Saturday, November 30, 2013

देव - २

’ तरूण तेजपाल प्रकरण आणि  आरूषी तलवार खून खटल्याचा निकाल ’ या दोनही घटनांबद्दल आपण इतकं वाचत आहोत, त्यात इथे वेगळं सांगू असं काही नाही.
 त्याबद्दल वाईट वा्टतं आहे,
इभ्रत खूनाबद्दल आधी लिहिलेलं.
तेजपाल प्रकरण चीड आणणारं आहे.

*******

देव -- क्रमश: -----

देवाशी संबंधीतच आपले सगळे सणवार आहेत. ते सगळेच उत्साहाने साजरे केले जात. आई किती दमत असे हे आज जाणवतंय, पण तेव्हा काय किंवा आत्ता काय आईला त्यात समाधान होतं/आहे.

मी कधी स्वत: उत्साहानं पूजा केलीय असं आठवत नाही. एकदा कधीतरी, तिसरी/ चौथीत म्हणालेले तर आईने नाराजीनेच करू दिलेली, (विश्वासला मात्र मनापासून, ) आणि मला पूजा करण्यात काहीही मजा आली नव्हती. पूजा संपली तर हुश्श!

हरितालिका वगैरे मी सहावी सातवीपासून करायला लागले असेन, माझ्या वर्गातल्या मुली तिसरी पासूनच उपास/ पूजा करीत. आई म्हणायची अजून लहान आहेस. हरितालिकेचा उपास करतोय म्हणजे भारी! आणि आता मी त्या सगळ्या मुलींपैकी एक झाले होते ते वेगळंच. आई म्हणालेली नुसता उपास कर, मी जरा खट्टूच झालेले. पत्री गोळा कर, फुलं आण यात मला भलताच उत्साह! नंतर नंतर तो संपत गेला.
( मजा म्हणजे पाच सहा वर्षांपूर्वीपर्यंत हा उपास मी करीत असे, कथा वगैरे सोडून देऊ, मला वाटे तुलनेने (:)) आपला नवरा किती चांगला आहे, तर कृतज्ञता! ....... )

 "आपलं आपलं सगळं करायला आपल्याला वेळ आहे देवासाठी थोडा वेळ काढायचा म्हंटलं की तुमच्याकडे वेळ नाही,  थोडी देवाची आठवण ठेवावी." असंच आईचं म्हणणं असे/आहे. अजूनही " साधा संध्याकाळी देवासमोर दिवा लावायचा... बरं दिवा नाही तर निदान एक उदबत्ती लावयची म्हंटलं तर कसं लक्षात राहात नाही?" असंच ती आजही म्हणते. आतूनच देवाबद्दल काही वाटत नाही, हे तिला कळूच शकत नाही. आणि समजा असेलच "तो" तर असा कर्मकांडात अडकलेला असेल का?
 
 देवासंबंधी प्रश्न विचारायला मी कधी बरं सुरूवात केली?

 जी काय माहिती मिळत होती ती मी कालानुसार लावून घ्यायला सुरूवात केली असणार. म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलीयुग .... वेदांची, पुराणांची रचना, नीतिनियम वगैरे.... म्हणजे सत्ययुगात रामाचं एकपत्नीव्रत आणि द्वापारयुगात कृष्णाला सोळा सहस्त्र बायका, द्रौपदीला पाच पती.... बदलते नियम असं काहीतरी लक्षात येत गेलं.

 रामायण मुख्यत: ठसवलं जायचं ते रावणाच्या पराभवापर्यंतच, पुढचं उत्तररामायण बरचं पुढे कळलं, कदाचित ’कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघूरायाचे " या गाण्याने कुतूहल वाटून, प्रश्न पडले नाहीत.
किंवा कृष्णकथेत सुद्धा प्रश्न पडले नाहीत, आपल्यापर्यंत पोचतं ते देवांच्या बाजूनेच पोचतं.
पहिल्यांदा बहुदा प्रश्न पडायला लागले ते पाप आणि पुण्य, स्वर्ग आणि नरक या बाबतीत.
भागवतात एक कथा आहे, कोण तो एक राजा आयुष्यभर पाप करत राहिला पण मरताना त्याने ’नारायण’ असं , खरंतर आपल्या मुलाचं, नाव घेतलं, त्यामुळे स्वर्गात गेला. ही कथा काही मला पटली नाही.
 यावर मी बराच वाद घातल्याचं आठवतंय, आयुष्यभर चुकीचं वागूनही केवळ मरताना देवाचं नाव तोंडी आली की झालं! हा काही न्याय नाही!
( देवाची नावं मुलांना ठेवण्याचं हे ही एक कारण आहे.)

 मग वाटायला लागलेलं की स्वर्गात किंवा नरकात पाठवण्यात काहीतरी गडबड आहे.

 कधीतरी लक्षात आलं की रूढींमधे मुलींना आणि मुलग्यांना वेगळं वागवलं जातंय. दिवाळीतली न्हाणी बायकांनी एक दिवस आधी उरकून घ्यायची, पुरूषांची मात्र नरकचतुर्दशीला, थाटात!

 सहावी, सातवी, आठवीत कधीतरी अशी प्रश्नांना सुरूवात झाली असेल.

(क्रमश:)

*******

No comments:

Post a Comment

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...