Saturday, November 30, 2013

देव - २

’ तरूण तेजपाल प्रकरण आणि  आरूषी तलवार खून खटल्याचा निकाल ’ या दोनही घटनांबद्दल आपण इतकं वाचत आहोत, त्यात इथे वेगळं सांगू असं काही नाही.
 त्याबद्दल वाईट वा्टतं आहे,
इभ्रत खूनाबद्दल आधी लिहिलेलं.
तेजपाल प्रकरण चीड आणणारं आहे.

*******

देव -- क्रमश: -----

देवाशी संबंधीतच आपले सगळे सणवार आहेत. ते सगळेच उत्साहाने साजरे केले जात. आई किती दमत असे हे आज जाणवतंय, पण तेव्हा काय किंवा आत्ता काय आईला त्यात समाधान होतं/आहे.

मी कधी स्वत: उत्साहानं पूजा केलीय असं आठवत नाही. एकदा कधीतरी, तिसरी/ चौथीत म्हणालेले तर आईने नाराजीनेच करू दिलेली, (विश्वासला मात्र मनापासून, ) आणि मला पूजा करण्यात काहीही मजा आली नव्हती. पूजा संपली तर हुश्श!

हरितालिका वगैरे मी सहावी सातवीपासून करायला लागले असेन, माझ्या वर्गातल्या मुली तिसरी पासूनच उपास/ पूजा करीत. आई म्हणायची अजून लहान आहेस. हरितालिकेचा उपास करतोय म्हणजे भारी! आणि आता मी त्या सगळ्या मुलींपैकी एक झाले होते ते वेगळंच. आई म्हणालेली नुसता उपास कर, मी जरा खट्टूच झालेले. पत्री गोळा कर, फुलं आण यात मला भलताच उत्साह! नंतर नंतर तो संपत गेला.
( मजा म्हणजे पाच सहा वर्षांपूर्वीपर्यंत हा उपास मी करीत असे, कथा वगैरे सोडून देऊ, मला वाटे तुलनेने (:)) आपला नवरा किती चांगला आहे, तर कृतज्ञता! ....... )

 "आपलं आपलं सगळं करायला आपल्याला वेळ आहे देवासाठी थोडा वेळ काढायचा म्हंटलं की तुमच्याकडे वेळ नाही,  थोडी देवाची आठवण ठेवावी." असंच आईचं म्हणणं असे/आहे. अजूनही " साधा संध्याकाळी देवासमोर दिवा लावायचा... बरं दिवा नाही तर निदान एक उदबत्ती लावयची म्हंटलं तर कसं लक्षात राहात नाही?" असंच ती आजही म्हणते. आतूनच देवाबद्दल काही वाटत नाही, हे तिला कळूच शकत नाही. आणि समजा असेलच "तो" तर असा कर्मकांडात अडकलेला असेल का?
 
 देवासंबंधी प्रश्न विचारायला मी कधी बरं सुरूवात केली?

 जी काय माहिती मिळत होती ती मी कालानुसार लावून घ्यायला सुरूवात केली असणार. म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलीयुग .... वेदांची, पुराणांची रचना, नीतिनियम वगैरे.... म्हणजे सत्ययुगात रामाचं एकपत्नीव्रत आणि द्वापारयुगात कृष्णाला सोळा सहस्त्र बायका, द्रौपदीला पाच पती.... बदलते नियम असं काहीतरी लक्षात येत गेलं.

 रामायण मुख्यत: ठसवलं जायचं ते रावणाच्या पराभवापर्यंतच, पुढचं उत्तररामायण बरचं पुढे कळलं, कदाचित ’कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघूरायाचे " या गाण्याने कुतूहल वाटून, प्रश्न पडले नाहीत.
किंवा कृष्णकथेत सुद्धा प्रश्न पडले नाहीत, आपल्यापर्यंत पोचतं ते देवांच्या बाजूनेच पोचतं.
पहिल्यांदा बहुदा प्रश्न पडायला लागले ते पाप आणि पुण्य, स्वर्ग आणि नरक या बाबतीत.
भागवतात एक कथा आहे, कोण तो एक राजा आयुष्यभर पाप करत राहिला पण मरताना त्याने ’नारायण’ असं , खरंतर आपल्या मुलाचं, नाव घेतलं, त्यामुळे स्वर्गात गेला. ही कथा काही मला पटली नाही.
 यावर मी बराच वाद घातल्याचं आठवतंय, आयुष्यभर चुकीचं वागूनही केवळ मरताना देवाचं नाव तोंडी आली की झालं! हा काही न्याय नाही!
( देवाची नावं मुलांना ठेवण्याचं हे ही एक कारण आहे.)

 मग वाटायला लागलेलं की स्वर्गात किंवा नरकात पाठवण्यात काहीतरी गडबड आहे.

 कधीतरी लक्षात आलं की रूढींमधे मुलींना आणि मुलग्यांना वेगळं वागवलं जातंय. दिवाळीतली न्हाणी बायकांनी एक दिवस आधी उरकून घ्यायची, पुरूषांची मात्र नरकचतुर्दशीला, थाटात!

 सहावी, सातवी, आठवीत कधीतरी अशी प्रश्नांना सुरूवात झाली असेल.

(क्रमश:)

*******

Saturday, November 16, 2013

देव - १

मी एका धार्मिक, परंपरा पाळणार्‍या अशा घरात जन्मले.
आमच्याकडे रोज आई देवाची पूजा करायची. सोवळ्यात नाही पण धूतवस्त्रात.
आमच्या छोट्या घरात देवघर भिंतीला लावलेलं होतं.
सकाळी मी उठायच्या आधी आईची पूजा झालेली असायची.
संध्याकाळी आई देवापाशी दिवा लावायची.
मी आणि माझा भाऊ संध्याकाळच्या प्रार्थना, स्तोत्रे म्हणायचो.
घरात पंचांग असायचंच, चांगला/ वाईट दिवस पाहिला जायचा.
बहुतेक सगळे सणवार साजरे केले जायचे.

आधी देवाला नेवेद्य, नविन कपडे आणले की आधी देवापुढे ठेवले जायचे.
कुंकू लावून आधी देवाला नमस्कार मग घरातील मोठ्यांना अशी पद्धत होती.
आई रोज गाईसाठी पोळी/ नेवेद्य काढायची, रोज चिमण्यांना तांदूळ घालायची,
देवासमोर, दारात रांगोळी असे.

तर असं होतं की देव आहेच.
रामायण , महाभारतातल्या गोष्टी लहानपणीच ऎकलेल्या होत्या.
तेव्हा काही चांगली किर्तने ऎकलेली आहेत.
तिसरी, चौथीत असताना शाळेतून आल्यावर भागवत ऎकायला गेल्याचं आठवतंय.

तिसरीत जेव्हा सगळे स्वातंत्र्यलढ्यातले नेते इतिहासात होते तेव्हा हे देव नाहीत का? असा प्रश्न विचारला होता.
उत्तर मिळालं देव फार फार वर्षांपूर्वी होऊन गेले.
म्हणजे अजून फार फार वर्षांनी गांधी/ नेहरू/ टिळक हे ही देव होतील, असाच विचार करून थांबले होते.

एक कोटी वेळा रामनामाचा जप केला की आपण बोलू ते खरं होतं असं ऎकलेलं.
रोज कितीवेळा रामनामाचा जप करता येणं शक्य आहे?
मग कोटीवेळा म्हणून व्हायचं तर किती वर्षे लागतील, याचा एकदा हिशोब केलेला आठवतो आहे.

चिरंजीव असणारा हनुमान, अश्वथामा कुठे कुठे भटकत असतील, असं वाटायचं.

कोणत्याही माणसाचे पाय अधर असतील तर तो देव, इतकं सोपं होतं.
कधीतरी इरेला पडून कुणाचे पाय अधर आहेत हे पाहात बसलेले आठवतंय.
प्रत्येकाचे जमिनीला टेकलेले. देव बराच दुर्मिळ आहे! परीक्षेला जाण्याआधी आवर्जून देवाला नमस्कार केला जायचा.
’पेपर सोपा निघू दे’ असं मनात म्हणतही असू, बहुदा.

देव या मूर्तीत आहे का? देव म्हणजे काय असेल? असा लहानपणी कधी विचार केलेला नव्हता.
देव आहे, संतांना मदत करणारा, कुठे कुठे , वेगवेगळी रूपे घेऊन अजूनही लोकांना मदत करीत असेल, असं होतं.
काहीही मोठ्यांनी सांगितलं की स्वीकारायचं असंच, देवाला जोडूनच, स्वर्ग - नरक, पाप-पुण्य ते सगळंच स्वीकारलेलं होतं.

(क्रमश:)

Thursday, October 31, 2013

दिवाळीच्या शुभेच्छा!


माझ्या लहानपणीच्या ज्या दिवाळीच्या आठवणी आहेत त्या मजेच्या, सुखदायक अशाच आहेत. आम्ही दिवाळीची किती वाट पाहात असू आणि दिवाळी संपली की किती उदास वाटत असे ते आठवतंय.
आता जाणवतं. सगळे सणवार बायकांना किती दमवणारे आहेत.
दिवाळी म्हंटलं की फराळाचे पदार्थ आठवतात. ते सगळे आई घरीच करी.


पुरूषांना तेल लावून द्यायचं बायकांनीच,
रांगोळ्या काढायच्या बायकांनीच,
चारीठाव पक्वांनासहीत स्वैपाक करायचा तोही बायकांनीच,
घराची सजावट, पणत्या लावणं करायचं ते बायकांनीच
नंतर नटायचं तेही बायकांनीच

यावेळेस जरा वेगळा विचार करू या.
कामांकडे एक संधी म्हणून पाहू या.

म्हणजे रांगोळी काढायला मजा येतेच ना?
कामांमुळे वेगवेगळ्या कलांची ओळख होते.
ताण कमी करायला याचा उपयोग होऊ शकतो.

बरीचशी तीच तीच निर्रथक कामे करायला लागल्याने बाईमधे एक चिवटपणा येत जातो.
रिकाम्या वेळेचं काय करू? याचा फार मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा राहात नाही.

दागिने, कपडे, सजावटीच्या वस्तू यात मन घातल्याने, त्यापलीकडच्या मूलभूत प्रश्नांना त्या हात घालत नाहीत,
त्यामुळे तिथली तीव्र निराशा, एकाकीपण यांची त्यांना ओळखही होत नाही..
अज्ञानात सुख!
(पुरूषही फार पलीकडचा विचार करत असतील, असे नाही..)

बायकांसमोरची कामे, ही नियम पोटनियमासहीत समोर असतात.
"आपल्या घरी असं असतं."
त्यांनी विचार करावा, ही अपेक्षा नसते.
विचार करण्यामुळे जे झगडे करावे लागतात ते टळतात.

मध्यमवर्गीय बायका दुय्यम पण एक सुखाचं जीवन जगू शकतात.
ज्या तसं जगतात त्यांना तसं जगू द्यावं.

तुम्हांला शक्य झालं तर तुम्हीही बघा.

जर स्वातंत्र्य आणि स्वाभिमान यांच्याशिवाय जगणं शक्य नसेल तर
तुमचा मार्ग खडतर आहे.

 शुभेच्छा!




Tuesday, October 15, 2013

"बाईपणाची ... ओझी." च्या निमित्ताने

http://asvvad.blogspot.in/2013/09/blog-post.html

>>यातील कोणती ओझी सर्वात जड, असह्य होणारी, सर्वव्यापी अशी सांगता येतील? कोणती ओझी झुगारणं तुलनेने सोपं आहे?
जी ओझी व्यक्तिवर अवलंबून असतात ती झुगारणं तुलनेनं सोपं असतं, जरी ती अवघड असली तरी.
जी ओझी इतरांनी लादलेली असतात ती झुगारणं अवघड.

~~~~~~~~
आपण बाईपण विसरलो तरी
बाकीचे विसरत नाहीत.
बाकीच्यांना वगळून
आपल्याला जगता येत नाही.
आपल्या वागण्याचे
अर्थ लावणारे ते असतात.
आपण कितीही मुक्‍त असलो
तरी चौकटी आखणारे ते असतात.
सगळं कसं नियमबद्ध
ते करु शकतात.
अपवाद म्हणून का असेना
आपल्याला नियमात बसवतात.
नुसते आपण बदलून उपयोग नसतो,
बाकीचे बदलावे लागतात.
~~~~~~

जी वावरतानाची छोटी छोटी ओझी आहेत ती प्रथम झुगारली पाहिजेत, ती तुलनेनं सोपी आहेत. त्याला होणारा विरोधही दुर्लक्ष करण्याजोगा असू शकतो, असेलच असं नाही. पण काच हळु हळू सैलावत नेला पाहिजे, प्रत्येकीच्या घरची परीस्थिती कशी आहे त्यावर ते अवलंबून आहे. म्हणजे कुणाकडे कुठलेही कपडे घालण्यावर बंधन नसेल पण मंगळसूत्र घातलंच पाहिजे. कुणाकडे मंगळसूत्र घाल की न घाल पण अंगभर कपडे हवेत, असं असेल.
 प्रश्न असा आहे की तिने काय घालायचं काय नाही, हे तुम्ही ( समाज, बाजारपेठ... कोणीही) ठरवू नका, तिचं तिला ठरवू देत. मग ओझं नाही. घरातले किंवा समाज ते ठरवायला लागला की ते ओझं.
 मला असं वाटतं की चालण्या, बोलण्या, वागण्याचे नियम मी बर्‍यापैकी धुडकावलेले आहेत.
समाजाचं कसं असतं ना, की तो तुम्हांला सामावून घ्यायलाच बसलेला असतो, इकडून नाहीतर तिकडून विळखा घालायला तयार. तुमचा अपवाद करून पण तुम्हांला समाजात बसवणारच. आणि व्यक्तिलाही समाजाचे दोर कुठे कापायचे असतात?
 म्हणजे माझ्या बाबतीत कसं होतं की काही थोडेसे नियम पाळले नाही तरी लग्न केलं, संसार करते आहे, मुलांसाठी नोकरी सोडून घरी बसले आहे... त्यामुळे मी तर अगदी फिट्ट बसते चौकटीत!
 आणि त्याहुनही महत्त्वाचं म्हणजे तिच्या नवर्‍याला चालतंय ना? मग आपल्याला काय करायचंय?
नवर्‍याचा विरोध पत्करून मला कुठे कधी झेंडे फडकवायची वेळच आलेली नाही.
"नवर्‍याला चालतंय ना! त्याला सांभाळून हवं ते करू देत."  लोक जेव्हा असा निष्कर्ष काढून मोकळे होतात, तेव्हा काहीही करता येत नाही.

"आदर्श बायको असण्याचं ओझं, नवराबायकोचं कित्ती छान चाललेलं आहे, हे दाखवण्याचं ओझं" हेसुद्धा मी बर्‍यापैकी झुगारलेलं आहे.
आपण कितीही खरं आणि स्पष्ट बोलायला गेलो ना तरी लोक हवा तसा अर्थ काढतात, मी म्हणते की ’ माझं आणि माझ्या नवर्‍याचं फार काही छान चाललेलं नाही, खरं आमचं अगदी उत्तम चालू शकतं पण नवरा काही प्रयत्नच करत नाही.’ लोक अर्थ काढतात वा! याचं तर मस्तच चाललंय. उगाच विनम्रता! आपल्याला काही करता येत नाही. आणि उघड्या डोळ्यांनी आजूबाजूचे कितीक संसार पाहिल्यावर, त्या नवरा बायकोंनी नात्याचं काय भयंकर करून ठेवलं आहे हे पाहिल्यावर आमच्यात मैत्री आहे ही पुष्कळच कमाई आहे , हे लक्षात येतं.

 माझ्यासाठी तरी खोलवर आणि सर्वव्यापी असणारं ओझं हे बलात्काराच्या भीतीचं ओझं आहे.
ते झुगारून द्यायला जमलेलं नाही.

~~~~~~~

>>> आणखी एक ओझं म्हणजे यशस्वी नवर्‍याची बायको म्हणून पार्ट्यांना जायचं.
थोडं समजलं, अधिक स्पष्ट करता येईल?
काय स्पष्ट करायचं? यशस्वीच असं नाही नवर्‍याबरोबर केवळ त्याची बायको म्हणून पार्टीला जाणं,  हेमंत जोगळेकरांच्या कवितेत आलं आहे तसं,
http://kavitanchagaon.blogspot.in/2013/10/blog-post.html
मला कधी नटून थटून जावं लागलेलं नाही, म्हणजे मिरवायची बाहुली म्हणून मी कधीच गेलेले नाही,
तरीही तिथे माझी ओळख केवळ अमक्याची बायको हीच असते, तिथे आलेल्या सगळ्या बायकांचीही अशीच असते,
नवर्‍याच्या मागे मागे हसत फिरायचं किंवा बायकांच्या घोळक्यात शिरायचं, अति औपचारिक बोलायचं.
नको होतं.
तिथे असणार्‍या इतर बायकांना ते काचत असेलच याची मला खात्री नाही.
मुळात मुलींना वाढवलं जातं तेच अशा बाहुल्या व्हायला.
मग नटून थटून मिरवणं, हा एक बहुमानच वाटायला लागतो/ वाटत असावा.
...... आपल्याला काहीच करता येत नाही.

*******

पियू,
तू लिहिलेले सगळे मुद्दे खरे आहेत.
अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी लढण्यात किती एनर्जी जाते.
काय करणार?
आपल्याला जर निमूट सहन करायला जमणार नसेल तर तक्रार करत/ विरोध नोंदवत राहिलं पाहिजे.
खूप दमायला झालं तर काही दिवस विश्रांती घ्यायची, त्यांच्या मनासारखं वागायचं.
घरी काय आणि दारी काय माणसं हीच आहेत!
तरी आपल्या पूर्वीच्या पिढीतल्या बायकांपेक्षा आपलं खूप बरं चाललंय.

*******

>>>> प्रौढ कुमारीकांना, परित्यक्तांना, विधवांना आपण स्वच्छ चारित्र्याचे आहोत हे दाखवत बसण्याचं एक ओझं असतं. विवहितांपेक्षा कुठल्याही पुरूषाशी वागताना त्यांना फारच काळजी घ्यावी लागते.

>>अगदी खरं आहे. निमशहरी गावात, खेड्यात विवाहितेलाही हे ओझं असतं.

हो. विशेषत: एकटा पुरूष आणि एकटी बाई भेटले तर नैतिकतेचं काय होईल? म्हणून सारा समाज त्यांच्यावर डोळे ठेवून असतो. उघडपणे कुठल्याही बाईला नवर्‍याव्यतिरीक्त कुठल्याही (भाऊ, वडील या नात्याचे पुरूष वगळता) पुरूषाला एकट्याने, एकट्याला सहज, गप्पा मारायला वगैरे भेटणं ( आणि उलटही, म्हणजे कुठल्याही पुरूषाला , कुठल्याही बाईला भेटणं) ही जवळपास अशक्य गोष्ट आहे.
 निमशहरी गावात किंवा खेड्यात तर अशक्यच आहे.

 *******




Monday, September 30, 2013

द लंच बॉक्स

मला हा चित्रपट खूप आवडला.

ही एका मध्यमवर्गीय गृहिणीची कहाणी आहे.
शाळेत जाणारी एक मुलगी, ऑफीसला जाणारा एक नवरा, वर राहणार्‍या देशपांडे काकू, आजारी वडील, आई आणि परीक्षेतील अपयशाने आत्महत्या केलेला भाऊ.
 नवर्‍याला आपलंसं करण्यासाठी वेगळं काहीतरी बनवण्याच्या खटपटीत ती.... इला.
तिला नवर्‍याची जवळीक खरोखर हवी आहे का? माहीत नाही.
पण नवर्‍याची मर्जी पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नात ..... ती.
जी कुणीही असू शकते.
नवरादेखील ऑफीस आणि काम यात पिचलेला.
नवर्‍याचं कुठे काही अफेअर तर नसेल? ती साशंक! असेल किंवा नसेलही.
पण तिच्या डोक्याला खुराक!

मुंबई
तोच पाऊस, तीच गर्दी, तेच डबे, तीच ने आण, तेच तेच ..... घडत काहीच नाहीये.
दुबारा बारीश शुरू हो सकती है!

गेली बारा की पंधरा वर्षे देशपांडे काकू, आधी कोमात गेलेल्या आणि आता दिवसा छताला टांगलेल्या फिरत्या ओरीयंट फॅन कडे बघत असणार्‍या नवर्‍याची देखभाल करताहेत.

खाली वर राहणार्‍या शेजारणींचं चांगलं सख्य आहे.

खाली वर सुरू असलेल्या संसारातही साम्य आहे का काही?
इलाचा नवराही दिवसा चाकोरीच्या फॅनमधे अडकलेला तर नाही?

काहीच न घडणारे कदाचित खुपसे दिवस!

आणि एक दिवस कधी न घडणारी चूक डबेवाल्यांकडून होते.
इलाने नवर्‍यासाठी तयार केलेला डबा कुणा साजन फर्नांडीस नावाच्या विक्षिप्त समजल्या जाणार्‍या अकौंटंटच्या टेबलावर जातो.
त्याची बायको वारलेली मागेच.
तोही स्वेच्छानिवृत्ती घेऊन नाशिकला जाण्याचं ठरवत असलेला.
अनपेक्षित चवदार जेवणाने तो सुखावतो.

डब्यातून चिठ्ठ्यांची देवाण घेवाण सुरू होते.

अजूनही तेच ते, वेगवेगळ्या भाज्या तयार करणं, डबा भरणं, डबेवाल्याने नेणं, पोचवणं, परत आणणं.
पण आता मनं बदलली आहेत.
तेच तेच असलं तरी त्यात प्रेम मिसळलंय, उत्कंठा आहे, वाट पाहणं आहे.
साध्या साध्या गोष्टी सांगायला त्यांना कुणीतरी मिळालंय.

रोजचं चाकोरीतलं जगणं आपण टाळू शकत नाही, आजू बाजूची परीस्थिती बदलू शकत नाही.
प्रेम, आस्था, आपुलकी, शेअरींग याने जगणं बदलून जातं.

कधीही जाऊ शकणार नाही असा एक भूतान मनात तयार होतो.

तोही बदलतो. केवळ शेखमुळे नाही तर नव्या मैत्रिणीमुळे, कधीतरी शेखच्या घरी जाऊन येतो, त्याच्या चुका दुरूस्त करत बसतो. गल्लीतल्या मुलांशी दोस्ती होते.

चित्रपटभर दोघांची भेट अशी होत नाही.

ती एकदाच इराण्याच्या हॉटेलमधे त्याची वाट पाहात थांबते,
एकट्या बाईसाठी असं वाट पाहात थांबणं किती साहसाचं आहे!
(तिचा नवरा कुठेही गेला तरी देशपांडे काकू विचारणार नाहीत पण दुपारभर ही नव्हती तर त्यांच्या चौकशा सुरू.)

चित्रपटाच्या शेवटी तो तिच्याकडे यायला निघतो.
कदाचित भेटेल कदाचित नाही.
दोघे मिळून भूतानला जातील?
कोण जाणे, नाहीच बहुदा.

सगळ्यांनी कामं छान केलेली आहेत. इरफान खान, नवाजुद्दिन सिद्दिकी आणि निम्रत कौर.
संथ, छोट्या छोट्या प्रतिक्रिया टिपणारा सिनेमा आहे.
भारती आचरेकरने नुसत्या आवाजाने देशपांडे काकूंचं व्यक्तिमत्व उभं केलं आहे.

पाहायलाच हवा असा चित्रपट आहे. चुकवू नका.

दिवाळीअंकातल्या एखाद्या जमून आलेल्या गोष्टीसारखा आहे.

.

 . Epstein files मधून जे जे काही बाहेर येतं आहे ते भयंकर आहे. Jeffrey Epstein हा माणूस आहे का सैतान? त्याने इतक्या बालिकांचं लैंगिक शोषण केल...