Friday, October 31, 2014

ज्योतीनंदा




माझे बाबा सगळ्या भांवंडांत लहान. त्यामुळे त्यांच्या मोठ्या बहीणीची नात ज्योतीनंदा माझ्या बरोबरीची.
लग्नाकार्यात, सुट्टीत भेट होईल तेव्हा आम्ही बरोबर असायचो.
तिच्याबद्दलची पहिली आठवण अशी आहे.....

माझ्या एका आतेभावाचं लग्न होतं. लग्नाला सगळे बस करून गेलेलो. मग आतेबहीणींबरोबर आम्ही नवरी पाहायला गेलो. तेव्हा ती होती, ज्योतीनंदा. आम्ही दोघीही पहिली-दुसरीत असू. त्या लग्नात आम्ही मिळून खेळलो. तेव्हा कधी नव्हे ते मला दोन नवीन कपडे शिवले होते. नाहीतर, घरात घालायचे दोन, बाहेर जायचा एक आणि एक गणवेश एव्हढेच चार/पाच झगे असायचे.  एकदम दोन म्हणजे चैनच! एक परकर पोलकं आणि एक झगा. मी अगदी खूष होते.
 आमची परीस्थिती बेताचीच होती, त्यांची तर आमच्याहूनही साधारण असेल.
तिने मागीतला म्हणून का तिच्याकडे नव्हता म्हणून आईने दुसर्‍या दिवशी माझा नवा झगा ज्योतीनंदाला घालायला दिला. मीही आनंदी माणसे जशी उदार होऊ शकतात तशी झालेले. लग्न झालं आमचा परतीचा प्रवास सुरू झाला, तरीही ती आपली माझा झगा घालूनच बसलेली. मी माझं परकर पोलकं बदलून साधासा फ्रॉक घालून बसले होते. मी आईला म्हणाले देखील ’ आई, ही अजून माझा झगा का देत नाहीये?’ आई म्हणाली, "गावी पोचलो की देईल." आणि झालं काय की ती आणि तिचे आई-बाबा गावी आलेच नाहीत, मधेच तिच्या आत्याचं गाव लागलं तिथे उतरून गेले. उतरताना काय म्हणणार?
 झालं! माझा नवाकोरा झगा गेलाच!
किती दिवस मला हळहळ वाटत राहिली.

पुढच्या वर्षी ती भेटली तेव्हाही मला माझा झगाच आठवत होता पण आई म्हणालेली आता काही बोलू नकोस, म्हणून मी शहाण्या मुलीसारखी गप्प बसलेले.

आणखी दोन-तीन वर्षांनी काय झालं? ज्योतीच्या धाकट्या मावशीचं म्हणजे माझ्या आतेबहीणीचं लग्न झालं. लग्नानंतर ती हैद्राबादला गेली होती, येताना ती ज्योतीसाठी खड्यांच्या, बर्‍यापैकी महाग अशा दोन बांगड्या घेऊन आली. आम्ही मांडवपरतनीला जाणार नव्हतो पण गेलो. माझ्या तिथे असण्याची आतेबहीणीला कल्पना नव्हती. तिने एकच जोड आणलेला, अंदाजाने. झालं काय की तो ज्योतीच्या हातात जात नव्हता. माझ्या हातात जाऊ शकला. मला खूप आवडलेला. सुंदरच होता तो बांगड्यांचा जोड! पण ताई म्हणाली म्हणून मी नको, नको असं केलं. शेवटी आग्रह करून आतेबहीणीने तो मला दिलाच.
 मी त्या बांगड्या पुढे चार वर्षे तरी घातल्या असतील.
त्या मला मिळाल्या याचं ज्योतीला काय वाटलं असेल कुणास ठाऊक? ती माझ्याजवळ काही बोलली नाही.

ज्योतीनंदा म्हंटलं की हे दोन प्रसंग मला आठवतातच.

तिचे बाबा थोडे विक्षिप्तच आहेत. आम्ही सातवीत होतो तेव्हाची गोष्ट. सुट्टीत गेलेलो असताना म्हणत होते, " चांगलं श्रीमंताचं स्थळ आलंय ज्योतीसाठी, तिचं लग्नच करतो." मला तेंव्हा शिंगं फुटायला लागलेली. मी त्यांच्याशी खूप भांडले. वेगवेगळे मुद्दे घेऊन भांडत होते. शेवटी शेवटी म्हणाले की मी पोलीसात कळवीन, कायद्याने बालविवाहाला बंदी आहे.’ ते खरं माझ्याशी भांडण्याची मजा घेत असणार, मला ते कळत होतं तरीही लहान वयात एकदाचं मुलीचं लग्न लावून द्यायचं आणि मोकळं व्हायचं ही कल्पनादेखिल मला सहन होत नव्हती. विशेष म्हणजे मी जिच्यासाठी भांडतेय ती ज्योती भांडणात कुठेच नव्हती ती शांतच.

 ती शिकली दहावी/ बारावी ..... नुसती माझ्यासारखी शिकत नव्हती, त्याजोडीला घरकाम, स्वैपाक हे ही करायला लागलेली,
पुढे दोन चार महिने या मामाकडे, त्या मावशीकडे असं केवळ नवरा मिळेपर्यंत राहिली.

यथावकाश तिचं जमलं. मामा मावश्यांनी पुढाकार घेऊन लग्न लावून दिलं.
मी ME करत होते तोवर तर ती दोन मुलांची आई झालेली. संसारात रूळलेली.
नांदेडला गेले तर चुलतभावाला म्हणाले, " चल ज्योतीकडे जाऊन येऊ. " तेव्हा मी आवर्जून सगळ्या सगळ्यांकडे जात असे.
आमच्याकडे देशस्थात कसं आहे? नातेवाईकांचा भरपूर गोतवळा आणि गुंता! साधसं काही असलं तरी जेवायला ३०/४० लोक सहज बोलावतील. बहुतेक बाबतीत त्यांचे माझे विचार पटणारे नाहीत. पण ती सगळी माझ्याकडची माणसं आहेत आणि त्यांच्यात मला रस आहे.

हं. तर ज्योतीकडे गेले तर तिची मुलं, पुतणे आजूबाजूला. ही कायम साडीत. मोठीच वाटायला लागलेली.
तिचे विषय वेगळे माझे वेगळे. खरं म्हणजे तसे ते पूर्वीपासूनच होते. पण आता खूप अंतर पडलंय हे जाणवत होतं.

त्यानंतर कधी मी तिच्याकडे गेले नाही.
पुढे माझंही लग्न झालं, मुलंबाळं, मीही संसारात बुडून गेले.

दरम्यान कधीतरी भॆट, कधीतरी दिसणं, वरवरचं बोलणं बस्सं!

चार वर्षांपूर्वी एका लग्नाच्या निमित्ताने भेटलो.
निजामाबादला लग्न होतं, पुष्कळ बारा-चौदा तासांचा प्रवास होता.
सर्वांच्या मिळून भेंड्या, काहीतरी गप्पा, आठवणी निघत होत्या.
नंतर म्हणाली, " मी आता विद्याच्या शेजारी बसणार आहे."
मग आमच्या दोघींत गप्पा म्हणजे
इतकं औपचारीक बोलणं सुरू झालं.
जवळपास एकमेकींची काहीच माहिती नाही असंच होतं.

तिच्या मोठ्या मुलाला कॅन्सर झालेला, पहिल्या स्टेजलाच कळला, व्यवस्थित औषधोपचार केले आणि तो पूर्ण बरा झालाय आता काहीच धोका नाही हे कळलेलं.

तॊ विषय निघाला. म्हणाली आता अगदी छान आहे, पॉलीटेक्नीक करतोय.

मग त्या दिवसांमधलं सांगायला लागली.
मुलांचं असं कळलं. त्याच्यासाठी मुंबईच्या फेर्‍या, औषधोपचार, लाखभर रूपये खर्च येणार होता.
माझे तर हातपायच गळाले. एव्हढे पैसे कसे आणि कुठून उभे करू?
ह्यांना पण काही कळेना.
कोणीतरी सांगितलं, खासदारांना भेट.
अजूनही कोणी कोणी काय काय सांगितलेलं असेलच.
म्हणाली, " मला परक्या पुरूषांशी कधी बोलून माहित नाही." एकटी खासदारांना भेटायला गेली. (भेट मिळण्यासाठीही दोन, तीन फेर्‍या झाल्या असतील.) सोबत रिपोर्टस. " त्यांच्याशी कसं काय बोलले माहित नाही. देवाने बळ दिलं बघ."
मग त्यांनी सतराशे साठ गोष्टींची पूर्तता करायला सांगितली, त्यासाठी अर्ज करणं, नगरपालिकेत खेटे घालणं, सगळं केलं.
साधी सही कशी करायची ते या बाईला येत नव्हतं.
खासदार निधीतून पन्नास-साठ हजारांची मदत मिळाली. बाकीचे इकडून तिकडून उभे केले.
एकटीने मुंबईचा प्रवास, लोकलने फिरणं, तिथं राहणं, मुलाची काळजी, त्याची पथ्यं सांभाळणं, सगळं निभावलं.

ज्योती किती बदलली होती.
म्हणाले, "ज्योती, तू ग्रेट आहेस."

Friday, August 15, 2014

अस्वस्थता

आम्ही मुस्कान चं काम जाणून घेत होतो.
बाललैंगिक अत्याचारांची आकडेवारी भयंकर आहे.
आणि ते करणारी माणसे कुणी विकृत नाहीत, म्हणजे ते करणं ही विकृतीच आहे, पण ती माणसे सरसकट विकृत नसतात.
त्यांची कुठलीही ठळक ओळख नाही.
ती आजूबाजूची माणसं आहेत, संधी साधून ती हे करतात.
ती कुठल्याही जाती, धर्माची, वयाची, स्त्री किंवा पुरूष असू शकते.
’आपण आणि ते’ अशी वर्गवारी करता यावी अशी निकड भासत होती,
मुस्कान मधील मैत्रिण पुन्हा पुन्हा तसं नाही हे सांगत होती.

......

त्यामागच्या प्रमुख कारणांपैकी, एक आहे मुलांकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन,
म्हणजे त्यांच्याकडे व्यक्ती असं न पाहता, मालकी हक्काची वस्तू समजणे, त्यांच्यावर विश्वास न ठेवणॆ,

सत्तेच्या उतरंडीत ती सर्वात खाली आहेत.

.......

आमचा छोटासा गट हे ऎकत बसला होता.
बोलता बोलता मैत्रिण म्हणाली, " ही आकडेवारी इतकी आहे की या आपल्या गटातही कुणाकुणाला या अत्याचाराला सामोरं जावं लागलं असेल. "
खरंच आहे.
....
विचार करता करता वाटलं.... अत्याचार करणार्‍यांचंही प्रमाण किती जास्त आहे.
.......
कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवावा , असा खात्रीचा मित्र मैत्रिणींचा गट!
......
या आपल्या गटातही कुणीकुणी अत्याचार करत असेल? हे असलं भलतं मनात आलं आणि मग अंधारून आलं.
काहीच सुचेनासं झालं.
.......
ती अस्वस्थता अजूनही गेली नाही.
........

Thursday, July 31, 2014

हे ही कधीतरी बोललं पाहिजे

दोन वर्षांपूर्वी लिहिलेला लेख

********

मी खूप हिंमत करून हे लिहित आहे.
मी शेवटपर्य़ंत लिहू शकीन असं वाटतंय.
सत्यमेव जयते चा दुसरा बाललैंगिक शोषणावरचा भाग पाहिला.
आणि लिहायचेच असे ठरवले आहे.
*******

मी पाच- सहा वर्षांची होते. वाड्यात सगळे मुलगे आणि मी एकटी मुलगी. सगळ्या घरांमधून फिरायचे, सगळ्यांची लाडकी. खूप बोलत असे. वाड्यातले नुकते लग्न झालेले, उमेदवार असलेले काका/ काकू मला खास गप्पा मारायला बोलवत.
आणि
.........................
त्यातलेच एक काका होते, तेव्हा काकू बाळंतपणासाठी माहेरी गेलेल्या होत्या. त्यांनी मला त्यांच्या खोलीत बोलावलं आणि दार लावून घेतलं. फारतर पाच मिनिटे मी त्यांच्या खोलीत असेन. जे काय त्यांनी केलं ते किळसवाणं होतं.
.................
नंतर
त्यांनी मला बांगड्यांच्या आकारातलं लोखंडी स्प्रिंग दिलं, ते फोर्बस कंपनीत होते, तिथल्या टाकाऊ मालातलं ते असायचं, वाड्यातल्या आम्हां मुलांना ते खेळणं फार आवडायचं, पूर्वीही त्यांनी मला दिलेलं होतं, मी त्यांना आणखी मिळालं तर आणा असं सांगीतलेलं.
.........
मी घरी आले, ते खेळणं कोपर्‍यात टाकून दिलं. घरात कोणाशीही काही बोलले नाही.
........
सहा वर्षांच्या एका छोट्या मुलीसाठी ही असली घाणेरडी गोष्ट ....... कुणाला न सांगता...... स्वत:च्या मनात पुरून ठेवणं...... खूप अवघड होतं...... ती एक बोलकी मुलगी होती..... काही खुट्ट वाजलं तरी वाडाभर जाऊन सांगायची......
तिने ते केलं..... कुणालाही काही सांगीतलं नाही..... तिला कळलंच नसणार, कसं सांगावं ते....
.......
आणखी चार दिवसांनी ....... त्यांनी अचानक मला उचलून त्यांच्या खोलीत नेलं...... मी ओरडले नाही.... पुन्हा तसेच.... पाच मिनिटांनी मला बाहेर सोडले आणि चाराणे माझ्या हातात ठेवले..... चॉकलेट घे म्हणून.......
................................
मी ते पैसे घट्ट मुठीत धरून घरी घेऊन आले................. माझ्या लाडक्या खिडकीत बसले................... आणि ते पैसे खिडकीतून मागच्या बोळीत टाकून दिले.
.........................
जे काय घडतंय त्याचं काय करायचं मला काहीच कळत नव्हतं.
....
आणखी दोन दिवसांनी असेल... मी खाली अंगणात खेळत होते, ते वरच्या मजल्यावर राहायचे ...... गॅलरीच्या कठड्याला टेकून त्यांनी मला ’ये ’ अशी हाताने खूण केली. मी जे पळत घरात जाऊन बसले. कोणीही कितीही बोलावलं तरी बाहेरच आले नाही. नाही मला खेळायचं आणि नाही मला बाहेर यायचं असंच सांगत राहिले........
.......
नळाजवळ आम्ही लावलेल्या गुलाबाशेजारी उभी असलेली ती सहा वर्षांची मुलगी.... छोटीशी.... फ्रॉक घातलेली..... आणि वर कठड्याला टेकून तिला ये म्हणणारा तिच्या गोष्टीतला राक्षस......
ते दोघे अजून माझ्या डोळ्यासमोर आहेत....
त्यानंतर जीव खाऊन ती मुलगी घरात पळाली... ते ही
.........................

पुन्हा असं काही झालं नाही. त्यांच्याबद्दल लोक, आईबाबा चांगलंच बोलायचे, "किती बिचारा सज्जन माणूस" असेच. ते कधी घरी आले तर मी पळून बाहेर जायची. काकू आल्यावरही मी शक्यतो त्यांच्या घरात जायचीच नाही. त्यांचं बाळ पाहायला आईबरोबर गेले तर आईचा पदर धरूनच बसले.
पुढे वर्षसहा महिन्यात ते वाडा सोडून दुसरीकडे राहायला गेले.

पुढे साताठ वर्षांनी ते अकाली गेले. सगळेच त्याबद्दल हळहळत होते.
मला इतकं बरं वाटलं.

.....................

पुढे कधीही असं काही घडलं नाही.
माझं बालपण याने काळवंडून गेलं नाही.
मी ते माझ्या मनात पुरून ठेवलं...... जणू दुसर्‍याच कुणा मुलीचा अनुभव असावा तसं.
सुरूवातीला याचा खूप त्रास झाला असेल. ते कळावं असं माझं वय नव्हतं.
मोठी होता होता, कधी कधी हे आठवलं की मला त्रास व्हायचा.
मोठी झाल्यावर यात माझा काहीच दोष नव्हता, मी मला कोसत बसले नाही.
तरीही ही खूप त्रासदायक आठवण होती.

....................

मी हे अजूनही आईबाबांशी बोलू शकलेले नाही.
मी त्यांना सांगीतलेलंच नाही.

.......................

लग्नानंतर मिलिन्दशी बोलावं, असं बरेचदा वाटून गेलेलं.......
मी शब्दच गोळा करू शकायचे नाही....

...........
आम्ही मॉन्सून वेडींग हा सिनेमा पाहायला गेलेलो. शेवटी शेवटी मी रडायला सुरूवात केली. मी वेड्यासारखी रडत होते. सिनेमा संपला. मी रडत होते.... आम्ही रस्त्यावरून चालत होतो..... मी रडत होते. मिलिन्दला कळेनाच मला काय झालंय ते...... मला वाटतं आम्ही हॉटेलात गेलो.... तिथेही मी रडत होते....... मला रडू आवरताच येत नव्हतं.
किती वर्षांनी त्या घटनेसाठी मी रडून घेतलं.
...................
घरी आल्यावर मी मिलिन्दला सांगीतलं....
इतक्या वर्षांनी..... पहिल्यांदा.... मी कुणाशीतरी बोलले.....
खूप मोकळं मोकळं वाटलं.....

..........
परवा शनिवारी.... सकाळी कोरीगडावर जाऊन आले..... संध्याकाळी/ रात्री आशाकडे छान जेवलो, मस्त गप्पा मारल्या. अख्खा दिवस छान गेलेला. रविवारी सकाळी घरी आले. पुन्हा थोड्यावेळाने झोपले....

अकराला मिलिन्दने उठवलं. ’तुला सत्यमेव जयते पाहायचंय ना?" उठले.... अख्खा एपिसोडभर रडतच होते.

मिलिन्द म्हणाला ," किती हिमतीनं सांगीतलं ना त्यांनी! "

वाटलं आता बोललंच पाहिजे......
तुम्हांला तरी सांगीतलं पाहिजे.
 
...................

Tuesday, July 15, 2014

अनिता

अनिता आमच्या हॉस्टेलवर महिनाभरासाठी आलेली. सुरूवातीला तिची आमची फारशी ओळख नव्हती.
ती उशीरापर्यंत झोपायची. मी कॉलेजला गेल्यावर कधीतरी तिच्या कामावर जायची. रात्री जेवायला नसायची. उशीराच यायची.

ती मिडी/ स्कर्ट असले आमच्यापेक्षा आधुनिक कपडे घालायची. उंच टाचांच्या सॅंडल्स वगैरे, कापलेले केस खांद्यापर्यंत रूळत असायचे.
उशीरा उठायची त्यामुळे दोन-तीन दिवसांनी कधीतरी आंघोळ, स्वच्छता कमीच पण सुगंध फवारून, हलका मेक अप करून तयार!
कुठेतरी रिसेप्शनीस्ट होती. खरं तिच्याकडे दोन - चारच ड्रेस होते पण अत्याधुनिक असे, दुरून महागडे वाटायचे पण नीट पाहिले तर तुळशी बागेतलेच.

आल्यानंतर दहा-बारा दिवसांनी बोलणे झाले असेल.

तिचे लग्न झालेले होते, बरेचदा ती छोटेसे नकली मंगळसूत्र घालायची. सासर शिरूरजवळच्या कुठल्याशा खेड्यातले होते. नवरा स्थानिक पुढार्‍याचा मुलगा होता. मी त्या पुढार्‍याचे नाव ऎकलेले नव्हते. हिला नोकरी करायचीच होती, म्हणून ती इथे राहात होती. मला तिचे कौतुक वाटले.

आणखी एका जरा सविस्तर भेटीत कळले की तिचे आंतरजातीय लग्न होते. ती ब्राह्मण तर नवरा मराठा. पळून जाऊन आळंदीत लग्न केले होते. मुलगा आईला पसंत नव्हता. बहुदा तिच्या कॉलेजमधेच होता. आई जुन्या पुण्यात कुठल्याशा पेठेत राहायची. वडील नव्हते, एक भाऊ आणि आई वाड्यात राहायचे. सासरकडच्या सगळ्यांना पसंत होती, तिकडे काही प्रश्न नव्हता. लवकरच पुण्यात घर घेऊन ती आणि तिचा नवरा असे दोघे इथेच राहणार होते.

एकदा कधीतरी आम्ही आपापल्या आयांबद्दल बोलत होतो, जरा मजेमजेचं तरी आपुलकीचं असं बोलणं चाललेलं.
अनिता म्हणाली, " माझी आई, आई नाही वैरीण आहे. मला आयुष्यभर तोंड दाखवू नकोस म्हणाली आहे. लग्नानंतर सहा महिन्यांनी एकदा भाऊ वाटेत भेटला म्हणून घरी गेले होते. बसले, जरा वेळाने तिला सांगितलं की तीन महिने झाले आहेत. चिडली. उठून माझ्या पोटावर लाथा मारल्या. "पाप आहे" म्हणत होती. त्याने माझं अ‍ॅबॉर्शन झालं. माझं बाळ पडून गेलं. मी तिचं कधीही तोंड पाहणार नाही. कधीही त्या घराचा उंबरठा ओलांडणार नाही. " आम्ही सुन्न झालो. तिही रडत नव्हती. बधीर झालेली.

दुपारी तिला भेटायला किंवा घेऊन जायला कोणीतरी नवर्‍याचा मित्र यायचा, आम्ही कधी त्याला बघितलं नव्हतं. पण तो शीळ घालायचा आणि ही जायची.
 नवर्‍याच्या मित्राबरोबर बाईकवरून जायला काहीच हरकत नव्हती पण त्याने शीळ का घालावी? नीट रितसर आत येऊन बोलावू का नये? असे आपले आम्हांला वाटायचे.
आम्ही तशा मागासलेल्याच होतो.

सासर कसं आहे? असं एकदा विचारत होते तर म्हणाली, "एकदा गेलेय, आठ दहा दिवस राहून आले आहे. सासू आणि नणंदही चांगलीच आहे. नणंद माझ्या एवढीच आहे. तिची मैत्रिण म्हणूनच गेले होते."
" का?"
"अजून गावी कोणाला सांगितलेलं नाही. स्थानिक निवडणुका आहेत, त्या झाल्या की सांगू असं सासर्‍यांनी ठरवलं आहे."
मी उडालेच.
" काय? ही फसवणूक आहे. तुला कळतंय का? तुमचं लग्न कायदेशीर आहे का? तुझ्याकडे काही पुरावा आहे? उद्या लग्न झालेलंच नाही म्हणाले तर? तुझा नवरा फिरला तर? सासरच्यांच्या दबावाखाली आला आणि लग्नच नाकारलं तर? आधी मॅरेज सर्टीफिकेट घेऊन ठेव. लग्नाचे फोटो तुझ्या ताब्यत ठेव. "
मी चिडलेले. मला कळेना, ही मुलगी मूर्ख तर नाही? मला कळतंय ते हिला कळतंय की नाही? मी कितीतरी वेळ तिच्याशी बोलत रहिलेले.
पुन्हा एकदोनदा ति्ला आठवण केली की याबद्दल नवर्‍याशी बोल म्हणून.
मी तिच्याकडे लक्ष द्यायला सुरूवात केली. बोलू, हिला थोडं शहाणं करू असं मला वाटत होतं.
एक दिवस अचानकच आमचा निरोप न घेता दुपारीच ती निघून गेली.
ठरलेला महिना आणि पुढे मला वाटतं दहा - बारा दिवस ती राहिली असेल.
आमच्याकडे कुणाकडेही पत्ता नव्हता. पुन्हा कधी दिसलीही नाही.

मधेच एक दिवस ती कुठे काम करायची, त्या ऑफीसची पार्टी होती, तिकडे खूप वेळ लागणार आणि इतक्या उशीरा आलेलं त्या हॉस्टेलवर चालायचं नाही. मग ती तिथेच राहीली, हॉटेलमधेच! हे आम्हां सगळ्या जणींना खटकलेलं.

आम्ही खरं काय हिची विचित्र गोष्ट म्हणत रहिलो. तिला नावं ठेवली. अर्थात आस्थेनं ऎकून घ्यायचो  पण मदतीचा हात पुढे केला नाही. तो करेकरेतो ती निघूनच गेली आणि आम्ही तिची आठवणही काढत राहिलो नाही.

ती परिस्थितीने कॉलगर्लचं काम करायला लागलेली का? कोण जाणे.
******

मी स्वत:च्या आणि स्त्रियांच्या हक्कांबद्दल जागरूक असले तरी लैंगिकतेच्या बाबतीत अक्षरश: काहीच विचार केलेला नव्हता.
"लैंगिक स्वातंत्र्य आणि माझ्या शरीरावर माझा हक्क" हे मी शिकले, लैंगिकतेचं राजकारण शिकले ती स्त्री अभ्यास केंद्रात.
तोवर बायका बायकांमधे लैंगिकतेमुळे केलं जाणारं विभाजन मला मान्यच असावं, मी काही विचारच केलेला नव्हता त्यावर.
आता मी सगळ्या स्त्रियांकडे समानतेने बघू शकते.

*******
कदाचित तेव्हा मी तिला काही मदत करू शकलेही नसते.
आता करू शकेन.

********

आपल्या मुलीने जातीबाहेर लग्न केलं, एवढं कारणंही आईचं मुलीवरचं प्रेम संपायला पुरतं. 
अशा आया असतात.
आई थोडी उदार झाली असती, तिला आपल्या मुलीवर थोडसं प्रेम करता आलं असतं तर...
एक अनिता कदाचित वाचली असती.
*******

Monday, June 30, 2014

शीला

शीला केरळातल्या पट्टनमतिट्टाहून आलेली. महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावातल्या इंजिनीअरींग कॉलेजमधून तिने BE केलं होतं. नंतर इथे पुण्यात नोकरी करत होती. आमच्या हॉस्टेलवर राहात होती.

साधी सरळ मुलगी! प्रेमात पडली होती. लग्न ठरलेलं. ते चार वर्षांनी करायचं हे ही ठरलेलं. तो मुलगा मुंबईत राहायचा. मुंबईपेक्षा एकट्या मुलीला राहायला पुणं सुरक्षित! म्हणून आईवडिलांनी वर्षभर पुण्यात राहून नोकरी करण्याला परवानगी दिली होती.

आता आई-बाबांचं ऎकायचं, नंतर नवर्‍याचं, मग संसार मुलं.... तिचं अगदी पक्कं होतं.

आमच्यापेक्षा तिचं जरा निराळं होतं. आमचं सार्‍याजणींचं भविष्य धुसर, अनिश्चित होतं. तिचं दृष्टीपथात. त्यापेक्षाही खरं प्रेमाने तिला वर उचललेलं.

तिच्या प्रेमकथेच्या खरं मजाच होत्या.

एक म्हणजे दोघंही पट्टनमतिट्टाच्या एकाच हॉस्पीटलमधे चार महिन्यांच्या अंतराने जन्मलेले.

दुसरं..

ही दोघं आणि आणखीही आठ-दहा जण असतील, इथे शिकायला आलेले. हा खरं तर तिच्या मैत्रिणीचा चांगला मित्र! तिघेही एकाच वर्गात. पण शीला त्याच्याशी फारसं बोलत नसे. दोघांचं कसं जमलं, हा तपशील मी विसरले आहे. पण दोघांचं नक्की ठरल्यावर त्यांनी घरी सांगायच्या आत, या दोघांना त्या छोट्या गावातल्या शीलाच्या एका दूरच्या काकांनी पाहिलं. तेच तिचे local guardian होते. योगायोगाने चारच दिवसांनी ते गावी, पट्टनमतिट्टाला जाणार होते. दोघी मैत्रिणी काळजीत पडल्या. ते काका घरी जाऊन हे नक्की सांगणार! मग घरी कसा गोंधळ माजेल, कदाचित फिसकटेल हे दिसायला लागलं. मग काकांच्या आधी आपणच घरी सांगावं हा विचार करून रिझर्वेशन नसताना तसाच प्रवास करत दोघी मैत्रिणी गावी गेल्या. शीला अशी अचानक कशी काय आली? आई-बाबांना कळेना.

हिने सांगितलं की ते काका उद्या-परवा येणार आहेत, त्यांनी मला एका मुलाबरोबर पाहिलं, ते येऊन काही सांगतील तर त्याच्या आत आपणच खुलासा करावा म्हणून आले आहे. आई-बाबा म्हणाले, " अगं, वेडी की काय तू? तेव्हढ्यासाठी आलीस? त्यांनी काहीही सांगितलं तरी आमचा काय आमच्या मुलीवर विश्वास नाही? आमची खात्री आहे. तू काहीही काळजी करू नकोस. " ........ झालं! इथवर गोष्ट आली की ख्यॅ! ख्यॅ! ख्यॅ! आम्ही नुसत्या हसायला लागायचो. मग काकांना जी शंका आली ती खरीच आहे....... वगैरे वगैरे सांगताना तिची उडालेली त्रेधातिरीपीट ऎकायला जाम मजा यायची.

एकाच जाती-पोटजातीतल्या आणि अनुरूप असणार्‍या दोघांच्या लग्नाला दोन्हीकडच्यांनीही पाठिंबा द्यावा यात नवल ते काय?

तिचं सगळं शिस्तीत चालायचं. सकाळी उठल्यावर प्रार्थना, झोपताना देवाचे आभार, वगैरे वगैरे. तिच्या आयुष्यात आलेल्या ’त्याच्या’ वर ती खूष होती आणि हे करणार्‍या देवाबद्दल कृतज्ञ!



आमच्या हॉस्टेलच्या शेजारी दर गुरूवारी सकाळी भजनी मंडळाच्या बायका जमून भजनं म्हणत. जो काही टिपेचा सूर लावीत! बस्स! मी म्हणायचे काय कटकट आहे! आणि माझ्या दोन मैत्रिणी नसरीन आणि शीला मला समजावीत असत की " असं म्हणू नये. देवाचं नाव आपोआप कानावर पडतं. " :)

नसरीन सारखीच शीला ही एकमेव ख्रिश्चन मैत्रिण!

तिचे बाबा तिकडे चर्चमधे फादर होते. म्हणजे तो हुद्दा की संबोधन कोण जाणे!

तिचे घरी आणि त्याला मुंबईला फोन करण्याचे दिवस ठरलेले होते. (तिचा पगार ती जपून वापरत असे.) मुंबईला फोन केला की आधी नणंदेशी किंवा सासूबाईंशी अदबीने बोलणं मग त्याच्याशी. तेव्हा सर्रास मोबाईल नव्हते, आम्ही सगळ्याच १/४ रेट झाल्यावर घरी फोन करत असू.

ते दोघे एकाआड एका रविवारी भेटत असत. बरेचदा लोणावळ्याला.  दोघांनांही ते बरे पडे.

एकदा काय निरोपात गडबड झाली माहित नाही पण ही लोणावळ्याला गेली आणि तो आलाच नाही. आम्ही कुठे कुठे भटकायला गेलेलो परत हॉस्टेलवर आलो तर ही पांघरूण घेऊन झोपलेली. कुणाशी काही बोलेना. रडतच असलेली. आम्हीही शांत बसलो. तेव्हा काय किंवा नंतर काय कधीही आम्ही या प्रसंगाची खिल्ली उडवली नाही.

एकदा कधीतरी लोकरीच्या विणकामाचा विषय निघाला, मी शिकवू शकेन म्हंटल्यावर दोघी- तिघीजणी जाऊन तुळशीबागेतून लोकर , सुया घेऊन आल्या. मी काहीतरी साधीशी विण शिकवली असेल. नसरीनने पण कुणासाठीतरी करायला घेतला. शीलाला आपण त्याच्यासाठी स्वेटर विणतोय हे इतकं भारी वाटत होतं. मला म्हणाली, "तुझं लग्न ठरलं की तुही एक छानसा विण. "

" मी? ह्या!"

" कशी गं तू? तुला काहीच नवर्‍यासाठी करायला नको आहे. त्याला किती छान वाटेल! विचार करून बघ. "

" मला वाटतं, ही अशी भेट मला मिळाली तर मला किती छान वाटेल! तुम्ही स्वत:ला छान वाटण्याचा जरा विचार करून बघा. " :)

त्या रविवारी तो यायचा होता. मुंबईहून पुण्याला. त्याला साडी नेसलेली आवडते म्हणून शीला एक साडी घेऊन आली होती. ती तिला नेसायची होती. इतक्या लगेच ब्लाऊज कसा शिवून मिळेल? मग काय सगळ्याच जणी सल्ले द्यायला तयार! रेडीमेड कुठे मिळेल? पासून काळा चालेल, पर्यंत. ती कॉटनची काळ्यावर डिझाईन असलेली साडी होती. मी म्हणाले, " तुला अगदी मॅंचिग हवा आहे ना? मग काय कर, तुझ्याकडे काळा ब्लाऊज आहेच ना, त्याच्या नुसत्या बाह्या बदल. साडीच्या आतल्या बाजूकडून बाह्या कापून घ्यायच्या आणि जोडायच्या, कोणीही हे पटकन करून देईल. "

"वा!" ती एकदम खूष झाली.

पण दोन दिवसांत हे करून देईल असा कोणी टेलर मिळाला नाही.

" विद्या, तूच दे ना करून. "

" बरं. " मीही उदारपणे म्हणाले.

रविवारी सगळ्याजणी कुठे कुठे गेलेल्या. आम्ही दोघीच होतो. तो दुपारी चारला यायचा होता.

मी उशीरा उठून सावकाश आवरून, पेपर वाचून, निवान्तच. तिने जुना ब्लाऊज उसवून ठेवलेला, आणि माझ्या मागे पुढे.

जेवायला दोघीच होतो. शेवटी ती म्हणाली, " विद्या, शिवून देणारेस की नाही?"

" देते की! कितीसा वेळ लागणारे!"

" जेवण झालं की दुसरं काहीही करू नकोस."

जेवणानंतर खरंच मी शिवायला घेतला.

मग माझ्याजवळ बसून त्याच्याबद्दल काय काय सांगायला लागली.

ती इतकी त्याच्या प्रेमात बुडालेली होती आणि इतकी सुंदर दिसत होती.

म्हणाली, " त्याला दुबईला जाऊन खूप पैसा कमवायचाय. दोन-चार वर्षच जाईन म्हणतो आहे. आमच्याकडे हे फार आहे. पुरूषमंडळी आखातात आणि बरेचदा बायका इकडॆ. लग्न झालं तरी आम्हांला एकत्र राहायला मिळणार की नाही कोण जाणे. "

ती काळजीतही होती आणि सुखातही.

मी नुसती ऎकत होते.

ती बोलत होती.

प्रेमामुळे माणसं कशी फुलून येतात, कशी तरंगायला लागतात हे मी पहिल्यांदा इतक्या जवळून पाहिलं ते तेव्हा!

तिचाही स्वर इतका सलगीचा होता, इतका आतला होता.

नुसत्या मैत्रीने , स्नेहाने मी न्हाऊन निघत होते.



माणसाला काय बरं हवं असतं?

आतलं आतलं बोलता यावं असं एक माणूस!



शीलाही पत्त्यासगट कुठेतरी हरवून गेली.

पट्टनमतिट्टा ? की मुंबई? की दुबई?

कुठे आहेस तू?



स्वत:ला छान वाटावं याचा विचार करून बघितलास की नाही अजूनतरी?


********


.

 . Epstein files मधून जे जे काही बाहेर येतं आहे ते भयंकर आहे. Jeffrey Epstein हा माणूस आहे का सैतान? त्याने इतक्या बालिकांचं लैंगिक शोषण केल...