Thursday, September 30, 2010

व्हाईट लिली आणि नाईट रायडरच्या निमित्ताने, पुन्हा एकदा----

इंटरनेटच्या आभासी जगातून वास्तव जगाशी जुळवून न घेता येणं हा याचा विषय आहे असं म्हणता येईल. जे खरोखरच चॅटींग करतात त्यांच्यासाठी हा जिव्हाळ्याचा असेलही. आता संपर्काची माध्यमे इतकी सहज हाताशी आहेत. मोबाईल, sms, मेल, चॅटींग तरी खरेच संवाद होतो का? की ही माध्यमे प्रत्यक्ष संवादाची गरज संपवतात? अशी मानसीकता असेल तर ’एकमेकांजवळ न बोलता नुसतं असणं’ हे कसं अनुभवता येणार?
चाळीशीच्या आसपास असलेल्या या अविवाहितांना लग्नही करायचे आहे. आपल्या लग्नव्यवस्थेत ज्या अनेक त्रुटी आहेत त्यातल्या, लैंगिक अनुरूपता आणि रोजच्या जगण्यातली, सवयींमधली अनुरूपता पाहिली जात नाही, या दोन त्रुटी हे नाटक समोर आणते.
 भक्ती आणि माधव यांनी घातलेले व्हाईट लिली आणि नाईट रायडरचे मुखवटे हे खरोखरच मुखवटे आहेत का? का ती त्यांना हवीशी अशी स्वत:ची रूपं आहेत?
 या नाटकाचा जीव फारसा नाही, कदाचित सुदर्शन वरचे हे नाटक नाट्यगृहात आणायचे ठरवल्यावर वाढवले असेल, ते दिसूनही येते.  ही दोघं लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय का स्वीकारत नाहीत ते मला कळले नाही. लग्न म्हणजे काय? कशासाठी करायचं? याबद्दल दोघांनीही काही विचार केला आहे असे दिसले नाही. दोघांमधे शारीरिक आकर्षणही नाही, जे काही काळ दोघांना एकत्र ठेवू शकले असते, आणि प्रेम? प्रेमामुळे तुम्ही जोडीदाराच्या डोळ्यांनीही जग पाहायला शिकता,  तेही नाही. लग्न केलंच पाहिजे असंही खरं म्हणजे काही नाही. त्या पर्यायाचाही विचार नाही.
 लग्नासाठी जोडीदार शोधताना काय बघायचं याचा विचार नाही. नाटकातलं वास्तव स्वीकारलं तरी, नाटक तर्कसुसंगत मार्गाने पुढे जात नाही. तुम्ही लग्नाआधी लैंगिक अनुरूपता आहे की नाही हे पाहण्याचा जर पर्याय स्वीकारता/ तेवढे पुढारलेले आहात  तर ’लग्न ही आयुष्यभर टिकवलीच पाहिजे अशी गोष्ट आहे” हे कसं धरून ठेवता?
 चॅटींगचीच सवय असल्यामुळे एकमेकांजवळ येतानाचं अवघडलेपण ही कल्पनेतली गोष्ट वाटते आणि असलंच तर ते तात्पुरतं असणार आहे त्यात अधोरेखित करण्याजोगं काय आहे?
 राहता राहिली रोजच्या जगण्यातली/ सवयींमधली अनुरूपता. ती इतकी महत्वाची गोष्ट आहे? गेल्या लेखात मी लिहिलं होतं तसं हे आहे. भांडणाची ही वरवरची कारणं आहेत, खरा सल वेगळाच असतो. वैफल्य आहे, निराशा आहे, अपेक्षाभंग आहे ती वाफ अशी कुठूनतरी बाहेर पडते. पंखा हवा की नको यावर उपाय शोधता येतो पण जोडीदारच नकोसा झाला तर त्यावर काही उपाय नाही. (असतील पण सोपे नाहीत.)
 लग्न म्हणजे तडजोड करावीच लागते. कुणीही लैला-मजनू जरी संसारात पडले की भांडणे होणारच आहेत, भांडण हा शब्द खुपत असेल तर आपण मतभेद म्हणू या. जर कोणी आमची भांडणे होतच नाहीत असा दावा करत असेल तर एकतर ते खोटं बोलताहेत किंवा त्या दोघांमधलं नातं समानतेचं नाही गुरू- शिष्याचं आहे असं मी म्हणेन. आदर्श लग्न हे एक मिथक आहे. आदर्श जोडीदार खास तुमच्यासाठीच बनवला गेलेला कुठेही नाही हे एकदा लक्षात घ्या. मानवी पद्धतीने लग्नाकडे पाहा मग आहे हाच जोडीदार किती चांगला आहे हे शोधता येईल. तोही आणि आपणही साधी माणसं आहोत हे मान्य केल्यावर त्यालाही आणि स्वत:लाही चुकण्याची संधी देता येईल.
 स्त्रीवादाच्या दृष्टीकोनातून या नाटकाकडे पाहिलं तर, हे नाटक पुरूष हा स्त्रिला अनुरूप असावा,( असेल तो तिने स्विकारावा ऎवजी) हे मांडतं आणि स्त्रिच्या लैंगिक इच्छांचा उच्चार करतं पण त्यापलीकडे माधव आणि भक्ती ही दोघंही पारंपारिक पुरुष आणि स्त्री या साच्यातलेच आहेत.
 हे नाटक पाहावं - हसावं - विसरून जावं या प्रकारातलंच  होतं. तरी पाहायलाच हवं असंही होतं.

********

 आपल्या सवयी जुळतात की नाही हे ती दोघं तपासत असतानाच्या गमती भारी होत्या पण मला त्यात कुठेही आमचे प्रतिबिंब दिसले नाही. जिथे कुठे जावं तिथून आपलं फारच जुळतं असेच निष्कर्ष काढून घरी यावं लागत आहे. आम्ही लग्न करायचं ठरवलं तेव्हा मिलिन्दचा एक मित्र म्हणाला होता, ’ तुम्ही दोघेही आळशी, अव्यवस्थित, दोघेही पुस्तक घेऊन बसाल, तुमचं घर चालायचं कसं?’  याची आठवण झाली. फार जुळणं ही सुद्धा काही फार चांगली गोष्ट नाही :)
 एकमेकांच्या काही सवयींचा खरेच त्रास होतो. म्हणजे मला व्हायचा /होतो. ( मिलिन्दला अर्थातच होत नाही, बोलून दाखवण्याइतका होत नाही. ) पण त्या गोष्टी सोडून द्यायच्या ना! मी ’संत’ नसल्यामुळे स्वत:ला वैतागायची सवलत देते, मनावर घेत नाही.
 बालमानसशास्त्राप्रमाणे, मुलाशी बोलताना त्याला, तुझं हे वागणं/ ही कृती मला आवडली नाही पण तू मला आवडतोसच असं सांगायचं असतं ना! असंच नवर्‍यालाही सांगता आलं पाहिजे :)

**********
        

No comments:

Post a Comment

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...