Friday, May 30, 2014

छोट्या छोट्या गोष्टी - ५

आम्ही एका मिश्र गटात गप्पा मारत होतो. चर्चा चाललेली. नोकरी करणारी, वरच्या पदावर असणारी बायको पुरूषांना चालते का? असं काहीतरी चाललेलं.
 तिथे गप्पांमधे लग्न होऊन सहा-सात वर्षे झालेली एक मुलगी काय बोलली ते मला तुमच्यापर्यंत पोचवावसं वाटतं आहे.
ती म्हणाली, " मी एका पारंपारिक घरातून आले आहे. समानतेच्या, माझ्या हक्काच्या बर्‍याच गोष्टी मला नवर्‍याने शिकवल्या. मुलगी लहान दोन वर्षांची असताना, तिच्यासाठी नवरा पूर्णवेळ घरी होता. मुलीला छान सांभाळत होता, घरही सांभाळत होता. मी घरी आले की लगेच घर, मुलगी माझ्या ताब्यात, असं नव्हतं. रात्री उठायला लागलं तर, मुलीचं आजारपणही त्याने बघितलं. आता तो नोकरी करतोय आणि मी मुलगी, घर सांभाळते आहे."
 माझं सासर पुरोगामी विचारांचं आहे.
एकदा माझ्या नवर्‍याच्या मित्राच्या लग्नाच्या स्वागत-समारंभाला मी एकटीच सासरी गेलेले, मी आणि माझे सासरे समारंभाला गेलो. जेवण झाल्यावर सासरे म्हणाले, " मी निघतो, तुमच्या गप्पा चालू देत." मी नवर्‍याच्या मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारत बसले, पान वगैरे खायला गेलो. निघू असं म्हणून पाहिलं तर रात्रीचे दोन वाजलेले! मी घाबरले. नवर्‍याच्या मित्राला सोबत घेऊनच घरी आले. उद्या काय ते पाहू, असा विचार करून माझ्या खोलीत झोपायला गेले. तिथून मध्यरात्री नवर्‍याला फोन लावला आणि काय झालंय ते सांगितलं. "माझं चुकलं, गप्पांच्या नादात घड्याळाकडे लक्षच गेलं नाही." नवरा म्हणाला, "एव्हढं काय टेन्शन घेतेस? काही झालेलं नाही." ती म्हणाली , " मी काय सांगतेय ते त्याला कळतच नव्हतं.
 दुसर्‍या दिवशी काय कोसळणार? याची मला कल्पना आली. सासरी आलेले असताना, त्यात नवरा सोबत नसताना, खुशाल त्याच्या मित्रांबरोबर (फक्त एका मित्राची बायको होती.) रात्री दोनपर्यंत सुनेने गप्पा मारत बसावं. तेही बाहेर, आणि अपरात्री परत यावं. सगळंच गंभीर होतं. ती म्हणाली, " मी विचार केला की कोणी ओरडायच्या आत आपणच सॉरी म्हणून धार कमी करावी. चुकलेलं तर आहेच!"
 सकाळी उठल्यावर ती सासर्‍यांकडे गेली आणि त्यांना ’सॉरी’ म्हणाली. त्यांनी विचारलं, "सॉरी कशाबद्दल? माझ्या मुलाला या घरात जेवढे अधिकार आहेत, तेव्हढेच तुलाही आहेत. तो रात्री दोनपर्यंत गप्पा मारून घरी येऊ शकतो तर तू का नाही? हो, प्रश्न तुझ्या सुरक्षिततेचा आहे. तर या सगळ्या मुलांना मी लहानपणापासून ओळखतो, ते पोचवायला येणार, मग काळजी कसली?"
.........
अशीही काही घरं आहेत.....
अशीही काही माणसं असतात......
तुमच्यापर्यंत पोचावं म्हणून.....

(क्रमश:)

Saturday, March 15, 2014

देव - ८

माणसाला अजूनही निसर्गातली सगळी कोडी सुटलेली नाहीत , हे ही "देव" टिकून राहण्याचं महत्त्वाचं कारण आहे.
तसं बहुदा कधीही होणार नाही.

देवाची व्यवस्था ही हुकूमशाही व्यवस्था आहे.
माणसाचं स्वातंत्र्य गमावणारी आहे.

जन्मत: तुम्ही देव स्वीकारलेला आहे, असंच असतं,
नाकारायचा असेल तर विचारपूर्वक तो नाकारावा लागतो.
ते ही सहज नसतं.
समाजात देव ही कल्पना ऎच्छिक न राहता सक्तीची होते.


माझा माझा देव असं म्हणून प्रत्येकाचा देव वेगळा नाही. बहुसंख्यांचा मिळून एक देव आहे.
समाजाचे नियम, रितीभाती, योग्य-अयोग्य, नीती- अनीति देव ठरवतो.
’देव’ म्हणजे ’देव ज्यांच्या ताब्यात आहे ते मूठभर लोक’ हे ठरवतात.
आणि या व्यवस्थेत सत्ता त्यांच्याकडेच राहते.
ते जनसामान्यांना देवाजवळ पोहचू देत नाहीत.
ज्ञानेश्वरांनी संस्कृतमधली गीता प्राकृतात आणली, ही एक मोठी बंडखोरी होती.
ते ज्ञानही सामान्यांसाठी खुलं नव्हतं.

देव प्रत्येकासाठी एक चाकोरी आखून देतो,
ती तुमच्या जात, वय, लिंगानुसार असते.
देव प्रत्येकाची छोटी छोटी स्वातंत्र्येही काढून घेतो.
देव/ धर्म / धार्मिक / पारंपारिक असं ते मिळून पॅकेज आहे.
मी काही विशिष्ट दिवशी काय स्वैपाक करायचा? हे ठरलेलंच असतं.
( उदा, होळी - पुरणपोळी )
मी काही विशिष्ट दिवशी कुठले कपडे घालायचे ते आणखीच कुणीतरी ठरवतं.
(उदा. नवरात्रात ठरवले गेलेले कपड्यांचे रंग)
मी कुठले प्रवास करावेत?
( तीर्थयात्रा --- ठरलेल्या!)
समाजातील बहुसंख्यांना एक चाकोरी लागते हे मान्य करूनही,
लोकांच्या देवभोळेपणाचा फायदा उठवला जातो.
माणसा माणसात प्रतवार्‍या केल्या जातात. हे तर नक्कीच.

आस्तिक आहे, धार्मिक आहे, म्हणजे तो माणूस नैतिक आहे, असं समजणं चुकीचं आहे.
आणि नास्तिक माणूस नैतिक नाहीच, हे ही चुकीचं आहे.
धार्मिकता आणि नैतिकता या वेगवेगळ्या पायांवर उभ्या असतात, हे ठामपणे सांगण्याची गरज आहे.


********

Saturday, March 8, 2014

तुमचं स्वातंत्र्य तुम्हांला जपता येवो


स्वत:चं स्वातंत्र्य जपायचं. त्याविषयी काटेकोर, आग्रही राहायचं. सोपं नसतं.
स्वत:चं एक स्वतंत्र बेट करून नाहीच राहता येत.
तसं एक बेट असतंच म्हणा, प्रत्येकाच्या मनात.
तिथे कुठलं स्वातंत्र्य? तिथे तर आपली हुकूमशाहीच.
आपणच वसवलेलं गाव ते!
माझं गाव तर अस्ताव्यस्तच!
हवं तसं पसरलेलं.
स्वत:ला भेटायला इतरांना किती आवडतं कोण जाणे!
मला खूप आवडतं. दरवे्ळी एकटेपण म्हणाजे एकाकीपण नसतं.
स्वत:बरोबर मजा येते.

विषय चाललाय तो बाहेरच्या जगात स्वातंत्र्य जपण्याचा!
आपल्या समाजात अशी परिस्थिती आहे की लोक सहजच बाई म्हणून गृहित धरतात, मदत करायला येतात, डावलतात.
अशावेळी बरेचदा, एकतर दुर्लक्ष करणं शक्य असतं किंवा तिथल्या तिथे बोलून मोकळं होता येतं.
किंवा आवडलं नाही तरी सोडून देता येतं.
अवघड आहे ते नात्यात स्वातंत्र्य जपणं.
त्यांच्या प्रेमळपणाचं, त्यांच्या काळजीचं काय करायचं?
मी बाई असल्याने मी कुठेही असले तरी कळावं म्हणून मोबाईल हवाच, म्हणणारांचं काय करायचं?
ते आपले आप्त नव्हेतच का?
भावनांच्या बाबतीत इतकी गुंतागुंत असते.
सरळ तोडून टाकायचं म्हणजे कोरडेपणा!
आपल्याला न पटणार्‍या गोष्टी स्वीकारून नात्यातला ओलावा टिकवायचा?
शक्य होत नाही. मग आपलं असणं / आपण ’आपण’ असणं काय ते!
निजखूणच पुसायची?
मग कधी समजावून सांगायचं, कधी हट्टीपणा करायचा, कधी थोडी मुरड घालायची, असं करावं लागतं.

अगदी जवळच्या नात्यात स्वातंत्र्य कसं जपायचं?
तिथे तर हे ही कळत जातं की आपण वाटतो तितके सुसंगत नाही.
कधी कधी विसंबायचं असतं, कधी अधिकाराने आपणच निर्णय घेण्याचा हक्क घेतो, कधी सोपवावंसं होतं.
अशावेळी स्वातंत्र्याचं काय करायचं? त्यांच्याही आणि आपल्याही?
अशावेळी काटेकोर नियम नाहीच लावायचे.
तरी
स्वत्व गमवायचं नाही, स्वातंत्र्यही नाहीच.

जवळची आणि दूरचीही माणसं तर हवीतच.

तुमचं स्वातंत्र्य तुम्हांला जपता येवो, त्या मार्गावर सोबत लाभो, भावनांना वजा करण्याची वेळ न येवो.
शुभेच्छा!

आणि स्वत:च्या आतल्या जगात, तिथे स्वतंत्र असण्याची गरज आहेच हं!
गाभ्याशी स्वातंत्र्य असल्याशिवाय ते बाहेर कसं येणार?
ते लाभो.
शुभेच्छा!

Friday, February 28, 2014

देव - ७

माणसाच्या काही आदिम गरजा असणार,
अन्न, वस्त्र, निवार्‍याच्या पलीकडच्या, भावनिक गरजा...
प्रेम, भीती, भविष्याबद्दलची चिंता, म्रूत्यूबद्दलचे कुतूहल, मी कोण?, कुठून आलो? कुठे जाणार? असे मुलभूत प्रश्न,
जीवनातलं सातत्य, वंश पुढे चालू राहण्याची काळजी, सृष्टीच्या निर्मितीबद्दलचे कुतूहल....
या सगळ्यांची उत्तरे ’देव’ देतो, किंवा देव आहे.
देव ही कल्पना आयुष्याला एक स्थिरता देते.
म्हणूनच ती वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या माणसांच्या मनात घर करून राहिलेली आहे.

ज्या सगळ्या वेगवेगळ्या भीती माणसाला असतात,
मृत्यूची भीती असते, तर मृत्यूनंतर माणूस देवाकडे जातो, यात निश्चिंती आहे.
कधी मृत्यू येणार? देवाच्या मनात असेल तेव्हा.
भविष्याबद्दल चिंता? देव आहे चालवणारा... एव्हढेच काय तर देव बुद्धी देईल त्याप्रमाणे... देवाला आहे काळजी!

आत्मा एकच असून तो केवळ शरीरे / योनी बदलतो, ही हिंदू धर्मातली श्रद्धा,
जीवनातील सातत्य ......

मी गेल्यानंतर मुलाबाळांचं काय होईल?
किंबहुना माणसांचं काय होईल? माणूस जात टिकून राहिल ना?
तर राहणार आहे , हे आश्वासन देव देतो.

ही सृष्टी, जगातलं हे सारं अदभूत कसं निर्माण झालं असेल?
तर याचा निर्माता देव आहे, इतकं सोपं उत्तर देव ही कल्पना पुढ्यात ठेवते.

कुठलाही माणूस विचार करत गेला की मी कोण?, कुठून आलो? आणि कुठे जाणार? हे प्रश्न त्याला अस्वस्थ करणारच.
त्याचंही उत्तर देव देतो.

शरण जाणं, स्वत:ला कुणावर तरी सोपवणं हीसुद्धा माणसाची गरज असेल.

माणसाच्या वैयक्तिक गरजा जशा देव पूर्ण करतो
तशाच मानवी समूहाच्या काही गरजा आहेत
त्याही देव पूर्ण करतो.

समूहाची म्हणून एक नियमावली लागते, एक नैतिकता लागते,
त्यासाठी देव आहेच.
समूहाला एकत्र येण्यासाठी काही निमित्त लागतं.
तेही देव पुरवतो.

समुहासमोर कुणीतरी "रोल मॉडेल" असायला लागतं
देव ती भूमिका निभावतो.

समूहाला एक न्यायव्यवस्था लागते.
चांगलं वागण्याचा धाक आणि न वागल्यास शिक्षा,
हे दोन्हीही देव करतो.

*********
मग देवाची कल्पना स्विकारण्यात अडचण कसली आहे?

असं आहे की
देव स्वत: काहीही करत नाही.
तो त्याच्या भक्तांच्या / अनुयायांच्या ताब्यात आहे.
*********



Saturday, February 15, 2014

देव - ६

प्रेम हे सर्वव्यापी असतं.
बहुसंख्य हिंदी सिनेमे, हिंदी गाणी वर्षानुवर्षे एक " प्रेम " हा विषय धरूनच आहेत.
लोकप्रिय आहेत. लोकांच्या हृदयाला हात घालताहेत.
आपण कितीही नावं ठेवली तरी हिंदी सिनेमे लोकांच्या काही गरजा पूर्ण करतात, असं आहे,
म्हणूनच लोक ते पाहात असणार.
त्यातला महत्वाचा भाग हा आहे की कोणीतरी प्रेमाचं माणूस असणं, जिवाभावाचं कुणीतरी असणं,
प्रेम ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला आपल्या आयुष्यात हवी आहे.
कारण प्रेम ही एक मुलभूत भावना आहे, माणसाची गरज आहे.
आपल्यावर कुणीतरी प्रेम करावं, आपण आहोत तसं त्याच्याशी व्यक्त होता यावं, त्याने पोटाशी धरावं अशी आणि
आपण कुणावरतरी प्रेम करावं हीसुद्धा माणसाची गरज असते.

प्रत्येकालाच असं प्रेमाचं माणूस कुठून मिळणार?
प्रेमातल्या सोबत असणं, आधार असणं, जिवलग असणं,
या माणसाच्या गरजा " देव "  पूर्ण करतो.

माणूस हा कळपाने राहणारा, समाज निर्मून राहणारा प्राणी आहे.
त्याला सोबत लागते.
देवाची त्याला खात्रीची आणि कायमची सोबत मिळू शकते.
(देव या कल्पनेवर विश्वास ठेवता यायला हवा.)

मध्ययुगीन भक्तीपरंपरंपरेत, सूफी रचनांमधेही, देवाला प्रियकर मानलेलं आहे.

प्रेम माणसाला शुद्ध, निर्मळ, प्रामाणिक ....... अधिकाधिक चांगला माणूस बनवतं.
प्रेमात कसं आहे? स्वत:आधी दुसर्‍याचा विचार, त्याचं भलं, त्याग, त्याच्या सुखाची काळजी.
प्रेम ही माणूसपण उंचावणारी गोष्ट आहे.
माणसाचं सगळ्यात चांगलं रूप तो प्रेमात असतानाचं, प्रिय व्यक्तीसाठीचं आहे.

देव त्याच्यासाठी प्रिय व्यक्ती बनून येतो.

देव एकट्या, एकाकी माणसाला दुकटा करतो.
********

.

 . Epstein files मधून जे जे काही बाहेर येतं आहे ते भयंकर आहे. Jeffrey Epstein हा माणूस आहे का सैतान? त्याने इतक्या बालिकांचं लैंगिक शोषण केल...