Saturday, March 7, 2026

.

 .

Epstein files मधून जे जे काही बाहेर येतं आहे ते भयंकर आहे.

Jeffrey Epstein हा माणूस आहे का सैतान?

त्याने इतक्या बालिकांचं लैंगिक शोषण केलं आहे.

 त्यासाठी रितसर एक व्यवस्था उभी केली. 

 शाळकरी मुली निवडायच्या, त्यांच्या वर अत्याचार करायचा, पैसे द्यायचे आणि एकीला सांगायचं तुझ्या अजून दोन मैत्रिणींना घेऊन ये. त्या दोघी आणखी चार जणींना आणणार.

 हे वर्षानुवर्षे चाललं होतं, यात मुख्य सहभाग होता Ghislaine Maxwell या त्याच्या girlfriend चा.

 ती शाळांबाहेर फिरायची आणि सावज हेरायची.

  असं एक जाळं त्यांनी तयार केलं होतं.

 मग या मुली मोठमोठ्या सेलेब्रिटींना पुरवायच्या. 

 हे नामवंत, विचारवंत, अधिकारी, राजकीय नेते, हे यात सहभागी.


 आपल्याला काहीच कळेनासं होतं.

 यात बिल गेट्स चं नाव आहे, इंग्लंडचा राजा चार्ल्स चा धाकटा भाऊ ॲंड्र्यू आहे, बिल क्लिंटन आहे, विचारवंत चॉम्स्की आहे , डोनाल्ड ट्रम्प आहे.

   

   जेफ्री एपस्टिन हा मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आला, त्याच्याकडे पदवी नव्हती, खोटी प्रमाणपत्रे देऊन त्याने एका शाळेत नोकरी मिळवली. त्यानंतर तो शेअर मार्केटमध्ये गेला, एका कंपनीच्या खोट्या योजनेत सहभागी झाला. मग बिलिनेअरांचे अर्थकारण सांभाळू लागला, स्वतःची कंपनी सुरू केली आणि अक्षरशः एक साम्राज्य उभं केलं.

  न्यूयॉर्क मधे महाल, फ्लोरीडा मधे प्रचंड मोठं घर, पॅरिस मधे मोठं घर, न्यू मेक्सिको मधे ranch, एवढचं नाही तर एक स्वतःचं स्वतंत्र बेट, स्वतः ची खाजगी विमाने, हेलिकॉप्टरे...

  हे काय आहे?


Ghislaine Maxwell ही Robert Maxwell ची मुलगी. Robert Maxwell हे इंग्लंडमधील बडं प्रस्थ! प्रसिद्ध माध्यम सम्राट! ज्याचे राजघराण्याशी संबंध होते.

  वडिलांच्या मृत्यूनंतर, त्यांचे गैरव्यवहार आणि कर्जबाजारीपणा बाहेर आल्यावर, घिलेन न्यूयॉर्कला आली. ती एपस्टिनच्या संपर्कात आली. ती मोठमोठ्या वर्तुळात वावरलेली होती, त्यातला सहजपणा तिच्यात होता, त्याचा एपस्टिनला फायदा झाला. मोठमोठी लोकं त्याच्या वर्तुळात आली किंवा तो त्या वर्तुळात शिरला. 

 गिलेन ला एपस्टिनची संपत्ती, पैशांचं पाठबळ हवं होतं ते मिळालं.

  तिचे वडील आणि एपस्टिन यांच्यात खूप साम्य होतं. खोटेपणा, अफरातफरी, बायकांचा वापर करणं.

  गिलेन ला एपस्टिनच्या कुकर्मांचं काही वाटलं नाही, तिला आधीपासून घरात सवय असेल.

  आपण चक्रावून जातो, ज्याच्यावर तिचं प्रेम आहे त्या माणसाला ती मुली पुरवत होती!

  

  सत्ता आणि पैसा, यांसाठी ती काहीही करायला तयार होती.


  एपस्टिन आणि घिलेन दोघेही psychopath होते, narcissist होते.

  अशांना समोरच्या माणसाला काय वाटत असेल, हे कळूच शकत नाही, empathy नाही, नसतेच.


  इथे पुरूष बायकांचं शोषण करतो आहे असंच नाही. बाईच बायकांचं शोषण करते आहे.

 

   मला असं वाटतं एका मर्यादेपलिकडे सत्ता मिळाल्यानंतर बाई किंवा पुरुष हा भेद न राहता, दोघेही अत्याचारी झाले तर त्याचा बाई किंवा पुरुष असण्याशी संबंध उरत नाही.


   एपस्टिन आणि घिलेन अक्षरशः या मुलींच्या मनाशी खेळायचे. 

 एक मुलगी म्हणते, " मला माहित होतं की जितका जास्त मला त्रास होईल तितका त्याला आनंद होईल, मजा वाटेल.

   एपस्टिनचं स्वतःचं बेट होतं, इथे तर मुली पूर्णच अडकलेल्या आणि परावलंबी. एक मुलगी समुद्रातून पोहत निसटून जायचा प्रयत्न करते पण सगळीकडे कॅमेरे लावलेले, बरोबर तिला पकडून परत बेटावर आणलं जातं.

   तिथे बेटावर तर कुठलाच कायदा नाही. काय काय चालायचं, असं बोललं जातं, त्यात cannibalism आहे. मुलींना प्रेग्नंट करून त्यांची अपत्ये दिली जायची नाहीत.


एपस्टिन हे इतकं भयंकर, राक्षसी प्रकरण आहे सगळं, ना त्यावरची documentry, बघवते ना काही वाचायची इच्छा होते.


   मुलींना मसाज करायचा म्हणून मसाज रूममधे न्यायचं, जे काही घडायचं ते त्यांच्या अंगावर यायचं.

शाळकरी मुली, ना कुठे बोलू शकायच्या, ना सांगू शकायच्या.


 आपल्या पोटात कसंतरी होतं.


 एवढंच नाही त्या आपल्या मैत्रिणींना घेऊन यायच्या. प्रत्येकीला पैसे मिळायचे.

   शाळकरी मुली जे चाललंय त्याला विरोध करू शकत नाहीत, नाही म्हणू शकत नाहीत, त्यांचा मेंदू तसा तयार झालेला नसतो.

  शिवाय, घिलेन अशा मुली निवडायची ज्या पिडीत आहेत, ज्यांच्या घरी अस्थैर्य आहे, आई वडिलांचं पटत नाही, ड्रग्स घेतात किंवा घरातून पळाल्या आहेत, किंवा बलात्कार झालेला आहे. त्या आधीच मोडलेल्या असतात.


  या मुली वर्षानुवर्षे हा अत्याचार विसरू शकल्या नाहीत, कोणी व्यसनं करायला लागल्या, त्यांचा आत्मविश्वास गेला, त्यांच्यातलं अपराधीपण गेलं नाही, ते घेऊन जगणं अवघड होऊन बसलं. एपस्टिनने त्यांच्यावर अत्याचार तर केलेच पण पुढचं त्यांचं आयुष्य नरक करून ठेवलं.


हे करण्याचा त्याला काय अधिकार होता?

 अशी माणसं स्वतःला कायद्याच्या वर समजतात, ते म्हणतील तो न्याय, त्यांच्या साठी ज्यांची आयुष्य खराब झाली, ती माणसं, त्या मुली केवळ कचरा. माणसं काय ती हीच. त्यांच्याखाली सगळे गुलाम. 

 एपस्टिनला स्वतः ची, उच्च प्रतीची, माणसं तयार करायची होती, त्याच्यापासून मुलं तयार करायची होती, त्यादृष्टीने संशोधन करायला तो प्रोत्साहन देत होता.


    एपस्टिन खूप मोठ्या प्रमाणात देणग्या द्यायचा आणि मोठमोठी शैक्षणिक क्षेत्रातील धेंडं आपल्या बाजूला वळवून घ्यायचा, 

 किती उदार! किती दयाळू!

तो राजकीय कारणांसाठी देणग्या द्यायचा. 

  संशोधन करणाऱ्या संस्थांना देणग्या द्यायचा.

मुळात त्याला वेगळंच संशोधन करायचं आणि घडवून आणायचं असायचं.


    शाळकरी मुली होत्या त्या बळी पडल्या.

  ही मोठमोठी धेंडं कशी त्याच्या जाळ्यात अडकली?


 असं म्हणतात की घिलेन अशा व्यक्तींना एपस्टिन वर्तुळात आणायची.

 प्रिन्स ॲंड्र्यू तिचा मित्र होता. बिल क्लिंटन ला ती ओळखत होती. 


   बेटावर गेलेल्यांच्या यादीत खूप मोठमोठी नावं आहेत. स्टिफन हॉकिंग आहे.

  चॉम्स्की त्याला सल्ला देतो आहे. 


एपस्टिन फाईल्स मधे नाव आहे, म्हणजे ती व्यक्ती दोषी आहेच असं नाही. एपस्टिन हे बड्या वर्तुळातलं मोठं प्रस्थ होतं, काहींना त्याच्या काळ्या बाजूची कल्पना नसेलही.

  असलेल्यांमधेही मोठी नावं आहेत.


   ही माणसंही अनैतिक कृत्य करत होती. एपस्टिनने मुली पुरवल्या, यांनी वापरल्या. 

   आपल्याला आदर्श वाटणारी माणसं ही अशी सडलेली निघावीत? 

   असं का व्हावं?

उंचीवर पोचल्यावर माणसांना मी करीन ते न्याय! मी कायद्याच्या वर आहे, असं वाटायला लागतं की काय?

  

    की प्रत्येक माणसातच हा असा घाणेरडा माणूस लपलेला असतो, तो सुपीक... (सत्ता आणि पैसा, बुद्धिमत्ता...मुबलक...अशा)  वातावरणात फोफावत जातो, याला वेसण घालण्याचं बळ या नामवंतांमधे नव्हतं!!

  यांच्या हाती जगाचा कारभार देऊन कसं चालेल?

    मग कुणाहाती द्यायचा?


  मुली सांगतात की एपस्टिन काय, घिलेन काय, त्यांच्याशी अतिशय मृदूपणे वागत, त्यांना भेटी देत, जणू त्यांची जवळची मित्र - मैत्रीण असावे. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचं आश्वासन देत... मग त्यांच्याशी गैरवर्तन केले जाई.

 आणि असं भासवलं जाई की हे लैंगिक गैरवर्तन जणू नॉर्मल, सामान्य गोष्ट आहे. 

  हे फोडण्याचे कृत्य कुणी करायला गेलं तर धमक्या मिळत.


हे जे काय चालू होतं... वर्षानुवर्षे चालू होतं... याची आपण कल्पना करू शकत नाही.


 हे इतकी वर्षे उघडकीला का आलं नाही? 

   नक्कीच केवळ घिलेन आणि एपस्टिन दोघेच हे असं नेटवर्क विणू शकत नाहीत. अजून कितीतरी माणसं यासाठी काम करत होती. या मुली काही व्यावसायिक शरीरविक्रेत्या नव्हत्या. त्या अठरा वर्षांखालील मुली होत्या. हे काय त्यांना दिसलं नसेल. 

  एपस्टिन कडे पैसा होता, सत्ता होती, तो बड्या वर्तुळातला होता, मोठमोठ्यांशी त्याची मैत्री होती, म्हणून ते दबले? पैशाची गरज म्हणून त्याची नोकरी करत राहिले?


 की अशा अतिश्रीमंतांचं हेच कल्चर आहे?


अनिल अवचटांच्या पुस्तकात निप्पाणीच्या विडी कामगार महिलांवरच्या अत्याचारांबद्दल लिहीलंय ते आठवलं. 

 छोटी-मोठी सत्ता आणि पैसा हातात असला की ती गाजवली जाते पहिल्यांदा बाईवर.


अशी उदाहरणे जगभर असणार.


पण एपस्टिनचं जाळं आणि त्याचा आवाका, त्याचे पोचलेले हात, भयावह आहे.


मती कुंठित होते.

आपण काहीच करू शकत नाही, ही हतबलता भयानक आहे, एक निराशा पसरते आहे. निर्बलता... दुबळेपणा... सगळ्याची किळस येते. उलटी येईलसं होतं. हे काहीही पचवणं शक्य नाही.

 बधीर झाल्यासारखं 

हे आपलं जग नाही.

हे कळलंच नसतं तर बरं झालं असतं.


ज्या मुली समोर आल्या, एपस्टिन आणि घिलेन, विरूद्ध बोलल्या, आपली ओळख उघड केली, त्यांच्या हिमतीचं खूप कौतुक आहे. व्हर्जिनिया रॉबर्ट्स ने प्रिन्स ॲंड्र्यू विरूद्ध गुन्हा दाखल केला आणि त्याच्यावर कारवाई केली गेली. ज्युली ब्राऊन या पत्रकार महिलेने या एपस्टिन प्रकरणाचं खोदकाम केलं, लावून धरलं. या संकटातून वाचलेल्या मुलींच्या वकीलांनी धैर्याने मुलींची बाजू लावून धरली.

 आशेचे किरण आहेत.


बेलाट्रिक्सवर हॅरी 'पिडीतो' हा शाप टाकतो तेव्हा तिला काहीच होत नाही.

 ती म्हणते," हॅरी हा शाप लागायचा असेल तर मनातून दुसऱ्या व्यक्तीची तडफड पाहण्याची इच्छा पाहिजे, ती होत असताना आनंद घेता आला पाहिजे तरच तो शाप लागेल."


आपण हॅरी सारखेच असहाय्य आहोत असं वाटायला लागलं आहे. अशा माणसांना 'Crucio - पिडितो' शाप देण्याची खूप इच्छा आहे,पण तो लागायचा नाही. 


  तीच हॅरीची ताकदही होती.

या सगळ्या अंधाऱ्या काळातून, (एकीकडे युद्ध सुरू आहे) , पुढे प्रकाशाकडे जाऊया, मैत्री - प्रेम - विश्वास - हीच आपली ताकद आहे.


    महिलादिनाच्या शुभेच्छा! 🌹🌹

Wednesday, April 16, 2025

सुनीता

 सुनीता माझ्याकडे केरफरशीला येते.आज इतकी वर्ष आमच्याकडे कामाला येते ,घरातली एक असल्यासारखी.तिचं काम अतिशय चकचकीत, स्वच्छ. फरशी पुसताना फरशीवरून प्रेमाने हात फीरवणारी.जशी कामाला लागली तशी अशीच .कधीही कामचुकारपणा नाही, उरका मारणं नाही. मनापासून काम करणारी.अतिशय प्रामाणिक.मला जरा बरं वाटत नसेल तर नुसत्या माझ्या चेहऱ्याकडे बघून हिला कळतं.वहिनी तुम्ही पडा मी काय करून देऊ?संध्याकाळच्या पोळ्या भाकरी देऊ का करून?तुमचे पाय चेपून देऊ का?बाहेरून काही आणून हवं असेल तर मला फोन करा मी कामाला येताना आणून देईन तुम्हाला. एक न हजार कामांची मदत करायला तयार.

सध्या तिला मेनोपॉजचा फारच त्रास होतोय.चिडचिड, थकवा,कामातला उत्साह कमी झालाय.आमच्या गप्पा सध्या याच.भरपूर प्रश्न विचारत असते.वहिनी दोन वर्षांपूर्वी मी इतकी काम करायची,कामांचा सपाटा नुसता,कधी बसलेली मला मी आठवत नाही. आणि आता काहीही करावंसं वाटत नाही. जाऊ दे मरु देत सगळं असं वाटतं, वहिनी तुम्हाला पण असं सेम होतं का?मी हसून ,अगं हो गं मला ,तुला,सगळ्या बायकांना या वयात असंच होतं. पाळी जाणं सोपं नाही. जशी येताना शरीरात बदल होतात तसं पाळी जातानाही शरीरात होणाऱ्या बदलामुळे असे वेगवेगळे त्रास होतात.काही वर्ष होईल असं पण पुन्हा उत्साह येईल बघ.मी माझ्या मना बरोबर तिचीही समजूत काढत होते.

आता सुनीता मला आणि मी सुनीताला समजून घेण्याचा काळ सुरू झाला आहे.तिने मला म्हणावं आणि मी तिला म्हणावं,"बाई गं राहू दे ते काम"आधी स्वतःकडे लक्ष दे.कधी माठातलं घोटभर थंडगार पाणी ,फ्रीजमध्ये तयार करून ठेवलेलं गार ताक,कापलेल्या कलिंगडाच्या चार गार फोडी.... आता माझ्याकडे कामाला आल्यावर पंख्याखाली बसून सुनीताच्या आणि माझ्या घटकाभर मारलेल्या गप्पा हा नित्यनियमाचा कार्यक्रम झाला आहे.दोन्ही मुलींची लग्न झालीत ,त्यांच्या खुशालीच्या गप्पा,गावाकडे एकत्र कुटुंब,शेती,उन्हाळा पावसाळा,पिकं, नवऱ्याच्या तक्रारी,.....एक ना दोन .काय सांगू आणि किती सांगू असं होतं तिला अगदी.आली की सगळं मनातलं बोलून टाकते.वर म्हणते आपलं काम करून गेलं न वहिनी की फ्रेश वाटतं, पुढची कामं करायला उत्साह येतो.

सुनीतासारख्या असंख्य बायकांचं मला कायम कौतुक वाटतं.कोणत्याही परिस्थितीत न डगमगता, कष्ट करून,स्वतःच्या जीवावर, घरातल्या अनेक जबाबदाऱ्या उत्तम रीतीने पार पाडतात.ती म्हणते खरं आमचं काम करून तिला उत्साह येतो पण मी उलट म्हणते सुनीताकडे बघितलं तर मला कायम हुरूप वाटत आला आहे.

Saturday, March 8, 2025

वाचण्याचा सोहळा

 


हे चित्र मला फार आवडलं आहे.

ही तरुणी पाय पोटाशी घेऊन पुस्तक वाचत बसली आहे.

छान सजून, तयार होऊन बसली आहे.

आपण पुस्तक वाचायला असं सज - धजके बसतो का? नाही.

 जर कुणी पुस्तक वाचण्याचा सोहळा करण्या आधी आवरत असेल तर भारीच!!

  आपण असं तयार कधी बरं होतो? काही सण, समारंभ, कार्यक्रम असेल तर... नवीन कपडे.. सळसळते... नाजूकसा गजरा..अंबाड्याभोवती... हातात बांगड्या, छानशी अंगठी... ओढणी सुद्धा घेतलेली आहे...

 हिच्याही घरी तसंच काही असेल कदाचित , एखादा सण...

 कदाचित तिचं लग्न झालेलं आहे... कदाचित नाही.

 ती कुठल्या जाती, धर्माची आहे? कुठल्याही... महत्त्वाचं.. ती स्त्री आहे आणि ती वाचत बसली आहे.

  नुसती वाचते आहे असं नाही.. शेजारी वाफाळता कप आहे... वाचण्याचा सोहळा सुरू आहे.

 सणादिवशी सगळे जमले आहेत, नातेवाईक.. मित्र - मैत्रिणी... काहीतरी हसणं, खेळणं.. मजा चालू असेल... बाहेरच्या खोलीत, अंगणात...

  हिला मात्र ओढ लागलेली पुस्तकातल्या गोष्टींची.. कदाचित पुढे काय होईल? ची... आपली ही नायिका आहेच नादिष्ट.. मन मानेल तसं करणारी... त्या बाहेरच्या सगळ्यांना सोडून ती आतल्या खोलीत आली आहे... स्वतः च्या, स्वतः ला हव्याशा जागेत... घरातल्या आणि मनातल्याही!! येताना मस्त गरम चहा किंवा कॉफीचा  कप घेऊन आली आहे .

   किती सुंदर चित्र आहे हे!!!


तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना असं आपल्या या नायिकेसारखं, मनाला वाटेल तेव्हा... वाचनाचा सोहळा करता यावा,  याच महिला दिनाच्या शुभेच्छा!! 🌹🌹
- विद्या कुळकर्णी 

( हे बोहो पद्धतीचं चित्र आहे, प्रीती या चित्रकर्तीचं, हे मला नेटवर भेटलं.)

Friday, March 8, 2024

हिरो

 

माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले नाहीत. एकदा एका बाईंचे बरेच पैसे, काही वर्षांचे अडकून होते. तर आपल्या या मैत्रिणीने त्याचा पाठपुरावा करून ते पैसे त्या बाईंना मिळवून दिले. 

 बाई म्हणाल्या," तुम्ही माझं रखडलेलं काम केलंत, तुम्हाला किती देऊ?"

 तर आपली ही मैत्रिण, आपण तिला सुमन म्हणूया. 

सुमन म्हणाली," अहो, हे माझं काम आहे, ते मी केलं, त्याचा पगार मी घेते. मला काही नको."

बाईंनी दोन तीनदा विचारलं. सुमन ठाम होती.

 मग एके दिवशी त्या बाई सोन्याची अंगठी सुमनसाठी घेऊन आल्या, भेट म्हणून.

 सुमन म्हणाली," मला नको."

तिने अंगठी परत केली.

त्या बाई मागे लागल्या, सुमनवर काही परिणाम झाला नाही. 

एके दिवशी सुमन तिच्या जागेवर नाही हे पाहून त्यांनी सुमनच्या टेबलवर अंगठी ठेवली आणि निघून गेल्या.

 सुमन जागेवर आली, तिने अंगठी पाहिली, आता अशी महागाची वस्तू टेबलवर कशी सोडून द्यायची? सुमन अंगठी घेऊन घरी आली, तिला रात्रभर झोप आली नाही, अंगठी परत करायची कशी? हाच विचार.

  दुसऱ्या दिवशी त्याच ऑफिसमधे काम करणाऱ्या माझ्या मैत्रिणीकडे आली आणि तिला काय घडलं ते सांगितलं.

 मैत्रीणीने फोन करून त्या बाईंना बोलावलं, त्या मैत्रिणीच्या ओळखीच्या होत्या, त्यांचे एवढे पैसे सुटले तर, जिने काम करून दिलं तिला काहीतरी दिलंच पाहिजे, असं त्यांना वाटत होतं.

 मैत्रीणीने सुमनलाही बोलवून घेतलं. 

 सुमनजवळची अंगठी घेतली, त्या बाईंच्या हातात ठेवली," ती घ्यायला नाही म्हणते आहे, तुम्हाला कळत कसं नाही? या तुमच्या अंगठीमुळे ती रात्रभर झोपू शकली नाही, ही अंगठी घ्या आणि जा. पुन्हा कधीही सुमनला काही देण्याचा प्रयत्न करू नका."

त्या बाई अंगठी घेऊन निघून गेल्या.

  ही जी सुमन आहे..... ती हिरो आहे!!!

 मला तिचा अभिमान वाटतो! तिचा आणि माझ्या मैत्रिणीचाही!!

आजूबाजूच्या भ्रष्टाचारी जगात असं कुणीतरी ठाम उभं राहणं किती आश्वासक आहे!!

 रोज लोकलने प्रवास करणारी... गर्दीत मिसळून गेलेली सुमन... हिरो आहे!

****

आमच्याकडे अलका मावशी कामाला यायच्या. त्यांचं काम एकदम स्वच्छ. तांब्या, पितळेची सोडाच पण स्टीलची भांडी पण लखलखणार! फरशी अशी पुसून घेतील की पायाला स्वच्छता जाणवेल. हे त्या काही मी सांगते म्हणून, कुणी सांगतं म्हणून करायच्या नाहीत, त्यांना स्वतःलाच जाता येता/ वरवर/ कसंही काम केलेलं चालायचं नाही. अतिशय दर्जेदार काम आणि कामावर निष्ठा! 

  हे एक दिवस, दोन दिवस नाही..

 तब्बल बावीस वर्षे त्या आमच्याकडे यायच्या.

 त्या हिरो आहेत.

कामाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन किती प्रोत्साहक आहे!!

रस्त्यावरून भराभर चालताना त्या दिसल्या तर ओळखू यायच्या नाहीत, बस मिळाली पटकन चढतील..... त्या हिरो आहेत.

****

माझी एक मैत्रीण आहे.. नृत्य तिच्या आवडीचं! अप्रतिम नृत्यांगना आहे. काव्यवेडी आहे, कवितांवर उत्तम कार्यक्रम सादर करते. उत्तम रसिक आहे. नृत्य - संगीत - साहित्य यांचा आस्वादही घेते आणि सादरही करते. एवढंच नाही पर्यावरणाबाबत जागरूक, प्लॅस्टिक वापरणार नाही, पुनर्वापर करेल. वीजेचा, पाण्याचा काळजीपूर्वक वापर करेल, हे अगदी रोज हं!

   केमो करून आली, चार दिवसांचा थकवा गेला की पुन्हा शेजारणींना गोळा करेल, चला गं जरा व्यायाम करू, योगासनं करू, विचार करू, व्यक्त होऊ.

 ती हिरो आहे.

ती कार चालवत असेल, कुठे सिग्नलला ती थांबलेली दिसेल... तुम्हाला कळणारही नाही..ही कोण ते!! .... ती हिरो आहे.

*****

माझ्या एका मैत्रिणीने आंतरजातीय लग्न केलं आहे. समाजाला मान्य नसणारी गोष्ट. नातेवाईकांचा विरोध. 

 तिची आई ठामपणे तिच्यामागे उभी राहिली. मराठवाड्यातल्या एका छोट्या गावातली ही बाई!

 हे ही आज नाही, वीस वर्षांपूर्वी!!

 मुलांच्या बरोबरीने मुलीला वाढवलं, शिकवलं. आनंदाने तिने निवडलेला मुलगा आपलासा केला.

 ती हिरो आहे.

  एखाद्या लग्नकार्यात किंवा नातवांच्या गॅदरिंग मधे तुम्हाला ही आजी भेटेल, हसरी आणि उत्साही! तुम्हाला कळणार नाही... ती हिरो आहे.

*****

या स्त्रिया, या स्त्रियांच्या गोष्टी माझ्या आयुष्यात आल्या.... मला प्रेरणा देत राहिल्या. माझं जगणं सुंदर करत राहिल्या. 

   प्रत्येक जण खास असते. आपल्याला कळत नाही, ओळखू येत नाही..... माझी प्रत्येक मैत्रीण खास आहे. प्रत्येक बाई खास आहे.

 कधीतरी त्या खास असण्यावर कवडसा पडतो आणि ती उजळलेली मला दिसते. तिच्या उजळण्याचा प्रकाश माझ्यावर पडतो आणि माझं असणं मलाच आवडायला लागतं.



****


महिलादिनाच्या शुभेच्छा!! 💐💐

Wednesday, March 8, 2023

यात्रा

 यात्रा हे मुक्ता बाम लिखित दिग्दर्शित नाटक आहे. एकपात्री आहे, सुकन्या गुरव ने आक्काच्या भूमिकेचं सोनं केलं आहे.


 यात्रा ही आक्काची गोष्ट आहे.

छोट्या गावात प्रेमळ आईबाबांच्या सावलीत वाढणारी आक्का त्यांच्यासोबत पंढरपूरच्या वारीला जायला निघते, तिथे गर्दीत हरवते, एक दलाल तिला कोठीवर घेऊन येतो, तिथे ती मोठी होते, व्यवसाय करू लागते, एकाच्या प्रेमात पडते , तो धोका देतो, अशा माणसाचा गर्भ वाढवायचा नाही म्हणून ती पाडून टाकते. कायम तिच्या मनात ही इच्छा असते की वारीला जायचं, यात्रा पूर्ण करायची, दरवेळी ती सुटू शकत नाही, यात्रा पुरी होत नाही. ती अडकते, कोठीची प्रमुख होते.

 हा तिचा प्रवास या नाटकात आहे.


तसं पाहिलं तर ठराविक टप्पे घेत जाणारं हे नाटक आहे. तरीही हे महत्त्वाचं नाटक का आहे?

 कारण हे केवळ ती चं नाटक राहात नाही, ते नाटक पाहणाऱ्या प्रत्येकीचं नाटक होतं. आक्का जरी वेश्या असली तरी आधी ती स्री आहे आणि या नाटकाला येणारी प्रत्येक गृहिणी ही देखील आधी स्री आहे.

 यात्रा ही स्त्री च्या स्वातंत्र्य मिळवण्याच्या धडपडीची गोष्ट आहे.

 नाटकाचा वरचा स्तर हा आक्काच्या आयुष्याची गोष्ट सांगणारा आहे. जी वळणं घेत, धक्के देत पुढे जाते. 

 आणखी एक स्तर हा तिचं बाई म्हणून घडणं दाखवणारा आहे.

  ही साधारण ९० च्या दशकातली गोष्ट आहे.


ती चं घरातलं वाढणं आणि कोठीतलं वाढणं यात तसा काही फरक नाही, मुलीनी काय करावं? काय नाही? याचे नियम घरातही आहेत. भांडी घासा, केर काढा, शिवण करा, सुईत दोरा ओवा, हे दोन्हीकडेही आहेच. सुमी काय आणि कमला काय! दोघी सारख्याच आहेत.

बाई म्हणून जगतानाच्या मर्यादांबद्दल ती म्हणते.... 

इथे मला एक सांगू देत की अतिशय साधं, सुंदर आणि समर्पक नेपथ्य आहे. चार बाजूंना चार रंगांच्या साड्या सोडलेल्या आहेत. मध्यभागी एक चौरस लेवल आहे! बस!  त्यातली पहिली साडी बालपणाची, बाईपणाची, तिची गाठ तिच्या पदराला सुरूवातीपासूनच बांधलेली आहे...


 आक्का म्हणते, " हळूहळू त्या मागे ओढणाऱ्या गोष्टीची सवय होऊन गेली मला, तिला बांधून घेऊन फिरता येतं तेवढंच जग असतं, आसं वाटायला लागलं होतं मला" 

 मधे मधे येणारी साडी असतानाही, तिच्याशी खेळत, ते बंधन समजून घेत तिच्या हालचाली, वावर दिग्दर्शिकेनं उत्तमरीत्या अधोरेखित केला आहे.

 तिसरा स्तर आहे तिच्या आणि विठ्ठलाच्या नात्याचा! " इट्टल म्हणेल तो मार्ग, इट्टल म्हणेल ती यात्रा!

 आपन काय होणार? आपन नाही ठरवायचं? आसं आसतं होय!" 

 संवाद अर्थवाही आहेत.

आवा चालली पंढरपुरा.... या भारूडाचा खोलात जाऊन लावलेला अर्थ.... हा आणखी एक सशक्त धागा या नाटकात आहे. 

 आवा पंढरपुरला जात नाही, जाऊ शकत नाही. " मुले लेकरे घरदार, माझे इथेच पंढरपूर" आक्का म्हणते आवाला घरादाराचा मोह नव्हता, ती घरदार सोडू शकत नव्हती कारण ते तिच्या असण्याचा भाग झालं होतं. आक्का ही तिचं, तिच्या बायकांचं घरदार, त्यांची जबाबदारी सोडू शकत नाही. ते तिच्या असण्याचा भाग होऊन गेलेलं असतं. पटतंच आपल्याला. बंडखोरी केवळ आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यातच असते का? जेव्हा तुम्ही सगळी तोडमोड करू शकत असता तेव्हा जबाबदारी उचलण्यातली बंडखोरी आक्का दाखवून देते असं मला वाटतं. ती सुटू शकत असते आणि ती थांबणं निवडते. विठ्ठलाला ती म्हणते," ही यात्रा तू माझ्यासाठी लिहीली आहेस का? मी स्विकारते"

 तिचा तो स्वीकार मात्र आपल्या डोळ्यात पाणी उभं करतो.

  आक्का अशी आपल्या डोळ्यांदेखत समजदार होतं जाते, शहाणपण तिच्यात असतंच... मी उपाशी मरंल पण न्हाई खाणार .. म्हणणारी छोटी आक्का ते जेवते अन् म्हणते.. थोडं अन्न पोटात गेलं अन् मन सावरलं... मुंग्यांची रांग कुटं जात आसंल?.. असा प्रश्न पडणारी छोटी आक्का.. खूप खूप शहाणी होते.. हा प्रवास पाहणं एक सुंदर अनुभव देतं त्याचवेळी आपल्याला जागं करत जातं, !!.... आसं असतं व्हयं बाईंचं जगणं? 

हे अतिशय सुंदर बांधलेलं नाटक आहे. ( हे गंगूबाई काठीयावाडी च्या आधीचं नाटक आहे.) अतिशय गुंगवून टाकणारं तरीही विचार करायला लावणारं मुक्ताचं लेखन आहे. नाटकाचा ओघ , वळणं यातनं आपण पार होत असताना, कधी नाटक संपलं? कळत नाही.

आणि रंगमंचावर फक्त एकटी सुकन्या असते. १७-१८ व्यक्तिरेखा ती आपल्या समोर उभ्या करते. आवाज आणि लकबींसह! ती एक कमाल अभिनेत्री आहे. आपण थक्क होतो. सुकन्या, तुझ्या अभिनयातून यापुढेही तू वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारणार आहेस! शुभेच्छा!🌹

 मुक्ताने नाटक बसवताना खूप छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला आहे. तिचं सामाजिक भान तिच्या लेखनातून आणि दिग्दर्शनातून जाणवत राहतं. तिचं म्हणणं ती ठाम पणे मांडते. जेव्हा काजलमौसी मरते आणि आक्काला आता तिथून सुटता येत नाही, ती म्हणते," इट्टला, तू खेळायलास का माझ्याशी?" .... हे आक्काला समजणं किंवा तिने तो अर्थ लावणं, तिच्या घडण्यातून ते येणं.... आपण अवाक होतो... ही २०- २१ वर्षांची लेखिका आहे, यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. मुक्ता, तुझ्याकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत, तू असंच सशक्त लेखन करणार आहेस. आहेसच! शुभेच्छा!🌹

दोघींचे सूर छान जुळलेले आहेत. दोघींनीही बरीच बक्षिसे या नाटकासाठी पटकावलेली आहेत. या दोघीच नव्हे तर त्यांची अख्खी टीम एकमेकांना सहकार्य करत उत्तम काम करते. अभिनंदन आणि शुभेच्छा! 🌹🌹

  


 यात्रा चा जेव्हा केव्हा प्रयोग असेल तेव्हा नक्की पाहा. 

महिलादिनाच्या निमित्ताने, जीवनाच्या ओघात, सहजपणे,  एक समजूतदार शहाणपण, आयुष्याचा अर्थ कळणं, तुमच्या - माझ्यात, सगळ्यात येऊ दे, याच शुभेच्छा!🌹🌹

-- विद्या कुळकर्णी 

.

 . Epstein files मधून जे जे काही बाहेर येतं आहे ते भयंकर आहे. Jeffrey Epstein हा माणूस आहे का सैतान? त्याने इतक्या बालिकांचं लैंगिक शोषण केल...