Monday, December 31, 2012

बायांनो, सांभाळा


दिल्लीत एका युवतीवर बसमधे सामुहिक बलात्कार झाला आणि नंतर तिला वाचवण्याचे सगळे प्रयत्न अपयशी ठरले.......
ज्या बातम्या आपण वाचतोय...... हे भयंकर आहे.

अन्यायाविरूद्धची/ क्रूर राक्षसी वृत्तीबद्दलची चीड असली तरी या क्षणी असहायताच दाटून आली आहे.
काहीच सुचेनासं झालं आहे.

आपल्या देशात कुठल्याही तेवीस वर्षाच्या मुलीचं भविष्य कदाचित असं असू शकतं?
किती लाजीरवाणी गोष्ट आहे.
कुठल्याही स्त्रीच्या आयुष्यात एक दिवस असाही उगवू शकतो?
तुमच्या, माझ्या, कुणाच्याही!
काय करायचं बायकांनी?
कसं सुरक्षित ठेवायचं स्वत:ला?
या घटनेमुळे घरोघरच्या किती मुली आणि त्यांचे आईबाप घाबरले असतील!
त्यांच्यावरची बंधने वाढतील.
अंधार पडला की बाहेर नको जायला. असं होईल.

बायकांना बलात्काराच्या भीतीतच आयुष्य काढायला लागतं.

बलात्कारी पुरूषांबद्दल मला आत्ता इथे काहीच बोलायचे नाही.
त्यांना कायद्याने काय व्हायची ती शिक्षा होईल.

जी मुलगी याला बळी पडली, तिचं काय?
............................................................................................


**********

सार्‍या जगभराच्या इतिहासात पुरूषांनी स्त्रियांवर राज्य केलं आहे, करताहेत. जगभर मातृकुळे होती आणि नंतर पितृकुळे/ पुरूषसत्ताक पद्धत आली. हा असा बदल का झाला असावा? यावरचे वेगवेगळे अभ्यास आहेत.

 मला कायम असं वाटतं की पुरूष हे करू शकले याचं कारण त्यांच्याकडे असलेली बलात्कार करण्याची क्षमता.
जे बाई करू शकत नाही आणि पुरूष करू शकतात असं काय आहे? तर बलात्कार.
बलात्कार करून एखाद्या बाईचं आयुष्य ते उद्ध्वस्त करू शकतात.
बलात्कार हा बाईचा आत्मसन्मान धुळीला मिळवणारा असावा म्हणून मग योनिशुचितेच्या कल्पना आणि पतिव्रताधर्म!
बलात्कार हा अपघात म्हणून सोडून देता येऊ नये यासाठी लहानपणापासून मुलीला तिने स्वत:ला कसं सांभाळलं पाहिजे, पावित्र्य कसं जपलं पाहिजे हे सांगितलं जातं, जन्मल्यापासून हे ऎकत वाढणारी मुलगी, पावित्र्यभंग झाला की मोडून पडणारच ना?

*******

 बलात्कार करण्याची क्षमता घेऊन सगळे पुरूष हिंडताहेत खुशाल!
मोकळेच!
कुठल्याही स्त्रीवर बलात्कार होऊ शकतो
कधीही, कुठेही
बायांनो, सांभाळा
तुमचं शीलच नाही तर तुमचा जीवही धोक्यात आहे.
तुमचा गुन्हा इतकाच आहे की तुम्ही बाईचं शरीर घेऊन जन्माला आला आहात
कुठलीही वेळ अवेळ असू शकते
कुठलीही जागा चुकीची असू शकते

बलात्कार करण्याची क्षमता घेऊन सगळे पुरूष हिंडताहेत खुशाल!
मोकळेच!
जमलं तर सांभाळा, नाहीतर मरून जा.
******

Friday, December 14, 2012

इंद्रधनु १०० - काही प्रश्न /मते


या लेखाच्या शीर्षकात इंद्रधनु - १०० असं असलं तरी मी या लेखात लिहिणार आहे ते फक्त माझ्या लेखांबद्दल ........
लेख वाचून माझ्या पर्यंत आलेले काही प्रश्न  /मते ...

 स्त्री-मुक्तीच्या विचारांमुळे काहीशी एकारली विचारपद्धती तू सर्वत्र अवलंबत तर नाहीस ना ? ( असं काही वेळा वाटून गेलं.)
(या एका विचारपद्धतीखेरीज अनेक पद्धतीने माणसाचा विचार होऊ शकतो,)
स्त्री-मुक्तीच्या विचारपद्धतीखेरीज  अनेक पद्धतीने माणसाचा विचार होऊ शकतो, हे मला मान्यच आहे.
त्या त्या विचारपद्धती बाईला आत्मसन्मानाने जगण्याची मुभा देतात की नाही, त्या मला मान्य आहेत की नाही, हा वेगळा मुद्दा आहे.
(मुळात त्या सगळ्या विचारपद्धतींचा माझा अभ्यास आहे, असं नाही. )
बाईला आत्मसन्मानाने जगायला मिळणं ही माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
खरं सांगायचं तर स्त्रीमुक्तीचाही मी खोलवर अभ्यास केलेला आहे, असं नाही. स्त्री-पुरूष समानतेची एक दृष्टी मिळाली की आजूबाजूच्या घटनांमधलं जे राजकारण दिसतं ते पुढं आणायचा प्रयत्न केला आहे.
मागच्या लेखात लिहिलं आहे तसं, समजा इथे पावसावर लिहिताना "अंगाला चिकटलेले कपडे आणि ते पाहणारांच्या नजरा... यांच्यासह मला भिजायला लागतं." या अनुभवावर मी लिहिलं म्हणून पावसाकडे मी त्याच पद्धतीने पाहते असं नाही, त्यापलीकडेही मी तो अनुभवते आणि तो माझ्या जगण्याचा अविभाज्य भाग आहेच. फक्त तो संपूर्णपणे इंद्रधनुवर प्रतिबिंबीत होणार नाही.

 स्त्रीवादावर आधारित आजूबाजूच्या भवतालाकडे पाहाणारी मांडणी हाच इंद्रधनु ब्लॉगचा स्कोप आहे.........
खरं तसं नाही. वेगळ्या विचारपद्धतीने त्या घटनेकडे पाहणारे लेख कुणी लिहिले आणि चर्चा पुढे गेली तर चालणार आहे. पण मी तसे लिहिलेले नाहीत. आणि स्त्रीवादी पद्धतीने स्त्रियांना अधिक चांगलं जाणून घेता येतं असं माझं मत आहे. स्त्रीवादी पद्धतीने दिसणारं जग सगळ्यांनीच एकदा पाहिलं पाहिजे, ते डोळे उघडणारं असेल. मग त्यातल्या त्रुटींवर, मतभेदांवर बोलूया.

 इंद्रधनु वरील बरेचसे विषय महत्त्वाचे नाहीत,
विषय महत्त्वाचा आहे की नाही कसं ठरवणार? जे विषय महत्त्वाचे वाटले/ मला/ माझ्या दृष्टीने त्यावर मी लिहिलं आहे. मी फक्त वाचणारांसाठी म्हणून लिहित नाही, मला स्वत:लाही शोधत असते. विषय मला भिडणं, आतून लिहावसं वाटणं, हे ही महत्त्वाचं असतं. मी जे काय लिहिते ते माझ्या अनुभवविश्वातलं आहे किंवा ते मी माझ्या अनुभवविश्वात आणते आहे. माझ्या अनुभवांच्या मर्यादा या माझ्या काही लेखांच्याही मर्यादा असणार आहेत. कुणी सुचवलं म्हणून एखाद्या विषयावर अभ्यास करून लिहायला हरकत नाही. कुणी सुचवलं तर बघू.
 मी निवडलेल्या विषयामुळे वाचकाचा रसभंग होत असेल, तर मी म्हणेन.. तरीही वाचा, हे आमचं आयुष्य आहे. :)

यापेक्षा महत्त्वाचे विषय घ्यायला हवे होते.
काही महत्त्वाचे विषय अजून आले नसतील तर पुढे येतील.
समजा बलात्कार, या अनुभवावर मी नाही लिहू शकणार पण बलात्कारच्या भीतीनं जगणं कसं आकसून घ्यायला लागतं, यावर लिहू शकते. कधीतरी लिहीन.
 वेश्या, लैंगिकतेचं राजकारण, पतिव्रताधर्म, बाललैंगिक अत्याचार, यावर अजून लिहिलेलं नाही. जरा बिचकत होते. कधीतरी लिहीन.

बरेचसे लेख गाभ्यापर्यंत पोचत नाहीत. ...
 यापुढे प्रयत्न करीन.
 लेखाचा जीवच थोडका आहे.
जे विषय निवडले आहेत त्यावरचाही खोलवर अभ्यास या लेखांमधून पोचणार नाही आहे.
मी नम्रपणॆ आणि मनापासून हे सांगू इच्छिते की या लेखांमधून समग्र असं काही नाही पोचणार, लक्ष वेधणं हे होऊ शकतं, पुढचा अभ्यास स्वत:च करायला हवा.
 मी जे लेख लिहिते त्याला माझी कुवत, माझा अभ्यास, माझे अनुभव, माझी संवेदनशीलता, यांच्या मर्यादा आहेत.
आणि असे अभ्यास इंद्रधनु बाहेर बरेच आहेत, तिकडे वळावं असं कुणाला वाटलं/ इंद्रधनु अपुरं आहे असं वाटलं, तर ते मी इंद्रधनु चं यशच आहे असं समजॆन.

  इंद्रधनु वर सगळ्यात महत्त्वाचं आहे ’आमचं व्यक्त होणं "
ही बाईला मनातलं बोलण्याची जागा आहे, त्याला विषयाच्या, कशा पद्धतीने व्यक्त होते आहे..... याच्या मर्यादा नसाव्यात.

या लेखांमधलं कुठलंही लिखाण पुरूषविरोधी नाही. यालाही माझे अनुभव कारणीभूत असतील. माझ्या आयुष्यातील जवळचे पुरूष खरोखरच खूप चांगले आहेत. किंबहुना सध्याच्या समाजव्यवस्थेने पुरूषांवरही कशी बंधनं लादली आहेत, त्यांनाही कसा चाकोरीचा काच आहे, याची मला जाणीव आहे. मी ते माझ्या लिखाणातून मांडायचा प्रयत्न करते.

 अजून एक... कुठलंही लेखन/व्यक्त होणं हे पूर्णत: व्यक्तिनिरपेक्ष नसतं. माझं लेखन हे माझं वय, माझं घडणं, माझी जात, माझा वर्ग, माझा वर्ण, मी ज्या समाजाचा हिस्सा आहे तो आजूबाजूचा समाज, त्यातलं माझं स्थान , तिथून मला दिसणारं जग, याला तोडून नसणार आहे.
 माझ्या बिंदूवरून शक्यतो सगळीकडे पाहायचा प्रयत्न करीत मी लिहिते आहे.

ज्यांनी ज्यांनी माझे लेख वाचले आणि त्यावरची आपली मतं माझ्या पर्यंत पोचवली त्यांची मी मनापासून आभारी आहे.

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...