Wednesday, December 16, 2009

जड झाले ओझे....

मुलींना घरात वाढवलं जायचं तेच मुळी हे त्यांचं घर नव्हे, त्यांचं घर म्हणजे त्यांच्या नवर्‍याचं घर. पूर्वी आया सोनंबिनं घेऊन ठेवायच्या मुलीच्या लग्नासाठी. परवा परवा पर्यन्त बैकांच्या जाहिराती असायच्या की मुलीच्या लग्नासाठी आणि मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज देतो म्हणून!
माझ्याहून साताठ वर्षांनी मोठ्या असणार्‍या माझ्या आतेबहिणीला वाटले केस कापावे, तिला पाहायला सुरवात केली होती.तर आत्या म्हणाली ,’आत्ता नको, एकदा लग्न होऊदे, मग कापा नवर्‍याला आवडले तर!’

माझ्या घरात असे संवाद झाले नाहीत, तरी नातेवाईक होतेच की! मी ME करायचे ठरवल्यावर माझी मोठीआई बाबांना (आईला नाही बाबांना) म्हणाली’ ’पोरीला एवढं शिकवताय ,आता साजेसा जावाई कुठे शोधाल?’ (साजेसा म्हणजे माझ्यापेक्षा वयाने,उंचीने, शिक्षणाने जास्त)
मुलीच्या जन्माचं ध्येय काय? तर लग्न करून चांगला नवरा मिळवणे. म्हणजे नशीब काढलं पोरीनं!
कळती मुलगी म्हणजे आईबापांच्या जीवाला घोर! एकदा लग्न झालं की ते सुटले!
( मला माहित आहे आपण मुलींना असे नाही वाढवत, आपणही अशा वाढलो नसू, पण आजूबाजूला तर अशी खूप उदाहरणे होती/आहेत.)

अशी मुलगी लग्न होऊन सासरी आली की ते तरी तिचे घर असते का?

आपण पाहिलेच ना? भांड्यांवर नावे कुणाची?

ते तर ....श्री.रा.रा.......यांचे घर आजन्म कराराने (खाऊन,पिऊन, राहण्याची सोय करून) चालवण्यास दिलेले आहे.घराचे पडदे आणि उशांच्या खोळी निवडण्याचे स्वातंत्र्य सदरहू ....चि.सौ.कां...यांना देण्यात आलेले आहे. बाकी गोष्टीत त्यांनी नाक खुपसू नये अशी अपेक्षा आहे.......

तेही तिचे नसते. आहे त्या घराच्या साच्यात तिला बसवण्याचे प्रयत्न होतात.
बाई ही अशी तुटलेलीच असते आयुष्यभर!

आमचं लग्न झालं. आम्ही सगळे संगमनेरला आलो.... संध्याकाळ...स्वैपाकघरात काहीतरी चहापाण्याची व्यवस्था चाललेली....सगळे मजेत...कदाचित खूप दिवसांनी भेटलेले नातेवाईक...एकमेकांशी गप्पा मारताहेत...आनंदात....छोट्या मुलांची काहीतरी गडबड चाललीये.... पाखरांची घरट्याकडे परतायची वेळ झालेली.....बाहेर पक्षांचा किलबिलाट..... घरातला दिव्यांचा मंद उजेड.....बैठकीच्या खोलीतला बातम्यांचा आवाज.... मी इथे काय करू?.......मी इथे का आहे?......माझं घर मागे ठेवून आलेली मी आणि ज्याच्याशी मी नुकतं लग्न केलयं असा, त्याच्या माणसांमधे रमलेला माझा नवरा...माझ्यापासून कोसों दूर.....मी एकटी....गप्प.... ते तुटलेपण मला लख्ख जाणवलं.
हा अनुभव प्रातिनिधिक नसेलही. (सगळ्या गोष्टींची कारणं बाहेरच्या परिस्थितीतच असतात असे नाही ,काही आत शोधावी लागतात.)
तुमच्यापैकी प्रत्येकीला असा तुट्लेपणाचा अनुभव टप्याटप्यानी / अचानक केंव्हातरी आला असेलच. काय केलंत तुम्ही त्याचं?
...................................
तुटलेपणाची म्हणजे परात्मतेची संकल्पना प्रथम मार्क्सवाद्यांनी मांडली.म्हणजे कामगार जे काम करतो त्यापासून तुटलेला असतो, घर बांधणारा मजूर कधीही त्या घरात राहणार नसतो असं.
मार्क्सवादी स्त्रीवाद्यांनी पहिल्यांदा हे स्त्रियांना कसं लागू पडतं हे दाखवून दिलं.
.....................................

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...