Friday, November 21, 2014

दीपू

आमच्या वाड्यात लहानांत सगळे मुलगे आणि सर्वात लहान मी एकटी मुलगी.
माझ्यापेक्षा वर्षाने मोठा दीपू. पहिला वहिला मित्र. तसे वाड्यातले सगळेच मित्र पण हा खास मित्र.
 आम्ही दोघं खेळात कायम लिंबू-टिंबू. घरातही लहान त्यामुळे समदु:खी.
आमची छानच मैत्री होती. आम्ही गळ्यात गळे घालून वाडाभर फिरत असू. दुसरी तिसरीपर्यंत असेल, म्हणजे तसे लहानच.
पण तरीही आमच्या गळ्यात गळे घालण्याबद्दल किंवा एकत्र असण्याबद्दल कोणीही कधीही हटकलेलं नव्हतं.
तो आमच्या घरी नाहीतर मी त्यांच्या घरी नाहीतर दोघे मिळून वाड्यात कुठेतरी.
तो वरच्या इयत्तेत असला तरी माझं सगळं ऎकायचा. एकमतच असायचं आमचं. :)

वाड्यात छोट्या मुलांनी गणपती बसवायचा असं ठरवलं. दीपूचा मोठा भाऊ मनोज त्यात पुढे होता.
चिठ्ठ्या टाकून मुलांची कार्यका्रिणी वगैरे ठरवण्यात आली. अध्यक्ष, सचिव, खजिनदार वगैरे....
आम्ही दोघंही कुठेच नाही, आम्ही भोकाड पसरलं असेल, आया मधे पडल्या असतील, मग आम्हांला कुठलीतरी (हरकाम्या टाईप) पदं मिळाली.
एकाच नावेतले प्रवासी असल्याने आमचं मेतकूट होतं.

दीपूची मोठी बहीण आक्का चांगली दहावीत वगैरे होती, आईच्या बरोबरीने कामं करायची, तिची गणती मोठ्यातच होत असे.
मनोज त्यांच्याकडच्या मोठ्या टेबलावर चादरी वगैरे घालून घरातल्या सगळ्यांच्या कपड्यांना इस्त्री करायचा.
आम्ही दोघं तिथेच आसपास रेंगाळत त्याच्याशी गप्पा मारत खेळत असू.
मग शेवटी तो दीपूच्या आणि त्याच्याबरोबर माझ्याही रूमालाला त्रिकोणी/चौकोनी घड्याघड्यांची इस्त्री करून देत असे.
तो गरम रूमाल घरी आणून मी व्यवस्थित कप्प्यात ठेवत असे.

तो चित्र छान काढायचा. त्याच मोठ्या टेबलावर ड्रॉईंग शीट पसरून तो तो वेगवे्गळी चित्रे काढत असे. हुबेहूब!
पुस्तकातल्यासारखे शिवाजीमहाराज!
आणि मग चित्राभोवती फ्रॆम असावी तशी वेगवेगळी वेलबुट्टी काढत असे.
एका शीटवर पाच-सहा छोटी छोटी चित्रे तो काढायचा.
डोळे विस्फारून आम्ही पाहात असू.
त्याचं पाहून मी डोळा काढायला शिकले.
मग पाहिलेल्या त्याच्या वेलबुट्ट्य़ा कुठे कुठे वापरल्या, कधी रांगोळीत कधी मेंदीत.
तोही कुठून कुठून शिकला असेल पण मी शिकले ते त्याच्याकडून.
त्याचं झालं की तो कागदाची व्यवस्थित गुंडाळी करून रबर लावून ठेवत असे.
त्याच्या नेटकेपणाला आम्ही जरा दबून असायचो.

गणपतीत एकेवर्षी आक्काने पाण्यावर सुंदर रांगोळी काढली होती.
आधी कोळशाची बारीक पूड करून घेतली, परातीत पाणी घेतलं, त्यावर सगळीकडे ती पूड पसरली आणि मग हलक्या हाताने त्यावर पांढरीशुभ्र रांगोळी काढली. साधीच रांगोळी, नेहमीची पण दिव्याच्या प्रकाशात काय सुंदर दिसत होती!
तर तिचं हे ठरल्यापासून, कोळशाची पूड, ती चाळणीनं चाळणं, मग परातीत पाणी घेणं...... रांगोळी पूर्ण होईपर्य़ंत, आम्ही तिच्या मागे मागे.

आमच्या काळी मुलांना भरपूर वेळ असे, बारीक निरीक्षण करण्याची संधी असे.
असं काहीही कळलं की आधी आम्ही एकमेकांना सांगत असू आणि मग  काय घडतंय तिथे बसून राहात असू.
साधा कल्हईवाला आला तरी त्याची सगळी भांडी होईपर्यंत आम्ही बसून राहात असू. कळकट भांडी एकदम चमकायला लागत, तो चमत्कार मिळूनच पाहायचा असे. शिवाय त्या कल्हईवाल्याला मदत देखील करायचो. वाडाभर तो फाटकाबाहेर बसलाय हे सांगत फिरायचं, शिवाय भांडी संपत आली की अजून काही आहेत का, बघा, तो आणखी चार महिने यायचा नाही, हे ओरडत आणखी एक फेरी.

अगदी नाली तुंबली असेल, ते साफ करायला माणूस आला असेल तरी आम्हांला ते टक लावून बघायचं असे. तुंबलेलं पाणी वाहून गेलं, वर चार बादल्या पाणी टाकलं, तेही भराभर वाहून गेलं की आम्ही विजयी चेहर्‍याने एकमेकांकडॆ बघत असू.

एकूण काय तर सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींमधे एकमेकांसोबत.
उन्हाळ्यात पत्ते, शिवाय नेहमीचे चंफूल, चिरकी, गोट्या, चक्का असे सगळ्या मुलांबरोबरचे खेळ असायचेच.

मी पहिलीत किंवा दुसरीत असताना असेल. दीपूच्या बाबांनी असेल किंवा अन्य कुणी असेल, त्याच्यासाठी एक छोटुसा शाईपेन आणला. नेहमीच्या पेनांपेक्षा जवळपास निम्मा. जाडीलाही, उंचीलाही. असं ऑलीव्ह ग्रीन रंगाचं पेन आणि सोनेरी टोपण! नुसतं शोभेचं नव्हतं ते! शाई भरली की मस्त चालायला लागलं. ते मिळालं की दीपू  लगेच दाखवायला आमच्याकडे घेऊन आला. कसलं देखणं होतं ते! त्याच्या छोट्या हातात तर ते काय ऎटबाज दिसायचं. ते तसलं पेन मला लगेच हवं झालं. पण ते काही आमच्या इथे मिळत नव्हतं. ते पेन मिळालं आणि दीपू असा हवेतच. सारखं पेन त्याच्याजवळ आणि सारखं त्यासंबंधीच बोलणं. पेनशिवाय त्याला काही सुचेना. तो नेहमीचा दीपू राहिलाच नाही. त्याच्याकडे आहे आणि माझ्याकडे नाही असं काहीतरी आमच्या मधे येत होतं. नेहमीच्या गप्पा नीट होईनात. थोडी भांडणं व्हायला लागली, पटेनासं झालं. एकीकडे ते पेन हवंच असं मला झालेलं. आणि मी काय केलं असेल? दोन-तीन दिवसांनी त्याचा डोळा चुकवून ते पेन चक्क चोरलं. मी ते हळूच लपवून ठेवलं. पेन हरवलं म्हंटल्यावर त्याने जो काय गोंधळ घातला. मी पण त्याच्या जवळच होते. मी ते लपवलं असेल अशी कोणाला साधी शंकाही आली नाही. दुसर्‍या दिवशी तो जरा शांत झाला. पण दु:खीच. तिसर्‍या दिवशी जरा नॉर्मल. तोवर माझ्या लक्षात आलं की त्याचं पेन मी उघडपणे वापरूच शकणार नव्हते. शिवाय तो असा मलूल झाला होता की वाईटही वाटत होतं. पेन घेतल्याची टोचणीही होतीच. मग मी हळूच ते पेन त्यांच्या खिडकीच्या दाराखाली ठेवून दिलं. दोनेक तासांनी तो नाचत आला पेन सापडलं म्हणून.

 दुसरी-तिसरीपर्यंत आमची अगदी घट्ट मैत्री होती. पण तिसरीत काय झालं? मला एक मैत्रिण मिळाली, शाळेतली, पलीकडच्या गल्लीतली. मग काय आम्ही दोघी सोबतच. एकमेकींच्या घरी फेर्‍या सुरू! तिला दोन मोठ्या बहीणी होत्या आणि ती सराईतपणे अय्या, इश्श, असं मुलींसारखं काय काय करू शकायची, मला त्याची भूलच पडली.

 पुढे दीपूने वाडा सोडला. तरी आमचं जाणं येणं होतंच. मनमोकळ्या गप्पा व्हायच्या.
पुढे सगळ्यांचीच स्वत:ची घरं झाली. तो ग्रॅजुएट झाला आणि नोकरीलाच लागला. मी शिकतच होते, आला तेव्हा नोकरीतल्या मजा सांगायचा.
आमच्याकडे कधीही मुलांनी घरी यायचं नाही, मुलांशी गप्पा मारायच्या नाहीत, असं नव्हतं. जो कोण असेल त्याची घराशी मैत्री व्हायची. हा तर वाड्यातला मित्र होता.

आधी आधी पुण्याहून गेले की मी सगळ्यांकडे जाऊन यायचे. पुढे ते बंद झालं. अजूनही आईकडून बातम्या कळतात. पण गेल्या दहा-बारा वर्षात मी त्यांच्याकडे गेलेले नाही.

*****

त्याचा पत्ता मला ठाऊक आहे. घर मला माहीत आहे.
पण असं वाटतं जाऊन बोलणार तरी काय? तेच मुलांबाळंविषयी, नोकरी धंद्याविषयी. आणि हो, वाड्यातल्या जुन्या आठवणी निघतील. मग त्याच्या बायको, मुलांना किंवा माझ्या मुलांना वाड्यात कसं होतं ते सांगीतलं जाईल. वाड्यातल्या आठवणी आमच्या बालपणीच्या आठवणींचा अविभाज्य भाग आहेत. त्याने त्या कशा पाहिल्यात कोण जाणे. म्हणजे तो त्यात रमलेला असेल की नाही? सगळेच मोठे त्या आठवणीत रमतात असे नाही. ते कुरकुरे होत जातात किंवा अलिप्त. आपली घरं किती छोटी होती, किती अडचणीत राहायचो हेच तो सांगायला लागला तर? मला नाही चालायचं. मला ते नाहीच बोलायचं.

 दुसर्‍याने काय बोलावं याच्यावर नियंत्रण ठेवू पाहणारी बाई आहे की काय मी? :)
मग माझ्यासारख्या बाईने काय करावं? तेच मी करते.
मला त्याच्या घरी जायचं नाही.

**********

Friday, October 31, 2014

ज्योतीनंदा




माझे बाबा सगळ्या भांवंडांत लहान. त्यामुळे त्यांच्या मोठ्या बहीणीची नात ज्योतीनंदा माझ्या बरोबरीची.
लग्नाकार्यात, सुट्टीत भेट होईल तेव्हा आम्ही बरोबर असायचो.
तिच्याबद्दलची पहिली आठवण अशी आहे.....

माझ्या एका आतेभावाचं लग्न होतं. लग्नाला सगळे बस करून गेलेलो. मग आतेबहीणींबरोबर आम्ही नवरी पाहायला गेलो. तेव्हा ती होती, ज्योतीनंदा. आम्ही दोघीही पहिली-दुसरीत असू. त्या लग्नात आम्ही मिळून खेळलो. तेव्हा कधी नव्हे ते मला दोन नवीन कपडे शिवले होते. नाहीतर, घरात घालायचे दोन, बाहेर जायचा एक आणि एक गणवेश एव्हढेच चार/पाच झगे असायचे.  एकदम दोन म्हणजे चैनच! एक परकर पोलकं आणि एक झगा. मी अगदी खूष होते.
 आमची परीस्थिती बेताचीच होती, त्यांची तर आमच्याहूनही साधारण असेल.
तिने मागीतला म्हणून का तिच्याकडे नव्हता म्हणून आईने दुसर्‍या दिवशी माझा नवा झगा ज्योतीनंदाला घालायला दिला. मीही आनंदी माणसे जशी उदार होऊ शकतात तशी झालेले. लग्न झालं आमचा परतीचा प्रवास सुरू झाला, तरीही ती आपली माझा झगा घालूनच बसलेली. मी माझं परकर पोलकं बदलून साधासा फ्रॉक घालून बसले होते. मी आईला म्हणाले देखील ’ आई, ही अजून माझा झगा का देत नाहीये?’ आई म्हणाली, "गावी पोचलो की देईल." आणि झालं काय की ती आणि तिचे आई-बाबा गावी आलेच नाहीत, मधेच तिच्या आत्याचं गाव लागलं तिथे उतरून गेले. उतरताना काय म्हणणार?
 झालं! माझा नवाकोरा झगा गेलाच!
किती दिवस मला हळहळ वाटत राहिली.

पुढच्या वर्षी ती भेटली तेव्हाही मला माझा झगाच आठवत होता पण आई म्हणालेली आता काही बोलू नकोस, म्हणून मी शहाण्या मुलीसारखी गप्प बसलेले.

आणखी दोन-तीन वर्षांनी काय झालं? ज्योतीच्या धाकट्या मावशीचं म्हणजे माझ्या आतेबहीणीचं लग्न झालं. लग्नानंतर ती हैद्राबादला गेली होती, येताना ती ज्योतीसाठी खड्यांच्या, बर्‍यापैकी महाग अशा दोन बांगड्या घेऊन आली. आम्ही मांडवपरतनीला जाणार नव्हतो पण गेलो. माझ्या तिथे असण्याची आतेबहीणीला कल्पना नव्हती. तिने एकच जोड आणलेला, अंदाजाने. झालं काय की तो ज्योतीच्या हातात जात नव्हता. माझ्या हातात जाऊ शकला. मला खूप आवडलेला. सुंदरच होता तो बांगड्यांचा जोड! पण ताई म्हणाली म्हणून मी नको, नको असं केलं. शेवटी आग्रह करून आतेबहीणीने तो मला दिलाच.
 मी त्या बांगड्या पुढे चार वर्षे तरी घातल्या असतील.
त्या मला मिळाल्या याचं ज्योतीला काय वाटलं असेल कुणास ठाऊक? ती माझ्याजवळ काही बोलली नाही.

ज्योतीनंदा म्हंटलं की हे दोन प्रसंग मला आठवतातच.

तिचे बाबा थोडे विक्षिप्तच आहेत. आम्ही सातवीत होतो तेव्हाची गोष्ट. सुट्टीत गेलेलो असताना म्हणत होते, " चांगलं श्रीमंताचं स्थळ आलंय ज्योतीसाठी, तिचं लग्नच करतो." मला तेंव्हा शिंगं फुटायला लागलेली. मी त्यांच्याशी खूप भांडले. वेगवेगळे मुद्दे घेऊन भांडत होते. शेवटी शेवटी म्हणाले की मी पोलीसात कळवीन, कायद्याने बालविवाहाला बंदी आहे.’ ते खरं माझ्याशी भांडण्याची मजा घेत असणार, मला ते कळत होतं तरीही लहान वयात एकदाचं मुलीचं लग्न लावून द्यायचं आणि मोकळं व्हायचं ही कल्पनादेखिल मला सहन होत नव्हती. विशेष म्हणजे मी जिच्यासाठी भांडतेय ती ज्योती भांडणात कुठेच नव्हती ती शांतच.

 ती शिकली दहावी/ बारावी ..... नुसती माझ्यासारखी शिकत नव्हती, त्याजोडीला घरकाम, स्वैपाक हे ही करायला लागलेली,
पुढे दोन चार महिने या मामाकडे, त्या मावशीकडे असं केवळ नवरा मिळेपर्यंत राहिली.

यथावकाश तिचं जमलं. मामा मावश्यांनी पुढाकार घेऊन लग्न लावून दिलं.
मी ME करत होते तोवर तर ती दोन मुलांची आई झालेली. संसारात रूळलेली.
नांदेडला गेले तर चुलतभावाला म्हणाले, " चल ज्योतीकडे जाऊन येऊ. " तेव्हा मी आवर्जून सगळ्या सगळ्यांकडे जात असे.
आमच्याकडे देशस्थात कसं आहे? नातेवाईकांचा भरपूर गोतवळा आणि गुंता! साधसं काही असलं तरी जेवायला ३०/४० लोक सहज बोलावतील. बहुतेक बाबतीत त्यांचे माझे विचार पटणारे नाहीत. पण ती सगळी माझ्याकडची माणसं आहेत आणि त्यांच्यात मला रस आहे.

हं. तर ज्योतीकडे गेले तर तिची मुलं, पुतणे आजूबाजूला. ही कायम साडीत. मोठीच वाटायला लागलेली.
तिचे विषय वेगळे माझे वेगळे. खरं म्हणजे तसे ते पूर्वीपासूनच होते. पण आता खूप अंतर पडलंय हे जाणवत होतं.

त्यानंतर कधी मी तिच्याकडे गेले नाही.
पुढे माझंही लग्न झालं, मुलंबाळं, मीही संसारात बुडून गेले.

दरम्यान कधीतरी भॆट, कधीतरी दिसणं, वरवरचं बोलणं बस्सं!

चार वर्षांपूर्वी एका लग्नाच्या निमित्ताने भेटलो.
निजामाबादला लग्न होतं, पुष्कळ बारा-चौदा तासांचा प्रवास होता.
सर्वांच्या मिळून भेंड्या, काहीतरी गप्पा, आठवणी निघत होत्या.
नंतर म्हणाली, " मी आता विद्याच्या शेजारी बसणार आहे."
मग आमच्या दोघींत गप्पा म्हणजे
इतकं औपचारीक बोलणं सुरू झालं.
जवळपास एकमेकींची काहीच माहिती नाही असंच होतं.

तिच्या मोठ्या मुलाला कॅन्सर झालेला, पहिल्या स्टेजलाच कळला, व्यवस्थित औषधोपचार केले आणि तो पूर्ण बरा झालाय आता काहीच धोका नाही हे कळलेलं.

तॊ विषय निघाला. म्हणाली आता अगदी छान आहे, पॉलीटेक्नीक करतोय.

मग त्या दिवसांमधलं सांगायला लागली.
मुलांचं असं कळलं. त्याच्यासाठी मुंबईच्या फेर्‍या, औषधोपचार, लाखभर रूपये खर्च येणार होता.
माझे तर हातपायच गळाले. एव्हढे पैसे कसे आणि कुठून उभे करू?
ह्यांना पण काही कळेना.
कोणीतरी सांगितलं, खासदारांना भेट.
अजूनही कोणी कोणी काय काय सांगितलेलं असेलच.
म्हणाली, " मला परक्या पुरूषांशी कधी बोलून माहित नाही." एकटी खासदारांना भेटायला गेली. (भेट मिळण्यासाठीही दोन, तीन फेर्‍या झाल्या असतील.) सोबत रिपोर्टस. " त्यांच्याशी कसं काय बोलले माहित नाही. देवाने बळ दिलं बघ."
मग त्यांनी सतराशे साठ गोष्टींची पूर्तता करायला सांगितली, त्यासाठी अर्ज करणं, नगरपालिकेत खेटे घालणं, सगळं केलं.
साधी सही कशी करायची ते या बाईला येत नव्हतं.
खासदार निधीतून पन्नास-साठ हजारांची मदत मिळाली. बाकीचे इकडून तिकडून उभे केले.
एकटीने मुंबईचा प्रवास, लोकलने फिरणं, तिथं राहणं, मुलाची काळजी, त्याची पथ्यं सांभाळणं, सगळं निभावलं.

ज्योती किती बदलली होती.
म्हणाले, "ज्योती, तू ग्रेट आहेस."

Friday, August 15, 2014

अस्वस्थता

आम्ही मुस्कान चं काम जाणून घेत होतो.
बाललैंगिक अत्याचारांची आकडेवारी भयंकर आहे.
आणि ते करणारी माणसे कुणी विकृत नाहीत, म्हणजे ते करणं ही विकृतीच आहे, पण ती माणसे सरसकट विकृत नसतात.
त्यांची कुठलीही ठळक ओळख नाही.
ती आजूबाजूची माणसं आहेत, संधी साधून ती हे करतात.
ती कुठल्याही जाती, धर्माची, वयाची, स्त्री किंवा पुरूष असू शकते.
’आपण आणि ते’ अशी वर्गवारी करता यावी अशी निकड भासत होती,
मुस्कान मधील मैत्रिण पुन्हा पुन्हा तसं नाही हे सांगत होती.

......

त्यामागच्या प्रमुख कारणांपैकी, एक आहे मुलांकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन,
म्हणजे त्यांच्याकडे व्यक्ती असं न पाहता, मालकी हक्काची वस्तू समजणे, त्यांच्यावर विश्वास न ठेवणॆ,

सत्तेच्या उतरंडीत ती सर्वात खाली आहेत.

.......

आमचा छोटासा गट हे ऎकत बसला होता.
बोलता बोलता मैत्रिण म्हणाली, " ही आकडेवारी इतकी आहे की या आपल्या गटातही कुणाकुणाला या अत्याचाराला सामोरं जावं लागलं असेल. "
खरंच आहे.
....
विचार करता करता वाटलं.... अत्याचार करणार्‍यांचंही प्रमाण किती जास्त आहे.
.......
कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवावा , असा खात्रीचा मित्र मैत्रिणींचा गट!
......
या आपल्या गटातही कुणीकुणी अत्याचार करत असेल? हे असलं भलतं मनात आलं आणि मग अंधारून आलं.
काहीच सुचेनासं झालं.
.......
ती अस्वस्थता अजूनही गेली नाही.
........

Thursday, July 31, 2014

हे ही कधीतरी बोललं पाहिजे

दोन वर्षांपूर्वी लिहिलेला लेख

********

मी खूप हिंमत करून हे लिहित आहे.
मी शेवटपर्य़ंत लिहू शकीन असं वाटतंय.
सत्यमेव जयते चा दुसरा बाललैंगिक शोषणावरचा भाग पाहिला.
आणि लिहायचेच असे ठरवले आहे.
*******

मी पाच- सहा वर्षांची होते. वाड्यात सगळे मुलगे आणि मी एकटी मुलगी. सगळ्या घरांमधून फिरायचे, सगळ्यांची लाडकी. खूप बोलत असे. वाड्यातले नुकते लग्न झालेले, उमेदवार असलेले काका/ काकू मला खास गप्पा मारायला बोलवत.
आणि
.........................
त्यातलेच एक काका होते, तेव्हा काकू बाळंतपणासाठी माहेरी गेलेल्या होत्या. त्यांनी मला त्यांच्या खोलीत बोलावलं आणि दार लावून घेतलं. फारतर पाच मिनिटे मी त्यांच्या खोलीत असेन. जे काय त्यांनी केलं ते किळसवाणं होतं.
.................
नंतर
त्यांनी मला बांगड्यांच्या आकारातलं लोखंडी स्प्रिंग दिलं, ते फोर्बस कंपनीत होते, तिथल्या टाकाऊ मालातलं ते असायचं, वाड्यातल्या आम्हां मुलांना ते खेळणं फार आवडायचं, पूर्वीही त्यांनी मला दिलेलं होतं, मी त्यांना आणखी मिळालं तर आणा असं सांगीतलेलं.
.........
मी घरी आले, ते खेळणं कोपर्‍यात टाकून दिलं. घरात कोणाशीही काही बोलले नाही.
........
सहा वर्षांच्या एका छोट्या मुलीसाठी ही असली घाणेरडी गोष्ट ....... कुणाला न सांगता...... स्वत:च्या मनात पुरून ठेवणं...... खूप अवघड होतं...... ती एक बोलकी मुलगी होती..... काही खुट्ट वाजलं तरी वाडाभर जाऊन सांगायची......
तिने ते केलं..... कुणालाही काही सांगीतलं नाही..... तिला कळलंच नसणार, कसं सांगावं ते....
.......
आणखी चार दिवसांनी ....... त्यांनी अचानक मला उचलून त्यांच्या खोलीत नेलं...... मी ओरडले नाही.... पुन्हा तसेच.... पाच मिनिटांनी मला बाहेर सोडले आणि चाराणे माझ्या हातात ठेवले..... चॉकलेट घे म्हणून.......
................................
मी ते पैसे घट्ट मुठीत धरून घरी घेऊन आले................. माझ्या लाडक्या खिडकीत बसले................... आणि ते पैसे खिडकीतून मागच्या बोळीत टाकून दिले.
.........................
जे काय घडतंय त्याचं काय करायचं मला काहीच कळत नव्हतं.
....
आणखी दोन दिवसांनी असेल... मी खाली अंगणात खेळत होते, ते वरच्या मजल्यावर राहायचे ...... गॅलरीच्या कठड्याला टेकून त्यांनी मला ’ये ’ अशी हाताने खूण केली. मी जे पळत घरात जाऊन बसले. कोणीही कितीही बोलावलं तरी बाहेरच आले नाही. नाही मला खेळायचं आणि नाही मला बाहेर यायचं असंच सांगत राहिले........
.......
नळाजवळ आम्ही लावलेल्या गुलाबाशेजारी उभी असलेली ती सहा वर्षांची मुलगी.... छोटीशी.... फ्रॉक घातलेली..... आणि वर कठड्याला टेकून तिला ये म्हणणारा तिच्या गोष्टीतला राक्षस......
ते दोघे अजून माझ्या डोळ्यासमोर आहेत....
त्यानंतर जीव खाऊन ती मुलगी घरात पळाली... ते ही
.........................

पुन्हा असं काही झालं नाही. त्यांच्याबद्दल लोक, आईबाबा चांगलंच बोलायचे, "किती बिचारा सज्जन माणूस" असेच. ते कधी घरी आले तर मी पळून बाहेर जायची. काकू आल्यावरही मी शक्यतो त्यांच्या घरात जायचीच नाही. त्यांचं बाळ पाहायला आईबरोबर गेले तर आईचा पदर धरूनच बसले.
पुढे वर्षसहा महिन्यात ते वाडा सोडून दुसरीकडे राहायला गेले.

पुढे साताठ वर्षांनी ते अकाली गेले. सगळेच त्याबद्दल हळहळत होते.
मला इतकं बरं वाटलं.

.....................

पुढे कधीही असं काही घडलं नाही.
माझं बालपण याने काळवंडून गेलं नाही.
मी ते माझ्या मनात पुरून ठेवलं...... जणू दुसर्‍याच कुणा मुलीचा अनुभव असावा तसं.
सुरूवातीला याचा खूप त्रास झाला असेल. ते कळावं असं माझं वय नव्हतं.
मोठी होता होता, कधी कधी हे आठवलं की मला त्रास व्हायचा.
मोठी झाल्यावर यात माझा काहीच दोष नव्हता, मी मला कोसत बसले नाही.
तरीही ही खूप त्रासदायक आठवण होती.

....................

मी हे अजूनही आईबाबांशी बोलू शकलेले नाही.
मी त्यांना सांगीतलेलंच नाही.

.......................

लग्नानंतर मिलिन्दशी बोलावं, असं बरेचदा वाटून गेलेलं.......
मी शब्दच गोळा करू शकायचे नाही....

...........
आम्ही मॉन्सून वेडींग हा सिनेमा पाहायला गेलेलो. शेवटी शेवटी मी रडायला सुरूवात केली. मी वेड्यासारखी रडत होते. सिनेमा संपला. मी रडत होते.... आम्ही रस्त्यावरून चालत होतो..... मी रडत होते. मिलिन्दला कळेनाच मला काय झालंय ते...... मला वाटतं आम्ही हॉटेलात गेलो.... तिथेही मी रडत होते....... मला रडू आवरताच येत नव्हतं.
किती वर्षांनी त्या घटनेसाठी मी रडून घेतलं.
...................
घरी आल्यावर मी मिलिन्दला सांगीतलं....
इतक्या वर्षांनी..... पहिल्यांदा.... मी कुणाशीतरी बोलले.....
खूप मोकळं मोकळं वाटलं.....

..........
परवा शनिवारी.... सकाळी कोरीगडावर जाऊन आले..... संध्याकाळी/ रात्री आशाकडे छान जेवलो, मस्त गप्पा मारल्या. अख्खा दिवस छान गेलेला. रविवारी सकाळी घरी आले. पुन्हा थोड्यावेळाने झोपले....

अकराला मिलिन्दने उठवलं. ’तुला सत्यमेव जयते पाहायचंय ना?" उठले.... अख्खा एपिसोडभर रडतच होते.

मिलिन्द म्हणाला ," किती हिमतीनं सांगीतलं ना त्यांनी! "

वाटलं आता बोललंच पाहिजे......
तुम्हांला तरी सांगीतलं पाहिजे.
 
...................

Tuesday, July 15, 2014

अनिता

अनिता आमच्या हॉस्टेलवर महिनाभरासाठी आलेली. सुरूवातीला तिची आमची फारशी ओळख नव्हती.
ती उशीरापर्यंत झोपायची. मी कॉलेजला गेल्यावर कधीतरी तिच्या कामावर जायची. रात्री जेवायला नसायची. उशीराच यायची.

ती मिडी/ स्कर्ट असले आमच्यापेक्षा आधुनिक कपडे घालायची. उंच टाचांच्या सॅंडल्स वगैरे, कापलेले केस खांद्यापर्यंत रूळत असायचे.
उशीरा उठायची त्यामुळे दोन-तीन दिवसांनी कधीतरी आंघोळ, स्वच्छता कमीच पण सुगंध फवारून, हलका मेक अप करून तयार!
कुठेतरी रिसेप्शनीस्ट होती. खरं तिच्याकडे दोन - चारच ड्रेस होते पण अत्याधुनिक असे, दुरून महागडे वाटायचे पण नीट पाहिले तर तुळशी बागेतलेच.

आल्यानंतर दहा-बारा दिवसांनी बोलणे झाले असेल.

तिचे लग्न झालेले होते, बरेचदा ती छोटेसे नकली मंगळसूत्र घालायची. सासर शिरूरजवळच्या कुठल्याशा खेड्यातले होते. नवरा स्थानिक पुढार्‍याचा मुलगा होता. मी त्या पुढार्‍याचे नाव ऎकलेले नव्हते. हिला नोकरी करायचीच होती, म्हणून ती इथे राहात होती. मला तिचे कौतुक वाटले.

आणखी एका जरा सविस्तर भेटीत कळले की तिचे आंतरजातीय लग्न होते. ती ब्राह्मण तर नवरा मराठा. पळून जाऊन आळंदीत लग्न केले होते. मुलगा आईला पसंत नव्हता. बहुदा तिच्या कॉलेजमधेच होता. आई जुन्या पुण्यात कुठल्याशा पेठेत राहायची. वडील नव्हते, एक भाऊ आणि आई वाड्यात राहायचे. सासरकडच्या सगळ्यांना पसंत होती, तिकडे काही प्रश्न नव्हता. लवकरच पुण्यात घर घेऊन ती आणि तिचा नवरा असे दोघे इथेच राहणार होते.

एकदा कधीतरी आम्ही आपापल्या आयांबद्दल बोलत होतो, जरा मजेमजेचं तरी आपुलकीचं असं बोलणं चाललेलं.
अनिता म्हणाली, " माझी आई, आई नाही वैरीण आहे. मला आयुष्यभर तोंड दाखवू नकोस म्हणाली आहे. लग्नानंतर सहा महिन्यांनी एकदा भाऊ वाटेत भेटला म्हणून घरी गेले होते. बसले, जरा वेळाने तिला सांगितलं की तीन महिने झाले आहेत. चिडली. उठून माझ्या पोटावर लाथा मारल्या. "पाप आहे" म्हणत होती. त्याने माझं अ‍ॅबॉर्शन झालं. माझं बाळ पडून गेलं. मी तिचं कधीही तोंड पाहणार नाही. कधीही त्या घराचा उंबरठा ओलांडणार नाही. " आम्ही सुन्न झालो. तिही रडत नव्हती. बधीर झालेली.

दुपारी तिला भेटायला किंवा घेऊन जायला कोणीतरी नवर्‍याचा मित्र यायचा, आम्ही कधी त्याला बघितलं नव्हतं. पण तो शीळ घालायचा आणि ही जायची.
 नवर्‍याच्या मित्राबरोबर बाईकवरून जायला काहीच हरकत नव्हती पण त्याने शीळ का घालावी? नीट रितसर आत येऊन बोलावू का नये? असे आपले आम्हांला वाटायचे.
आम्ही तशा मागासलेल्याच होतो.

सासर कसं आहे? असं एकदा विचारत होते तर म्हणाली, "एकदा गेलेय, आठ दहा दिवस राहून आले आहे. सासू आणि नणंदही चांगलीच आहे. नणंद माझ्या एवढीच आहे. तिची मैत्रिण म्हणूनच गेले होते."
" का?"
"अजून गावी कोणाला सांगितलेलं नाही. स्थानिक निवडणुका आहेत, त्या झाल्या की सांगू असं सासर्‍यांनी ठरवलं आहे."
मी उडालेच.
" काय? ही फसवणूक आहे. तुला कळतंय का? तुमचं लग्न कायदेशीर आहे का? तुझ्याकडे काही पुरावा आहे? उद्या लग्न झालेलंच नाही म्हणाले तर? तुझा नवरा फिरला तर? सासरच्यांच्या दबावाखाली आला आणि लग्नच नाकारलं तर? आधी मॅरेज सर्टीफिकेट घेऊन ठेव. लग्नाचे फोटो तुझ्या ताब्यत ठेव. "
मी चिडलेले. मला कळेना, ही मुलगी मूर्ख तर नाही? मला कळतंय ते हिला कळतंय की नाही? मी कितीतरी वेळ तिच्याशी बोलत रहिलेले.
पुन्हा एकदोनदा ति्ला आठवण केली की याबद्दल नवर्‍याशी बोल म्हणून.
मी तिच्याकडे लक्ष द्यायला सुरूवात केली. बोलू, हिला थोडं शहाणं करू असं मला वाटत होतं.
एक दिवस अचानकच आमचा निरोप न घेता दुपारीच ती निघून गेली.
ठरलेला महिना आणि पुढे मला वाटतं दहा - बारा दिवस ती राहिली असेल.
आमच्याकडे कुणाकडेही पत्ता नव्हता. पुन्हा कधी दिसलीही नाही.

मधेच एक दिवस ती कुठे काम करायची, त्या ऑफीसची पार्टी होती, तिकडे खूप वेळ लागणार आणि इतक्या उशीरा आलेलं त्या हॉस्टेलवर चालायचं नाही. मग ती तिथेच राहीली, हॉटेलमधेच! हे आम्हां सगळ्या जणींना खटकलेलं.

आम्ही खरं काय हिची विचित्र गोष्ट म्हणत रहिलो. तिला नावं ठेवली. अर्थात आस्थेनं ऎकून घ्यायचो  पण मदतीचा हात पुढे केला नाही. तो करेकरेतो ती निघूनच गेली आणि आम्ही तिची आठवणही काढत राहिलो नाही.

ती परिस्थितीने कॉलगर्लचं काम करायला लागलेली का? कोण जाणे.
******

मी स्वत:च्या आणि स्त्रियांच्या हक्कांबद्दल जागरूक असले तरी लैंगिकतेच्या बाबतीत अक्षरश: काहीच विचार केलेला नव्हता.
"लैंगिक स्वातंत्र्य आणि माझ्या शरीरावर माझा हक्क" हे मी शिकले, लैंगिकतेचं राजकारण शिकले ती स्त्री अभ्यास केंद्रात.
तोवर बायका बायकांमधे लैंगिकतेमुळे केलं जाणारं विभाजन मला मान्यच असावं, मी काही विचारच केलेला नव्हता त्यावर.
आता मी सगळ्या स्त्रियांकडे समानतेने बघू शकते.

*******
कदाचित तेव्हा मी तिला काही मदत करू शकलेही नसते.
आता करू शकेन.

********

आपल्या मुलीने जातीबाहेर लग्न केलं, एवढं कारणंही आईचं मुलीवरचं प्रेम संपायला पुरतं. 
अशा आया असतात.
आई थोडी उदार झाली असती, तिला आपल्या मुलीवर थोडसं प्रेम करता आलं असतं तर...
एक अनिता कदाचित वाचली असती.
*******

.

 . Epstein files मधून जे जे काही बाहेर येतं आहे ते भयंकर आहे. Jeffrey Epstein हा माणूस आहे का सैतान? त्याने इतक्या बालिकांचं लैंगिक शोषण केल...