Thursday, September 15, 2011

सौंदर्य -- गोरेपणा


माझी एक मैत्रिण होती. काम सुबक नीटनेटकं. इंजिनीअर. आम्ही बरोबरच नोकरीत रूजू झालो. एकलहर्‍याला राहायचो तेंव्हा घर असलं तरी ते हॉस्टेलसारखंच असायचं. रात्री जागून गप्पा व्हायच्या. तिचा रंग काळा, केस लांब आणि जाड होते. वेणी खूप छान दिसायची.
 एकदा अशाच गप्पा मारत होतो. सांगत होती, ”माझ्या सगळ्या चुलत, मावस बहीणी गोर्‍या आहेत. त्यांच्या रूपाचं सारखं कौतुक, मी कोणाच्या खिजगणतीतही नसायचे, काय करावं माझ्यासारख्या सामान्य रूपाच्या मुलीने? मी अभ्यास करायचे. मी मार्क मिळवायला लागले , सगळ्यांचं माझ्याकडे लक्ष जावू लागलं, थोडफार कौतुक सुरू झालं. त्याने अभ्यासाची मला गोडी लागली.”
  दीपा, तू लिहिलंस तसं, शाळेत नाचात गोर्‍या गोमट्या मुलींना घ्यायची पद्धत होती. मी नाचात नसायचे, मला भाषण देता यायचं, निबंध लिहिता यायचे, वर्गात पहिली, दुसरी यायचे, रंगाचा मला त्रास झाला नाही.
  याचं श्रेय आईला पण द्यायला हवं. तिने माझ्यात कधी रंगाचा न्यूनगंड येऊ दिला नाही.
एक वय असं येतं, जेव्हा आपण स्वत:च्या, स्वत:च्या दिसण्याच्या प्रेमात असतो, स्वत:चं दिसणं समाजाच्या पट्टीवर मोजत असतो, ही फेज माझ्यासाठी लवकर संपली, तेव्हाही रंगापेक्षा चेहर्‍यावरच्या फोडांचा मला अधिक त्रास होत असे, नुसता दिसण्याचा नाही तर दुखण्याचा...
इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठी मला कधी काही करावं लागलं नाही. कॉलेजमधेही मुलं/ मुलगे माझ्याशी बोलायला येत ते अर्थातच माझ्या दिसण्यासाठी नाही, त्यामुळे सहज संवाद होऊ शके.
 जर लग्नाच्या बाजारात उभं राहायची वेळ आली असती तर त्रास झाला असता.
”समाजाच्या दृष्टीने सुंदर असाल तर ती पुढचं सगळंच आयुष्य श्रीमंतीत आणि तथाकथित सुखात घालविण्याची किल्ली आहे.”
पण जो नवरा केवळ आपल्या दिसण्यावर प्रेम करतो, त्याच्याबरोबर आयुष्य काढायचं म्हणजे खरंतर शिक्षा आहे! माझं रूप म्हणजे मी नाही. ते मला मिळालेलं आहे. त्याशिवायची जी मी आहे ना? ती ”मी” मला घडवलेली आहे. घडवलेल्या ”मी” शी नातं सांगू न शकणारांची काय पर्वा करायची?
****
>>कधीकधी तिच्याकडूनही काळ्या रंगाबद्दलची नाराजी दीसते तेव्हा या रंगापलिकडे काही गोष्टी चांगल्या आहेत.
दीपा, हे वाक्य तू सहज लिहिलं असशील, तरी "रंगापलीकडे" असं आपण म्हणतो तेंव्हा रंगाचं महत्व आपण मान्य करतो असं होतं. वाक्यरचना विचारपूर्वक करायला हवी.
मुक्ता अभिनव मधे होती तेव्हा शाळेत ताईंनी ”तुम्ही चहा पिऊ नका, काळे पडाल." असं वर्गात सांगितलं. मी मुख्याध्यापिकाबाईंना भेटायला गेले होते. आपल्या मुलांना केवळ आपण घडवत नाही, समाजही घडवतो. आपण दक्ष राहिलं पाहिजे.
****

****
आपण पृथ्वीच्या ज्या कटीबंधात राहतो, तिथल्या लोकांचा रंग हा काळा, सावळा, निमगोरा असाच असणार आहे.
गोरेपणा म्हणजे त्वचेतील मेलॅनिन या रंगद्रव्याची कमतरता.
अर्थात हे सांगून उपयोग नाही.
*****


Thursday, September 1, 2011

सौंदर्य -- १


गावाहून आले की आमच्याकडे केबल/डीश नाही याचं मला फार बरं वाटतं.
बातम्या नकोत, चर्चा नकोत, मालिका नकोत..... काहीच नको.
गावाला असले की सगळ्यांबरोबर थोडाफार टीव्ही पाहिला जातोच.
मग मालिकांपेक्षा जाहिराती पाहाव्याशा वाटतात.
काही जाहिराती खरोखरच पाहण्यासारख्या असतात..... किती वेळा पाहणार??

नुसत्या जाहिरातींचा अभ्यास केला तर काय आढळेल?
कुठल्या आहेत आपल्यासमोरच्या महत्त्वाच्या समस्या?
घरादाराची, कपड्यांची, स्वत:ची स्वच्छता कशी राखावी?
केसांत कोंडा झाला तर?
झुळझुळीत केस आणि तजेलदार कांती, गोरेपणा कसा मिळवायचा?

या जाहिरातसुंदर्‍यांचं तर ना, मला काही कळतच नाही.
जसं जसं नीट पाहात जाल तसं तसं त्यांचं हसणं, नाचणं, कृत्रिम वाटायला लागतं.
त्यांच्या आनंदी असण्याचं रहस्य काय?   तर एक क्रिम? एक साबण?
फ्रिज करून ठेवलेलं त्यांचं ते हसणं!..... काय घडतंय आजूबाजूला हसण्यासारखं?
प्लास्टीकच्या बाहुल्याच नव्हेत का त्या? किल्ली दिली की हसणार्‍या, गाणं म्हणणार्‍या...
त्यांचं एक ठीक आहे, त्यांचं हसणं, त्यांची त्वचा, त्यांचे केस, त्यांचं सौष्ठव हे त्यांचं भांडवल आहे.
त्या पूर्णत: व्यावसायिक आहेत/ असाव्यात/ असल्या पाहिजेत.
आपलं काय?

९० च्या उदारीकरणानंतर उत्पादनाचे वेगवेगळे पर्याय सामान्यांसाठी खुले झाले.
नुसत्या साबणांचे, शांपूचे शंभरेक प्रकार आज बाजारात असतील.
टीव्हीमुळे ते वापरणार्‍या सुंदर्‍या आपल्या घरात घुसल्या.
पूर्वी कसं होतं, मधुबाला असेल किंवा हेमामालिनी असेल, या चित्रपटगृहांच्या पडद्यावर होत्या.
त्यामुळे स्थानिक यमींच्या गोरेपणाला, सौंदर्‍याला भाव होता.
चारचौघीत उठून दिसणारी..... पुरेसं होतं.
आजच्या यमीची तुलना थेट कतरीनाशी, करीनाशी, दीपिकाशी किंवा कोण नविन?... त्या सोनाक्षी वगैरेंशी होऊ लागली.
बाई गं, त्यांचा पूर्णवेळेचा उद्योग ’दिसणं’ सांभाळणं हा आहे. तुला ते जमेल का?

आजची बाई त्या स्पर्धेत स्वत:ला भरडून घेते आहे.
स्वीकारा ना स्वत:ला! जशा आहात तशा!
आणि जशा आहात तशा तुम्ही छानच आहात.
स्वत:कडे पुरूषाच्या नजरेतून बघणं टाळा.
आपल्यात काय काय छान आहे ते शोधा.
स्वत:मधलं असं ’छान’ सापडलं, की ती छान दिसेलच की नाही?
कुणाला दिसला नाहीत ’छान’... तर तो त्यांच्या नजरेचा दोष आहे.
तुम्ही ”छानच’ आहात.

***

Tuesday, August 16, 2011

भांडण - २


कौटुंबिक मतभेदांमधे ही बायकाबायकांमधली भांडणे आहेत, दोन बायकांचंच एकमेकींशी पटत नाही, अशा फटकार्‍याने ती बाजूला केली जातात. तसं नसतं. बायकांमधल्या वादाला पुरूषसत्ता नाहीतर/ आणि पुरूष कारणीभूत असतात.
पुरूषसत्ता कशी कारणीभूत असते?
पुरूषसत्तेची काही पायाभूत तत्वे आहेत, (त्यात पुरूषप्रधानता हे आहेच,) काही धारणा आहेत, काही उतरंडी आहेत.
उदा. लग्नानंतर मुलीने नवर्‍याच्या घरी राहायला जायचे,
मुलीचं घर कुठलं? जे तिच्या नवर्‍याचं घर ते तिचं घर.
इथे आपण हे मान्य करूया की समाजव्यवस्था चालायची तर त्याला काही चौकट आखावी लागेल, काही नियम लागतील, त्यात प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा संकोच होणार आहे.
जेव्हा सून लग्न होऊन घरात येते तेव्हा तिचं स्थान सर्वात खालचं असतं. म्हणजे सासूसासरे, नवरा, दीर, नणंदा, मग ती. हळूहळू या उतरंडीत ती वर चढत जाते...
स्वयंपाकघर हे असं क्षेत्र आहे, ज्यात सासू सून दोघी काम करत असतात. दोघींपैकी एकीला त्यात रस नसेल तर स्वयंपाकघरातले वाद कमी होतात. दोघींनी आपल्या कर्तृत्वाचं क्षेत्र तेच मानलेलं असेल तर अवघड होत जातं. त्यातून मार्ग काढता येतात/ काढले जातात. एकावेळी एकीने करायचं दुसर्‍यावेळी दुसरीने... एकमेकींच्या स्वैपाकात पडायचं नाही. असं ठरवूनच घ्यायचं.
प्रश्न असा येतो की .... आपला समज असा असतो की कौटुंबिक नाती ही भावनेवर आधारलेली असतात. त्यात इतक्या रूक्षपणे नियम ठरवत बसायचे?
मुळात आपण एक लक्षात घेऊ या की कौटुंबिक नाती ही केवळ प्रेमावर आधारीत नसतात त्यात खूप राजकारण असतं. नवरा - बायकोच्या नात्यातसुद्धा ओलावा टिकवणं म्हणजे एक कसरत असते, तिथे बाकीच्या नात्यांचं काय?
तर काय करावं?
मला असं वाटतं, प्रत्येक नात्याची घरात एक खुर्ची असते. तिचा आदर आपण केला पाहिजे. ती व्यक्ती आपल्याला आवडत नसेलही पण ती त्या खुर्चीत बसलेली आहे हे आपण विसरू नये.
 समजा मुक्ताच्या आजोबांचे आणि माझे मतभेद आहेत. तरी या घरातले ते ज्येष्ठ आहेत, त्यांना योग्य तो मान आणि आदर मिळालाच पाहिजे, त्याशिवायही मतभेद असू शकतात/ असतात.. त्याचं काय करायचं ते बघू या.
घरात कुणाला किती अधिकार आहेत? यावर मतभेद असतात.
भांडणांच्या मुळाशी आपण गेलो नाही तर वरवरच्या मलमपट्टीचा उपयोग होईलच असं नाही, मग घरातदेखील हसरा मुखवटा घालून वावरावे लागते, त्याचा ताण असतो.
हे माझं घर आहे. असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा माझं म्हणजे कुणाचं? माझं एकटीचं नाही ना!
या घरात मला कुठले हक्क आहेत? माझ्यावर कुठल्या जबाबदार्‍या आहेत? त्याप्रमाणेच घरातल्या इतर सदस्यांना कुठले हक्क आहेत आणि कुठल्या जबाबदार्‍या आहेत याची वर्तुळे निश्चित केलेली असली पाहिजेत.
बायकांना मन:शांती हवी असेल तर...
माझ्या घरात मला काय हवं आहे? माझ्या घरातल्या कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत? नक्की कशाचा मला त्रास होतो? घरातलं काय मला बदलणं शक्य आहे? काय स्वीकारावं लागणार आहे? ... याचा विचार केलाच पाहिजे.
परीस्थिती पूर्णपणे बदलणं कुणालाच शक्य नसतं. थोडी बदलावता येते, थोडी स्वीकारावी लागते. त्यात जय पराजय काहीही नसतो.

*********

Sunday, July 31, 2011

गोष्टी मुलींच्या - १



माझ्या नंणंदेची एक मैत्रिण आहे, माहेश्वरी समाजातील. तालुक्याच्या गावची. लहानपणापासूनच हुशार. वर्गात पहिली असायची. COEP ला वसतिगृहात राहून अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं. नंतर एका चांगल्या कंपनीत, चांगल्या पगाराची नोकरी करत होती. दोन-तीन मुली घर घेऊन राहायच्या.
 आता लग्नाची वेळ आली आहे. घरच्यांनी स्थळे पाहायला सुरूवात केली आहे.
एकत्र कुटूंब आहे. आई दादाजीं समोर (सासर्‍यांसमोर) कधी जात नाही. घरात कोणीच नसेल तर घुंघट घेऊन कामापुरती, जेवायला वाढणे वगैरे, समोर जाते. लग्नाच्या वयाची मुलगी असलेली ही सून आहे, हे लक्षात घ्या. कुटूंबाचा काहीतरी एकत्रित व्यवसाय आहे.
 एकदा ती चार दिवसांची रजा काढून घरी आली. दादाजी म्हणाले, ” आता लग्न करायचं आहे, हीची नोकरी बास झाली, घरीच राहू दे.”
सगळ्यांना ते पटलं. तिला नोकरी सोडायला लावली. सध्या ती घरीच आहे. तिला फार घराबाहेर पडू देत नाहीत. ”सारखं काय लॅपटॉप आणि इंटरनेट?” त्यावर बंधने आली आहेत. कधी मैत्रिणीकडे आली की संगणकावरून इतरांशी संपर्क साधते.
 नवरा कसा मिळेल? माहीत नाही. त्याने जर नोकरी करू दिली तर ही करणार... नाहीतर नाही. नवरा हिच्या पसंतीने नाहीतर घरच्यांच्या पसंतीने ठरवला जाईल. शेवटी हिला विचारतील पण ऎकतीलच असं नाही.
 हिच्या पत्रिकेत मंगळ आहे, पत्रिका जुळणे अवघड, ती जुळल्याशिवाय पुढे जाणारच नाही. मंगळाची शांती करून घेत आहेत.
आईलाही वाटतं मुलीचं हे असंच असणार, असायला पाहिजे.

********

सगळ्या मैत्रिणींच्या गप्पा चाललेल्या.... असंच पुन्हाही कधीतरी आपण माहेरी येऊ तेव्हा भेटत राहू. ही म्हणाली, ” एकदा माझं लग्न होऊ दे, मी माहेरी येणारच नाही.”

*******
ही घराबाहेर राहिलेली मुलगी आहे, तिने जग पाहिलेलं आहे, स्वत: कमवायची धमक तिच्यात आहे.
आत्मविश्वास आहे का? तिच्यात लढण्याची बीजे आहेत का?
मला माहीत नाही.
तिला नवरा, सासरचे लोक कसे मिळतील?
काळजी वाटते.
तिची इच्छा नसताना तिला घराशी बांधून ठेवलं आहे.
समाज म्हणून आपण तिच्यासाठी काय करू शकतो?
काही नाही.

*******

Wednesday, June 15, 2011

नावात काय आहे!


मुलींनी लग्नानंतर नाव - आडनाव बदलू नये. नाव ही आपली ओळख असते. लग्नामुळे ती का बदलली जावी? पुरूषांची बदलते का?
कोणाची बायको म्हणून ओळखली जाण्यापेक्षा कुणाची मुलगी म्हणून ओळखलं जाणं मला पसंत आहे. मी जशी आहे तशी माझ्या बाबांनी मला स्वीकारलीच असती. आई - बाबांनी मला वाढवलं ते आपलं मूल म्हणून! मी घडत गेले. माझ्या नवर्‍याने माझ्याशी लग्न करायचे ठरवले ते माझ्यातल्या काही गोष्टी पटल्या / आवडल्या म्हणून! म्हणजे आमचं नातं विनाअट नाही.
 बाबांचं तसं नाही म्हणजे नसावं, वडील आहे त्या क्षमतांसह अपत्याला स्वीकारतात / स्वीकारावं. मला आईचं नाव लावायलाही आवडलं असतं, ते माझ्या हातात नव्ह्तं.
 मी लग्नानंतर माझं नाव/ आडनाव बदललं नाही. त्यामुळे जिथे जिथे मला किंवा मिलिन्दला आम्ही नवरा - बायको आहोत हे सांगायची गरज पडते, तिथे तिथे आमचं मॅरेज सर्टीफिकेट दाखवावं लागतं. साधं कुरीअरने आलेलं पत्र सही करून घ्यायचं असलं तरी कधी कधी तुमचं आडनाव वेगळं कसं? तुम्ही यांच्या कोण? असे प्रश्न विचारले जातात. मला ते सवयीचं झालं आहे.
 आमच्याकडे मोठे मूल बाबाचे नाव लावेल आणि धाकटे आईचे लावेल असे आम्ही ठरवले होते. त्याप्रमाणे सुहृदचे नाव शाळेत आम्ही सुहृद विद्या कुळकर्णी असे लावले होते.

त्रिनाम पद्धतीत आडनाव न लावता नावापुढे आईचे आणि वडिलांचे फक्त नाव लावतात. आडनावे किती वैशिष्ट्यपूर्ण असतात!, ती सोयीची आहेत, ती आपल्या समाजाची ओळख आहे. ती मिटून जावी असे मला वाटत नाही. आडनावामुळे जातीचा अंदाज येतो किंवा जात कळते. जे जात मानत नाहीत त्यांनी ही जातीवाचक ओळख नको व आई, वडीलांचे दोघांचेही नाव लावायचे अशी पद्धत सुरू केली. यावर माझे म्हणणे असे होते की इतर गोष्टींवरूनही लोक जातीचा अंदाज बांधतच असतात आणि जात हे आपल्या समाजातील वास्तव आहे ते असे वरवर नाकारून काय फायदा? जात आहे ती स्वीकारून आपले वर्तन जातीनिरपेक्ष ठेवले पाहिजे.

माझे नाव लावण्यावर  जवळचे नातेवाईक आणि माझ्या मैत्रिणीदेखिल अनेक प्रश्न विचारीत. पटकन हे कोणालाच पटायचे नाही. म्हणजे
”अगं एका घरात भावाबहीणींची नावे निराळी असली तर त्यांच्यात दुरावा येईल? ”
”का? आत्ताही बहीणीच्या लग्नानंतर दोघांची आडनावे वेगळी होतातच की!
” आता आईचं नाव येतंच की दहावीच्या प्रमाणपत्रावर?”
” नाव येतं आडनाव नाही! ते प्रमाणपत्र म्हणजे मुलाची ओळख नाही.”
” मूल वडीलांच्या कुळातलं असतं म्हणून ते नाव लावायचं”
” ते आईच्याही कुळातलं असतंच की!”
यावर आणखी पुढे तर मी म्हणते असे, ”माझं मूल हे माझं मूल आहे हे नक्की! ते मी सांगते माझ्या नवर्‍याचं आहे म्हणून त्याचं आहे!” ... हे तर कोणालाही झेपत नसे.
 आम्ही सुहृदचं नाव ठरवल्याप्रमाणे टाकलं. पहिलीत गेल्यावर नावाची नोंद शासन दरबारी होते. त्यामुळे जन्माचा दाखला लागतो. तो दिला. त्यावर आईचं फक्त नाव आणि वडीलांचं पूर्ण नाव असं असतं. आईचं आडनाव नाही. त्यामुळे शाळेने चौकशी केल्यावर कळले असे नाव ठेवायचे असल्यास गॅझेटमधे बदलून घ्यावे लागेल. ( खरे म्हणजे बदलायचे काही नव्हतेच! फक्त लावायचे होते.)
 अशी नावें ठेवणार्‍या इतर पालकांनी काय केले? हे जाणून घेण्यासाठी गणेश विसपुते यांना फोन केला. त्यांनी आपल्या मुलींची नावे त्रिनाम पद्धतीने ठेवलेली आहेत. त्यांनाही आता दहावीला गॅझेटमधे नाव (परत एकदा) आणायला लागणार होते. ते म्हणाले ,” आपण ठाम राहायचं, म्हणायचं आमच्यात असंच आहे. त्या साऊथ इंडियन लोकांना कोणी विचारत नाही तुमचं नाव असंच का? हवी ती कागदपत्रे पुरवीत राहायचं.”
त्यानंतर सचिनला फोन करून श्रुती पानसे आणि इब्राहिम खान यांनी त्यांच्या मुलाचं नाव काय घातलं आहे? त्यांचा अनुभव काय आहे? हे विचारून घ्यायला सांगीतलं.
 त्यांनी रूढ पद्धतीप्रमाणेच नाव घातलेलं आहे नाहीतर फार कटकटी असतात. तो पुढे म्हणाला, विनय र. र. यांनी त्यांच्या मुलीचं नाव त्रिनाम पद्धतीप्रमाणे ठेवलं आहे, त्यांच्या मुलीने मात्र आपल्या मुलाचे नाव रूढ पद्धतीने ( वडीलांचे नाव आडनाव लावून) घातले आहे. सततच्या कटकटींना ती वैतागलेली होती. तिचे स्वत:चे नावही आई- बाबांनी रूढ पद्धतीने ठेवले असते तर बरे झाले असते,असे तिला वाटते. रश्मीताई म्हणाल्या ,” नाव वेगळ्या पद्धतीचे असले की बरीच कागदपत्रे लागतात, गॅझेटमधे नाव बदलून घेऊनही मनिषाताईंच्या मुली्ला दहावीच्या ऎन परीक्षेत नावामुळे त्रास झाला.”
 एकूण काय तर आईचे नाव/ आडनाव मुलांनी लावावे हे स्वीकारण्याची समाजाची / चौकटीची तयारी नाही. नसेल तर कोणीतरी लढायला हवं. अगदी खरं आहे.
 माझी लढायची तयारी नाही. आज माझ्यासाठी तो शाळेत नीट डबा खाईल ना? पूर्णवेळ शाळेत रूळेल ना? घाबरणार नाही ना? हे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत. त्याच्या इतर चिंता मला नसत्या तर मी लढलेही असते. आता मी त्या मनस्थितीत नाही.
 मिलिन्द म्हणाला ,” तू याकडे सोय म्हणून पाहात असशील तर हरकत नाही, तुला हा तुझा पराभव आहे असं वाटत असेल तर लढायला हवं”
 मी म्हणाले,” ही सोय आहे. कशाच्या बदल्यात काय मिळवायचं याचा मी व्यावहारीक विचार करते आहे. नावासाठी इतक्या कटकटींना सामोरं जाण्याची माझी इच्छा नाही. आज माझ्यात ती ताकदही नाही. पूर्वी मला या मुद्द्याविषयी जितकं तीव्रतेनं वाटायचं ते आज वाटत नाही.”

मग शाळेत जाऊन मी सुहृदचं आधीचं नाव खोडून ते बाम सुहृद मिलिन्द असं केलं.

*****
सुहृदला विचारलं, ” तुझं नाव तुला आत्ता आहे तसं सुहृद विद्या कुळकर्णी असं आवडेल की सुहृद मिलिन्द बाम असं आपल्या ताईसारखं आवडेल?”
”मला माझं नाव सुहृद विद्या कुळकर्णी असंच आवडतं.

******

हल्ली मी विचार करते तो समाज जावू देत खड्ड्य़ात! मी काही समाज बदलण्याचा मक्ता घेतलेला नाही! माझं काय चाललं आहे ते समाज बघतो तरी का? मला साथ देतो का? नाही ना! मग मी का विचार करायचा? मी पण माझ्यापुरतंच बघीन.

दरवेळी हे जमेल का? मला माहित नाही.

*******

हा माझा पराभव आहे का? मी ’सोयी’आड दडते आहे का?
नसावं. हा बदल मी खूप सहजतेने केला आणि स्वत:ला काही लावून घेतलं नाही.
बहुदा मी समजदार झाले असेन.

******

.

 . Epstein files मधून जे जे काही बाहेर येतं आहे ते भयंकर आहे. Jeffrey Epstein हा माणूस आहे का सैतान? त्याने इतक्या बालिकांचं लैंगिक शोषण केल...