Friday, May 28, 2010

मैत्री..... मनाला हवीहवीशी.

माझ्या आयुष्यात वयाच्या प्रत्येक टप्प्यावर जेव्हा कोणाशी मैत्री होते तेव्हा समोरची व्यक्ती स्त्री आहे का पुरुष याचा विचार करुन कधीच होत नाही.मला वाटते लहानपणापासून आपण कसे वाढवलो गेलो यावर ते अवलंबून असते. याबाबतीत विचारांनी माझी आई खुप सुधारीत होती. आणि बाबांचे विचार त्यामानाने मागासलेले.आईने लहानपणी आम्हाला सर्व जातीचे, सर्व थरांमधील, मित्र-मैत्रीणींशी मैत्री करायला हवी ती मोकळीक दीली.त्या मैत्रीच्या सीमारेषा,त्यातील फायदे तोटे,धोके हे वेळोवेळी त्या त्या वयानुसार समजावून सांगितले. त्यामुळे समाजाची कधीच भीती वाटली नाही. यात आमचे बाबा,नातेवाईक,सोसायतीतील इतर मंडळी हे सर्वजण मोडत होते.कारण त्या मैत्रीवर पूर्ण विश्वास असणारी माझी आई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती.आणि हाच विश्वास व आमच्या नात्यातील पारदर्शकता ही कोणत्याही वयात, कोणाशीही होणारी मैत्री टीकवण्यात होते.या आमच्या नात्यातील जमेच्या बाजूंमुळे मला लहानपणी,कॉलेजमध्ये मित्र मैत्रीणींची संख्या भरपूर होती.आणि त्यातही मित्रांच्या संख्येचे प्रमाण जास्त होते.लग्नाआधी आम्ही रात्री दहादहा वाजेपर्यंत गप्पा मारायचो,एकत्र फोटोग्राफीला जायचो,एकत्र स्केचिंग करायला जायचो.
एकत्र कुटुंबात लग्न करुन आल्यावर नवरा म्हणून कौस्तुभचा अंदाज यायला खूप वेळ लागला.याला एकत्र कुटुंबातील घरातील अनेक कारणे होती. त्यामुळे मित्रांशीच बोलणे केले.तो मला जास्त सोपा मार्ग वाटला.त्या मित्रांनीही माझी बाजू समजावुन घेऊन काही वर्ष फोन नाही केले,न भेटण्याचे ठरवले.आता गेली तीन एक वर्षांपासून आमच्या बॅचमधले मित्र-मैत्रीणी आम्ही एकत्र दोन एक महीन्यातुन एक दीवस भेटत असतो.घरी माझ्या जुन्या मित्रांचे फोन येतात.त्याबद्दल कौस्तुभला माहीतीही आहे.वेळोवेळी त्याची मित्रांशी ओळखही करुन दीली जाते.आता समाजाची भिती अजिबात वाटत नाही. एकत्र कुटुंबात कोण काय म्हणेल याचा मनावर ताणही येत नाही. कारण कोणतीही आमच्या मैत्रीमधील गोष्ट माझ्याकडून लपवली जात नाही.
परवाच मी मुलांना घेउन बालगंधर्वला प्रदर्शन बघायला गेले होते.मी त्या वस्तू आणि त्याची माहीती वाचण्यात गुंग होते. एवढ्यात मागून मला कोणीतरी ट्प्पल मारली. वळून मागे बघते तर माझा कॉलेजचा मित्र होता.क्षणभर मी ही चक्रावले. कारण त्याच्या वयाने म्हणा मी त्याला पटकन ओळ्खले नाही.वेगळ्या स्टाईलची मिशी,रहाणीमान सर्वच बदललेले होते. त्याच्याशी दहा मिनीटे गप्पा मारल्या. गप्पा मारत असताना स्मृतीचा चेहरा कावरा बावरा झालेला दीसला.मी ओळखले आणि मुलांची ओळख त्याच्याशी करून दीली.नंतर आम्ही घरी आलो आणि दारातच स्मृतीने मला विचारलं तो मगाशी तुला टप्पल मारणारा माणूस कोण होता?तिचा मगाशी झालेला कावराबावरा चेह-यामागचा प्रश्न आता तीने मला विचारला होता.दोघांनाही कॉलेजच्या त्या मित्राविषयी सांगितले.आम्ही एकत्र कसे काम करायचो अश्या गप्पा त्यांच्याशी मारल्यावर स्मृती मला म्हणते कशी की आई म्हणजे माझा जसा शाळेमध्ये यश हा मित्र आहे तसा तुझा तो मित्र होता का? कारण यश पण माझ्या डोक्यावर ट्प्पल मारतो.म्हणजे लहानपणी मित्राने गंमत म्हणून मारलेली टप्पल आपल्या नजरेला खटकत नाही याउलट हेच मोठ्या वयात तिच्या नजरेला खटकले.तर समाजाला काय म्हणायचे?
मैत्री ही समोरचा स्त्री-पुरुष कोण आहे यावर अवलंबून नाही. माझे विचार ज्याच्याशी जुळतात,मी कुठलाही विषय,कोणतीही अडचण,सुखात-दु :खात, कोणत्याही वेळेस ज्याच्याशी,जिच्याशी मनमोकळेपणाने शेअर करु शकते तो खरा मित्र.आणि यात वयाची अट नसते.
आताही कधीही, वयाच्या कोणत्याही टप्प्यावर मित्रांशी खूप वेळ मनमोकळ्या गप्पा माराव्यात,त्यांच्याबरोबर सिनेमाला जावे,एकत्र स्केचिंग-फोटोग्राफी करावी,त्या चित्रावर-फोटोवर तासंतास वाद घालावेत.एकत्र कॉफी प्यावी असे नक्कीच वाटते. यासाठी समाजाची, कोण काय म्हणेल याची भिती नाही वाटणार. कारण जवळच्या व्यक्तीचा माझ्यावर असणारा विश्वास व नात्यातील पारदर्शकता. या दोन गोष्टींनी बाकी समाजाशी लढण्याचे बळ येते. व त्या समाजाचा आपल्या मनावर ताण येत नाही.

रमा

मिलिन्दच्या एका मित्राने संगमनेरला एक तीन मजली, नगर जिल्ह्यातली सर्वात मोठी अशी फर्निचरची शोरूम काढली आहे. त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो. त्या इमारतीवर दिव्यांच्या माळा वगैरे, तिथे जेवण होतं. मध्यभागी सॅलडचं डेकोरेशन, एक बर्फाचा मोठा गणपती, एका बाजूला पाणीपुरी, कुल्फी असे स्टॉल्स, दुसरीकडे सगळे जेवणातले पदार्थ, दोन तीन गोड पदार्थ. श्रीमंती अशी वाहत होती.
हा मिलिन्दचा मित्र स्वत:च्या कर्तृत्वावर मोठा झालेला. आमचं लग्न झालं तेव्हा वडीलांचं छोटं दुकान होतं. पुढे सगळा व्यवसाय यानेच वाढवला. आता तर गावातल्या कॉलेजच्या संचालक मंडळावर आहे. आणखीही काय काय करत असेल.
आम्ही गेलो, अगदी ’ या! या!’ मिलिन्दचे बाकीचेही बरेच मित्र आलेले होते. शोरूम पाहून आलो, म्हंटलं,”छान आहे.” मी विचारलं, ” हे बाजूचं वर्कशॉप आहे का?” ” नाही, पूर्वी होतं. आता आपली (आपली??? ती त्याची स्टाईल आहे.) दोन युनिट्स MIDC त आहेत. एक पावडर कोटींगचं नवं आहे.” पुढे म्हणाला,” वहीनी, तिकडे बसा ना, रमा तिथेच आहे.” रमा म्हणजे त्याची बायको. मी तिकडे गेले. तिथे पूजा केलेली होती.
मी प्रसाद घेतला. रमाला शोधत होते. साताठ वर्षांपूर्वी भेटले होते. चेहरा नीट आठवत नव्हता. तिथे असणार्‍या बर्‍याच बायकांपैकी एक रमा मी निश्चित केली. खरं तिच्याभोवती फार बायका नव्हत्या. ती एकटीच उभी होती, मला वाटलं तीच असावी. मी विचारलं, ’रमा ना?’ ’हो’ मग मी माझी ओळख करून दिली. सांगीतलं शोरूम छान आहे, वगैरे. ती मला यजमाणीन वाटतच नव्हती. ती इतकी अलिप्त दिसत होती, ताणाखाली वाटत होती. ’ तुम्ही जे सगळं पाहताय ते माझं आहे’ असे कुठलेही भाव तिच्या चेहर्‍यावर नव्हते. ती मिरवत नव्हतीच. मी निघताना तिने माझे हात हातात घेतले,’जेवून जा, नक्की." तिचे हात गार होते. आजचा प्रसंग तिला निभावून न्यायचा होता??

परात्मता... त्या समारंभाचा ती हिस्सा नव्हती.

का बरं?

तिचं लग्न झालं तेव्हा नवरा छोटा व्यावसायीक होता. त्याच्या छॊट्याशा वर्तुळात ती आत्मविश्वासाने वावरत असणार. सासू-सासरे, दीर, सगळ्याचं ती करत होती. तिच्या कष्टांना किंमत होती. नवर्‍याचं वर्तूळ वाढत गेलं. भराभर तो मोठा होत गेला. श्रीमंती येत गेली. किती साड्या आणि दागिने घेणार?? त्यालाही मर्यादा आहे, शेवटी ओझ्याच्याच गोष्टी त्या! ती सराईत झाली नाही, दुसरी एखादी झाली असती कदाचित. तिच्या घरी तीच पाहुणी होऊन राहिली होती?

********



बायकांचं काय असतं? घर नवर्‍याचं, मुलं त्याची, त्याचं नाव लावणारी ......

मला नेहमी वाटतं, अध्यात्मात जाणं बायकांना किती सोपं आहे. संसार असार आहे वगैरे. सगळं सोडून बायका हिमालयात तरी का गेल्या नसाव्यात? जावून तिकडेतरी शोधा की मोक्ष बिक्ष काय आहे ते!

सतत दुय्यम होऊन राहणं का स्वीकारतात त्या?

आपल्याकडे बायकांनी विचार करावा, प्रश्न विचारावेत, बदलाची अपेक्षा ठेवावी.... असं काही वाढवलंच जात नाही त्यांना.

************

Friday, May 21, 2010

मी बाई आहे याचा मला अर्थातच आनंद होतो, समाधान आहे.

स्त्रियांच एकंदरीतच समाजातील स्थान मग ते पूर्विच्या काळापासून ते आत्ताच्या आधुनिक काळार्यंत कशाप्रकारे होत/आहे ह्याचा विचार मी स्त्री म्हणून जास्त समजून करु शकते असं वाटतं. परिस्थिती बदली तरी अजूनही कुठल्याना कुठल्याप्रकारे अत्याचार हे वेगवेगळ्या पध्दतीने होतच आहेत ह्याचा खेद वाटतो.

स्त्री म्हणून काही आलेले अनुभव, मनावर कोरल्या गेलेल्या घटना, वाचनातील प्रसंग ह्यातून एक दहशत ही सतत आपल्या बाजूला वावरत असतेच. आताच्या काळात कणखर स्त्री ही त्याला प्रतिकार करुन उभी राहू शकते. पण अजूनही पन्नास टक्के स्त्रीया असहाय्य असतात ह्याची टोचणी सतत मनात जाणवते.
स्त्री व पुरुष यांची निसर्गत:च शारीरिक ठेवण भिन्न असल्यामुळे प्रत्येकाची बलस्थान वेगवेगळी आहेत. ती त्यांच्या क्षमतेनुसार आहेत. मग ती ताकद असो अथवा सहनशीलता. त्यामुळे श्रेष्ठत्वाचा निकष आपण लावू शकत नाही. पण बौध्दिक, मानसिक क्षमता ह्या दोघांच्याही तुल्यबळ आहेत. आणि तरीही ब~याच अंशी अनेक सामाजिक स्तरात स्त्रीच्या ह्या क्षमता स्विकारताना कुठेतरी नकार दिसतॊ ह्याच वाईट वाटतं.

स्त्री होणं किंवा पुरुष होण हे नैसर्गिक आहे. त्याचा फायदा / तोटा असा विचार न करता दोघांनाही समाजाने निर्माण केलेल्या प्रथांना, येत असलेल्या अनुभवांना सामोरे जावेच लागते. मी स्त्री म्हणून माझ्या मनात कायमची भिती, ताण निर्माण करणारे अनुभव खालील प्रसंगातून घेतले आहेत -
- गर्दीतून जाताना - बसमधून प्रवास करताना - रेल्वेतून रात्रीचा प्रवास करताना - N.C.C. मधे जवानांबरोबर वावरताना. त्या त्या वेळी मी प्रतिकार जरुर केला पण एक भिती बाळगूनच. तेव्हा ह्या पुरुष जातीचा खूप संताप आला. ह्या उलट माझ्या संपर्कातील सर्व पुरुष हे अत्यंत संवेदनशील व समानता मानणारे आहेत. दुस~या बाजूने विचार केला तर मी आज स्त्री आहे म्हणून मी माझ्या भावना मोकळेपणाने व्यक्त करु शकते, मात्त्रुत्वाचा सुखद अनुभव घेऊ शकते ह्याचं मला समाधान मिळतं.
ह्या जन्मात मी स्त्री म्हणून जन्मले आणि म्हणूनच मी तिला पूर्णत: समजू शकले. त्यामुळे पुढच्या जन्मी मला पुरुष म्हणून पण अनुभव घ्यायला आवडेल. एकंदरीतच ह्याबाबतीतली नैसर्गिक व सामाजिक रचना जास्त जवळून तपासता येईल असे वाटते.

पण आज मी स्त्री आहे ह्याचा मला अत्यंत आनंद होतो. त्यामूळेच मी खूप समाधानी आहे.

Saturday, May 15, 2010

मनापासून वाटले ते.....

दररोज सकाळी आयता चहाचा कप हातात येणे,आरामात पेपर वाचन करणे, फक्त स्वत:चेच आवरणे, आयता नाष्टा- जेवण घेणे, मनात येईल तेव्हा कोठेही कसेही पाय पसरुन बसणे, मनात येईल तेव्हा आराम करता येणे, मनाला वाट्टॆल तेव्हा ,वाट्टॆल तितकी झोप घेता येणे,मानसिक शारीरीक ताण कमी करण्यासाठी आपले आवडीचे छंद जोपासणे,चप्पल पायात घातली की घराबाहेर पडता येणे,आठवड्याची एक अशी हक्काची सुट्टी मिळणे,व ती सुट्टी फक्त आठवडाभर दमलो या कारणाने सत्कारणी लावणे,रात्री उशिरा पर्यंत घरी आले तरी चालणे, मित्रांबरोबर कटटयावर चकाटया पिटत बसणे, मनात येईल तेव्हा शिट्टी मारता येणे, जोरात आळस देता येणे, चारचौघांच्या समोर जांभई देता येणे, ढेकर देता येणे,आणि पादता येणे , उन्हाळ्यात उघडे बसता येणे,महीन्याच्या त्या अडचणींचे चार दिवस वाटयाला न येणे, मासिक पाळीचा शारीरीक व मानसिक होणारा त्रास वाटयाला न येणे, अशी एक ना अनेक उदाहरणे बघितली की मला नेहमी वाटते की मी पुरुषाच्या जन्माला आले असते तर बरे झाले असते.
या उलट मी स्त्री आहे याचा मला निश्चित अभिमान वाटतो.कारण आयुष्यातल्या स्त्रीच्या वाट्याला येणा-या प्रत्येक भुमिकेत मिळणारे समाधान. म्हणजे कधी मी कुणाची मुलगी, तर कोणाची बहीण, तर कोणाची बायको, तर कोणाची आई असते.आणि या नात्यांमध्ये असणारा ओलावा मला भावतो. या प्रत्येकात स्त्री म्हणुन असलेली माझी गुंतवणूक महत्वाची वाटते. मी स्त्री आहे याचा निश्चित अभिमान आहे कारण मी माझ्यातून स्त्री-पुरूषाचे प्रतिक म्हणून एका नव्या जीवाला जन्म देऊ शकते. एकाच वेळी अनेक कामांवर लक्ष केंद्रीत करून ती चोख बजावण्याचे सामर्थ्य स्त्रीयांमध्ये असते, संसार (मुले वाढवणे, त्यांची आजारपणे, त्यांचा अभ्यास, इ. अनेक अश्या अर्थी) आणि नोकरी अश्या अनेक गोष्टींसाठी लागणारी मॅनेजमेंट ही स्त्रीयांकडे उत्तम असते असे मला वाटते.
स्त्री असणे व पुरुष असणे या दोन्ही गोष्टी ज्याच्या त्याच्या जागी योग्य व श्रेष्ठ आहेत असे माझे मत आहे.प्रत्येकाचे नक्कीच फायदे व तोटे आहेत. म्हणूनच निसर्गत:च काही गुणधर्म हे स्त्री व पुरुषांत वेगवेगळे असतात ते आपण मान्य केले पाहीजे.

Thursday, May 13, 2010

मी बाई आहे याचा मला आनंदच होतो.

मी बाई आहे याचा मला आनंदच होतो.

बाईचं आयुष्य अधिक समृद्ध असतं पुरूषाच्या आयुष्यापेक्षा. नैसर्गीकदृष्ट्याही आणि सामाजिकदृष्ट्याही. अधिक सुखाचं असतं असं नाही म्हणत आहे मी, पण समृद्ध नक्कीच असतं.

बाई ही कायमच कमी दर्जाची समजली गेली आहे. माणसाच्या इतिहासात (HIS-STORY) बाईच्या कामाची कुठे नोंदच केली गेलेली नाही. बायकांनी लावलेला टोपलीचा शोध असो की शेतीचा शोध असो, पुसले गेले. व्यवस्थाच अशी बनवली गेली की फक्त घराबाहेरच्या कामांची नोंद होते. बायकांना वर्षानुवर्ष घरकामालाच जुंपलं गेलं आहे. त्यांना संधीही सहज मिळत नाही. आजचं हे जग मुख्यत्वे पुरूषाच्या कर्तृत्वावर उभं आहे. बायका सहकारी असतील पण नेतृत्व पुरूषांच आहे.

मला बरं वाटतं मी पुरूष नाही ते. या जगाचं जे वाट्टोळं केलं आहे, तेही पुरूषांनीच ना? बहुसंख्य दहशतवादी पुरूष आहेत, बहुसंख्य सैनिक पुरूष आहेत, बहुसंख्य राजकारणी पुरूष आहेत. बलात्कार करणारे तर पुरूषच असतात फक्त.

मला बाई असण्याचं समाधान वाटतं. त्यात अश्विनी म्हणते तसं निर्मितीची क्षमता हे एक आहे, पण तेच एक नाही.( त्याआधारे बायकांची केली जाणारी वर्गवारी मला मान्य नाही.)  समजून घेण्याची क्षमता वगैरे मिलिन्द म्हणतो तसं सामाजिक घडणीने लादलेल्या गोष्टी आहेत. मग माझं बाईपण कशात आहे?केवळ शारिरिक फरकात? हो, आदर्श समाजव्यवस्थेत ते तेव्हढ्यातच असेल.पण आजच्या समाजव्यवस्थेत मला ते सारखं लक्षात ठेवावं लागतं.

मला केवळ एक चांगलं माणूस म्हणून जगायचं आहे. आपण समाजात समानतेचं वातावरण आणू शकलो तर तुम्ही बाई असा की पुरूष असा तसा फरक पडणार नाही.

बाई असण्याचे तोटे हे आहेत, प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान तुम्हांला सहजी मिळत नाही, कमवावा लागतो. तुम्हांला कायम आवरून सावरून राहावं लागतं, पावित्र्य जपणे, पुरूषांपासून सांभाळून राहणे या आणखी काही गोष्टी. दुय्यमत्व स्वीकारावे लागते.
बाई असण्याचे फायदे असे आहेत की, कमावण्याचं, कर्ते असण्याचं दडपण नसतं. अपेक्षांचं दडपण कमी असतं. यादी वाढवता येईल पण ही सगळी कारणे आपल्या आजच्या समाजव्यवस्थेमुळे आहेत.

स्मिताने लिहीलं आहे तसं प्रत्येकात काही खास स्त्रीचे मानले गेलेले गुण असतात तर काही खास पुरूषाचे मानले गेलेले गुण असतात. (मानले गेलेले यासाठी की तसं च घडवलं जातं.) पण समाजात स्त्रीचे तथाकथित पुरूषी गुण आणि पुरूषाचे तथाकथित स्त्रीत्व प्रगट करणारे गुण जाहीरपणे स्वीकारले जात नाहीत.

मी तेच तर म्हणते आहे, मला माझ्या गुणावगुणांसह मोकळेपणाने एक माणूस म्हणून जगायचं आहे.

मी एक बाई आहे, मी वेगळी आहे पुरूषांपेक्षा, माझं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी म्हणून मला पुरूष व्हायचं नाहीये.

तथाकथित पुरूषांचं मानलं गेलेलं क्षेत्र निवडायचं, तिथे त्यांच्या नियमांनी खेळून आपला ठसा उमटवून स्वत:ला सिद्ध करायचं. हा मार्ग जुना झाला. जिथे तिथे ’प्रमाण’ पुरूष आहे. हे जगच बदलायला हवं. जरा आमच्या डोळ्यांनी बघायला जगाने शिकायला हवं.

अश्विनीने लिहिलंय तसं ’नको हे बाईपण’ असं वाटणारे प्रसंग माझ्यावरही आले नाहीत. नको ते पुरूष असं म्हणायला लागावं असे पुरूषही माझ्या वाट्याला आले नाहीत.

खरं म्हणजे माझ्या जवळच्या वर्तूळातले पुरूष फारच चांगले आहेत. माझ्याशी तरी चांगलेच वागलेले आहेत. बाबा माझ्याशी समानतेने वागले. मिलिन्दच्या डोक्यात समानतेचा तराजू पक्का आहे. तो माझ्याशीच समानतेने वागतो असे नाही तर त्याच्या बहीणींशी, इतर नात्यातल्या, ऑफीसमधल्या स्त्रीयांशी पण समानतेने वागतो, हे मला महत्त्वाचे वाटते.( माझ्याही समोर कोणी अन्यायी पुरूष नाही, ज्याला मी जबाबदार धरू.) माझा राग व्यवस्थेवरच आहे.

बाईपण श्रेष्ठ की पुरूषपण? हे ठरवता येणं अवघड आहे. पण निकाल देणं अनिवार्य असेल तर मी तो बाईच्या बाजूने लावेल.

मिलिन्दला हाच प्रश्न विचारला तर तो म्हणाला निर्विवादपणे स्त्री. कारण विचारल्यावर म्हणाला,” बायकांची स्वत:ला विसरून दुसर्‍याच्या भुमिकेतून विचार करण्याची क्षमता आणि निरनिराळ्या रूपांमधे वेगवेगळ्या नावांनी (वात्सल्य, ....) अमर्याद प्रेम करण्याची शक्ती.

Tuesday, May 11, 2010

-o-o-o-

मी भाग्यवान आहे.. मी मुलगी म्हणून जन्मले. मी जशी आहे तशी मला आवडते. माझ्या गुणदोषांसकट आवडते. मला माझी बलस्थाने माहिती आहेत आणि उणीवाही ठाऊक आहेत. काही उणीवा मी प्रयत्नपूर्वक दूर करू पाहाते तर काही तशाच सांभाळते. मला तडजोडी कराव्या लागतात. कधी दोन पावलं मागं यावं लागतं. कधी काही संधीही गमावाव्या लागतात. याचा त्रास तर होतोच. खंतही वाटते.
तडजोडी, संधी गमावणं, माझ्यातल्या उणीवा, यांचं कारण प्रत्येक वेळी माझं बाईपण हेच असतं? नक्कीच नाही.
माझ्या भोवतालची परिस्थिती, व्यवस्था कारण असतं त्यामागे? मग का मी त्या व्यवस्था मानते? का नाही झुगारुन देत? पुन्हा बाईपण आडवं येतं?
जेव्हा हीच व्यवस्था, परिस्थिती (कधीकधी) पुरुषांनाही तडजोडी करायला लावते, तेव्हा त्यांच्यातला प्रत्येक पुरुष तरी कुठे व्यवस्थेला आव्हान देतो?
मग परिस्थिती बदलता न येणं ही बाईपणाची उणीव? की माझी व्यक्तीगत उणीव? की जी व्यवस्था बाईपणाला दुय्यम स्थान देते त्या व्यवस्थेची उणीव?
’नको हे बाईपण’, ’जळ्ळा मेला बायकांचा जन्म’ असं वाटायला लावणारे प्रसंग माझ्यावर कधी आले नाहीत हे खरंच, पण समजा तसे आले, तरी मी बाईपणाला दोष नाही देणार. मी ज्या समाजात रहाते, तिथे असणारं बाईचं दुय्यम स्थान, तिला कराव्या लागणार्‍या असंख्य तडजोडी, तिचे भोग हे त्या व्यवस्थेतील दोषांमुळे आहेत. ’नको हे बाईपण’ असं म्हणताना मी नकळत पुरुषी श्रेष्ठत्वच मान्य करते. बाई म्हणुन असणार्‍या माझ्या क्षमतांना कमी लेखत असते.
अरुणा ढेरेंची एक कविता आहे -
काळोखाचेप्रचंड ओझे
उचलून...वर्षानुवर्ष...
चालत रहातात बायका
आयुष्याचे डोंगर
चढतात...उतरतात...
उतत नाहीत की मातत नाहीत
निर्मळ हातांनी
अवजड ओझे सावरत जातात.
या कवितेतल्या बायका मी माझ्या आसपास, कुटुंबात खूप बघितल्या. त्या काही फ़ार शिकलेल्या नव्हत्या. धो धो पैसा कमावत नव्हत्या. पण त्यांनी त्यांचं घर आपल्या खांद्यांवर उभं केलं होतं. एकटीच्या बळावर उभं केलं होतं. त्यांचे पुरुष हरलेले होते. कोणी व्यसनात बुडालेले होते, कोणी जुन्या वैभवाच्या भ्रामक जगात वावरत होते- वर्तमानात जगायलाच तयार नव्हते. या बायका मात्र लवचिकपणे सगळे आघात पचवत पुन्हा पुन्हा उभ्या रहात होत्या. स्वतःबरोबर संसार सावरत होत्या. मुलांना घडवत होत्या. काय होतं त्यांच्याकडे? त्या काळोखाचे ओझे त्या उचलू शकल्या ते त्यांच्या अंतरीच्या उजेडाच्या जोरावर. त्यांच्या बाईपणाच्या जोरावर. भोवतालचा काळोख उजळून टाकण्याचीही शक्ती त्या उजेडात होती. पण व्यवस्थेच्या पोलादी भिंतींनी तो उजेड झाकोळून टाकला होता. भिंतिंआडचा उजेड मात्र त्यांना बळ देत राहिला. बाईपणाबरोबर येणारी शरीर-मनाची लवचिकता, सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची वृती, आहे त्या परिस्थितीशी कधी जुळवुन घेत, कधी दोन हात करत पाय़ घट्ट रोवुन उभं रहाणं ही त्यांची शक्तीस्थानं होती. ती त्यांना त्यांच्या बाईपणानं दिलेली होती.
बाईपण जसं या शक्ती देतं तसंच एक वेगळं, तरल, संवेदनशील, भावगर्भ अनुभवविश्वही मला देतं. माझ्या शरीरात निसर्गानं काही वेगळ्या योजना, रचना केल्या आहेत. मी माझ्यात एक नवीन जीव सामावून घेऊ शकते. त्याला पोसू शकते, वाढवू शकते. बाहेरच्या जगात आणू शकते. याच नैसर्गिक क्षमता मला आणखीही काही देतात. मी माझ्याबरोबरच्यांचा स्वतःपलिकडे जाऊन विचार करु शकते. त्यांना जास्त चांगलं समजुन घेऊ शकते.
बाईपणाचा मला अभिमान असला तरीही श्रेष्ठत्वाचा वाद मात्र मला निरर्थक वाटतो. निसर्गानं तर श्रेष्ठ-कनिष्ठ अशी विभागणी स्त्री-पुरुषात केलेलीच नाहीये. तिथे क्षमतांचं परस्परपूरकत्व मात्र आहे. मी बाई म्हणुन पुरुषापेक्षा श्रेष्ठही नाही आणि हीन तर मुळीच नाही. पण बाईपणाला झाकोळून टाकणार्‍या त्या पोलादी भिंतींचं काय करायचं? अजून किती काळ आणि किती शक्ती जाणार त्यांना उखडून काढण्यात? पण त्या उखडुन काढता येत नाहीत, तोवर काळोखाची ओझी वाहाणं अटळच.

Sunday, May 2, 2010

मनोगत

स्त्री किंवा पुरूष असणे हे आपल्या मर्जीवर अवलंबून नाही. पण निवडीचे स्वातंत्र्य असते तरी मला स्त्रीच व्हायला आवडले असते. हा विषय विद्याने सुचवला तेव्हा पहिला विचार हाच आला.

नंतर जेव्हा खोलवर विचार सुरु केला तेव्हा जाणवले की स्त्री आणि पुरूष यांच्यात शारिरीक भेद असले तरी मानसिकदृष्ट्या पाहिले तर प्रत्येकात थोडी स्त्रीची व थोडी पुरूषाची मानसिकता असतेच. विविध प्रसंगानुरूप ज्याची त्याची जी गरज असेल त्यानुसार हे प्रमाण कमी जास्त होत असते.

काही गोष्टी स्त्रियांनाच जमतात किंवा त्या त्यांनीच करायच्या आणि काही गोष्टींत पुरुषांची मक्तेदारी आहे म्हणून तेथे स्त्रियांनी वळायचेच नाही असे असू नये. आणि त्यासाठी स्त्री असो वा पुरूष, कुठेतरी ह्या गोष्टींचा स्वीकार करायची मनाची तयारी किंवा मोकळेपणा असावा.

उदाहरण द्यायचं झालं तर दुःखाच्या क्षणी रडणे ही गोष्ट स्त्रियांकडून अपेक्षित असते पण कधीकधी आपल्या दुःखाला वाट करून देण्यासाठी काही अश्रू पुरुषांच्या डोळ्यांतून ओघळले तर त्यात काय काही चुकीचे नाही. तसेच आयुष्यात एखाद्या कसोटीच्या क्षणी पुरुषाने कणखर रहायचे आणि स्त्रीने कोसळून जायचे असेच असायला हवे असे नाही. उलट स्त्रीने कणखरपणे उभे राहून पुरुषाला आधार दिला तरीही चालण्यासारखे आहे.

एकूणच मला असं वाटतं की मी स्त्री असले तरी ते स्त्रीपण मी कसं स्वीकारते आहे हे अधिक महत्वाचे आहे. स्त्री असण्याचे फायदे तोटे स्वीकारूनही सर्वांगाने संपूर्ण असे जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मी पुरुष असते (की असतो?) तरी मला वाटतं की मी हाच विचार केला असता.

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...