Tuesday, June 2, 2015

उमा ..... बारी चाय्याची!

आम्ही सुट्टीत चार दिवस कूर्गला गेलो होतो.
तिथे मला भेटली उमा.
कोडगू चं इंग्रजांनी केलं कूर्ग
कोडगू हा कर्नाटकातील एक नितांत सुंदर जिल्हा आहे.
तिथले स्थानिक हे कोडवा, ही लढवय्या जमात आहे.
उमा आणि तिचा नवरा रमेश हे कोडगू जिल्ह्यातील एका खेड्यात किंवा वस्तीवरच म्हणू या, राहतात आणि पर्यटकांची घरगुती राहण्याची सोय करतात.

आम्ही त्यांच्याकडे उतरलो होतो.
दोघांनांही गप्पांची आवड. उमाला खूपच.
त्यांच्या कुटुंबाची तिथे पन्नास एक एकर जमीन आहे. कॉफी हे मुख्य उत्पादन!

दोघांमधेही लोकांना आपलंसं करण्याची कला आहे.
अगत्य, आग्रह आणि गप्पा जणू कुणा आप्तांकडॆच उतरलो आहोत असं वाटत होतं.
यजमान आमच्याबरोबर एकाच टेबलावर नाष्ट्याला, जेवायला बसत आणि भरपूर गप्पा होत.

आम्ही पोचलो तेव्हा आमच्या आधी राहायला आलेला ओयोन आणि उमाच्या गप्पा रंगलेल्या होत्या.
ओयोनची बायको उर्मीमाला या दोघांना गप्पा मारायला सोडून खोलीत आराम करत होती.
उमाने आमची चौकशी केली मग आमची आणि ओयोनची ओळख करून दिली, रमेश बाहेर गेल्याचं सांगितलं.

आल्यावर रमेशनेही सगळी चौकशी केली. रात्री जेवताना भरपूर गप्पा झाल्या. ओयोन आणि उर्मीमाला त्यांच्या कुंटुंबाचेच घटक झाले होते.
मग त्यात आम्हीही सामावले गेलो.
गाणी झाली, गप्पा झाल्या , सांस्कृतिक देवाण-घेवाण वगैरे! :)
मुक्ताने एक कन्नड, एक बंगाली आणि एक मराठी गाणं म्हंटलं.

उमा मला आवडूनच गेली.
सकाळी मी तिच्या घराचं चित्र काढत होते, दोघांनांही उत्सुकता कुठवर आलंय? कसं होतंय?
संध्याकाळी ते चित्र त्यांनांच दिलं. इतकी हरखून गेली ती! एखाद्या लहान मुलीसारखी! :)
चित्राने आम्हां दोघींना आणखीनच जवळ आणलं.
आमची गट्टीच जमली.

एक दिवस आम्ही कुठे बाहेर भटकायला गेलो नव्हतो, मग काय? भरपूर गप्पा.
ऎरवीही जेवणाच्या टेबलाशी तास दीड तास गप्पा!
सुरूवातीला मुलंबाळं काय करतात ते सांगून झालं.
घर सांभाळणं, शिक्षण वगैरे बायकी गप्पा!

तिला विचारलं की तुझं लग्न कसं जमलं?
ठरवून लग्न!
रमेश माझ्या भावाबरोबर एकाच कंपनीत काम करायचा.
एकदा त्याचा निरोप घेऊन घरी आला.
सकाळी सातला.
मी दार उघडलं, मला त्याने पाहिलं आणि मी त्याला आवडले.
नऊ वाजता एका मित्राला घेऊन आला, मी ज्या मुलीशी लग्न करणार आहे, ती बघ, म्हणून.
नंतर माझ्या भावाला सांगितलं की त्याला माझ्याशी लग्न करायचयं.
मी म्हणाले, " म्हणजे लव्हमॅरेजच झालं!"
" हो. त्याच्याबाजूने. मी नाही म्हणाले, मी फक्त अठरा वर्षांची होते. मला नव्हतं लग्न करायचं. हा आमच्याकडे येत राहिला, आईबाबांना हा आवडायचा. नंतर शेवटी मलाही आवडायला लागला. बावीसाव्या वर्षी मी लग्न केलं."

" तुमच्या लग्नाचे फोटॊ मला दाखव."
" नाही दाखवणार."
" का?"
" अजिबात नाही!"
" पण का?"
" अगं, माझी एक कझीन आहे, तिने मला मेक अप केलेला, ते फाऊंडेशन अन काय काय, डोळ्यांवर काय काय, ती म्हणालेली की लग्नात तर मेक अप करायचाच असतो. सगळा वेळ मी तो मेक अप सांभाळून होते, आमच्यात घुंगट घेतात, पारदर्शकच कळतं कोण कोण भेटायला आलेत. नंतर रूममधे नवर्‍याने घुंगट उचलायचा आणि दुध पाजायचं असं असतं. याने घुंगट उचलला आणि त्याचा चेहरा पाहून मला कळलं मी कशी दिसत असणार ते! भीतिदायक!"
तिकडून रमेश म्हणाला, "घोस्ट!"
आम्ही खळखळून हसलो.
त्या आठवणीने ती पुन्हा हिरमुसली. तिच्यात एक छोटी मुलगी आहे.
" मग मी आरशात पाहिलं आणि चेहरा धुवून काढला! तर ... असं दुधाळ पाणी!" :)

" पण कोडवा पद्धतीने साडी नेसल्यावर घुंगट कसा घेता येईल?" त्या पद्धतीत निर्‍या मागे असतात आणि पदर मागून पुढे घेऊन त्याला पिन लावून टाकतात.
" अगं , ओढणी असते ती वरून घेतात, साडीचा पदर नव्हे. आमच्यात नवरा मुलगा आणि मुलगी दोघांनांही ती पांघरतात. त्या उत्तरीयाचा रंग लालच असायला लागतो. मुलीची साडी पण लाल असावी लागते. हल्ली मुली केशरी किंवा मरून अशी घेतात, पण लालपैंकीच हवी.

"तुमच्यात लग्न कसं लागतं?"
रमेश पुढे सरसावला, म्हणाला, " लग्नाचे विधी असे काही नसतात. अग्निभोवती फेरे वगैरे काही नाही. जस्ट सेलिब्रेशन! मुला मुलीचे आईवडील ते साजरं करतात."
" हार वगैरे घालतात की नाही?"
" तेवढंच असतं. जेवण, खाणं /पिणं नाच!"
" लग्नगीतं असतात?"
" गाणी नाहीत, केवळ म्युझिक!"
" कसं नाचता?"
"बल्ले बल्ले स्टाईल! हात वर करून" उमा म्हणाली.
" मंगळसूत्राचं काही महत्त्व नाही. काही घातलं तरी ते आई घालते ना, दोघांची लग्नं तशी आपापल्या घरी, आपापल्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लागतात. म्हणजे माम्या, मावश्या, आत्या, काकू वगैरे मिळून आंघोळ घालतात. मग नवर्‍याकडचे नातेवाईक नवर्‍या मुलाला घेऊन मुलीकडे येतात. नवरा मुलगा म्हणतो, ’मला तुमच्या मुलीशी लग्न करयचयं.’ मुलीकडचे म्हणतात,’ आम्ही नाही देणार आमची मुलगी!" मग थोडावेळ गमतीशीर बोलाचाली होते, मुलीचं लग्न करायला तयार होतात. मुलीकडचे सांगतात, " केळी कापून आत या" अशी मोठमोठी केळीची खोडं असतात. कोयत्याने एका वारात ती कापायची असतात. थोडक्यात, मुलाकडच्यांनी आपलं शौर्य दाखवायचं असतं. मुलाकडचा कोणीतरी पुरूष हे करतो. मग दोघं एकमेकांना हार घालतात.
मुलाकडे आल्यावर मुलीने नारळ कोयत्याने फोडायचा असतो. "
" एका वारात?"
" पूर्वी यायचे मुलींना, हल्ली नाही. उमा वीस पंचवीसदा मारून फोडायचा प्रयत्न करत होती. :) "
तो पुढे सांगायला लागला, " नारळाचं पाणी विहिरीत घालतात मग त्या विहिरीतून कळशीभर पाणी काढून नवर्‍या मुलीने कळशी डोक्यावर घ्यायची. नाचत- गात- पीत ही वरात नवच्या घरी येते. एवढंसं अंतर कापायला तीन- चार तास लागतात. "
" मुलीची मान अवघडत असेल."
" हो. मुलीकडच्या स्त्रिया हात लावतात. कोणी घाई केली तरी तरूण मुलं ऎकत नाहीत, त्यांना नाचायचं असतं."
उमा म्हणाली, " अगं आमच्यावेळी पहाटेचे साडेचार वाजलेले. तेव्हा रूममधे जायचं आणि साडेसहाला बाहेर आलंच पाहिजे! :) "
नंतर मजा मजा चालते.
उमा म्हणाली, एका आत्याबाईने तिची पेटी उघडली आणि त्यातली एक एक वस्तू, साड्या उचलून सगळ्या बायकांना दाखवू लागली, सगळ्या नुसत्या हसत होत्या.

........ हे ऎकत असताना मला वाटून गेलं की कशा वेगवेगळ्या पद्धती असतात ना! जी त्याच सांस्कृतिक परिसरातील मुलगी असेल ती याची मजा घेऊ शकेल. पण समज कुणी पाश्चात्य मुलगी लग्न करून आली तर या प्रथेचा तिला किती धक्का बसेल! तिची बॅग, तिच्या स्वत:च्या वस्तू, कपडे सगळ्यांना दाखवण्यात, काय मजा आहे! तो तिचा अपमान आहे असं वाटेल तिला. काय मागासलेले लोक आहेत असं वाटेल... ........ काय बरं असेल या प्रथेमागे? रॅगिंग? .... मुलीला सामावून घेण्याचीच एक रांगडी पद्धत?..... आपण आपल्या सांस्कृतिक परीघाबाहेर पडून अशा गोष्टींकडे बघायला पाहिजे. आपल्या मोजपट्ट्या न वापरता.... एका अख्ख्या जमातीला बोल न लावता याकडे बघायला पाहिजे.... उमालाही ते नव्हतं आवडलेलं बहुदा, तिच्या सुरावरून, किंवा सुनांना अशी चेष्टा नसेलच आवडत.... ती शहरात, बंगलूरात जन्मलेली आणि वाढलेली मुलगी आहे. आपल्या सुनेच्या वेळी ती ही प्रथा बदलेल का? कोण जाणे. सांस्कृतिक अभिसरणात वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या गोष्टी प्रतिष्ठेच्या समजल्या जात असतात. काही वर्षांपासून.... तरी तीस- चाळीस, लग्नानंतर केक कापणे ही प्रथा त्यांच्यात सुरू झालेली आहे, पूर्वी ती नव्हती.

 अमेरिकेतल्या भटजी बोलावून अगदी मराठी पद्धतीने केलेल्या लग्नातही आता केक कापणे + किस हे वाढवलेलं आहे. संस्कृतींच्या सीमारेषेवर हे बदल होत असतात.

उमाच्या मुलाचं लवकरच लग्न आहे. लग्न होईपर्यंत तिने गोड खाणं सोडलंय. असं असतं का त्यांच्याकडे? कोण जाणे.
मुलाने स्वत:च लग्न ठरवलंय, सून मल्याळी आहे.
तिचा फोटॊ दाखवला, तिला केलेले दागिने घातलेला फोटो होता.
म्हणाली, " आमच्या इकडच्या बायका म्हणाल्या की दागिने निवडायला सुनेला कशाला न्यायचं? आपल्याला आवडतील ते करायचे. मी तसं केलं नाही. आपले दागिने तिला आवडले नाहीत तर ती घालणार नाही, तसेच ठेवेल आणि मी गेले की विकून टाकेल, त्यापेक्षा तिच्या पसंतीने घेतलेले चांगले, ती वापरेल. मला मुलगी नाही, ती माझ्या मुलीसारखी रा्हील."

 तिच्या घराच्या खालच्या बाजूला तिचे सासूसासरे राहतात. त्यांचं घर काहीच्या काही सुंदर आहे. उमा म्हणाली की त्या घराचं खरं सौंदर्य म्हणजे माझी सासू आहे. ८६ वर्षांची आहे, कायम व्यवस्थित असते, एखाद्या राणीसारखी राहते. कूर्ग पद्धतीची साडी नेसते, (उमा कायम पाश्चात्य पेहरावत असते.) तिची स्किन बघ तू, कशी ठेवलीये. अगदी ताठ चालते. स्वत:च्या आणि नवर्‍याच्या आरोग्याची खूप काळजी घेते. तिला अजूनही तिचं वय कुणाला कळू द्यायचं नसतं. :)
 सासूबाईंना भेटायचं राहूनच गेलं.

 रमेश आधी टाटा टी त होता. मग त्याने बंगलुरूला व्यवसाय सुरू केलेला. दहा वर्षांपूर्वी तिचे दीर अचानक वारले. मग सासूसासर्‍यांकडे बघायला कोणी नव्हतं. दर आठवड्याला रमेश बंगलुरूहून यायचा. वर्षभर त्याने असं केलं.
 उमा सांगत होती, " एके दिवशी एकदम रमेश म्हणाला की आपण कोडगूत आपल्या खेड्यात राहायला जातोय. माझ्यासाठी तर धरणीकंप झाला. एका बाईचं विश्व कुठलं असतं? तिचं घर, तिचा नवरा, तिची मुलं. बायकांना कसं पुढचं दिसत असतं ना? मला माझं घर विखुरलेलं दिसायला लागलं. मोठा मुलगा तेव्हा मॉडेलिंग करायचा, मला त्याला एकट्याला त्या क्षेत्रात सोडणं रिस्की वाटत होतं. धाकट्याची दहावी झालेली, त्याच्याकडे बारावीपर्यंत तरी पाहायला हवं होतं. मी रमेशला म्हणाले की मला दोन वर्ष दे, मी मुलांपाशी राहते. दोन वर्षे मी इथे जाऊन येऊन होते. रमेशने त्याचं काम सुरू केलं. मी इथे येऊन आचारी शोधून त्याला सगळं शिकवलं, इथलं बस्तान बसवून दिलं. इथल्या आजूबाजूच्या बायका म्हणायच्या ’तू तर नवर्‍याला इथे ठेवून बंगलुरात मजा करते आहेस.’ मजा? मी घर सांभाळत होते, पोरं सांभाळत होते, धाकटा चांगला हुशार पण खेळात मग्न, त्याच्या ताणात होते. मग एकदा मी एकीला म्हणाले तू पण एकटी बंगलूरात ये आणि मजा कर.
धाकटा मेडीकलला लागला. मग तो हॉस्टेलला गेला. मोठ्याने त्याची कंपनी सुरू केली( कदाचित रमेशची चालवायला घेतली.) मी इथे राहायला आले."
" इथे, या खेड्यात राहायचं कसं जमवतेस?"
" हं. जमवते. दर दोन महिन्यांनी बंगलुरला जाते. एक दिवस खरंच मजा करते. आम्ही सगळ्या मैत्रिणी भेटतो. दुपारी बाराला जेवायला जमतो. बाहेर जेवतो. मग क्लबात जातो आणि सात वाजेपर्यंत गप्पा गप्पा गप्पा! कुणाचं काय चाललंय?, हिच्या तिच्या सासूची गार्‍हाणी, नवर्‍याची गार्‍हाणी, मजा येते."
 उमा सुगरण आहे. खास कोडवा (कूर्ग) पद्धतीचं अप्रतिम जेवण तिने आम्हांला खिलवलं.
शेवटच्या दिवशी रात्री तिच्याकडून पाककृती उतरवून घेतल्या.

तिने खास कोडवा पद्धतीचा जॅम दिला, शिवाय मिरे, घरचे पेरू... आई गं! निरोप घेतला, पुन्हा येईन म्हणाले.
दुसर्‍या दिवशी पहाटे साडेचारला निघणार होतो, आम्हांला वाटले हाच निरोप!
पण नाही.
सकाळी साडेचारला केवळ आम्हांला निरोप द्यायला दोघेही उठले होते.
उमाने मिठी मारली आणि आता खरंच निरोप घेतला.
या चार दिवसांत मी काही कोडवा शब्द शिकले आणि ती काही मराठी शब्द शिकली.
बारी चाय्याची -- छान वाटलं....

पुन्हा येईन.... नान पुना बप्पी!


Wednesday, May 13, 2015

स्वयंपाक

स्वयंपाक हा खरोखरच बायकांच्या दृष्टीने खूपच महत्वाचा विषय आहे. 
म्हणजे वेगवेगळ्या अंगांनी त्याबाबत विचार होऊ शकतो. जसं अत्यंत आवडीने करणं, पर्याय नाही म्हणून करावा लागणं, ते आपलं कर्तव्य आहे असं समजून करणं, किंवा अगदी टोकाचा भाग म्हणजे रोज हॉटेलात जाणं शक्य नाही म्हणून इलाज नाही म्हणून करणं.
स्वयंपाक करणं ही प्रामुख्याने बाईची जबाबदारी आहे अशी एक सर्वमान्य धारणा आहे. म्हणजे घरी जेवायच्या वेळा झाल्या की घरच्या बाईकडे "हे काय अजून जेवायच तयार नाही" हे जितकं हक्कानं बघितलं जातं तितकं पुरुषा कडे बघितलं जात नाही. 

..............................................................................................


मला लग्न होईपर्यंत प्राथमिक स्वरुपातच स्वयंपाक येत होता. म्हणजे उपाशी राहणार नाही एवढ्यापुरता. पण त्यामुळे एक फायदा असा झाला की को-या पाटीमुळे सासरकडील चवीचे पदार्थ त्यांच्या पध्दतीप्रमाणे शिकण्यास सुरुवात झाली. त्यामुळे स्वयंपाक घरात सासू सुनेमधे तुझी माझी पध्दत अशी येणारी टसल आलीच नाही. एखादा पदार्थ आयता मिळत असेल तर त्याच्या चवीला फारसे प्राधान्य माझ्या लेखी नव्हते. त्यामुळे केलेल्या स्वयंपाकाचा मनमुराद आस्वाद घ्यायचा आणि जाताजाता थोडं फार शिकायचं या भूमिकेत मी असायचे. घरात कुटुंबही लहान असल्याने माझी अंदाजक्षमता जास्तीजास्त ४-५ माणसांपर्यंत मर्यादित असायची. माझ्या परिचयाच्या काही जणी आहेत. त्यांचा स्वयंपाकाबाबतचा आत्मविश्वास मला नेहमी न्यूनगंड देणारा आहे. म्हणजे. मी १५-२० माणसांचा स्वयंपाक कसा झटपट करु शकते ते सुध्दा कुठल्याही पदार्थाची चव न घेता हे मला मोठ्या दिमाखात ऎकवतात. (एथे चविष्ट पदार्थ करण्याच्या संकल्पनेला फारसं महत्व नसावं हे मला नंतर जाणवायचं.) 

आनंदला स्वयंपाकातील पदार्थ करण्याची आवड आहे. पण  नोकरीच्या व्यापामुळे रोजचा रोज सहभाग जमत नाही. सुट्टी च्या दिवशी मात्र तो आवर्जून एखदा पदार्थ करण्यात  सहभाग घेतो. 

स्वयंपाकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आवड म्हणून करणं आणि इलाज नाही म्हणून करणं ह्यामुळे येणा-या मानसिकतेबाबत घरातील सगळ्यांनाच त्याची जाणीव असेल, त्यासाठी सहकार्य असेल तर मग  "स्वयंपाकघर - एक भन्नाट प्रयोगशाळा" म्हणून त्याची मज्जा घेताच येईल.

Saturday, March 7, 2015

शहाण्या झालेल्या बायका!

८ मार्चच्या निमित्ताने आपण लिहू या, तू विषय सुचव. असा दीपाचा फोन आला.
गेले काही दिवस ’स्वयंपाक’ या विषयावर लिहावं असं डोक्यात घोळत होतं,
मग सगळ्यांसाठी मी हाच विषय सुचवला.
दीपाचा लेख आल्यावर नेहमीप्रमाणे आमच्या त्यावर गप्पा झाल्या.
दीपा म्हणाली, " इतका आपल्या जिव्हाळ्याचा विषय पण तो अजूनपर्यंत ब्लॉगवर कसा आला नव्हता?"
आम्ही भेटून चर्चा करतो त्यातही कधी आला नव्हता.
मी म्हणाले, " अगं आजवर आपण नवर्‍याची गार्‍हाणी करण्यात वेळ घालवला. त्यांच्याबद्दल बोलून झाल्यावर आता आपल्याला आजूबाजूचं दिसतंय. :) "
   यात खरं तथ्य नाही, आम्ही खरोखरच वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेलं आहे. पण आम्हांला हसायला निमित्त झालं!
आमचं ख्यॅ! ख्यॅ! खूखू झाल्यावर आम्ही बोललो ते असं.....
की नवरे जसे आहेत तसे आपण त्यांना स्वीकारलेलं आहे , त्यांना बदलायचा प्रयत्न आता आम्ही करणार नाही. नवर्‍यांना सोडून दिलेलं आहे आणि स्वत:ही मोकळ्या झालेल्या आहोत. आता स्वत:चं जग उभारूया. स्वत:च्या आवडी जपूया. स्वत:ला हवं तसं जगायचा प्रयत्न करू या.
ज्यात त्यात नवरा हवाच आहे असं करायचं नाही. ( असा तरी तो कुठे येतो? :) ) आपल्या आयुष्याच्या केंद्रस्थानी स्वत:ला ठेवायचं.
 खरं म्हणजे तसं जगायला आम्ही सुरूवात केलेली आहे.
मी म्हणाले, " आपण आता खर्‍या शहाण्या झालेल्या बायका आहोत." :)

   हे शहाणपण जसं आम्हांला आलं तसं तुमच्यापैकी प्रत्येकीला येवो, हीच महिलादिनी शुभेच्छा! :)


********

Friday, March 6, 2015

स्वयंपाक......१

    विषय वाचल्या वाचल्या माझ्या  लहानपणीचा एक प्रसंग डोळ्यासमोर आला.भातुकली खेळत असताना आई मला खरी खरी मळलेली कणीक द्यायची.भाताला तांदूळ द्यायची,आणि काही भाज्या......इकडे भातुकली खेळत असताना हळूच माझं लक्ष नसताना माझ्या भातुकलीतल्या काही भांड्यांमध्ये खरा तयार झालेला भात,छोट्या वाटीने पाडलेल्या आणि खरंच भाजलेल्या छोट्या छोट्या पोळ्या,आणि माझ्या छोट्याश्या कढईत परतलेली खरीखरी शिजलेली भाजी.मला जादूच वाटायची.त्या न कळत्या वयात आपण कीती भारी स्वयंपाक केला असं वाटायचं.मला वाटतं याच मुळे का काय आजही मला स्वयपाकाची आवड आहे. याला आजून एक कारण असंही असावं की माझ्या लहानपनापासून मी आईच्या बरोबरीने बाबांनाही स्वयपाक करताना पाहात आले आहे.म्हणजे मला आठवतं तसं मी सहावी सातवीत असेन बहुतेक,आई ऑफीसहून येण्याआधी साधारण कणीक मळून ठेवणे,भाजी चिरुन ठेवने,वरण भाताचा कुकर लावणे अशी कामं बाबा करत.काहीवेळा त्यांच्या बरोबरीने या कामात मला त्यांनी सहभागी करुन घेतलं.ते म्हणायचे तुला जमेल तसे कर.भाजी काहीवेळा खूप मोठी चिरली जायची,भाताला पाण्याचा अंदाज चुकायचा,पण हे सगळं आई बाबांनी चालवून घेतले.त्यामुळे चुकतमाकत मी स्वयपाक शिकले.कधीही सुचना,उपदेश दिले नाहीत म्हणून त्यातली आवड आजही कायम आहे.
   माझ्या आईची एक डायरी होती .वेगवेगळ्या पदार्थांची पाककृती त्यात लिहून ठेवलेली असायची. आणि विशेष म्हणजे त्याच पद्धतीची बाबांची पण डायरी आहे.अनेक प्रकारचे मसाले,विविध प्रांतीय पाककृती ,अनेक प्रकारचे केक,एक ना अनेक पदार्थांनी ह्या डाय-या भरलेल्या आहेत.एखादा चांगला पदार्थ कोणी करत असेल तर तो डायरीत टीपून ठेवायची सवय मला यामुळेच लागली.मी रमते पदार्थ बनवण्यात आणि मला मनापासून आवडतं असे पदार्थ बनवून खाऊ घालण्यात.
     लग्नाआधी आई बाबांचे बघून बघून मी पूर्ण स्वयपाक ,अगदी पुरणपोळी सकट सगळं शिकले ते खूप आवडीने.लग्नानंतर माझी ही आवड कायम राहीली ती कौस्तुभच्या आईमुळे.आई खूप छान,चविष्ट स्वयपाक करतात.कोणताही पदार्थ खूप मनापासून करतात.त्यांचे भातांचे प्रकार खूप खास आहेत.काही गोष्टी त्यांच्या बघत बघत शिकले.
     एकत्र कुटुंब असल्याने धबडगा खूप, त्यामुळे पदार्थ करतानाची गंमत, त्यातला आनंद संपला.आवड नक्की शिल्लक आहे पण आता काही पदार्थ करताना जुन्या गोष्टी आठवतात आणि वीट येतो करण्याचा.एवढ्या धबडग्यात माझ्या स्वयपाकाला मनापासून दाद देणारी एकच व्यक्ती होती.बाबा ( कौस्तुभचे बाबा ) ,मनापासून पदार्थ कसा झालाय हे पानावर बसल्या बसल्या लगेच सांगायचे.आम्ही वेगळे झालो.दुपारी घरी जाताना ते आमच्या डेक्कनच्या घरी डोकवायचे .माझ्या गरमगरम भाकरी चालल्या असतील की हमखास खाऊन जायचे.आणि परत घरी गेल्यावर आईंना सांगायचे मजा आली आज, दिपाने गरम गरम भाकरी वाढली.खूप कौतुक होतं त्यांना. माझ्या हातची भाकरी ,आळुची भाजी,हे पदार्थ बाबांच्या विशेष आवडीचे होते. आजही स्वयपाक करताना त्यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.अशी मनापासून दाद देणारं मला आजून भेटलं नाही.तुमच्या सगळ्या स्वयपाकाचा थकवा दूर करणारी गोष्ट म्हणजे त्याला मिळणारी दाद.
     स्वयपाकाचे काम हे फक्त बायकांचेच अश्या विचारांच्या घरात मी जन्मले नाही.माहेरी कधी मी हे पाहीले नाही त्यामुळे सासरी आल्यावरचे चित्र पचवणे अवघड गेले.नंतर सवयीचा भाग म्हणून पुरुषांनी ऑर्डर सोडायची आणि बायकांनी ते करत रहायचे याची सवय झाली.पहील्यां पहील्यांदा होणारी चिडचिड त्या गोष्टी स्विकारल्याने कमी झाली.आणि कोणत्याही परीस्थितीत मग आपण आजारी पडो, आपले अ‍ॅबॉर्शन होवो,बाळंतपणातून उठो,मुलं तान्ही असो,त्यांचे आजारपण असो,अश्या गोष्टींपासून ते एखाद्या दिवशी मूड नाही म्हणून.....पण ते सगळं बाजूला सारुन स्वयपाक केलेले आहेत. आता इतक्या वर्षांनी हे सगळं सहन केले आहे म्हणून का काय या सगळ्याचा वीट आलाय,कंटाळा आलाय.थकलेली आहे मी.उत्साहच कमी झालाय.या क्षणाला या स्वयपघरातून रीटायर्ड हो म्हणलं कोणी तर आनंदान बाजूला होण्याची तयारी झाली आहे.आता जे काही करते आहे ते बळं करते असे वाटते. आता अस वाटतं कोणीतरी आयतं द्यावं हातात.नाही पडायचं त्यात.त्याहीपेक्षा आवडीच्या माझ्या राहून गेलेल्या गोष्टींमध्ये रमून जायचे आहे.त्या गोष्टी करण्यात वेळ घालवायचा आहे.आणि आता त्या दिशेने माझा प्रवास सुरु झाला आहे.


Sunday, February 8, 2015

सांगता न येणार्‍या गोष्टी

माझे आणि दीपाचे बोलणे चालले होते, दीपा म्हणाली, " मी तर मोकळी आहे मी माझ्यासंबंधातलं काहीही सांगू शकते, लिहू शकते. मला सांगता येणार नाही असं काही नाहीच."
माझं म्हणणं होतं, " दीपा, मीही मोकळी आहे, मी माझ्याबाबतीतल्या ७५% गोष्टी सांगू शकेन, तू माझ्यापेक्षाही मोकळी आहेस तू ९०% गोष्टी सांगू शकशील, पण तुझ्याकडेही १०% तर असणारच, जे तुला सगळ्यांना नाही सांगता यायचं. "

 सगळ्यांना सांगण्याची इच्छा नसणं आणि सांगता न येणं या दोन वेगळ्या बाबी आहेत.
सांगायचं म्हंटलं तरी नाही सांगता यायच्या अशा गोष्टी.
अशा गोष्टी कुठल्या असतात? आहेत?
खोलवरचे अपमान, सल, दुखावले गेलेलो आहोत असे प्रसंग विसरताही येत नाहीत आणि सांगताही येत नाहीत.
काही प्रसंगांचा जीव तर इतका छोटा असतो की सांगायला गेलो तर समोरच्याला वाटतं त्यात काय एवढं? सांगताना आपल्यालाही कळत असतं की हे सहज वाटू शकतं, तरीही आपल्या आत आपण खूप दुखावले गेलेलो असतो, बाण वर्मी बसलेला असतो.
काही प्रसंग असे असतात की नंतर आपल्याला वाटत असतं की असे कसे आपण चुकलो? मग त्या आपल्या चुका नाही सांगाव्याशा वाटत.
आपलं अपयश? ते नाही सांगावसं वाटत. नातेसंबंधातलं अपयश सांगावसं वाटत नाही.

विचार करता करता असं लक्षात येतय की या तर खूप मोठ्या गोष्टी झाल्या, काही साध्या साध्या गोष्टीही नाही सांगता येत.
उदा. कुणाचा फोन चालू असेल, समोरचा माणूस गप्पाच मारतोय आणि आपण महत्त्वाच्या कामात आहोत तर मला पटकन असं म्हणता येत नाही की नंतर बोलूयात. मी त्या माणसाच्या बोलण्यातल्या फटी शोधत राहते.
 त्याउलट समोरच्याला मला गप्पा मारायच्या आहेत, माझ्यासाठी वेळ काढ, असंही नाही सांगता येत.

खरं स्वत:वर खूपच काम करायला हवं आहे.


******

.

 . Epstein files मधून जे जे काही बाहेर येतं आहे ते भयंकर आहे. Jeffrey Epstein हा माणूस आहे का सैतान? त्याने इतक्या बालिकांचं लैंगिक शोषण केल...