Saturday, March 15, 2014

देव - ८

माणसाला अजूनही निसर्गातली सगळी कोडी सुटलेली नाहीत , हे ही "देव" टिकून राहण्याचं महत्त्वाचं कारण आहे.
तसं बहुदा कधीही होणार नाही.

देवाची व्यवस्था ही हुकूमशाही व्यवस्था आहे.
माणसाचं स्वातंत्र्य गमावणारी आहे.

जन्मत: तुम्ही देव स्वीकारलेला आहे, असंच असतं,
नाकारायचा असेल तर विचारपूर्वक तो नाकारावा लागतो.
ते ही सहज नसतं.
समाजात देव ही कल्पना ऎच्छिक न राहता सक्तीची होते.


माझा माझा देव असं म्हणून प्रत्येकाचा देव वेगळा नाही. बहुसंख्यांचा मिळून एक देव आहे.
समाजाचे नियम, रितीभाती, योग्य-अयोग्य, नीती- अनीति देव ठरवतो.
’देव’ म्हणजे ’देव ज्यांच्या ताब्यात आहे ते मूठभर लोक’ हे ठरवतात.
आणि या व्यवस्थेत सत्ता त्यांच्याकडेच राहते.
ते जनसामान्यांना देवाजवळ पोहचू देत नाहीत.
ज्ञानेश्वरांनी संस्कृतमधली गीता प्राकृतात आणली, ही एक मोठी बंडखोरी होती.
ते ज्ञानही सामान्यांसाठी खुलं नव्हतं.

देव प्रत्येकासाठी एक चाकोरी आखून देतो,
ती तुमच्या जात, वय, लिंगानुसार असते.
देव प्रत्येकाची छोटी छोटी स्वातंत्र्येही काढून घेतो.
देव/ धर्म / धार्मिक / पारंपारिक असं ते मिळून पॅकेज आहे.
मी काही विशिष्ट दिवशी काय स्वैपाक करायचा? हे ठरलेलंच असतं.
( उदा, होळी - पुरणपोळी )
मी काही विशिष्ट दिवशी कुठले कपडे घालायचे ते आणखीच कुणीतरी ठरवतं.
(उदा. नवरात्रात ठरवले गेलेले कपड्यांचे रंग)
मी कुठले प्रवास करावेत?
( तीर्थयात्रा --- ठरलेल्या!)
समाजातील बहुसंख्यांना एक चाकोरी लागते हे मान्य करूनही,
लोकांच्या देवभोळेपणाचा फायदा उठवला जातो.
माणसा माणसात प्रतवार्‍या केल्या जातात. हे तर नक्कीच.

आस्तिक आहे, धार्मिक आहे, म्हणजे तो माणूस नैतिक आहे, असं समजणं चुकीचं आहे.
आणि नास्तिक माणूस नैतिक नाहीच, हे ही चुकीचं आहे.
धार्मिकता आणि नैतिकता या वेगवेगळ्या पायांवर उभ्या असतात, हे ठामपणे सांगण्याची गरज आहे.


********

No comments:

Post a Comment

सुनीता

 सुनीता माझ्याकडे केरफरशीला येते.आज इतकी वर्ष आमच्याकडे कामाला येते ,घरातली एक असल्यासारखी.तिचं काम अतिशय चकचकीत, स्वच्छ. फरशी पुसताना फरशीव...