Wednesday, August 15, 2012

वाचकांचे लेख -- अधिक महिना आणि जावयाचे वाण..

आता अधिक महिना जवळ आला आहे. सगळीकडे (निदान माझ्या आसपास तरी) अधिक मासाच्या वाणाची चर्चा सुरु झाली आहे. लग्नाचे हे पहिलेच वर्ष असल्याने माझ्या नवर्याला या वर्षी काय वाण मिळेल याची उत्सुकता इकडे लागून राहिलेली आहे. तिकडे आई बाबांची सुद्धा वाण म्हणून द्यायला सोनाराकडे एक फेरी झाली आहे.

का देतात अधिक मासात जावयाला वाण?? कुणाला ठाऊक आहे? इकडे ज्या लोकांना वाण काय मिळणार म्हणून उत्सुकता आहे त्यांना हा प्रश्न विचारल्यावर ते काहीतरी विनोदी उत्तरे देऊन माझा प्रश्न हसण्यावारी नेत आहेत..

मुळात अधिक महिनाच काय? पहिल्या वर्षाच्या प्रत्येक सणाला जावयाला आणि मुलीच्या सासरकडच्या लोकांना काही ना काही दिले पाहिजे असं शास्त्र कोणी काढलं? आणि ते का पाळाव लागतं??

इतक्या का आपण मुली टाकाऊ असतो? कि आपल्यासारखीला आश्रय देणारा जावई महान होय.. त्याला लग्नात हुंडा द्यावा, मग लग्नानंतर पहिल्या वर्षी प्रत्येक सणाला काही ना काहीतरी द्यावे; हे काय कमी म्हणून आयुष्यभर.. म्हणजे अगदी सासू ९८ वर्षाची झाली आणि जावई ७० वर्षाचा म्हातारा झाला तरीही अधिक मासाचे वाण द्यायचे. हे काय कमी म्हणून ती सासू वारली तरी मुलीचा भाऊ वाण देऊन हि परंपरा कायम ठेवतो.

माझा ह्या देण्या-घेण्याला सक्त विरोध आहे. का म्हणून मुलीच्या आई-वडिलांनी मुलीच्या सासरी हे असं सतत देत राहायचं?? आई-वडील जुन्या वळणाचे असल्याने त्यांना "नका देऊ" सांगून पटत नाही. सासरच्यांना नका घेऊ सांगितलेले आवडणार नाही. नवर्याला सांगितले तर तो म्हणतो कि "मला त्यांच्याकडून काहीही नको पण त्यांनी खूप आग्रह केला तर मला त्यांचे मन मोडवणार नाही".

मला नक्की माहितीये कि सध्या माझ्या आई-वडिलांची जावयाला सोन्या-चांदीची वस्तू देण्याची नक्कीच ऐपत नाहीये. त्यांनी पोटाला चिमटा काढून हि वस्तू घेतली आहे. आधीच माझ्या लग्नासाठी बाबांनी खूप कर्ज काढले होते. (मुळात लग्न साधेपणाने करायची आमची इच्छा होती पण मोठ्यांनी ती हाणून पाडली. इकडची (सासरची) माणसे आम्ही लग्नाचा अर्धा खर्च करतो असं म्हणत होते.. पण माझेच आईवडील जुन्या वळणाचे असल्याने त्यांनी लग्नाचा सगळा खर्च ऐपत नसतांना स्वत:च उचलला).

आता मला आई-बाबांकडून काहीही घ्यायला लाज वाटते. ह्या सगळ्या सिस्टीम वरच खूप राग येतोय..

हि कुठली भिकारडी (विवाह) संस्था?? मुलीच्या आईवडिलांच्या पोटाला चिमटे घेऊन त्यांना मुलीच्या सासरकडच्या लोकांचा मानपान करायला लावणारी? मी लग्न केले हे चुकले का?? कि विधिवत लग्न करायची त्यांची (माझ्या आणि नवर्याच्या आईवडिलांची) अट मानली हे चुकले?

खूप कात्रीत अडकल्यासारखे झाले आहे. तुम्ही अश्या प्रसंगातून गेले आहात का? काय केलेत अश्या वेळी? मी काय करू शकते अश्या प्रसंगात?

- आश्लेषा

8 comments:

  1. या रीतीरिवाजांचं अवडंबर न माजवता आणि त्यांचं ओझं न मानता निव्वळ हौस, गंमत, कौतुक असं स्वरूप ठेवलं तर या पद्धती नात्यातला गोडवा वाढवतात. पण 'बरं दिसत नाही', 'रीतीचं करायला हवं', 'काय म्हणतील ते लोक' अशा ओझ्याखाली सगळी देणीघेणी त्याच त्या पद्धतीने, त्याच त्या साच्यात पार पाडली जातात. लोक ते कर्तव्यभावनेनं, आणि आनंदानंही करतात. सगळं 'यथासांग' केलं याचं समाधान त्यांना जास्त असतं. ठरलेल्या पद्धतीपेक्षा वेगळं काही करता येतं आणि त्यातून सर्वांना निखळ आनंद मिळू शकतो हे त्यांना पटवून देणं मुळीच सोपं नसतं पण अशक्यही नसतं. माझ्यावर जेव्हा असे प्रसंग आले तव्हा मी बोलत राहिले, पर्याय देत राहिले. ते कधी स्वीकारले गेले, कधी नाही. पण मी माझ्याकडून बोलत राहिले आहे.

    ReplyDelete
  2. अधिकाचे वाण न मिळाल्यास राग येणारे नवरे ह्या २१ व्या शतकात आहेत हेच दुर्दैव आहे.

    ReplyDelete
  3. Dear Ashlesha

    hyat gondhlun janayasarkha kahi nahiye

    hindu paramparenusar Adhik Mahina ha Purushottam Mass mhanun Olakhtat.ya mahinyat Krushnachi puja keli jaate. Ya mahinyat dilele Waan kinwa Daan he adhik-adhik wadhat jate. ekhadya goshtichi vrusshi honyasathi aapan laxmichi pooja karto. Pan laxmi kadhich ekti nasatemhanun tya barobar narayna hi aalach.tyana waan dene mahnje ekprakae samruddhisathichi prarthana karne . Hindu Prathenusar Mulgi aani javai yana laxminarayna che rup samjun tyana dhatuchi vastu aani kapde dile jataat. Lagnanatar pahilyanda yenara adhik mahinyatach he kartat.kahi kahi lok pratyek adhik mahinyat kartat .

    Arthat hya goshti kiti pramnaat karaychya he pratekaane tharvave.

    Agdich karj vagaire kadhun he sagla karna mhanje ateech hoil.

    I don't know tu ya reply la sahamat hosheel ki nahee pan mala je watle te mi sangitale .


    Adhik mahinyache Vaan milale nahi mhanun atta kuthlech navre raagawat nahit kinwa rusun hi basat nahit ...

    ReplyDelete
    Replies
    1. पण शीतल.. तुला असं नाही वाटत.. कि या समजुतीपोटी किंवा हिंदू धर्मातल्या अजूनही काय काय समजूतिन्पोटी मुलीच्या आई-वडिलांकडून काय काय उकळण्याच्याच प्रथांची उत्पत्ती झाली आहे? मुलगी आणि सून जर कृष्ण आणि लक्ष्मि (??) असतील तर मुलगा आणि सून काय चेटकीण आणि राजपुत्र असतात काय? कुठल्याच सणात सासूने सुनेला काही द्यायची प्रथा का नाहीये??

      असो.. लेख थोडा नीट वाचला तर लक्षात येईल कि काका-काकूंनी (आश्लेषाच्या आई-वडिलांनी) लग्नासाठी कर्ज काढले होते वाण देण्यासाठी नाही.

      अधिक महिन्याचे वाण मिळाले नाही म्हणून आत्ता कुठलेच नवरे रागावत नाहीत किंवा रुसून हि बसत नाहीत ... >> असं ठामपणे सांगता येत नाही. आणि लग्न म्हणजे फक्त नवरा नाही.. सासू-सासरे, दीर-जावा, नणंदा.. त्यांचे काय करायचे?

      Delete
  4. आश्लेषाताई,

    तुमचा लेख वाचून तुम्हाला याबद्दल खूप पोटतिडिकीने काही वाटते आहे हे जाणवले.
    तुमच्या भावनांबद्दल आदर आहे...

    तुमच्या लेखातून (आणि प्रतिक्रियांतून) असं पोचतं आहे की परवडत असेल (कर्ज वगैरे न काढता) तर असल्या प्रथा पाळण्याने फारसं काही बिघडत नाही.
    म्हणजे हौस आहे, ऐपत आहे तर काय हरकत आहे?
    तुम्हाला नक्की असंच म्हणायचं आहे का ?

    ज्यांच्याबरोबर तुम्ही आयुष्याची २१~२२ वर्षे काढली त्या तुमच्या आई-वडिलांना जर तुमचं म्हणणं पटत नसेल तर ज्यांच्याशी जेमतेम १ वर्षाचा संबंध आहे त्या सासरच्या लोकांना ते पटत नाही हा मुद्दाच महत्वाचा कसा होऊ शकतो ?

    कर्ज काढून लग्न केल्याचा उल्लेख तुम्ही केलात. या लग्नात तुम्ही फक्त स्वत:वर किती खर्च केलात ? शालू, पैठणी, साड्या, दागिने, प्रसाधन वगैरे आणि त्या सगळ्या गोष्टींची नंतर उपयुक्तता किती ?

    तुमच्या शेवटच्या प्रश्नाबद्दल,

    मला जर काही बदल घडायला हवे असतील तर सुरुवात माझ्यापासून व्हायला हवी.
    पण मला हवे असलेले सगळे बदल घडतीलच असंही नाही.
    REBT वाल्या लोकांची एक प्रार्थना-विचारसरणी आहे.
    "Grant me the courage to change the things I can change, the serenity to accept those that I cannot change, and the wisdom to know the difference."

    ReplyDelete
    Replies
    1. परवडत असेल (कर्ज वगैरे न काढता) तर असल्या प्रथा पाळण्याने फारसं काही बिघडत नाही.म्हणजे हौस आहे, ऐपत आहे तर काय हरकत आहे? >>
      अगदी असच नाही. पण तुम्हाला मुलीला/ जावयाला सहज भेट म्हणून काही द्यावेसे वाटले तर हि असली हौस करा. मुलीला देता तसाच सुनेला पण द्या.. मुलाला आणि जावयाला.. सगळ्यांनाच जे काही द्याल ते सारखं द्या..पण अधिक मासात जावयाला(च) काही दिले(च) पाहिजे. ती चांदीची(च) वस्तू असली पाहिजे (मोस्टली ताट). मग तुम्हाला परवडत असो वा नसो. नाहीतर "लोक काय म्हणतील" ह्या भीतीने काही देणे ह्या सगळ्याला विरोध आहे. भेटी काय.. अश्या ना तश्या आपण घेतोच.. आणि त्यांची परतफेडहि करतो.. पण मुलीच्या सासरी मुलीला नीट नांदवावे..ते लोक काय म्हणतील नाही दिले तर.. ह्या भावनेने देणे एकदम नामंजूर.

      इथे एक गोष्ट सांगायची आहे ते म्हणजे जावई आणि मुलगी लक्ष्मी-नारायण वगैरे असतात यावर माझा मुळीच विश्वास नाहीये. जावई झाला म्हणून काय लगेच त्याच्यात देवत्व येत नाही. त्याला स्वत:चा मुलगा मानून प्रेम जरूर द्यावे. पण देव म्हणून डोक्यावर घेण्यात काय अर्थ?? कोणीतरी मला म्हटले "तुला काय फरक पडतो? तुझ्या भावाला पण मिळणार आहे ना त्याच्या सासर्यांकडून? म्हणजे तुमच्या घरात(माहेरी) balance होणारच आहे ना" पण मला ते मुळीच पटले नाही. आणि असा हिशोबच करायचा झाला तर ज्यांना दोन्ही मुलीच आहेत त्यांचे नशीब फुटले काय?? अश्या देण्याघेण्याच्या हिशोबामुळेच तर मुली नकोश्या झाल्या आहेत आज.. आणि त्यात नवल ते काय??

      ज्यांच्याबरोबर तुम्ही आयुष्याची २१~२२ वर्षे काढली त्या तुमच्या आई-वडिलांना जर तुमचं म्हणणं पटत नसेल तर ज्यांच्याशी जेमतेम १ वर्षाचा संबंध आहे त्या सासरच्या लोकांना ते पटत नाही हा मुद्दाच महत्वाचा कसा होऊ शकतो ? >>
      पटले. आधीच्या पिढीलाच (मग ते कोणाचेही आई-वडील असोत) मी माझा मुद्दा पटवून देण्यात अयशस्वी ठरत आहे.

      कर्ज काढून लग्न केल्याचा उल्लेख तुम्ही केलात. या लग्नात तुम्ही फक्त स्वत:वर किती खर्च केलात ? शालू, पैठणी, साड्या, दागिने, प्रसाधन वगैरे आणि त्या सगळ्या गोष्टींची नंतर उपयुक्तता किती ?
      >> मी लग्नात फक्त ५ साड्या घेतल्या. आणि त्याही एरवी नेहमी वापरता येतील अश्या. दागिने बरेच घेतले (दोन्हीकडून). कारण मी त्यांचाकडे इन्व्हेसमेंट म्हणून पहात होत. आई-बाबांना सांगितले होते कि लग्नावर जो काही खर्च कराल तेवढे पैसे मला संसाराला मदत म्हणून द्या. त्यांनी सांगितले त्यापेक्षा तुला ४ दागिने जास्त घालू. (माझ्या अंगावर दागिने घालून त्यांनाही समाजात मिरवायचे होते कदाचित) त्यामुळे दागिने जास्त घेतले. प्रसाधनांच्या बाबतीत नक्की सांगता येणार नाही. कारण माझ्याच एका मैत्रिणीने मला लग्नाची भेट म्हणून मला मेहेंदी काढून दिली होती आणि माझा संपूर्ण मेक-अप केला होता. (पण हेही कबूल करते कि कदाचित तिने नसता केला तरी मी पैसे खर्चून "हा" खर्च केला असता.)
      प्रसाधने सोडल्यास साड्या किंवा दागिने (यांवर केलेला खर्च) वाया गेले नाहीत.

      मला जर काही बदल घडायला हवे असतील तर सुरुवात माझ्यापासून व्हायला हवी.
      पण मला हवे असलेले सगळे बदल घडतीलच असंही नाही. >> ठीक आहे. पण हि प्रार्थना म्हणून गप्प बसणे हा शेवटचा उपाय झाला.

      -आश्लेषा

      Delete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...