Tuesday, May 31, 2011

गप्पा


यावेळी मी आणि माझी एक मुंबईची मैत्रिण भेटायचे ठरवून औरंगाबादला गेलो होतो. ती दोनच दिवसांसाठी आली होती. दुसर्‍या दिवशी सगळे आटोपून रात्री सव्वादहा - साडेदहाला आमच्याकडे आली दहा मिनिटे आईबाबांशी बोलली, नंतर आम्ही गच्चीवर गेलो.
 पूर्वी यायचा तसाच तिचा भाऊ साडेअकरा बाराला तिला बोलवायला आला. ती म्हणाली, ” येते तासाभराने.”
आई म्हणाली,” दीड वाजलाय. किती वेळ गप्पा!”
मी म्हणाले,” तू थांब आता इथेच.” सकाळी सहाच्या रेल्वेने तिला मुंबईला जायचे होते. सव्वाचारला ती गेली, आवरून लगेच स्टेशनवर गेली. मला म्हणाली, ” गाडीत झोपायचेच आहे.”
खूप वर्षांनी आम्ही अशा रात्रभर निवांत गप्पा मारल्या.

----------

ती आणि तिचा नवरा त्याच दिवशी शनि- शिंगणापूरला जाऊन आले होते. तिथे घराला दारे नसतात, हे पाहण्यासाठी म्हणून. तिथे तेव्हढ्या परीसरात खरोखरच दारे नाहीत. ती म्हणाली, ” न्हाणीघराला, शौचालयांनादेखील दारे नाहीत. नुसते पडदे .” दारे नाहीत हे मला माहीत होते, चोर देवाच्या भीतीने चोरी करत नसणार एवढेच माझ्या मनात येऊन गेले होते. त्यापलीकडे मी काही विचार केलेला नव्हता. मी म्हणाले, ” दारे काही फक्त समोरच्या व्यक्तीवर अविश्वास दाखविण्यासाठी नसतात. आपल्याला एकांत हवा असतो, तो मिळण्याची खात्री हवी असते. ”
” हो ना!, मी विचारलं एकीला तुमच्या झोपायच्या खोलीलापण दारं नाहीत का? कसं वाटतं तुम्हांला ? ”
” असं विचारलंस??”
” हो, त्यात काय?”
(माझ्या  बर्‍याच मैत्रिणी ’ त्यात काय’ म्हणणार्‍या आहेत. त्या मला आवडतात.)
पुढे म्हणाली, ”तिथे झोपायच्या खोलीची रचना अशी असते की येणारा थेट येऊ शकत नाही ,  त्याची चाहूल लागते.”
”काय हा वेडेपणा! एकदा त्या शनीला सांगून टाकायचं, बाबा रे आमचा तुझ्यावर विश्वास आहे, आम्ही आमच्या तिजोर्‍या उघड्या टाकू पण काही आवश्यक दारे लावू.”

---------

” विद्या, मी एवढया नवरा-बायकोच्या जोड्या पाहते आहे ना! प्रत्येकाला साजेसा जोडीदार मिळतो. बघ मला माझ्यासारखा मिळाला, तुला तुझ्यासारखा मिळाला. अण्णा - वहिनी दोघेही उधळे आहेत”
” छे! मला नाही पटलेलं. वर्षानुवर्ष ते एकमेकांबरोबर राहून जुळवून घ्यायला शिकतात, कोणाही दोघांत काही जुळणार्‍या काही न जुळणार्‍या गोष्टी असतात. आपण खुशीत असलो की आपल्याला जुळणार्‍या गोष्टी प्रामुख्याने दिसतात, नसलो की न जुळणार्‍या”

----------

”माझी शेजारीण खूप सुंदर आहे. तिचा नवरा असातसाच आहे, दिसायला. लग्नाला वीस-बावीस वर्षे झाली आहेत. अजूनही तिच्या मनात येतं .... आपल्याला आई वडील नव्हते, मामावर भार नको म्हणून याच्याशी लग्न केलं / करावं लागलं..... दिसण्याचं वगळता तो तसा चांगला आहे.”

----------

तिचे सासरे गेले तेव्हाचं सगळं सांगत होती, मला महानिर्वाण नाटकाची आठवण झाली.

------------

”तुला मीना आठवते? माझी मामेबहीण, माझ्या मावसभावाशी लग्न झालं तिचं”
” हो. आठवली.”
” तिचं कमी वयात लग्न झालं. पुढे मुलं झाली. संसाराची जबाबदारी पडली, मी तेव्हा शिकतच होते. ती मागच्या महिन्यात एका लग्नासाठी मुंबईला आली होती. माझ्याकडे उतरली. एकटीच आली होती. पाच सहा दिवस राहिली. हृषिकेशच्या परीक्षांमुळे मी रजा घेतलेली होती. तो जायचा परीक्षेला आणि आम्ही दोघी भटकायचो. तिला मी मुंबई दाखवली, फोर्ट्मधे पायी फिरवलं, लोकलमधून फिरलो. काही आवडलं की खायचं, खरेदी करायची. तिच्या आवडीची साडी घेऊन दिली. मजा केली. मला फारसं काही वाटलं नाही पण ती खूप भारावली होती. सारखं किती छान मोकळं वाटतयं.. असं म्हणत होती. मी फार केलं असं म्हणत होती.
एवढं काय? येणारांना मी मुंबई दाखवते, यावेळी रजेमुळे सोय झाली. गप्पा झाल्या. इथून हैद्राबादला गेल्यावरही ती सगळ्यांना मुंबईच्या गोष्टी सांगत होती. मामा मला फोनवर म्हणाले, ”तू मीनावर काय जादू केलीस?”
तिला आम्ही पूर्वी गप्पा मारायचो त्या आठवत होत्या, मी बरचसं विसरले होते. एकटीने काय मी फिरतेच ना! रोजचा स्वैपाक करायचा नाही, मुलं पाठीमागे नाहीत, आपल्याला हवं ते कारायचं... याचच तिला अप्रूप होतं.
 संसारात ती पार बुडाली. मी नोकरी करत असल्यामुळे माझं मला स्वत:चं विश्व आहे. तिच्या लग्नापूर्वी आम्ही गप्पा मारायचो, मजा करायचो ..... त्यानंतर तिने आजवर काही मजाच केलेली नव्हती.

********

बायकांना कसं जखडून टाकलं जातं ना! ...... स्वैपाक करा, भांडी घासा, कपडे धुवा ( किंवा मदतनीसाकडून करून घ्या), किराणा आणा, भाज्या आणा, बिलं भरा, मुलांच्या मागे फिरा, त्यांचा अभ्यास - त्यांचे कलावर्ग - त्यांचे खेळ, नवर्‍याला सांभाळा, आल्यागेल्याकडे बघा..... हे सगळं आपली पायरी सांभाळून ....... या चोवीस तासातून स्वत:साठी वेळ काढा........
 वर्षानुवर्ष मीनासारख्या कितीक बायकांच्या अंगावरून स्वातंत्र्याची साधी झुळूकदेखील जात नाही.......
पण काळजी करु नका बायका जगतात त्याशिवायही.... त्या चिवट असतात.

********

Thursday, May 12, 2011

भारतीय स्त्रीचे गृहिणीकरण -- १



इंग्रज भारतावर राज्य करत होते. भारताला लुटत होते. स्वत: ’सभ्य लोकांचा देश’ म्हणून मिरवत होते. भारतावर राज्य करण्यासाठी त्यांना काहीतरी नैतिक कारण हवं होतं. कुठल्याही देशाची संस्कृती किती पुढारलेली आहे हे ठरवण्यातले महत्त्वाचे मापक तिथल्या स्त्रियांची स्थिती कशी आहे? हे आहे. आपल्याकडे सती, केशवपन असल्या प्रथा त्यामुळे सारे भारतीय हे रानटी अवस्थेत आहेत आणि त्यांच्या उद्धारासाठीच इंग्रज हे भारतावर राज्य करीत आहेत, अशी ही भुमिका होती.
 त्या विरोधात इथल्या आणि काही पाश्चात्य इतिहासकारांनी पूर्वी म्हणजे प्राचीन काळी गार्गी, मैत्रेयी यांचे दाखले देत तेव्हा भारतात स्त्रिया पुरूषांच्या बरोबरीच्या होत्या, नंतरच्या काळात मध्ययुगात विशेषत: मुस्लिमांच्या आक्रमणानंतर इथल्या स्त्रियांची स्थिती खालावली अशी एक इतिहासाची रचना समोर आणली.
 आमचा इतिहास गौरवाचाच आहे, अशी भूमिका घेतली. भारतीयांना उभं राहण्यासाठी ती गरजेची होती.
इंग्रजांनी जर आमच्यावर सत्ता गाजवायला नको असेल तर आपण आधी आपल्या स्त्रियांची स्थिती सुधारली पाहिजे असं नवशिक्षितांना आणि सुधारकांना वाटायला लागलं.
 मग व्हिक्टोरीयन इंग्रजी गृहिणी ही प्रमाण मानून इथल्या स्त्रीचं गृहिणीकरण सुरू झालं.
पहिल्यांदा हे बंगालमधे झालं आणि नंतर हे महाराष्ट्रात सुरू झालं.
 स्त्रियांनी शिकलं पाहिजे, सुधारलं पाहिजे असं ठरवलं गेलं.
स्त्रीचं काम काय? तर मुले सांभाळणं, त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देणं, शिवण - टिपण करून घर व्यवस्थित ठेवणं वगैरे वगैरे.
स्त्रीने शिकायचं का? तर मुलांना शिक्षित आई मिळावी म्हणून. मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून. तिने यासाठी गणित, शास्त्र हे शिकण्याची गरज नाही, तिने गृहविज्ञान शिकावं.
 तिने वावरायचं कसं, बोलायचं कसं हे ही ठरवलं जावू लागलं.
...........................................................

******

आपण का शिकायचं? शिक्षण म्हणजे काय बरं? आपण का शिकलोय?.....

*******

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...