Tuesday, May 11, 2010

-o-o-o-

मी भाग्यवान आहे.. मी मुलगी म्हणून जन्मले. मी जशी आहे तशी मला आवडते. माझ्या गुणदोषांसकट आवडते. मला माझी बलस्थाने माहिती आहेत आणि उणीवाही ठाऊक आहेत. काही उणीवा मी प्रयत्नपूर्वक दूर करू पाहाते तर काही तशाच सांभाळते. मला तडजोडी कराव्या लागतात. कधी दोन पावलं मागं यावं लागतं. कधी काही संधीही गमावाव्या लागतात. याचा त्रास तर होतोच. खंतही वाटते.
तडजोडी, संधी गमावणं, माझ्यातल्या उणीवा, यांचं कारण प्रत्येक वेळी माझं बाईपण हेच असतं? नक्कीच नाही.
माझ्या भोवतालची परिस्थिती, व्यवस्था कारण असतं त्यामागे? मग का मी त्या व्यवस्था मानते? का नाही झुगारुन देत? पुन्हा बाईपण आडवं येतं?
जेव्हा हीच व्यवस्था, परिस्थिती (कधीकधी) पुरुषांनाही तडजोडी करायला लावते, तेव्हा त्यांच्यातला प्रत्येक पुरुष तरी कुठे व्यवस्थेला आव्हान देतो?
मग परिस्थिती बदलता न येणं ही बाईपणाची उणीव? की माझी व्यक्तीगत उणीव? की जी व्यवस्था बाईपणाला दुय्यम स्थान देते त्या व्यवस्थेची उणीव?
’नको हे बाईपण’, ’जळ्ळा मेला बायकांचा जन्म’ असं वाटायला लावणारे प्रसंग माझ्यावर कधी आले नाहीत हे खरंच, पण समजा तसे आले, तरी मी बाईपणाला दोष नाही देणार. मी ज्या समाजात रहाते, तिथे असणारं बाईचं दुय्यम स्थान, तिला कराव्या लागणार्‍या असंख्य तडजोडी, तिचे भोग हे त्या व्यवस्थेतील दोषांमुळे आहेत. ’नको हे बाईपण’ असं म्हणताना मी नकळत पुरुषी श्रेष्ठत्वच मान्य करते. बाई म्हणुन असणार्‍या माझ्या क्षमतांना कमी लेखत असते.
अरुणा ढेरेंची एक कविता आहे -
काळोखाचेप्रचंड ओझे
उचलून...वर्षानुवर्ष...
चालत रहातात बायका
आयुष्याचे डोंगर
चढतात...उतरतात...
उतत नाहीत की मातत नाहीत
निर्मळ हातांनी
अवजड ओझे सावरत जातात.
या कवितेतल्या बायका मी माझ्या आसपास, कुटुंबात खूप बघितल्या. त्या काही फ़ार शिकलेल्या नव्हत्या. धो धो पैसा कमावत नव्हत्या. पण त्यांनी त्यांचं घर आपल्या खांद्यांवर उभं केलं होतं. एकटीच्या बळावर उभं केलं होतं. त्यांचे पुरुष हरलेले होते. कोणी व्यसनात बुडालेले होते, कोणी जुन्या वैभवाच्या भ्रामक जगात वावरत होते- वर्तमानात जगायलाच तयार नव्हते. या बायका मात्र लवचिकपणे सगळे आघात पचवत पुन्हा पुन्हा उभ्या रहात होत्या. स्वतःबरोबर संसार सावरत होत्या. मुलांना घडवत होत्या. काय होतं त्यांच्याकडे? त्या काळोखाचे ओझे त्या उचलू शकल्या ते त्यांच्या अंतरीच्या उजेडाच्या जोरावर. त्यांच्या बाईपणाच्या जोरावर. भोवतालचा काळोख उजळून टाकण्याचीही शक्ती त्या उजेडात होती. पण व्यवस्थेच्या पोलादी भिंतींनी तो उजेड झाकोळून टाकला होता. भिंतिंआडचा उजेड मात्र त्यांना बळ देत राहिला. बाईपणाबरोबर येणारी शरीर-मनाची लवचिकता, सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची वृती, आहे त्या परिस्थितीशी कधी जुळवुन घेत, कधी दोन हात करत पाय़ घट्ट रोवुन उभं रहाणं ही त्यांची शक्तीस्थानं होती. ती त्यांना त्यांच्या बाईपणानं दिलेली होती.
बाईपण जसं या शक्ती देतं तसंच एक वेगळं, तरल, संवेदनशील, भावगर्भ अनुभवविश्वही मला देतं. माझ्या शरीरात निसर्गानं काही वेगळ्या योजना, रचना केल्या आहेत. मी माझ्यात एक नवीन जीव सामावून घेऊ शकते. त्याला पोसू शकते, वाढवू शकते. बाहेरच्या जगात आणू शकते. याच नैसर्गिक क्षमता मला आणखीही काही देतात. मी माझ्याबरोबरच्यांचा स्वतःपलिकडे जाऊन विचार करु शकते. त्यांना जास्त चांगलं समजुन घेऊ शकते.
बाईपणाचा मला अभिमान असला तरीही श्रेष्ठत्वाचा वाद मात्र मला निरर्थक वाटतो. निसर्गानं तर श्रेष्ठ-कनिष्ठ अशी विभागणी स्त्री-पुरुषात केलेलीच नाहीये. तिथे क्षमतांचं परस्परपूरकत्व मात्र आहे. मी बाई म्हणुन पुरुषापेक्षा श्रेष्ठही नाही आणि हीन तर मुळीच नाही. पण बाईपणाला झाकोळून टाकणार्‍या त्या पोलादी भिंतींचं काय करायचं? अजून किती काळ आणि किती शक्ती जाणार त्यांना उखडून काढण्यात? पण त्या उखडुन काढता येत नाहीत, तोवर काळोखाची ओझी वाहाणं अटळच.

Sunday, May 2, 2010

मनोगत

स्त्री किंवा पुरूष असणे हे आपल्या मर्जीवर अवलंबून नाही. पण निवडीचे स्वातंत्र्य असते तरी मला स्त्रीच व्हायला आवडले असते. हा विषय विद्याने सुचवला तेव्हा पहिला विचार हाच आला.

नंतर जेव्हा खोलवर विचार सुरु केला तेव्हा जाणवले की स्त्री आणि पुरूष यांच्यात शारिरीक भेद असले तरी मानसिकदृष्ट्या पाहिले तर प्रत्येकात थोडी स्त्रीची व थोडी पुरूषाची मानसिकता असतेच. विविध प्रसंगानुरूप ज्याची त्याची जी गरज असेल त्यानुसार हे प्रमाण कमी जास्त होत असते.

काही गोष्टी स्त्रियांनाच जमतात किंवा त्या त्यांनीच करायच्या आणि काही गोष्टींत पुरुषांची मक्तेदारी आहे म्हणून तेथे स्त्रियांनी वळायचेच नाही असे असू नये. आणि त्यासाठी स्त्री असो वा पुरूष, कुठेतरी ह्या गोष्टींचा स्वीकार करायची मनाची तयारी किंवा मोकळेपणा असावा.

उदाहरण द्यायचं झालं तर दुःखाच्या क्षणी रडणे ही गोष्ट स्त्रियांकडून अपेक्षित असते पण कधीकधी आपल्या दुःखाला वाट करून देण्यासाठी काही अश्रू पुरुषांच्या डोळ्यांतून ओघळले तर त्यात काय काही चुकीचे नाही. तसेच आयुष्यात एखाद्या कसोटीच्या क्षणी पुरुषाने कणखर रहायचे आणि स्त्रीने कोसळून जायचे असेच असायला हवे असे नाही. उलट स्त्रीने कणखरपणे उभे राहून पुरुषाला आधार दिला तरीही चालण्यासारखे आहे.

एकूणच मला असं वाटतं की मी स्त्री असले तरी ते स्त्रीपण मी कसं स्वीकारते आहे हे अधिक महत्वाचे आहे. स्त्री असण्याचे फायदे तोटे स्वीकारूनही सर्वांगाने संपूर्ण असे जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मी पुरुष असते (की असतो?) तरी मला वाटतं की मी हाच विचार केला असता.

Friday, April 30, 2010

लग्न:-- ठरवणे, करणे, मोडणे, टिकवणे...वगैरे वगैरे

अभिनवमधे मुक्ताचा पहिला दिवस. तिला सोडायला मी शाळेत गेले होते. तिथे मला माझी शाळेतली मैत्रीण भेटली. तिच्या मुलीला सोडायला आलेली. दहावी नंतर एकदोनदाच आम्ही कुठे बाहेर, बाजारात वगैरे भेटलो असू.
अभिनवमधेही आमचा आयांचा एक गट होता. आम्ही वारंवार भेटायचो, काही कार्यक्रम ठरवायचो. शिवाय मुलामुलींचे वाढदिवस वगैरे असायचे. आमच्या छान गप्पा व्हायच्या. एका वाढदिवसानंतर आम्ही बरोबरच बाहेर पडलो, पार्कींगमधे गाड्या काढत होतो, आमच्या मुली तिथेही खेळत होत्या. मैत्रीण म्हणाली,’ विद्या, मला घरी जावसंच वाटत नाहीये. काय म्हणून मी तिथे जाऊ? मला काही स्थानच नाही त्या घरात. घरात फिरताना देखील माझा नवरा सहा इंच दूरून जातो, माझ्याशी कामापुरतं बोलतो, सासू आणि नवरा मिळून घरातल्या गोष्टी ठरवतात. मी कुणीच नाहीये त्यांची.’ मी थांबले, तिच्या पाठीवर हात ठेवला, थोपटलं. यापलीकडे मी काय धीर देऊ शकणार होते? उशीर झालेला, बहुदा त्यावरूनच बोलणं निघालं असेल.
ही हसती खेळती माझी मैत्रीण , ती स्वत: बोलली म्हणूनच त्यावर विश्वास ठेवायचा, नाहीतर कुणाला खरं वाटणार नाही. घरी आले पण मला काही सुचेना. आपण स्वत:च्या आयुष्याचंही भलं करू शकू याची खात्री नसते, दुसर्‍यांच्या बाबतीत तर असहाय्यच असतो, मदत तरी काय करायची?........ ऎकून घ्यायचं. मी तेच केलं. पुढे आम्ही दोघी ठरवून भेटलो, ती बोलत होती, मी ऎकत होते.

नवरा म्हणून, वडील म्हणून, घरातली कुठलीही जबाबदारी तो घेत नव्हता. बॅंकेत नोकरी करतो, जरूरीपुरते पैसे दिले की त्याचं काम संपलं. मैत्रीण वकील आहे, तिच्यापुरतं कमवायची. सासू दोघांमधे समेटाचा प्रयत्न करत नव्हती, उलट दोघे दूर जायला हातभारच लावत होती.
हिला त्रास होता, पण माहेरी काही बोलली नव्हती. लग्नानंतर वर्षाच्याआत मुलगी झाली. मुलगी सहा महिन्यांची असेल, तिच्या बाबांनी औरंगाबादहून बसचं रिझर्वेशन केलं, तिने फोन करून कळवलं, ’या गाडीने येतोय असं.’ तर म्ह्णाला,’ कशाला येतेस? नाही आलीस तरी चालेल.’ आता काय करायचं?म्हणजे निघताना काही भांडण झालेलं नव्हतं, कधी इतक्या टोकापर्यन्त बोलणं गेलं नव्हतं आणि अचानक असं!! मग तिला आईबाबांना सांगावं लागलं. अशा त्याच्या कितीतरी गोष्टी होत्या.तेंव्हा समेट झाला पण नंतर आणखी काही उभं राहिलं.

मैत्रीणीची जुळवून घ्यायची खूप इच्छा होती. तिला वाटायचं मुलीला बाबा हवा. हा तर अजिबात मुलीत गुंतलेला नव्हता. कितीतरी घरं मुलांमुळे उभी असतात. आम्ही दोघी जीवनसाथमधे शोभा भागवतांकडे गेलो, त्यांनी सगळं ऎकून घेतलं. एका मानसोपचारतज्ञ/ समुपदेशकाचा सल्ला घ्यावा, असं सुचवलं, त्याच्याकडे गेलो. नेहमीच ज्याला खरी समुपदेशनाची गरज असते, तो कधीही स्वत:हून पुढे येत नाही, त्याच्या जोडीदाराने येऊन फारसा फायदा होत नाही. आणखीही प्रयत्न केले. वेगळं होण्याचा निर्णय तिला घेता येत नव्हता. कधीही कुठलाही निर्णय अगदी बरोबर असा नसतोच, त्या वाटेवर नकोसंही काय काय असतंच. कुठलाही निर्णय घेतला तरी डोळसपणे घ्यायचा, त्याचे फायदे- तोटे स्वीकारायचे, त्याची जबाबदारी घ्यायची आणि ठामपणे पुढे जायचं, हे ज्याचं त्यालाच करावं लागतं. आपण कुणाच्याही आयुष्याची जबाबदारी घेऊ शकत नाही, दोन्ही वाटांवरचं चित्र फारतर स्पष्ट करू शकतो, निवड जिची तिने करायची. कधीतरी तिला पटलं, वेगळं व्हायला हवं.
आता ती प्रक्रिया सुरू आहे.

----------

माझ्या मैत्रीणीचं मला खूप कौतुक वाटतं. ती या सगळ्या काळात धीराने वागली. सुरुवातीला तिला हे अवघड जायचं, सारखं रडू यायचं, त्याच्याशी नीट भांडताही यायचं नाही, ताणाचे काही काही शारीरिक परीणाम दिसायला लागले होते, हळूहळू ती यातून बाहेर आली. तिचं आणि मुलीचं छान जग उभं केलं. आई-बाबा पाठीशी आहेत, पण त्यांच्या घरी राहायला गेली नाही. स्वतंत्रपणे राहते. एक पालक असणार्‍यांचा एक गट आहे, तिथे सक्रिय आहे. वकीलीतही जम बसतोय, दोघींपुरतं आरामात कमावते.


----------------


आम्ही सारखं त्यावर बोलत होतो, या लग्नाचं कुठे काय चुकलं?
खरं म्हणजे लग्नाआधीही काही थोड्या गोष्टी लक्षात आल्या होत्या, त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं.
हे टाळता कसं आलं असतं?
काही गोष्टींबाबत त्याची मतं काय आहेत? लग्नाकडे तो कोणत्या दृष्टीने पाहतो? हे समजून घ्यायला हवं होतं.
पत्रिका, काही मुलं पाहिल्यावर आता जमायलाच हवं चा ताण, घाई , हे टाळता आलं असतं.

--------------

लग्नासारखी गंभीर गोष्ट आपण गांभीर्याने कधी घेणार?
स्वत:ला ओळखणं, आपल्याला काय हवं आहे, हे ओळखणं, जोडीदार कसा हवा आहे हे ठरवणं, त्याला शोधणं. ह्या यातल्या पायर्‍या आहेत.
लग्न यशस्वी (निदान टिकाऊ म्हणू या) होण्यासाठी हे अपरिहार्यच आहे.
कुणा एकाच्या त्यागावर चालणारी घरं, यापुढे टिकण्याची शक्यता कमी आहे.

--------------
लग्नाच्या खरेद्या, कपडे, दागिने, समारंभ यापेक्षा महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत, हे आपण लक्षात घ्यायला हवं. विवाहपूर्व समुपदेशनाला पर्याय नाही. लग्न आपण का? कशासाठी करतो आहोत? त्यानंतर आयुष्य कसं बदलणार आहे, कुठल्या तडजोडी कराव्या लागतील त्यातल्या कुठल्या मी करणार नाही, ही सारी स्पष्टता लग्नाआधी असायला हवी.

-------------
आपणही एकदा भागवतांची ती ’प्रश्नपत्रिका’ सोडवायला हवी. स्वत:ला, जोडीदाराला ओळखण्याच्या प्रक्रियेत कुठेतरी सवयीने थांबून गेलेलो असू कदाचित! पाणी वाहतं राहायला मदत होऊ शकेल.



*******************



आपल्याकडे आईवडील आणि त्यांची मुलं (एक किंवा दोन) हे एक आदर्श कुटूंब म्हणून सारखं थोपलं जातं. त्याचीच प्रतिबिंबं जिकडे तिकडे दिसत असतात. जाहिरातींमधलं सुखी कुटूंबाचं चित्र बघा. त्यामुळे काय होतं? अविवाहित, परित्यक्ता, मुले नसणारी, एक पालक असणारी कुटूंबे आपण परीघावर ढकलतो. त्यांची जगण्याची पद्धत कम अस्सल ठरवतो. ती फक्त वेगळी आहे असं समजून सामावून का घेत नाही?
माझी मैत्रीण आणि तिची गोड मुलगी जेंव्हा टीव्ही बघत असतील, तेंव्हा त्यांनी त्या जगाशी कसं नातं जोडायचं?


***************

जरा विचार करु या-३

मुळात बाई बाईत फरक हा अनेक गोष्टीत आणि अनेक प्रकारे केला जातो.म्हणजे ती एखादी कामवाली, अडाणी, अशिक्षित, शिकलेली,घर सांभाळणारी अथवा नोकरी करणारी.मुळात त्या बाईशी वागणारी आजूबाजूची मंडळी(त्यात दुसरी स्त्री पण आली) ही तिचा दर्जा......ती मिळवत असलेला पैसा(मग तो चार घरची धुणं-भांडी करुन मिळवलेला असो वा नोकरी करुन)आपल्याला ती स्त्री कीती आणि कशी कामास येते यावर ठरवत असतात.मग त्या स्त्रीचे समोरच्या व्यक्तीशी नाते कोणतेही असो.ती त्याच्या अपेक्षेप्रमाणे पात्र ठरली तर ती चांगली नाहीतर तिला कोणीही यावे कसेही बोलावे व तिच्याशी कसेही वागावे हे ठरलेले असते. यात तिच्या स्वत:चा असा विचार करणारी व्यक्ती आपल्याला पहायला मिळत नाही.हा फरक समाजात अनेक थरांमध्ये वेगवेगळा आढळतो. म्हणजे काही घरांत जिला मुलगा आहे, जी कमावती आहे, जी घरात आपण म्हणू त्याला मान डोलावते,जी आपल्या तालावर नाचते अश्या स्त्रीया या त्यांच्यामते श्रेष्ठ असतात.याउलट जिला मुली आहेत,जी घर सांभाळते पण पैसे कमावून आणत नाही,इतरांचा विचारांबरोबर स्वत:चा विचार सुद्धा करते,व सगळ्यांसमोर आपले मत मांडते.अश्या स्त्रीयांना मिळणारी वागणूक ही नेहमी वेगळी असते.मला वाटतं की एक स्त्री आयुष्याच्या ज्या प्रवासातून जात असते तिने दुस-या स्त्रीला मग ती कोणत्याही जातीची असो, सुशिक्षित असो, वा कोणत्याही थरातील असो. तिला जाणून घेणे हे इतरांपेक्षा एका स्त्रीला खरतर सोपे जायला हवे. पण समाजात हे चित्र आपल्याला खूप कमी ठीकाणी बघायला मिळते. ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

Saturday, April 3, 2010

जरा विचार करू या - २

आमच्या मावशी, आम्ही सर्वत्र मधे राहायला आलो तेव्हापासून आमच्याकडे येतात. तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची मुलगीपण यायची. काम स्वच्छ, नीटनेटकं, जास्त बोलणं नाही की चौकशा नाहीत.


हळूहळू त्या रूळल्या, मग काही काही बोलायला/ सांगायला लागल्या. आधी धाकटी दोन मुलं गावाकडे शिकत होती. मावळात त्यांचं गाव. त्या मुलांना शिकायला इकडं आणलं. मोठा मुलगा आणि मुलगी आधीच इथे आले होते. नवरा मुंबईत गिरणीत होता. सगळे गिरणीकामगार बेकार झाल्यावर हे कुटूंब काही दिवस गावात राहून नंतर इथे आले. नवर्‍याला दारूचं व्यसन. तो काहीच काम करत नाही, इतक्या वर्षात दोन-तीन वर्षे काहीतरी काम केले असेल.

मोठ्या मुलाने दहावीनंतर शाळा सोडली, नोकरीला लागला, मावशींना जरा त्याचा आधार. तो वूडलॅन्ड मधे वॉचमन होता. काही गुंड कुणाशीतरी भांडण म्हणून सोसायटीत घुसले, हा त्यांच्यामागे धावला, प्रतिकार करत होता तर त्यांनी यालाच मारले. तो गेला. मावशी खचल्या, म्हणाल्या मी आता या गावात राहात नाही. मावळात परत गेल्या. महिन्या दीड महिन्याने परत आल्या. तिकडे बसून राहून खायला काय मिळणार? पुन्हा माझ्याकडे यायला लागल्या. कुठे कोर्टात केस करणार? संबंधीत मंडळी म्हणाली पैसे देतो, यांनी मान्य केलं. खूप मागे लागल्यावर ठरलेल्या एक लाखापैकी नव्वद हजार मिळाले. चाळीस हजारात लेकीचं लग्न केलं. चाळीस हजारात सुतारदर्‍यात जागा घेतली. उरलेले उडवले नवर्‍याने. निदान जागा घेतली गेली.

सगळ्यात धाकट्याला कांजिण्या झाल्या, ताप मेंदूत गेला तो हातपाय वाकडे करू लागला. मी हे रोज ऎकत होतेच, नीट चालत नाहीये म्हंटल्यावर मी त्याला मुक्ताच्या डॉक्टरांकडे घेऊन गेले, पुढे न्युरोसर्जन आणि काय काय तपासण्या, पंधरा दिवस दवाखान्यात, मग बरा होऊन घरी आला, वाचला. त्याचे लाड वाढले, अभ्यासातलं लक्ष कमी झालं.

दुसरा अभ्यासात बरा आहे, त्याच्याही परीक्षांच्या वेळेस बापाचा पिऊन गॊंधळ, भांडणे.

मग शेती विकून घर बांधायचे ठरवले, आता पैसे येणारच म्हणून नवर्‍याची दारू, उधारी वाढली.

आम्ही इकडे राहायला आलो. मावशींना म्हंटले तुम्हीच या इकडे. त्यांना पायी बरंच दूर पडतं, पण येतात. मग इथेच आणखी दोन कामे पाहून दिली, त्यांनी मयूर कॉलनीत जाणे सोडले.

खूप प्रयत्नांनी शेती विकली गेली, आलेल्या दीड-दोन लाखात पत्रे घालून घर बांधलं. मोठ्याला दहावीला चांगले मार्क्स मिळाले, तो बारावी करून आता BCS करतोय, अर्धवेळ नोकरी करतोय, तरी महागाई इतकी वाढली आहे, घर चालवणं अवघड जातं.

त्या जरा स्थिरस्थावर झाल्या की काहीतरी संकट उभं राहतं, नवर्‍याची उधारी, नाहीतर दारू, नाहीतर आजारपण.परवा म्हणाल्या, ” घरात अगदी दाणा नव्हता, कुणाकडून तरी शंभर रूपये उसने आणले, त्यातनं किलोभर गहू, साखर आणि असाच काहीतरी किराणा आणला, सत्तर संपले, तीस उरले तर धाकट्याला बरं नाही दोन दिवसांपासून म्हणून दवाखान्यात पाठवला.” त्यांना रोज भाजी खाणं शक्य होत नाही. समतोल आहाराचं काय? धाकट्याला कावीळ आहे म्हणून डॉक्टरांनी सांगीतलं. तपासण्या करायला सांगीतल्या. ’दैव कसं कुठूनही मारायलाच बघतय’ म्हणत होत्या.

आज तपासणीचे रिपोर्ट आले. त्यांना सोडायला आणि रिपोर्ट बघायला गेले होते. ऎरवी कधी सोडायला गेले तर त्यांना शिवतीर्थनगरच्या रस्त्यावरच सोडते. आज घरी गेले. इतके आत आत घर आहे, मला सापडले नसते. रिपोर्ट पाहिला. हिमोग्लोबीन ६.४ आहे, WBC खूप कमी आहे. डॉक्टरांनी अ‍ॅडमीट व्हायला सांगीतलं आहे.

काय करायचं या बाईने आता?

मी तरी काय करते? करू शकते? हवे तेंव्हा हात उसने पैसे देते, त्यांना बरं वाटावं असं बोलते, त्यांचं ऎकून घेते, त्या नाही आल्यातरी चालवून घेते. यापलीकडे काय??



गेल्या दहावर्षात माझं आयुष्य कसं गेलं? संथ, निवान्त.

का? माझ्या जातीमुळे? माझ्या शिक्षणामुळे?

बाई बाईच्या आयुष्यात इतकी तफावत का असते?

त्यांनी माझ्याघरी काम करावं, असं मी काय कमावलंय? मी त्यांना कामाचे मोल देऊ शकते, तेही स्वत: कमावून नाही तर माझा नवरा कमावतो म्हणून!

जगण्याच्या प्राथमिक गरजांसाठी मला झुंजावं लागत नाही, म्हणून मला इतर गोष्टी सूचू शकतात.

मी जे माझे प्रश्न म्हणते ते मावशींच्या खिजगणतीत तरी असतील का?

ते माझे प्रश्न तरी खरे की आभासी?



*****************



आत्ता जरी मला याचा त्रास होत असला तरी हे लिहून झालं की मी उठेन. सचिनकडे कांदाभात न्यायचाय म्हणून कांदा बारीक चिरेन. मन लावून भात करेन. तिथे गेल्यावर मजेत गप्पा मारेन, एका कोपर्‍यात मावशींना आठवत असले तरी.

मावशी कुठ्ला दवाखाना स्वस्तात पडेल याचा विचार करत असतील.

त्या कुठे घरगुती/ अंधश्रध्देचे उपाय करत नाहीयेत याचं बरं वाटून घेईन.

.

 . Epstein files मधून जे जे काही बाहेर येतं आहे ते भयंकर आहे. Jeffrey Epstein हा माणूस आहे का सैतान? त्याने इतक्या बालिकांचं लैंगिक शोषण केल...