Tuesday, December 31, 2013

देव - ४

जन्मत: कुठलंही मूल आईवर अवलंबून असतं.
जवळच्या कुटूंबियांवर अवलंबून असतं.
मानवी पिल्लाचं परावलंबन तर बराच काळ चालू असतं.

ज्यांच्यावर विसंबावं अशीच ही वडीलधारी माणसं असतात, माझ्यासाठी होती.
मोठी माणसं जे करतात ते आपल्या भल्यासाठीच यावर विश्वास, पूर्णच विश्वास!
ते जर म्हणताहेत देव असतो तर असणारच, शंकाच नाही.
जर देवाला सकाळ संध्याकाळ नमस्कार करायचा असतो तर केला पाहिजे.
वडीलधार्‍यांना नमस्कार करावा तर करावा.
छोटं सुरक्षित जग!

आणि कधीतरी अचानक कुणीतरी आपलं मोठं माणूस सांगतं की सगळीचं मोठी माणसं विश्वास ठेवावा अशी नसतात, ती आपल्या भल्याचाच विचार करतील असं नाही.
मग कृष्णार्पणमस्तू !

ही छोट्या सुरक्षित जगाला तडा जावा अशी कदाचित पहिली घटना असेल.
या क्षणी काय झालं असेल त्या छोट्या जीवाचं!
ती बावरलेली छोटी मुलगी माझ्यासमोर उभी राहते आहे.
ती कदाचित तिच्या एकटेपणाची सुरूवात होती.
कदाचित कुठला मार्ग निवडायचा हे ठरवणारा तो पहिला क्षण असेल.
सुरूवातीला त्या छोटुकलीला वाटलं की बरं झालं कोण आपला कोण परका ते कळलं...
पण त्याचवेळी कुठेतरी मनात असणार की अशी परकी माणसं ओळखायची तरी कशी?
कोण आपलं, कोण परकं? कोण हितचिंतक, कोण शत्रु?
मला सावधपणे पावलं टाकायला हवीत.

प्रत्येकाच्या आयुष्यात येणार्‍या अशा क्षणानंतर मग मोठं होता होता कधीतरी लोकांची देवावर विसंबायला सुरूवात होत असणार.
जो कायम आपलं हितच चिंतणार आहे असा खात्रीचा कोण? तर देव!
जो खात्रीने सोबत करणार आहे, असा कोण तर देव!
ज्याच्याशी काहीही मोकळेपणानं बोलता येईल, असा कोण? तर देव!
जो मदतीला धावणार आहे, असा कोण? तर देव!
मित्र, सखा, मार्गदर्शक, सर्वकाही देव!

कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाई

माझे जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी

देव सगळ्यांचा आहे पण माझा माझा एकटीचा/एकट्याचाही आहे.

अशा देवाची कल्पना किती लोभस आहे.

********

Sunday, December 15, 2013

देव - ३

" समलिंगी संबंध " ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निराशाजनक आहे.
त्यावर कधीतरी लिहिन.

******

देव -- क्रमश: -----

लहानपणी आईचं असं असे की सगळी कर्मकांडं केली पाहिजेत, त्या मानाने बाबांचं जरा कमी होतं. म्हणजे आम्ही कुठल्या मंदिरात गेलो तर बाबा आत आलेच नाहीत, बाहेरच थांबले असं झालेलं आहे. किंवा पुजेतही हे चालेल ते चालेल, ते चालवून घेऊ असं त्यांचं असायचं. पण तेही देवाचं सगळंच करायचे आणि करतात.

 जे काही आणि जितकं काही आमच्या गावाकडे करतात त्यापेक्षा आईचं करणं बरंच कमी आणि सुटसुटीत आहे. पण आहे.

 माझ्या एका आत्याच्या अंगात यायचं. देव काही असा अंगात येत नाही याबाबत दोघांचंही एकमत होतं. हे काहीतरी ढोंग आहे किंवा मानसिक गरज आहे असंच त्यांनाही वाटायचं. ते जाहीरपणे आत्यांसमोर कधी बोलले नाहीत.
 या आत्याने एकदा अंगात देवी आलेली असताना कुठलातरी एक जप लाखवेळा दोघांना करायला सांगितला, त्याने माझी मावशी/ काकू बरी होणार असं होतं. तो जप दोघांनीही केला. मी विचारलं, "याने काही मावशी बरी होणार नाही हे माहित असूनही तुम्ही का करताय?"
 त्यावर आईचं उत्तर होतं, " देवाचं नाव घेतलेलं काही वाया जात नाही. आणि समजा पोचलं पुण्य मावशीपर्य़ंत , झाली बरी तर हवंच आहे, "
आणखी एक असंही होतं की कोणी का असे ना जमण्यातलं काहीतरी मावशीसाठी करायला सांगितलं तर करायचं नाही हे तिला पटण्यातलं नव्हतं.

 आपल्या आईवडिलांची देवाबद्दलची काय मतं आहेत, याचा आपल्या देवाविषयीच्या मतांवर प्रभाव असतो का?
मला वाटतं, निश्चितच असतो. सुरूवातीच्या दिवसांत तरी असतोच असतो. आपण कधीतरी सुटे होऊन विचार करून आपली मतं बनवायला लागलो की परीस्थिती बदलते. माझा भाऊ विश्वास  हा तितकाच धार्मिक, अस्तिक राहिलेला आहे, मी मात्र बदलत गेले.

  मिलिन्दबरोबर राहिल्याने बदल सहज होत गेले.

प्रत्येक घराची काहीतरी रित असते, काही श्रद्धा असतात. देव विषयक काहीतरी भूमिका असते.
आमच्या घरात देवावर, धर्मावर पूर्णच विश्वास! (शिवाय आपण उच्चवर्णीय असल्याचा अभिमान!)
आणखी एक आमच्या घराचं वैशिष्ट्य होतं, इथे कुठल्याही विषयावर खुली चर्चा होऊ शकत असे.
म्हणजे तुमचं ऎकलं जाईल आणि कृती होईलच असं नाही पण बोलण्यावर बंदी नव्हती.
याबाबतीत माझे त्यांच्याशी पराकोटीचे वाद होत.

मला असं वाटतंय वेगळेपण माझ्यात सुरूवातीपासूनच होतं / असावं.
तिसरीपासून मी शारदा मंदीरमधे जायला लागले, बसने जावं/ यावं लागे. आम्ही सगळी मुलं जाता येता जेव्हढी मंदिरं लागत त्या त्या देवांना हात जोडून नमस्कार करत असू. ( बसमधे उभं असताना दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा म्हणजे एक कसरत असे, मजा यायची :) ) सुपारी मारूती, हिंगुलांबिका ठीकच आहे पण मी  गांधी भवनातील गांधीच्या पुतळ्याला, बुद्ध आणि आंबेडकरांच्या पुतळ्यालाही नमस्कार करायचे, हे उद्याचे देवच आहेत, म्हणायचे.

 देवाला नमस्कार का करायचा?
नमस्कार करताना म्हणायचं असायचं ते " जय बाप्पा, सुखी ठेवा"
आपल्याला त्याने सुखी ठेवावं ही इच्छा! आणि ते त्याच्या हातात आहे असंही!

*******

या नमस्कार करण्यावरून एक आठवलं.... एक थोडा शहाणा होण्याचा क्षण.
अगदी लहानपणी आईने की मावशीने कोणी सांगितलं होतं कुणास ठाऊक, आपण मोठ्या माणसांना नमस्कार करतो, ती आशीर्वाद देतात, पण सगळी मोठी माणसं आपलं चांगलंच चिंतत असतील असं नाही, म्हणून अशा मोठ्यांना नमस्कार करताना म्हणायचं "कृष्णार्पणमस्तू". म्हणजे नमस्कार कृष्णार्पण केला की बदल्यात त्यांनी जे इच्छिलं असेल ते ही होतं कृष्णार्पण!



*******
(क्रमश:)


हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...