Friday, April 30, 2010

लग्न:-- ठरवणे, करणे, मोडणे, टिकवणे...वगैरे वगैरे

अभिनवमधे मुक्ताचा पहिला दिवस. तिला सोडायला मी शाळेत गेले होते. तिथे मला माझी शाळेतली मैत्रीण भेटली. तिच्या मुलीला सोडायला आलेली. दहावी नंतर एकदोनदाच आम्ही कुठे बाहेर, बाजारात वगैरे भेटलो असू.
अभिनवमधेही आमचा आयांचा एक गट होता. आम्ही वारंवार भेटायचो, काही कार्यक्रम ठरवायचो. शिवाय मुलामुलींचे वाढदिवस वगैरे असायचे. आमच्या छान गप्पा व्हायच्या. एका वाढदिवसानंतर आम्ही बरोबरच बाहेर पडलो, पार्कींगमधे गाड्या काढत होतो, आमच्या मुली तिथेही खेळत होत्या. मैत्रीण म्हणाली,’ विद्या, मला घरी जावसंच वाटत नाहीये. काय म्हणून मी तिथे जाऊ? मला काही स्थानच नाही त्या घरात. घरात फिरताना देखील माझा नवरा सहा इंच दूरून जातो, माझ्याशी कामापुरतं बोलतो, सासू आणि नवरा मिळून घरातल्या गोष्टी ठरवतात. मी कुणीच नाहीये त्यांची.’ मी थांबले, तिच्या पाठीवर हात ठेवला, थोपटलं. यापलीकडे मी काय धीर देऊ शकणार होते? उशीर झालेला, बहुदा त्यावरूनच बोलणं निघालं असेल.
ही हसती खेळती माझी मैत्रीण , ती स्वत: बोलली म्हणूनच त्यावर विश्वास ठेवायचा, नाहीतर कुणाला खरं वाटणार नाही. घरी आले पण मला काही सुचेना. आपण स्वत:च्या आयुष्याचंही भलं करू शकू याची खात्री नसते, दुसर्‍यांच्या बाबतीत तर असहाय्यच असतो, मदत तरी काय करायची?........ ऎकून घ्यायचं. मी तेच केलं. पुढे आम्ही दोघी ठरवून भेटलो, ती बोलत होती, मी ऎकत होते.

नवरा म्हणून, वडील म्हणून, घरातली कुठलीही जबाबदारी तो घेत नव्हता. बॅंकेत नोकरी करतो, जरूरीपुरते पैसे दिले की त्याचं काम संपलं. मैत्रीण वकील आहे, तिच्यापुरतं कमवायची. सासू दोघांमधे समेटाचा प्रयत्न करत नव्हती, उलट दोघे दूर जायला हातभारच लावत होती.
हिला त्रास होता, पण माहेरी काही बोलली नव्हती. लग्नानंतर वर्षाच्याआत मुलगी झाली. मुलगी सहा महिन्यांची असेल, तिच्या बाबांनी औरंगाबादहून बसचं रिझर्वेशन केलं, तिने फोन करून कळवलं, ’या गाडीने येतोय असं.’ तर म्ह्णाला,’ कशाला येतेस? नाही आलीस तरी चालेल.’ आता काय करायचं?म्हणजे निघताना काही भांडण झालेलं नव्हतं, कधी इतक्या टोकापर्यन्त बोलणं गेलं नव्हतं आणि अचानक असं!! मग तिला आईबाबांना सांगावं लागलं. अशा त्याच्या कितीतरी गोष्टी होत्या.तेंव्हा समेट झाला पण नंतर आणखी काही उभं राहिलं.

मैत्रीणीची जुळवून घ्यायची खूप इच्छा होती. तिला वाटायचं मुलीला बाबा हवा. हा तर अजिबात मुलीत गुंतलेला नव्हता. कितीतरी घरं मुलांमुळे उभी असतात. आम्ही दोघी जीवनसाथमधे शोभा भागवतांकडे गेलो, त्यांनी सगळं ऎकून घेतलं. एका मानसोपचारतज्ञ/ समुपदेशकाचा सल्ला घ्यावा, असं सुचवलं, त्याच्याकडे गेलो. नेहमीच ज्याला खरी समुपदेशनाची गरज असते, तो कधीही स्वत:हून पुढे येत नाही, त्याच्या जोडीदाराने येऊन फारसा फायदा होत नाही. आणखीही प्रयत्न केले. वेगळं होण्याचा निर्णय तिला घेता येत नव्हता. कधीही कुठलाही निर्णय अगदी बरोबर असा नसतोच, त्या वाटेवर नकोसंही काय काय असतंच. कुठलाही निर्णय घेतला तरी डोळसपणे घ्यायचा, त्याचे फायदे- तोटे स्वीकारायचे, त्याची जबाबदारी घ्यायची आणि ठामपणे पुढे जायचं, हे ज्याचं त्यालाच करावं लागतं. आपण कुणाच्याही आयुष्याची जबाबदारी घेऊ शकत नाही, दोन्ही वाटांवरचं चित्र फारतर स्पष्ट करू शकतो, निवड जिची तिने करायची. कधीतरी तिला पटलं, वेगळं व्हायला हवं.
आता ती प्रक्रिया सुरू आहे.

----------

माझ्या मैत्रीणीचं मला खूप कौतुक वाटतं. ती या सगळ्या काळात धीराने वागली. सुरुवातीला तिला हे अवघड जायचं, सारखं रडू यायचं, त्याच्याशी नीट भांडताही यायचं नाही, ताणाचे काही काही शारीरिक परीणाम दिसायला लागले होते, हळूहळू ती यातून बाहेर आली. तिचं आणि मुलीचं छान जग उभं केलं. आई-बाबा पाठीशी आहेत, पण त्यांच्या घरी राहायला गेली नाही. स्वतंत्रपणे राहते. एक पालक असणार्‍यांचा एक गट आहे, तिथे सक्रिय आहे. वकीलीतही जम बसतोय, दोघींपुरतं आरामात कमावते.


----------------


आम्ही सारखं त्यावर बोलत होतो, या लग्नाचं कुठे काय चुकलं?
खरं म्हणजे लग्नाआधीही काही थोड्या गोष्टी लक्षात आल्या होत्या, त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं.
हे टाळता कसं आलं असतं?
काही गोष्टींबाबत त्याची मतं काय आहेत? लग्नाकडे तो कोणत्या दृष्टीने पाहतो? हे समजून घ्यायला हवं होतं.
पत्रिका, काही मुलं पाहिल्यावर आता जमायलाच हवं चा ताण, घाई , हे टाळता आलं असतं.

--------------

लग्नासारखी गंभीर गोष्ट आपण गांभीर्याने कधी घेणार?
स्वत:ला ओळखणं, आपल्याला काय हवं आहे, हे ओळखणं, जोडीदार कसा हवा आहे हे ठरवणं, त्याला शोधणं. ह्या यातल्या पायर्‍या आहेत.
लग्न यशस्वी (निदान टिकाऊ म्हणू या) होण्यासाठी हे अपरिहार्यच आहे.
कुणा एकाच्या त्यागावर चालणारी घरं, यापुढे टिकण्याची शक्यता कमी आहे.

--------------
लग्नाच्या खरेद्या, कपडे, दागिने, समारंभ यापेक्षा महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत, हे आपण लक्षात घ्यायला हवं. विवाहपूर्व समुपदेशनाला पर्याय नाही. लग्न आपण का? कशासाठी करतो आहोत? त्यानंतर आयुष्य कसं बदलणार आहे, कुठल्या तडजोडी कराव्या लागतील त्यातल्या कुठल्या मी करणार नाही, ही सारी स्पष्टता लग्नाआधी असायला हवी.

-------------
आपणही एकदा भागवतांची ती ’प्रश्नपत्रिका’ सोडवायला हवी. स्वत:ला, जोडीदाराला ओळखण्याच्या प्रक्रियेत कुठेतरी सवयीने थांबून गेलेलो असू कदाचित! पाणी वाहतं राहायला मदत होऊ शकेल.



*******************



आपल्याकडे आईवडील आणि त्यांची मुलं (एक किंवा दोन) हे एक आदर्श कुटूंब म्हणून सारखं थोपलं जातं. त्याचीच प्रतिबिंबं जिकडे तिकडे दिसत असतात. जाहिरातींमधलं सुखी कुटूंबाचं चित्र बघा. त्यामुळे काय होतं? अविवाहित, परित्यक्ता, मुले नसणारी, एक पालक असणारी कुटूंबे आपण परीघावर ढकलतो. त्यांची जगण्याची पद्धत कम अस्सल ठरवतो. ती फक्त वेगळी आहे असं समजून सामावून का घेत नाही?
माझी मैत्रीण आणि तिची गोड मुलगी जेंव्हा टीव्ही बघत असतील, तेंव्हा त्यांनी त्या जगाशी कसं नातं जोडायचं?


***************

1 comment:

  1. लेख आवडला.. मनापासून..

    समाजाने ठरवलेल्या साच्यापासून फारकत घेतलेल्यांना समाज एकतर फार क्रूर वागणूक देतो किंवा त्यांना कम्प्लीटली इग्नोर करून वेगळाच छळ करतो. हा छळ अनेक प्रकारे केला जातो.. त्यांना लग्न, पार्टीज, गेट-टुगेदर अश्या सोशल इव्हेंट्स मधून अगदी सहजपणे बाजूला काढतो..

    जणू काही एखाद्या परित्यक्तेचे स्वत:चे आयुष्यच नाहीये.. किंवा एखाद्या बाईने मुल झाल्यावर घटस्फोट घेतला तर तिने कोण पाप केले आहे.. एखाद्या मुलीने जर (सारे काही नॉर्मल असतांना) लग्न न करण्याचा/ मुल न होऊ देण्याचा निर्णय घेतला तर काय गहजब माजतो आणि तिच्यावर किती प्रेशर आणले जाते हे आपल्याला ऐकून/ क्वचित अनुभवून माहिती असेलच.

    ह्याच सोशल प्रेशरमुळे अनेकदा बायका स्वत:च्याच हिताचे निर्णय घ्यायला कचरतात.. आपल्याकडे परदेशात असतात तसे सगळ्या प्रकारच्या बायकांसाठी सपोर्ट ग्रुप का नाहीयेत?
    (कि आहेत आणि मला माहिती नाहीयेत?)

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...