Friday, January 28, 2011

खरं बोलणं... सांगणं... ऎकणं


खरं बोलणं हा नातेसंबंधांचा पाया आहे. नाती जितकी जवळची  असतील तितकं आपण अधिक खरं बोलतो. पूर्ण खरं बोलतायेण्याजोगी काही नाती आपल्याला असली पाहिजेत. नाहीतर आपण धुक्यातलं काहीतरी बोलत बसतो आणि तेच खरं आहे असं समजून चालतो. नंतर (की आधीपासूनच) खरं काय ते शोधणंही सोडून देतो.
 खर्‍याच्या प्रत्येकाच्या व्याख्याही वेगवेगळ्या असतात. त्यामुळे आपण खरं बोललो तरी ऎकणारे वेगळाच अर्थ लावतात. त्यांना पूर्ण खरं ऎकायची सवयच नसते ना? कधी कधी मी माझ्या थेट खर्‍याचा अर्थ समजावून सांगते आणि याचा अर्थ हाच + एव्हढाच आहे असंही सांगते.
 दूरच्या माणसांशीही शक्यतो खरंच बोलावं असा माझा प्रयत्न असतो. खरं पचणार नाही असं वाटलं तर मी बोलायचं टाळते पण शक्यतो खोटं बोलत नाही.
 आपल्या समाजात सगळीकडे खोटं बोलणं, खोटं वागणं, खोटं कौतुक , खोटी सभ्यता असं सुरू आहे. तुम्हांला ही नाटकं करायचा कंटाळा नाही येत?
मला येतो. म्हणजे मी ती करत नाही असं नाही. पण कुणाशीतरी खरं बोलून पहा, इतकं मोकळं छान वाटतं.
समाजात बदल करता येणं आपल्याला शक्य आहे का? नाही. पण आपल्या आजूबाजूचा परीसर स्वच्छ करायला काय हरकत आहे?
आपल्या जवळच्या व्यक्तींपुरतं साधं, स्वच्छ, सरळ आणि खरं जगून पाहूया.
खरं बोलणं म्हणजे स्वत: स्वत:ला स्वीकारणं आहे.
***
माझ्या बहीणीकडे एक कौटूंबिक प्रश्न निर्माण झाला. मी त्यात पडले. तिथे घरात कोणीही कोणाशीही खरं बोलत नव्हतं. ते लोक स्वत:शीही खरं बोलत नव्हते. मी माझ्या भाचीला म्हणाले,” पहिल्यांदा आपण हे ठरवून टाकूया की मी तुझ्याशी खरंच बोलेन आणि तुही काही झालं तरी माझ्याशी खरंच बोलशील.” बहीणीशीही हेच बोलले, पुढे त्या दोघींनीही तसं ठरवलं. यामुळे एकमेकांबद्दलचे गैरसमज कमी व्हायला मदत झाली. घरात संवाद सुरू झाला.
***
घरात नवरा- बायकोने एकमेकांशी खरं बोललं पाहिजे. म्हणजे आपण खोटं बोलत असतो का? तर नाही. ”खरं” म्हणजे काय खरं आहे ते शोधून बोललं पाहिजे. बर्‍याच जणांना/ जणींना स्वत:शीही खरं बोलायची सवय नसते. अशी मंडळी स्वत:कडेही समाजाच्या नजरेतूनच बघतात.
पण काही प्रश्न आहेत...
मिलिन्दशी सगळंच बोलत राहणं आणि खरं बोलत राहणं , त्याला न आवडणारंही बोलत राहणं ही माझीच गरज होऊन बसली होती/ आहे.
स्वत: त्यांचं काही सांगणं ही त्याची गरज नाही आणि ऎकणं ही सुद्धा! दीड-दोन वर्षांपूर्वी मी त्याला सांगीतलं... मी तुला सगळंच सांगत बसणार नाही. तू विचारलंस तरच सांगेन. क्वचित तो विचारतो, बहुतेकदा विचारतच नाही.
 माझा समज होता सगळं सांगून मी त्याला माझ्या जगण्यात सहभागी करून घेते. खरंच आहे ते!
माझा बहुदा ओव्हरडोस होत असणार आता मी त्याला आवश्यक वाटेल, वेळ असेल तेवढंच सांगते.
नवरा - बायकोत तो म्हणतो असायला हवं ते अंतर हे असेल.
***
काही वेळा नेमकं बोलता येणं, खरं शोधता येणं... अशी कौशल्ये नसतील तर काय करायचं?
बोललेलं समजून घेता आलं नाही तर?
मला माहीत नाही.
***
आपल्या आई-वडिलांशी चांगले संबंध असणं ही एक समाधानाची बाब असते.
त्यांनाही आवश्यक ते सगळं सांगीतलं पाहिजे. परवानगी मागायची असे नाही.
असं सांगणं म्हणजे त्यांनाही आपल्या आयुष्यात स्थान देणं असतं.
***
कुणाशीही मनापासून बोलणं, सांगणं म्हणजे आपल्या जगण्यात त्याला/ तिला सहभागी करून घेणं, सोबती बनवणं असतं.
****

Tuesday, January 25, 2011

सासू-सून- मुलगा....माझा विचार

मूळात कोणतीही दोन माणसे.... त्यांचे विचार वेगळे,जगण्याची उद्दीष्टे वेगळी,पद्धती वेगळ्या,आवडी-निवडी वेगळ्या.हे आपण जर समजावून घेत असू तर आपली अपेक्षा अशी असते की समोरच्याने पण तसाच आपल्या सारखा विचार करावा. आणि यामध्ये फरक पडत असेल तर मतभेद, वादविवाद यांना सुरुवात होते. मग ते नातं कोणतही असो.भाऊ- बहीण, आई-मुलगी, नणंद-भावजय,सासू-सून,नवरा-बायको आणि अशी अनेक. पण या सगळ्यांमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात सासू- सून हे नात जास्त डोक्यात जातं. मला वाटतं की यामागची कारणं सुद्धा शोधली पाहीजेत. तसा विचार करायला हवा.
नणंद-भावजय.........
आमच्याकडे कौस्तुभला सख्खी बहीण नाही. त्यामुळे नणंद या नात्यापासून मी वाचले. असे म्हणते कारण माझ्या आईच्या आणि माझ्या आत्त्याच्या नात्याच्या आठवणींनी त्या नात्यातील अनुभवाने मी जेव्हा लग्नाला उभी राहीले तेव्हाच आई- बाबांना माझी एक अट घातली की मला एकवेळ दोन-चार दिर असतील तर चालतील पण नणंद नको.नणंद-भावजय या नात्याचीच डोक्यात तिडीक बसली होती. आता तुम्ही म्हणाल की मी कोणाची तरी नणंद आहेच. नक्कीच आहे. आता मलाही भावजय आहे. पण मागील पीढीचा हा अनुभव पाहून त्यानुसार आमच्या दोघींचे नाते जास्तीत जास्त कसे चांगले राहील यासाठीचे वागणे माझ्या हातात आहे.ती नोकरी करते.भावाचे लग्न झाले तसे आईला- बाबांना बसून समजावून सांगितले की आता उटसूट माहेरी येणे,किंवा माहेरच्या कोणत्याही निर्णयात माझे मत ग्राह्य धरणे चुकीचे आहे.ती नव्याने घरात आली आहे तुमच्या चौघांच्या एकमेकांतील नात्याने हे घर फुलूद्यात.त्या आनंदात आम्ही नक्कीच तुमच्या बरोबर आहोत.आणि हे माझ्या आईनेही चांगल्या रीतीने स्विकारले आहे. आणि यामुळेच भावजयीला जर का एखाद्याचे वागणे मग ते माझ्या भावाबद्दल असो, कींवा आई-बाबांच्या बद्दल असो तिचा हक्काने मला फोन येतो आणि यात कोठेही तक्रारीचा सूर नसतो व तो प्रॉब्लेम चुटकीसरशी सामज्यस्याने सोडवला जातो. समजावून घेऊन कोणत्याही नात्याला कोणत्याही नात्याशी मोकळेपणाने एखादी अडचण मांडता यावी असे नाते असावे असे मला मनापासून वाटते.
सासू-मुलगा-सून...........
या नात्यातही रोज छोट्या-छोट्या कारणांवरुन वाद हे होणारच आहेत. सुरवातीला माझं प्रचंड डोकं फीरायचं.आणि त्यातून माझा स्वभाव हा कोणाही बद्दल काही तक्रार न सांगण्याचा. त्यामुळे या स्वभावाने मी मला स्वत:ला आतल्या आत खूपच त्रास करुन घेत असे.माझा चेहराच बघून खूपदा कौस्तुभ मला विचारत असे की काय झालं पण मी त्याला म्हणत होते की तुझ्या पर्यंत काही नाही. याचा अर्थच असा की जरी सासूचे वागणे आपल्याला खटकणारे असले तरी आपण ज्याच्याकडे तिच्याविषयीची तक्रार करणार आहे तो आपला नवरा असण्या आधी तिचा मुलगा आहे.कोणत्याही मुलाला त्याच्या आईविषयी तक्रार ऎकून घेणे हे अपमानास्पद वाटते. रहाता राहीला प्रश्न कोण चूक कोण बरोबर. आणि त्याने कोणाची बाजू घ्यायची.खरंतर सासू-सून वादातील पूर्ण प्रसंग घडताना तो नवरा म्हणजेच सासूचा मुलगा हा त्या प्रसंगाला हजर असणे आणि तो हजर नसताना घडून गेलेल्या वादावर दोघींच्या बाबतीत योग्य निर्णयाने वागणे यात फरक आहे.कारण प्रत्येकजण आपण बरोबर या धारणेने त्या मूलाच्या म्हणजेच नव-याच्या पुढे आपली बाजू मांडत असतो.अश्यावेळी आपल्या भोवतालची परीस्थिती जर वर्षानुवर्षे तशीच रहाणार आहे तर अश्या माणसांचा, अश्या परीस्थितीचा त्रास करुन न घेता त्याने योग्य निर्णय घेणे.हे मला महत्वाचे वाटते.आणि शेवटी सगळ्यात महत्वाचे आपण नवरा- बायको म्हणून जेव्हा दोघेच असतो तो पर्यंत काही नाही. पण जेव्हा मुलं होतात तेव्हा त्यांच्यापुढे, संपूर्ण घराचे मनस्वास्थ्य संभाळणे गरजेचे आहे असे वाटते.
पूर्वी यातलं मला काहीच जमत नव्हतं यातून काय मार्ग काढावा काहीच सुचत नव्हते. याचा परीणाम कौस्तुभवर सतत चिडचिड होत होती.पण एक दिवस शांत बसून विचार केला व त्यातून मार्ग सापडला.आपल्या स्वत:च्या स्वास्थ्यासाठी, आपल्या मुलांसाठी, त्यांचे बालपण आनंददायी रहाण्यासाठी, घर हसतं रहाण्यासाठी, प्रत्येक नात्यातील काही खटकणा-या गोष्टीं नक्की सोडून देऊयात.

Saturday, January 15, 2011

सासू - सून - मुलगा / नवरा - २

काही खर्‍या गोष्टी लक्षात घेतल्या, परीस्थितीकडे स्वच्छपणे पाहता आलं तर गुंते कमी होण्याची शक्यता असते.

१) सासूबाईंना आई म्हणायची पद्धत पडलेली असली तरी ती आई असू शकत नाही. इतक्या सहज कुणालाही आई होता आले तर ’आईपण’ ते काय राहिले? ती नंणंदेला झुकतं माप देणार, त्यावरून त्रागा करायचं काय कारण? मुलीला एक ड्रेस की सुनेला एक ड्रेस ही समान वागणूक नसते, ते दाखवणं असतं. आई आहे नां ती? नणंदेला तिने बावीस- तेवीस वर्षे वाढवलं आहे, त्या दोघींत घट्ट नातं असणारच. आपण त्यात पडायचं काय कारण?
 मलातरी माझ्या आईने मला झुकतं माप दिलेलं आवडणार आहे, मी जर तिला तिच्या सुनेसारखीच झाले तर मी दुखावली जाईल. ड्रेसची नि बांगड्यांची वाटणी शक्य आहे, प्रेमाचे काय? ( ते मुलीवरच जास्त असणार हे मान्य केल्यावर, इतर गोष्टींचं काय एवढं?)

२) सासू नणंदेची ’आई’ आहे तशी नवर्‍याची ’आई’ आहेच नां? ती त्याच्यावर हक्क सांगणारच आहे. आपलं मुलाने ऎकावं असं तिला वाटणारच आहे. मुलाचं लग्न झाल्यामुळे तिला जरा असुरक्षितता आली असेल, तिचे मेनापॉज चे दिवस असतील, समजून घेऊया तिला. तिने एकाहाती आजवर घर चालवत आणले असेल.... असतील काही कारणं आणखीही... पहिल्यांदा समजूनच घेऊ यात.
 म्हणजे अन्याय सहन करायचा असे नाही. ज्या तडजोडी शक्य नाहीत तिथे ठामच राहायचं, पण वाद चिघळू द्यायचे नाहीत. स्पष्टपणे, शांतपणे आपलं म्हणणं सांगायचं आणि त्याप्रमाणे वागायचं.

३) आपल्या घरात आपल्याला काय हवं आहे, कसं वातावरण.. ते एकदा नवर्‍याबरोबर बसून नीट ठरवायला हवं. प्रत्येक घराचे आपापले नियम असतात, घर त्या नियमांवर चालत असतं. एकदा नियम ठरवले की सगळ्यांसाठी ते सारखे आहेत.

४) नवर्‍याला आपणहून काही कळेल याची वाट पाहू नये, त्याला (आपल्याला) नक्की काय खुपतंय ते स्पष्टपणे सांगीतलं पाहिजे, त्याआधी ते आपल्याला शोधता आलं पाहिजे.

५) काही गोष्टी स्विकारण्यावाचून गत्यंतर नसते, त्या स्विकाराव्या लागल्या याचा त्रास करून घेऊ नये. नवर्‍यालाही काही बाबी अपरीहार्यपणे स्विकाराव्या लागलेल्या असतात.

६) आपण परीपूर्ण (परफेक्ट) नाही हे मान्य करावं. तसं कुणी नसतंच. सासू आणि नवरा हे ही परीपूर्ण असणं शक्य नाही, तेही चुकू शकतात.

७) सासू / नवरा  यांच्याकडून आपल्या काय अपेक्षा आहेत, त्या सांगाव्यात, (सगळ्याच पूर्ण होणार नसतात.) त्यांच्या काय अपेक्षा आहेत, त्यातल्या कुठल्या आपल्याला पूर्ण करता येणार नाहीत / का करता येणार नाहीत याची कल्पना द्यावी.

८) घराचं मनस्वास्थ्य सगळ्यात महत्त्वाचं आहे पण त्यासाठी आपलं स्वातंत्र्य विकायला काढू नये. आपण घर, नवरा, मुलं यांना प्राधान्य देत असलो तरी स्वत:साठी जगणं विसरू नये. (स्वत:च्या मनस्वास्थ्यासाठी ते गरजेचं आहे.)

यांपैकी काही गोष्टी मला जमतात. काहींसाठी प्रयत्न करते आहे.

माझ्या अनुभवाबाहेरचे, तुम्हांला आस्था असणारे काही मुद्दे राहून गेले असतील. तुम्ही भर घालू शकाल.

------------------------------------

Friday, December 31, 2010

सासू - सून - मुलगा / नवरा

पूर्वी लग्ने होत ती दोन घरांना जोडण्यासाठी, मुलगी कशी आहे, यापेक्षा तिचे घर कसे आहे हेच पाहिले जात असे. दुसरे कारण घरात कामाला एक माणूस आणणे, त्यामुळे शारीरिकदृष्ट्या अव्यंग हवी, इतकी माफक अपेक्षा असे. दिसायला चांगली असली तर छानच, पण तो काही महत्वाचा निकष नसे.
 त्यामुळे घरात येणार्‍या सुनेची कर्तव्ये केवळ नवर्‍यापुरती मर्यादित नसत, तर घरांप्रती, म्हणजे सासू-सासरे-दीर-जावा-नणंदा अशा सगळ्यांसाठी असत. नवरा एकटा शहरात नोकरीसाठी असला तरी सासू-सासर्‍यांसाठी गा्वात राहणार्‍या कितीक सुना दिसून येत. सासू-सासर्‍यांचं करतोय, धाकट्या दिरांनणंदांचं करतोय म्हणजे म्हणजे परक्या कुणाचं करतोय अशी भावना नसे.
 शहरांमधे नवनव्या नोकर्‍या तयार होऊ लागल्या, कारखाने, उद्योगधंदे वाढले, खेड्यातल्या घरांच्या शाखा शहरात आल्या, तशी ही एकत्र कुटूंबपद्धती जाऊन त्याजागी विभक्त कुटूंबपद्धती आली. पण पूर्णत: विभक्त नव्हे, दिरांची, नातेवाईकांची मुले शिक्षणासाठी या विभक्त कुटूंबातून असत, भावना ही की सोय म्हणून हे शहरातले घर आहे पण मूळत: त्या घराचा हिस्साच आहे.
 हळूहळू पूर्णत: विभक्त कुटूंबे आली. आता तर मुलगा आणि वडील एकाच गावात वेगवेगळ्या घरात राहात असलेले आपण पाहतो.

या प्रत्येक कुटूंबपद्धतीचे आपापले फायदे-तोटे आहेत.

तर आता सुनांची कर्तव्ये बदलली आहेत. सून घरात मुलासाठी, त्याच्या पसंतीने, त्याला साजेलशी आणली जाते. सुनेची कर्तव्ये आता बहुतांशी बायको म्हणून, आई म्हणूनच आहेत. सुनेच्या डोक्यातही हे पक्के होत जात आहे, की नवरा, मुले तेव्हढी आपली. सासू सासर्‍यांचं करणं भाग आहे, इतरांचं मी केलं तर ते जास्तीचं तो काही माझ्या कर्तव्याचा भाग नाही.
 आपले नवरे आणि आपणही अशा विभक्त कुटूंबात वाढलो आहोत. अर्थातच नवर्‍याची आई नवर्‍यात खूप गुंतलेली आहे. त्याला वाढवण्यात तिचा बर्‍यापैकी सहभाग होता. आता तिच्या आपल्या मुलाकडून काही मागण्या असणे स्वाभाविक आहे.
इतक्या वर्षांनी मुलाच्या राज्यात तिला काही अधिकार मिळाले आहेत आणि ती वापरते आहे.
.......
जसजशी समाजरचना बदलत जाते, कुटूंबपद्धती बदलत जाते, तसतशी नाती बदलतात. आपल्या नवर्‍याकडून काय नि सासूकडून काय, ज्या अपेक्षा असतात त्या समाज ठरवत असतो, निरपेक्षपणे आपण काहीही ठरवत नाही....
हा प्रकाश डोक्यात पडला नां, की हताश व्हायला होतं.
.........
घरात आलेली सून तर मुलासाठीच आलेली आहे, ती आपल्या नवर्‍यावर म्हणजेच सासूच्या मुलावर प्रेम करत असते, दोघीही त्याच्यावर प्रेम करत असतात म्हणजे काय तर मालकीहक्क दाखवत असतात.
 हा नवरा/ मुलगा काय करत असतो? बहुतेकदा तो काहीही करत नाही, किंवा काहीच करत नाही.. प्रेम वगैरे .. मर्यादा असतात माणसांच्या ...पुरूष असण्याच्या... स्त्री असण्याच्या..
 ही सासू आहे नां! ती आयुष्यभर आपल्या नवर्‍याला, मुलांना धरून बसली आहे. समाजाने, तिच्यासाठी हेच काम नेमून दिलेलं होतं. तिने स्वत:ची वाढच करून घेतलेली नाही, (हे मी शिक्षणाच्या संदर्भात बोलत नसून नातेसंबंधांच्या संदर्भात म्हणत आहे.)
 उदा. मुलासाठी आटापीटा करून एखादा पदार्थ करणे....’ यातच माझ्या जीवनाचे सौख्य़ सामावले आहे’.... अगं बाई, हे असं नाही गं! माणसाची गरज केवळ खाणे एवढीच नसते.
 आपण मुलासाठी / नवर्‍यासाठी जे असं करतो ते मिरवण्याची गरज का भासते? कारण त्यावेगळं काही भरीव आयुष्यात नसतंच ना!
....
सगळ्या सासवांकडेच बोट दाखवण्यात अर्थ नाही. काही घरात सूनवास असतो
......

आपणतरी सासवांसारखे होणे टाळू या. कुठली गोष्ट किती मोठी करायची हे आपल्यावर अवलंबून असते. स्वयंपाकघरातले वाद टाळू या. ती फार महत्वाची बाब आहे असं आपण समजायचंच नाही.
 नातेसंबंधांचा विकास करू या. एकट्या नवर्‍यावर अवलंबून राहणे सोडून देऊ.
आई-मुलगा आणि नवरा-बायको या नात्यांमधे आईमुलाचे नाते खोलवर पोचणारे असू शकते पण नवरा-बायकोचे नाते हे अधिक मिती असणारे, सर्वांगांनी फुलू शकणारे असे आहे. ( आपण ते फुलवत नाही, हे सोडून द्या.) हे सासवांनी स्वीकारायला हवे.
....
वादामधे मुलग्याने/नवर्‍याने मधे पडावे अशी दोन्ही बाजूंची इच्छा असते. कुठल्याही असल्या घरगुती वादांमधे न्याय देणे ही फार अवघड गोष्ट असते. सामोपचाराने पुढे जात राहणं याला काही पर्याय नसतो. कटूता टाळावी.
मुलगे किंवा त्यांचे वडील या पुरूषांनी परीस्थिती सुधारावी म्हणून काहीच प्रयत्न केले नाहीत तर ती चिघळत जाते. बरेच वाद हे घटनेवर पुरूष काय प्रतिक्रिया देतात यावरून घडतात. (घरातले सत्ताधारी तेच असतात ना?)
 ....
घराचे मनस्वास्थ्य सांभाळणं हे माझ्यामते सगळ्यात महत्वाचं आहे. त्यासाठी काही गोष्टी सोडून देऊ, काही कानाआड करू, काहींसाठी ठाम राहू पण घर हसतं/ बोलतं/ प्रसन्न असायला हवं. आपल्या घरात छोटी मुलं आहेत, त्यांचं बालपण टिकवायला हवं.

Monday, November 29, 2010

कमावणं

नीरज, आनंद, धन्यवाद!

कमावणं म्हणजे नोकरीच आणि ती ही निरर्थकच असा विचार का करावा? आवडीच्या गोष्टींतून अर्थार्जन का करू नये?
मान्य! (सगळ्यांना ते शक्य नसते तरी मान्य!)
मी जी नोकरी करत होते ती तशी निरर्थकच होती, कुणी सांगावं मी ती करत राहिलेही असते. मी त्यासंदर्भात लिहिले आहे.

 "कामाची विभागणी" हे तत्व महत्वाचं आहे.
मान्य़!
घरात येणार्‍या कमाईवर सगळ्यांचा हक्क आहे असे मानूया. मग काय करशील? समज प्रत्येकाच्या नावे त्याच्या/ तिच्या खात्यात ठरलेली रक्कम जमा केली, त्या पैशांवर त्या व्यक्तीचा हक्क, बरोबर आहे? म्हणजे ते पैसे ती व्यक्ती हवे तसे खर्च करू शकेल. (हे ही शक्य नसतं)
 मग तर माझी समस्या सुटलीच नां! मी सध्या जे काम करते त्याचेच पैसे मला मिळायला लागले तर आर्थिक परावलंबन नाही (रूखरूख नाही)
तू ज्या वाटेने विचार करतो आहेस त्यासाठी मला तुझ्याबद्दल आदर वाटतो. पण हा एक सापळा आहे, नीरज. घर सांभाळून मला पैसे मिळायला लागले तर मी घराबाहेर कशासाठी पडायचं?
 घरकामाला वेतन अशी चळवळ युरोपात झाली होती. काही देशांमधे तसे कायदेही झाले (कदाचित स्वित्झर्लंड किंवा स्वीडन) काही नवरे नियमितपणे घरकामाचा पगार आपल्या बायकांना देत असत. या आकृतिबंधामुळे असं झालं की त्या बायकांचं घरकाम पक्कं झालं, त्या घराशी बांधल्या गेल्या. जर त्या घरकामाचा पगार घेत आहेत तर घरकामात नवर्‍याच्या मदतीची अपेक्षाच नको. घरकाम हे तेच ते, कंटाळवाणे, कौशल्याची नाही तर वेळेची मागणी करणारे आहे. (मुलांकडे पूर्णवेळ लक्ष द्यावे लागते अशी कितीशी वर्षे असतात?) एकदा संसार मांडला आहे म्हणजे कुणालातरी घरकाम करावे लागणारच आहे, म्हणजे मदतनीसांचे साह्य घेऊन का असेना, त्यात अडकून राहावेच लागते. मग कौशल्याची, कस लागेल अशी, त्यांची वाढ होईल अशी, कामे त्यांच्या वाट्याला येतच नाहीत. व्यक्ती म्हणून त्यांचा विकास थांबवला जातो.
 घरातल्या जास्तीत जास्त कामांसाठी बाईला मदत मिळायला हवी. छोट्या विभक्त कुटूंबांमुळे स्त्रीचा श्वास मोकळा झाला आहे पण तिच्यावरच्या घरातल्या जबाबदार्‍या वाढल्या आहेत, तात्पुरती तिची जबाबदारी उचलू शकेल असं कुणी नाही. ’घर मी चालवते/ माझ्यामुळे चालते’ च्या मुखवट्यामुळे कुठल्या कुठल्या प्रगतीच्या वाटा बंद कराव्या लागतात याची बाईला जाणीव नाही. पर्यायी व्यवस्था काय असावी? कुटूंबव्यवस्था कशी असावी? कम्यून असावीत का ? निकड निर्माण झाली की समाज उत्तरे शोधेलच.(बहुदा)
 आता तर स्त्रियांवर इतका दबाव आहे (९० च्या उदारीकरणानंतर झालेले बदल....... यावर कधीतरी लिहिन.), तिने शिकलेलं असायला हवं, कुठल्यातरी कलेत पारंगत असायला हवं, चांगलं दिसायला हवं, घर व्यवस्थित ठेवायला हवं, मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यायला हवं, नोकरी करायला हवी, घराबाहेरची कामे यायला हवीत....... ही यादी वाढती आहे.


.

 . Epstein files मधून जे जे काही बाहेर येतं आहे ते भयंकर आहे. Jeffrey Epstein हा माणूस आहे का सैतान? त्याने इतक्या बालिकांचं लैंगिक शोषण केल...