांडणीत काहीवेळा टोकाला गेले आहे (धागा न सोडता), ( असं टॊकापर्यंत जाऊन विचार केला पाहिजे, असं मला वाटतंच) पारतंत्र्याच्या बाबतीत , मान्य.
 आगाऊपणा चालवून घ्यावास, असं नाही. :)

आणि आता एक शेवटचं आणि महत्त्वाचं -- मी जे काही करते, त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करतच असेन असं नाही. करत नाहीच. पण असं काही पृष्ठभागावर आलं, कोणी लक्षात आणून दिलं तर मी नक्कीच विचार करीन आणि बदलेन.

1 comment:

  1. लेखातील शेवटचे वाक्य काळजाला भिडले.

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...