Monday, September 26, 2011

सौंदर्य-२

विद्या तुझा सौंदर्य या विषयावरचा ब्लॉग वाचला आणि तेव्हाच माझ्या लहानपणापासूनच्या काही आठवणी मनात येऊन गेल्या.लहान नू.म.वि. शाळेत असताना आमचं स्नेहसंमेलन आलं की तेव्हा मला त्याच्यात आनंद घेण्यापेक्षा मनातून खूप वाईट वाटत असे याची मुख्य कारणे म्हणजे माझी उंची,ज्यामुळे नाचात कायमच मी मागच्या रांगेत ,दुसरं म्हणजे रंग...... समाजाच्या दृष्टीने गो-या गोमट्या, देखण्या यात बसणा-या मुली स्टेजवर पुढे असत. त्यामाने कमी देखण्या मागच्या रांगेत असा जणू नियमच ठरलेला.समाजात अजूनही दीसणं हा कीती महत्वाचा मुद्दा आहे.तेव्हा त्या शाळेच्या वयात या बद्दल मनात एक प्रकारचा न्यूनगंड आला होता.त्यातून स्वत:च शहाणपण यायला बरीच वर्षे गेली.मी कॉलेजला असताना जेव्हा फोटोग्राफी विषय घेतला तेव्हा काळा रंगातील सौंदर्य म्हणजे काय?अनेक काळ्या रंगाच्या असणा-या व्यक्तींचे उत्कृष्ठ फोटो मी जेव्हा पाहीले तसतसा मनातला न्यूनगंड कमी झाला.माझं लग्न करण्याचा जेव्हा आई बाबा विचार करत होते तेव्हा आलेल्या अनेक स्थळांपैकी बहुतेक मुलांच्याकडून आलेल्या फोनवरचे संवादावरुन रंगावरुन नकार हे कारण होते.माणूस एवढा आपल्या बाह्यरुपाला महत्व देतो.याउलट इकडं कौस्तुभकडे सगळे पांढरे फटक गोरे असताना जिथून मला खात्रीने नकार येईल अशी अपेक्षा होती तिथूनच होकार आलेला पाहून मला धक्काच बसला. कारण त्याआधी आलेल्या स्थळांमध्ये आपलं दीसणं कीती महत्वाचे आहे हे अनुभवायला येत होतं.त्याबद्दल कौस्तुभचे खरंच कौतुक.आता आई म्हणून मी जेव्हा स्मृतीला वाढवतं असताना आमच्याकडे इतर माझ्या पुतण्या रंगाने गो-या आहेत त्यामुळे कधीकधी तिच्याकडूनही काळ्या रंगाबद्दलची नाराजी दीसते तेव्हा या रंगापलिकडे काही गोष्टी चांगल्या आहेत.आपलं वागणं,आपल्यातले गुण,आपल्या जवळची हुशारी ,आपल्या आवडी-निवडी अश्या अनेक विषयावर तिच्याशी बोलल्यावर तिचा चेहरा एकदम खुलतो.खरंच लहानपणापासून या गोष्टी आपण कश्या दाखवतो हे फार महत्वाचे वाटते.गोरं म्हणजे सुंदर आणि तसं आपन नसू तर अनेक गोष्टींच्या लेपनाने तो तात्पुरता गोरा रंग मिळवून समाजात मिरवणा-या बायकांकडे बघून खरंच कीव करावीशी वाटते अनेक प्रकारची महागडी सौंदर्य प्रसाधने वापरुन आपण आहोत त्यापेक्षा अधिक सुंदर दाखवणे. त्यासाठी पैसा, वेळ, आपली बुद्धी खर्च करणे म्हणजे केवळ मुर्खपणा आहे.आपल्या मुलींकडे पाहीले की खरंच बरं वाटत की घराच्या बाहेर पडताना त्यांना पावडर न लावताही बाहेर पडता येतं. स्वत:च्या दिसण्यात त्या एवढ्या गुरफटल्या जात नाहीत.आपलं बोलणं,आपलं हासणं, आपल्यातील छंद,कल्पकता यासारख्या अश्या अनेक गोष्टी म्हणजे खरं सौंदर्य......... याचा अर्थ त्यांना खूप लहान वयात माहीती होतोय.

Thursday, September 15, 2011

सौंदर्य -- गोरेपणा


माझी एक मैत्रिण होती. काम सुबक नीटनेटकं. इंजिनीअर. आम्ही बरोबरच नोकरीत रूजू झालो. एकलहर्‍याला राहायचो तेंव्हा घर असलं तरी ते हॉस्टेलसारखंच असायचं. रात्री जागून गप्पा व्हायच्या. तिचा रंग काळा, केस लांब आणि जाड होते. वेणी खूप छान दिसायची.
 एकदा अशाच गप्पा मारत होतो. सांगत होती, ”माझ्या सगळ्या चुलत, मावस बहीणी गोर्‍या आहेत. त्यांच्या रूपाचं सारखं कौतुक, मी कोणाच्या खिजगणतीतही नसायचे, काय करावं माझ्यासारख्या सामान्य रूपाच्या मुलीने? मी अभ्यास करायचे. मी मार्क मिळवायला लागले , सगळ्यांचं माझ्याकडे लक्ष जावू लागलं, थोडफार कौतुक सुरू झालं. त्याने अभ्यासाची मला गोडी लागली.”
  दीपा, तू लिहिलंस तसं, शाळेत नाचात गोर्‍या गोमट्या मुलींना घ्यायची पद्धत होती. मी नाचात नसायचे, मला भाषण देता यायचं, निबंध लिहिता यायचे, वर्गात पहिली, दुसरी यायचे, रंगाचा मला त्रास झाला नाही.
  याचं श्रेय आईला पण द्यायला हवं. तिने माझ्यात कधी रंगाचा न्यूनगंड येऊ दिला नाही.
एक वय असं येतं, जेव्हा आपण स्वत:च्या, स्वत:च्या दिसण्याच्या प्रेमात असतो, स्वत:चं दिसणं समाजाच्या पट्टीवर मोजत असतो, ही फेज माझ्यासाठी लवकर संपली, तेव्हाही रंगापेक्षा चेहर्‍यावरच्या फोडांचा मला अधिक त्रास होत असे, नुसता दिसण्याचा नाही तर दुखण्याचा...
इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठी मला कधी काही करावं लागलं नाही. कॉलेजमधेही मुलं/ मुलगे माझ्याशी बोलायला येत ते अर्थातच माझ्या दिसण्यासाठी नाही, त्यामुळे सहज संवाद होऊ शके.
 जर लग्नाच्या बाजारात उभं राहायची वेळ आली असती तर त्रास झाला असता.
”समाजाच्या दृष्टीने सुंदर असाल तर ती पुढचं सगळंच आयुष्य श्रीमंतीत आणि तथाकथित सुखात घालविण्याची किल्ली आहे.”
पण जो नवरा केवळ आपल्या दिसण्यावर प्रेम करतो, त्याच्याबरोबर आयुष्य काढायचं म्हणजे खरंतर शिक्षा आहे! माझं रूप म्हणजे मी नाही. ते मला मिळालेलं आहे. त्याशिवायची जी मी आहे ना? ती ”मी” मला घडवलेली आहे. घडवलेल्या ”मी” शी नातं सांगू न शकणारांची काय पर्वा करायची?
****
>>कधीकधी तिच्याकडूनही काळ्या रंगाबद्दलची नाराजी दीसते तेव्हा या रंगापलिकडे काही गोष्टी चांगल्या आहेत.
दीपा, हे वाक्य तू सहज लिहिलं असशील, तरी "रंगापलीकडे" असं आपण म्हणतो तेंव्हा रंगाचं महत्व आपण मान्य करतो असं होतं. वाक्यरचना विचारपूर्वक करायला हवी.
मुक्ता अभिनव मधे होती तेव्हा शाळेत ताईंनी ”तुम्ही चहा पिऊ नका, काळे पडाल." असं वर्गात सांगितलं. मी मुख्याध्यापिकाबाईंना भेटायला गेले होते. आपल्या मुलांना केवळ आपण घडवत नाही, समाजही घडवतो. आपण दक्ष राहिलं पाहिजे.
****

****
आपण पृथ्वीच्या ज्या कटीबंधात राहतो, तिथल्या लोकांचा रंग हा काळा, सावळा, निमगोरा असाच असणार आहे.
गोरेपणा म्हणजे त्वचेतील मेलॅनिन या रंगद्रव्याची कमतरता.
अर्थात हे सांगून उपयोग नाही.
*****


Thursday, September 1, 2011

सौंदर्य -- १


गावाहून आले की आमच्याकडे केबल/डीश नाही याचं मला फार बरं वाटतं.
बातम्या नकोत, चर्चा नकोत, मालिका नकोत..... काहीच नको.
गावाला असले की सगळ्यांबरोबर थोडाफार टीव्ही पाहिला जातोच.
मग मालिकांपेक्षा जाहिराती पाहाव्याशा वाटतात.
काही जाहिराती खरोखरच पाहण्यासारख्या असतात..... किती वेळा पाहणार??

नुसत्या जाहिरातींचा अभ्यास केला तर काय आढळेल?
कुठल्या आहेत आपल्यासमोरच्या महत्त्वाच्या समस्या?
घरादाराची, कपड्यांची, स्वत:ची स्वच्छता कशी राखावी?
केसांत कोंडा झाला तर?
झुळझुळीत केस आणि तजेलदार कांती, गोरेपणा कसा मिळवायचा?

या जाहिरातसुंदर्‍यांचं तर ना, मला काही कळतच नाही.
जसं जसं नीट पाहात जाल तसं तसं त्यांचं हसणं, नाचणं, कृत्रिम वाटायला लागतं.
त्यांच्या आनंदी असण्याचं रहस्य काय?   तर एक क्रिम? एक साबण?
फ्रिज करून ठेवलेलं त्यांचं ते हसणं!..... काय घडतंय आजूबाजूला हसण्यासारखं?
प्लास्टीकच्या बाहुल्याच नव्हेत का त्या? किल्ली दिली की हसणार्‍या, गाणं म्हणणार्‍या...
त्यांचं एक ठीक आहे, त्यांचं हसणं, त्यांची त्वचा, त्यांचे केस, त्यांचं सौष्ठव हे त्यांचं भांडवल आहे.
त्या पूर्णत: व्यावसायिक आहेत/ असाव्यात/ असल्या पाहिजेत.
आपलं काय?

९० च्या उदारीकरणानंतर उत्पादनाचे वेगवेगळे पर्याय सामान्यांसाठी खुले झाले.
नुसत्या साबणांचे, शांपूचे शंभरेक प्रकार आज बाजारात असतील.
टीव्हीमुळे ते वापरणार्‍या सुंदर्‍या आपल्या घरात घुसल्या.
पूर्वी कसं होतं, मधुबाला असेल किंवा हेमामालिनी असेल, या चित्रपटगृहांच्या पडद्यावर होत्या.
त्यामुळे स्थानिक यमींच्या गोरेपणाला, सौंदर्‍याला भाव होता.
चारचौघीत उठून दिसणारी..... पुरेसं होतं.
आजच्या यमीची तुलना थेट कतरीनाशी, करीनाशी, दीपिकाशी किंवा कोण नविन?... त्या सोनाक्षी वगैरेंशी होऊ लागली.
बाई गं, त्यांचा पूर्णवेळेचा उद्योग ’दिसणं’ सांभाळणं हा आहे. तुला ते जमेल का?

आजची बाई त्या स्पर्धेत स्वत:ला भरडून घेते आहे.
स्वीकारा ना स्वत:ला! जशा आहात तशा!
आणि जशा आहात तशा तुम्ही छानच आहात.
स्वत:कडे पुरूषाच्या नजरेतून बघणं टाळा.
आपल्यात काय काय छान आहे ते शोधा.
स्वत:मधलं असं ’छान’ सापडलं, की ती छान दिसेलच की नाही?
कुणाला दिसला नाहीत ’छान’... तर तो त्यांच्या नजरेचा दोष आहे.
तुम्ही ”छानच’ आहात.

***

Tuesday, August 16, 2011

भांडण - २


कौटुंबिक मतभेदांमधे ही बायकाबायकांमधली भांडणे आहेत, दोन बायकांचंच एकमेकींशी पटत नाही, अशा फटकार्‍याने ती बाजूला केली जातात. तसं नसतं. बायकांमधल्या वादाला पुरूषसत्ता नाहीतर/ आणि पुरूष कारणीभूत असतात.
पुरूषसत्ता कशी कारणीभूत असते?
पुरूषसत्तेची काही पायाभूत तत्वे आहेत, (त्यात पुरूषप्रधानता हे आहेच,) काही धारणा आहेत, काही उतरंडी आहेत.
उदा. लग्नानंतर मुलीने नवर्‍याच्या घरी राहायला जायचे,
मुलीचं घर कुठलं? जे तिच्या नवर्‍याचं घर ते तिचं घर.
इथे आपण हे मान्य करूया की समाजव्यवस्था चालायची तर त्याला काही चौकट आखावी लागेल, काही नियम लागतील, त्यात प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा संकोच होणार आहे.
जेव्हा सून लग्न होऊन घरात येते तेव्हा तिचं स्थान सर्वात खालचं असतं. म्हणजे सासूसासरे, नवरा, दीर, नणंदा, मग ती. हळूहळू या उतरंडीत ती वर चढत जाते...
स्वयंपाकघर हे असं क्षेत्र आहे, ज्यात सासू सून दोघी काम करत असतात. दोघींपैकी एकीला त्यात रस नसेल तर स्वयंपाकघरातले वाद कमी होतात. दोघींनी आपल्या कर्तृत्वाचं क्षेत्र तेच मानलेलं असेल तर अवघड होत जातं. त्यातून मार्ग काढता येतात/ काढले जातात. एकावेळी एकीने करायचं दुसर्‍यावेळी दुसरीने... एकमेकींच्या स्वैपाकात पडायचं नाही. असं ठरवूनच घ्यायचं.
प्रश्न असा येतो की .... आपला समज असा असतो की कौटुंबिक नाती ही भावनेवर आधारलेली असतात. त्यात इतक्या रूक्षपणे नियम ठरवत बसायचे?
मुळात आपण एक लक्षात घेऊ या की कौटुंबिक नाती ही केवळ प्रेमावर आधारीत नसतात त्यात खूप राजकारण असतं. नवरा - बायकोच्या नात्यातसुद्धा ओलावा टिकवणं म्हणजे एक कसरत असते, तिथे बाकीच्या नात्यांचं काय?
तर काय करावं?
मला असं वाटतं, प्रत्येक नात्याची घरात एक खुर्ची असते. तिचा आदर आपण केला पाहिजे. ती व्यक्ती आपल्याला आवडत नसेलही पण ती त्या खुर्चीत बसलेली आहे हे आपण विसरू नये.
 समजा मुक्ताच्या आजोबांचे आणि माझे मतभेद आहेत. तरी या घरातले ते ज्येष्ठ आहेत, त्यांना योग्य तो मान आणि आदर मिळालाच पाहिजे, त्याशिवायही मतभेद असू शकतात/ असतात.. त्याचं काय करायचं ते बघू या.
घरात कुणाला किती अधिकार आहेत? यावर मतभेद असतात.
भांडणांच्या मुळाशी आपण गेलो नाही तर वरवरच्या मलमपट्टीचा उपयोग होईलच असं नाही, मग घरातदेखील हसरा मुखवटा घालून वावरावे लागते, त्याचा ताण असतो.
हे माझं घर आहे. असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा माझं म्हणजे कुणाचं? माझं एकटीचं नाही ना!
या घरात मला कुठले हक्क आहेत? माझ्यावर कुठल्या जबाबदार्‍या आहेत? त्याप्रमाणेच घरातल्या इतर सदस्यांना कुठले हक्क आहेत आणि कुठल्या जबाबदार्‍या आहेत याची वर्तुळे निश्चित केलेली असली पाहिजेत.
बायकांना मन:शांती हवी असेल तर...
माझ्या घरात मला काय हवं आहे? माझ्या घरातल्या कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत? नक्की कशाचा मला त्रास होतो? घरातलं काय मला बदलणं शक्य आहे? काय स्वीकारावं लागणार आहे? ... याचा विचार केलाच पाहिजे.
परीस्थिती पूर्णपणे बदलणं कुणालाच शक्य नसतं. थोडी बदलावता येते, थोडी स्वीकारावी लागते. त्यात जय पराजय काहीही नसतो.

*********

Sunday, July 31, 2011

गोष्टी मुलींच्या - १



माझ्या नंणंदेची एक मैत्रिण आहे, माहेश्वरी समाजातील. तालुक्याच्या गावची. लहानपणापासूनच हुशार. वर्गात पहिली असायची. COEP ला वसतिगृहात राहून अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं. नंतर एका चांगल्या कंपनीत, चांगल्या पगाराची नोकरी करत होती. दोन-तीन मुली घर घेऊन राहायच्या.
 आता लग्नाची वेळ आली आहे. घरच्यांनी स्थळे पाहायला सुरूवात केली आहे.
एकत्र कुटूंब आहे. आई दादाजीं समोर (सासर्‍यांसमोर) कधी जात नाही. घरात कोणीच नसेल तर घुंघट घेऊन कामापुरती, जेवायला वाढणे वगैरे, समोर जाते. लग्नाच्या वयाची मुलगी असलेली ही सून आहे, हे लक्षात घ्या. कुटूंबाचा काहीतरी एकत्रित व्यवसाय आहे.
 एकदा ती चार दिवसांची रजा काढून घरी आली. दादाजी म्हणाले, ” आता लग्न करायचं आहे, हीची नोकरी बास झाली, घरीच राहू दे.”
सगळ्यांना ते पटलं. तिला नोकरी सोडायला लावली. सध्या ती घरीच आहे. तिला फार घराबाहेर पडू देत नाहीत. ”सारखं काय लॅपटॉप आणि इंटरनेट?” त्यावर बंधने आली आहेत. कधी मैत्रिणीकडे आली की संगणकावरून इतरांशी संपर्क साधते.
 नवरा कसा मिळेल? माहीत नाही. त्याने जर नोकरी करू दिली तर ही करणार... नाहीतर नाही. नवरा हिच्या पसंतीने नाहीतर घरच्यांच्या पसंतीने ठरवला जाईल. शेवटी हिला विचारतील पण ऎकतीलच असं नाही.
 हिच्या पत्रिकेत मंगळ आहे, पत्रिका जुळणे अवघड, ती जुळल्याशिवाय पुढे जाणारच नाही. मंगळाची शांती करून घेत आहेत.
आईलाही वाटतं मुलीचं हे असंच असणार, असायला पाहिजे.

********

सगळ्या मैत्रिणींच्या गप्पा चाललेल्या.... असंच पुन्हाही कधीतरी आपण माहेरी येऊ तेव्हा भेटत राहू. ही म्हणाली, ” एकदा माझं लग्न होऊ दे, मी माहेरी येणारच नाही.”

*******
ही घराबाहेर राहिलेली मुलगी आहे, तिने जग पाहिलेलं आहे, स्वत: कमवायची धमक तिच्यात आहे.
आत्मविश्वास आहे का? तिच्यात लढण्याची बीजे आहेत का?
मला माहीत नाही.
तिला नवरा, सासरचे लोक कसे मिळतील?
काळजी वाटते.
तिची इच्छा नसताना तिला घराशी बांधून ठेवलं आहे.
समाज म्हणून आपण तिच्यासाठी काय करू शकतो?
काही नाही.

*******

.

 . Epstein files मधून जे जे काही बाहेर येतं आहे ते भयंकर आहे. Jeffrey Epstein हा माणूस आहे का सैतान? त्याने इतक्या बालिकांचं लैंगिक शोषण केल...