Wednesday, October 31, 2012

मुलीचं घर -- १


"मुलींनी आपल्या आईवडीलांना सांभाळायचे, अशी प्रथा हवी होती." माझी मैत्रिण एकदा म्हणालेली. तिच्या आईला स्वत:जवळ काही दिवस ठेवून घेण्याची, कायमचं ठेवून घेण्याची तिची इच्छा होती. सासरच्यांना वाटायचे, भाऊ आहेत की. भावजय नीट लक्ष द्यायची नाही. आईलाही मुलीकडे राहायला प्रशस्त वाटायचे नाही. मुलाकडे कसंही वागवलं गेलं तरी हक्क वाटायचा.
 " मुलींचा कसा आईवडीलांत जीव गुंतलेला असतो. त्या नीट करतील त्यांचं. " ........ ती म्हणते.
माझा यावर विश्वास नाही. मुलगे काय नि मुली काय! सारखेच! काही लक्ष देतील काही नाही, सरसकट काही विधान नाही करता येणार.


आज मला लिहायचंय ते आईवडीलांना मुलीकडे राहायला अवघडल्यासारखं होतं.... यावर.
अगदी एकुलती एक मुलगी असली, दोन्ही मुली असल्या तरीही.
मुलीच्या घरात त्यांना हक्क वाटत नाही.


मी जेव्हा लहान होते, तेव्हा आमच्या आजूबाजूच्या काही घरांमधे ’मुलीला मुलगा झाल्याशिवाय, त्याचं बारसं झाल्याशिवाय, मुंज झाल्याशिवाय.. आईवडील मुलीच्या घरी जेवत नसत.
मला आठवतं, शेजारच्या एका काकूंना बरं नव्हतं तर त्यांचे वडील भेटायला आलेले, उन्हाळयाचे दिवस होते, त्यांना तर मुलीच्या घरचं पाणी पण चालणार नाही, मग मी त्यांच्यासाठी पाणी घेऊन गेले.... आणि घरी येऊन सांगितलं की " तुम्ही दोघे असं कधीही करणार नाही. तसं करणार असाल तर मला लग्नच करायचं नाही."
 काही लोक यातून मार्ग काढीत, म्हणजे मुलीकडे जेवायचं पण मग ताटासमोर पैसे ठेवायचे. भावना ही की मुलीकडे फुकटचं जेवलो नाही.
मी अगदी लहान असल्यापासून यावर बोलत आले आहे.
आई बाबांना सांगत आले आहे, लग्न झाल्यावर जे आणखी घर मिळेल, ते माझ्याइतकंच तुमचंही असणार आहे.
त्यांना मी बरंच बदलवलं असलं तरी पूर्ण नाही.
सारखं मला त्यांच्याशी भांडावं लागतं.
काही गोष्टी मी सोडून देते.


माझं नुकतं लग्न झालं होतं , तेव्हा आई माझ्याकडे आलेली, तिने जरा स्वैपाकघर आवरलं,
आणि नंतर मला म्हणाली, " डबे इकडचे तिकडॆ केलेत, तुझ्या सासूबाईंना चालेल ना?"
मला हसावं की रडावं कळेना.
जे काय भांडत आले, सांगत आले, ते सगळं वाहूनच गेलं की काय?


माझ्या मावशा, माम्या, आत्या यांच्यापेक्षा ते खूपच बरे आहेत.
तरी त्यांना कारणाशिवाय माझ्याकडे राहणं नको वाटतं, अर्थात भावाकडेही ते कारणाशिवाय फार राहात नाहीत, हे त्यातल्या त्यात साम्य.


देवांशी आमच्या घरी आम्हां दोघांनांही काही देणंघेणं नाही.
तरी कुणी विचारलं तर "माझं कुलदैवत बालाजी, मिलिन्दचं अंबेजोगाईची देवी", असली विक्षिप्त वाटतील (ऎकणाराला) अशी उत्तरे मी देते.
त्यातल्या त्यात आम्ही कुठला सण करत असू तर ’गणपती बसवणे"
मला आणि मुक्ताला गणपती करायला आवडतो.. म्हणून!
परवा आईबाबा गणेश चतुर्थीला होते,
आई एकदम म्हणाली, "तुमच्याकडॆ गणपतीला तळलेले मोदक चालतील ना?" (आमच्याकडे, औरंगाबादला, तळलेले मोदकच असतात.)
मी काहीही सांगितल्ं तरी तिचं बेसिक क्लिअर आहे.
तिच्या घरच्या म्हणजे माझ्या औरंगाबदच्या घरच्या सांस्कृतिक परंपरा चालवणारं, पुढे नेणारं घर हे तिच्या मुलाचं आहे.
आणि माझ्या या घरात मात्र तिच्या जावयाच्या घरच्या सांस्कृतिक परंपरा असायला हव्यात.


मी म्हणाले, "गणपतीला काय गं, उकडीचे असोत की तळलेले, मोदक मिळाल्याशी कारण!"
त्याला काही अर्थ नाही.

......................................
.....................................
....................................
...................................

 पुढे

http://asvvad.blogspot.in/2013/03/blog-post_31.html

***********


Tuesday, October 23, 2012

व्रत वैकल्ये -- २


अश्विनी,
>> उत्सव साजरा करण्याची एक पद्धत यापलीकडे त्याला काही महत्व द्यावं असं मला वाटत नाही.
अगदी मान्य!
आपण फक्त महत्त्वाच्याच गोष्टींवर लेख लिहितो असं नाही. :)
यावर मला लिहावं असं वाटलं, कारण ही प्रथा सर्वव्यापी होत चालली आहे,
दुसरं असं की सकाळपासून रात्रीपर्यन्त , जिम असो, शाळा असो, कार्यालय असो, लिफ्ट असो की दवाखाना असो,
सगळीकडॆ त्यावर बोललं जातंय.
ही उत्सव साजरा करण्याची पद्धत लवकरच रूढी होत जाईल, असं मला दिसतं आहे, त्याचे साक्षीदार आपण आहोत. त्याची नॊंद करून ठेवली पाहिजे असं मला वाटलं.
आणि समाजमनाची मानसिकता कशी असते? हे काही शोधता येईल का यावरून? हे पाहावंसं वाटलं.

ही प्रथा देवीच्या अवाढव्य मूर्ती, मोठाले मंडप किंवा कर्णकर्कश्य आवाज.... यासारखी अनिष्ट नाही. तिचं उपद्रव मूल्य काही नाही. असं जे म्हणते आहेस त्यावर मला वेगळं सांगायचं आहे.
पर्यावरणावर, समाजाच्या रोजच्या व्यवहारांवर अनिष्ट परीणाम करणार्‍या प्रथा तेव्हढ्या अनिष्ट आणि माणसाच्या मनावर परीणाम करणार्‍या , त्याला अनिष्ट वळण लावणार्‍या प्रथांना काय म्हणायचं? तशा प्रथा धोकादायक नाहीत का?

 पहिला लेख लिहिल्यावर मी एक क्रियापद वापरलं जाताना ऎकलं, नवरात्र पाळणे! रंग पाळणे!
या प्रथेला धार्मिक अस्तर आहे त्यामुळे सर्वसामान्यांत प्रथा नाही पाळली तर कोप होणार, अर्धवट सोडली तर आणखी काहीतरी होणार, नऊ दिवस नाही तर निदान एक दिवस पाळलंच पाहिजे..... असलं काय काय सुरू होईल.
मग रंग पाळल्याने कोणाची कशी भरभराट झाली च्या कहाण्याही येतील.
 दुसरं असं की कोणीतरी अज्ञात व्यक्ती ठरवताहेत आणि समाजातले बरेच लोक पाळण्याच्या मागे आहेत, चर्चा करताहेत. म्हणजे आकाशवाणी झाली "हे करा" की प्रश्न न विचारता लोक करताहेत, ही कशी मानसिकता आहे? ती आहेच, यानिमित्ताने दिसली, जशी अन्य निमित्तांमुळेही दिसते.
 -----
या मुळे मला एक जुना प्रसंग आठवला.
मी आठवीत असेन. औरंगाबादला गावात हडळ आली आहे, अशी अफवा उठलेली. जर तुम्ही हळदी-कुंकवाचे हात दारावर उठवले तर हडळ त्याला घाबरते, आणि त्या घरात जात नाही, असं होतं. पेपरमधून बातम्या, हळदी-कुंकवाचे हात उठवलेल्या घरांचे फोटॊ वगैरे. आम्ही ज्या निम्न मध्यमवर्गीय भागात राहतो, तिथे आजूबाजूला खूपच हात दिसत होते. हडळ येते की नाही माहीत नाही पण हात उठवण्यात काय तोटा आहे? झाला तर फायदाच!.... आमच्या घरावर अर्थातच असलं काही केलेलं नव्हतं. आमच्या मागे राहणार्‍या काकू आल्या आणि हात उठवले पाहिजेत वगैरे बोलायला लागल्या. आम्ही ते उडवून लावत होतो. विशेषत: बाबा!  बाबा म्हणाले रात्री दार वाजलंच, हडळ आली तर तिला सांगा मागे कुळकर्ण्यांकडॆ जा. ती इकडे आली की आम्ही बघून घेतो. बराच वेळ मजा चाललेली.
 शेजारचा एक शहाणासुरता माणूस ठामपणे नाही म्हणतोय याचा परीणाम त्या बाईवर झाला आणि तिने हात उठवले नाहीत.
मला भारी वाटलं, मग शाळेत किंवा कुठेही या विषयावर बोलणं चाललेलं असलं की आम्ही ते उडवून लावत असू. नाही म्हंटलं तरी त्याचा परीणाम होतो.
------
दुसरी एक गोष्ट आठवते, आहे.
 ताईने इथे दीडवर्ष राहून तिचं पीएचडीचं काम केलं. मनापासून आणि खूप छान. तिचे कष्ट दिसत होते, आम्ही पण चर्चांमधे सामील असायचो, तिच्या शोधनिबंधात जरा गुंतलेले.
नंतर सावकाश व्हायवा होती. त्यादिवशी विद्यापीठात ती एकटीच गेली. निदान तिच्या आई आणि बाबांना न्यायला हरकत नव्हती. तिचं कौतुक ऎकायला छानच वाटलं असतं.
 ती म्हणाली होती. तिथे व्हायवा म्हणजे नातेवाईकांची गर्दी होऊन बसते. डॉक्टरेट मिळणं हा एक उत्सव असल्यासारखं नटून थटून नातेवाईक येतात. नंतरच्या खाण्यापिण्याविषयीचंच बोलणं सुरू असतं. विद्यापीठातल्या या प्रथेला माझा ठाम विरोध आहे. त्यावेळी अभ्यासविषयक चर्चाच , पुरेशा गांभीर्याने व्हायला हवी. आई - बाबा तिथे शांत राहून ऎकतील, साध्या कपड्यात असतील, खरेच आहे. विद्यापीठातली ही पद्धत बंद व्हावी असं मला वाटतं, ते मला माझ्या कृतीतून दाखवून द्यायचं आहे. ती एकटीच गेली. घरी आल्यावर संध्याकाळी आम्ही पार्टी केली.
-----
  सांगायचा मुद्दा असा की समाजातले बहुसंख्य लोक अशा पद्धतीने एका बाजूला झुकलेले असतात तेंव्हा काहीजणांनी तरी ठामपणे उभं राहायला लागतं आणि काही वेळा समतोल साधण्याचा प्रयत्न म्हणून दुसर्‍या बाजूला झुकायला लागतं.
----
अश्विनी, धन्यवाद! रंग पाळणारांच्या बाजूने काही बोलत/ लिहित राहीलीस.
म्हणून चर्चा पुढे गेली.

*******
माझ्या मनात एक कल्पना , पहिला लेख लिहिला तेव्हाच येऊन गेली होती. ती अशी की आपण "इंद्रधनु" ने , आपल्या आजू बाजूच्या बायकांशी या विषयावर बोलून त्यांची मते नोंदवून ठेवायची. अजून दोन वर्ष हे सातत्याने करायचं. बघू काय निघतंय ते! हा एक छान प्रकल्प होऊ शकेल.
*******


Monday, October 15, 2012

व्रत वैकल्ये


पहिलीतली छोटी मुलगी काल मला म्हणाली, " काकू, आज निळा ड्रेस घालायचा होता. तू कुठला घातलास बघ."
" हो?"
" हो. मी बघ निळा घातलाय."
" आईने काय घातलय आज?"
" निळी साडी"
" कुणी गं सांगीतलं हे? आज कुठल्या रंगाचे कपडे घालायचे ते?"
थोडा वेळ विचार केला आणि मग म्हणाली, " पेपरात लिहून येतं."
********

बायकांच्या सणावारांविषयीच आपण बोलत होतो. आता नवरात्रात कुठल्या दिवशी कुठल्या रंगाचे कपडे घालायचे? याचं एक नविन व्रत सुरू झालं आहे. पेपरमधे लिहून येणार.... मग बायका त्या त्या रंगाच्या साड्या किंवा ड्रेस घालणार... नसला तो रंग आपल्याकडॆ तर खरेदी करणार... एक फोटॊ काढून घेणार... आणि त्या वृत्तपत्राला पाठवणार...... दुसर्‍या दिवशी आवर्जून आपला फोटो आला का बघणार... नसेल तर खट्टू होणार.. असेल तर हर्षित!....
 काय हौस म्हणायची का काय?
मला याची मजा वाटते, विचार न करता , घराघरातल्या, कार्यालयातल्या, शाळेतल्या आणि कुठल्या कुठल्या बायका ( त्या दिवशी तो रंग वापरणं) हे का करत असतील?
बायकाच नाही पुरुषांसाठी जरी कुणी हे काढलं तरी पुरूषही आपलं डोकं गहाण ठेवतील. माझी खात्री आहे.

******

त्यात थोडी मजा आहे. असेल.
पण कुणीतरी सांगायचं आणि आपण करायचं. असं का होत असेल?
आपलं कुठल्याही दिवशी कुठल्याही रंगाचे कपडे घालण्याचं स्वातंत्र्य असं कुणालाही का देऊन टाकायचं?
माणसाची मूळ वृत्ती आहे का ही?
पारतंत्र्य!
कुणीतरी सांगा मी करीन.
कुणीतरी ठरवा मी तसं वागेन.
मला चाकोरी आखून द्या मी खाली मान घालून त्यातूनच फिरेन.

*******
आपण सगळ्यात आधी काय सोडून देत असू तर विचार करणं.
म्हणूनच एखाद्या हुकूमशहाला समाज आपल्याला हवा तसा वाकवता येतो.

*******
म्हणजे आपण देशप्रेमाची इंजेक्शन्स दिली की सैनिक तयार करणार.
धर्माची दिली  की दहशतवादी तयार करणार....
*******

Saturday, September 22, 2012

बायकांचे सण


श्रावण - भाद्रपद - अश्विन, बायकांचे इतके सण असतात या महिन्यांमधे. मंगळागौरी, मग महालक्ष्म्या म्हणजे गौरी आणि नंतर नवरात्र. या सणांचे काय काय इतर अनेक उद्देश असले तरी यानिमित्ताने बायका एकत्र जमायच्या. एकमेकींशी संवाद होत असे.
आपण हे सगळे सण नाकारले. विशेषत: हळदी कुंकवाचे, जे की बायकांच्या वैवाहिक स्थितीवर अवलंबून आहेत. बायकांची त्यावरून वर्गवारी करतात.
 नव्या समाजात आपण कुठले नवीन सण आणले का? जे की समतेच्या पायावर आधारीत आहेत. जे बायकांचा एक गट करतील. त्यांना एकमेकींशी संवाद साधण्याची संधी देतील.
तसं काही दिसत नाही.
 आपण काय करतो आहोत? तर महाभोंडले आणि महाआरत्या आणि महा अथर्वशीर्षे.
पाया तर तोच राहतो आहे ना? जुन्या संस्कृतीचा. जी बायकांना कमी लेखते.
त्याचा एक फायदा होतो की अथर्वशीर्ष म्हणायला जाण्यासाठी बाईला घरातून सहज परवानगी मिळत असणार.
बायका बायका मिळून काहीतरी धार्मिक करताय ना? मग करा.
म्हणजे बाहेर जाऊ देतोय चा आव तर आणलेला आहे पण तरी पायात दोर्‍या तर आहेतच.
बायका बायका मिळून किंवा बायका पुरूष मिळून जोवर काही विचार करत नाहीत, तोवर पुरूषसत्तेला काही धोका नाही.
महिला दिनाचं आपण काय करून ठेवलं आहे? बायका बायका मिळून फारतर बाहेर जेवायला जातात, शुभेच्छांची देवघेव होते, नवरा हौशी असेल तर काहीतरी भेट देतो. दिवाळीचा पाडवा काय नि महिलादिन काय? आम्हांला काहीच फरक पडत नाही. शेवटी नवर्‍याला ओवाळायचे आणि भेट मिळवायची हेच आहे ना?
आपण आपल्या साजरं करण्याच्या रिती बदलायला हव्यात.
त्यात गंमत, मजा ही तर हवीच पण हे सारं समतेच्या पायावर उभं असायला हवं.
आपल्या समाजातील समता कशी आहे? तर बायका पौरोहित्य करायला लागल्या. त्याने समाज पुढे गेला का?
नाही. आपण काही नव्या पोथ्या काढल्या नाहीत. जुनी व्यवस्था नव्या पद्धतीने पक्की होत आहे.

महिलांचे सण असायला हवेत. ती पोकळी नव्या वातावरणात दिसते.
आपापल्या सोयीने महिलामंडळांचे, भिशीमंडळांचे कार्यक्रम होत असणार. पारंपारिक पद्धतीने.
पण, एकेका सणाला
’मी माझ्या बाई असण्याचा विचार करीन."
"मला बाई म्हणून आत्मसन्मानाने कसं जगता येईल हे पाहीन"
" बाई म्हणून इतर सगळ्याजणींना कसं आत्मविश्वासाने जगता येईल, यासाठी प्रयत्न करीन."
............................
अशा काही मुद्द्यांवर विचार करता आला तर ते खूप हवं आहे.

**********

Friday, August 31, 2012

छोट्या छोट्या गोष्टी - ४


एका जवळच्या नातेवाईकांकडे मंगळागौरीला गेले होते. साडी नेसून, मंगळसूत्र (एक प्रकारची माळ, अ्सं समजून) घालून गेले होते. म्हणजे त्या सगळ्या नातेवाइंकांमधे मिसळून जाऊ शकेन अशा वेशात होते. साडी का नेसली नाहीस?, मंगळसूत्र कुठं आहे? हे सुरूवातीचे प्रश्न टाळून, पुढे गप्पा मारता येणार होत्या.
चुलत बहीण, आतेबहीण जवळपास वर्षानंतर भेटत होत्या. त्यांच्या मुली लग्नाला आल्या आहेत.
एकीकडे पूजा चालली होती. आम्हांला काही फारसे काम नव्हते. आमच्या गप्पा सुरू झाल्या.
आतेबहीणीच्या मुलीला ’नीट पाहून/ बोलून नवरा निवड. असं सांगत होते."

आपल्याकडे मुलीला वाढवतात/ वाढवायचे ते तिचे लग्न करून देण्यासाठी असेच असते.
लहानपणापासूनच त्यादृष्टीने सवयी लावल्या जातात.
आणि लग्नाचे वय झाल्यावर त्यावरून एक सफाईचा हात फिरवला जातो.

बोलताना विषय ’आजकालचे कपड” इकडे वळला.
बहीण मुलीची तक्रार करत म्हणाली, " या मुलींना जीन्सची सवय असते. नीराला (तिच्या मुलीला) झोपतानाही पॅंट-टीशर्ट घालायची सवय आहे. आवरून सावरून बसणं माहीतच नाही!"
मी म्हणाले, " बरं आहे की, त्या पोषाखात बिनधास्त वावरता येतं. साडीसारखं नाही, इकडनं वर गेली का? तिकडनं गेली का? पाठ दिसतेय का? अन पोट दिसतय का? सांभाळावं लागत नाही."
" अगं पण सांभाळायची सवय असली पाहिजे. मी नीरासाठी दोन गाऊन घेऊन आले आहे. सांगीतलंय हे घालूनच झोपायचं. झॊपेतही कपडे सावरायची सवय हवी. " पुढे म्हणाली, " मी झोपते तेव्हा, झोपेत जर माझा परकर घोट्याच्या वर गेला तरी मला कळतं. मी तो व्यवस्थित करते. "
मी अवाक झाले. मला कळेचना काय बोलावं ते!

मला वाटलं माझ्या या बहीणीला मी किती कमी ओळखते! ही बाई वयात आल्यापासून कधीही गाढ, बिनधास्त झोपलेली नाही!
(तिने दर वेळी परकर/गाऊन घोट्याच्या वर गेला की नीट केलेला आहे.)
आणि घरोघरच्या किती मुली अशा झोपू शकत नाहीत, देव जाणे.

कायम शरीराचं भान ठेवायचं, सतत, चोवीस तास, कशी तारेवरची कसरत आहे ही!

मला जाणवलं , मी सुद्धा ही करते, तिच्याइतकी नाही पण करतेच.
मी पॅन्ट, सलवार, घालण्याचा पर्याय निवडीन आणि बिनधास्त झोपीन.
चार लोकात झोपायची वेळ येते, तेव्हा मी गाऊन घालणारच नाही, ( मी घरीही फारसा घालत नाही.) आपल्याला तो सावरायला जमत नाही, हे मला माहीत आहे.

पूर्वी सारखे हात गळ्याशी नेऊन चाचपायची सवय, आतले कपडे आतच आहेत ना? कुठे पट्टी बाहेर तर दिसत नाहीये ना?
साडी नेसली की दहा पिना लावून बंदोबस्त करायचा.

सारखं सांभाळत राहायचं.
मला कंटाळा आला आहे.
मला सोडून द्यायचंय.

*********

बायकांवर किती आणि किती प्रकारचॊ प्रेशर्स असतात.
याची त्यांना जाणीवही नसते.
त्या चालत असतात....
चालत राहण्याची त्यांना सवय असते.

**********



.

 . Epstein files मधून जे जे काही बाहेर येतं आहे ते भयंकर आहे. Jeffrey Epstein हा माणूस आहे का सैतान? त्याने इतक्या बालिकांचं लैंगिक शोषण केल...